Wednesday, August 26, 2009

ऑस्ट्रेलियन युगाचा अंत


जो पिछले कई साल मे नही हूआ वो अब हो गया है !

हो हे खरं आहे. क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपलीय. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियानं सलग दुस-यांदा अ‍ॅशेस मालिका गमावली.कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पॉंन्टिंगचा संघ पहिल्या,दुस-या किंवा तिस-या नाही तर थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय.जगातील सर्व गोलंदाजांची चिंधड्या उडवणारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅट म्नान न करणारे कांगारु फलंदाज आता दोनशे धावाही करु शकत नाहीत.शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राचा वारसा सांगणा-या कांगारुंच्या गोलंदाजाना एंडरसन-पानेसार ही शेवटची इंग्लंडची जोडी तासभर घाम गाळूनही फोडता येत नाही. फक्त इंग्लंड नाही तर भारत श्रीलंका आणि न्यूझिलंड संघाच्या विरुद्धही ऑस्ट्रेलियानं कसोटी गमावलीय.सलग सोळा कसोटी दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम करणा-या कांगारुंना सलग दोन कसोटी जिंकतानाही धाप लागतीय.क्रिकेटविश्व आता समतल पातळीवर आलंय.

मी क्रिकेटमधील वेस्टइंडिजचे युग पाहिले नाही.लॉईड,रिचर्डस,ग्रिनीच,मार्शल या सारख्या खेळाडूंचा खेळ मी पाहू शकलो नाही.परंतु ऑस्ट्रेलियन युग मात्र पुर्णपणे अनूभवलंय.सलग तीन विश्वचषक, सलग सोळा कसोटी जिंकण्याचा दोन वेळेस विक्रम, कित्येक कसोटी आणि एकदिवसीय मालिकांमध्ये अगदी एकतर्फी विजय मिळवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.विजयाचे दुसरे नाव म्हणजे ऑस्ट्रेलिया.प्रतिस्पर्धीला कोणतीही दयामाया न दाखवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.सामना जिंकून देणारे एक नाही तर अकरा खेळाडू एकाच संघात बाळगणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. कोणत्याही खेळाडूचे अथवा कर्णधाराचे अजिबात लाड न करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.क्रिकेटमधील सर्वात खडूस स्वभावाची टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.

मला आठवतोय इंग्लंडमध्ये 1999 साली झालेला विश्वचषक.दक्षिण अफ्रिका संघ नेहमीप्रमाणे तुफान फॉर्मात होती.उपांत्य सामन्यात कांगारुचा संघ दोनशेही धावा करु शकला नव्हता.पण ते डगमदले नाहीत.त्यांच्या गोलंदाजांनी खांदे टाकले नाहीत.किवा क्षेत्ररक्षकांनी नाहक चूका केल्या नाहीत.शेन वॉर्नने एक अप्रतिम स्पेल टाकला.दक्षिण अफ्रिकेची प्रमुख फळी कापून काढली.शेवटच्या षटकात कांगारुंना विजयाकरता नऊ धावा हव्या होत्या.स्ट्रायकवर होता त्या विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडू लान्स क्लूसनर.पहिल्या दोन चेंडूवर क्लूसनरने चौकार मारले.सामना बरोबरीत आणला.चार चेंडू शिल्लक होते.क्रिकेट पाहणा-या सर्व प्रेक्षकांनी सामन्यांचा निकाल गृहित धरला होता.मात्र मैदानावर खेळणारे ते 11 ऑस्ट्रेलियन लढाऊंनी अजून हार पत्कारली नव्हती.तिस-या चेंडूवर क्लूसनरचा अतिउत्साह आणि डोनाल्डचा भित्रेपणा यांचा संगम झाला.चाणाक्ष कांगारुंनी ती संधी साधली.काही कळायच्या आत क्लूसनरला धावचित केले.सरस धावगतिच्या जोरावर कांगारु अंतिम फेरीत गेले.मोक्याच्या क्षणी कच खाणा-या दक्षिण अफ्रिकन वृत्तीला कधीही हार न मानणा-या कांगारुंच्या जिद्दीने धूळ चारली.या सामन्यानंतर झालेले तिन्ही (99.2003,2007 ) हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकलेत.दक्षिण अफ्रिकेची मात्र विश्वविजेतेपदाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही.

उगवलेला सूर्य हा मावळतोच. भरतीच्या वेळी खवळलेला सागरही शांत होतो.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन युगाचा अंत आता जवळ आलाय. शेन वॉर्न.ग्लेन मॅग्रा,मॅथ्यू हेडन,गिलख्रिस्ट हे ऑल टाईम ग्रेट ऑस्ट्रेलियन फलंदाज आता निवृत्त झालेत.त्यांची जागा घेणारे खेळाडू त्यांना अजुनही मिळालेले नाहीत.ब्रेट लि या दौ-यात केवळ टुरिस्ट ठरला.मिचेल जॉन्सचा फॉर्म पार हरपलाय.सलामीच्या जोडीचा प्रश्न अजनही सुटलेला नाही.शेवटच्या तीन कसोटीत शेन वॉटसनला सलामीला पाठवण्याचा त्यांचा निर्णय हा असाच अंगाशी आला.प्रभावी बेंच स्ट्रेन्थच्या अभावी ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला थकलेल्या आणि अनअनुभवी खेळाडूंवर अवलंबून राहावे लागले.या सर्व कारणामुळे पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडमध्ये सलग दुस-यांदा अ‍ॅशेस गमावल्यात.गेल्या शंभर वर्षात अशी नामुष्की कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघावर ओढावली नव्हती.कधी फ्लिंटॉफ,कधी स्टुएर्ट ब्रॉड तर कधी जोनाथन ट्रॉट अशा वैयक्तिक कामगरिच्या जोरावर इंग्लंडने ही मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाणा-या ऑस्ट्रेलियन आत्मविश्वासाच्याच 'अ‍ॅशेस' झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या या पराभवानंतर टीम इंडियानेही बोध घेतला पाहिजे.ऑस्ट्रेलियन संघ हा काही ठरावीक खेळाडूंवर अवलंबून होता.हे आता स्पष्ठ झालंय. कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही सचिन-द्रविड-लक्ष्मण-सेहवाग यांच्या पलिकडे जाऊ शकलेला नाही.अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर एकहाती सामना जिंकून देणारा गोलंदाज कोण याचे उत्तर आपल्याला ठामपणे देता येत नाही.एकदिवसीय संघातही वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले.युवा रक्ताला वाव दिला.परतु दोन वर्षानंतर पुन्हा एकदा तिस-या क्रमांकार खेळण्याकरता राहुल द्रविड हाच एकमेव पर्याय निवड समितीसमोर उरलाय. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या T-20 विश्वचषकात सेहवागची कमतरता जाणवली.युवराजला कसोटी संघात अजुनही आपला क्लास सिद्ध करता आलेला नाही.रोहित शर्मा ,रैना अनअनुभवी आहेत.हरभजन बेभरवशाचा तर झहीर खान सतत दुखापतीने घेरलेला.गेली दोन वर्ष भारतीय संघ ज्या नावाभोवती फिरतोय तो महेंद्र सिंग धोनी आपला खरा खेळ पार विसरलाय.अशा परिस्थितीमध्ये एकटा गंभीर संघाचा भार कसा वाहणार ? हा प्रश्न आहे.येत्या काही वर्षात सचिन-लक्ष्मण-राहुल हे निवृत्त होतील.हे महान खेळाडूंच्या निवृत्तीआधीच त्यांच्या पर्यायाचा शोध आपण गांभिर्याने घ्यायला हवा.अन्यथा अटलजी विना भाजपची झालीय त्याहीपेक्षा केविलवाणी अवस्था टिम इंडियाची होऊ शकते.क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियन युगाचा अंत होत असताना या सरत्या युगापासून हाच धडा टिम इंडियाने घ्यायला हवा.

Tuesday, August 18, 2009

शाहरुख पब्लिसिटी खान


शाहरुख खान या बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला चौकशीकरता अमेरिकेतल्या नेवार्क या विमानतळावर थांबवण्यात आलं.त्याच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. तो ग्लोबल आयकॉन आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात त्याचे फॅन्स आहेत.भारतामधील अगदी वरपर्यंतच्या वर्तुळात त्याच्या ओळखी आहेत.अगदी कशाचाही त्या खडूस तपासणी अधिका-यांवर परिणाम झाला नाही.त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्याची मुक्तता केली.खरंतर शाहरुख सारख्या सेलिब्रिटीनी हा विषय समंजसपणे हाताळायला हवा होता.पण माझं नाव मुस्लिम आहे म्हणूनच मला थांबवण्यात आलं.असा दावा त्यानं केला.

एप्रिल महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.

ह्या विषयावरचे नेटवरील संदर्भ अभ्यासत असताना माणिक मुंढे या माझ्या जुन्या सहका-याने त्याच्या ब्लॉगवर लियो टॉलस्टायबद्दलचा लिहलेला एक प्रसंग वाचण्यात आला.हा प्रसंग जशाच्या तशा लिहण्याचा मोह मला होतोय.टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

हे तीन प्रसंग आहेत तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे..तीन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय. हे कर्तुत्व सिद्ध केल्यानंतर जो समंजसपणा यायला हवा तो शाहरुखमध्ये आलाय..असं काही वाटतं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून मुस्लिम नट टॉपला आहेत. ' खान ' नावांच्या खानदानाची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याची बातमी कधी तरी आल्याचं आठवतंय का ? परंतु घर नाकारलं गेल्यावर किसर किंग इमरान हश्मीलाही तो मुस्लिम असल्याचा साक्षात्कार होतो.अमेरिकेत तपासणी झाल्यावर शाहरुखला मुस्लिम म्हणून मिळणारी सहानभूती कॅश करण्याचा प्रयत्न करतो.

अमेरिकन नागरिकांमध्ये मुस्लिमांबद्दल खरचं द्वेष असाता तरं बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष कसे झाले असते ? अमेरिकेमध्ये आज लाखो मुस्लिम नागरिक राहातायत.त्यामधील अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गैरमुस्लिम नागरिकांना मिळणा-या वागणुकीपेक्षा कित्येक पटीनं सन्मानाची,प्रतिष्ठेची आणि बरोबरीची वागणूक या मुस्लिमांना मिळते.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेमधील परिस्थीती झपाट्याने बदललीय. सर्व सार्वजनिक ठिकाणी अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. कोणत्याही व्यक्तीची तपासणी होत असताना त्याची प्रतिष्ठा,पद समाजातील राजकीय स्थान कशा कशाचाही विचार केला जात नाही.अमेरिकेत जाऊन आलेल्या लाखो भारतीयांनी याचा अनेकदा अनुभव घेतलाय.परंतु त्यांनी त्याचा कधीही ब्रभा केला नाही.अमेरिकेत येणा-या,वावरणा-या प्रत्येक नागरिकांच्या हलचालींवर अमेरिकन सुरक्षा अधिका-यांचे बारीक लक्ष असते.त्यामुळेच अमेरिकेवर 9-11 नंतर एकही मोठा हल्ला होऊ शकला नाही.त्याच्या नेमक्या उलट आपल्याकडची परिस्थिती.26-11 नंतर आपण सतर्क झालो.असा एक समज आहे.पण आजही सीएसटी स्टेशनच्या परिसरात अगदी सहजपणे वावरता येतं..मेटल डिटेक्टर सुरक्षा अधिकारी काय आणि कसे काम करतात याची अनुभती अनेक जण रोज घेत असतात.त्यामुळेच या देशात कुठेही आणि कधीही अगदी सहज हल्ला होऊ शकतो.

देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले.मात्र तरीही या देशातीन अनेकांच्या रक्तातील संरजामी गूण गेली नाही.उलट राजकारणी,सनदी नोकरशाहा,चित्रपट कलावंत,क्रिकेटपटू यांच्यातील सरंजामदाराची नवीन जमात या देशात निर्माण झालीय.आपल्या देशात मिळणा-या व्हीव्हीआयपी वागणुकीची त्यांना इतकी सवय झालीय की त्यांना परदेशातही हीच वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते.

लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. या पाचशे कोटींमध्ये विकासाची कित्येक काम होऊ शकतात.आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही.ही व्यक्ती आहे पंडित नेहरुंचा पणतूजावाई,इंदिरा गांधीचा नातजावाई,सोनिया गांधींचा जावई आणि प्रियंका गांधीचा नवरा रॉबर्ट वढेरा.गांधी घराण्याचा जावाईच हीच त्याची एकमेव ओळख.केवळ याच गोष्टींमुळे तो देशातील सर्वशक्तीशाली नागरिकांमध्ये जाऊन बसतो.

शाहरुखच्या चाहत्यांना हा संपूर्ण देशाचा अपमान वाटला.आपल्याकडे ही बातमी गाजत असताना अमेरिकेत आणखी एक प्रकार घडला. बॉब डिलन या वयोवृद्ध अमेरिकन संगीतकाराला एका चौकशी अधिका-याने अडवलं.बॉब डिलन आज ८४ वर्षांचे आहेत. गेल्या पाच दशकांत त्यांच्या संगीताने जगभरातल्या संगीतकारांवर प्रचंड प्रभाव टाकला आहे. अमेरिकेसह जगभरातल्या संगीत रसीकांवर त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे.असे हे जगप्रसिद्ध बॉब डिलन अमेरिकेतल्या एका चौकशी अधिका-याच्या 'अपमानास्पद' वागणुकीला सामोरे गेले. परंतु बॉब यांनी आपण संगीतकार आहोत,वृद्ध आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी आहोत..असा कोणताही गवगवा केला नाही.

ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.या जॉर्ज ऑरवेल यांच्या वाक्याची सतत आठवण येत राहते..मोअर इक्वल या प्रकारात मोडणारे अनेक शाहरुख आपल्या देशात आहेत.त्यांच्या या समजूतीला कोणी धक्का दिला की काही जण आदळाआपट करतात.कुणाला तो दलित महिलेचा अपमान वाटतो तर कुणाला आणखी काही..शाहरुख सारखे काही हूशार व्यक्ती त्याचा पब्लिसिटीसाठी वापर करुन घेतात.या देशातील भोळी-भाबडी जनता मात्र त्यांच्या अशा नाटकी वागण्याला बळी पडते.त्यांचा अपमान हा स्वत:चा अपमान समजते. कोणी आपला आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करुन घेतयं हे त्यांच्या गावीही नसतं.सरंजामशाही नष्ट झाले, संस्थानिकांचे तनखे रद्द झाले परंतु संस्थानिकांना देव समजण्याची खास भारतीय प्रवृत्ती अजूनही नष्ट झालेली नाही.

भारतीय मनोवृत्ती आणि अमेरिक मनोवृत्तींमध्ये असलेला हा एक सर्वात मोठा फरक.अमेरिकेची बरोबरी करायाला निघालेल्या आपण सर्वांनी सुरवातीला ही मनोवृत्ती बदलायला हवी.पण याची तयारी किती जणांची आहे ?

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...