Friday, August 10, 2012

वंचित समाजाचे बटबटीत वास्तव

 हिंदी चित्रपट निर्माते- दिग्दर्शक दोन प्रकारचे असतात एक प्रेक्षकांना गृहित धरणारे  आणि दुसरे  प्रेक्षकांच्या बुद्धीमत्तेवर  विश्वास ठेवून त्यांच्यापुढे सिनेमा सादर करणारे.  अनुराग कश्वायपचा गॅँग्ज ऑफ वासेपूर हा दुस-या प्रकारातला चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव फक्त इंग्रजी आहे, पण ही कथा अगदी याच मातीमधली आहे. या चित्रपटाची भाषा, लहेजा, शिव्या,हिंसा, प्रेम परस्परातील वैर, राजकारण आणि बदला प्रत्येक गोष्ट ही या मातीतील आहे. चोप्रा-जोहर यांच्या एनआरआय चित्रपटावर वाढलेल्या आणि  मल्टीप्लेक्स सिनेमाला सरावलेल्या प्रेक्षकांना हा प्रकार कदाचित आवडणार नाही. त्यांना हा चित्रपट अतिशय बटबटीत, अश्लील, नृशंस आणि अविश्वसनीय वाटेल.. पण महानगरात राहणा-या या मूठभर वर्गाच्या पलीकडेही एक मोठा समाज या देशात आहे. ज्या समाजातील पुढच्या पिढीच्या खांद्यावर मागच्या पिढीचे ओझे आपोओप येते. मागच्या पिढीचा वारसा ( त्यांचे प्रेम, भांडण, कोर्ट कचेरी ) ही पिढी इमानइतबारे पुढे चालवित असते. तीन तास डोके बाजूला ठेवून पाहण्याचा प्रकार म्हणजे सिनेमा असा ह्या वर्गाचा समज नसतो. तर या वर्गातील प्रत्येकाच्या डोक्यात स्वत:चा असा एक सिनेमा सुरु असतो. शहरी मानसिकेतपासून काहीसा विलग असलेल्या या समाजाचे बटबटीत वास्तव मांडणारी कथा अनुराग कश्यपने या दोन भागात जिवंत केली आहे.

      या चित्रपटाचा पहिला भाग जून महिन्यात तर दुसरा भाग हा आठ ऑगस्टला प्रदर्शित झाला. वासेपूर हा ख-या अर्थाने दोन भागातील चित्रपट आहे. असे पार्ट-2 किंवा पार्ट-3 प्रकारतील चित्रपट सध्या खो-याने आढळतात. पण ह्यामध्ये पहिल्या भागाचा दुस-याशी आणि दुस-याचा तिस-याशी फारसा संबंध नसतो.हे चित्रपट आपल्या पहिल्या भागाच्या यशाचा  ब्रँड पुढील भागात वापरतात.यापूर्वी रामगोमाल वर्माच्या रक्तचरित्रची कथाही दोन भागात दाखविली होती. वासेपूर हा ही त्याच पठडीतला चित्रपट आहे. पहिल्या भागाची कथा ज्या ठिकाणी संपते त्याच ठिकाणी दुसरा चित्रपट सुरु होतो. पहिल्या पिढीतील सूडभावना दुस-या पिढीत  गडद होते आणि तिस-या पिढीत कळसाला पोहचते. 1940 ते 2009 अशी सात दशके चित्रपटात जिवंत करण्याचे काम अनुरागने या साडेपाच तासांच्या दोन भागात केले आहे.

        2004 मधील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ह्या  लोकप्रिय मालिकेपासून ही कथा सुरु होते. एक मोठे कुटूंब एका लहानशा खोलीत ही मालिका पाहत असताना अचानक गोळीबार सुरु होतो.... अगदी पहिल्या फ्रेममध्ये चित्रपटगृहातील प्रेक्षक स्थिरावण्याच्या आत ह्या 'गोळ्यांची दिवाळी' अनुराग पडद्यावर साकार करतो. ही दिवाळी संपल्यानंतर व्हाईस ओव्हरच्या माध्यमातून समजते की वासेपूर आहे. जे पूर्वी बंगाल नंतर बिहार आणि आता झारखंडचा भाग आहे. ह्या गावात राहणा-या सरदार खानचा ( मनोज वाजपेयी ) एकच उद्देश आहे तो म्हणजे ब...द...ला !!! स्थानिक आमदार रामधीर सिंग ( तिग्मांशू धुलीया ) ला मारुन आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेणे हे एकच त्याचे ध्येय आहे.हा सूड त्याला आंधारात, बेसाववधपणे पूर्ण करायचा नाहीयं.. तर अगदी दिवसाढवळ्या, रामधीरला सूचना देऊन त्याच्या डोळ्याला डोळे भिडवत त्याला आपला सूड पूर्ण करायचा आहे. ( कहं के लूंगा )बदल्याची ही आग कायम ठेवत वासेपूरमध्ये होणारी स्थित्यंतर अनुराग आपल्याला दाखवत असतो. कोळशाची चोरी, रेतीचा व्यापार, खाण माफियांचे वास्तव त्याला मिळाणारी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची साथ ह्या सर्वांची उकल विविध दृश्यांमध्ये केली आहे. प्रेक्षकांना संदर्भ समजवण्यासाठी व्हाईस ओव्हरचा वापरही अनेक ठिकाणी करण्यात आला आहे.

चित्रपटाचा पहिला भाग हा मनोज वाजपेयी चा आहे. सत्यानंतर पहिल्यांदाच इतकी सशक्त भूमिका त्याच्या वाटेला आली आहे. भिकू म्हात्रे पाहून मोठा झालेल्या माझ्या सारख्या चाहत्यांच्या मनातील भिकूचा प्रभाव पुसण्याचे काम मनोजच्या या सरदार खानने केला आहे. सरदार खानमध्ये एकही गूण नाही..तरीही तो आपला वाटतो.  क्रूरता असो वा रोमान्स प्रत्येक प्रसंगातील त्याची सहजता मूग्ध करणारी आहे. त्याची पहिली बायको नगमा ( रिचा चढ्ढा ) आणि दुसरी दूर्गा ( रिमा सेन ) बरोबरच्या प्रसंगातून त्याचे कौटुंबिक आयुष्य समोर येते. रिमा सेनला फारसा स्कोप नसला तरी रिचाने दोन्ही भागात कमाल केली आहे. नव-याच्या बाहेररख्यालीला वैतागलेली, पोलिसांवर कोयता घेऊन धावणारी आणि दुस-या भागात आपल्या मुलाला बदला घेण्यास प्रवृत्त करणारी नगमा ही या पुरुष कलाकारांच्या गर्दीतही भाव खावून जाते.पहिल्या भागाच्या शेवटी मनोज वाजपेयी मरतो. आणि आता सरदारविना वासेपूर-2 कसा बघायचा ? हा प्रश्न पडलेला असतानाच त्याचा दुसरा मुलगा फैजल खान ( नवाजुद्दीन सिद्दीकी ) त्याची जागा घेतो. सचिनच्या जबरदस्त सुरुवातीनंतर  अर्धवट राहिलेले टार्गेट कोहली किंवा रैनाने त्याच तडफेने पूर्ण केल्यानंतर सच्चा क्रिकेटप्रेमीमंध्ये जे समाधान असते तेच समाधान वासेपूर-2 मध्ये फैजलने मिळवून दिले आहे.


फैजलच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनवर विश्वास टाकल्याबद्दल अनुराग कश्यपच्या सृजनात्मक साहसाची दाद द्यायला हवी. लूक, प्रेझेन्स ह्याचा विचार केला तर पारंपारिक हिरोच्या फ्रेममध्ये कुठेही न बसणारा हा हिरो त्याने निव्वळ अभिनय क्षमतेच्या जोरावर उभा केला आहे. त्याच्यावर चित्रीत झालेल्या प्रत्येक दृश्यात त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे.कायम नशेत चूर्र... असणा-या फैजलच्या आयुष्यात बापाच्या मोठ्या भावाच्या मृत्यूने्ही फारसा फरक पडलेला नसतो, पण आपल्या आईच्या त्राग्यानंतर तो जागा होतो.आपने दादा का, बाप का, भाई का सबका बदला घेण्याची कसम हा   हिंदी चित्रपटाच्या प्रभावात नेहमी  वावरणारा फैजल घेतो. फजलूचा गळा कापण्यापासून ते रामधीर सिंगच्या हत्येपर्यंतच्या टप्यात फ्रस्टेटेड, डिस्टर्ब आणि खूनशी असा फैजल प्रत्येक फ्रेममध्ये भाव खावून जातो. मोहसिना ( हुमा कुरेशी ) बरोबरची त्याची प्रणयदृश्यही विरंगुळा देणारी आहेत. दुस-या भागात केवळ फैजलच नव्हे तर मोहसिना, टेजंट, परपेंडिकूलर, फजलू, शमशाद आणि सूलतान ह्या प्रत्येकाने आपले काम चोख केले आहे. सत्यानंतर अशा प्रकारे एकत्रित कम करणारी गँग ही वासेपूरच्या निमित्ताने पाहयला मिळाली आहे.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूवर भाष्य करणे हा काही माझा प्रांत नाही. मात्र राजीव रवीच्या कॅमेरामनची कमाल ही दोन्ही भागात जाणवते. दुस-या भागातील पाठलागाचा प्रसंग हा ख-या बाजारात चित्रीत केला आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांचा कॅमेरा चोख काम करतात. तसेच या चित्रपटातील संगीतही तितकच परिणामकारक आहे. पहिल्या भागातील इक बगल में चांद होगा, वुमनिया, आय एम हंटर, किंवा दुस-या भागातील चिचा लेदर, काला रे, आबरु की कसम, किंवा तार बिजली से पतले हमारे पिया ही गाणे कथेला पूढे नेण्यात आणि कलाकारांच्या स्वाभाव छटा दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावितात. तार बिजली से पतले हमारे पिया म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून या भागातील जनता आहे. त्यांच्या या परिस्थिीतीला गांधीजी, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण हे देखील कुठेतरी जबाबदार आहेत असे गीतकाराला या गाण्यातून सांगायचे आहे. पियूष मिश्रा आणि वरुण ग्रोवर यांच्या गीतांना स्नेहा खानवलकर ह्या हरहुन्नरी संगीतकार ( की संगीतकारणी ) ने साज चढविला आहे. यशपाल शर्माने गायलेली चित्रपटाली गाणे आणि त्याचा बँड ही त्या विशिष्ट प्रसंगाला अधिक मार्मिक बनवितात.

अर्थात ह्या चित्रपटातही काही खटकणा-या गोष्टी आहेत. रामधीर सारखा आमदार सरदार खान सारख्या एका गावगुंडाला इतका का घाबरतो ते कळत नाही. दुस-या भागातील हिंसाचार जास्तच लांबला आहे. विशेषत: शेवटच्या भागात फैजलने अगदी अमिताभ बच्चनच्या स्टाईलने केलेली मारामारी जास्तच अविश्वसनीय वाटते तसेच दुस-या भागातील पात्र पुढे कसा वागेल किॆवा त्याचा शेवट कसा होईल याचाही अंदाज यायला लागतो. मात्र चित्रपटाचा एकंदरीत परिणाम लक्षात घेता ह्या त्रूटी दुर्लक्ष कराव्यात अशा आहेत.'बदला' हे पारंपरिक ढोबळ सूत्र वापरुन बनिवण्यात आलेले हे दोन्ही भाग ह्या तीन अक्षरी सूत्राच्या जोरावरच हटके ठरतात.

शहरी मानसिकेतेपासून शकडो मैल दूर असणा-या भारताची ही वासेपूर कथा आहे. या भागातील संघर्ष त्यांच्यातील ताण-तणाव, कट-कारस्थानेही ही देखील याच देशाचा भाग आहे. आपल्याला माहिती नसलेला हा भारत कसा आहे हे पाहण्यासाठी तरी वासेपूरचे दोन्ही भाग पाह्यलाच हवेत.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...