जो पिछले कई साल मे नही हूआ वो अब हो गया है !
हो हे खरं आहे. क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपलीय. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियानं सलग दुस-यांदा अॅशेस मालिका गमावली.कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पॉंन्टिंगचा संघ पहिल्या,दुस-या किंवा तिस-या नाही तर थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय.जगातील सर्व गोलंदाजांची चिंधड्या उडवणारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅट म्नान न करणारे कांगारु फलंदाज आता दोनशे धावाही करु शकत नाहीत.शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राचा वारसा सांगणा-या कांगारुंच्या गोलंदाजाना एंडरसन-पानेसार ही शेवटची इंग्लंडची जोडी तासभर घाम गाळूनही फोडता येत नाही. फक्त इंग्लंड नाही तर भारत श्रीलंका आणि न्यूझिलंड संघाच्या विरुद्धही ऑस्ट्रेलियानं कसोटी गमावलीय.सलग सोळा कसोटी दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम करणा-या कांगारुंना सलग दोन कसोटी जिंकतानाही धाप लागतीय.क्रिकेटविश्व आता समतल पातळीवर आलंय.
मी क्रिकेटमधील वेस्टइंडिजचे युग पाहिले नाही.लॉईड,रिचर्डस,ग्रिनीच,मार्शल या सारख्या खेळाडूंचा खेळ मी पाहू शकलो नाही.परंतु ऑस्ट्रेलियन युग मात्र पुर्णपणे अनूभवलंय.सलग तीन विश्वचषक, सलग सोळा कसोटी जिंकण्याचा दोन वेळेस विक्रम, कित्येक कसोटी आणि एकदिवसीय मालिकांमध्ये अगदी एकतर्फी विजय मिळवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.विजयाचे दुसरे नाव म्हणजे ऑस्ट्रेलिया.प्रतिस्पर्धीला कोणतीही दयामाया न दाखवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.सामना जिंकून देणारे एक नाही तर अकरा खेळाडू एकाच संघात बाळगणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. कोणत्याही खेळाडूचे अथवा कर्णधाराचे अजिबात लाड न करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.क्रिकेटमधील सर्वात खडूस स्वभावाची टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.
मला आठवतोय इंग्लंडमध्ये 1999 साली झालेला विश्वचषक.दक्षिण अफ्रिका संघ नेहमीप्रमाणे तुफान फॉर्मात होती.उपांत्य सामन्यात कांगारुचा संघ दोनशेही धावा करु शकला नव्हता.पण ते डगमदले नाहीत.त्यांच्या गोलंदाजांनी खांदे टाकले नाहीत.किवा क्षेत्ररक्षकांनी नाहक चूका केल्या नाहीत.शेन वॉर्नने एक अप्रतिम स्पेल टाकला.दक्षिण अफ्रिकेची प्रमुख फळी कापून काढली.शेवटच्या षटकात कांगारुंना विजयाकरता नऊ धावा हव्या होत्या.स्ट्रायकवर होता त्या विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडू लान्स क्लूसनर.पहिल्या दोन चेंडूवर क्लूसनरने चौकार मारले.सामना बरोबरीत आणला.चार चेंडू शिल्लक होते.क्रिकेट पाहणा-या सर्व प्रेक्षकांनी सामन्यांचा निकाल गृहित धरला होता.मात्र मैदानावर खेळणारे ते 11 ऑस्ट्रेलियन लढाऊंनी अजून हार पत्कारली नव्हती.तिस-या चेंडूवर क्लूसनरचा अतिउत्साह आणि डोनाल्डचा भित्रेपणा यांचा संगम झाला.चाणाक्ष कांगारुंनी ती संधी साधली.काही कळायच्या आत क्लूसनरला धावचित केले.सरस धावगतिच्या जोरावर कांगारु अंतिम फेरीत गेले.मोक्याच्या क्षणी कच खाणा-या दक्षिण अफ्रिकन वृत्तीला कधीही हार न मानणा-या कांगारुंच्या जिद्दीने धूळ चारली.या सामन्यानंतर झालेले तिन्ही (99.2003,2007 ) हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकलेत.दक्षिण अफ्रिकेची मात्र विश्वविजेतेपदाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही.
उगवलेला सूर्य हा मावळतोच. भरतीच्या वेळी खवळलेला सागरही शांत होतो.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन युगाचा अंत आता जवळ आलाय. शेन वॉर्न.ग्लेन मॅग्रा,मॅथ्यू हेडन,गिलख्रिस्ट हे ऑल टाईम ग्रेट ऑस्ट्रेलियन फलंदाज आता निवृत्त झालेत.त्यांची जागा घेणारे खेळाडू त्यांना अजुनही मिळालेले नाहीत.ब्रेट लि या दौ-यात केवळ टुरिस्ट ठरला.मिचेल जॉन्सचा फॉर्म पार हरपलाय.सलामीच्या जोडीचा प्रश्न अजनही सुटलेला नाही.शेवटच्या तीन कसोटीत शेन वॉटसनला सलामीला पाठवण्याचा त्यांचा निर्णय हा असाच अंगाशी आला.प्रभावी बेंच स्ट्रेन्थच्या अभावी ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला थकलेल्या आणि अनअनुभवी खेळाडूंवर अवलंबून राहावे लागले.या सर्व कारणामुळे पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडमध्ये सलग दुस-यांदा अॅशेस गमावल्यात.गेल्या शंभर वर्षात अशी नामुष्की कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघावर ओढावली नव्हती.कधी फ्लिंटॉफ,कधी स्टुएर्ट ब्रॉड तर कधी जोनाथन ट्रॉट अशा वैयक्तिक कामगरिच्या जोरावर इंग्लंडने ही मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाणा-या ऑस्ट्रेलियन आत्मविश्वासाच्याच 'अॅशेस' झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या या पराभवानंतर टीम इंडियानेही बोध घेतला पाहिजे.ऑस्ट्रेलियन संघ हा काही ठरावीक खेळाडूंवर अवलंबून होता.हे आता स्पष्ठ झालंय. कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही सचिन-द्रविड-लक्ष्मण-सेहवाग यांच्या पलिकडे जाऊ शकलेला नाही.अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर एकहाती सामना जिंकून देणारा गोलंदाज कोण याचे उत्तर आपल्याला ठामपणे देता येत नाही.एकदिवसीय संघातही वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले.युवा रक्ताला वाव दिला.परतु दोन वर्षानंतर पुन्हा एकदा तिस-या क्रमांकार खेळण्याकरता राहुल द्रविड हाच एकमेव पर्याय निवड समितीसमोर उरलाय. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या T-20 विश्वचषकात सेहवागची कमतरता जाणवली.युवराजला कसोटी संघात अजुनही आपला क्लास सिद्ध करता आलेला नाही.रोहित शर्मा ,रैना अनअनुभवी आहेत.हरभजन बेभरवशाचा तर झहीर खान सतत दुखापतीने घेरलेला.गेली दोन वर्ष भारतीय संघ ज्या नावाभोवती फिरतोय तो महेंद्र सिंग धोनी आपला खरा खेळ पार विसरलाय.अशा परिस्थितीमध्ये एकटा गंभीर संघाचा भार कसा वाहणार ? हा प्रश्न आहे.येत्या काही वर्षात सचिन-लक्ष्मण-राहुल हे निवृत्त होतील.हे महान खेळाडूंच्या निवृत्तीआधीच त्यांच्या पर्यायाचा शोध आपण गांभिर्याने घ्यायला हवा.अन्यथा अटलजी विना भाजपची झालीय त्याहीपेक्षा केविलवाणी अवस्था टिम इंडियाची होऊ शकते.क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियन युगाचा अंत होत असताना या सरत्या युगापासून हाच धडा टिम इंडियाने घ्यायला हवा.