Tuesday, December 23, 2008

दिपस्तंभ !


तुझा आवडता फलंदाज असा कोणी मला अगदी मध्यरात्री गाढ झोपेत असताना प्रश्न विचारला तर मी एकच उत्तर सांगेन राहुल द्रविड..भारतीय संघाला मोठ्य़ा फलंदाजांची कमतरता कधीही नव्हती,विजय हजारंपासून अगदी वीरेंद्र सेहवाग पर्यंत अनेक मोठे फलंदाज भारताला मिळाले आहेत. यापुढही मिळतील.पण या सा-या फलंदाजांच्या मांदियाळीत मि.डिपेंडेबल म्हणता येईल असा एकचं फलंदाज आतापर्यंत भारताला मिळालाय तो म्हणजे राहुल राहुल द्रविड

मला आठवतय,1996 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल भारताच्या संघात आला.वनडे क्रिकेटचा थरार काय असतो हे त्या विश्वचषकात जयसुर्या-कालूविथरणा जोडीनं दाखवून दिलं होत.भारताकडेही त्यावेळी सचिन,जडेजा सिद्धु यासारखे फटकेबाज खेळाडू होते.त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीनचा वारसा सांगणा-या त्याच्याच परंपरेरीतली शैलीदार फलंदाजी करणा-या राहुलनं भारतीय संघात प्रवेश मिळवला.1996 साली ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित त्यानं सौरव गांगुलीच्या साह्यानं कसोटी पदार्पन केलं.चार बाद...अशा एका अगदी नाजूक परिस्थीतीमध्ये त्यानं सौरवच्या साह्यानं हा डाव सांभाळला.या डावात सौरवनं शतक मारलं.मात्र द्रविडला शतकानं पाच धावांनी हुलकावणी दिली.या कसोटीत सौरवच्या शतकाप्रमाणे राहुलच्या 95 धावाही अतिशय महत्वाच्या होत्या.मात्र त्याच्या या महत्वपूर्ण खेळाकडे सा-याच दुर्लक्ष झालं.पहिल्या कसोटीपासून ते सध्याच्या महोली कसोटीपर्यंत सातत्यानं द्रविडच्या फलंदाजीचं मनमोकळं कौतूक जगात झालंच नाही.

राहुलकडं दुर्लक्ष झालं याच कारण तो ज्या काळात खेळायला आला त्याकडे आहे.त्याची फलंदाजी सुनील गावस्कर,हेन्स,बॉयकॉट,हनीफ या खेळाडूंच्या परंपरेतली होती.तर 1996 या वर्षात सचिनचा सूर्य अगदी मध्यावर होता.सचिनच्या फलंदाजींन भारतीय क्रिकेटची परिभाषाचं बदलून टाकली. आक्रमकतेचा नवा मुलमंत्र सचिननं भारतीय क्रिकेटला दिला.त्यानंतरचे सौरव सहेवाग किंवा सध्याचा युवराज सिंग या सा-यांच्या फटका-यांच्या झगमगाटाट द्रविडची फलंदाजीही संपूर्णपणे वेगळी आहे.आज 20-20 च्या या जमान्यात केवळ विध्वंस करणं हीच बॅटींगची व्यख्या झालीय.मात्र ही व्यख्या करणारे हे सोयिस्कर रित्या विसरतात की लढाई केवळ तलवार,बंदूका यांच्यासाह्यानं लढता येत नाही तर ही लढाई जिंकण्यासाठी ढालही तितकीच मजबूत असावी लागते.शत्रूवर हल्ला करण्याकरता एक भक्कम बालेकिल्ला तुमच्याकडं असायला हवा.राहुल द्रविड ही भारतीय संघाची अशी ढाल होती की जी पुढं करुन भारतानं वेगवेगळ्य़ा देशांमधल्या लढाया जिंकल्या.राहुल द्रविड हा असा एक मजबूत खांदा होता की ज्याच्या खांद्यावर भरवसा ठेवून भारतीय तोफा गेली अनेक वर्षे धडाडल्या.

भारतीय संघाचं परदेशात कसोटी जिंकणं म्हणजे जनसंघानं लोकसभेच्या जागा जिंकण्यासारखी परिस्थीती 1996 पूर्वी होती.या जनसंघाचं भाजपमध्ये रुपांतर करण्याचं काम द्रविड या निस्पृह फलंदाजानं केलं.राहुल द्रविडनं केलेल्या नांगरणीनूनच भारतीय संघाला परदेशात विजयाचं पीक काढंता आलंय.सिडनी असो की लाहोर हेडिंग्ले असो की जमेका क्रिकेट विश्वातल्या कोणत्याही कोप-यात भारतानं जे विजय गेल्या दशकात मिळवलेत.त्या विजयात राहुलचा वाटा सर्वात मोठा आहे.2001 साली कोलकता कसोटीमध्ये त्यानं जी अविस्मरणीय भागीदारी व्ही.व्ही.एस लक्ष्मण बरोबर केली.त्याला कोणाताच भारतीय क्रिकेट रसीक कधीच विसरणार नाही.भारताचा सर्वात अविश्वसनीय विजय म्हणूनचं या कसोटीकडं पाहवं लागेल.

द्रविड फक्त कसोटीचा फलंदाज आहे असा आरोप नेहमीच होत आलंय.(याच कारणामुळे काहीही काऱण नसताना त्याला या वर्षाच्या सुरवातीला वनडेतून वगळण्यात आलं.) पण सचिन आणि सौरवनंतर वनडेमध्ये 10 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज आहे फक्त राहुल द्रविड.जे अगदी नवडे स्पेशालिस्ट फलंजा ओळखले जातात त्या विरेंद्र सेहवागचे वनडेत शतकं आहेत 9 आणि सरासरी आहे 33.28,युवराज सिंगची आहेत 10 शतकं आणि 37.16 इतकी सरासरी उलट राहुल द्रविडची अगदी 333 एकदिवसीय सामने खेळूनही सरासरी आहे 39.49.कसोटीमध्येतर त्याच्या दर्जाशी आणि गुणवत्तेशी फक्त सचिनच स्पर्धो करु शकेलं.हे संपूर्ण 2008 खराब जाऊनही त्याची सरासरी आहे 52.52 कसोटी क्रिकेटच्या 100 वर्षांच्या इतिहासात ही सरासरी पार करणारे अगदी मोजकेच फलंदाज असतील.कसोटी खेळणा-या प्रत्येक देशात शतक झळकावाणरे अगदी बोटावर मोजता येतील इतके फलंदाज आहेत.त्या यादिय द्रविडनं स्थान सचिनच्याही आधी मिळवलं होतं.(सचिनचाही या यादीत द्रविडच्या नंतर समावेश झालाय.)

ह्या महान फलंदाजासाठी हे संपूर्ण वर्ष मात्र अगदी खराब गेलं. त्याच्या बॅटला या संपूर्ण वर्षात ग्रहण लागलं होतं.फलंदाजाची स्टार व्हल्यू जेवढी जास्त तेवढी त्याच्या अपयशाचा आवाजही मोठा असतो.टिव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांच्या स्पोर्टस पेजवर हा आवाज सर्वात जास्त घुमतो.द्रविडनं निवृत्त व्हावं का हा सध्या भारतानं पाकिस्तानवर हल्ला करावा का या प्रश्नानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न बनलाय.(हा प्रश्न अजुन भारत-पाकिस्तान युद्दापेक्षा महत्वाचं बनला नाही हे आपल्या सर्वांचे सुदैवंच मानावं लागेल) मात्र आता मोहाली कसोटीमधल्या शतकानं आपण संपलो नसल्याचं त्यानं जगाला दाखवून दिलंय.20-20 क्रिकेटच्या या फास्टफूडच्या जमान्यात द्रविडही सर्व पक्वान्नांनी भरलेली डिश आहे.ब-याचदा आक्रमकता ही बेदरकार ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक संघात असा एका दिपस्तंभ असावाचं लागतो.हा दिपस्तंभ म्हणजे राहुल द्रविड आहे.

मला अनेक गोष्टींची हुरहुर वाटते,आपल्याला लोकमान्य टिळक आणि सावरकरांचे भाषणं ऐकता आली नाहीत.जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वानं भारलेल्या विद्यार्थी शक्तीचा काळ मी अनुभला नाही.गॅरी सोबर्स,डॉन ब्रॅडमन ह्यांची फलंदाजी पाहण्याचं भाग्यही मला मिळालं नाही मात्र मी माझ्या आयुष्यातली 12 वर्ष राहुल द्रविडची फलंदाजी पाहीलीय. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात ही राहुलची ही फलंदाजी मला एक सतत नवी उभारी देत राहील. काळ कसाही असो परिस्थिती कशीही असो न डगमगता न खचता आपलं काम करत राहयचं...माझ्या कुटूंबासाठी माझ्या मित्रपरीवारासाठी त्याहीपुढं जाऊन माझ्या देशासाठी एक मिस्टर डिपेंडेबल बनण्याचा सतत प्रयत्न करायचा ...त्यामुळेच मी या ब्लॉगच्या अगदी सुरवातीला म्हंटलंय की तूझा आवडता फलंदाज कोणता असा प्रश्न मला कोणी अगदी गाढ झोपेत अगदी मध्यरात्री कोणी मला प्रश्न विचारला तर मी सांगेनं राहुल द्रविड !

Tuesday, December 9, 2008

इलेक्ट्रॉनिक मिडिया नवे सॉफ्ट टार्गेट


महाराष्ट्रात कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट घडली तर त्याला गोष्टीला शरद पवारचं जवाबदार आहेत.असं म्हणायची पद्धत गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रचलित आहे.(याला वैतागून लातूरचा भूंकपही मीच घडवला असा आरोप करा असं शरद पवार एकदा म्हणाले होते) त्याच प्रमाणे देशातल्या कोणत्याही घटनेनंतर त्या घटनेची भीषणता वाढण्यास इलेक्ट्रॉनिक मिडियाचं जवाबदार आहे असा आरोप अशा प्रकारचा नवा ट्रेंड सर्वत्र (विशेषत: मुद्रीत माध्यमांमध्ये) प्रचलीत झालाय. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियावर वेगवेगळे आरोप करण्याची जणी स्पर्धाचं वाढलीय. ही स्पर्धा सध्या इतकी वाढलीय की हा हल्ला आपला टिआरपी वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडियानंचं घडवून आणला असा आरोप कोणी केला तर मला याचं आश्चर्य वाटणारं नाही.

सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मुंबईवरचा हा हल्ला एवढा भयानक असेल की याची कल्पना सुरवातीच्या काही तासात कोणालाचं आली नव्हती.अगदी इलेक्ट्रॉनिक मिडियाही त्याला अपवाद नाही.असं असतानाही ह्या हल्ल्ल्याच्या काळात कोणतीही चूकीची अथवा भीती पसरेल अशा प्रकारची बातमी जाणार नाही याची आंम्ही सारे जण काळजी घेत होतो.26/11 च्या रात्री सा-या बातम्या इतक्या वेगानं येऊन आदळंत होत्या की त्या कुठून येतायत हेही कळत नव्हतं.अशा परिस्थीतही देशात कोणत्याही प्रकारचा तणाव वाढेल अशी बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिली नाही.अशा भयानक परिस्थीतीमध्ये अत्यंत संयमानं वार्तांकन कराव याची जाणीव आंम्हा सर्व पत्रकारांना नक्कीच आहे.त्यामुळेच मृतदेह,सांडलेल्या रक्ताचा सडा,अथवा असाप्रकारचे बटबटीत अनेक दृश्य आमच्याकडं असूनही आंम्ही ती दाखवण्याचं टाळलं. तसंच यासंबधीची जी दृश्य दाखवली गेली त्यामधल्या बटबटीत आणि चित्त विचलीत करु शकतील अशी दृश्यांना ''ब्लर'' ही करण्यात आलं होत.

हेमंत करकरे आणि अन्य पोलीस अधिका-यांचा मृत्यू इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच झाला.अशी बातमी एका माझ्या आवडत्या वृत्तपत्राच्या संकेत स्थळावर मी वाचली होती. एकांगी विचाराचा हा अस्सल नमुना आहे.वास्ताविक ज्यावेळी सगळीकडून अंदाधुंद गोळीबार होत होता त्यावेळी टीव्ही बघायला या अधिका-यांना वेळ तरी होता का ? उलट खराब दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेचं या अधिका-यांचा मृत्यू झाला.ही वस्तुस्थीती सरकारसमोर मांडण्याचं काम इलेकट्रॉनिक माध्यमांनीचं सर्वप्रथम केलं.दुसरा आणखी एक फालतू मुद्दा म्हणजे की अतिरेक्यांना टीव्हीमुळे बाहेर काय चालले आहे याची खडा न् खडा माहिती मिळत होती.जणू काही तुमच्या वाहिन्यांवरच्या बातम्या बघूनच ते त्यांची रणनीती ठरवत होते. असा लोकांचा समज होता. पण या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, हे सर्व अतिरेकी अत्यंत तयारीने आले होते आणि आपल्याला काय करायचे आहे याचे पूर्ण भान त्यांना होते म्हणून ते मुंबईचे एवढे नुकसान करु शकले.ताज आणि ओबेरॉय मधील विद्युतप्रवाह आणि टीव्ही कनेक्शन त्वरीत बंद केले होते याची माहिती जनतेसमोर दडवण्यातचं अनेकजण धन्यता मानत आहेत.

उलट ह्या हल्ल्याची परिणामकारता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच तात्काळ सा-या जगभरात पोचली.हा हल्ला किती गंभीर आहे.ह्याची जाणीव देशातल्या नागरिकांना या बातम्यांमुळे तात्काळ झाली.त्यामुळेच या हल्ल्याच्या दुस-या दिवशी अनेक मुंबईकरांनी घराबाहेर जाणं टाळलं.त्यामुळे मुंबईच्या व्यवस्थेवर निर्माण होणारा ताण यामुळेचं टळला.या महत्वाच्या प्रसंगी राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता सर्वांपर्यंत पोचवण्याचं कामही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीच केलं. आर.आर.पाटलंच या हल्ल्याबाबतचं धक्कादायक विधान,विलासराव देशमुखांची ताज टूर याच माध्यमांमुळे जनतेपर्यंत पोचली. शिवराज पाटील सारख्या संवेदनशून्य नेत्याचे 'कपडे' काढण्याचं काम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीचं अनेक वेळा केलं आहे.

ह्या हल्ल्याच्या पाठिमागेही पाकिस्तानचं कनेक्शन आहे.ह्याची जाणीव अगदी पहिल्याच क्षणी सा-यांना झाली होती.तरीही ठोस पुरावा हाती आल्याशिवाय या प्रकरणात पाकिस्तानचं नावं घेणं इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी टाळंलं.ह्या नाजूक क्षणी कोणताही नवा तणाव निर्माण होणार नाही ह्याची काळजी सर्व माध्यमं घेत होती.एक याबाबत आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की इलेक्ट्रॉनिक मिडियात कोणतीही बातमी सांगताना ती बातमी सिद्ध करणारी VISUALS , BYTE असल्याशिवाय दाखवता येत नाही.बाप दाखव नाही तर श्राद्ध करं असा हा प्रकार असतो.उलट वृत्तपत्रामधल्या अनेक बातम्या ह्या टेबल न्यूज असतात हे अगजी उघड गूपीत आहे.कदाचित याच कारणामुळे इलेक्ट्रॉनिक मिडियाची सर्वसामान्य जनतेमधली विश्वासहर्ता जास्त आहे.(नेमक्या याच असूये पोटी इलेक्ट्रॉनिक मिडियाला वारंवार टार्गेट केलं जात नसेल ना ? )

युद्ध, दहशतवादी हल्ला अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये माध्यमांचं व्यवस्थापन कसं करावं याचं व्यवस्थापन या देशात अजूनही विकसीत झालेलं नाही.ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या कमांडो कारवाईची दृश्य दाखवली गेली नाही.कारण या ठिकाणी कारवाई करणा-या कमांडोमनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांना अशा प्रकारची सूचना केली होती.सर्वच माध्यमांनी ही सूचना पाळली.यापूर्वीही जम्मूमध्ये झालेल्या एका लष्करी ऑपरेशनमध्ये प्रसिद्धी माध्यमांना घटनास्थळाच्या दोन किलोमीटर आगोदरच थांबवण्यात आलं होतं.ह्या निर्णयालाही कोणत्यीच प्रतिनिधीनं विरोध केला नाही. अशा नाजूक प्रसंगी सरकारशी सहयोग आंम्ही नेहमीच केला आहे.मात्र सरकारी यंत्रणेमध्येच जर समन्वय नसेल तर या भोंगळ कारभारचं खापर इलेक्ट्रॉनिक मिडियावर फोडण्याचं काम सरकारकडून केलं जातं.

या देशात 24 तास काम करणा-या वृत्तवाहिन्याचं वय अवघी दहा वर्षे आहे. या अपु-या अनुभवामुळे या माध्यमांकडून कळत नकळत काही चूका झाल्या असतील.अशावेळी या चुका संमजसपणे निदर्शनास आणून देण्याचं काम या देशातल्या उज्जवल परंपरा असलेल्या वृत्तपत्रांनी करावं.या माध्यामातल्या पत्रकारांना हा वडीलकीचा नक्कीच अधिकार आहे.परंतु या पत्रकारांकडून सध्या उघड उघड भाऊबंदकी सुरु आहे. याच वृत्तपत्रांनी घालून दिलेल्या ट्रेंडच पालंन लबाड राजकारणी,बेजावबदार पोलीस अधिकारी किंवा निगरगट्ट प्रशासकही करु लागलेत.या सा-यांना इलेक्टॅनिक मिडियाच्या रुपानं एक नव स्फॉट टार्गेटचं सापडलंय.अशा प्रकारचा अंधाधुंद हल्ला आणखी किती काळ करायचा याचा विचार ज्यानं त्यानंच करायला हवा.

Thursday, December 4, 2008

दोन लातूरकर..




मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्यानंतर दोन लातूरकरांचा राजकीय बळी गेलाय.या हल्ल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभापूढे नमतं घेत (खर तर निवडणुकांची गणितं समोर ठेवून) गृहमंत्री शिवराज पाटील आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा देण्याचे निर्णय कॉँग्रेस हायकमांडन दिले.केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचं मुख्यमंत्री ही दोन्ही अत्यंत महत्वाची पदं गेली चार वर्षे लातूरकडं होती.लातूरचं नाव देशात चर्चेत ठेवण्यात या दोन नेत्यांचा नेहमीच महत्वाचा वाटा राहीलाय.एक लातूरकर या नात्यानं या दोन्ही नेत्याची राजकीय काराकीर्द मला जवळून पाहता आलीय.
मला आठवतीय 1996 लोकसभा निवडणूक शिवराज पाटील हरणार असंच सा-या लातूर शहरात वातावरण होतं.त्यांच्या विरोधात गोपाळराव पाटील सारखा तगडा उमेदवार भाजपनं दिला होता.त्या काळातला भाजप हा आजच्या भाजपपेक्षा बराच सोज्जवळ होता.भाजपची सा-या देशभर हवा होती.अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुपानं पंतप्रधान पदाचा एक चांगला उमेदवार देशापुढं होता.त्या अटलजींच भाषण ऐकण्याकरता लातूरच्या राजस्थान शाळेच्या मैदानावर मोठी गर्दी झाली होती.मी अटलजींच प्रत्यक्ष ऐकलेलं ते पहिलं भाषण..सारा जीव कानात एकवूटन मी अटलजींच प्रत्येक भाषण ऐकलेलं आहे.त्या भाषणात अटलजी एक वाक्य बोलले होते,''शिवराज पाटील बहूत अच्छे नेता है उन्होने संसद काफी अच्छी तरहसे चलायी''अटलजींच्या त्या एकाच वाक्यामुळे माझ्या मनात शिवराज पाटील यांच्याबद्दलचा आदर अनेक वर्ष टिकवून ठेवला होता.
खरतर शिवराज पाटील यांची प्रकृती ही परंपरागत राजकारण्यासारखी कधीच नव्हती.पांढरे बूट,पांढरी कडक इस्त्रीची सफारी,चोपून बसवलेला भांग आणि अगदी अगम्य इंग्रजी बोलणारा माणूस म्हणजे शिवराज पाटील अशीचं त्यांच्याबद्दल माझी लहाणपणी प्रतिमा होती.ते 1972 पासून राजकारणात आहेत.या 36 वर्षात आमदार,खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष,अगदी केंद्रीय गृहमंत्री अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवली.पण या 36 वर्षात त्यांनी लातूरकरता काय केलं याचा शोध मला आजपर्यंत कधीच लागलेला नाही.राजकारणी लोकांप्रमाणे जनसंपर्क,कार्यकर्त्यांचा गराडा,सर्वसामान्य जनतेची वर्दळ या माणसानं कधीचं अनुभली नाही.हा गांधी घराण्याशी निष्ठा हा महत्वाचा कॉँग्रेसी बाणा
त्यांच्यामध्ये पुरेपूर भिनलाय..
मला आठवतंय 30 स्पटेंबर 1993 ला लातूर जिल्ह्यात मोठा भूकंप झाला होता.या भीषण भूकंपानंतर सा-या जगभरातून लातूर जिल्ह्यात मदत कार्य सुरु होतं.या सा-या मदतकार्यात हे आमचे लातूरचे सन्माननीय खासदार महाशय पूर्णपणे गायब होते.ते अवतरले थेट सोनिया गांधीच्या लातूर दौ-यात.त्या काळात सोनिया गांधी सक्रीय राजकारणात नव्हत्या.पण भूकंपग्रस्तांची पाहणी करायला म्हणून पहिल्यांदाच जाहीररीत्या त्या जनतेत आल्या होत्या.हे आमचे खासदार लातूरच्या ग्रामीण भागात अपला सूट सांभाळत दबकत दबकत फिरत होते.कोण काय म्हणंत ते बाईंना इंग्रजी अनुवाद करुन सांगत होते.या आपत्तीमध्ये शिवराज पाटलांचे आंम्हाला झालेले हे एकमेव दर्शन.
गांधी घराण्याच्या याच निष्ठेचं फळं त्यांना 2004 साली मिळालं.वास्ताविक ते लातूरची लोकसभा निवडणुक हरले होते.(मी आणि माझ्या मित्र कंपनीनं केलेलं ते पहिलं मतदान,आमच्या मतामुळे एक मातब्बर निष्क्रीय खासदार हरला याचा आनंद आंम्हा सा-यांना होता.) पण या निकालानंतर सोनिया गांधीनी आंम्हाला मोठा धक्का दिला.ज्या शिवराज पाटलांना लातूरकरांनी नकारलं होतं त्या शिवराज पाटलांना त्यांनी थेट गृहमंत्री म्हणून सा-या देशाच्या डोक्यावर बसवलं.
त्याच्या अगदी उलट विलासरावांचं राजकारण होतं.बाभुळगावच्या सरपंचपदापासून त्यांनी आपली काराकिर्द सुरु केली.ते लातूरचे आमदार बनले.अंतुलेंच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री बनले.त्यांच्याच प्रयत्नामुळे 1982 साली लातूर जिल्हा बनला.त्या नंतरच्या 26 वर्षात विलासरावांनी अनेक वेगवेगळी मंत्रीपद सांभाळली.1999 साली मुख्यमंत्री होण्यापूर्वी जवळपास सा-या खात्याच्या मंत्रीपदाचा त्यांना अनुभव होता.एक आमदार म्हणून मंत्री म्हणून मोठं होत असताना त्यांनी लातूरच्या विकासाकडंही जातीनं लक्ष पुरवलं हे मान्य करावचं लागेल.आज लातूर जिल्हा हा महाराष्ट्रातला एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो.नैसर्गिक दृष्ट्या लातूरकडं कोणतीही जमेची बाजू नाही.रेल्वे सारख्या विकासाच्या महत्वाच्या दळणवळण साधनापासून लातूर अगदी अलिकडच्या काळापर्यंत अलग होत.( लातूरमधल्या माझ्या अनेक मित्रांनी वयाच्या 17 व्या 18 वर्षी पुण्यात आल्यावर पहिल्यांदा रेल्वे पाहिली आहे) या सर्व अडचणींवर मात करत लातूर विकासाच्या दिशेनं झेपावतंय.याचं महत्वाचं श्रेय विलासरावांच्या नेतृत्वालाच द्यावं लागेल.
या दोन्ही लातूरकरांची शेवटचा कार्यकाळ मात्र नेहमी वादग्रस्त ठरला.कॉँग्रेसमधला सर्वात सोयीचा नेता म्हणून शिवराज पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आलं.तर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला छेद देणारा तगडा मराठा नेता म्हणून विलासराव दुस-यांदा मुख्यमंत्री झाले.शिवराज पाटलांच्या काळात देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे पार वाभाडे निघाले.दिल्ली,जयपूर,हैदराबाद,बेंगळूरु,अहमदाबाद,मालेगाव यांच्यासह गुवाहटी,आगरतळा या सारख्या इशान्य भारतामधल्या देशात बॉम्बस्फोट झाले.मुंबईवर हल्ला करुन दहशतवाद्यांनी सा-या देशाशीच युद्ध पुकारलं होतं.तरीही दहशतवाद्यांना शोधून काढू आणि त्यांना कठोर शासन देऊ, अशी साचेबंद प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी प्रत्येक वेळी दिली.दिल्ली बॉम्बस्फोटानंतर तरदेशाचे गृहमंत्री ठिकठिकाणी भेट देण्यासाठी आपले सफारी सूट बदलण्यात मश्गूल होते. सुरक्षा दलांना आवश्यक ते आदेश देण्यापेक्षा आणि बॉम्बस्फोटातील जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यापेक्षा त्यांना आपले कपडे बदलणे महत्त्वाचे वाटले.सा-या देशाला या सुटातल्या 'निरोची' लाज वाटली होती.
विलासरावांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही अनेक आपत्ती राज्यावर आल्या.26 जुलैला मुंबईत झालेली अतिवृष्टी,रेल्वे बॉम्बस्फोट,खैरलांजी प्रकरण, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या या प्रत्येक आपत्तीत विलासरावांच सरकार ढिम्मचं राहीलं.राज ठाकरेंच्या काठीनं शिवसेनेचा साप मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला.राज यांची जी लार्जर दॅन लाईफ प्रतिमा मुंबई आणि परिसरात निर्माण झालीय.ही प्रतिमा बवनण्यात विलासराव सरकारचाचं मोठा वाटा आहे.मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला या दोन्ही लातूरकरांच्या अकार्यक्षम कारभाराचा कळसअध्याय ठरला.कोणतीही आपत्ती असू दे बेफिकीर राहयची सवय विलासरावांना लागली होती.याच बेफीकीरीतून ते ताज हॉटेलची पाहणी करायला रामगोपाल वर्माला घेऊन गेले.माध्यमांनी हे सर्व प्रकरण उचलून धरल्यानंतरही त्यांचा देशमुखी बेफीकीरपणा कमी झालेला नव्हता.
आता या दोन्ही लातूरकरांच्या खुर्च्या गेल्या आहेत.एकुण विचार केला तर शिवराज पाटील यांची राजकीय काराकिर्द आता संपली असंच म्हणावं लागेल.विलासराव देशमुखांना मात्र कॉँग्रेस पक्षामध्ये अजुनही भवितव्य आहे.कोणतीही राजकीय परिस्थिती नसताना हे दोन्ही लातूरकर देशाच्या तसंच राज्याच्या राजकारणात मोठे झाले.पश्चिम महाराष्ट्रातल्या तसंच उत्तर भारतामधल्या प्रबळ लॉबीला नमवून महत्वाची पद त्यांनी हस्तगत केली.एवढी महत्वाची पद मिळूनही हे नेते स्वत:च्याच धुंदीत मग्न राहीले.हायकमांडची मर्जी राखण्याकरता त्यांनी जितकी खटपट केली त्याच्या निम्मी जरी कार्यक्षमता दाखवली असती तरी त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती.
राजकीय क्षेत्रातल्या या नेत्यांच्या लातूर पॅटर्नला आज सेटबॅक बसला आहे.मात्र ह्या नेत्यांच्या चुकांपासून बोध घेत विकासाचा,कार्यक्षमतेचा प्रगतीचा नवा लातूर पॅटर्न कोण निर्माण करणार हा प्रश्न माझ्यातल्या एका लातूरकराला पडलाय.

Saturday, November 29, 2008

मुंबई 26/11...


मुंबईसह सा-या देशाला 59 तास वेठीस धरणारा दहशतवाद्यांचा नंगानाच आता संपलाय.देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा चिंधड्या उडवणा-या या घटनेचे अनेक कंगोरे येणा-या काही दिवसात पुढं येतील.मात्र या घटनेतून तीन महत्वाच्या गोष्टी समोर येतायत.
यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या संपुर्णपणे चिंधड्या उडाल्या हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.यापुर्वीही कारगील युद्ध किंवा संसदेवरच्या हल्ल्याच्या प्रसंगीही ही गोष्ट समोर आली होती.या दारुण नामुष्कीनंतर वास्ताविक गुप्तचर यंत्रणेनं सावध राहयला हवं होत.मात्र तरीही ही यंत्रणा बेफीकीर राहीली.मुंबईच्या या ताज्या हल्ल्यानंतरतर आपल्या देशाची यंत्रणा जगातली सर्वात खराब गुप्तचर यंत्रणा आहे हेच सिद्ध झालंय.देशातली प्रत्येक इमारत आणि प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणं जगातल्या कोणत्याही पोलीस यंत्रणेला शक्य नाही.कोणत्याही दहशतवादाचा सामना हा गुप्तचर यंत्रणेच्या साह्यानंच केला जातो.आपली यंत्रणा याबाबत संपुर्णपणे झोपलेली होती.हे सर्व दोन डझन अतिरेकी बोटीनं भारतामध्ये आले.मुंबईमधल्या आपल्या इच्छित स्थळी जाऊन पोचले.या संपुर्ण स्थळांची माहिती त्यांच्याकडं होती.या सर्व दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण या शहराचे स्थानिक नागरिक होते.त्यांच्या या कार्याला अनेक जगभरातल्या अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत केली गेली,मात्र याचा पत्ता गुप्तचर यंत्रणेला लागला नाही.हे सर्व दहशतवादी बिनभोबाटपणे शहरात घुसले.त्यांना हव्या त्या ठिकाणी नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं आणि ठार मारलं.गेले अनेक दिवस वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड पकडले गेले हा भारतीय सुरक्षा यंत्रणेचा दावा किती बिनबूडाचा होता हेच यातून सिद्ध झालंय.
यामधून समोर आलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर चाललेला जिहाद दहशतवाद्यांनी भारतीय भूमीवरही पुढं सुरु ठेवला.ह्या पूर्वीच्या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरुन मदत केली जायचे.त्यांच्या घातपातामागची कारणंही स्थानिक होती.(गुजरात दंगल, बाबरी ढाचा पाडणं इ...)मात्र या दहशतवाद्यांचे लक्ष्य वेगळं होत.अमेरिकन ब्रिटीश आणि इस्त्रायल ही दूष्ट राष्ट्रांची नागरिक हेच त्यांचं मुख्य टार्गेट होतं.ताज.ओबेरॉय किंवा नरिमन हाऊस ह्या वास्तू त्यांनी ताब्यात घेतल्या.ह्याचही हेच कारण होतं.धर्माची अफूची गोळी घेऊन जीवावर उदार झालेले हे संतप्त तरुण नव्हते.तर हे तरुण जागतिक दर्जाचे व्यवसायिक दहशतवादी होते.दहशतवादांच्या जागतिक युद्धात आता भारताची जमीनही वापरली जाणार ही गोष्ट या प्रकरणातून समोर आलीय.
या प्रकरणातली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा भारताच्या आर्थिक साम्राज्यावरचा हल्ला आहे.अमेरिकेवर 9/11ला झालेल्या या हल्ल्याशीच याची तुलना करावी लागेल.अल कायदानं वर्ल्ड ट्रेड सेंटर निवडलं कारण त्यांना अमेरिकेच्या आर्थिक गंडस्थळावर हल्ला करायचा होता.सा-या अमेरिकेची शान असलेली वास्तू त्यांनी उडवून लावली.या देशात कोणताच अमेरिकी नागरिक सुरक्षित नाही ही भिती त्यांना अमेरिक नागरिकांच्या मनात निर्माण करायची होती. नेमकी हीच भिती सर्व भारतीयांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून अतिरेक्यांनी यंदाच्या हल्ल्याची ठिकाणं निवडली आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतली सर्वात क्रिम समजले जाणारी हॉटेल त्यांनी निवडली.दक्षिण मुंबई हा मुंबईतलाच नाही तर सा-या देशातला सर्वात सुरक्षित भाग समजला जातो.ताज आणि ओबेरॉयमध्ये येणारा व्यक्ती हा देशातला सर्वात उच्चभ्रू समाजातलाच असतो.जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तसंच बॅंकांची मुख्यालंय या इमारतीमध्ये आहेत. या इमारतींना वेठीस धरुन अतिरेक्यांनी सा-या देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाच जबरी हादरा दिलाय.विकसीत भारताची स्वप्न देशांनी ज्या व्यक्तींच्या,संस्थेच्या जोरावर पाहिली होती,त्या नव्या युगाच्या स्वप्नांना या अतिरेकी हल्ल्यानं तडा दिलाय.दहशतवादाच्या 59 तास चाललेल्या नंग्यानाचानंतर या तीन महत्वाच्या बाबी समोर आल्यात.
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही शक्ती आहे.या देशाला हाजारो वर्षांचा सांस्कृतीक इतिहास आहे.या देशाच्या लष्करी शक्तीचा सा-या जगात दरारा आहे.या देशाच्या आर्थिक शक्तीची सा-यांनाच आदरयुक्त जाणीव आहे.या महान भारत वर्षावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.अगदी बगदादमध्ये गेला महिनाभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईपेक्षा कमी नागरिक मारले गेलेत. सा-या देशासाठी या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते.
अशा प्रकारचे हल्ले अमेरिका,ब्रिटनवर यापुर्वी झालेत.मात्र या देशांनी या हल्ल्यानंतर धडा घेतलाय.9/11 नंतर अमेरिकेनं जागतिक दबाबवाला बळी न पडता ( तसंच मानवअधिकार आयोगाच्या थयथयाटाकडं दुर्लक्ष करतं ) आपली संरक्षण व्यवस्था भक्कम केलीय.त्यामुळेच दहशतवाद्यांना आता अमेरिकेऐवजी भारतासारखी 'सॉफ्ट टार्गेट' निवडावी लागत आहेत. भारतावर अशा प्रकारचा हल्ला होणार आणि त्या हल्ल्याला पाकिस्तानचे मदत मिळणार याची माहिती आपल्याला होती.तरीही आपलं सरकार गाफील राहील,त्याचे परिणाम आज शंभर कोटींचा देश भोगतोय.
आताही केंद्र सरकारनी अनेक आश्वासनं दिली आहेत मात्र आता आपल्याला आश्वासनं नको कृती हवी आहे.नुसती सैन्याची जमवाजमव नकोय तर या देश तोडणा-या परकीय शक्तीं विरुद्ध आर पारची लढई हवी आहे...


Wednesday, November 19, 2008

इंदिरा आणि भारत !


19 नोव्हेंबर हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही.याच दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस असतो.माझ्या आयुष्यातल्या आजवरच्या आणि यापुढच्या आयुष्यातही बाबांचा प्रभाव कायम राहील.मात्र स्वत:विषयी लिहण्यासाठी मी हा ब्लॉग वापरणार नाही.हे मी पुर्वीच ठरवलंय.त्यामुळे 19 नोव्हेंबरचं माझ्या देशासाठी आजच्या दिवसाचं असलेल्या महत्वाविषयी मी आज लिहणार आहे.

19 नोव्हेंबर हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा जन्मदिवस.भारताच्या आजवरच्या सर्वात खंबीर पंतप्रधान म्हणून त्यांच नाव आजही अनेकवेळा घेतलं जातं. 1966 साली तडजोडीच्या उमेदवार म्हणून त्या पंतप्रधान बनल्या. त्या काळी आणि (अगदी आजही) कॉँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक दिग्गज नावं शर्यतीमध्ये होते.मात्र या सा-यांना दूर सारुन पंतप्रधान पद त्यांच्याकड चालत आलं (यानंतर अशाच अगदी अनेपेक्षीतपणे 1991 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहरावांकडे पंतप्रधान बनले) मात्र आपण गंगी गुडीया नाही हे त्यांनी नंतरच्या काळात वारंवार सिद्ध केलं.

मोरराजी देसाईंच्या नेतृत्वाखालील दिग्गज कॉँग्रेस नेत्यांचा त्यांना विरोध होता.याच वादामुळे 1969 च्या बंगलोर (आत्ताच बंगळूरु) अधिवेशनात कॉँग्रेसमध्ये पहिल्यांदा फूट पडली.पंडित नेहरुंनी रंगवलेल्या स्वप्नामधून भारतीय बाहेर पडत होते.बंगाल,पंजाब,तामिळनाडू सारख्या महत्वाच्या राज्यात कॉँग्रेस पराभूत झाली होती. जनसंघ,समाजवादी, कम्युनिस्ट यासारखे कॉँग्रेस विरोधी पक्ष सांसदीय राजकारणात बाळसं धरु लागले होते. चीन आणि पाकिस्तान यांच्याशी झालेल्या युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.अन्नधान्यांच्या बाबतीत अमेरिकन मदतीवर देशाला अवलंबून राहवं लागयंच या सा-या आव्हानात्मक परिस्थीतीमध्ये वयाच्या 49 व्या वर्षी 1966 साली इंदिराजींना पंतप्रधानांची शपथ घेतली.एखादी सामान्य राजकरणी या ओझ्यामुळं दबून गेली असती.मात्र इंदिराजी सामान्य कधीच नव्हत्या.या सा-या दबावात्मक परिस्थितीमध्ये उसळी मारण्याची क्षमता त्यांच्यात होती.इंदिराजींनी मारलेल्या उसळीनंतर देशातल्याच नाही तर जगभरातल्या अनेक शक्ती गाडल्या गेल्या.

त्यांनी 1969 साली 14 प्रमुख बॅंकाच राष्ट्रीयकरण केलं.या निर्णयाला मोराराजींसह अनेकांचा मोठा विरोध होता.मात्र आज जागतिक मंदीच्या काळातही भारतीयांचा राष्ट्रीय बॅंकावरचा विश्वास जराही कमी झालेला नाही.राष्ट्रीयकरणाच्या जवळपास चार दशकानंतर इंदिरांजींच्या या निर्णयाचं महत्व तितकचं परिणामकारकरित्या पटतंय..अन्नधान्या समस्येवर मात करण्याकरता इंदिराजींच्याच काळात हरीतक्रांतीला चालना देण्यात आली.कृषी विषयक वेगवेगळे संशोधन प्रकल्प उभारणे,रासायनिक खतांचा वापर करुन जमीनीची उत्पादन क्षमता वाढवणे यासारखे वेगवेगळे प्रयोग या काळात राबवले गेले.आज शंभर कोंटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा महान भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे याचं श्रेय याच हरितक्रांती योजनेला आहे.इंदिरांजींनी जगाचा केवळ इतिहास नाही तर भूगोल हबदलवला.पूर्व पाकिस्तानमधल्या लोंढ्यांचा भारतावर पडणारा ताण त्यांनी सहन केला नाही.पाकिस्तानला पोकळ इशारे दिले नाहीत,अथवा जागतीक समुदायाकडं मदतीची फारशी याचना केली नाही.तर देशाच्या लष्कराचा योग्य वापर करुन त्यांनी पाकिस्तानची फाळणी करुन बांगलादेश निर्माण केला...अमेरिका आणि चीन या पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांच्या अगदी नाकावर टिच्चून भारतानं हा विजय मिळवला होता. जनरल सॅम मानेकशा यांच्या खंबीर युद्ध सेनापती बरोबरच इंदिराजींच्या पोलादी नेतृत्वाला या यशाचं सार श्रेय द्यावं लागेल.याच पोलादी नेतृत्वामुळे बंदूकीची कोणतीही गोळी न झाडता सिक्किमचे भारतामध्ये विलीनीकरण झाले.याच कणखर नेतृत्वामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का देत भारतानं 1974 साली पोखरणमध्ये अणूचाचणी केली.भारत अण्वस्त्रधारी देश बनला.देशाच्या इतिहासात कालालीत बदल घडवणा-या या सा-या इष्ट घटनांमध्ये इंदिराजींचा वाटा सिंहाचा होता हे मान्यचं कराव लागेल.

ह्या झाल्या इंदिराजींच्या सर्व जमेच्या बाजू.मात्र एक या सर्वात खंबीर पंतप्रधानांच खर्चाचं खातंही तेवढंच भक्कम आहे.कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्यच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.आज भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.

इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.
राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमेड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.राजकीय महत्वकांक्षेचा टोकाचा हव्यास इंदिरांजीनी टाळला असता तर हा कटू निर्णय त्यांना घ्यावा लागला असता का याचं उत्तर मला अजुनही सापडलेलं नाही....(तुमच्याकडं असेल तर मला नक्की कळवा.)

आज इंदिराजींच्या मृत्यूला 24 वर्षे झालीत.त्यांच्या हत्येनंतर लहाणची मोठी झालेली 'यंग इंडिया' 21 व्या शतकाचं आव्हान पेलण्यास तयार झालीय.मात्र आजही किंवा या नंतरही पाकिस्तान,दहशतवाद,आर्थिक आणि कृषीविषयक प्रश्वांनाचा विचार करताना इंदिरांजींच्या या क्षेत्रातल्या कामगिरीला विसरता येणार नाही. अगदी ज्या प्रमाणे कालचा,आजचा, आणि अगदी उद्याचा माझा शोध घेणा-या मला माझ्या आयुष्यावरचा माझ्या बाबांचा प्रभाव कधीच पुसता येणार नाही.

माझं आयुष्य आणि माझा देश याचा विचार करत असताना 19 नोव्हेंबर हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही ते याकरताच....

Tuesday, November 11, 2008

ओबामांची अमेरिका


बराक हुसेन ओबामा हे वादळ आता सा-या जगावर धडकायला सज्ज झालंय.ज्या अमेरिकेला वंशवाद,गुलामगिरी आणि वर्णभेदाचा मोठा इतिहास आहे त्या देशात बराक हुसेन ओबामा या सारख्या चमत्कारीक नावाचा अमेरिकन आफ्रिकन अध्यक्ष होणं ही एक क्रांतीकारक घटना आहे.फक्त बारा वर्षीपूर्वी प्रचलित राजकारणात उतरलेल्या ओबामांनी अमेरिकेमधले सर्वशक्तीमान पद काबीज केलंय.तेही प्रस्थापित व्वस्थेचा भाग बनत,समन्वयवादी भूमीकेतून (कोणतेही जातीय अथवा आर्थिक आरक्षण न घेता किंवा 'अल्पसंख्याक' कार्ड न वापरता...)

अमेरिकेच्या 44 व्या अध्यक्षपदासाठी झालेली निवडणुक हीच मुळात मोठी ऐतिहासीक होती.आठ वर्षाच्या बुशशाहीचा शेवट यंदा होणार हे नक्की होतं..बुश यांच्या पक्षानं जॉन मॅकेन यांना झटपट उमेदवारी जाहीर केली.मात्र डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळवण्याकरता ओबामांना मोठा संघर्ष करावा लागला.हिलरी क्लिंटन सारख्या हाय प्रोफाईल उमेदवाराशी त्यांची फाईट विलक्षण रंगली.या निवडणुकीत हिलरीबाजी मारणार हा सा-यांचा होरा चुकवत ओबामांनी बाजी मारली.डेमॉक्रेटीक पक्षाच्या निवडणुकीत ओबामांनी हिलरीचा पराभव करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं तिकीट मिळवलं. 232 वर्षांच्या अमेरिकन लोकशाहीत प्रथमच एखादा ब्लॅक उमेदवार अध्यक्षपदाचा प्रमुख उमेदवार बनला होता.

बुश यांच्या कारभाराला त्रासलेल्या अमेरिकन जनतेला नवा चेंज हवा होता.बुश अध्यक्ष बनताच वर्षभराच्या आतंच वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला.ह्या हल्ल्याचे निमीत्त साधून युद्धपिपासू बुश प्रशासनानं प्रथम अफगाणिस्तान आणि नंतर इराक बेचीराख केलं.या दोन्ही देशात लक्षावधी लोकं मारले गेले.सद्दाम हुसेन यांना फासावर चढवण्यात आलं.इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे कठपूतळी सराकार स्थापन करण्यात आले.मात्र तरीही अमेरिकेला या युद्धात विजय मिळाला नाही. खनिज तेलावर संपूर्ण ताबा मिळवण्याचं अमेरिकन ड्रीम भंग पावलंय. उलट इराकमध्ये रोज मरणारं सैन्य परत बोलवण्याकरता कोणतं कारण तयार करायचं हा प्रश्न आज अमेरिकेपुढ पडलाय.खनिज तेलाच्या किंमती वाढल्यामुळे निर्माण झालेल्या चलनवाढीचा मोठा फटका अमेरिकन अर्थव्यवस्थेला बसलाय.1929 नंतरच्या सर्वात मोट्या अमेरिकन महामंदीला आज अमेरिकाच नाही तर सारं जगं सामोरं जातंय..या सर्व परिस्थिनं गांजलेल्या अमेरिकन जनतेला म्हणबनच यंदा चेंज हवा होता.

मात्र एवढा क्रांतीकारी चेंज अमेरिकन नागरिक स्विकारतील का खरचं मोठा प्रश्न होता.केनियामध्ये जन्मलेला,इंडोनेशीयात बालपण घालवलेल्या बराक ओबामा या 47 वर्षाचे बराक हुसेन ओबामा यांच्या उमेदवारीनं सा-या अमेरिकन नागरिकांना मोठ्या कसोटीवर आणले होते.मात्र या कसोटीमधून अमेरिकन जनता यशस्वीपणे बाहेर पडलीय.अमेरिकेत काहीही अशक्य नाही या ओबांमांच्या विश्वासाला या निवडणुकीत अमेरिकेनं पावती दिलीय.अब्रामह लिंकन,मार्टीन ल्यूथर किंग यांच्या विचारांना आज 21 व्या शतकातल्या भांडवलवादी अमेरिकन्सनं प्रत्यक्षात आणलंय.मध्यमवर्ग आणि युवक या राजकारणामध्ये सहसा लक्ष न घालणा-या समाज घटकांनी यंदा प्रथमच ओबामांना भरभरुन मतदान केलंय.या अमेरिकन निवडणुकीतला हाही एक मोठा बदल आहे.

ओबामांच्या या विजयाचा भारतीय दृष्टीकोणातून अभ्यास करताना मला काही वेगळेच प्रश्न पडलेत. धर्म,वर्ण यांच्या पलीकडं जातं ओबांमानी अमेरिका काबीज केलीय.मात्र भारतीय राजकारण्यांची अस्मिता देशावरुन प्रदेशाकडं प्रदेशावरुन विभागाकडं केंद्रीत होत चाललीय.गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या आसेतु हिमाचल भारतवर्षावर गारुड करु शकेल असा एकही नेता आज दिसत नाही.उलट राजकीय नेते मी पाटण्याचा,मी मुंबईचा ,मी चेन्नईचा या सारख्या विचारांनी देशाच्या एकात्मतेला वारंवार आव्हान देत आहेत.या सारख्या परिस्थीतीमध्ये आधी देश मग प्रदेश असा विचार करणारा नेता भारताला कधी मिळणार हा प्रश्न मला सतावतोय.

अमेरिचे सतत अंधानुकरण करणारे भारतीय युवक ओबामांच्या विजयांचे अनुकरण करणार का ? YES WE CAN ची भारतीय आवृत्ती कधी अनुभवयाला मिळेल याचीच वाट मी सध्या पाहतोय...


Tuesday, November 4, 2008

सलाम ' जम्बो '


गेली अठरा वर्षे भारतीय गोलंदाजीचा भार पेलणारा अनिल कुंबळे आता निवृत्त झालाय. नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदान कुंबळेसाठी नेहमीच लकी ठरलंय...याच मैदानावर झालेल्या इराणी चषकाच्या सामन्यातल्या शानदार कामगिरीच्या जोरावर कुंबळेनं 1990 साली इंग्लंड दौ-यात जाणा-या भारतीय संघात स्थान मिळवलं होतं...1999 साली याच मैदानावर त्यानं पाकिस्तान विरुद्ध एकाच डावात विकेटस घेण्याचा विश्वविक्रम केला... याच मैदानावर च्यानं 7 कसोटीत तब्बल 58 विकेटस घेतलेत.त्याच मैदानावर कुंबळेनं निवृत्ती जाहीर केली,तेंव्हा आपल्या लाडक्या गोलंदाजाला निरोप देताना कोटलाची खेळपट्टीही हेलावली असेल.
भारतीय संघाला दर्जेदार फिरकी गोलंदाजांची परंपरा लाभलीय.बेदी-प्रसन्ना-चंद्रशेखर या फिरकी त्रयीनं 1970 चं दशक गाजवलं.तोच महान वारसा कुंबळेनं गेली अठरा वर्षे नुसता सांभळला नाही तर एका उत्तूंग शिखरावर उंचीवर नेऊन ठेवला.कसोटी क्रिकेटमध्ये 619 ,आणि वनडेमध्ये 337 विकेटस त्यानं मिळवलेत.मात्र केवळ ही आकडेवारी त्याला महान बनवत नाही....
कुंबळेचं मोठेपण आहे त्याच्या मॅचविनींग बॉलींगमध्ये..अनिल कुंबळेनं खेळलेल्या 43 कसोटीत भारत जिंकलाय... केवळ भारताचा नाही तर क्रिकेट जगतामधला महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तो कपील देव संघात असताना भारतानं जिंकलेल्या कसोटींची संख्या आहे 24. एवढचं नाही तर सुनील गावस्कर.सचिन तेंडूलकर या दिग्गज खेळाडूंच्ही विजयी सरासरी कुंबळेपेक्षा कमी आहे.त्याचे चेंडू वेगवेगळ्या कोनात वळत नसतील मात्र फलंदाजांना गोंधळात टाकणार टॉपस्पिन हे त्याचं अस्त्र होत.या टॉपस्पिनला जोड होती ती फ्लिपर आणि खास जम्बो स्पेशल गुगलीची...या अचूक अस्त्रातच्या जोरावर त्यानं गेली अठरा वर्षे टिच्चून गोलंदाजी केली. खेळपट्टीवरील एखाद्या अचूक टप्यावर त्यानं केलेली दिवसभर गोलंदाजी करोडो भारतीयांनी अनेकदा पाहिली आहे. त्याच्या याच जिद्दीमुळे त्यानं केवळ दिल्ली,कोलकत्ता,चेन्नई नाही तर मुलतान,ओव्हल आणि अगदी पर्थमध्येही यश मिळवलंय.उलट वेगवान गोलंदाजांना साथ देणा-या खेळपट्यावर चेंडू बाऊन्स करु शकणारा कदाचित तो एकमेव फिरकी गोलंदाज असावा....
एक महान गोलंदाज हीच केवळ त्याची ओळख नाही..तर एक झुंजार खेळाडू म्हणूनही कुंबळे कायम सा-यांच्या लक्षात राहील.एण्टीगा कसोटीत जबडा फाटल्यानंतरही त्यानं नुसतीच गोलंदाजी केली नाही तर ब्रायन लाराला बादही केलं..कोणताही क्रिकेट रसिक त्याची ही आठवण कधी विसरेल असं मला वाटत नाही. इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटीत त्यानं वयाच्या 37 व्या वर्षी शतक झळकावलं.अगदी त्याच्या शेवटच्या कसोटीतही हाताला अकरा टाके पडले असताना हा लढवय्या खेळाडू मैदानात उतरला आणि त्यानं तीन विकेटस घेतल्या..
भारतीय संघासाठी फक्त 100 नाही तर 1000 टक्के योगदान देणा-या या खेळाडूवर या देशानं मात्र नेहमी अन्यायचं केला...अगदी वन मॅच वंडर म्हणून त्याची हेटाळणी केली गेली. सचिन तेंडूलकरनंतर योग्यता असूनही कर्णधारपद त्याला मिळालं नाही.सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या त्याच्यासाठी ज्यूनीयर असलेल्या खेळाडूंच्या नंतर अगदी नाईलाज म्हणून किंवा तात्पूरती सोय म्हणून त्याला कसोटी संघाचं कर्णधार बनवण्यात आला. अगदी या ऑस्ट्रेलिया दौ-यातही ' कब तक कुंबले ?'सारख्या प्रश्नांचा त्याला सामना करावा लागला..मात्र या सा-याची पर्वा न करता सर्वस्व ओतून त्यानं गोलंदाजी केली.आपली केवळ शारिरीक नाही तर मानसिक उंचीही अन्य खेळाडूंपेक्षा मोठी असल्याचं त्यानं वारंवार दाखवून दिलंय...
टिम इंडीयाला नं. 1 बनवनं हेच कुंबळेचं स्वप्न होत.संघासाठी संपूर्ण योगदान देणारा खेळाडू अशीच आपली ओळख राहावी ही इच्छा त्यानं आपल्या निवृत्तीच्यावेळी बोलून दाखवली...व्यवसाय़ीक क्रिकेटच्या सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कुंबळे सारखी वृत्ती जोपसणारे खेळाडू आता विरळ होत चाललेत.
'जंटलमन्स गेम ' ही क्रिकेटची ओळख जपणा-या या जिगरबाज जम्बोला कोटी,कोटी सलाम !

Wednesday, October 22, 2008

देश दुभंगणारे ' राज ' कारण


राज ठाकरे यांनी घडवलेल्या एका अराजक नाट्याचा अंक नुकताच संपलाय.गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहण्याची सवय (की नशा ?) त्यांना जडलीय.कधी ते अमिताभ बच्चनला महाराष्ट्रात उपरे ठरवतात,कधी बाळासाहेबांसाठी संसदेचा अनादर करतात,तर कधी जेट कर्मचा-यांच्या आंदोलनात स्वत:ची पाठ थोपटून घेतात.महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत ' मराठी खतरेमें ' असा नारा देत पर्यायी सरकार'राज'तयार करण्याची त्यांचा सध्या प्रयत्न सुरु आहे.
सध्या राज ठाकरेंना नवीन निमीत्त मिळालं ते रेल्वे भरतीच्या परीक्षेच..यापुर्वीही त्यांनी शिवसेनेत असताना ही परीक्षा उधळून लावली होती.राज यांच्या या आक्रमणामुळे शिवसेनाला मी मुंबईकर ही मोहीम आवरती घ्यावी लागली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि परिसरात याच मोठा फटका सेनेला बसला.आता राजनी सेना सोडलीय, मात्र त्यांचा पीळ अजूनही कायम आहे हेच यातून दिसून आलंय.राज यांच्या या आंदोलनाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले.तीन जणांचा बळी गेला.शेकडो बसेस,गाड्या फुटल्या.ऐन दिवाळीच्या हंगामावर जे आर्थिक नुकसान मुंबईसह सा-या राज्याला,देशाला सहन करावं लागलं ते वेगळंच.
राज ठाकरेंच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तर त्यांनी निर्माण केलेल्या राजमार्गावरचा फोलपणा लक्षात येतो.बाळासाहेबांची प्रतिमा म्हणून ते सेनेत पुढं आले.ठाकरे या आडनावाचं सारं ग्लॅमर त्यांना जन्मल्यापासून मिळतंय.मात्र ज्यांनी त्यांना नाव दिलं,सन्मान दिला,प्रतिष्ठा दिली तोच त्यांचा 'विठ्ठल' अडचणीत असताना त्यांनी केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षा पूर्ण करण्याकरता शिवसेना सोडली.फाटापूट या मराठी माणसाला लागलेल्या जुन्या दोषांपासून तेही वेगळे नाहीत हेच यावेळी दिसून आलं.
मनसे निर्माण केल्यानंतर त्यांनी नवनिर्माणाच्या गोष्टी भरपूर केल्या आहेत.मात्र सेनेच्या चाळीस वर्षापूर्वीच्या कॅसटमधूनच त्यांचा नवनिर्माणाचा राग बाहेर पडतोय. परस्परांमध्ये वेगवेगळ्या द्वेषांची भिंत उभी करणा-या या मराठी माणसांवर भाषीक द्वेषाची नवी चादर लपटण्याचा प्रयत्न ते करतायत.ज्या तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ते तरुण देशामधल्या गरीब राज्यामधून आले होते.जातीभेद,लिंगभेद,शैक्षणीक विषमता असणा-या या प्रदेशातून हे सारे तरुण मुंबईत भावी आयुष्य घडवणारी परीक्षा देण्यास आले होते.मात्र त्यांच्या या स्वप्नांना तडा देण्याचं काम मनसैनिकांनी केलं. या आंदोलनानंतर या राज्यातल्या नागरिकांच्या मनात महाराष्ट्रविषयी अढी निर्माण झाली तर याला जवाबदार कोण ? केवळ व्यक्तीगत महत्वकांक्षेनी झपाटलेल्या राज यांनी सा-या राज्यात अराजक माजवलंय.ज्या राज्यकर्त्यांनी याला वेसण घालणं आवश्यक आहे ते तर केवळ मतांचा हिशेब करत काम करतायतं.
मनसेची स्थापना झाल्यापासून आघाडी सरकारचा राजबद्दलचा दृष्टीकोण मवाळ झालाय.शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याकरताचं ते या राज सेनेचा वापर करतायत.मुंबई,पुणे नाशिक या राज्याच्या सुवर्ण त्रिकोण समजल्या जाणा-या पट्यात विधानसभेच्या 100 जागा येतात.या भागात राज यांचा प्रभाव आता जाणवण्याइतपत वाढलाय. एकिकडं राज मराठी माणसांची मतं फोडतील अशी व्यवस्था करायची तर दुसरीकडं राजची भिती दाखवून अमराठी मंत मिळवायची अशी या मायबाप आघाडी सरकारची कल्याणकारी योजना आहे.ज्या कॉँग्रेसपक्षानं चाळीस वर्षापूर्वी बाळासाहेबांना बळ दिलं तीच कॉँग्रेस आज मागचा सर्व अनुभव असूनही राजला हिरो करण्याचा प्रयत्न करतीय.
राज यांच्या उपद्रव मुल्याचा आंदाज सहा महिन्य़ापूर्वीच सा-यांना आला होता.यामुळे यावेळी राज यांना अटक करण्यापूर्वी राज्य सरकारनं संपूर्ण तयारी करायला हवी होती.मात्र राज्य सरकार बेफिकीर राहीले. राजच्या कार्यकर्यांनी महाराष्ट्रात राडे सुरु केल्यानंमकरही आपले आर.आर.आबा फक्त इशारेच देत होते.केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील तर आता अशा ठिकाणी जाऊन पोटलेत की तिथून त्यांच्याबद्दल काही अपेक्षा करणंच चुकीचं आहे.अखेर संसदेत झालेल्या गदारोळानंतर देशमुख सरकारवरचा दबाव वाढला आणि त्यांनी राज यांच्या भोवती खटल्यांचा चक्रव्यूह उभा केला.या चक्रव्युहातून आपली सुटका नाही हे लक्षात आल्यानंतर राज यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.जर ही गोष्ट राज यांनी दोन दिवसांपूर्वीच केली असती तर हे सारे महाभारत घडलेच नसते.मात्र त्यांना कशाचंही सोयरसूतक नाहीयं. केवळ स्वत:ची प्रतिमा मोठी करण्याचा हा 'राज' हट्ट आहे.
राज यांचा मुद्दा निघाला की दक्षिणेकडची राज्य, बंगालमधले मार्क्सवादी यांची उदाहरण दिली जातात. या सर्व राज्यांचा अतिरेकी भाषाप्रेम ही देखील नक्कीच धिक्कार करण्याची गोष्ट आहे.त्या राज्यातले अशा प्रकराचे अतिरकेकी प्रयत्न हे देखील हाणून पाडायलाच हवेत.मात्र त्याचबरोबर तुमच्या आमच्या महाराष्ट्रानंही आपली सहिष्णुतेची परंपरा एखाद्या महत्वकांक्षी राज ठाकरेंसाठी मोडणं चुकीचं आहे.बिहार उत्तर प्रदेशातले नागरिक हे आपले देशबांधवच आहेत.त्यांना मुंबईसह राज्यात रोजगारासाठी येण्याचा, आणले सण समारंभ साजरे करण्याचा एवढंच नाही तर इंथ स्थायिक होण्याचाही पूर्ण अधिकार आहे. (असाच अधिकार महाराष्ट्रीयन नागरिकांनाही आहे) त्यांना समानतेची वागणूक मिळाली तर अमरसिंह लालूप्रसाद यादव यासारख्या आगलाव्या राजकारण्यांची दुकाणं बंद होतील.
एका 370 व्या कलमामुळे जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामध्ये मोठी भिंत गेल्या साठ वर्षात तयार झालीय.आज राज ठाकरे,करुणानिधी यासारखे काही नेते थेटपणे तर अमर,मुलायम लालूंसारखे नेते अप्रत्यक्षपणे अशा अनेक भिंती या देशात उभ्या करत आहेत.हे देश दुभंणारे ' राजकाराण' थांबवण्यासाठी प्रयत्न करायचा की यासबोत वाहवंत जायचं ह्याचा निर्णय करण्याची वेळ आता आली आहे.

Saturday, October 18, 2008

एक सचिन दुसरे बाकी सर्व...


स्थळ-भारतामधलं प्रेक्षकांनी भरलेलं कोणतही क्रिकेटचं मैदान
सामना-भारताविरुद्ध कोणताही देश
प्रसंग-सचिन तेंडुलकर ग्लोज घालत बॅट घेऊन मैदानावर चालत येतोय....
मैदानात जमलेले हाजारो प्रेक्षक, नाक्यावरच्या टिव्हीवर घोळका करुन बघणारी लाखो पब्लीक,घराघरात टिव्ही बघणारे कोट्यावधी क्रिकेटवेडे या सा-यांची नजर असते फक्त सचिन तेंडूलकरवर....त्याच्या प्रत्येक फटक्यानं ते मोहरुन जातात,त्याच्या चौकार षटकारनं बेभान होतात,त्यानं किमान शतक मारावं हीच त्यांची नेहमी अपेक्षा असते...आणि तो बाद झाला की..मैदानावर टाचणी पडेल अशी शांतता पसरते.नाक्यावरची गर्दी नाहीशी होती,टिव्हीवर क्रिकेट बघणारा रसीक चडफडतो आणि चॅनल चेंज करतो.गेली दिड वर्ष या शंभर कोटीच्या खंडप्राय देशानं हे चित्र वारंवार अनुभवलंय.एखादा कच्चा खेळाडू असता तर या ओझ्यानं केंव्हाच दबून गेला असतो.पण तो सचिन तेंडुलकर आहे.जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे बाकी सर्व...
152 कसोटींच्या खडतर तपश्चर्येनंतर सचिननं आज कसोटी क्रिकेटमधलं अढळपद मिळवलंय.वयाच्या सोळाव्या वर्षी वकार,अक्रम,इम्रान सारख्या खूंखार गोलंदाजाविरुद्ध सचिननं पदार्पन केलं.या खेळाडूंच्या स्पीडला तो घाबरला नाही,त्याच्या शेरेबाजीनं तो खचला नाही,कडव्या पाकिस्तानी प्रेक्षकांना तो दबला नाही.या सा-या दबावांना त्यानं आपल्या बॅटमधून उत्तर दिलं. या घटनेला 19 वर्षे झाली.मात्र कोणत्याही आक्रमनाला बॅटनं उत्तर द्यायचं ही त्याची सवय अजूनही मोडलेली नाही.
सचिनची सोनेरी कारकिर्द अनेक अविस्मरणीय खेळींनी सजलीय.पर्थच्या जगातल्या सर्वात वेगवान खेळपट्टीवरचं शतक, टिपीकल इंग्लीश वातावरणात 1990 साली मॅच वाचवणारी त्याची खेळी,जीवघेण्या पाठदुखीकडं दुर्लक्ष करत चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध मॅच वाचवण्यासाठी केलेली एकाकी धडपड जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर भारतीय संघाची फसलेली नौका बाहेर काढण्याचं काम सचिनच्या बॅटनं वारंवार केलंय.सचिननं खेळलेल्या ज्या 47 कसोटीत भारत जिंकलाय त्या 47 कसोटीत त्याची सरासरी आहे 62.11.उलट ज्या 43 कसोटीत त्याची सरासरी 36 वर घसरलीय नेमक्या त्याच 43 कसोटी भारत हरला आहे.सचिन स्वत:साठी खेळतो असं म्हणा-यांचे समाधान करण्याकरता आणखी कोणत उदाहरण द्यायचं.मोहम्मद अझरुद्दीन,सौरव गांगुली,राहुल द्रविड यासर्वांच्या नेतृत्वाखाली त्यानं सर्वस्व ओतून खेळ केलाय.एवढचं काय तर युवा खेळाडूंचा सतत जयघोष करणा-या महेंद्र सिंह धोनीच्या संघातही त्याचं स्थान अगदी फिट्ट आहे.जी ऑस्ट्रेलियातली तिरंगी मालिका जिंकल्यापासून धोनीचे शेअर्स गगनाला भिडलेत.त्या स्पर्धेतल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही सामन्यात सचिननंच मॅचविनींग बॅटींग केली होती.हे कोणीही विसरुन चालणार नाही.
फक्त एकदिवसीय क्रिकेट,कसोटी क्रिकेट,शतक,विक्रम एवढ्यापूरतं सचिनचं मोठेपण आहे ? अजिबात नाही.चित्रविचीत्र पोशाख ,डिस्कोमध्ये उशीरापर्यंत धिंगाना, नटींसोबतचे अफेयर्स, आपल्या संघातल्या किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूंवर किंवा निवड समितीबरोबर वाद यासारखे प्रकार त्यानं कझीचं केले नाहीत.अशाच प्रकारच्या प्रश्न विचारल्यास '' मला फक्त क्रिकेट खेळणं माहीती आहे " असं उत्तर सचिन देतो.मला वाटतं सचिनचं हेच उत्तर त्याला महान बनवंत.
गेली 19 वर्षे सचिन सतत खेळतोय.या 19 वर्षात आपल्या देशात अनेक उलाथपालथी झाल्या. कित्येक सरकार आली आणि गेली,देशाच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला,अर्थव्यवस्थेला आव्हान देणारे घोटाळे झाले,कित्येक जातीय दंगली झाल्या,भूंकप,महापूर,चक्रीवादळ,सूनामी सारख्या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तींना देशाला सामाना करावा लागला.केवळ सामाजिक आयुष्यात नाही तर व्यक्तीगत आयुष्यातही या शंभर कोटींच्या भारतीय नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलंय.मात्र या सा-या आपत्तीचा विसर पाडणारं टॉनीक सचिनच्या बॅटनं आपल्याला वारंवार दिलंय़.
आता सचिननं क्रिकेटमधली बहुतेक सारी शिखरं सरं केलीत.मात्र तरीही भारतीयांच समाधान अजुनही झालेलं नाही.आता 2011 मध्ये होणारा विश्नचषक सचिननं जिंकून द्यावा.हीच आपली त्याच्याकडून अपेक्षा आहे.अशी अपेक्षा ठेवणंही अगदी रास्त आहे.कारण मी सुरवातीलाच म्हंटलंय....
जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे बाकी सर्व...

Wednesday, October 15, 2008

काळी कोजागिरी


अश्विन शुद्ध पोर्णिमा म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा कालच झाली.
स्वच्छ निरभ्र आकाशामधला शुभ्र चंद्राचे प्रतिबींब दुधाच्या ग्लासं पाहणं हा एक आनंदायी अनुभव असतो.मात्र यावर्षी मला ह्या चंद्राचं प्रतिबींब काळं दिसलं.... आपल्या सभोवताली घडणा-या वेगवेगळ्या घटनांची सावली आपल्या आयुष्यावर पडत असते.तसंच काहीसा प्रकार या शुभ्र शामल चंद्राच्या बाबतीतही झाला असावा असं मला यावेळी वाटलं.जगात विशेषत: माझ्या प्रियतम भारत देशात सध्या घडत असलेल्या वेगवेगळ्या घंटनांची सावली पडून हा चंद्र काळा पडला आहे असंच मला वाटतय...
आपल्या देशाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर एका अस्वस्थ रात्रीची काळी सावली सध्या देशावर पडलीय असं म्हणाता येईल.देशातल्या अनेक भागात सध्या अस्वस्थता खदखदतीय..
भारतासाठी सर्वात संवेदनशील मानलं जाणा-या जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ प्रश्नावरुन नुकतचं फार मोठा रक्तपात घडून गेलाय.अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेल्या जमीनीवरुन आपल्या देशातले नागरिक काश्मीरमध्ये स्थायीक होतील...त्यांच्या संपर्कातून काश्मीरी जनतेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रुजवलेली फुटीरतावादाची भावना नष्ट होईल,काश्मीरीयतच्या नावाखाली चालणारं राजकीय दुकान संपेल अशी भिती राज्यातल्या काही पक्षांना वाटली.या भितीमधून त्यांनी जे काही केलं तो सारा इतिहास ताजा आहे.लष्कराचे प्रयत्न आणि देशातल्या जनतेच्या दुवांच्या बळावर काश्मीरमधली परिस्थीती सध्या नियंत्रणात आलीय असं वाटतंय..मात्र पंतप्रधानांच्या दौ-यात ही खदखद पुन्हा एकदा बाहेर आली.राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या काळात हा वणवा आणखी पेटेल अशीच दाट शक्यता आहे.
शुर पराक्रमी राजपूतांच्या राजस्थानमध्येही काही वेगळी परिस्थीती नाही.या राज्यात धार्मिक नाही तर जातीय अस्वस्थता आहे.आरक्षणाच्या मागणीकरता राष्ट्रीय संपत्ती वेठीसं धरणारं नवीन 'गुज्जर मॉडेल ' या राज्यानं देशाला दिलंय.गुज्जर आणि मीना या जातींमधली तेढ कमी व्हावी याकरता कोणतचं राजकीय पक्ष नेता प्रयत्न करत नाहीयं...उलट विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो या जातीचा दुराभिमान गोंजारण्याचाच प्रयत्न करतोय.आता राज्यात विधानसभा निवडणुका येतायत.त्यामुळं नवीन आश्वासन दिली जातील....आणि निवडणुकीनंतर ही आश्वासन पुर्ण करण्याकरता दबावाचं आणखी एक मॉडेल समोर येईल...
आर्थिक राजधानी मुंबईतही वेगळी परिस्थीती नाही.अमेरिकन अर्थव्यवस्थेवर साचलेल्या काळ्या ढगाची सावली मुंबईवरही पडलीय...शेअरबाजार कोसळतोय,हवेत संचार करणा-या शेकडो युवकांचे करीयर जमीनदोस्त होतंय.....मोठे उद्योग राज्याकडं पाहतही नाहीत,शेतक-यांच्या आत्महत्या तर सरकारी कुचेष्टेचा विषय बनलाय.सत्ताधारी पक्षं मात्र मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करुन नवीन राजकीय,सामाजिक गणीत (की समाजमनामधली भिंत) उभी करण्याचा प्रयत्न करतायत.तर जवाबदार समजवून घेणारे विरोधी पक्ष संकुचीत भाषीय राजकारणाची वर्षानुवर्षे वाजवलेली टेपचं पुन्हा एकदा बडवतात...
भारतातल्या वेगवेगळ्या भागात घडणारी ही काही प्रातिनिधीक तरीही खुप मोठा दूरगामी परिणाम करणारी उदाहरणं....देशात दिल्लीपासून बंगळूरु पर्यंत आणि अहमदाबाद पासून अगरतळामध्ये बॉम्बस्फोट होतायत....हे स्फोट घडवणारे हात कोणत्या परकीय देशामधले नाही,तर तुमच्या आमच्या सबोत राहणारे,आपले भारतीयचं आहेत. हिंदी चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात व्हीलनची प्रतीमा आता बदलू लागलीय.सध्याच्या समाजातले व्हीलन हे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये भल्या मोठ्या पॅकेजची नोकरी करतात.दळणवळणाकरता ईमेल,लॅपटॉप सारखी आत्याधुनीक साधनं वापरतात.पुणे मुंबई धारवाड सारख्या भागात शांत,चार चौघासारखं आयुष्य जगणारे हे तरुण आज तितक-याच थंडपणे दिल्ली अहमदाबाद सारख्या शहरात बॉम्बस्फोट घडवतात या बॉम्बस्फोटामुळे नागरिकांच्या आयुष्यातली मोडलेली घडी बसवण्यापेक्षा राज्यकर्त्यांना आपल्या कपड्याची इस्त्री मोडणार नाही याचीच जास्त काळजी आहे.
देशाचं सारं अवकाश व्यापून टाकणा-या या काळ्या ढगांच्या सावलीमुळे कोजागिरीचा चंद्र मला काळा दिसला असावा... पडलीय.....ही काळी सावली घाणवण्याकरता लक्षावधी दिवे लावण्याची वेळ आता आली आहे...मात्र हे दिवे लावण्याकरता कोण पुढं येणारं .ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरता किती काळ्या कोजागिरी पार कराव्या लागतील हे सांगणं शेअर बाजाराचा वार्षिक अंदाज सांगण्यापेक्षाही अवघड आहे.

Friday, October 10, 2008

उद्धवचा उदय


कोणी म्हणतं ते आक्रमक नाहीत...
कोणी ओरडंत ते बाळासाहेबांचा वापर करतात...
कोणी हेटाळणी करतं ते शिवसेना संपवायला निघालेत...
उद्धव ठाकरे हे राजकारणात आल्यापासून त्यांच्यावर सतत हे आरोप होत आहेत.मात्र शिवसेनेचा या वर्षीचा दसरा मेळावा ज्यांनी बघितला असेल त्या सर्वांना आता नक्की समजलंय की उद्धव हेच भावी शिवसेनाप्रमुख आहेत.
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून त्यांना राजकीय पक्ष वंश परंपरेनं मिळाला असेल मात्र या दसरा मेळाव्याला आलेले अनेक सैनीक त्यांनी स्वत: कष्ट करुन मिळवलेत.केवळ राड्यांची भाषा करणा-या शिवसैनीकांचे नवे नेते मात्र त्यांच्यापासून संपूर्ण वेगळे आहेत. केवळ विरोधी पक्षचं नाही तर परप्रांतीय,मुस्लीम या सेनेच्या परंपरागत शत्रूंच्या विरोधातही त्यांनी आतापर्यँत कधी मर्यादेच्या पलीकडं जाऊन (त्याला ' ठाकरी भाषा' असं म्हणातात का ??? ) टिका केलेली नाही.उलंट उद्धव प्रकाशात आले ते मी मुंबईकर या नव्या अभियानामुळं...
ज्या मुद्यांवर आणि ज्या माणंसांच्या जीवावर बाळासाहेबांनी शिवसेना सुरु केली ते मुद्दे आणी माणंस आता बदलंत चाललीत.21 व्या शतकात राजकारण आणि अर्थकारण यांची एकमेंकामधली गुंतागुत वाढलीय..एखाद्या समाजाला एखाद्या व्यक्तीला विरोध करुन दिर्घकाळ यशस्वी होण्यास आता मर्यादा पडतायत.त्यामुळेंच सर्वांना जोडणारं बेरजेचे राजकारण करणारा नेताचं आता राजकारणात यशस्वी होऊ शकतो.हे उद्धव ठाकरेंनी कदाचीत ओळखल असावं..त्यामुळेचं सेनेच्या मुळ गाभ्यालाच धक्का देत उद्धव यांनी मी मुंबईकर हे आंदोलनं सुरु केल होतं..मात्र राज ठाकरे यांनी मराठीचा गजर करत हे आंदोलनचं उधळून लावलं.उद्धवच्या राजकारणाला बसलेला हा पहिला धक्का होता.
मात्र उद्धवना त्याही पेक्षा मोठे धक्के दिले नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी.' स्वाभिमाना ' ची भाषा करत राणेंनी पक्ष सोडला.मालवणच्या पोटनिवडणुकीत राणेंना अनुकूल अशी जबरदस्त हवा होती.भाजपासहं शिवसेनेतल्या अनेक उद्धव विरोधकांचं राणेंना त्याकाळात पाठबळ होत..तरीही उद्धवही हरणारी लढाई नेटानं लढले.राणेंच्यातबालेकिल्याच चक्क मालवणात प्रत्येक गल्लीबोळ त्यांनी त्या निवडणुकीत पिंजून काढलं.ते निवडणुक हरले मात्र ते दरबारी राजकारणी आहेत हा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला असं म्हणता येईल..नंतर आधी श्रीवर्धन आणि रामटेकच्या निवडणुका जिंकत त्यांनी राणेंचा झंझावात रोखला.मात्र मुंबई महापालिका निवडणुक त्यांची खरी परीक्षा होती....
केवळ नारायण राणेचं नाही तर शिवसेनेतले प्रती ठाकरे समजले जाणारे राज ही 'नवनिर्माणाचा' नवा नारा देत त्यांच्या विरोधात उभे होते.बाळासाहेंबासारखा हुकमी एक्का शरपंजरी अवस्थेत असताना उद्धव यांनी ही निवडणुक स्वत:च्या हिमतीवर आणि देसाई,राऊत नार्वेकर यांच्या मदतीनं लढवली.सर्व राजकीय विरोधकांचे आंदाज चुकवून शिवसेनंनं मुंबई महापालीका राखली याचं श्रेय उद्धव ठाकरे यांनाच आहे.
या विजयामुळं शिवसेनेमधलं 'आऊटगोईंग' ब-याच प्रमाणात कमी झालं.हाच काळ पक्षाच्या बांधणीकरता उद्धव यांनी वापरला.शेतक-यांची कर्जमाफी,भारनियमन,ऊस आंदोलकांच्या प्रश्नावर उद्धव यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला.परभणी,धुळे,चंद्रपूर,कोल्हापूर सारख्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात याकाळात उद्धवच्या सभा या काळात यशस्वी झाल्या.शिवसेना संपवायला निघालेल्या उद्वव ठाकरेंच्या सभेला सामान्य मराठी माणसांचा हा प्रतिसाद होता.
उद्धव ठाकरे हे रसायन सनातन शिवसैनिकांपेक्षा वेगळं आहे. काही बाबतीत ते थेट शरद पवारांसारखे आहेत असं मला वाटतं.पवारांप्रमाणेचं त्यांच्या मनाचा ठावं घेणं अवघड आहे.पवारांप्रमाणेच पक्षांतर्गत विरोधकाला जाहीरपणे न दुखावता अडगळीत टाकण्याची कला त्यांनाही अवगत आहे.मात्र उद्धव यांच्यामागे बाळासाहेबांची शक्ती आहे.याबाबतीत ते पवार,राणे किंवा राज यांच्यापेक्षा नक्कीच उजवे ठरतात.ज्या शिवसैनीकांना दसरा मेळाव्यात फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकण्याची सवय आहे...त्या सवयीला उद्वव यांनी यावेळी धक्का दिला.
त्यांच्या भाषणात अटलजींचा गोडवा नाही,बाळासाहेबांसारखा मिश्कीलपणा नाही किंवा राज सारखा आक्रमकपणा नाही.. मात्र शिवसैनीकांना बांधुन ठेवणारी शक्ती नक्कीच आहे.पक्षाचा अजेंडा सांगणारं भाषण बाळासाहेबांचं नाही तर उद्दव यांच होत.हे यावेळी सगळ्यांनाच यंदा संमजलं.
एक नेता,एक मैदान,एक विचार या शिवसेनेच्या दस-या मेळाव्याच्या घोषणेतला एक नेता हा शब्द बदलण्याची वेळ आता आली आहे.हे शिवाजी पार्कच्या गर्दीला यंदा समजलं असावं.भावी शिवसेना प्रमुखाचा उदय आता झाला आहे.यावर्षीचा दसरा मेळाव्याचं हेच मोठं ऐतिहासीक मुल्य आहे.

Tuesday, October 7, 2008

दादा द ग्रेट !


आज सात ऑक्टोबर 2008. भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीनं आज निवृत्ती जाहीर केलीय.ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका ही सौरवच्या आयुष्यातली अखेरची मालिका असेल...त्याच्या निवृत्तीचं काऊंट डाऊन आता सुरु झालंय...
महाराजा ही सौरवची मैदानावरची आणि मैदानाबाहेरची ओळख...पण या राजाला कायमच टिकेला सामोरं जावं लागलंय. 1996 साली इंग्लंड दौ-यात त्याची संघात निवड झाली पण त्यावेळी त्याला डालमीयांच्यो कोट्यातला खेळाडू असं म्हंटलं गेल.लॉर्डसमधल्या आपल्या पहील्याच कसोटीत शतक झळकावून त्यानं आपला क्लास सिद्ध केला..या कसोटी सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या सौरवनं जिद्दीनं खेळ करत शतक झळकावलं होतं. 'जिद्द ' सौरवची कायमची ओळख राहीली.ऑफ शॉटस सरळ सिक्सर ही सौरवची बलस्थानं त्यामुळं ऑफ साईडचा देव या शब्दात सौरवचा राहूल द्रवीडनं खास सन्मान केला होता.
मात्र सौरवची खरी काराकिर्द बहरली ती तो कर्णधार झाल्यावर..ज्या देशात क्रिकेट हाच जन्म मानला जातो या क्रिकेटवेड्या देशात कर्णधारपद हे काटेरी सिंहासन आहे.सचिन,द्रवीडसह अनेक महान फलंदाज हे दडपण पेलू शकलेले नाहीत..सौरव तर भारतीय क्रिकेटच्या सर्वात कठीण काळात कर्णधार झाला होता.
मॅच फिक्सींगच्या किडीनं भारतीय संघ पोखरला गेला होता.सर्वसामान्य क्रिकेट रसिकांच्या मनातली त्यांच्या देवाची प्रतीमा भंगली होती.अशा परिस्थीत सौरव कर्णधार बनला नैराश्यानं ग्रासलेल्या संघात त्यानं जान फूंकली..जो संघ परदेशात केवळ हरण्याकरताच खेळतो अशी अनेकांची समजूत होती त्या संघानं सौरवच्या नेतृत्वाखाली परदेशात 12 कसोटी जिंकल्या आहेत. सौरवच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या सर्वात जवळ पोचला होता....भारतीय संघाचं 'टिम इंडीया ' या संघात त्यानंच रुपांतर केलं...सेहवाग,युवराज,हरभजन,झहीर हरभजन यासरखे टिम इंडीयाचे सध्याचे स्टार्स त्यानंच घडवले.बोर्ड आणि खेळाडूंच्या वादात कर्णधार खेळांडूंच्या पाठीशी उभा आहे हे चित्र पहील्यांदा त्याच्याच कालावधीत दिसलं ...त्यानंतर कर्णधार बनलेल्या द्रवीड आणि धोनीला हाच सौरवचा महान वारसा मिळाला आहे.एवढचं नाही तर ज्या यंग इंडीयाच्या जयघोषात सौरव आणि सिनीयर्सला सध्या वगळलं जातंय त्या यंग इंडीयाचा खरा निर्माता सौरवचं...
सौरवची एकूण काराकीर्द आणि सध्याचा फॉर्म पाहीला तर तो आणखी वर्षभर तर खेळेल असा सगळ्यांचा आंदाज होता.त्यामुळेच सौरवनं आज जाहीर केलेली निवृत्ती अधिक चटका लावणारी आहे.सर्व संघातले महान गोलंदाज,ग्रेग चॅपेल,ऑस्ट्रेलीयन मिडीया भारतीय माध्यमं यांना जिद्दीनं तोंड देणा-या सौरवनं अचानक बॅट खाली ठेवणं सगळ्यानाच अस्वस्थ करणारं आहे.फॉर्म आणि क्लास या दोन्हीचा विचार केला तर तो कसोटी आणि एकदीवसीय संघात असायला हवा मात्र या सौरवला एकदीवसीय संघातून बसवण्यात आलं...केवळ श्रीलंकेची खराब मालिका हा निकष गृहीत धरुन त्याला इराणी चषकातून वगळण्यात आलं...
भारतामधली अनेक मोठी साम्राज्य परकीय आक्रमणामुळं नाही तर अंतर्गत मतभेद आणि दगाबाजीमुळं कोसळली...भारतीय क्रिकेटच्या ख-या खु-या महाराजानंही बहुधा याचं कारणामुळं सन्यासधर्म स्वीकारला असावा.21 वे शतक आणि यंग इंडिया असा नारा देणा-या भारत देशात अजुनही तीच संरजामी वृत्ती शिल्लक आहे...हा प्रश्न आज मला अस्वस्थ करतोय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...