Friday, September 4, 2009

हिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप सैरभैर झालाय.प्रमुख नेत्यामंधील मतभेद वाढलेत.पक्षाला नवा नेता सापडलेला नाही.अडवाणीनंतर कोण ? संघ भाजपचा ताबा घेणार का ? अशा प्रकारचे प्रश्न सध्या वारंवार विचारले जातायत.अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भाजपचे काय होणार ? ही चिंता सतावतेय.देशातला एक प्रमुख पक्ष दुबळा झालाय.असं मत सध्या व्यक्त केलं जातंय.भाजपचे काय होणार ? हाच देशापुढचा सर्वात महत्वाचा आणि चिंतेचा प्रश्न बनलाय.असंच चित्र गेल्या आठवड्यात माध्यमांनी उभं केलं होतं.

भाजपचे काय होणार ? असा प्रश्न माझे अनेक मित्र मला सध्या विचारतायेत.मला याबाबत एक जुनी गोष्ट आठवते.एक अस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला देव आहे की नाही यावरुन. नऊ दिवस नऊ रात्र अखंड वाद घातल्यानंतरही निर्णय लागला नाही.त्यामुळे दोघंही आपआपल्या घरी निघून गेले.नास्तिक व्यक्तीनं घरी गेल्यानंतर घरी देव्हारा स्थापन करुन त्यात देवाच्या मुर्तीची स्थापना केली.तर आस्तिक व्यक्तीनं देवासकट देव्हाराचं फेकून दिला.आपल्या मुल्यांवरचा विश्वास हरवलेल्या,नेमक्या अस्मितेचं भान विसरलेल्या त्या आस्तिक माणसानं देवासकट देव्हारा फेकून देण्याचं दृष्टांत भाजपला अगदी फिट्ट बसतो.

भाजपचे काय होणार ? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना या पक्षातील चार महत्वाच्या अप्रवृत्तीचा विचार करायला हवा.

1) धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ

2 ) प्रमुख नेत्यांमधील टोकाचे मतभेद

3) भाजपचे झालेले काँग्रेसीकरण

4 ) भाजपचा नवा चेहरा कोण ?


धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ :

गेल्या काही वर्षात भाजपचे धोरण कमालीचे टोकाचे बनले आहे.सत्ता असताना सर्वधर्म समभाव आणि सत्तेत नसताना हिंदुत्ववाद. सत्तेत असताना पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी कोणत्याही थराला जायचे आणि सत्तेत नसताना, पाकिस्तानविरोधी प्रचार करायचा . सत्तेत असताना आर्थिक उदारीकरणासाठी फायद्यातील उद्योग विकण्याचा सपाटा, सत्तेत नसताना, दुस-या सरकारने स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणाचा विरोध. सत्तेत असताना अमेरिकेबरोबर अणुकराराकरता पुढाकार दुस-या सरकारच्या याच कराराला कमालीचा विरोध असे कमालीचे टोकाचे अगदी दुटप्पी वाटावे असे धोरण या पक्षाने राबवले आहे.

स्वदेशी आणि सुरक्षेचा जप भाजप नेहमी करतो. मात्र अगदी संसदेवर हल्ला होऊनही ' अब आरपार की लडाई होगी ' असं भाषणातून गरजण्याइतपतचं भाजपची आक्रमकता मर्यादीत राहीली. एकेकाळी स्वदेशीचा सतत जप करणा-या या पक्षानं निर्गुंतवणूक हे नवीन मंत्रालय निर्माण केलं.अनेक फायद्यातले सरकारी उद्योग मोडीत काढले. समान नागरी कायदा आणि 370 वे कलम रद्द करणे हे मुद्दे अडचणीचे ठरतात म्हणून कार्यक्रम पत्रिकेतून वगळले गेले.राममंदिराचा जप हा फक्त निवडणुका आल्यावरच करायचा हेच बहुधा या पक्षाचं धोरणं असावं.

प्रमुख नेत्यांमधील कमालीचे मतभेद :

पार्टी विथ डिफरन्स ही भाजपची एकेकाळाची ओळख. मात्र आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी नवी ओळख पक्षाची बनली आहे.जसवंत सिंग सारखा संपूर्ण हयात पक्षामध्ये घालवलेला नेता आपल्या पुस्तकांमध्ये जिनांचे कौतुक करतो.अरुण शौरीपांसून ते वसुंधराजे पर्यंत भाजपचे नेते पक्षासमोरील डोकेदुखी बनले आहेत.लोकसभा निवडणुका जिंकू न शकणारे अनेक नेत्यांनी पक्षात महत्वाच्या जागा बळकावल्यात.यापैकी काही नेत्यांचे संघटनात्मक किंवा व्यवस्थापनात्मक कौशल्य उत्तम आहे.परंतु आपली वैयक्तिक महत्वकांक्षा साध्य करण्यासाठी एकमेकांच्या बातम्या हेच नेते माध्यमांना पुरवतात.जसवंत सिंग-यशवंत सिन्हा-अरुण शौरी यांनी लिहलेलं अध्यक्षांना पत्र सार्वजनिक कसे झाले ? बाळ आपटे समितीचा अहवाल माध्यमांना कुणी पुरवला ? या आणि अशा प्रश्नांचा कठोरपणे मागोवा घेण्याची वेळ पक्षावर आलीय.गोपिनाथ मुंडे,नरेंद्र मोदी,शिवराज सिंह चौहान,वसुंधराजे शिंदे,यदीयुराप्पा विजयकुमार मल्होत्रा अशा राज्यपातळीवरील प्रमुख नेत्याला अपशकून करण्याकरता तितकाच मोठा गट पक्षात सतत कार्यरत असतो.भाजपच्या झालेल्या काँग्रेसीकरणाचे हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपचे काँग्रेसीकरण :-

जनसंघाची एक तर हिंदुमहासभा होईल किंवा काँग्रेस’ असे विधान जनसंघाच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले होते. हिंदुत्ववादाची पताका घेतलेल्या जनसंघाला ना हिंदुमहासभेचा आकार मिळाला, ना काँग्रेसचे रूप घेता आले. याच जनसंघाचा तीन दशकांनंतरचा अवतार म्हणजे भारतीय जनता पक्ष. तो मात्र काँग्रेस हिंदुत्ववादी अवतार किंबहुना हिंदुत्ववादाचा काँग्रेसी अवतार बनतो आहे, असे खुद्द भाजपच्या नेते-कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना आता वाटू लागले आहे.

भाजपचे काँग्रेसीकरण झाले, ते मुख्यत: गेल्या दोन दशकांत. वाजपेयी सरकारवर नजर टाकली तरी ते लक्षात येते. सुरेश कलमाडी, अरुण नेहरू आणि सुखराम यांच्यासारखे आयाराम ,गयाराम खूपच झाले ते सोडून दिले तरी वाजपेयी सरकारमधील किती मंत्री अस्सल संघवादी किंवा भाजपचे होते? जसवंतसिंह, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, राम जेठमलानी, मनेका गांधी, यांचा संघाशी किंवा संघाच्या विचारसरणीशी तरी काय संबंध? जसवंतसिंह लष्कारातील निवृत्त मेजर. यशवंत सिन्हा दोन तपे नोकरशाहीत वावरले आणि संधी मिळताच राजकारणात येऊन चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये थेट अर्थमंत्री बनले. पुढे १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून वाजपेयी मंत्रिमंडळात सत्तेची ऊब कायम राखली. आता तर संजय गांधींचे चिरंजीव, मनेकापुत्र वरुण म्हणजे भाजपची मुलुखमैदान तोफ मानली जाते. अरुण नेहरू, मनेका आणि वरुण यांनी हिंदुत्ववादी भाजपचे प्रतिनिधित्व करावे, यात नेहरू-गांधी घराण्याला खिजवण्याचे समाधान भाजपला मिळत असले, तरी ही भाजपचीही थट्टा आहे, हे त्यांना समजत नाही. अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

भाजपचा नवा चेहरा कोण ? :-

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी गेली तीन दशके भाजपची धुरा सांभाळलीय. भाजपला प्रभावी राष्ट्रीय पक्ष बनवण्यात आणि सत्तेपर्यंत पोचवण्यात या दोन्ही नेत्यांचा महत्वाचा वाटा आहे.आज अटलजी पार थकलेत.अडवाणींचा शक्तीपात झालाय.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचा हा लोहपुरुष कमालीचा एकाकी पडलाय.कंदहारच्या मुद्यावर अडवाणी सारख्या मुरब्बी आणि अस्सल राष्ट्रीय विचाराच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली आहे ती खरीच अस्वस्थ करणारी आहे.त्यांना ही भूमिका जाणीवपूर्वक घेण्यास भाग पाडले असावे.अशीही शंका मनात येत राहते.भाजप थिंक टॅंकच्या अनेक फसलेल्या आणि अंगाशी आलेल्या धोरणांपैकी हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांचा विचार केला तर भाजपचा चेहरा बनू शकेल असं एकच नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे नरेंद्र मोदी. 59 वर्षांचे नरेंद्र मोदी हे एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजराथमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.मोदींच्या कार्यकाळात गुजराथमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.मोदींचे हे मॅजिक या लोकसभा निवडणुकीत चालले नाही.असा एक महत्वाचा दावा त्यांचे विरोधक करतात.मात्र खुद्द अटलजी आणि अडवाणींचे मॅजिक चालण्याची सुरवात 1989 पासून झाली.मोदी कार्डचा वापर तर पक्षाने यंदा प्रथमच केलाय.

संघपरिवाराशी घट्ट जुळलेली नाळ हे मोदींचे आणखी एक बलस्थान.संघाच्या शक्तीशिवाय आणि मदतीशिवाय भाजप हा अधुरा आहे.हे एक अगदी उघड सत्य आहे.मोदी हे संघाचे अनेक वर्ष प्रचारक होते.संघाच्या मुशीत तयार झालेला नेता अशीच त्यांची पहिली ओळख पूर्वी होती आणि आजही आहे.अटलजींप्रमाणे मोदीही अविवाहीत आहेत.त्यामुळे इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा ब-यापैकी मोदीत्वाची ब-यापैकी ओळख करुन देते.

गुजराथची दंगल हा मोदींवरील डाग आहे.तसेच अल्पसंख्याक मतं भाजपला मोदींमुळे मिळाली नाहीत असाही प्रचार केला जातो.मात्र गेल्या आठ वर्षात साबरमती नदीमधून बरेच पाणी वाहून गेले आहे.एक विकासाची कास धरणारा राज्याला प्रगती पथाकडे नेणारा नेता अशी ओळख करुन देण्यात ते यशस्वी झालेत.विकासकामांना अडथळा येतो म्हणून अतिक्रमणं करुन बांधलेली अहमदाबादमधील मंदीरे पाडण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. मागील गुजराथ विधानसभे निवडणुकीत संघपरिवारातील एका 'प्रवीण' नेत्याने मोदींविरुद्ध मोहिम उघडली होती.ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदी त्यामुळे विचलीत झाले नाहीत.मोदींच्या कट्टरवादाचा बाऊ करणा-यांनी ही उदाहरणे आवर्जून लक्षात घ्यायला हवीत.

ये देशाचे कट्टर धर्मांध व्यक्तीने जेवढे नुकसान नाही केले तेवढे बेगड्या धर्मनिरपेक्ष व्यक्तींने केले आहे.
धर्मनिरपक्षतेच्या नावाखाली बांगालदेशी घुसखोरांपासून ते अफजल गुरुंपर्यंत सर्वांचे लाड करणे हेच अनेकांचे धोरण असते. अशा प्रकारच्या बेगड्या वृत्तींचा भाजपमध्ये शिरकाव झालाय.हिंदुत्व हाच भाजपाचा वैचारीक गाभा आहे. हा गाभा हलवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपच्या इमारतीला सध्या चिरा गेल्यात.या चिरा बुजवायच्या असतील तर नरेंद्र मोदींकडेच पक्षाची धूरा सोपवायला हवी.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपला धक्का नक्कीच बसला असेल.परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही.आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले, पण अद्यापही भाजप उभा चिरला जावा, तसा फुटलेला नाही.एका प्रमाणिक विचारांनी भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे मोठे बळ भाजपच्या मागे उभे आहे.हे बळ जोपर्यंत भाजपकडे आहे तोपर्यत या पक्षाला मरण नाही.
वैचारिक गोंधळ झाल्यामुळे देवासंकट देव्हारा फेकून देणा-या व्यक्तीचा दृष्टांत भाजपला लागू होतो.असं मी या ब्लॉगच्या सुरवातीलाच सांगितलंय. या देवाची पक्षात पुन्हा एकदा स्थापना करायची असेल तर यासाठी करायला लागणा-या पुजेचे पौरोहित्य मोदींकडेच द्यायला हवे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...