Saturday, August 27, 2011

अण्णांचे आंदोलन आणि लोकशाही व्यवस्था


दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य
ते काढाया यत्न करावे यातच जीवन साफल्य .
       
  अशा प्रकारच्या ओळी आपल्यापैकी अनेकांनी कित्येकदा वाचल्या असतील. त्यावर पोटतिडकीने चर्चा केली असेल, शोधनिंबधही लिहले असतील..पण केवळ वाचन,चर्चा शोधनिबंध लिहून हा विषय थांबत नाही. आपल्या देशाची आपल्या बांधवांची आज जी अवस्था झालीय ती बदलली पाहिजे...ही अवस्था ज्यांनी केली त्यांना शासन व्हावे किमान त्यांना जरब बसावी यासाठी काही तरी केलं पाहिजे यासाठी पुढाकार घेणारे यासाठी मरमर करणारे फारच थोडे आहेत. थोडक्यात काय तर शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात हीच मानसिकता असलेल्या या देशात अण्णा हजारे नावाचा शालेय शिक्षण ही पूर्ण न झालेला 76 वर्षांचा खेडूत देशातील भ्रष्टाचार संपुष्टात यावा यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारतो. मराठी मिश्रीत हिंदीमध्ये  बोलणा-या अण्णांच्या शूद्ध आचार , शूद्ध विचार, समर्पण, त्याग या सारख्या शब्दांची या 120 कोटींच्या देशाला भूरळ पडते..कोणतेही प्रलोभन, धाक न दाखवता या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी लोक जमतात ही खरच अतिशय अविश्वसनीय गोष्ट आहे.

                या अविश्वसनिय गोष्टी सुरु असतानाही काही गोष्टी मात्र अत्यंत अपेक्षेप्रमाणे सुरु आहेत. अण्णा हजारे कसे हट्टी आहेत...त्यांच्या साध्या इमेजचा फायदा घेत केजरीवाल,किरण बेदी  आपला छुपा एजंडा कसा राबवतायत, भाजपला सत्तेमध्ये आणण्यासाठी रा.स्व.संघ अण्णांचा वापर करतंय, अण्णांचा लोकपाल ही एक कशी फॅंटसी आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या आंदोलनामुळे देशाच्या सार्वभौमं संसदेला कसा धोका निर्माण झालाय...हे आंदोलन लोकशाही व्यवस्थेसाठी कसे घातक आहे असा प्रचारही आपल्या देशातील काही मंडळी अगदी प्रामाणिकपणे करतायत. महेश भटसारख्या भंपकांनी अण्णा हजारेंची तुलना काश्मिरमधले फुटीरतावादी नेते गिलानीशी केली. तर वादग्रस्त आणि बेछूट बोलण्यामध्ये दिग्विजय सिंगांचे महिला रुप  असलेल्या अरुंधती रॉयनी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना अण्णा हजारे गप्प का होते ? असा सवाल उपस्थित केला.  टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी अण्णांनी त्यांचे कौतुक कुठे केले ? म्हणून माझा या आंदोलनाला विरोध आहे असे अजून कोणत्या क्रिकेटपटूनी म्हंटले नाही हे निश्चितच कौतुकास्पद मानावे लागेल.

      गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या पस्पर विरोधी मत-मतांतरामुळे माझ्या डोक्याचा पार 'केमिकल लोचा' झाला होता. ही दुसरी क्रांती आहे की भाबडा आशावाद ? /यामध्ये टीम अण्णांचा निस्वार्थीपणा आहे की आक्रस्ताळेपणा ? ज्या लोकशाही तत्वांचा मला अभिमान आहे...ज्या सांसदीय पद्धतीचा अभ्यास मी अगदी आवडीने केलाय....त्याला यामुळे खरचं धक्का बसेल ? तिचे महत्व कमी होईल ? महेंद्रसिंग टिकैत, शरद जोशी यांच्या एकेकाळच्या आंदोलनाप्रमाणेच अण्णांच्या आंदोलनाची अवस्था होईल ? सर्वात महत्वाचे म्हणजे लोकपाल हे देखील भ्रष्टाचार करण्याचे नवे माध्यम बनेल का या सारख्या प्रश्नांनी मी काहीसा गोंधळलो होतो. मात्र गेल्या काही दिवसात याबबतची वेगवेगळे साहित्य वाचले. मित्रांशी चर्चा, वाद-विवाद केले आणि त्यानंतर अण्णा  हजारेंचे आंदोलन हे देशाच्या भल्यासाठी आवश्यक आहे तसेच यामुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नसून उलट ती सशक्तच होईल असं माझं ठाम मत झालंय. 

           लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवले राज्य म्हणजे लोकशाही. ही व्याख्या आपण सर्वांनी शिकली आहे. आज आपल्या देशातली लोकशाही खरीच तशी आहे ?  ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यामधील बहुतेकांची  निवडणुकीपूर्वीची संपत्ती आणि पाच वर्षानंतरची संपत्ती यामध्ये एकदम फरक कसा काय पडतो ? नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी जून्या पुराण्या लूनावर फिरणारा....झोपडी वजा घरात राहणारा व्यक्ती ...तो नगरसेवक झाल्यानंतर काही वर्षातच कारमध्ये फिरु लागतो. त्याचे झोपडी वजा घराची जागा एका इमारतीने घेतली असते. हे कसे काय घडते ? जगनमोहन रेड्डींकडे अशी काय जादूची छडी आहे किंवा त्यांच्यामध्ये असे कोणते अफाट व्यवसायिक कर्तुत्व आहे की त्यामुळे ते अवघ्या पाच वर्षात 11 लाखांवरुन थेट 43 हजार कोटींचे मालक बनतात ( ही केवळ अधिकृत आकडेवारी आहे )  मधू कोडा सारख्या व्यक्ती  एखाद्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला आव्हान निर्माण करणारे घोटाळे करतात... रेड्डी बंधू आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर येदीयुराप्पा सरकार आणि कर्नाटक भाजपला आपल्या दावणीला बांधू शकतात..आदर्श, लवासा सारख्या प्रोजेक्टच्या फाईल झटपट सरकतात...पण मावळमधल्या शेतक-यांचा आक्रोश ऐकायला सरकारला वेळ नाही ही अशी आणि याप्रकारची न संपणारी उदाहरणे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. तरीही आपण ती सहन कितपत करायची  ? जयललिता, शिबू सोरेन यासारखे घोटाळेबाज नेते वारंवार मुख्यमंत्री होतात. राजकीय गरज आणि स्वार्थापोटी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच राष्ट्रीय पक्षात चढाओढ असते.  इतकचं काय तर लालूप्रसाद यादव सारखे नेते भ्रष्टाचार ही देशाला लागलेली किड आहे  असं सांगत संसदेमध्ये भलं मोठं भाषण ठोकतात. हे सारे आपण संसदीय लोकशाहीच्या, लोकप्रतिनिधींचे हक्क यासाऱख्या गोंडस आणि पुस्तकी तत्वांसाठी आपण किती दिवस सहन करायचे ?

                    याबाबतचे वाचन करत असताना श्री अभय फिरोदीया यांच्या लेखातला एक किस्सा मला इथे टाकायचा मोह होतोय  फिरोदीया यांना वीस वर्षापूर्वी त्यांच्या एका राजकारणी मित्राने ( जो मंत्रीही होता ) त्यांनी राजकारण्यांविषयी तीन गृहितके सांगितले आहेत पहिले - राजकारणी मंडळी लोकसेवेसाठी सत्तेवर येत नाहीत, तर स्वत:ची सत्ता वाढविण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी ते सत्तेवर येतात. दुसरे - फक्त स्वत:ला  फायदेशीर ठरणारे कायदेशीर किंवा प्रशासकीय पाऊलच ते उचलतात. तिसरे प्रशासकीय किंवा संसदीय पातळीवर त्यांनी उचललेले कोणतेही पाऊल जनतेच्या फायद्यासाठीच टाकले आहे. असे चित्र निर्माण करतात, तसेच दुर्बल तळागळातीले लोक, अल्पसंख्याकांसाठी हे पाऊल उचलल्याचाही दावाही ते करतात   ( मग तसे असो किंवा नसो ) चौथे अलिखित गृहितकही फिरोदीया यांनी या लेखात लिहले आहे. ते म्हणजे तर्कदृष्ट्या पटणारी, देशाच्या हिताची नैतिकतेची सूचना मांडली तरी त्या सूचनेचा हे नेते गांभीर्याने विचार करत नाहीत. अशी सूचना राजकीय यंत्रणेबाहेरच्या व्यक्तींकडून किंवा सूजाण नागरिकांकडून आली, तरी ती दुर्लक्षिली जाते. अशा लोकांना राजकारणी बिनकामाचे किंवा तुच्छ समजतात.

    आपल्या राजकर्त्यांचा कारभार हा फिरोदियांनी मांडलेलेल्या या गृहितकांवरच आधारलेला आहे. निवडणूक व्यवस्थेतील सर्व त्रूटींचा फायदा घेत ज्यांना एकूण मतदार संख्येच्या 15 ते 20 टक्के मतं मिळाली आहेत ती आपली लोकप्रतिनिधी असतात. मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर दादा, भाई म्हणून मिरवणारी ही मंडळी आपले प्रतिनिधी म्हणून देशाच्या कायदेमंडळात बसतात आणि कायदे पास करतात अशा वेळी जनलोकपाल सारखे यांच्या नरडीचा घोट घेणारे आणि आपली दुकानदारी बंद करणारे विधेयक ही मंडळी कसे संमत करतील ?

    टीम अण्णांनी तयार केलेले लोकपाल विधेयक संमत झाले तर संसदेचा अवमान होईल असा प्रचार सध्या केला जातोय. आपल्या सरकारला सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेतेखालील परिषदेने तयार केलेला मसुदा चालतो. या परिषदेच्या सदस्यांचा कायदानिर्मितीमध्ये सक्रीय सहभाग असतो. सोनियांच्या स्वयंसेवी संस्थांना जो न्याय आहे तो अण्णांच्या स्वयंसेवी संस्थेला का नाही ?

  सध्या देशात असंख्य घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. या घोटाळ्यांमध्ये गुंतलेले सर्वपक्षीय नेत्यांचे चेहरे उघड होतायत तरीही ही बडी धेंड अजूनही उजळ माथ्यानं समाजात वावरतात. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आजवर कोणत्या लोकप्रतिनिधीला कायमचे जेलमध्ये राहवे लागले आहे ?

  लोकपाल बिलातील वादग्रस्त तरतूदींवर चर्चा होऊन त्यामध्ये आवश्यक बदल घडले पाहिजेत. मात्र हे बिल संसदेमध्ये सादर न करण्याचा हट्ट सरकारने का धरला ? हा हट्ट सरकारने 16 ऑगस्टपूर्वी सोडला असता तर अण्णांचे उपोषण झालेच नसते. भ्रष्ट व्यक्तींना जरब बसवण्यासाठी सरकारही गंभीर आहे असा संदेश ही यामधून गेला असता. मात्र मनमोहन सरकारने ही संधी दवडलीय. या कायद्यामुळे भ्रष्टाचार शंभर टक्के संपणार नाही मात्र भ्रष्ट व्यक्तींना जरब निश्चित बसू शकेल. एकट्या टी.एन. शेषनने निवडणूक आयोगाची जरब काय असते हे देशाला दाखवून दिलं. कॅगचा वार्षिक रिपोर्ट किती परिणाम करु शकतो हे विनोद रायनं सिद्ध केलंय. शेषन, विनोद राय यासारखे काम लोकपालही करु शकतो.
    
     पंतप्रधान आणि न्यायव्यवस्था लोकपालाच्या कार्यकक्षेत येता कामा नये हा हट्ट कशासाठी ? भारतीय राज्यघटनेनुसार देशाची जनता सार्वभौम आहे. तर मग या सार्वभौम नागरिकांचे जगणे असह्य करणा-या प्रत्येकांना वेळोवेळी जाब विचारायचा अधिकार त्यांना असायला हवा. देशाच्या राजकीय संस्कृतीचे संपूर्ण चित्र यामधून बदलू शकते. ते चित्र बदलू नये यासाठीच सध्या आटापिटा सुरु आहे.  

     स्वत:च्या फायद्यासाठी कायदे करणारी व्यवस्था बदलण्याची आता गरज आहे. लोकशाही व्यवस्थेत संसद सर्वोच्च आहे, संसद सदस्य नाही. सरकार सर्वोच्च आहे,  सरकार चालवणारे नाही. त्याचप्रमाणे लोकपाल सर्वोच्च, लोकपाल ही यंत्रणा चालवणा-या व्यक्ती नाही हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. अण्णा हजारेंनी दुस-या स्वातंत्र्य लढ्याची जी हाक देशाला दिली आहे त्यामधून याच प्रकारचे स्वातंत्र्य देशाला अपेक्षित आहे. देशातल्या जनतेला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सुरु असलेले हे आंदोलन लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक कसे असू शकेल ?           

Sunday, August 14, 2011

टीम इंडियाचे वस्त्रहरण


प्रचंड तगडी स्टारकास्ट, अनुभवी आणि नावाजलेला दिग्दर्शक, पाण्यासारखा पैसा खर्च करणारा निर्माता, उत्तम लोकेशन्स, तगडी तंत्रज्ञानाची फौज, आणि प्रसिद्धीपूर्वी ओतलेला पैसा या सा-या गोष्टींद्वारे वातावरणनिर्मीती करता येते. लोकांची उत्सुकताही चाळवता येते. मात्र चित्रपट सुपरहिट होण्यासाठी या सर्वांची एकत्रित भट्टी जमली पाहिजे. नावाजलेले कलाकार आपल्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून  जर पाट्या टाकणारे काम करु लागले तर ते लगेच उघडे पडतात. त्यांचा चित्रपट फ्लॉप होतो. अशा प्रकारचा चित्रपट मोठी अपेक्षा ठेवून गेलेल्या प्रेक्षकांचा जो मनस्ताप होतो जी चिडचिड होते तशीच माझी अवस्था सध्या झाली आहे.

 गेली 19 महिने  जपलेलं टेस्टमधलं साम्राज्य आता खालसा झालाय. नंबर 1 हा काही कायमस्वरुपी नसतोच. जी टीम आज नंबर 1 वर आहे ती उद्या नंबर 2 वर येणार हे निश्चित असतं. क्रिकेटवर एक दशकांपेक्षा जास्त राज्य करणारे वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया हेही नंबर 1 वरुन पायउतार झाले आहेत. मग  आपल्या पराभवाचं इतकं मनाला का लावू घ्यायचं ? असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. पण आपण ज्या पद्धतीनं हरलोय त्याबद्दल या टीमला कधीही क्षमा करता येणार नाही. टेस्टमध्ये नंबर 1 , चार महिन्यापूर्वी वन-डेमधली वर्ल्ड चॅम्पियन असणारी टीम इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश किंवा झिम्बाब्वेला लाजवेल अशा पद्धतीने हरली आहे.

   आपली कामगिरी किती सुमार आहे. हे भयाण वास्तव जाणून घेण्यासाठी काही आकडेवारी पुरेशी आहे. ( ही आकडेवारी भारत वि. इंग्लंड यांच्यातील पहिल्या 3 टेस्टची आहे. )

         भारताने केलेले रन्स -  1461
        इंग्लंडने केलेले रन्स -  2218  ( इंग्लंड 757 रन्स अधिक )
         भारतीय बॉलर्सनी घेतलेल्या विकेट्स - 41
         इंग्लिश बॉलर्सनी घेतलेल्या विकेट्स - 60 ( इंग्लंड 19 विकेट्सने  म्हणजेच जवळपास दोन  इनिंग जास्त )
           भारतीय बॅट्समनने झळकावलेल्या सेंच्युरी / डबल सेंच्युरी  - 2 /0
           इंग्लंडच्या बॅट्समनने झळकावलेल्या सेंच्युरी/ डबल सेंच्युरी - 5/2
        भारतीय बॅट्समनने झळकावलेल्या हाफ सेंच्युरी -  7
        इंग्लंडच्या बॅट्समनने झळकावलेल्या हाफ सेंच्युरी - 9
   इंग्लंडने आपल्यापेक्षा एक इनिंग कमी बॅटिंग केली आहे अन्यथा हा फरक आणखी वाढला असता.

    बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, मैदानावरचे आणि मैदानाबाहेरचे डावपेच अशा प्रत्येक क्षेत्रात इंग्लंडने आपल्यावर मात केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन, टेस्टमधली नंबर 1 टीम अशी एकदम रसातळाला कशी जाऊ शकते. ह्या टीमवर काही भानामती तर झाली नाही ना इतक्या टोकच्या अविश्वसनिय पद्धतीनं सध्या आपण हरतोय.

 अवसानघातकी बॅटिंग   -   बलाढ्य बॅटिंग ही टीम इंडियाची सर्वात मोठी शक्ती. याच बॅटिंगच्या जोरावर आपण नंबर 1 झालो. सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण सारखे अनुभवी आणि सोबतीला गंभीर, रैना आणि धोनीसारखे आक्रमक युवा बॅट्समन या टीममध्ये आहेत. संपूर्ण क्रिकेटविश्वाला हेवा वाटावा इतकी श्रीमंत बॅटिंग ऑर्डर आपल्याला लाभली आहे.


        पण इंग्लंडमध्ये काय झाले ?  टेस्टमध्ये सर्वात जास्त रन्स करणारे पहिले दोन बॅट्समन ( सचिन, द्रविड )  ज्या टीमममध्ये आहेत. त्या टीमला 6 पैकी एकाही इनिंगमध्ये 300 चा टप्पा पार करता आलेला नाही. सचिन, द्रविड आणि लक्ष्मण या तिघांचे एकत्रित टेस्टमध्ये एकूण 101 सेंच्युरी आहेत. पण या सीरिजमध्ये सचिन- द्रविड, सचिन- लक्ष्मण किंवा द्रविड - लक्ष्मण यांना एकदाही शतकी पार्टनरशिप करता आली नाही.याच भक्कम मीडल ऑर्डरच्या जोरावर आपण गेली 19 महिने राज्य केलं होतं. तीच मीडल ऑर्डर या सीरिजमध्ये अपयशी ठरली आहे. लॉ ऑफ एव्हरेज, किंवा महासेंच्युरीचे दडपण किंवा वेस्ट इंडिज दौ-यावर न जाण्याची चूक कारण काहीही असो सचिनसाठी ही सीरिज निराशाजनक ठरलीय. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या खेळण्यातील सौंदर्याला इंग्लंडमध्ये क्षणभंगुरतेचा शाप लागलाय. लॉर्डस आणि ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये लक्ष्मण चांगलं खेळत असताना अचानक  खराब शॉट मारुन आऊट झाला. एकट्या राहुल द्रविडने पहिल्या दोन टेस्टमध्ये शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याचीही शिकस्तही अपूरी ठरली.

           वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन टेस्ट दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तिस-या टेस्टमध्ये प्रचंड गाजावाजा करत तो आला आणि लगेच परतला. दोन्ही इनिंग मिळून तो फक्त 8 मिनिटे बॅटिंगसाठी मैदानात होता.      दुस-या इनिंगमध्ये जेंव्हा टीमला त्याची प्रचंड गरज होती. त्यावेळी ह्या नजफगडच्या नवाबाने आपली विकेट खिरापतीमध्ये बहाल केली. जेम्स एण्डरसनचा पहिलाच बॉल तो अगदी उतावळ्या पद्धतीने ( यालाच कौतुकाने सेहवाग स्टाईल म्हंटले जाते )  खेळला. सेहवाग खेळताना बहुधा हे विसरला असवा की स्लिपमध्ये राहुल द्रविड नाही स्ट्रॉस उभा आहे. स्ट्रॉसनं आनंदाने सेहवागचे दान स्विकारले. एजबस्टमध्ये तिस-या दिवशी इंग्लंड प्रचंड भक्कम परिस्थितीमध्ये असताना एलिस्टर कूकने शांतपणे खेळ करत फक्त 3 फोर लगावले . आणि आपले हे साहेब  जणू काही ही T-20 किंवा वन-डे आहे अशा थाटात पहिल्याच बॉलवर फोर मारायला निघाले.संयम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर इंग्लंडचा सलामीवीर कूकने 294 रन्स काढले. आपला ओपनर सेहवाग उतावळेपणाच्या नादात दोन्ही इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर परतला.



 बॉलिंगची बोंब -   कोणतीही टीम नंबर 1 वर टिकण्यासाठी त्या टीमचे बॉलर्स प्रभावी असणे आवश्यक असतं. वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलिया या देशांनी दिर्घकाळ राज्य केलं याचं कारण त्यांचे बॉलर्स आहेत. हेच दुस-या शब्दात सांगयच झालं तर एम्ब्रोज, वॉल्श गेल्यानंतर वेस्ट इंडिजची टीम मोडकळीस आली. आणि वॉर्न, मॅग्रा नंतर कांगारुंचा कडेलोट झाला. भारताची बॉलिंग इतकी शक्तीशाली कधीच नव्हती. मात्र झहीर खानच्या अनुपस्थितीमध्ये त्यामधला जीव हरवला. ज्या बॉलर्सनी मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत पहिली टेस्ट हरल्यानंतर कमबॅक केलं होत. ती जिद्द यंदा दिसलीच नाही. हरभजनचा सुमार खेळ सुरुचं होता. लॉर्डसमधला एक स्पेल सोडल्यास ईशांतची जादू  चालली नाही. प्रवीणकुमारनं प्रयत्न केले पण त्यात सातत्य नव्हते. त्यानं या 3 टेस्टमध्ये इतकी बॉलिंग केलीय की तो आता मैदानावर बॉलिंग करताना कधीही पडेल असं वाटू लागलंय. श्रीशांतने ट्रेंट ब्रिजमध्ये पहिल्या दिवशी आशा जागवली. मात्र एजबस्टनमध्ये तो आपण किती भंपक आहोत हे सिद्ध करण्यासाठीच बॉलिंग करत होता. अमित मिश्रा तर नो बॉल टाकणे हा आपला हक्कच आहे अशा पद्धतीनं बॉलिंग करतोय. अमित मिश्रानं आपल्या 12 टेस्टमध्ये 69 नो बॉल टाकले आहेत. तर इंग्लंडच्या सगळ्या बॉलर्सनी एकत्रित मागच्या 11 टेस्टमध्ये 39 नो बॉल टाकले आहेत. केवळ नो बॉलमधला हा फरक दोन टीममधला फरक स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे.


      खराब फिल्डिंग    -      भारतीय क्रिकेट टीमचा जन्म झाला तेंव्हापासून हा रोग आहे. लॉर्डसमध्ये पीटरसन 100 च्या आत असताना त्याचा कॅच आपल्या फिल्डरनं सोडला. पिटरसनने ़डबल सेंच्युरी झळकावली. एजबस्टन टेस्टच्या दुस-या दिवशी द्रविड, सचिन आणि श्रीशांतने मिळून 4 कॅच सोडले. यापैकी सचिननं 165 वर कूकची कॅच सोडली. तर द्रविड आणि श्रीशांतनं मॉर्गनला तो 30 रन्स करण्याच्या आत जीवदान दिलं. कूकनं 294 रन्स काढले. तर वन-डे स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्यावर शिक्का आहे त्या मॉर्गननेही सेंच्युरी झळकावत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं. सुमार बॉलिंगवर गलथान फिल्डर्सनी कळस चढवल्यामुळेच इंग्लंडला भक्कम धावसंख्येची इमारत उभी करता आलीय.

  धोनीला काय झाले ? -  

                 टीम इंडियाचा लकी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसाठी हा सर्वात खडतर दौरा ठरतोय. धोनीच्या कॅप्टनसीखाली पहिल्यांदाच भारतीय टीम टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झालीय. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये यापूर्वी भारतीय टीम सलग दोन टेस्ट एकदाही हरली नव्हती. आता पराभवाची हॅटट्रिक झालीय आणि 0-4 असा व्हाईटवॉश होण्याचा धोका आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये बॅट्समन म्हणूनही धोनी फ्लॉप   ठरला . धोनीची बॅट ही ब-याचदा शांत असते. पण यशाच्या धुंदीत हे अपयश खपवून घेतलं जायचं. आता या सीरिजपासून धोनीच्या अपयशाचा आवाजही जोरात घुमायला लागलाय. कब तक धोनी ?  यासारखे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत. एजबस्टनमध्ये त्यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याला बॅट्समन म्हणून वारंवार सिद्ध करावं लागेल. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर बहुतेक काळ बॅटिंग करुनही टेस्टमध्ये 32 सेंच्युरी झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉचा आदर्श धोनीनं ठेवण्याची गरज आहे. स्टीव्ह वॉची  टीमला संकटातून बाहेर काढण्याची कला धोनीने शिकली पाहीजे. अन्यथा कॅप्टन पदासाठी दुसरा समर्थ पर्याय मिळताच त्याची हकालपट्टी निश्चित आहे.

     धोनीची कॅप्टनसीही या सीरिजमध्ये सामान्य होतीय. झहीर खानच्या अनुपस्थितीमध्ये तो अगदीच केविलवाणा वाटतोय.लॉर्डसमध्ये तर पहिल्याच दिवशी घायकुतीला येत त्यानं  बॉलिंग केली. प्रवीण कुमार आणि ईशांत शर्मा हे दोन फास्टर आणि फुसका हरभजन टीममध्ये असल्यामुळे नाईलाजाने त्याला बॉलिंग करण्याचा जुगार खेळावा लागला. मात्र लॉर्डस टेस्टच्या दुस-या इनिंगमध्ये त्यानं रंगात आलेल्या ईशांत शर्माचा स्पेल अचानक बंद केला. ट्रेंट ब्रिजमध्ये तर त्यानं इयान बेलला परत बोलवण्याचं जे अफाट दातृत्व दाखवलं त्यामुळे धोनी मला आता थेट पृथ्वीराज चौहान यांच्या वंशातला वाटू लागलाय. बॅटिंगमधल्या खराब फॉर्मचा परीणाम त्याच्या कॅप्टनसीवर होतोय. मर्यादीत साधनांचा कुशलतेनं वापर करणारा हुशार कॅप्टन अशी त्याची ओळख आहे. मात्र या सीरिजमध्ये धोनीच्या कॅप्टनसीची स्पार्क अजून दिसलाच नाहीयं. टीम फॉर्मात येण्यासाठी धोनीमधला कॅप्टन परत येणंही आवश्यक आहे.

बीसीसीआय कधी बदलणार ?

  भारतीय टीमच्या या फ्लॉप शोचे सर्वात मोठे कारण म्हणजे अतिक्रिकेट.  गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या सर्व क्रिकेट विश्लेषकांचे आणि रसिकांचे हेच मत आहे.  वर्ल्ड कपसारख्या सर्वात प्रतिष्ठेच्या आणि मानसिक दृष्ट्या खडतर स्पर्धेनंतर अवघ्या आठवडा भराच्या आता आयपीएलच्या घाणीला भारतीय क्रिकेटपटूंना जुंपले गेले. मार्च आणि एप्रिलच्या उन्हाळ्यात संपूर्ण भारत भ्रमण करणारी ही कंटाळवाणी स्पर्धा खेळाडूंना खेळावी लागली.  जाहीरातदार तसेच फ्रॅंचायझी मालकांच्या दबावामुळे आयपीएलही खेळाडूंसाठी मानसिकरित्या कटकटीची आहे. आयपीएलचा थकवा घालवण्याची संधी काही मोजक्या प्लेयर्सनाच मिळाली. त्यानंतर भारतापेक्षा अगदी भिन्न वातावरण असलेला वेस्ट इंडिजचा दौरा. वेस्ट इंडिज सीरिजनंतर लगेच इंग्लंडची ही प्रतिष्ठेची सीरिज. अवघा एक सराव सामना खेळून भारतीय टीमला लॉर्डसमध्ये टेस्टसाठी उतरावं लागलं.
 
   या अतिक्रिकेटमुळेच भारतीय टीमला दुखापतींचे ग्रहण लागले. झहीर खान, हरभजन, युवराज सीरिजमधून आऊट झाले. वीरेंद्र सेहवाग दोन तर गंभीर एक टेस्ट खेळू शकला नाही. महत्वाच्या मॅचमध्ये झहीर सेहवाग आणि गंभीर नसल्याचा फटका टीमला बसला.इंग्लंड सीरिजमध्ये इतकी ओरड होऊनही बोर्ड धडा घ्यायला तयार नाही. या टेस्ट सीरिजनंतर 1 टी-20 आणि पाच वन-डे मॅचेसची सीरिज खेळून 18 स्पटेंबरला ही खचलेली आणि थकलेली टीम परत येईल. त्यानंतर दुस-याच दिवसापासून म्हणजे 19 स्पटेंबर पासून चॅम्पियन्स लीगला सुरुवात होतीय.सचिन, हरभजन, मुनाफ, धोनी, रैना, आणि विराट कोहली हे प्रमुख प्ले्यर या स्पर्धेत अगदी दुस-या दिवसापासून खेळताना दिसतील.चॅम्पियन लीग संपल्यानंतर लगेच इंग्लंडची टीम भारतामध्ये वन-डे आणि  T-20 खेळण्यासाठी येणार आहे. हा दौरा संपतो न संपतो तोच वेस्ट इंडिज-भारत वन-डे सीरिज आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये टीम इंडियाला आणखी एका खडतर अशा ऑस्ट्रेलिया दौ-यावर जायचे आहे. म्हणजेच इंग्लंड प्रमाणेच ऑस्ट्रेलियातही बॅण्ड वाजावा अशी संपूर्ण व्यवस्था बीसीसीआयनं केली आहे.
     ज्या क्रिकेटपटूंच्या जोरावर हे बोर्ड श्रीमंत झाले. त्याच क्रिकेटपटूंची जराही पर्वा न करणारे बीसीसीआयचे धोरण जोपर्यंत संपणार नाही तोवर टीम इंडियाचे होणारे वस्त्रहरण कोणीही रोखू शकणार नाही.   

Sunday, August 7, 2011

भारतीय क्रिकेटचा सच्चा सेवक

तो क्रिकेटचा देव मानला जात नाही. किंवा कॅप्टन कूल म्हणूनही ओळखला जात नाही. त्यानं कधी एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर्स मारले नाहीत... किंवा त्याचा कधी  ऑफ साईडचा महाराजा म्हणून गौरव झाला नाही. तरीही भारतीय क्रिकेट टीम जेंव्हा जेंव्हा संकटात सापडली तेंव्हा  गल्ली पासून दिल्ली पर्यंतचे क्रिकेट चाहते आणि ्अगदी निवड समितीलाही एका क्रिकेटपटूची आठवण होते. तो म्हणजे संकटमोचक राहुल द्रविड. भारतीय क्रिकेटचा 'सच्चा सेवक' ही ओळख असलेला राहुल द्रविड लवकरच वन-डे क्रिकेटमधून रिटायर  होणार आहे.


      दिलेली प्रत्येक जबाबदारी आपलं सर्वस्व ओतून पार पाडणा-या द्रविडचा निवड समितीनं अगदी यूझ एण्ड थ्रो अशा पद्धतीनं वापर केला. वन-डे क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन्स काढूनही याची कायम टेस्ट प्लेयर अशीच ओळख. आता इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर अवघ्या चार महिन्यात धोनीची ब्रिगेड जमिनीवर आलीय. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतर  क्रिकेटमध्ये 'भारतीय युग ' अवतरलं अशी स्वप्न पाहणा-यांना आता ही टीम इंग्लंड विरुद्ध 50 ओव्हर्स बॅटिंग करेल ना अशी शंका वाटू लागलीय. त्यामुळेच या टीमचं बुडत जहाज वाचवण्यासाठी जवळपास दोन वर्षांनंतर कुणालाही कल्पना नसताना ( अगदी राहुल द्रविडलाही ) त्याचा वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आला.  निवड समितीच्या या Use & Throw पॉलिसीला द्रविडनं आपली निवृ्ती जाहीर करुन चपराक लगावलीय.

          निवड समितीलच्या लहरी वृत्तीची किती उदाहरणं द्यावीत... 2003 च्या वर्ल्ड कपपूर्वी अगदी अचानक राहुल द्रविडवर विकेट किपरची जबाबदारी सोपवण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट किपर  हा एक स्पेशलाईजड जॉब आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट पिचवर आणि तेही वर्ल्ड कप सारख्या अतिशय महत्वाच्या स्पर्धेत अशी जबाबदारी द्रविडवर सोपवण्यात आली. द्रविडच्या जागेवर दुसरा एखादा क्रिकेटपटू असता तर त्यानं ही धोक्याची जबाबदारी  निश्चितच नाकारली असती. पण भारतीय क्रिकेटची सेवा करणे हे एकमेव तत्व घेऊन खेळणा-या द्रविडनं हा  धोका स्विकारला. क्रिकेटवेड्या देशात वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत एखादी चूक आपलं करियर उद्धवस्त करु शकते हे माहिती असूनही ( हा वर्ल्ड कप आपण जिंकला... मात्र अजूनही दक्षिण  आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या ओव्हर्समुळे कित्येक जण आशिष नेहराला माफ करायला तयार नाहीत ) द्रविडनं विकेट किपिंगचे ग्लोव्ज हातामध्ये चढवले आणि अगदी फायनलपर्यंत आपली जबाबदारी नेटानं आणि जिद्दीनं पार पाडली.

        त्यानंतर दोनच वर्षात राहुल द्रविड कॅप्टन झाला. तिस-या क्रमांकावरचा त्या काळातला सर्वात यशस्वी बॅट्समन म्हणून त्याची ओळख होती. तरीही त्यानं टीमच्या रणणिनीताचा भाग म्हणून स्वत:च पाचव्या क्रमांकावर डिमोशन केलं. वन-डे क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याची संधी ही पहिल्या तीन बॅट्समनलाच मिळते. हे त्याला निश्चितच माहिती होतं. तरीही त्यानं खालचा क्रमांक स्विकारला. त्याकाळात अगदी दिनेश कार्तिक, रॉबीन उथ्थप्पा या सारख्या नवोदित बॅट्समन्सनही राहुल द्रविडपेक्षा वरच्या क्रमांकावर बॅटिंग केलीय.

    2007 च्या  इंग्लंड सीरिजपर्यंत राहुल द्रविडचं वन-डे टीममधलं स्थान कॅप्टन म्हणून आणि प्लेयर म्हणून अबाधित होतं. मात्र भविष्याचा विचार करत त्यानं स्वत:हून कॅप्टनसी सोडली. टीमच्या भविष्याचा विचार करत कॅप्टनसीची कवचकुंडल स्वत: हून सोडणारे किती प्लेयर तुम्हाला या क्षणी आठवतात ?  ज्या द्रविडनं टीमचा विचार करत कॅप्टनसीचा त्याग केला त्या द्रविडला त्याच्याशी कसल्याही प्रकारची सल्ला मसलत न करता 2007 च्या ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर अचानक वन-डे टीममधून काढण्यात आलं.

   त्यानंतर थेट  2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची निवड समितीला आठवण झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी झालेल्या t-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय युवा बॅट्समननी साफ निराशा केली होती. इंग्लंड मध्ये  स्विंग होणा-या खेळपट्यांवर  या IPL च्या हिरोंचं तंत्र साफ उघड पडलं.टीम इंडियांच्या बॅटींगच्या ढासळता किल्ला सावरण्यासाठी 2009 मध्ये द्रविड या बुरुजाची निवड समितीला आठवण झाली.  तब्बल दोन वर्षांनतर द्रविडनं वन-डे साठी पॅड बांधले. त्या सीरिजमध्ये 40 च्या सरासरीनं रन्स करुनही त्याला पुढच्या सीरिजमधून वगळण्यात आलं.

   आता 2011 साली लॉर्डस टेस्टमध्ये झहीर खान जखमी झाल्यानं कॅप्टन धोनीनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धोनीला विकेट किपर म्हणून पुन्हा एकदा  38 वर्षे पूर्ण झालेला द्रविडचं आठवला.  जवळपास सहा वर्षांनतर अचनाक ही जबाबदारी सोपवण्यात येऊनही द्रविडनं हे काम बिनबोभाटपणे पार पाडलं. इतकचं काय तर नॉटिंगहॅम टेस्ट पूर्वी गौतम गंभीर जखमी झाल्यानंतर पुन्हा एकदा द्रविडला ओपनिंगला ढकलण्यात आलं. द्रविडऩं पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं. लॉर्डस पाठोपाठ नॉटिंगहॅममध्येही शतक झळकावलं.

        आता इंग्लंड विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी राहुल द्रविडची निवड समितीला आठवण झालीय. ज्या रैना, रोहित आणि विराट कोहलीकडं  टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहिलं जातंय... त्यांच्यापैकी कुणी (खरं तर  तिघ जण मिळूनही ) 50 ओव्हर्स खेळतील याची खात्री निवड समितीला नाही. त्यामुळे या रैना, रोहित आणि व कोहली यांना झाकण्यासाठी द्रविडची निवड समितीला आठवण झालीय. लॉर्डस, नॉटिंगहॅम, एजबस्टनच्या उसळत्या पिचवर खेळण्यासाठी द्रविड आणि राजकोट. हैदराबाद, ग्वाहलेरच्या पाटा पिचवर खेळण्यासाठी रैना, रोहित आणि कोहली....हेच निवड समितीचं धोरण आहे. निवड समितीच्या या धोरणाची पूरेपूर माहिती असूनही त्यावर कोणताही आक्षेप न नोंदवता आपली कारकिर्द ऐन बहरात असताना राहुल दविडनं वन-डेमधून रिटायर होण्याचा निर्णय घेतलाय.

मला अनेक गोष्टींची हुरहुर वाटते. आपल्याला लोकमान्य टिळक, सावरकर तसेच तरुण वयातले अटलजी .यांची भाषणं प्रत्यक्ष ऐकता आली नाहीत. बालगंधर्वांची नाटकं पाहिली नाहीत की जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वानं भारवलेला विद्यार्थी चळवळीचा काळ अनुभवता आला नाही. अगदी क्रिकेटमधलं बोलायचं तर डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, सुनील गावसकर यांची बॅटिंग पाहण्याचं भाग्य ही मला नाही. असं असलं तरी मी पुढच्या पिढीला हे नक्की सांगू शकेल की मी माझ्या आयुष्यातली 15 वर्षे राहुल द्रविडची बॅटींग पाहिलीय.त्याची ही बॅटिंग मला सतत उभारी देत राहील. काळ कोणताही असो.... परिस्थिती कशीही असो  न डगमगता.... न खचता आपलं काम करत राहयचं....माझ्या कुटूंबासाठी, माझ्या मित्रपरिवारासाठी त्याही पुढे जाऊन माझ्या देशासाठी 'मिस्टर डिपेंडेबल' बनण्याचा सतत प्रयत्न करायचा.

राहुल द्रविडनं आता वन-डेमधून रिटायर होण्याचा निर्णय घेतलाय. मात्र टेस्ट साठी अजूनही त्याची गरज क्रिकेटला आहे. फास्ट फूड क्रिकेटच्या या काळात शैलीदार बॅटिंगची परंपरा जपणा-या बोटावर मोजता येतील इतक्या क्रिकेटपटूंमध्ये तो सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळेच .   Rahul Dravid will continue playing test.cricket. So basically Test Cricket has not announced its retirement yet. अशा प्रकारचे SMS मला येत आहेत. अशा प्रकारचे SMS ही भारतीय क्रिकेटचा सच्चा सेवक म्हणून ओळखल्या जाणा-या द्रविडला क्रिकेट फॅन्सनी दिलेली सलामी आहे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...