Tuesday, October 27, 2009

अर्थ निकालाचा


महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अगदी अपेक्षित असेच लागले आहेत.हे निकाल लागल्यावर मला यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतची आठवण येतीय.. या स्पर्धेत कोलकता नाईट रायडर्सचा संघ हरणार यामध्ये अगदी सगळ्यांचे एकमत होते.या निवडणुकीत नाईट रायडर्सची जागा भाजप-शिवसेना युतीने घेतली होती. अगदी नाईट रायडर्स प्रमाणे युतीनेही अगदी विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणला. नाईट रायडर्सप्रमाणे युतीच्या टीममध्येही अनेक स्टारर्स होते.मात्र या स्टारर्समध्ये एकवाक्यता नव्हती. जॉन बुकाननची मल्टीपल कॅप्टनची थियरी त्यांनी अगदी निवडणूक प्रचारातच अमलात आणली होती.ऐन निवडणुक प्रचार रंगात असतानाचे युतीचे नेते आणि आयपीएलच्या दरम्यानचे नाईट रायडर्सचे खेळाडू यांचे चेहरे एकमेकांच्या बाजूला लावले तर हे दोन्ही चेहरे आणि चेह-यावरचे भाव अगदी सारखेच दिसतील.राजकारण आणि क्रिकेट या गोष्टी भारतीय समाजात किती बेमालुमपणे मिसळलेल्या आहेत याचे उदाहरण म्हणून हे पुरेसे असावे.

आघाडी सरकारचा नाकार्तेपणा त्यांना सत्तेपासून दूर खेचण्याकरता पुरेसा होता.परंतु या नाकर्त्या राजवटीला हटवण्यासाठी समर्थ पर्यायच युतीने उभा केला नाही. शिवसेनेचा सारा प्रचार राज ठाकरेंभोवतीच फिरत राहीला. तर भाजपची अवस्था जुने वैभव आठवत बसणा-या व्यक्तींसारखी झालीय.लोकसभेत झालेल्या पराभवातून हा पक्ष अजुनही बाहेर पडलाय असे वाटत नाही.या निवडणुकीत एक पक्ष म्हणून भाजप उतरलाय असे कधीच वाटले नाही. राज्य भाजपचे युनीट एकत्र बांधण्याची जी शक्ती प्रमोद महाजनांच्याकडे होती ती ताकत त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मिरवणा-या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे नाही.हे या निवडणुकीत सिद्ध झालंय.

पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणा-या भाजपने यंदाच्या निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाहीचा पॅटर्न राबवला.गोपीनाथ मुंडेंनी आपली मुलगी पंकजा, भाजी पूनम महाजन आणि जावाई मधुसूदन केंद्रे यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले.यापैकी पंकजा वगळता अन्य वारस या निवडणुकीत पराभूत झाले.मात्र या पंकजा मुंडेंना निवडून आणण्याकरता मुंडेंची बरीच शक्ती घालवावी लागली. मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप -सेनेला 6 पैकी केवळ परळीची एकमेव जागा मिळवता आली.संपूर्ण मराठवाड्यात परळी आणि उदगीर ह्या दोनच जागा भाजपला जिंकता आल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणा-या मुंडेंनी या पराभवाने कठोर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

भाजपची ही अवस्था तर दुसरिकडे शिवसेनेमध्येही यंदा आश्चर्यकारक असा गोंधळ होता.राडे, धाक, मारामारी आणि परप्रांतीयांचा द्वेष ह्या सारख्या घटकांच्या मदतीने शिवसेना मुंबईत आणि राज्यभर वाढली.उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यापासून शिवसेनेचा हा राडेबाज चेहरा कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि राज ठाकरे या सारख्या नेत्यांना उद्धव यांची ही नवी संस्कृती मानवण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे ते शिवसेनेपासून दूर झाले. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा एकखांबी तंबू होता. राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व गडद करण्याकरता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याकरता त्यांनी गेले पाच वर्षे भरपूर प्रयत्न केले. मात्र ऐन निवडणुक काळात राज यांच्या भुलभुलैयाला बळी पडून उद्धव स्वत:चा मार्ग भरकटले. हा मार्ग भरकटल्याची शिक्षा मतदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिली आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालेला उदय हे या निवडणुकीतील महत्वाचे वैशिष्ट मानावे लागेल. अवघ्या साडेतीन वर्षात स्वत:चे 13 आमदार निवडून आणण्याची कामगिरी राज ठाकरेंनी केलीय.राज ठाकरेंच्या राजकीय कौशल्याला नक्कीच सलाम करावा लागेल. परंतु मनसेने हा विजय कसा मिळवला आहे. या यशाकरता कोणता शॉर्टकट त्यांनी वापरला ह्याचाही विचार त्याच्या जोडीने करायला हवा.

राज यांच्या काठीने शिवसेना नावाचा साप मारला गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मंडळीना तसेच अनेक स्वयंभू सेक्यूलर विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. किंबहुना, युतीला रुळावरून उतरवण्यासाठी मनसेच्या इंजिनाला कोळसा आणि तेलपाणी कोणी पुरवले याचा विचारही व्हायला हवा. 'मराठी खतरे में' असा नारा देत मराठी माणसाचा एकमेव तारणहार असल्याचा दावा करत बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी राजकारण केले.आता बाळासाहेबांचा हा वारसा राज ठाकरे पुढे चालवत आहे. मराठी माणसांच्या नावाने दुकानदारी करणा-या या पक्षांना किती महत्व द्यायचे याचा विचार मराठी माणसांनीच करायला हवा.

राज्यातील जनतेच्या मनात आघाडी सरकारविषयी जो रोष होता, तोच मनसेच्या मतांमुळे विभागला गेला आहे. मनसेमुळे युतीच्या 40 जागा गेल्या. मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत हा जो प्रचार निवडणुकीपूर्वी युतीने केला आहे. ते या निकालाने सिद्ध झाले आहे. आघाडीला सत्तेवर आणण्याकरता राज ठाकरेंच्या या 'अशोकसेनेचा ' मोठा वाटा आहे..

शिवसेनेचा लढाऊ बाणा संपला, , मवाळ झाली, सर्वसमावेशक झाली, म्हणून तिचे पारंपरिक मतदार मनसेकडे वळले, असे मानले जाते. तसे असेल, तर ते मराठी माणसांसाठी किती घातक आहे. याचा विचार सर्व सुजाण मराठी माणसांनी करायला हवा. कोणत्याही मुद्द्यावर नाक्यानाक्यावर राडा करणारे, नोकरीच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांना पिटाळून लावणारे, टॅक्सी फोडणारे मराठी नेते जर मसीहा म्हणून ओळखले जात असतील तर ही अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे.

मराठी माणसांची ओळख भलेही कुणाला आक्रमक अस्मितेचा साक्षात्कार घडवणारी वाटो, ही ओळख ही न्यूनगंडामधून निर्माण झालेली आहे. मराठी समाज हा भावनिक भुललैय्यात अडकलेला आहे. या भुलभैलैय्यातून बाहेर काढणारे नेते सध्या महाराष्ट्राला हवे आहेत. ह्या समर्थ पर्यायाचा शोध मराठी मतदारांना लागेपर्यंत नाकर्त्या सरकारची राजवट राज्यातून जाणे अवघड आहे.

Sunday, October 4, 2009

चीन @ 60


चीन. भारताचा शेजारी देश.चीन जगातली सध्याची एक महासत्ता.. क्रीडा,लष्कर,व्यापार आणि आणखी ब-याच काही क्षेत्रात जगात अव्वल स्थान मिळवायचेच.या महत्वकांक्षेने झपाटलेला देश .भारताशी सीमाप्रश्नावर उभा दावा मांडणारा देश. पंचशील कराराचे उल्लंघन करत 1962 मध्ये आपले लचके तोडणारा देश. जगातल्या सर्व भारतविरोधी शक्तींना उदारहस्ते मदत करणारा शेजारी..आणि बरेच काही

1 ऑक्टोबर 2009 या दिवशी चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीला 60 वर्षे झालीत. माओंच्या नेतृत्वाखाली चिनी शेतक-यांनी साम्यवादी क्रांती केली. मागच्या साठ वर्षात यांगेत्से नदीच्या पात्रातून 'लाल' पाणी वाहून गेलंय. वर्गसंघर्षाविरुद्ध लढे उभारणा-या चीनमध्ये गेल्या साठ वर्षात राज्यकर्त्यांनी वेगवेगळी प्रयोग केलेत.केंद्रीय सत्ता आणि साम्यवादी राजवट मजबूत करणे हाच या सर्व प्रयोगांमधील मुख्य उद्देश होता. विसाव्या शतकात चीनमध्ये झाली इतकी सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवरची घुसळण क्वचितच कोणत्या देशात झाली असेल.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत म्हणून राहण्यापेक्षा समाजवादी अर्थरचनेत गरीब राहणे कधीही चांगले’, अशी माओच्या सांस्कृतिक क्रांतीची हाक होती. माओंच्या या हाकेपासून थेट मांजर काळे असो वा गोरे, जे उंदीराची शिकार करते ते मांजर चांगले.’ असा डेंग झिओपिंग पर्यंतचा बाजरपेठीय दृष्टीकोन असा थक्क करणारा प्रवास चीनने गेल्या साठ वर्षात केला आहे.

माओने 1949 मध्ये चीनची सत्ता साम्यवादी क्रांतीने ताब्यात घेतली.परंतु माओचे साम्यवादी मॉडेल हे रशियन मॉडेलपेक्षा वेगळे होते.चीनी शेतकरी हा या मॉडेलचा मूळ गाभा होता.तर रशियन राज्यक्रांतीमध्ये मजुरांना सर्वात जास्त महत्व होते. माओंची प्रयोगशाळा होती अख्या चीन देश. सामुदायीक शेती, उद्योगांची नवी रचना यासारखे अचाट आणि अजस्त्र प्रयोग त्याने याकाळात केले.या प्रयोगाच्या जोरावर साम्यवादी पक्षात एक प्रबळ जमात तयार झाली होती.सत्तेचे टॉनिक घेऊन सशक्त बनलेला हा वर्ग आपल्याला भारी पडेल अशी भिती माओंना सतत सतावत होती.

साम्यवादी राजवटीच्या आशिर्वादाने बलवान होत चाललेल्या या भांडलवादी जमातीला त्यांनी मुळापासून उखाडायचे ठरवले.सांस्कृतिक क्रांतीची हाक त्यांनी कोट्यावधी जनतेला दिली.आपल्याच पक्षातल्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना केंद्रीय नेत्यांवर हल्ला करण्यास चिथावले.त्याकाळातील चिनी समाजात घडत असलेल्या हिंसाचाराची वर्णने करणारी पुस्तके वाचली तर कुणीही बधीर होऊन जाईल. चंगेझ खानपासून ते हिटलर पर्यंत जगातल्या सर्व हुकूमशाहांना लाजवेल असे अभूतपूर्व शिरकाण याकाळात चीनमध्ये झाले. तेही सरकारी आशिर्वादाने.

माओंच्या नंतर चीनमध्ये डेंग झिओपिंग यांची राजवट आली.या राजवटीत माओंच्या उद्दीष्टांपासून पूर्णपणे फारकत घेण्यात आली.बदलत्या परिस्थितीशी दूळवून घेतले नाही तर ह्या महाकाय देशाचे तुक़डे होतील हे बहुधा डेंग यांनी ओळखले असावे.त्यामुळेच 1979 नंतर त्यांनी उदारीकरणाचे नवे युग चीनमध्ये आणले. गोर्बोचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनमध्ये ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’- स्वातंत्र्य आणि आर्थिक पुनर्रचनेचे नारे दिले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.कोंडून पडलेला रशियन समाज या वा-याने इतका मुळासकट हलला की या देशाची अनेक शकले झाली.डेंग यांनी गोर्बोचेव्हच्या आधीच हे बदल सुरु केले होते.मात्र टप्प्याटप्याने.केंद्रीय नेतृत्वाची पकड सैल होऊ न देता.

वर्गसंघर्षाविरुद्ध एकेकाळी नारे देणा-या चीनमध्ये आता ' आहे रे ' गटाचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.स्पेशल इकॉनॉमिक झोन, आक्रमक बाजार, गगनचुंबी इमारती, पंचतारांकित झगमगाट , अजस्त्र असे खाजगी प्रकल्प याच्या जोरावर एक नवा साम्यवादी राजवटीतला अस्सल भांडवलशाही चीन आज तयार झालाय.एवढ्या टोकाचा अंतर्गत विरोध घेऊन आत्मविश्वासाने वाटचाल करणारा चीन हा अधुनिक युगातील एक चमत्कार मानला पाहिजे.

चीनला झोपेतच राहू द्या. तो उठला, तर सारे जग हादरवून सोडेल’ ह्या नेपोलियनच्या प्रसिद्ध वाक्याची या देशाने गेल्या काही वर्षात जगाला वारंवार आठवण करुन दिली आहे.सोव्हियट युनीयनच्या पतनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे हे काम या देशाने केले आहे. अगदी क्रिडा क्षेत्रावरही चीनने आपली हुकमत आता सिद्ध केलीय.आज रिपब्लिक ऑफ चायना म्हणून जो देश ओळखला जातो, त्या देशाने सुरुवातीचा बराच काळ ऑलिंपिककडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही.

१९४९नंतर प्रथम म्हणजे १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये चिनी अ‍ॅथलीट्स प्रथम उतरले. त्या स्पर्धेत चीनने थेट चौथा क्रमांक पटकावला. त्यानंतर जवळपास प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत चीनने आपला ठसा उमटवला आहे. 2008मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये चीनने 51 सुवर्णपदके घेऊन पहिला क्रमांक पटकावला. .तर या वर्षी सारा भारत वर्ष अभिनव बिंद्राला मिळालेल्या पहिल्या वाहिल्या वैयक्तिक सुवर्णपदकांच्या आनंदामध्ये मग्न झाला होता.

चीनची लष्करी ताकदही महाकाय आहे.जगातील सर्वात मोठे पायदळ चीनकडे आहे.चीनकडे 23 लाख खडे सैन्य आहे. भारताची सर्व महत्वाची शहरे चीनी क्षेपणअस्त्रांच्या टप्प्यात येतात.चीनचे वायूदळही तितकेच प्रभावशाली आहे. भारतानेही नुकतीच चीनच्या तुलनेत आपले हवाईदलाचे सामर्थ्य एक तृतियांशही नसल्याची नुकतीच कबुली दिली आहे. 1964 सालीच अण्वस्त्रधारी बनलेल्या या राष्ट्राकडे आज सुमारे 400 अणवस्त्र असल्याची शक्यता आहे.इराण, उत्तर कोरियाप्रमाणेच पाकिस्तान या आपल्या कट्टर शत्रूला अणवस्त्रधारी बनवण्यात चीनची सक्रीय मदत लाभलेली आहे.

भारताचा शेजारी देश असल्याने चीनमध्ये घडणा-या प्रत्येक घटनांचे थेट आपल्यावर परिणाम होऊ शकतो.चीनबाबतीत गाफील राहीलो तर काय होऊ शकते याचा अनुभव आपण 1962 मध्ये घेतला आहे.पाकिस्तान,म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ मालदिव आणि श्रीलंका अशा भारताच्या बाजूच्या सर्व देशात चीनने आपले जाळे विणले आहे. तिबेटच्या दुर्गम भागात अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या लोहमार्गाचा उद्देश जलद गतीने लष्करी हलचाली करता याव्यात हाच आहे. भारताच्या सीमाभागात चीनने वाढवलेल्या हलचालींनी वेळीच सावध होण्याची गरज आपल्याला आहे.

गेल्या साठ वर्षात चीनने जगात आपला दरारा निर्माण केलाय.परंतु अनेक समस्यांनी चीनला ग्रासलंय.. तिबेट आणि सिंकिंयाग हे चीनचे दोन अवघड दुखणे,हे दुखनं कधी उसळी मारेल याचा नेम नाही. दारिद्रय आणि भूकबळीने गेल्या साठ वर्षात लाखो लोकांना जीव गमावावा लागला आहे. आर्थिक सुधारणांचे वारे अंगात गेलेल्या तरुण वर्गाला 1989 मध्ये चिनी राज्यकरत्यांनी रणगड्यांखाली चिरडले. या उठावाला आता वीस वर्षे झालीत.परंतु भविष्यातही असा उठाव होऊ शकतो ही भिती चीनी राज्यकर्त्यांना सतत पोखरत असते.त्यामुळे कोणतेही लहाण मोठे उठाव पाशवीपणे चीनमध्ये दडपले जातात.बेकारी आणि विषमता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलीय. एकेदिवशी या सा-याचा विस्फोट होऊन चीनी महासत्तेचा मुखवटा गळून पडेल असा अंदाज अनेकांनी वर्तवलाय.

ऐक शेजारी देश म्हणून चीनमध्ये होणा-या प्रत्येक गोष्टीकडे सावध नजर भारताला ठेवायला हवी.इतिहास, अर्थकारण, व्यापार, राजकारण व हजारो मैलांची सीमा या गोष्टींनी दोन देशांचे ऋणानुबंध अतूट आहेत. चिनी अर्थव्यवस्था कोसळली किंवा कम्युनिस्ट राजवट कोसळून तेथे राजकीय गोंधळ उडाला, तर त्याचे परिणाम युरोप-अमेरिकेपेक्षा भारताला अधिक भोगावे लागतील. चीनच्या हिरक महोत्सावाने दबून अथवा हुरळून न जाता डोळसपणे त्याचा सामना करण्याचे धोरणच भावी काळात भारताला उपयोगी पडणार आहे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...