Wednesday, July 22, 2009

चर्चा पे चर्चा...


कोणतही सरकार असो काही गोष्टी भारतामध्ये हमखास घडतात.लहरी मान्सून,अस्थिर शेअरबाजार,संवग लोकप्रियेतेच्या घोषणा.दरवर्षी देशाच्या काही भागात होणारे बॉम्बस्फोट आणि त्या स्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन सापडणे. देशातल्या महानगरांमध्ये बॉम्बस्फोट होतो...निष्पाप मारले जातात.ह्या स्फोटाचे मास्टरमाईंड पाकिस्तानमध्ये असल्याचं जाहीर होते. 'ठोस कारवाई होईपर्यंत पाकिस्तानशी चर्चा बंद.'

अशा हमखास हेडलाईन्स बनतात.कालांतराने विषय मागे पडतो...आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो आणि भारत सरकार पाकिस्तान बरोबर चर्चेचे गु-हाळ पुन्हा सुरु करते.

भारत-पाकिस्तानचे पंतप्रधान नुकतेच अलिप्त राष्ट्र परिषदे निमीत्त इजिप्तमध्ये भेटले.या बैठकीनंतर जे घोषणापत्र काढण्यात आले..त्याबद्दल सध्या अनेक वाद-प्रतिवाद निघतायत.दोन्ही बांजूंनी अनेक अर्थ काढले जातायत.मात्र दोन्ही देशांच्या चर्चेच्या दरम्यान दहशतवाद हा मुद्दा वगळणे ही बाब सामान्य भारतीयांना मोठ्या प्रमाणात अस्वस्थ करणारी आहे.याचे दोन अर्थ होतात पहिला म्हणजे जिहादी संघटना यांचा येथेच्छ धुडगुस सुरु असतानाही भारत-पाकिस्तान चर्चा होऊ शकते. दुसरा असा की या दोन्ही शक्तींवर नियंत्रण ठेवण्यास पाकिस्तान सरकार समर्थ आहे. या जगाचा (विशेषत: अमेरिकेच्या) विश्वासाला आता भारतानेही मान्यता दिली आहे.

पाकिस्तानमध्ये असणा-या दहशतवाद्यांविरुद्ध त्या सरकारने ठोस कारवाई सुरू केली आहे, असा पाश्चिमात्य जगताचा समज आहे. पाकिस्तानने स्वात, वझिरीस्तान, खैबर, बजौर आदी भागांतल्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू केली ही वस्तुस्थिती आहे. तथापि ती त्या भागापुरती मर्यादित आहे.बैतुल्ला मसुद सारख्या स्वत:हला डोईजड होत असलेल्या दहशतवाद्याच्या विरुद्ध पाकिस्तान लष्कर सध्या लढतंय.अमेरिकेनं पुकारलेल्या दहशतवादा विरुद्धच्या लढाईतही पाकिस्तानची भूमिका संशयास्पद आहे.

दाऊद इब्राहम पासून ते अजमल कसाब पर्यंत भारताविरुद्ध लढणा-या व्यक्तीची नाळ पाकिस्तानशी घट्ट जोडलीय.ही नाळ ठेचण्याच्या आधीच भाबड्या आदर्शवादाने भारलेले भारत सरकार पाकिस्तानशी पुन्हा एकदा चर्चेचा डाव टाकण्यास तयार झालंय.

या संयुक्त पत्रकात बलुचिस्तानचा उल्लेख करण्यात आलाय.ह्याचा समावेश करुन पाकिस्तानने पुन्हा एकदा बाजी मारलीय.बलुचिस्थानमध्ये अशांतता निर्माण व्हावी याकरता काही बाह्य शक्ती कार्य करत आहेत.असा उल्लेख या पत्रकात आहे.गेल्या सहा दशकांपासून बलुचिस्तान ही पाकिस्तानची मोठी डोकेदुखी आहे.पंजाबी लॉबीचे वर्चस्व माणण्यास बलुची लोकांनी कायमच नकार दिला.स्वतंत्र बलुचिस्तान हे तेथील राज्यकर्त्यांचे स्वप्न..महमंद अली जीनांनी लष्करी सामर्थ्याचा वापर करत बलुचीस्थान विलीन करुन घेतला.मात्र बलुची लोकांची स्वतंत्र राष्ट्राची भावना ते विजवू शकले नाहीत.

बलुचिस्तानच्या शेजारी असलेल्या अफगाणिस्तानने बलुची स्वातंत्र्य युद्धाला नेहमीच मदत केलीय.1980 च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हीएट रशियाचे वर्चस्व होते.तरीही ही मजत थांबली नाही.अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाईंच्या जवळच्या व्यक्तीही बलुची लढ्याला मदत करतात असा सर्वांचा समज आहे.पाकिस्तान आणि करझाईंचे संबंध त्यामुळेच तणावाचे राहीले आहेत.

भारताचे अफगाणिस्तानात चांगलेच बस्तान बसले आहे. तेथील पोलिस, सैन्य आणि अन्य नागरी सेवांत भारताने सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे या सेवेतील लोक व सामान्य अफगाणी लोक यांच्या मनात भारताबद्दल ममत्व निर्माण झाले आहे. याचीच पाकिस्तानला भीती वाटत आहे.पाकिस्तानची ही भीती या पत्रकात उमटलीय.जागतिक समुदायाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यास पाकिस्तानी राज्यकर्ते यशस्वी झालेत.

26-11 नंतर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी एक नामी संधी भारताला आली होती.गेल्या नऊ महिन्यात दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध पाकिस्तानने काहीही कारवाई केलेली नाही.भारताच्या समाधानाची एकही गोष्ट झाली नसताना भारत सरकार चर्चाला तयार झालंय..तेही दहशतवादाच्या मुद्याला बगल देण्याची तयारी दाखवत...आता यापुढे परराष्ट्र पातळीवर दोन देशांना जवळ आणण्यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचा नेहमीचा मार्ग स्वीकारला जाईल.केवळ पैशाच्या मागे धावणारं बीसीसीआय खेळाडुंच्या सुरक्षेच्या जराही विचार न करता दहशतवाद्यांच्या स्वर्गात खेळांडूंना पाठवेल.शांततेची तीच कबूतरं पुन्हा सोडले जातील.

सालाबादाप्रमाणे पुन्हा बॉम्बस्फोट होतील..त्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल...काही दिवस पुन्हा चर्चा बंद टाईप हेडलाईन्स पुन्हा एकदा अमेरिकेचा दबाब...सरकार कोणतेही असो भारत सरकारचा एक नेहमीचा खेळ पुन्हा सुरु होईल तो म्हणजे चर्चा पे चर्चा

Friday, July 10, 2009

फेडरर फॉरेव्हर


स्वित्झर्लंडलडच्या काही गोष्टीचे सा-या जगात मोठे कुतहूल आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य,जिनीव्हामध्ये चालणारी वेगवेगळ्या देशांची खलबते,स्वीस बॅंकेमध्ये असलेला अनेकांचा काळा पैसा आणि सध्याचा टेनिस सम्राट रॉजर फेडरर.


5 जुलैला झालेल्या 5 सेटच्या कडव्या झुंजीनंतर फेडररनं विम्बलडन स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं.हे त्यांच 15 वे ग्रँड स्लॅम.या विजेतेपदानंतर त्यानं 14 ग्रँड स्लॅमचा पीट सँप्रासचा विक्रम मोडला.14 गँड स्लॅमचा प्रवास करण्यास सँप्रासला 12 वर्षे लागली.हे शिखर फेडररनं अवघ्या 7 वर्षात पार केलं.या बारा वर्षात सँप्रासला फ्रेंच ओपन कधीही जिंकता आले नाही..तर फेडररने या वर्षी फ्रेंच ओपनचं विजेतेपद खेचत आपल्या सर्व टिकाकारांची तोंडे बंद केली.सहा विम्बल्डन, पाच अमेरिकन ओपन, तीन ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक फ्रेंच ओपन फेडररने जिंकून दाखवलीय.या चारही स्पर्धा जिंकणारा टेनिस इतिहासातला तो सहावा टेनिसपटू ठरलाय. पण ही आकडेवारी वरवरची आहे. कारण या अजिंक्यपदांच्या जोडीला आहेत सात विम्बल्डन फायनल्स, चार फ्रेंच ओपन फायनल्स, पाच अमेरिकन ओपन फायनल्स आणि चार ऑस्ट्रेलियन ओपन फायनल्स! म्हणजे 20 वेळा ग्रँड स्लॅम फायनल्स गाठल्यावर फेडररने त्यापैकी १5 सामन्यांमध्ये बाजी मारलीय. गेल्या २1 सलग ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये तो किमान उपांत्य फेरीपर्यंत तरी गेलेलाच आहे. तर गेल्या १7 ग्रँड स्लॅम स्पर्धापैकी १6 वेळा तो फायलमध्ये पोहोचलाय!टेनिस जगतामध्ये एवढं सातत्य दाखवणारा फेडरर एकमेव खेळाडू असेल.


सातत्याचे दुसरे नाव असलेल्या फेडररचा फॉर्म हरपलाय..अशी गेल्या काही महिन्यात सातत्याने सुरु होती.विशेषत: गेल्या वर्षी सलग दोन ग्रँण्ड स्लॅम स्पर्धेत तो नादालकडून हरला.चार वर्षाहून अधिक काळ त्याच्याकडे असलेलं अग्रमानांकान नादालने हिसकावून घेतलं.त्यामुळे फेडरर संपला अशीच हाकाटी काही जण पिटत होते. याबबतीत मला त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी करावीशी वाटते..सचिन आणि फेडरर या दोघांनाही दुस-या क्रमांकावर पाहयला क्रिडा रसिक तयार नसतात.सचिनने शतक मारावं आणि फेडररने ग्रँड स्लॅम जिंकावे अशीच सर्वांची एकमेव अपेक्षा असते.


टोटल टेनिसचे उदाहरण म्हणजे फेडररचा खेळ.बोरिस बेकर-सँप्रास-इव्हानोविचसारखी तडाखेबंद सव्‍‌र्हिस किंवा आगासीसारखा खणखणीत रिटर्न अशी हत्यारे फेडररकडे नाहीत.त्याच भर असतो टोटल टेनिसवर.

या टोटल टेनिसमुळेच क्ले असो की ग्रास अथवा हार्ड सर्व कोर्टवर तो विजेता ठरलाय.तिन्ही प्रकारच्या कोर्टवर ग्रँड स्लँम जिंकणारा आगासीनंतरचा दुसरा खेळाडू ठरलाय.


खेळाबरोबरच फेडररचं कोर्ट आणि त्याबाहेरचं वागणं त्याला कोणीही रोल मॉडेल ठेवावं असंच आहे. जिंकणं आणि हरणं या दोन्ही गोष्टी त्याने तितक्याच शांतपणे स्वीकारल्या आहेत. आपला खेळ चांगला होत नसेल तर त्याने त्या गोष्टीचा राग रॅकेटवर कधीच काढलेला नाही किंवा रेफ्रीशी त्यानं भांडणही केलं नाही.

यश मिळवणं सोप असंत परंतु ते टिकवणं मात्र प्रचंड अवघड..सध्याच्या व्यवसायिक टेनिसच्या या युगात अव्वल क्रमांक गमावल्यानंतर फेडररनं तो पुन्हा आपल्याकडे खेचून आणलाय.अव्वल स्थानावर पोचण्यासाठी आणि त्यावर टिकून राहण्याचा मंत्र त्याच्याकडे नक्कीच आहे. अखंड मेहनत,प्रचंड चिकाटी आणि पोलदापेक्षाही कणखरपणा या गुणांच्या जोरावर टेनिस इतिहासात त्यानं स्वत:च नाव कायमचं कोरलंय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...