Sunday, June 21, 2015

मध्य लटपटीत

मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंडाला अस्मितेच्या कोंदणात बसवून राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 19 जून 1966 या दिवशी मुंबईत जन्मलेल्या शिवसेनेनं आता सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याच्यावरचा अन्याय  या भोवती फिरणारी शिवसेना मराठी माणसांच्या मनात तर आहे. पण दुर्दैवानं ती त्या प्रमाणात राजकारणात दिसते का याचा विचार होणं आवश्यक आहे.

              राज्य स्थापनेला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचा जन्म झाला. ज्या मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडलं त्या मुंबईत अन्य भाषकांकडून मराठी भाषकांवर  होणारा अन्याय हा चलनी मुद्दा होता. शिवसेनेनी तो मुद्दा आपल्या माथी लावला.  त्यानंतर सतत पाच दशकं शिवसेनेनं काळास वळण देण्यापेक्षा काळाच्या आहारी जाणं पसंद केलं . बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हा सर्व शिवसैनिकांना जोडणारा समान धागा.या धाग्यानं एकत्र आलेल्या शिवसैनिकांसमोर आणि आपल्या मतदारांसमोर मद्रासी, गुजराती, कम्युनिस्ट, शीख, मुस्लिम आणि अलिकडच्या काळात उत्तर भारतीयांची भीती दाखवत  राजकारण केलं.

         सुरुवातीला शिवसेनेचा प्रभाव फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता मर्यादीत होता. कनिष्ठ मध्यवर्गातले तरुण हे शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते. तर पांढरपेशा आणि बुद्धीजीवी वर्गाला शिवसेनेच्या राडेबाज आणि बाळासाहेबांच्या मराठी रॉबिनहूड शैलीचं आकर्षण होतं. सुरुवातीच्या काळात लोकाधिकार समिती, तसेच मराठी कामगार संघटनेच्या मार्फत शिवसेनेनं मराठी तरुणांना नोक-या मिळवून दिल्या. कारकून निर्मितीच्या या कारखाण्याचा लाभ याच पांढरपेशा वर्गाला झाला. त्यामुळे हा वर्ग शिवसेनेशी जोडला गेला. पण या लोकाधिकार समितीनं मराठी तरुणांना केवळ कारकून किंवा तत्सम तृतीय श्रेणीतल्या नोक-या मिळवून दिल्या. एकैा कुंपणाच्या पलिकडं नोकरीतल्य मराठी क्षितीजांचा विस्तार करण्यास त्यांना जमलं नाही, किंवा त्यांनी तो मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नाही. असं म्हणावं लागेल.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून किर्लोस्कर, ओगले सारखे मराठी उद्योजक तयार झाले. पंडित नेहरुंनी पंतप्रधान झाल्यानंतर आयआयटी किंवा सरकारी उद्योगातले नवरत्न उभारुन एक रचानात्मक कार्य केलं.काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ उभारली. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातली घरं यामध्ये प्रथम जगाराशी आणि नंतर काँग्रेस पक्षाशी जोडली गेली. मुंबईवर दिर्घकाळ राज्य केलेल्या आणि अखिल महाराष्ट्राच्या विकासाचा ठेका आपल्याकडेच आहे अशा आविर्भावात राबणा-या शिवसेनेनं यापैकी कोणतंच संस्थात्मक किंवा विकासात्मक कार्य केलं नाही. युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय-वे किंवा मुंबई शहराच्या भविष्यातल्या वाहतूकीची गरज ओळखून शहरात उड्डाण पूल बांधली गेली. पण त्याचं श्रेय नितीन गडकरी म्हणजेच भाजपचं. उलट झोपडपट्टी धारकांना मोफत घरं देण्याच्या बाळासाहेबांच्या सवंग निवडणूक घोषणेमुळे शहराच्या लोकसख्येंची सूच प्रमाणाच्या बाहेर गेली. शहरात उत्तर भारतीयांचे लोंढे वाढले. या उत्तर भारतीयांना गोंजरण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आपला मराठीचा मुद्दा पातळ करावा लागलाम. संजय निरुपम सारख्या उत्तर भारतीय नेत्याचं महत्व पक्षात वाढलं. 'मी मुंबईकर' सारखी (पुन्हा तत्कालिन फायदा देणारी) मोहीम शिवसेनेला राबवावी लागली.

            1980 च्या दशकात शिवसेना पूर्णपणे राजकारणात उतरली. भाजपशी युती झाल्यानंतर आक्रमक हिंदुत्वाचा पक्षानं पुरस्कार सुरु केला. त्याचवेळी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि मंडल आयोगाच्या शिफारशींना पक्षाचा विरोध होता. मराठा आणि दलित दोन्ही वर्गाच्या विरोधी बाळासाहेब बोलत असत. मंडल आयोगाच्या शिफारशींना उघड विरोध करत ओबीसींना दुखावण्याचं काम केलं. बाळासाहेबांना हिंदू-हदय सम्राट अशी प्रतिमा बनवण्याचा अट्टहास असलेली शिवसेना 1992 च्या कारसेवा आंदोलनात सक्रीय नव्हती. या कारसेवेचं नेतृत्व संघ परिवार आणि भाजपनं केलं. पण बाबरी मशीद पडल्यानंतर त्याचं क्रेडीट घेण्यास बाळासाहेब अचानक पुढे सरसावले.त्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीच्या काळात पक्षानं आपण ब्रँड हिंदुत्व अधिकचं भगवं केलं. याचा फायदा त्यांना 1995 च्या निवडणुकीत झालं. देशात आणि राज्यात असलेल्या काँग्रेसविरोधी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला. बाळासाहेबांचा प्रचार, भाजपशी असलेल्या युतीमुळे होणारी बेरीज याच्या जोरावर शिवसेनेचे मनोहर जोशी सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

     यावेळी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे, शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे. तसंच द्रमुक त्यामधून नंतर फुटलेला अण्णा द्रमुक, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, असम गण परिषद, तेलगू देसम किंवा अगदी अलिकडच्या काळात स्थापन झालेला तेलंगणा राष्ट्र समिती ( टीआरएस) हे देखील देशातले मुख्य प्रादेशिक पक्ष आहेत. यापैकी टीआरएस हा पक्ष स्वबळावर एकदा तर अन्य प्रादेशिक पक्ष स्वबळावर किमान दोनदा आपआपल्या राज्यात सत्तेवर आले आहेत. उत्तर प्रेदशापुरंत मुख्यत्वे राजकारण असलेला समाजवादी पक्ष आणि बसपा, बिहारमधले राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड हे देखील मर्यादित अर्थानं प्रादेशिक पक्षच आहेत. त्यांनीही या राजकारणाच्या दृष्टीनं गंगेच्या पात्रापेक्षा अधिक खोल अशा प्रदेशात स्वबळावर सत्ता मिळवलीय. पण शिवसेनेला आपल्या 50 वर्षात महाराष्ट्रात एकदाही सत्ता मिळालेली नाही. याचं कारण  पक्षाच्या उत्सफुर्ततेच्या प्रकटीकरणाच्या राजकारणात आहे. ज्याला नेमक्या भाषेत वारंवार दिशा बदलणं असं म्हणता येईल.

        शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांच्या समोरचा शत्रू कसा बदलला याचा उल्लेख वरच्या परिच्छेदात केला आहेच. पण त्याच बरोबर त्यांच्या धोरणातही सतत बदल होतोय. भांडवलशाही विकासात मुंबईतल्या मराठी तरणांची होणारी कोंडी हा मुद्दा शिवसेनेनं सुरुवातीला उचलला. पण त्याचवेळी कारखाण्याती डाव्या संघटनांना मोडून काढण्यासाठीआपली ताकद त्यांनी मालकवर्गाला वापरु दिली. मुंबईचा गिरणी संप त्यातूनच चिघळला. मुंबईत मराठी माणसांचे सर्वात मोठे स्थालांतर शिवसेनेच्या प्रभावाखालीच झाले. शहरात टॉवर संस्कृती उभी राहिली. जागेचे भावं गगनाला भिडले. 'भूखंडाचे श्रीखंड' हा शब्दप्रयोग शिवसेनेनंच सर्वप्रथम आणला. पण मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता असतानाच  शहरातले मोक्याचे भूखंड अलगतपणे परप्रांतीय बिल्डराच्या घशात गेले. स्थानिक लोकाधिकार समितीच्या चळवळीचं राज ठाकरेंच्या शिवउद्योग सेनेत रुपांतर झालं. पण नंतर तो ही मुद्दा शिवसेनेनं सोडून दिला.

राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मिळालेली सारी पहिल्या क्रमांकाची पदं मुंबई आणि कोकणातल्याच नेत्यांना दिली. मुंबई आणि कोकणाशिवाय अन्य महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे शिवसेनेनं साफ दुर्लक्ष केलं. उर्वरीत महाराष्ट्रात शिवसेेनेचा एकही मोठा नेता आजवर तयार झालेला नाही. व्हँलेंटाईन डे ला विरोध हा शिवसैनिकांचा वार्षिक उद्योग. पण सेनेच्या नव्या  आदित्य राजेंना मुंबईत नाइट लाईफ सुरु करायची आहे. नाईट लाईफ सुरु करताना जगातल्या मोकळ्या संस्कृतीच्या शहरांचा उल्लेख शिवसेना करतं. पण त्याचवेळी डे संस्कृतींना शिवसेना विरोध करतं. म्हणजेच भावी नेतृत्वाची वैयक्तिक आवड जपण्यासाठी शिवसेनेला मुंबईत नाईट लाईफ  जपण्यासाठी शिवसेनेला मुंबईत नाईट लाईफ आणायची आहे का ? रोहिंग्टन मिस्त्रींचे पुस्तक मुंबई विद्यापाठीच्या अभ्यासक्रमातून बाद करायला लावणारे आदित्य ठाकरे खरे की मॅग्ना कार्टाला 800 वर्ष पूर्ण झाले याबद्दल स्मरण ट्विट करणारे आदित्य ठाकरे अस्सल ? अन्य पक्षातल्य विशेषत:  गांधी घरण्यातल्या घराणेशाहीला शिवसेनेनं सतत विरोध केला. पण शिवसेना ही अन्य प्रादेशिक पक्षांप्रमाणेच एकाच कुटुंबाची प्रॉपर्टी बनलीय. घरण्यातला सत्ता संघर्ष तीव्र झाल्यानंतरच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना करावी लागली. मराठी आणि हिंदू समाजाच्या हितासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दाखवणारे   बाळासाहेब आपल्याच घरातली ही फूट रोखू शकले नाहीत.

    2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं युती तोडली. भाजपला अगदी अफजलखानाची फौज हे विशेष लावून झालं. पण तरीही केंद्रातली मंत्रीपदं सोडली नाहीत. स्वाभिमानाचा जप करणा-या उद्धवसेनेनं मिळतील ती मंत्रिपद निमुटपणे स्विकारत  निवडणुकीनंतर सत्तेत सहभाग घेतला. सुरेश प्रभूंच्या निमित्तानं आपसूकपणे चालून आलेलं केंद्रीय रेल्वेमंत्रीपद पक्षानं विनाकारण नाकारलं. आणि सर्वात जुन्या पक्षावर भाजप अन्याय करत असल्याचं रडगाणं सुरुचं ठेवलं.

यापूर्वी बाळासाहेबांची गाठ अटलजी-अडवाणीसारख्या सहिष्णू नेत्यांशी होती. आता
उद्धव आणि आदित्य यांची गाठ मोदी-अमित शहा या 'शतप्रतिशत भाजप' या एकाच ध्येयानं पेटलेल्या चाणाक्ष राजका्रण्यांशी आहे. दोन पक्षातल्या विधानसभा निवडणुकीतली पहिली लढाई भाजपनं जिंकली.शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा स्वबळावर जिंकल्या. आता मुंबई महापालिका निवडणुकीत या लढाईचा दुसरा अंक रंगणार आहे.

           पन्नाशी म्हणजे मध्याचा काळ. या काळात मागील शिलकीचा आढावा घेत पुढे होणा-या खर्चाचं नियोजन करणं आवश्यक असतं. पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिलेच्या आयुष्यात असलेली अस्वस्थता गौरी देशपांडे यांनी 'मध्य लटपटीत' या आपल्या एका अजरामर कथेत मांडलीय. शिवसेनेची अवस्थाही पन्नाशीत  'मध्य लटपटीत' अशीच झालीय.      

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...