Sunday, August 16, 2020

''मैं हर इक पल का शायर हूँ''

 DHONI finishes off in style...

A magnificent strike in to the crowd...

India lift the world cup after 28 years... 

महेंद्र सिंह धोनीची  यापुढे जेंव्हा आठवण काढली जाईल त्या प्रत्येक वेळी रवी शास्त्री यांचे हे वाक्य सर्वांना आठवेल. क्रिकेट पाहत मोठे झालेल्या माझ्या पिढीसाठी आजवरची सर्वात चांगली आठवण आहे. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये नुवान कुलसेखराचा तो बॉल धोनीनं अगदी शांत आणि सहजपणे मिडऑनवरुन मैदानाच्या बाहेर फेकला. धोनीच्या या सिक्सरसोबत टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

 कपिल देवच्या युवा आणि उत्साही टीमनं मिळवलेलं विजेतपद आम्ही केवळ टीव्हीवर हायलाईट्समध्ये पाहिलं होतं. त्यानंतर 28 वर्ष या क्षणाची देशानं प्रतीक्षा केली. सर्व देशवासियांच्या अपेक्षा धोनीच्या टीमने पूर्ण केल्या. क्रिकेटच्या पंढरीतसुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरच्या मुंबईत धोनीनं सिक्सर खेचत सर्व भारतीयांची स्वप्नपूर्ती केली.

 महेंद्रसिंह धोनी टीम इंडियामध्ये स्थान नक्की करत असतानाच 'बंटी आणि बबलीहा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात 'छोटे छोटे शहरोंसे खाली भोर दुपहरोंसे हम तो झोला उठाके चलेबारीश कम-कम लगती हैं नदीयां मद्धम लगती है हम समंदर के अंदर चलेअसं गाणं आहे. देशात जागतिकीकरण स्थिरावत असलेला तो काळ होता. छोट्या शहरातल्या तरुणांची मोठी पिढी महानगराकडे धाव घेत होती. छोट्या गावात त्यांनी पाहिलेली स्वप्न महानगरात म्हणजेच स्पर्धेच्या महासागरात ही पिढी पूर्ण करत होती.

सिस्टिमच्या बाहेरच्या या मंडळींनी देशात घुसळण सुरु केली होती. याच काळात रांचीमधला म्हणजेच भारतीय क्रिकेटमधल्या प्रस्थापित शहरी बेटांच्या बाहेरचा महेंद्रसिंह धोनी हा तरुण टीममध्ये दाखल झाला. 2002 मधला रेल्वेतला सामान्य टिकीट चेकर ते  स्वत:चं जेट विमान सहज घेऊ शकेल असा देशातला श्रीमंत खेळाडू हा  धोनीचा प्रवास आहे. या काळात फक्त धोनीचा बँक बॅलेन्स वाढला नाही. तर क्रिकेटविश्वातली सारी मानाची  विजेतेपद टीम इंडियाच्या कपाटात आली आहेत.

महेंद्र सिंह धोनी येण्यापूर्वी भारतीय टीममध्ये काही ठरावीक महानगरांमधील खेळाडूच प्रामुख्याने होते. धोनीनं छोट्या शहरातील खेळाडूंसाठी टीमचा दरवाजा सताड उघडला. भारतीय टीमवरील  काही ठरावीक शहरांची मक्तेदारी संपली. छोट्या शहरातील खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी आणि सर्वोच्च पातळीवर सर्वोत्तम खेळ करण्यासाठी आवश्यक वेळ, पाठिंबा आणि मार्गदर्शन धोनीकडून मिळाले.

 प्रत्येक कॅप्टनचं एक वैशिष्ट्य असतं. कपिल देव स्वत: अग्रभागी राहून टीमला चांगलं खेळण्यासाठी प्रोहत्साहित करत असे. सौरव गांगुलीनं टीममधल्या प्रत्येकाचा खेळ उंचवण्यावर भर दिला. लढाऊ वृत्तीला मैदानातल्या कुशल डावपेचाची जोड राहुल द्रविडनं दिली. महेंद्र सिंह धोनीचं वैशिष्ट्य काय किंवा धोनीनं टीम इंडियाला काय दिलं या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्याचं असेल तर धोनीनं टीम इंडियाला जगातली यशस्वी टीम बनण्याची 'प्रोसेसदिली.

होय प्रोसेस. धोनीच्या बोलण्यात नेहमी येणारा शब्द. धोनीच्याच वेगवेगळ्या वाक्यांचा आधार घेत सांगायचं झालं तर प्रोसेस म्हणजे,  "एखाद्या कामासाठी शारीरिक आणि मानसिक रित्या पूर्णपणे तयार असणं, भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार न करता ते लक्ष्य गाठण्यासाठी स्वत:ला मैदानावर झोकून देणं. निकाल काय लागेल तो फारसा महत्वाचा नाही. पण त्यासाठी तुम्ही 90 किंवा 95 टक्के नाही तर 100 टक्के मेहनत घेतली आहे का हे महत्वाचं आहे. टीमचं हे 100 टक्के कमिटमेंट म्हणजेच प्रोसेस "

 याच प्रोसेसपूर्तीचा ध्यास घेऊन धोनी खेळला. त्यामुळेच तो केवळ टीम इंडियाचा नाही तर जगातला एक यशस्वी कॅप्टन बनला. मैदानावर असताना संपूर्णपणे फोकस होऊन खेळणं आणि  खेळताना घडलेल्या घटनामिळालेलं यशापयश हे मैदानाच्या बाहेर पडल्यावर मैदानावरच सोडणं हे धोनीचं वैशिष्ट्य होते. ही 'स्विच ऑन- स्विच ऑफवृत्ती धोनीकडं आहे. त्यामुळेच तो भारतीय क्रिकेट फॅन्सचा अमर्यादीत दबाव सहजपणे सहन करु शकला.

 धोनीने टीममध्ये येण्यापूर्वी क्रिकेटचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले नव्हते.

प्रथमश्रेणी सामन्यातही  कधी कॅप्टन नसलेला हा पठ्या थेट राष्ट्रीय टीमचा कॅप्टन झाला. कॅप्टन झाल्यानंतर  क्रिकेटचं शास्त्रीय प्रशिक्षण न घेणं त्याच्या फायद्याचं ठरलं. मैदानावरच्या समस्यांची पुस्तकी उत्तरं त्यानं शोधली नाहीत. तर आपल्या ओरिजनल मेथडनं त्यानं प्रतिस्पर्धी टीमला गोंधळात टाकलं. सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला. टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

धोनी हा कॅप्टन म्हणून अनेकदा प्रतिस्पर्धी प्लेयर्सच्या एक पाऊल पुढे असे. तो अगदी ओरिजनल सुचण्याच्या बाबतीत 'भारतीय क्रिकेटचा स्टीव्ह जॉब्ज ' होता. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बॉल आऊटमध्ये भारताने मिळवलेला विजय हा धोनीच्या याच 'एक पाऊल पुढे' विचाराचा परिणाम होता. त्याने नेहमीच्या फास्ट बॉलर्सच्या नाही तर संथ बॉल टाकून स्टंप उडवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंच्या हाती बॉल दिला होता. 


बॉल आऊटमध्ये बॉलरचे टार्गेट स्टंप होते. धोनी बरोबर स्टंपच्या मागे अशा पद्धतीने बसला की बॉलरला बॉल टाकताना टार्गेट स्पष्ट दिसत होते. बॉलर हातातून बॉल सोडेपर्यंत तो त्या जागेवरुन अजिबात हलला नाही. त्याचा योग्य परिणाम झाला. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा या भारताच्या तीन्ही बॉलर्सनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. त्याच्या अगदी उलट पाकिस्तानच्या बॉलर्सची निवड आणि विकेट किपरची स्टंपमागची पोझिशन हे सर्व काही चुकले होते. त्यामुळे त्यांच्या एकाही बॉलरला बॉल आऊटमध्ये यश मिळाले नाही.

बांगलादेश विरुद्ध २०१६ च्या टी -२० वर्ल्ड कपमध्येही धोनीच्या इतरांच्या पुढे विचार करण्याच्या वृत्तीने टीम इंडियाला तारले. हार्दिक पंड्याचा बॉल स्ट्राईकवरील बॅट्समनपर्यंत पोहचेपर्यंत त्याच्या सहकाऱ्याने अर्धे क्रिज पार केले होते. धोनीनं तो बॉल शांतपणे पकडला. थ्रो करताना हातातून निसटू नये म्हणून ग्लोज काढण्याचीही खबरदारी घेतली आणि चपळाईने समोरच्या खेळाडूला रन आऊट करत बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.  

टी-20 वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांची विजेतेपद जिंकणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. या तिन्ही विजेतेपदामध्ये धोनीची विचार करण्याची ओरिजनल मेथड उपयोगी पडली. यामुळेच त्यानं टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची ओव्हर हरभजनला नाही तर जोगिंदर शर्माला दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली आऊट झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या युवराजच्या ऐवजी स्वत: मैदानावर उतरला. चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडला विजय डोळ्यासमोर असताना त्यानं इशांत शर्माच्या हातात बॉल दिला.

सहकाऱ्यांबद्दलचा विश्वासत्यांचा खेळ उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत हाच धोनीच्या यशाचा 'एक्स फॅक्टरआहे. एकदा मिळालेलं यश हे  योगायोग असू शकतं. पण त्या यशाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या यशामध्ये 'एक्स फॅक्टरनिर्णायक असतो.  सभोवतल्या व्यक्तींना नियंत्रित करतोय याची कल्पनाही न देता प्रभावित करणं हा महान नेत्यांचा 'एक्स फॅक्टरअसतो. अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायी सहजपणे विकसित होत असतात.

धोनी कॅप्टन असताना मैदानात आणि ड्रेसिंग रुममधली शांतता, सर्वोच्च यश आणि पराकोटीचं अपयश आल्यानंतरही त्याला सारख्याच स्थितप्रज्ञतेनं सामोरं जाण्याची धोनीची वृत्ती याचा सहकाऱ्यांवर मोठा प्रभाव पडला हे नक्की. त्यामुळेच धोनीच्या टीममधले खेळाडू मैदानातल्या कठीण प्रसंगाला न डगमगता सामोरं गेले. या टीमनं खेळाचा आनंद लुटला.

संपूर्णपणे फोकस करुन खेळतानाही हा फक्त खेळ आहे. हा खेळ म्हणजे आयुष्य नाही हा धोनीमंत्र टीममध्ये कुठेतरी रुजला असावा. त्यामुळेच टी वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफीवर्ल्ड कपआशिया कपऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेचं विजेतेपदआयसीसी टेस्ट रँकींगमध्ये पहिला नंबरवन-डे रँकींगमध्ये पहिला नंबरटी-20 रँकींगमध्ये पहिला नंबरहे सारं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला मिळवता आलं.

आज टीम इंडियाच्या फिटनेसचा स्तर उंचावलाय. हा कॅप्टन धोनीच्या प्रभावाचा मोठा भाग आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीबी सीरिजपूर्वी 'संथ हलचाली करणारे खेळाडू टीममध्ये नको' असं त्यानं निवड समितीला सांगितलं होतं. एका ओव्हरमध्ये बॉलर्सना किंवा सिक्सर लगावल्यानंतर बॉलर्सवर भडकलेला धोनी कुणी पाहिला नाही. सलग चार वाईड बॉल टाकले तरी चेहऱ्यावरची रेषाही हलू न देणारा विकेटकिपर-कॅप्टन धोनी सर्वांनी पाहिलाय. पण ढिसाळ फिल्डिंगला धोनीकडं कधीही माफी नव्हती. अशावेळी धोनीनं केलेली कानउघडणी स्टम्पमधल्या मायक्रोफोनमधून साऱ्या जगानं ऐकलीय.

फिल्डिंग आणि 'रनिंग बिटविन द विकेटहा क्रिकेटमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. यामध्ये प्रत्येकानं आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे हे सर्वांमध्ये बिंबणारा कॅप्टन म्हणून इतिहास धोनीला लक्षात ठेवणार आहे. धोनीचा हा वारसा विराट कोहलीने नव्या उंचीवर नेलाय. 

 'कोणताही खेळाडू हा त्याच्या नावावर नाही तर खेळाच्या जोरावर टीममध्ये असायला हवा. तो टीमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतो की नाही हे कॅप्टनला ठरवू द्या' असा नियम धोनीनं तयार केला.याच नियमाच्या आधारावर त्यानं गांगुलीलक्ष्मण आणि द्रविड या तिघांना टीममधून वगळलं. धोनीची टेस्टमधील निवृत्ती आणि वन-डे, टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयही त्याने असाच अगदी सहज घेतला. १०० टेस्ट खेळण्याचा किंवा २०० वन-डे मध्ये कॅप्टनसी करण्याचा विचार त्याने केला नाही. कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर, बीसीसाआयला फक्त काही ओळींचे औपचारिक पत्र पाठवून धोनीनं त्याची निवृत्ती जाहीर केली होती. 

धोनीनं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर मागच्या तीन वर्षात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल वारंवार चर्चा झाली. त्याचा खेळ संथ झाला होता. त्याला मैदानात आल्यावर स्थिर होण्यास बराच वेळ लागत असे. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही तो अगदीच संथ खेळला. त्याच्या संथ खेळामुळे झटपट रन्स बनवण्याच्या नादात हार्दिक पंड्या आऊट झाला. रवींद्र जडेजा संपूर्ण भरात होता. त्यावेळी धोनीनं फक्त प्रत्येक बॉलला एक रन काढून त्याला साथ देणे आवश्यक होते, पण तो दिवस धोनीचा नव्हता. वर्ल्ड कप फायनलमध्ये बटलर-स्टोक्स जोडीनं जवळपास याच परिस्थितीतून मॅच बरोबरीत आणली होती. पंड्या आणि जडेजाच्या मदतीनं नेहमीच्या धोनीला मॅच जिंकणे सहज शक्य होते, पण त्या दिवशी नेहमीचा धोनी दिसलाच नाही.

धोनी आणि क्रिजमध्ये अखेर अगदी काही इंचाचे अंतर राहिले. मार्टिल गप्टीलच्या थेट थ्रो ने धोनी रन-आऊट झाला. त्यावेळी मॅचचे लाईव्ह समालोचन करणाऱ्या सौरव गांगुलीसह जगभरात मॅच पाहणाऱ्या तमाम भारतीयांचा आवाज नंतरचा काही काळ बंद झाला होता. धोनीनं रिटायरमेंटचा जो 4.2 मिनिटांचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यात जवळपास 20  सेकंद त्याचे हे शेवटचे रन आऊट दाखवलंय. मैदानावरचे यश आणि अपयश शांतपणे स्विकारणाऱ्या आणि ते मैदानावर सोडून पुढच्या क्षणी सामान्य आयुष्य जगणे ही ज्या धोनीची सवय आहे, त्या धोनीलाही 'ती आठवण' किती छळतीय  हे आपल्याला समजण्यासाठी धोनीनं त्या रन आऊटच्या प्रसंगाला दिलेला इतका वेळ पुरेसा आहे.

धोनी वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही सेमी फायनल खेळला नाही. 'तो रिटायर कधी होणार?' 'तो रिटायर का होत नाही?' 'तो जागा अडवून का बसलाय?' ' त्याने इतरांना जो नियम लावला त्याची स्वत: का अंंमलबजावणी करत नाही?' यासारखे अनेक प्रश्न अनेकांनी विचारले. धोनी त्याच्या स्वभवाप्रमाणे शांत होता. त्याच्यात आणि निवड समितीत काय चर्चा झाली का? याचे अंदाज अनेकांनी बांधले. ठराविक दिवसांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु होत असे. अखेर तो त्याने ठरवले त्याच दिवशी, त्याच्या नेहमीच्या शांत पद्धतीने निवृत्त झाला. 

त्याचे लग्न, टेस्टमधील निवृत्ती, वन-डे आणि टी-२० कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय याच प्रमाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती यापैकी कोणतीही बातमी जगात कुणालाही 'ब्रेक' करता आली नाही. आता त्याच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा सर्वांनी त्याच्या 'टायमिंगवर' 'वेळकाढू' चर्चा सुरु केलीय. 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीप्रमाणे अनेकजण त्यावर काथ्याकूट करतायत. धोनीचा स्वभाव पाहता या सर्वांना त्याच्याकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळातही अनेक जण 'आपल्यातल्या शेरलॉकला अनलॉक करत' नवे-नवे सिद्धांत मांडत स्वत:ची पाठ थोपटून घेतील हे नक्की.

सौरव गांगुलीनं नव्या भारतीय टीमची उभारणी केली. टीम इंडियाला आक्रमक बनवलं. धोनीनं या आक्रमकतेला शांततेची जोड दिली. 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008 साली सीबी सीरिज जिंकल्यानंतर अगदी सामान्य विजयासारखे राहा, अवास्तव सेलिब्रेशन करु नका' अशी स्पष्ट सूचना धोनीनं टीममधल्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती. 'ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे ही जगासाठी मोठी गोष्ट असेल. आमच्यासाठी ही एक सामान्य बाब आहे'. हा संदेश ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्वाला टीम इंडियानं दिला होता. 

यश आणि अपयश हे खेळाचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. यशानंतर अपयश आणि अपयशानंतर पुन्हा यश ही सर्व प्रोसेस सतत सुरु राहणार आहे. आपण या प्रोसेसचा अभ्यास करायचा. आपले स्कील अधिक घोटीव करायचे आणि त्यानंतर जे काही होईल त्याला शांतपणे समोर जायचे. या विस्तीर्ण ब्रह्मांडातला आपण एक बिंदू आहोत, आपल्यापूर्वी इथे अनेक सरस होऊन गेले आणि पुढेही अनेक अव्वल होतील. आपण फक्त काल आणि उद्या या साखळीला जोडणारा आज आहोत. हा आज आपल्याला अधिक समृद्ध करायचा आहे. धोनीचं करियर हीच शिकवण देते.

महेंद्र सिंग धोनीनं निवृत्तीसाठी देखील याच प्रकारचे गाणे निवडले आहे. करियरमधील सर्वोच्च क्षण आणि अगदी तळाचे क्षण याला या व्हिडिओमध्ये समान महत्व देण्यात आलंय. धोनीचा तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले. त्यानंतर पुन्हा प्रत्येकदा व्हिडिओ पाहतानाही डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. त्यामधील प्रत्येक प्रसंग हा माझ्यासह अनेकांच्या तारुण्याची गोष्ट आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे पाहताना त्या सर्व आठवणीने डोळ्यात पाणी येणार आहे.

धोनीला निवृत्तीच्या प्रसंगी जगाला काय सांगायचे आहे ते त्याने साहिर लुधियानवी यांच्या शब्दात सांगितले. माझ्यासाठी धोनी काय आहे हे सांगण्यासाठी देखील मला साहिरचेच शब्द आठवतात....

रिश्तों का रूप बदलता है, बुनियादे खतम नही होती

ख्वाबो और उमंगों की मियादें खतम नही होती

- ''मैं हर इक पल का शायर हूँ''

 


Friday, August 7, 2020

राम मंदिर : भयावरील विजयाचा उत्सव

नव्या पर्वाची सुरुवात


स्वतंत्र भारताच्या इतिहासात पाच ऑगस्ट ही तारीख भयावर विजय मिळवणारा दिवस म्हणून लिहिली गेली आहे. भारताने एक देश म्हणून दोन घटना सलग दोन वर्ष या दिवशी दुरुस्त केल्यात. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणारे कलम 370 रद्द करणारे विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यानंतर बरोबर वर्षभरानी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातील दोन विषयांची पूर्तता इतकेच या घटनांचे महत्व नाही. सामान्य भारतीयांसमोर भयाचा बागूलबुवा उभा करुन वर्षानुवर्षे ज्या दोन गोष्टी प्रस्थापित व्यवस्थेने होऊ दिल्या नाहीतत्या दोन गोष्टी या दिवशी घडल्या. त्यापैकी अयोध्येतील जन्मभूमीच्या स्थानी श्रीराम मंदिराच्या पुन्हा एकदा निर्मितीसाठी तर तब्बल पाच शतकांची प्रतीक्षा या देशाने केली आहे. 

'मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे?' या प्रश्नाच्या उत्तरातील सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे मनुष्याने जगण्यासाठी स्वत:ची संस्कृती उभी केली. ती संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून जतन केली. त्या संस्कृतीमधील वैभवशाली वारसाचा, परंपरांचा आणि इतिहासाचा अभिमान ही मनुष्याला एकमेकांशी घट्ट बांधणारा मुख्य घटक आहे. 

सततच्या आक्रमणामुळे जगभरात ज्यू विखुरले होते, इस्रायलच्या निर्मितीवेळी ज्यू धर्माच्या गौरवशाली इतिहासाने त्यांना एकत्र आणले. ज्यू लोकांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे अक्षरश: राखेतून इस्रायल हा विजिगीषू देश उभा केला. फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्समध्ये एक समान भाषा नव्हती. वेगवेगळे गट अस्तित्वात होते. या सर्वांना जोडणारा फ्रेंच संस्कृती हा एक धागा होता. फ्रेंच संस्कृतीच्या धाग्याने परस्परांशी जोडल्या गेलेल्या या समाजाने फक्त युरोप खंडावर नाही तर संपूर्ण जगावर परिणाम करणारी फ्रेंच राज्यक्रांती केली.   

भारतामधील हिंदू संस्कृतीमधील आदर्श पुरुष म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. भारतीयांसाठी विष्णूचा सातवा अवतार इतकेच श्रीरामाचे महत्व नाही. राम हा एक आदर्श राजा आहे. 'राम राज्य' ही भारतीय संस्कृतीमधील सर्वात आदर्श राज्यपद्धती आहे. श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने काँग्रेसी, डावे, नास्तिक, शाळावाले, हॉस्पिटलवाले आणि हल्ली नव्याने तयार झालेले चायनीज व्हायरसचे काळजीवाहू अशा मंडळींपैकी अनेकांनी भूमीपूजनाची पोटदुखी सहन होत नसतानाही रामाचे मोठेपण आणि रामराज्याची आठवण करुन देत देशातील बहुसंख्य सश्रद्ध हिंदूंना उपदेशाचे डोस पाजले आहेत. 

भारतामध्ये पाचशे वर्षांपूर्वी एक परकीय, धर्मांध आणि जुलमी राजा येतो आणि भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले रामजन्मभूी स्थानावरील मंदीर पाडतो. तो धर्मांध राजा आणि त्यानंतर दिल्लीच्या गादीवर बसलेले त्याचे वंशज परकीय होते. त्यानंतर सत्तेवर आलेले ब्रिटीशही परकीय होते. ब्रिटीश भारतामधून निघून गेल्यानंतरही ७२ वर्षे 'अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराम मंदिर उभं करण्याचा प्रश्न प्रलंबित असतो. हे मंदिर उभं राहू नये म्हणून भारतामधला एक वर्ग अगदी वाट्टेल ते डावपेच आखतो. ही परकीय व्यक्तीसाठी आश्चर्यकारक आणि भारतीयांसाठी शरमेची बाब आहे.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारला म्हणजेच दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी श्रीराम मंदिराची उभारणी ही एक सहज साध्य गोष्ट होती. गुजरातमधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराची निर्मिती सरकारच्याच माध्यमातून झाली. नेहरु सरकारने सोमनाथ प्रमाणेच अयोध्या, काशी आणि मथुरामधील मंदिरांची निर्मिती करायला हवी होती. तसे झाले असते तर, देशातील हिंदुत्ववादी संघटनांचा एक खूप मोठा मुद्दा काँग्रेस पक्षाने सुरु होण्यापूर्वीच संपवला असता. रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून संघ परिवार, भाजपा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी संघटनांचा देशभर विस्तार झाला. त्यांनी देशभरात आपल्या संघटना भक्कम केल्या. त्याच संघटनात्मक शक्तीच्या जोरावर आज नरेंद्र मोदी हा 'कट्टर हिंदू' देशाचा पंतप्रधान आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सत्ता मिळालीय, असा दावा अनेक मंडळी वारंवार करतात. थोडक्यात काँग्रेसने वेळीच हालचाल केली असती तर 1990 नंतर बदललेल्या इतिहासाची आज काही मंडळींना लाज वाटते, तो इतिहास घडलाच नसता.

मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे देशातील स्व प्रमाणित 'विवेकाचा आवाज' 'अंधाराची काजळी भेदणारे' 'पुरोगामी' 'समतावादी' 'मानवतावादी' 'एनजीओवादी ( मी इथे पुढचा शब्द नक्षलवादी हा शब्द वापरणार नाही, कुणाला तो आठवला तर ते तो योगायोग समजावा. मी कुणाचेही विचार नियंत्रित करु शकत नाही. विचार नियंत्रित करण्यावर माझा विश्वासही नाही)  मंडळींवर  'बिच्चारे दिवस' आलेच नसते.

प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. या वनवासातही त्यांना अनेक अडचणी आल्या. श्रीरामानांही कष्ट चुकलेले नाहीत,ति राम मंदिर सहज साध्य कसे असेल ? या भावनेतून हिंदूंनी गेली 500 वर्षे  प्रतीक्षा केली आहे. गेली 30 वर्ष यासाठी तीव्र लढा दिला. या लढ्यात अनेक हुतात्मा झाले. मंदिर स्थापना करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात नाही तर भारतात हिंदूंना कारसेवा करावी लागली. बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह सरकारने या कारसेवकांवर गोळीबार केला. त्यानंतर काही वर्षांनी गुजरातमधल्या गोध्रामध्ये कारसेवकांनी भरलेला रेल्वेचा डबा बाहेरच्या जमावाने पेटून दिला. देशातल्या हिंदूंना डिवचण्यासोबतच मुस्लिमांना गोंजारत त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम गेल्या ३० वर्षात केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारने केले.

सत्तेत असलेल्या पक्षांची रामभक्तांवर दडपशाही सुरु असताना राजकीय सत्तेपासून कोसो दूर असलेल्या डाव्या संघटनांनी स्वातंत्र्यानंतर एक नवी 'इको सिस्टिम' तयार केली.या वर्गाने श्रीरामाच्या अस्तित्वावर, भारतीय संस्कृतीशी, अयोध्येशी श्रीरामाच्या असलेल्या संबंधांवर सातत्याने खोट्या प्रमेयाद्वांरे प्रश्न निर्माण केले. हिंदूच्या विचारपद्धतीत संभ्रम निर्माण केला. हिंदू समाज हा जगाच्या प्रारंभापासून सहिष्णू आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणारा आहे. या डाव्या संघटनांनी या समाजातील प्रत्येक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांवर प्रश्नचिन्ह उभे करत 'आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलो' ' आम्ही हिंदू आहोतयाची लाज वाटावी अशी पिढी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 

सोमनाथ ते विश्वनाथ, कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत परकीय धर्मांध राजांच्या हिंदू मंदिरांवरील आक्रमणाच्या खुणा या देशात ठिकठिकाणी आहेत. या खुणा या मंडळींना कधीही दिसत नाहीत. वेगवेगळ्या परकीय आक्रमकांचे पुतळे पाडण्याची मोहीम जगभर सुरु असते. या चळवळीला डाव्यांचा पाठिंबा असतो. भारतामधील खिल्जी, टिपू, औरंगजेब या मंडळींनी केलेले आक्रमण या डाव्या मंडळींना दिसत नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या ABP देशातील अल्पसंख्यांकावर झालेले हल्ले त्यांना समजत नाहीत. या देशातील शेकडो मंदिरं  1947 नंतर पाडण्यात आली. हजारो धर्मांतर झाले. असंख्य महिलांना रोज  'लज्जा'स्पद प्रसंग सहन करावे लागतात. या सर्व गोष्टींचा या मंडळींना कधीही त्रास होत नाही.

राजकीय आणि बौद्धीक पातळीवरील दादागिरी सुरु असूनही हिंदू संघटनांनी राम मंदिरासाठी मोठ्या चिवटपणे लढा दिलाय. कोर्टाच्या दरबारातील आणि जनतेच्या दरबारातील प्रत्येक लढाई ते लढले. ''श्रीराम जन्मभूमी आंदोलन हे स्वातंत्र्य लढ्यासारखे व्यापक होते. यामध्ये संपूर्ण देशाचा समावेश होता.'' असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीयांनी न्यायालयातही या प्रकरणाचे सर्व पुरावे मांडत, युक्तीवाद सादर करत आणि आक्षेपांचे खंडण करत या 500 वर्षांच्या लढाईचा निर्णायक शेवट केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एकमताने निर्णय दिला. हा निर्णय झाल्यानंतर देशात कुठेही अतिरेकी जल्लोष झाला नाही. दुसऱ्या दिवशी वाजत-गाजत मंदिर उभे करण्याचे काम सुरु झाले नाही. याचे कारण म्हणजे विरोधकांची भावना दुखावण्यात किंवा त्यांना त्रास देण्यात हिंदू समाजाला  कधीही रस नव्हता, ती हिंदू समाजाची संस्कृती नाही. 

स्वत:ला राज्यघटनेचे रक्षक म्हणवणाऱ्या 'अंधाराची काजळी फोडू छाप' व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करुन श्रीराम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे मोकळ्या मनाने स्वागत करायला हवे होते. वास्ताविक तसे काहीही झाले नाही. श्रीराम मंदिराच्या जागेवर शाळा उभारा, हॉस्पिटल उभारा ही त्यांची बडबड सुरुच होती. मनासारखा निर्णय दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयावर आणि तो निर्णय देणाऱ्या खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीशावरही त्यांनी शंका उपस्थित केली. तरीही ही मंडळी स्वत:ला 'संविधानवादी' असं ठासून सांगतात आणि जगाने त्यांच्यावर तसा विश्वास ठेवावा अशी त्यांना अपेक्षा असते. 

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीची प्रक्रिया इतके दिवस सुरु नव्हती. यापूर्वीचा बहुसंख्य काळ 'आंधाराची काजळी फोडू छाप' विचारांचे सरकार होते. त्यांच्या हातात गल्लीपासून- दिल्लीपर्यंत कारभार होता. हे सर्व असूनही शिक्षण आणि आरोग्याचे  प्रश्न आजही का कायम आहेत? लहान देश आपल्या पुढे निघून जात आहेत असं मंदिर भूमीपूजनाच्या आठवड्यात रडगाणे गायणाऱ्या व्यक्तींचा विवेकशील आवाज यापूर्वी का बसला होता? अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणार म्हणजे आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार असे केंद्र सरकारने किंवा कोणत्या भाजप शासित राज्य सरकारने सांगितले आहे? सरकार सोडा तुमच्या भागात राहणाऱ्या परिवारातील जबाबदार व्यक्तींनी आता हे प्रश्न सोडवण्याची सरकारला गरज नाही. 'सरकारचे जीवतकार्य आता संपले आहे, सर्व प्रश्न आपोआप मार्गी लागतील' असे वक्तव्य केले आहे का

 मंदिराच्या भूमीपूजनाचा दिवस घरात दिवाळीसारखा साजरा करणाऱ्या परिवारानेच या देशात शाळा आणि रुग्णालयांचं जाळं उभं केलंय. यामध्ये अनेक गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याची व्यवस्था उभी केलीय. रुग्णांवर वैद्यकीय उपचार होतात. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, मोठा अपघात, आणि आता चायनीज व्हायरस प्रत्येक आपत्तीमध्ये हे सर्व स्वयंसेवक सर्वस्व झोकून देऊन काम करतात. हे या मंडळींना दिसत नाही, दिसलं तरी आठवतं नाही, आठवलं तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ही मंडळी राम मंदिराचे काम सुरु झाले याचा आनंद न झाल्याने 'माझं मत जरा वेगळं आहे' असं ओरडत समाजाच्या मुख्य धारेपासून वेगळी पडत चालली आहेत. त्यांनीच त्यांच्या सोयीसाठी मांडलेला सिद्धांत खरा आहे, हे समजण्याचा काळ हा सोशल मीडियाच्या युगात इतिहासजमा झालाय.  

शहरातल्या कोणत्याही इमारतीकडे पाहून ' अरे इथे हॉस्पिटल बांधले असते तर आज चायनीज व्हायरस पेशंट्सवर चांगले उपचार झाले असते' हे सांगणाऱ्या व्यक्तींचा 'कोरोना वॉरियर्स' म्हणून गौरव करणे  जितके हास्यास्पद आहे त्यापेक्षा जास्त जास्त हास्यास्पद असा या मंडळींचा हॉस्पिटल आणि शाळा प्रेमाचा आलेला हा हंगामी उमाळा आहे.

परकीय सत्ताधीश देशातून निघून गेले म्हणजे देश बदलला असं होत नाही. परकीयांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्यानंतरच भीतीच्या सावटातून देशाची सुटका होते. भारतात पहिले मंदिर पाडले गेले तेंव्हापासून आजपर्यंत हिंदूंच्या मनात परकीय आक्रमकांनी भीतीचा पर्वत तयार केलाय.काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या विशाल भारत देशात शतकं उलटली, कित्येक पिढ्या बदलल्या, जीवनपद्धतीमध्ये बदल झाले, तरी भीतीचा पर्वत मार्गातून हटत नव्हता. 

हा भीतीचा पर्वत वितळण्यास 5 ऑगस्ट 2020 या दिवशी सुरुवात झालीय. हा दिवस म्हणजे फक्त अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाची  तारीख नाही, तर शेकडो वर्षांचे भय नष्ट होत आहे याची जाणीव करुन देणारा  दिवस आहे. एक असे भय ज्यावर हिंदू समाजाने आजवर फारशी मोकळेपणे चर्चा केलीच नाही. याच भयामुळे हिंदू बायकांना मोकळेपणे फिरण्यावर बंधनं आली. याच भयामुळे अनेक मंदिरातले देव एखाद्या घरात लपवले गेले.  याच भयामुळे नवी दिल्लीत अठराव्या शतकात एकही भव्य मंदीर उभे राहिले नाही. 1939 साली पूर्ण बिर्ला मंदीर हे नवी दिल्लीमध्ये काही शे वर्षानंतर उभे राहिलेले भव्य मंदीर आहे. याच भयातून निर्माण झालेल्या चुकीच्या समजुतीमधून सरकारी कार्यक्रम असूनही पंडित नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पूजेला जाणे टाळले. भारतीय उपखंडातल्या प्रत्येक भागातील भग्न मंदिरं आणि मोडकळीस आलेल्या लेण्यांमधून या भयाचे अवशेष सापडतात. हे भय अखेर आता संपलंय. जे आजवर गमावलं ते सारं गंगार्पण म्हणून सोडून देण्याची परंपरा आता खंडित झालीय. आपला नष्ट झालेला सांस्कृतिक वारसा हिंदू समाज पुन्हा उभा करु शकतो याची जाणीव 5 ऑगस्ट 2020 या दिवशी झालीय. 

धर्माला दडपशाही आणि बुद्धीभेद करुन कायम स्वरुपी नष्ट करता येत नाही, हा विश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारा हा दिवस आहे. 5 ऑगस्ट 2020 या दिवशी भारतीयांच्या भयावरील विजयाच्या उत्सवाला आता सुरुवात झालीय.

टिप - श्रीरामाच्या आयुष्यावरील भ्रामक समजुती दूर करणारा माझा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...