Saturday, November 9, 2013

न्यूयॉर्क ते नेवांग



न्यूयॉर्कच्या 135 मजली टोलेजंग पॉश इमारतीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये नेमक्या जागेवर  कैवल्यनं  नेहमीच्या सफाईनं गाडी पार्क केली. बाहेर दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन गार्डनं ठोकलेल्या सॅल्युटचा शिष्टशीर पद्धतीनं स्विकार केला. डोक्यात दिवसभराच्या सा-या कामांच, बोर्ड मीटिंगचं चक्र त्याच्या डोक्यात घूमू लागलं. त्याचा प्रत्येक मिनिट नं मिनिटं हा ‘लाख’ मोलाचा होता. आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस. आज सारी कामं नेहमीच्याच सफाईनं आणि 100 टक्के बिनचूक पद्धतीनं झाली पाहिजेत.  पहिला दिवस चांगला गेला तरच आठवडा चांगला जातो, अशी त्याची ठाम समजूत. याच मनोनिग्रहानं तो ऑफिसात शिरला. कामाच्याच विचारात असलेल्या कैवल्यनं सहका-यांच्या हाय सर, हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू सर चा नेहमीच्याच परिटघडानं स्विकार केला आणि आपल्या केबिनमधल्या खूर्चीवर स्थानापन्न झाला. 
ऑफिसात आल्यानंतर आधी सर्व मेल चेक करायची हा त्याचा शिरस्ता. मेल चेक करत असतानाच भारतामधल्या पेपरच्या साईट त्यानं नेहमीच्या सवयीनं ओपनं केल्या. आज सलग तिस-या दिवशी मणिपूरच्या अशांततेची बातमी प्रमुख पेपरनं फ्रंट पेजवर घेतली होती हे कैवल्यला त्याची ई एडिशन पाहताना समजले. एरवी मणिपूरसारख्या दुर्गम राज्याला फारसं महत्त्व न देणारी ही सारी वृत्तपत्र सलग तिस-यांदा मणिपूरची बातमी देतायत. म्हणजे मामला गंभीर आहे. 
मणिपूरच्या बातम्यांमध्ये रस असण्याचं त्याचं कारण म्हणजे त्याची रियल लाईफमधली सर्वात जवळची दोन माणसं  त्य़ाचे आई-बाबा मणिपूरच्या विवेकानंद केंद्रात सेवाव्रतीचं काम करत होते.  धुमसत्या मनस्थितीला शांत करत कैवल्यनं ऑफिसातली काम नेटानं सुरु ठेवली.


दिवसभराची कामं संपवून घरी परतल्यावर नेहमीच्या रितेपणासह कैवल्य घरात शिरला. आज पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस, बॅँक बॅलेंस सारं काही त्याच्याजवळ आहे. पण हे सारं शेअर करायला कुणीच नाही. आपण आनंदी आहोत, यशस्वी आहोत हे समाजाला दाखवण्याचा आणि स्वत:ला समजवण्याचा प्रयत्न तो सतत करतो.पाच दिवस भरगच्च काम आणि नंतर दोन दिवस भरपूर एन्जॉय अगदी अमेरिकन लाईफस्टाईल अंगात भिनलंय. तरी हे सर्व करत असताना आपले आई-बाबा तिकडं सात समुद्रापार घरापासून हजार किलोमीटर दूर असलेल्या मणिपूरमध्ये एका खेड्यात सेवाव्रतीचं आयुष्य जगतायत. किती बुलशीट आहे हे सारं ? हा सारा डोलारा आपण कुणासाठी उभा करतोय ? त्यांचे समाजसेवीची डोहाळं कधी पूर्ण होणार ? ही सारी प्रश्न  कैवल्याच्या डोक्याचा रोज रात्री केमिकल लोचा करतात.  या केमिकल लोच्याची रिएक्शन त्याला जाणवू लागली होती अखेर 15 दिवसांच्या रजेचा मेल ऑफिसला टाकला आणि भारताला जाण्याचे निश्चित केल्यानंतरच कैवल्यला किती तरी दिवसांनी शांत झोप लागली.  

दुस-या दिवशी सकाळी कैवल्यनं  ट्रॅव्हल एजंटला तातडीनं फोन केला. “ एक नवी दिल्ली अगदी तातडीनं लगेच हो, हो अगदी फास्ट, महाग असेल तरी चालेल. भारतात सध्या पावसळा आहे ?, असू दे महापूर येऊन सारं काही वाहून जाण्याची वेळ आलीय आता आयुष्यात त्यामुळे आहे ते वाचवण्यासाठी पावसाळा असो की उन्हाळा मला तिकीट तातडीनं हवंय. काहीही चौकशी न करता थेट तिकीट काढणारा तो ट्रॅव्हल एजंटचं पहिलंच गि-हाईक असावा. ऑफ सिजनमध्ये वाटेल ती किंमत मोजणारं गि-हाईक मिळाल्यानं एजंटही खूश झाला. त्यानं तातडीनं ते तिकीट त्याच्या हाती ठेवलं. 

विमानात उडल्यानंतर अगदी वेगळाच फिल येतो. सारं जग आपल्या खाली आणि आपण आकाशात...अगदी वर टॉपला. टॉपला जाण्याचं वेड आपल्याला कधी शिरलं हे कैवल्य आठवू लागला. शाळेत असेपर्यंत वर्गातल्या हुशार मुलांमध्ये कधीच नव्हतो आपण. अगदी ढ ही नाही आणि हुशारही नाही. त्यामुळे कोणत्याच कारणामुळे शाळेत कुणाच्या लक्षात आलो नाही. 

घरी आई आणि वडील. वडील प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून नोकरी करत बाकी सारा वेळ सामाजिक कार्य. परिसरातल्या दुष्काळगस्त भागातल्या केंद्राच्या कामात प्रत्येक शनिवार-रविवार वेळ दे. त्यांना धान्य वाटप कर. ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या साखर शाळांच्या कामाचा आढावा घे. भूकंपाने उद्धवस्त झालेलं एक गावं नव्यानं वसवण्याची जबाबादारी  स्वामी विवेवेकानंद केंद्रानं त्यांच्यावर सोपवलेली. सामाजिक काम असलं की वडिलांना नवा उत्साह येत असे. त्या गावाचं पूनर्वसन हॆच आपले जीवतकार्य आहे, त्यामुळे ते अधिकाधिक निर्दोष पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे या ध्येयानं ते झपाटलेले. हा सारा परमार्थ करत असताना घराकडे त्यांचं फारसं लक्ष नसायचंच.  

कैवल्यला वडिलांच्या या सा-या कामाबद्दल आदर होता. पण आपणही तसंच काम करांव हा वडिलांचा आग्रह त्याला मान्य नव्हता.त्यामुळे तो वडिलांपासून लांब लांब राहू लागला. वडिलांबद्दल आदर, प्रेम सारं काही आहे पण तरी जवळीकता साधणं त्याला जमायचे नाही. त्याचा घरातला सारा व्यवहार आईच्या मार्फत चालयचा. 
10 वी ला बरे मार्क पडले. मग सामाजिक प्रथेप्रमाणे आणि मुख्य म्हणजे घरापासून दूर राहता येईल म्हणून त्यानं शहरातल्या कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला.  बारावीत आणखी छान मार्क्स. मग इंजिनियरिंग. अभ्यासाची चटक लागलेल्या कैवल्यालं तिथं थेट गोल्ड मेडल मिळाल्यानं अमेरिकतल्या विद्यापीठात स्कॉलरशीपसह नोकरीची संधी चालून आली. अगदी 9/11 ऩंतर अमेरिकनं आपलं व्हिसा धोरण कडक केलं असूनही त्याला सहजगत्या व्हिसा मिळाला. सतत पुढं जाण्याच्या ओढीनं धावणा-या कैवल्यनं घरच्यांशी काहीही चर्चा न करता अमेरिका गाठली.

   अमेरिकेत गेल्यानंतर नव्या वातावरणात तो रमला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी आपसूक चालून आली. आता आई-वडिलांनी आपल्याकडे यावं असा त्याचा आग्रह. तर त्यांना देशाची काळजी पडलेली. ‘देशाची काळजी घ्यायला सरकार आहे, ना  लष्कराच्या भाक-या भाजण्याचे तुमच्यासारखे उद्योग मला जमणार नाहीत.  ‘  अमेरिकेची भव्यता, वर्क कल्चरला महत्त्व देणारी इथली मंडळी, ज्या देशात माझ्या गुणवत्तेचं चीज होतोय. आरक्षण, दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार, जातीयता, नक्षलवाद याच्या चक्रव्युवाहात माझं प्रोजेक्ट अडकत नाही. त्याच देशात मला राहण्याची इच्छा आहे, कृपया आता भारतात परत यावं असा आग्रह करु नये. तुमचा हाच आग्रह कायम असेल तर आता आपण एकमेकांशी संपर्क  न करणे उत्तम. असं निर्वाणीचं पत्र त्यानं घरी पाठवलं होतं त्यालाही आता सहा वर्ष उलटून गेली होती.  आई-बाबा निवृत्तीनंतर महाराष्ट्र सोडून मणिपूरात स्थायिक झालेत. तिथल्या विवेकानंद केंद्रातल्या शाळेत ते शिकवतात. अशी वार्ता त्याला नातेवाईक-मित्रमंडळीकडून समजली होती. पण तरीही त्यानं त्याबाबत कधी आई-वडिलांकडे विचारणा केली नाही. तर त्याच्या शेवटच्या पत्रानं दुखावलेल्या आई-बाबांनीही त्याला ते कधी कळवले नव्हते. त्यामुळेच आता असे अचानक आई-बाबांना भेटल्यानंतर आपण एकमेकांशी कसे रिएक्ट होऊ हा विचार त्याला प्रवासभर छळत होता.


नवी दिल्लीत उतरल्यानंतर मागच्या दहा वर्षात देशातल्या सप्तसिंधुमधून बरेच पाणी वाहून गेलंय याची जाणीव कैवल्यला झाली. आता अमेरिकीची छोटी आवृत्ती नवी दिल्ली विमानतळ परिसरात आढळत होती. दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेचा वाजलेला बो-या, वीजेची टंचाई, वाढती झोपडपट्टी हे सारे प्रश्न आपण पेपरात वाचतो. पण त्याचबरोबर दिल्लीला शहरीकरणामुळे आलेली सूज त्याला जाणवत होती. मॉल्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, रस्त्याच्या बाजूला सिनेस्टार आणि क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या वेशातली वेगवेगळ्या प्रॉडक्टची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, मेट्रो रेल्वे, पाण्यापेक्षाही अगदी सहजगत्या मिळणारे कोक-पेप्सी, स्मार्ट फोनमध्ये रमलेली तरुण पिढी, यामुऴे दिल्लीचं होतं असलेलं जागतिकीकरणाचा अनुभव घेत कैवल्य गुवाहाटीच्या रेल्वेत बसला.

  गुवाहटीत गेल्यानंतर मागच्या दहा वर्षात आपण किती बदललोय आणि या बदलामुळे सभोवतलाच्या परिस्थितीशी जुळवून घेणं किती अडचणीचं आहे हे कैवल्यला जाणवू लागलं. त्यातचं इफांळला जाणारी गाडी उद्या रात्री असल्यामुळे आजची रात्र हॉटेलात राहणं भाग होतं. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. त्याला पाऊस फक्त सिनेमात बघायला आवडयचा. गुवाहटीचा नखशिखान्त हलवलणारा पाऊस आणि या पावसात हॉटेल निवडण्याची कटकट त्यानं खिशात असलेल्या भक्कम पैशांच्या जोरावर पार पाडली. चला, तर खिशात भक्कम पैसे असले की जगात कुठेही अडचणीच्या वेळी मार्ग निघतोच हे त्याचं गृहितक पुन्हा एकदा पक्क झाल्याचं जाणवताच तशाही परिस्थितीत  आत्मिक हासू फुटलं.

   दुस-या दिवशी पावसानं उघडीप दिल्यानं गुवाहटी ते इंफाळ प्रवास कसा होईल हे पाहण्यासाठी कैवल्यनं हालचाल सुरु केली. ज्या नेवांग गावाला त्याला जायचे होते ते गोयपांग इंफाळच्या 1 तास अलिकडे आहे, याची नोंद त्यानं जवळच्या जीपीआरएसनं केली होती. मात्र भारतामधून मणिपूरला जाण्याचा मार्ग बंद होता. 
भारतामधून मणिपूरला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक आसाममधल्या सिल्चरमधून येणारा हायवे क्रमांक 53. पण दहशतवादी कारवाया आणि हायवेची दुरावस्था यामुळे तो मार्ग 20 वर्षांपासून बंद आहे. दुसरा मार्ग आसाम, नागालॅँड, मणिपूरमधल्या नागा हिल्स, कुकी हिल्स मार्गे मैदानी प्रदेशात येतो. बंडखोर नागा संघटनांनी हा मार्ग रोखून धरल्यानं मणिपूरचा श्वास आवळला गेलाय.

  या भागात, ना अन्नधान्य पोहचंत, ना औषधं. जगण्याची कोणतीच साधनं जिथं जाऊ शकत नाहीत अशा राज्यातली जनता मागच्या दोन महिन्यांपासून आयुष्य ढकलतीय. हे जाणवल्यानं इतके दिवस सुबत्तेच्या राशीवर लोळणारा कैवल्य वास्तवाच्या जमिनीवर आला. मागची सहा वर्ष केवळ मी भोवती फिरणा-या त्याच्या विश्वात आठवडाभरापासून आई-बाबा आले होते. आता ते विश्व अधिक विस्तारत मणिपुरची जनताही त्यात सामवली जात होती. 

    अर्थात कोणत्याही आपत्तीचं आपल्या फायद्यासाठी रुपांतर करणारी जात जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळते. याची जाणीव कैवल्यला होतीच. मणिपुरची ही समस्या तर मानवनिर्मित होती. त्यामुळे या भागात काळाबाजार करणा-यांकडे येणा-या पैशांचा वेग हा गुवाहाटीत दिवसभर कोसळणा-या पावसापेक्षा जास्त होता. 
मणिपूरला सुटणा-या गाड्यांच्या स्थानकावर सर्वत्र माणसांचा नुसता समुद्र पसरलेला असताना बसमध्येही माणसांनी खच्चून बसावं याचं कैवल्यला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याचा गणिती विचार करणाच्या त्याची वृत्ती आता मागे पडली होती. नेवांगला नेणारी हीच एकमेव बस आता आहे. त्यामुळे या बसमध्ये चढताना, बसमधली हवा, सीट, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे भाडं या पैकी कशाचीही घासाघीस करायची नाही हे त्याला उमजले होते.
बसमध्ये बसल्यानंतर आजूबाजूला सर्व एकाच चेह-याची माणसं आणि सर्वांच्या चेह-यावर एकच प्रकारची काळजी. गोरी, बुटकी, बारीक डोळ्याची बसक्या नाकांच्या मंडळींसोबत प्रवास करताना कैवल्यला वर्गातला मणिपूरचाच झोराम आठवला. स्वत:बद्दल कधीही काही न बोलणारा,मागेमागेच राहणारा, अबोल, बुजरा माणूसघाणा म्हणता येईल इतपत एकलकोंडा. तो आपल्या वर्गात चार वर्ष होता. पण त्याला कुणी समजून, सामावून घेतलाच नव्हता. अगदी टिपकील चीनी, नेपाळी असं म्हणून त्याची कुणी हेटाळणी केली नसेल. पण कॉलेज संपल्यानंतर झोराम कुठे गेला, त्याचं काय सुरु आहे याचं कुणालाच पडलेलं नव्हतं. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस एप सारख्या वेगवेगळ्या संपर्क माध्यमांनी वर्गातलं सगळं पब्लिक एकमेकांशी कनेक्ट असताना एकट्या झोरामची कनेक्टेव्हीटी कुठे आणि कधी तुटली ?

विचारांची ही तंद्री सुरु असतानाच त्यानं मणिपूरच्या प्रश्नाबाबत बोलण्यासाठी बाजूच्या काकांशी कधी सुरुवात केली हे कैवल्यलाही समजले नाही. आम्ही भारतीय आहोत, अगदी महाभारत कालापासून याचे दाखले आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या आझाद हिंद सैन्यातही मणिपुरी जनतेनं आपलं ‘खून’ दिलं ते देशाच्या ‘आझादी’साठीच ना ? स्वातंत्र्यानंतरच्या तीन्ही युद्धात मणिपूरच्या युवक अन्य जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. आशियाई स्पर्धेत मणिपूरच्या खेळाडूनंनी पदकं जिंकलीत. राष्ट्रीय स्पर्धेत मणिपूर नेहमी अग्रेसर असंत. या स्पर्धांचं नेटकं आयोजनही आम्ही केलंय. इतकचं काय तर च महिला बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद मेरी कोमनं पटकावलं ते  मणिपूरसाठी नाही तर भारतासाठीच.
दिल्ली, मुंबईत होणा-या छोट्याश्या आंदोलनाचीही लगेच दखल घेतली जाते. त्यावर संसदेत चर्चा होते. पण मणिपूरमध्ये ब्लॉकेडमुळे लोकं उपाशी मरतायत, त्यांचा देशाशी संपर्क तुटतोय. पेट्रोल 150 च्या पुढे, कांदा 75 रुपये किलो. डाळीनं 80 चा टप्पा ओलंडलाय.अगदी एटीएममधून पैसा काढण्यासाठी चार-चार तास रांगा लावाव्या लागत असल्यानं पैसा ही इथं महाग झालाय. मागच्या आठड्यात वृत्तवाहिन्यांनी याची ‘ब्रेकींग न्यूज’ खाली दखल घेतली. इंग्रजी
वृत्तपत्रांनी शब्दमर्यादेचं आणि संपादनाचं काटेकोर कौशल्य वापरत 250 शब्दात या बाबतच्या बातम्या दाखवल्या. पण यामुळे मणिपूरचे प्रश्न सुटले का ? याचा फॉलो-अप किती जणांनी केला ?

मणिपुरी काकांच्या एक-एक प्रश्नानं कैवल्यनं स्वत:भोवती गुंफून घेतलेले कोष गळून जात होते. ज्या सामाजिक संस्कारात तो लहाणाचा मोठा झाला. ज्या सामाजिकतेचं भान वडिलांनी आयुष्यभर जपलं आणि निवृत्तीनंतरच आयुष्य घालवण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्यांनी मणिपूरची निवड का केली हे त्याला समजू लागलं होतं. आपण काही करु शकतो ही भावनाच मरुन जावी इतकी विषण्णता या मणिपूरच्या हवेत साठून राहिल्याचं त्याला जाणवू लागलं.
 हताशा, हतबलता, परकीय घुसखोरी, बेरोजगारी, व्यसनाधिनता, विघटनवाद, आणि नाकरलेपणाची भावना या सारख्या समस्यांनी ग्रासलेल्या या राज्यातल्या जनतेमध्ये सकारात्मकतेचा, एकात्मतेचा, समरसेतेचा आणि राष्ट्रीयत्वचा धागा जोडण्यासाठी आपले आई-बाबा काम करतायत हे समजताच त्याला त्यांचा प्रचंड अभिमान वाटला. आता या कामात त्यांना संपूर्णपणे मदत करायची हे त्यानं नेवांगमध्ये बस दाखल होण्यापूर्वीच पक्क केलं होतं. ज्या देशात आपण जन्मलो, ज्या समाजात आपण मोठे झालो त्याचं देणं आपल्याला चुकवावंच लागतं. आपले बाबा मागची चाळीस वर्ष हेच करतायत. आता आपणही तेच करायचं हे न्यूयॉर्क ते नेवांग हा प्रवास पूर्ण करेपर्यंत कैवल्यनं निश्चित केलं होतं. त्याच्या आयुष्याचं ‘लक्ष्य’ त्याला सापडलं होतं. 


टीप - झी २४ तास डॉट कॉमच्या दिवाळी अंकात सर्वप्रथम प्रसिद्ध

Friday, November 1, 2013

राहिले दूर घर माझे... ( आनंद वासू )

क्रिकेट भारतामधल्या सर्वाधिक ग्लॅमरस क्षेत्रापैकी एक. एखाद्या बॉलिवूड कलाकाराच्या तोडीची किंवा अनेकदा त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धीही क्रिकेटपटूंना मिळते. अगदी लहान वयात मिळणारा पैसा, प्रसिद्धी, हायप्रोफाईल स्टेटस हे सर्वांनाच भूरळ पाडणारं. आज आयपीएलमुळे तर एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यापूर्वा सुपरस्टार झालेले आणि घरोघरी पोहचलेले खेळाडू आपल्या देशात आढळतात. पण वर्षभर फिरणा-या या क्रिकेटपटुंच्या आयुष्याची दुसरी बाजू काय आहे. तरुण वयात आपल्या घराच्यांपासून दूर त्यांना राहवं लागतं. वर्गमित्रांसोबतची धमाल, नातेवाईंकांची लग्न, घरातली आजरपण या सा-या प्रसंगात ते कुठेच नसतात. क्रिकेटमुळे त्यांची लाईफ स्टाईल बदलते. मात्र या बदलत्या लाईफ स्टाईलची किंमतही तितकीच मोटी आहे. या बदलत्या लाईफ स्टाईलशी जूळवून घेऊन स्पर्धात्मक क्रिकेट खेळणा-या खेळाडूच्या अवस्थेवर विस्डेन इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक आनंद वासू यांनी एक सविस्तर लेख लिहलाय. त्या लेखाचा हा अनुवाद. आनंद वासू यांनी या अनुवादाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार....

..........................................................................................................................................

एक किशोरवयीन युवक क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार करतो त्यावेळी त्याच्या डोक्यात आयुष्यात काही तरी भव्य करण्याची कल्पना असते. आपल्या हातात बॅट घेऊन असा काही पराक्रम गाजवू की ज्यामुळे सा-यांचीच डोळे दिपून जातील. 22 यार्डाच्या खेळपट्टीवर अफाट करण्याच्या कल्पनेनं अनेक  किशोरवयीन युवक झपाटलेले असतात. मात्र चरितार्थ चालवण्यासाठी क्रिकेट खेळण्याचे भाग्य काही मोजक्याच भाग्यवंतांना मिळते. यापैकी अगदीच निवडक क्रिकेटपटूंना हे भाग्य सातत्याने लाभलंय. आजच्या युगात व्यवसायिक खेळाडू असणे म्हणजे सारी स्वप्न पूर्ण होण्यासारखी बाब आहे. मात्र हीच स्वप्नपूर्ती झोप उडवणारी आहे.

.क्रिकेट विश्वाचे केंद्र असलेल्या भारतामध्ये क्रिकेटचे कॅलेंडर सप्टेंबरमध्ये सुरु होते. सप्टेंबर ते जानेवारी या काळात चार दिवसांचे आठ रणजी सामने आणि पुढे कदाचित नॉक आऊट लढती. त्यानंतर कॉर्पोरेट चषक स्पर्धा. वर्षभरातल्या या एकमेव स्पर्धेत खेळण्यासाठी उद्योगपती खेळाडूंना दरमहा पगार देत असतात. त्यानंतर देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा, आणि टी-20 सामने. पुढे दोन महिने इंडियन प्रिमयर लीग. या सर्व स्पर्धा एका पाठोपाठ खेळून झाल्यानंतर पुन्हा रणजी सामन्यांचे वेळापत्रक तुमची वाट पाहत असते. थोडक्यात कोणत्याही यशस्वी क्रिकेटपटूच्या जीवनात  वैयक्तिक आयुष्याला जागाच राहत नाही. क्रिकेट खेळणे हेच त्यांचे आयुष्य बनलेले असते.


अर्थात देशासाठी खेळत असताना वैयक्तिक गोष्टींचा विचार करणे अशक्य असतं. खेळाडूचे कारियर हे मर्यादित असते.ज्या वयात बहुतेक व्यक्तींच्या करियरमधला सर्वोत्तम काळ सुरु होण्याच्या मार्गावर असतो त्यावेळी खेळाडू निवृत्त होतो.साधारणपणे क्रिकेटपटू पस्तीशीच्या आसपास निवृत्त होतात. तर सामान्य व्यक्ती वयाच्या चाळीशीत आपल्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या प्रतिक्षेत असतो. अनेकांना पन्नाशीतही अधिक पैसा कमावण्याची संधी उपलब्ध असते. मात्र क्रिकेटपटू आयुष्यातला सर्वोत्तम काळ हा सुरुवातीलाच पूर्ण करतात. त्यामुळे हे सारे सुखी आयुष्य मिळवण्याची मोठी किंमत त्यांना मोजावीच लागते.

क्रिकटेपटूंच्या आयुष्याच्या होणा-या या घुसळणीतचं क्लासीक उदाहरण म्हणजे मुरली कार्तिक.या डावखु-या फिरकीपटूनं आठ कसोटी ( 2000-2004) आणि 37 एकदिवसीय ( 2002-2007) मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. म्हणजेच टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळून त्याला सहा वर्ष लोटली आहेत. तरी कार्तिकला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. कार्तिक सांगतो,  “ व्यवहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी मागच्या 19 हंगामापासून क्रिकेट खेळतोय. भारतामधील रणजी  आणि इंग्लंमधील कौंटी क्रिकेट दरम्यान ब्रेक नसतो. एक खेळाडू या नात्याने रणजी टीमसाठी माझी जी जबाबदारी असते त्या पेक्षा मोठी जबाबदारी एक विदेशी खेळाडू म्हणून कौंटी क्रिकेट खेळताना मला पूर्ण करावी लागते. मी तिथे केवळ माझ्या कॅप्टनला नाही तर त्या कल्बमधल्या प्रत्येक व्यक्तीचा मी उत्तरदायी आहे.” लॅँकरशायर, मिडलेक्स, सोमरसॅट आणि अगदी अलीकडच्या काळात सरे या इंग्लीश कौंटी टीमचं कार्तिकनं प्रतिनिधित्व केलंय. पण टीम इंडियामध्ये त्याच्यासाठी जागा नाही.

 “ वर्षातला बहुतेक काळ दिल्लीतलं माझं घर बंद असतं. कोणत्याही व्यक्तीप्रमाणे मी देखील या घरासाठी कठोर परिश्रम केलेत. त्यासाठीच, पैसे मिळवलेत पण या घराचं सुख उपभोगण्याची संधी मला मिळत नाही ’’  अशी भावना कार्तिकनं बोलून दाखवलीय. इंग्लंडमध्ये असताना प्रत्येक हंगामात अलिशान घरात त्याची बडदास्त ठेवली जाते. कुठेही फेरफटका मारण्यासाठी टीमच्या प्रायोजकाची गाडी दिमतीला असते. तरीही त्याला आपल्या घराची सर नाही असे कार्तिकला वाटते. “गेल्या पाच वर्षांपासून मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेसाठी आणि नंतर इंग्लींश कौंटी क्लबसाठी पूर्ण हंगाम क्रिकेट खेळत आलोय. या काळात मी माझ्या दिल्लीतल्या घरी किती राहिलो याची नोंद माझ्याकडे आहे. मागच्या पाच वर्षात अनुक्रमे 22,27,23,24 आणि 25 रात्र मी माझ्या घरात मुक्काम केलाय.घरातील एकमेव व्यक्तीला स्वत:च्याच घरात वर्षातून एक महिन्यापेक्षा कमी काळ राहयाला मिळाल्यावर त्याची काय अवस्था होत असेल याचा विचार केलाय का ? ’’  असा प्रश्न कार्तिक विचारतो.

मुरली कार्तिकनं मागच्या सहा वर्षात टीम इंडियासाठी एकही मॅच खेळलेली नाही या गोष्टीचा फेरविचार केल्यानंतर सध्याच्या खेळाडूंची काय अवस्था होत असेल याचं गांभीर्य लक्षात येईल. जगभरात वेगवेगळ्या लीग सुरु असतात. वाजवी पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देशात होणा-या स्पर्धांचं दमवणारं वेळापत्रक क्रिकेटपटू पाळावचं लागतं. अर्थात यामध्येही कुटुंबाला महत्व देणारा गौतम गंभीर सारखा खेळाडू विराळाच. 2008-09 च्या हंगामात गंभीर त्याच्या कारकिर्दीमधल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्या सहा टेस्टच्या ड्रीम रनमध्ये केविन पिटरसनच्या इंग्लंडविरुद्ध 179 आणि 97  हॅमिल्टन कसोटीत 72 आणि 30, नेपियरमध्ये पहिल्या डावात 16 आणि दुस-या डावात 11 तास खेळपट्टीवर ठाण मांडून केलेली 137 धावांची अजरामर खेळी. वेलिंग्टन कसोटीत 23 आणि 167. श्रीलंकेविरुद्ध अहमदाबादमध्ये 1 आणि 114 आणि पुन्हा कानपूर कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 167. कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या गंभीरनं कौंटुबिक जबाबदारीला महत्व देत त्यानंतरच्या मुंबई टेस्टमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

गंभीर बहिण्याच्या लग्नासाठी मुंबई टेस्टमध्ये खेळला नाही. ’माझ्या कौटुंबिक आयुष्याततल्या अनेक आनंदाच्या प्रसंगात परिवारासोबत राहण्याची संधी मला मिळालेली नाही. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट हे करियर निवडता त्यावेळी तुमची प्राथमिकता बदललेली असते हे सर्वांनीच गृहीत धरलेलं असतं. तरीही काही गोष्टी टाळता येणं शक्यच नसतं बहिणीचं लग्न ही अशीच एक न टाळता येणारी बाब आहे, असं गंभीर सांगतो.
अर्थात गंभीरचा टेस्ट न खेळण्याचा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नव्हता. मी एखाद्या खेळाडूला अशा प्रकारची सूट दिलीच नसती, असे बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले म्हणाले होते. ( टीप- हा लेख लिहीत असताना लेले हयात होते) तर आमच्या काळात अशा प्रकारची कल्पना करणंही अशक्य होतं असं टीम इंडियाचे माजी कोच आणि निवड समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी सांगितलं. क्रिकेट दौ-यावर असल्यामुळे सुनील गावसकरला आपल्या नवजात मुलाचा चेहरा दोन महिने पाहता आला नव्हता याची आठवणही गायकवाड यांनी करुन दिली.


आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा क्लब लेव्हलची प्रत्येक मॅच खेळण्याची इच्छा क्रिकेटरची असते असं गंभीर सांगतो. मात्र काही वेळा कुंटुंब हे या सर्वापेक्षा महत्त्वाचे आहे याची जाणीव तुम्हाला होते. ज्या कुटुंबानं तुमच्या क्रिकेट करियरसाठी अनेक गोष्टींचं बलिदान दिलंय. त्यांच्यासाठी क्रिकेट आणि कुंटुंबामधील सीमारेषा काही प्रसंगात ओलंडण्याची आवश्यकता असते. गंभीरनं स्वत:च्या लग्नासाठीही टेस्ट खेळणे टाळले होते. ( अर्थात त्या लग्नात त्याची उपस्थिती आवश्यकच होती) तसेच इंग्लंड विरुद्धच्या अहमदाबाद टेस्टपूर्वी त्याची आजी ( आईची आई) आशा गुलाटी यांचं निधन झालं त्यावेळीही गंभीरनं कौटुंबिक  जबाबदारीला प्राथमिकता देत घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आजीने माझा लहानपणी सांभाळ केलाय. मी क्रिकेट खेळतो त्यामुळे मला सर्वांपासून दूर राहवं लागतं हे घरच्यांनी स्वीकारलंय. मात्र या अशा काही गोष्टी आहेत की ज्या मी टाळूच शकत नाही असं गंभीरनं सांगितलं.
गंभीरचा फॉर्म सध्या हरपलाय. त्याच्या बॅटमधून पूर्वीसारख्या धावाही होत नाहीत. त्यामुळे सध्याच्या टीममध्ये त्याचा समावेश नसणं हे स्वाभाविक आहे. पण तरीही गंभीरचं लॉजिक तुम्ही नाकारु शकत नाही. काही वर्षांनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. त्यानंतरच सारं आयुष्य त्याला कुटुंबासमवेतच घालवायच. त्यावेळी आपल्या सर्वाधिक गरजेच्यावेळी गौतमनं आपल्याला वेळ दिला याची जाणीव घरातल्या प्रत्येकाला असेल. त्यामुळे घरातल्या सर्वांसाठी त्याच्या परतण्याचं मोठ मोल असेल. क्रिकेटपटू या नात्यानं किती धावा केल्या याच्यापेक्षा हे ‘मोल’ नक्कीच जास्त आहे.

एक व्यवसायीक क्रिकेटपटू या नात्याने आपण आयुष्य चांगले घालवले याचे समाधान गंभीरला नक्कीच असेल. पण जगातले अन्य काही क्रिकेटपटू या सर्वांकडे वेगळ्याच दृष्कीकोणातून पाहतात. कुमार संगकारा हा त्यापैकी एक. श्रीलंकेच्या सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये त्याचा समावेश नक्कीच होईल. वयाच्या 22वर्षी लॉचे शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या संगकाराचा दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणा-या श्रीलंकन टीममध्ये समावेश करण्यात आला. पहिल्या तीन टेस्टमध्ये त्याला एकदाही 25 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र चौथ्या टेस्टमध्ये डरबनच्या खेळपट्टीवर श़ॉन पोलॉकच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी करणा-या आफ्रिकन तोफखाण्यासमोर त्यानं 74 धावांची झुंजार खेळी केली. श्रीलंकेच्या नव्या स्टारचा त्या दिवशी जन्म झाला. “ पहिला दौरा हा माझ्यासाठी करा किंवा मरा अशाच पद्धतीनं असल्यानं आजही चांगलाच लक्षात आहे. जगातल्या सर्वोत्तम टीमसमोर उभ राहून त्यांच आव्हान स्विकारण्याची धमक माझ्यात आहे हे मला दाखवून द्यायचे होते. माझा पहिला दौरा आणि सर्वात अलिकडचा दौरा यामधला फरकही मला चांगलाच जाणवतो.’’

संगकाराला हा फरक नक्कीच जाणवत असेल. पण धकाधकीचं कंटाळवाणे आयुष्य जगणा-या अन्य व्यक्तींसाठी सर्व गोष्टी काही काळानंतर अस्पष्ट होऊ लागतात. क्रिकेटर म्हणून केलेला प्रत्येक प्रवास हा संस्मरणीय नव्हता हे संगकाराने मान्य केले. त्यानं दक्षिण आफ्रिका ज्या देशातली अंतर्गत खळबळ ही श्रीलंकेप्रमाणेच आहे तिथंही क्रिकेट खेळलंय. तसेच निसर्गाचे वरदान लागभलेल्या न्यूझीलंडच्या क्वीन्सटॉऊनचाही दौरा केलाय.

एक बुद्धिमान खेळाडू अशी ओळख असलेल्या संगकाराला युवा क्रिकेटपटू असताना केलेल्या दौ-याच्या वेळेस थ्रील चांगलेच आठवते. कारकिर्दीच्या सुरुवील प्रत्येक दौरा हा तुमच्यासाठी चांगली संधी असते. परदेशी खेळपट्यांवर आपला ठसा उमटवण्याची भूक तुम्हाला असते. वैयक्तिक कामगिरी सुधारण्याचे आणि नवे लक्ष्य गाठण्याचे आव्हान प्रत्येक दौ-यात खुणावत असते. पण संघाचा नियमित सदस्य झाल्यानंतर शांत चित्त किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होते. ज्या देशात तुम्ही खेळत आहात तिथल्या वातावरणाचा आनंद घेणे, सकारात्मक पद्धतीनं खेळाचा आनंद लुटणे किती महत्वाचे असते हेही तुम्हाला जाणवू लागते.
प्रतिकुल परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न संगकारानं केला. त्याला नव्या  भागात फिरायला आवडतं. स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्या परिस्थितीशी एकरुप होण्याचाही त्याचा प्रयत्न असतो. पण त्याच त्याच ठिकाणाचा दौरा करण्याची वेळ त्याच्यावर अनेकदा आलीय. टेस्ट क्रिकेट हे केवळ 10 देशांमध्ये खेळलं जातं. प्रत्येक देशात आंतरराष्ट्रीय सामने होणारी पारंपारिक केंद्र आहेत. त्यामुळे  ठराविक शहरांचा दौरा वारंवार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय दौरे आवडणारे असले तरी सतत विमानतळ आणि हॉटेलमधले चेक-इन आणि चेक-आऊट, सामानांची सततची पॅकींग आणि पुढचं शहर गाठण्यासाठीची धावपळ या सा-या गोष्टी या तितक्याच तापदायक आणि चिडचिड वाढवणा-या असतात, हे संगकाराने मान्य केलंय.
आक्रमक युवा खेळाडू म्हणून टीममध्ये पदार्पण करणा-या संगकाराच्या आयुष्यात क्रिकेटच्या सोबतीनं बरेच बदल झालेत. आज तो एक पती तसेच जमीनदारही आहे. त्याच्या देहबोलीतून हा बदल जाणवतो.   “ पण क्रिकेटच्या दौ-यावर असताना माझे आयुष्य हे सर्वसाधारणच असते. मला माझी सारी बिलं भरावीच लागतात. तसेच माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. दौ-यावर असताना तुमचं आयुष्यही सुरुच असतं. तुमचा अन्य गोष्टींशी असलेला संपर्क तुटत नाही ही खूप आश्वासक बाब आहे. घरातले सदस्य आणि सांसरिक जबाबदा-या तुमच्यावर कायम असतात. तुम्ही का खेळता आणि तुमच्या खेळावर कोण कोण अवलंबुन आहे, याचे स्मरण या सा-यामधून होत असते. ’’


व्यवहारिकतेची जाणीव असलेला संगकारा तितकाच संवेदनशील आहे. “ मी माझे घर कायमच मिस करतो. लग्नानंतर येहालीला ( संगकाराची पत्नी) शक्य तेंव्हा दौ-यावर सोबत नेण्याचा माझा प्रयत्न असतो. तरीही घरच्यांसोबत अनेक गोष्टी मला करता येत नाहीत. विशेषत: बाप झाल्यानंतर एक पिता या नात्यानं तर ही बाब फारच अस्वस्थ करणारी असते. मुलाच्या वाढीचे महत्त्वाचे टप्पे जवळून पाहता येत नाहीत असे जुळ्या मुलांचा बाप असलेल्या संगकाराने सांगितले.  कौटुंबिक आयुष्यातल्या अनेक गोष्टींचे साक्षिदार होण्याची इच्छा असते, त्यामुळेच दौ-यावर कुटुंबाला नेण्याची परवानगी मिळावी यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका मांडली आहे. ’’

माझ्या क्रिकेट करियरमधल्या प्रत्येक गोष्टीचे योग्य पद्धतीनं ‘रेकॉर्ड’ होत असताना त्याच्या बायकोचे काम मात्र दुर्लक्षित राहतय हे सांगयला संगकरा अजिबात कचरत नाही, . “ .अर्थात क्रिकेटमुळेच आम्हाला सध्याची जीवनशैली जगता येतीय हे खरयं. पण बायकोनं माझ्यासाठी मोठं बलिदान दिलंय दोन्ही मुलांच्या संगोपनाची तिनं एकटीनं पेलली आहे. अनेकदा आमचा एकमेकांशी संपर्क होत नाही. माझी ‘ग्राऊंड रिएलिटी’ काय आहे हे तिला समजायला काहीच मार्ग नसतो. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी आमच्या टीमवर केलेला हल्ला हे या अनिश्चित परिस्थितीचे सर्वात मोठं उदाहरण. सतत अनिश्चित असलेल्या माझ्या वेळापत्रकामुळे तिला फार पुढचे नियोजन करता येत नाही.या सा-या अवघड गोष्टी तिनं शातंपणे समजून घेतल्यात. तिच्या सारखी सहचारिणी मिळाल्यामुळेच माझा क्रिकेट दौरा सुसह्य होतो. ’’

श्रीलंकेतल्या आपल्या अनेक देशवासियांना स्वप्नवत वाटणारं आयुष्य मी जगतोय हे खरंय. पण या सुखी आयुष्याच्या मार्गावर द्याला लागणा-या ‘टोल’ची किंमत कमी लोकांना माहितीय. बिझनेस क्लासने विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम आणि प्रत्येक ठिकाणी मिळाणारी व्हिआयपी वागणूक या सर्व गोष्टी अल्हादायी वाटतात. पण हा सारा झगमगाट म्हणजे आयुष्य नाही हे वास्तव कधीही न विसरण्याची दक्षता घ्यावी लागते. या सर्व तारांकीत आयुष्याचा झगमगाट कधी ना कधी संपणार आहे. अशावेळी तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर काय करता यालाच सर्वाधिक महत्व आहे. वाढती जबाबदारी आणि कुटुंबाचा विरह हा माझ्या या सध्याच्या आयुष्याचा ‘टोल’ आहे, पण क्रिकेट हेच माझे आयष्य आहे निवृत्तीनंतर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे रस्त्यावरुन फिरायला लागल्याची खंत मला कधीच जाणवणार नाही. मात्र क्रिकेट आणि मित्रांनी गजबजलेलं ड्रेसिंगरुमचं वातावरण मी नेहमी मिस करेन, असं संगकारानं स्पष्ट केलं.

कार्तिक, गंभीर किंवा संगकारासारखे व्यवहारिक आणि क्रिकेट आणि बाकी आयुष्य याची सांगड घालणारे खेळाडू मोजकेच आहेत. अनेक हाय प्रोफाईल क्रिकेटपटूंचे आयुष्य या अनेक अव्यवहारिक आणि परस्परभिन्न गोष्टींनी भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणारे पॅडी उप्टन हे यापैकी एक. पॅडी सध्या दक्षिण आफ्रिकेचे व्यवस्थापक आणि राजस्थान रॉयल्स या टीमचे मुख्य कोच आहेत. आयुष्यात काय करायचे याच उत्तर शोधण्यासाठीच पॅडी यांनी बराच कालवधी खर्च केलाय. वेस्टर्न प्रोव्हिन्स या दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टीमचे डावखुरे फलंदाज म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. त्यानंतर हॅन्सी क्रोनिए कॅप्टन असताना ते राष्ट्रीय टीमचे पूर्णवेळ ट्रेनर होते. याच क्षेत्रात आपल्याला करियर करता येईल हे समजल्यानंतर त्यांनी स्पोर्टस सायन्स आणि एक्सिक्युटीव्ह कोचिंग या विषयातलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. मानसिक स्थिती या विषयातले पितामह म्हणून ओळखले जाणा-या टीम नोअकेस यांच्या हाताखाली पॅडी यांनी कोचिंगचे धडे गिरवले आहेत.

पॅडी टीम इंडियासोबत असताना टीम टेस्टमध्ये नंबर वन बनली. तसेच विश्वविजेतेपदालाही टीमनं गवसनी घातली. खेळात आनंद मिळाल्याशिवाय त्यातील श्रेष्ठत्व मिळू शकत नाही असा पॅडी यांचा ठाम विश्वास आहे. एखाद्या सात वर्षाच्या मुलापेक्षाही जास्त प्रश्न उपस्थित करणा-या पॅडी यांनी देशातल्या आघाडीच्या क्रिकेटपटूंचे आयुष्य काय आहे हे अगदी जवळून पाहिलय. भारतामध्ये क्रिकेट हा मनोरंजनाचा व्यवसाय बनलाय. क्रिकेटपटू हे मनोरंजनाचे माध्यम बनलेत. त्यांचे सेलिब्रेटी स्टेटस हे सतत वाढत असून त्यासाठी वेगवेगळ्या जाहीरातींमध्ये ते व्यस्त असतात. झगमगत्या (ग्लॉसी) मासिकात त्यांची छायाचित्रं छापून येतात फिरण्यासाठी स्पोर्टस कार उपलब्ध असतात. एखाद्या क्रिकेटपटूचा चेहरा त्यानं आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वी शॉपिंग मॉल, विमानतळ, रस्त्याच्या बाजूचे जाहीरातीचे फलक अशा यत्र तत्र सर्वत्र झळकत असतो. या सर्व झगमगटानं येणा-या तोट्याची पॅडी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये अत्यंत गांभिर्यानं नोंद केलीय. “ प्रत्येक युवा क्रिकेटपटूंना वाचन ही अनिवार्य बाब केली पाहिजे. मॉडेल, चित्रपट कलाकार, संगीतकार तसेच उद्योगपतींसाठी हा सारा झगमगाट हे पार्टी कल्चर ही आता नेहमीची बाब बनलीय. क्रिकेटपटूंचा यामध्ये अलिक़डेच शिरकाव झालाय. हे सारं आनंदी आणि हवहवंस वाटणारं विश्व आहे. आपल्या आवडत्या कलाकाराबाबत जाणून घ्याला त्याच्या आयुष्याबद्दल वाचायलला लोकांना आवडत असतं. स्टारसाठी हे आयुष्य रंगीत, आकर्षक, आव्हानात्मक आणि प्रसंगी प्राणघातकी बनू शकतं. जिंकणारे जिंकतात आणि हरणारे हरतात. संसाराच्या नियमाप्रमाणे सा-या गोष्टी घडत असतात. कोणत्याही चांगल्या पार्टीनंतरचा हॅँगओव्हरही तितकाच परिणामकारक असतो.अनेक जण हे मान्य करणार नाहीत पण अनेक क्रिकेटरचे आयुष्य हे घोटाळे, एकाकीपण, निराशा, घटस्फोट आणि अगदी आत्महत्या यांनी भरलेलं आहे. या लाईफस्टाईलमध्ये बदल केला नाही तर हा सा-या हॅँगओव्हरचा पसारा वाढत जाणार आहे.
क्रिकेटरच्या या सा-या भयावह आयुष्याचा विचार करणारे पॅडी हे अत्यंत विद्वान गृहस्थ आहेत. कोणत्याही मुद्यावर त्यांना प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून समजून घेत असताना त्या प्रश्नावर त्यांनी कित्येक पाय-या पुढचा विचार केला आहे, याची जाणीव प्रश्नकर्त्याला होते. त्यांच्याशी चर्चा करणे हा नेहमीच एक शिकण्याचा अनुभव असतो. कारण तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं कदाचित मिळणार नाहीत पण  जिथून सुरुवात केली असते त्याच्या बरचं पुढं गेल्याची जाणीव ही सारी चर्चा संपल्यावर निश्चितच होते. क्रिकेटर्सना आता पुर्वीपेक्षा अधिक पैसा मिळतो. त्यांच्या आयुष्यातला झगमगाट, ग्लॅमर याच्यात वाढ झालीय. पण ते पुर्वीपेक्षा जास्त एक्सपोजही होत आहेत. पण या सा-या प्रकाशमान आयुष्याच्या बरोबर येणा-या काळ्या सावलीची जाणीव क्रिकेटरना आहे का ? ही काळी सावली गडदपणे समोर आणण्याचे काम प्रसारमाध्यमांनी अनेकदा केलंय. नाईट क्लबमध्ये होणारी भांडणं, अतिरेकी मद्यपान करुन गाडी चालवणे, उतावळे लैंगिक संबंध, फसवे व्यवसायिक परवाने, अंमली पदार्थाचे सेवन, ‘हनी पॉट’ आणि मॅच फिक्सिंगमधला सहभाग हे सर्व क्रिकेटपटूंच्या आयुष्यातल्या काळ्याबाजू अलिकडच्या काळात पुढे आल्या असल्याचं पॅडी सांगतात. कायद्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना काही सेलिब्रेटिंची झालेली असते. ही भावनाच अशा प्रकारच्या कृत्यांचा पाया रचते.

पॅडी यांचे शब्द हे अतिरेकी नकारात्मक वाटत असले तरी आकडेवारी त्यांच्या शब्दांना बळ देणारी आहे. 2013 मध्ये क्रिकेटरचे आत्मत्येचे प्रमाण हे अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे. घटस्फोटाच्या आकडेवारीनंतर हॉलिवूडमधल्या जोडप्यांनंतर क्रिकेटरचा नंबर लागतो. आज पैसा, प्रसिद्धी प्रतिष्ठा वारेमाप मिळतीय. पण सततचा प्रवास हा क्रिकेटर्सना अस्थिर करणारा आहे. क्रिकेट खेळाडू हा मनोरंज विश्वाचा भाग होण्याचे प्रमाण वाढले आहे. पार्ट्या ग्लॅमरच्या या झगमगटामध्ये क्रिकेटपटचे जवळचे मित्र त्यांच्यापासून दूर होत आहेत. त्यांच्याभोवतालचं खुशमस्क-यांचे जाळे दिवसोंदिवस घट्ट होतय.

क्रिकेटपटूंची आजच्या इतकी बिकट मानसिक अवस्था पुर्वी कधीच नव्हती. गॅरी सोबर्स यांचा केवळ वेस्ट इंडिजच्या नाही तर जगातल्या सर्वकालीन महान क्रिकेटपटूमध्ये समावेश होतो. त्यांनी आत्मचरित्रात लिहलेले काही प्रसंग तर आज एखाद्या कादंबरीत फिट्ट बसतील असे आहेत. अफाट नैसर्गिक गुणवत्ता लाभलेल्या या बार्बाडोसच्या खेळाडूचं करियर हे एखाद्या मुक्तछंदातल्या कवितेसारखं होतं. पारंपारिक नियम चौकटी त्यानं फारश्या पाळल्याच नाहीत. आपल्या आत्मचरित्रातच सोबर्सनं हा किस्सा लिहून ठेवलाय. ‘’ मला जुगार आवडत असे मी दारुही चिकार प्यायचो. तसेच सुंदर युवतींसोबत लेट नाईट पार्टींना जाण्यापासूनही मला कोणी रोखले नाही. करियरच्या शेवटावर 1973 साली इंग्लंड दौ-यावर घडलेला एक किस्सा मोठा मजेशीर आहे.

लंडनमध्ये स्थायिक झालेल्या वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू रेग स्कॅरलेटनं सोबर्स यांना मद्यपानासाठी आमंत्रण दिलं होतं. सोबर्स यांनी हे आमंत्रण आनंदानं स्विकारलं. वेस्ट इंडिज टीम राहत असलेल्या हॉटेलमध्ये न बसता ते दोघे एका बारमध्ये गेले. त्या बारमध्ये स्कॅरलेटनं केलेल्या पाहुणचाराचा सोबर्स यांनी पूर्ण सन्मान केला. रात्रभर रंगलेल्या कार्यक्रमानंतर सकाळी थंड पाण्याने कशीबशी आंघोळ करत सोबर्स यांनी आपल्या टीमला ज़ॉईन केले. त्या कसोटीच्या अदल्यादिवशी सोबर्स 26 धावांवर रोहन कन्हईयासह नाबाद होते. त्यामुळे त्यांना आराम करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या सर्व कसरतीनंतर मैदानावर उतरलेल्या सोबर्स यांच्यसमोर पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजीला होता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बॉब विलीस. पहिले पाचही बॉल मी बिट झालो. वेगवान गोलंदाजीला मदत करणा-या खेळपट्टीवर माझा सहज फाडशा पाडेल अशा आर्विभावात विलीस गोलंदाजी करत होता. पाच चेंडूनंतर ड्रेसिंगरुममध्ये माझ्या हलचालींवर होणारी शेरेबाजी मला जाणवली. विश्रांती न झाल्यानं मैदानावर माझी भंबेरी उडाल्याची जाणीव सहका-यांना झाली होती. विलीसनं टाकलेला सहावा चेंडू बॅटच्या मध्यावर बसला. मी मैदानावर स्थिरावलो. सत्तरी पार केल्यानंतर पोटात साचलेल्या अल्कोहलनं आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. मला शौचालयास जाणे आवश्यक होते. मात्र त्याचवेळी मैदानावर सेट झाल्यानं तयार झालेला रिदमही मला तोडायचा नव्हता. त्यामुळे मी तसंच खेळायचा निर्णय घेतला.
पोटातली खळबळ थोपवून धरलेल्या सोबर्सनं जिद्दीनं आपलं शतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर त्यांनी पोट रिकामं करण्यासाठी मी पंचाकडे परवानगी मागितली. ड्रेसिंगरुममध्ये गेल्यानंतर रोहन कन्हाईनं माझ स्वागत केलं कॅप्टन तुला काय त्रास होतो ? ( मी तेंव्हा कॅप्टन नव्हतो तरी रोहन मला कॅप्टन अशीच हाक मारत असे). असा प्रश्न त्याने विचारला. मी त्याला सांगितले, पोरा माझ्या पोटात नरकयातना होतायत. एक कडक ब्रँडीचा पेग हाच त्यावर उपाय आहे. रोहननं तात्काळ ड्रिंकची ऑर्डर दिली. त्यानं एकदा माझ्याकडे निरखून पाहिलं आणि तो ओरडला कॅप्टनसाठी आणखी एक ब्रँडीचा पेग आणा, आणि हो हा पेग पहिल्यापेक्षा मोठा भरा. मला त्याची ही आयडिया आवडली. त्यानं मागवलेला दुसरा पेगही मी आनंदानं रिचवला. माझ्या पोटातली खळबळ अचानक शांत झाली. शौचालयास जाण्याची गरज मला भासलीच नाही. त्या डावात सोबर्सच्या नाबाद 150 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं आपला डाव 6 बाद 652 या विशाल धावसंख्येवर घोषित केला. वेस्ट इंडिजनं ती टेस्ट एक डाव आणि 226 धावांनी जिंकली.

या घटनेला यावर्षी ४० वर्ष पूर्ण झालीत. आजही स्वत:ला तृप्त करण्याचे अनेक ऑफफिल्ड मार्ग खेळाडूंना उपलब्ध आहेत. पण सोबर्स ज्या पद्धतीनं स्वच्छंदीपणे आयुष्य उपभोगू शकले ते स्वातंत्र्य त्यांना मिळणार नाही. आजही खेळाडूंसाठी ड्रींक्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण ते बंद दरवाज्याआड किंवा एखाद्या सेलिब्रिटी पार्टीमध्ये त्याची सोय केली जाते. ज्याची माहिती ही उघडपणे कोठेही येत नाही. सोबर्ससारखं व्यक्तीमत्व खेळाडूंमध्ये असेलही पण अशा व्यक्तीला आश्चर्याऐवजी तिरस्कार जास्त सहन करावा लागेल.
2013 मध्ये जागतिक क्रिकेटचा हिस्सा बनलेल्या व्यक्तीनं त्याच आयुष्य हे अस्थिर असल्याचा स्वीकार हा केलाच पाहिजे. तसेच काही वर्षांपूर्वीपर्यंत निरस, एकाकी आणि काहीस हेकेखोरपणे आयुष्य जगत असलेल्या क्रिकेट पत्रकारांचे आयुष्यही आता एक इंग्रजी कवितेप्रमाणे बदलत चाललंय.
Corridor of uncertainty
It used to be only a few inches wide,
Just outside a batsman’s off stump.
It used to be a bowler’s principal aim,
Just nag away and wait for a mistake
It used to be every left-hander’s weakness,
Just leave the ball or play it ?
It used to be the slip cordon’s ally,
Just the right line for a nibble
It used to be cricket’s basic principle,
The corridor of uncertainty
Today, it’s wider than a pitch,
And sits in the middle of the desert
Today, it’s that place you can’t avoid,
On any cricketing voyage
Today, it’s bright and cheery in the night,
Keeping people constantly on the move
Today,  It’s where you meet stranger,
Former players officials friends in cricket.
Today it’s the Dubai International Airport
Cricket’s new corridor of uncertainty

विमानतळावर ताटकळत अनेक तास घालवण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर तुम्हाला या शब्दाचा अर्थ समजेल. जर सुदैवाने ही वेळ आली नसेल तर बाहेरच्या जगात जरा पहा त्या जगात क्रिकेट आणि प्रवास हे दोघे इच्छा नसताना एकमेकांचे घट्ट सोबती झालेत. आजच्या युगातले क्रिकेटर हे विश्वप्रवासी असतात. सामान्य क्रिकेटपटूलाही हा प्रवास चुकलेला नाही. यशाच्या झगमगटात चमकणा-या क्रिकेटपटूंच्या आयुष्याची नाळ या कंटाळवाण्या वास्तवाशीही घट्ट विणलेली आहे.


टीप - हा मुळे लेख इथे  वाचू शकता.

Tuesday, October 8, 2013

सावलीतला सूर्य तो...


राहुल द्रविडनं T-20 खेळणं म्हणजे साने गुरुजींनी सावरकरांसारखे जहाल भाषण देण्यासारखे आहे. सहा वर्षांपूर्वी जेंव्हा आयपीएलला सुरुवात झाली त्यावेळी माझा एक मित्र मला कुत्सितपणे हे हिणवत होता. अर्थात त्याच्या या टवाळखोर विधानाला आधारही तितकाच होता. पंचपक्वान्नावर वाढलेल्या व्यक्तीला रस्त्यावरचे फास्ट फुड मानवणारच नाही. आणखी वेगळ्या शब्दात सांगयचे म्हंटलं तर मोहम्मद रफी सारखा स्वर्गीय आवाजाचा गायक जर मिल्का प्रमाणे लैला ते ले लेगी म्हणू लागला तर काय होईल तशीच सा-यांची अवस्था द्रविडच्या T-20 खेळण्याबाबत झाली होती.

आता राहुल द्रविड टेस्ट आणि वन-डे प्रमाणेच टी-20 मधूनही निवृत्त झालाय. तो ज्या राजस्थान रॉयल्सच्या टीमचा कॅप्टन म्हणून चॅम्पियन्स लीग खेळला त्या टीममध्ये एक शेन वॉटसन सोडला तर कोणीही आंतरराष्ट्रीय स्टार नव्हता. तरी त्या टिमनं फायनलपर्यंत अपराजित राहण्याची किमया साधली. 18 वर्षाचा संजू सॅमसन ते 42 वर्षांपर्यंतच्या प्रवीण तांबेपर्यंत राजस्थानच्या प्रत्येक खेळाडूला रॉयल फॉर्म सापडला याचे कारण होते राहुल द्रविडचे नेतृत्व.

अर्थात टीमसाठी सर्वस्व ओतण्याची आणि सहका-यांच्या सर्वोत्तम खेळाचा अविभाज्य घटक बनण्याची त्याला सवय अगदी पहिल्या टेस्टपासून आहे. लॉर्डसमध्ये स्विंग खेळपट्टीवर सातव्या क्रमांवर फलंदाजीला येऊन पदार्पण करताना त्यानं काढलेल्या 95 रन्समध्ये कॉपीबूकमधले अनेक फटके सापडतील. पण सर्वांना लक्षात आहे त्या टेस्टमधलं सौरव गांगुलीचं नवाबी पदार्पण आणि त्यांची तडफदार सेंच्युरी. सचिन तेंडुलकरच्या स्पेशल आणि लक्ष्मणच्या मॅजिकल इनिंगमध्ये द्रविडचा सहभाग हा नेहमीच मोलाचा आणि महत्त्वाचा राहिलाय.

1999 च्या वर्ल्डकपमध्ये तो भारताचा टॉप स्कोअरर होता हे किती जणांच्या लक्षात आहे ? त्याच वर्ल्डकपमध्ये गांगुलीनं श्रीलंकेविरुद्ध काढलेले 183 आणि पुढे काही महिन्यांनी हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सचिनच्या 186 रन्सच्या  इनिंगची आठवणी आजही रंगवल्या जातात. मात्र या दोन्ही इनिंग द्रविडच्या 145 आणि 153 रन्सशिवाय पुर्ण होऊ शकल्या असत्या का ? वन-डे क्रिकेटमध्ये 300 रन्सच्या दोन पार्टनरशिपमध्ये सहभागी असणारा द्रविड हा एकमेव खेळाडू आहे.

परदेशी खेळपट्यांवर विशेषत; स्वींग गोलंदाजीवर भारतीय बॅटसमनची उडणारी भंबेरी ही नेहमीचीच बोंब. द्रविडनं 2002 मध्ये इंग्लंड दौ-यात तीन सेंच्युरी झळकावत परदेशी वातावरणात कसं खेळायचं याच उदाहरण घालून दिलं. पुढच्या आठ वर्षात भारतानं परदेशात मिळवलेल्या अनेक संस्मरणीय विजयाचा पाया या तीन सेंच्युरीनं रचला गेला. 
  
2004 मध्ये भारताचा पाकिस्तान दौ-याचा हिरो ठरला तो मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग. मात्र त्याच सीरिजमधल्या शेवटच्या टेस्टमध्ये दोन्ही टीममधल्या अन्य कोणत्याही खेळाडूला सेंच्युरी झळकवण्यात अपयश आले असताना राहुल द्रविडनं 270 रन्स काढले होते. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात याच मालिका विजयात याच 270 धावांचे किती मोल होते हे सांगण्याची कोणती वेगळी गरज आहे ?
राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला सर्वोत्तम खेळ ही तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत ?

अजिंक्य राहणे,संजू सॅमसन, दिनेश याज्ञिक, स्टुअर्ट बिन्नी, अशोक मनेरिया, प्रवीण तांबे, राहुल शुक्ला, कूपर  या सा-या नवख्या खेळाडूंना घेऊन जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा पाडाव करणारा कॅप्टन हा केवळ राहुल द्रविडच असू शकतो. संघासाठी आणि सहका-यांसाठी निस्वार्थीपणे सारं काही देण्याच्या त्याच्या या वृत्तीमुळेच फिक्सिंगच्या राखेतून राजस्थान रॉयल्सचा संघ फिनिक्सभरारी मारु शकला.

सामान्य खेळाडूंच्या असमान्य खेळामुळेच राजस्थान रॉयल्सची टीम ही आयपीएलमधली अनेकांची आवडती टीम आहे. या टीमचा पहिला कॅप्टन शेन वॉर्नही हरहुन्नरी होता. पण शो मनशिप त्याच्या रक्तातच होती. टी-२० ला लागणारा सारा मसाला त्याच्यामध्ये भरलेला होता.राहुल द्रविडनं त्याच्या उलटपद्धतीनं आणि तितक्याच परिणामकतेनं रॉयल्सची कॅप्टनसी सांभाळली.

राहुल द्रविडप्रमाणेच सचिन तेंडुलकरही आता टी-२० मधून निवृत्त झालाय. आयपीएल आणि चॅम्पियन लीग या दोन्ही स्पर्धा जिंकणा-या टीमचं सदस्य होण्याचं भाग्य सचिनला लाभलं. इथेही सचिननं आपल्या जुन्या सहका-यावर मातच केली. पण सचिनच्या मुंबई इंडियन्सकडे स्टार-सुपरस्टार खेळाडूंचा भरणा होता. ग्लेन मॅक्सवेलसारखा मिलीयन डॉलर बेबी खेळाडू ते जेवताना लोणचे वापरावे तितकाच वापरु शकतात. त्या उलट राजस्थान रॉयल्सचं आहे. मर्यादीत रिसोर्सेमधून सर्वोत्तम आऊटपूट काढण्याची पद्धत या टीममध्ये आहे. जे आऊटपूट सुरुवातीच्या काळात शेन वॉर्ननं काढलं. त्याचा नैसर्गिक वारसा द्रविडनं पुढं वाढवला. आता सचिनच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी आणखी एखाद्या महागड्या,  आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सलामीवीराला घेऊन सचिनची मुंबई इंडियन्समधली जागा सहजगत्या भरुन काढू शकतील. 

पण राहुल द्रविडचा वारसदार राजस्थान रॉयल्सला मिळणे अशक्य आहे. कायम सावलीत राहिलेल्या या सुर्याचं महत्त्व हे त्याच्या निवृत्तीनंतर प्रखरतेनं जाणवणार आहे ते असं.  

टीप - भारतीय क्रिकेटचा सच्चा सेवक हा माझा राहुल द्रविडवरचा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दिपस्तंभ हा माझा राहुल द्रविडवरचा जुना ब्लॉग वाचण्याठी इथे क्लिक करा 

Sunday, September 1, 2013

अर्थव्यवस्थेचे 'ॲशेस'कार


''  हजारो जवाबोंसे अच्छी है खामोशी मेरी,
     न जाने कितने सवालों की आबरु रखे ''

    भारताच्या इतिहासातले आजवरचे सर्वात मौनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत केलेल्या भाषणामधला हा एक शेर. मनमोहन सिंग यांच्या आजवरच्या कारकिर्दीचे वर्णन करत असताना त्यांनीच सांगितलेल्या या शेरची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे.

    नऊ वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद स्विकारलं त्यावेळी  शायनिंग इंडिया या एनडीएच्या दाव्याचा  मतदारांनी निकाल लावला होता. मात्र देशाचा विकास दर हा समाधानकारक स्थितीमध्ये होता. 2020 मध्ये भारत ही महासत्ता बनेल. आर्थिक क्षेत्रातही भारताला यशाचं नवं एव्हरेस्ट गाठता येईल असा विश्वास देशी आणि विदेशी भांडवलदारांना होता. त्यातचं राजकीय पार्श्वभूमी नसलेले, स्वच्छ, आर्थिक सुधाराणांचे शिल्पकार म्हणून ज्यांचे उठता बसता नाव घेतले जायचे असे अर्थशास्त्राचे डॉक्टर, ऑक्सफर्ड रिटर्न,  रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर, माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानं संपूर्ण जगाची अपेक्षा भारताकडून वाढली होती. 1991 मध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली त्यावेळी  डॉ. मनमोहन सिंग ( अर्थमंत्री), पी चिदम्बरम ( वाणिज्य मंत्री), सी रंगराजन ( आरबीय गव्हर्नर), माँटेक सिंग आहलुवालिया ( अर्थ सचिव) ही टीम देशाचा आर्थिक गाडा चालवित होती. चार दशकांच्या समाजवादी वळणाच्या अर्थव्यवस्थेला खुलं  करण्याचं काम या टीमनं केलं, परमीटराज संपुष्टात आले. गुंतवणूक दारांमध्ये विश्वास निर्माण झाला. त्यामुळे या टीमचं वर्णन 'ड्रीम टीम' म्हणून केलं गेलं.

        आज 22 वर्षानंतरही देशाच्या आर्थिक आघाडीचं नेतृत्व याच टीमकडं आहे. तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेचा बॅँड वाजलाय. देशाच्या आर्थिक रस्त्यावर इतके खड्डे पडलेत की त्यापुढे कल्याण-डोंबिवलीतले रस्तेही आता गुळगुळीत वाटू लागलेत.1991 मध्ये या ड्रीम टीमचे सर्वोच्च नेते होते पी,व्ही नरसिंहराव. नरसिंहरावांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला. राजकीय पातळीवर संरक्षण दिलं.नरसिंह राव ठामपणे पाठिशी होते म्हणून त्यांचे हे आर्थिक सैन्य सुधारणांच्या लढाईत उतरु शकले. आता या टीमचे नेतृत्व करतायत सोनिया गांधी. ज्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा आपल्या व्होट बॅँकेची काळजी आहे. नरेगा, कर्जमाफी, डिझेल सबसिडी, धान्याच्या आधारभूत किंमतीमध्ये मोठी वाढ, बड्या कंपन्यांना कर्जवाटप करण्यासाठी गुंडाळण्यात आलेले नियम आणि आता अन्न सुरक्षेचे मोहजाल. जगाच्या पाठीवर इतक्या सा-या खिरापती वाटणारा व्हेनेझुएला नंतर भारत हा एकमेव देश असावा

           पंतप्रधानांनी संसदेमध्ये या विषयावर जे भाषण केलं त्याच वर्णन, 'ते बोलले, त्यांनी खापर दुस-यांनर फोडले आणि आता ते पुन्हा ( नेहमीसारखे) गप्प बसले' असंच करावे लागेल. जगातल्या विकसीत देशांपेक्षा भारतामध्ये महगाईचा दर जास्त आहे असं पतप्रधान सांगतात. पण ही महागाई तुम्ही किंवा मी नाही तर या सरकारनेच वाढवली आहे. उत्पन्न अधिक झाले की   किंमती कमी होतात हा साधा सिद्धांत समजण्यासाठी अर्थशास्त्राचे डॉक्टर असण्याची अधवा I..M.F. मध्ये नोकरी केलेली असण्याची गरज नाही. मागच्या पाच वर्षात अन्न धान्याच्या उत्पन्नात 30 टक्के वाढ झालीय असं सरकारी अहवाल सांगतो. पण अन्न धान्य खरेदीच्या आधारभूत किंमतीमध्ये सरकारनं अवाजवी वाढ केलीय. ही आधारभूत किंमत ठरवण्यासाठी कोणत्याही निकषाचं पालनं केलेलं नाही. 'कॅग' ने मे 2013 मध्ये  मांडलेल्या आपल्या अहवालात या विसंगतीकडे बोट दाखवलंय. गव्हाच्या आधारभूत किंमतीमध्ये 29 ते 66 टक्के आणि तांदळाच्या आधारभूत किंमतीमध्ये 14 ते 50 टक्के वाढ 2006 च्या नंतर करण्यात आलीय असा हा अहवाल ,सांगतो. या वाढत्या दरामुळे देशाच्या अर्थव्यस्थेवर ताण येणारच. तसेच बहुतेक धान्य हे सरकारी गोदामात जाणार ( अर्थात हे अन्न धान्य साठवण्यास योग्य दर्जाचे गोदाम नाहीत याची कबुलीही याच सरकारनं दिलीय) परिणामी खुल्या बाजारपेठीतील अन्नधान्याचा साठा कमी होऊन त्याच्या किंमती वाढणार. याची थेट झळ ग्राहकांच्या खिशाला बसतीय. महागाईतला 50 टक्के वाटा हा अन्न धान्यांच्या वाढत्या किंमतींचा आहे. सर्व कथा थोडक्यात सांगयची तर देशातली महागाई हे मनमोन सरकारचे अपत्य आहे.

             वित्तीय तूट नियंत्रणात ठेवणं हे सरकार पुढंच मुख्य आव्हान आहे, असंही पंतप्रधानांनी सांगितलंय. या आर्थिक वर्षातली वित्तीय तूट 4.8 टक्के इतकी मर्यादीत ठेवण्यासाठी य़ोग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. आता योग्य ती पावलं म्हणजे काय ? रुपयाच्या घरणीमुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. ( आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये डिझेल हे डॉलरमध्ये खरेदी करावे लागते. डॉलर आणि रुपयांतील दराचे प्रमाण हल्ली भलतेच अस्ताव्यस्त झाल्यानं  तेल कंपन्यांना अधिक पैसा मोजावा लागतोय.) हा तोटा कमी करण्यासाठी डिझेलच्या दरात वाढ हाच पर्याय आहे. डिझेलचे दर सध्याच्या  प्रती लिटर 10 रुपयांपेक्षा अधिक वाढवावे लागतील असं अर्थतज्ज्ञ सांगतात.आता निवडणुकीच्या वर्षात इतकी काही दरवाढ केंद्र सरकार करणार नाही. मग हा वाढता खर्च नियंत्रणात आणण्यासाठी अन्य नियोजीत कामांना कात्री लावावी लागणार... आता ही नियोजीत कामं रेंगाळल्यास या आर्थिक वर्षात विकास दराचे जे 5.5 % लक्ष्य निश्चित करण्यात आलंय ते गाठणे हे अशक्य होईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

     आपले अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी या परिस्थितीचे खापर माजी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींच्या निर्णयावर फोडण्याचा प्रयत्न केला. ( आता हे म्हणजे आशिष नेहारनं खराब बॉलिंगसाठी मुनाफ पटेलला दोषी धरावं असं आहे. )  प्रणबदा अर्थमंत्री असताना त्यांची सारी वर्तणूक ही लायसन्स आणि परमीट राजच्या काळतले आपण अर्थमंत्री आहोत. अशीच होती. ( 30 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळातही प्रणबदा अर्थमंत्री होते, बहुधा ते त्याच विश्वातून  बाहेर  आले नव्हते) त्यांनी व्होडाफोन कंपनीवर पूर्वलक्षी दरानं 13 हजार कोटी रुपये कर चुकवल्याचा दावा लावला. पूर्वलक्षी दराने कर आकारणी हा विकसीत देशाशी नाही तर आदीम काळातील देशांच्या निर्णयाशी सुसंगत असा निर्णय. मागील काही वर्षात देशातली विदेशी गुंतवणूक घटली. ही गुंतवणूक घटल्यानं डॉलरची गंगाजळी कमी झाली. ही गंगाजळी वाढवायची असेल तर विदेशी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे. त्य़ासाठी करसवलती देणं आवश्यक असताना पूर्वलक्षी कराचा वरवंटा मनमोहन सरकार फिरवत होतं. व्होडाफोन साऱख्या दूरसंचार क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीला अस्थीर करुन अन्य कोणत्या दूरसंचार कंपनीला सरकार खुलं आकाश देत होतं हे न समजण्या इतकी देशातली जनता दुधखूळी नक्कीच नाही.अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकारला आपला हा जीझिया कर मागे घ्यावा लागला. पुढे प्रणबदांचा मुक्काम अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात हलला.  मात्र त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमधली भारताची पत गेली ती गेलीच.  हे सारे उपदव्याप अर्थतज्ज्ञ, उदारणीकरणाचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरु असतानाही पंतप्रधान हे एखाद्या निर्विकाराप्रमाणे शांतच होते. बहुधा 'अपनी तो ये आदत है की हम कुछ नही कहते' हे  मनमोहन सिंग यांच सर्वात आवडत गाणं असावं.

              आता हे झाले अर्थखात्याबद्दल. कोळसा खात्याचे काय  ?  भारत जगातला तिस-या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे. आपल्या देशातला कोळसा फारसा शुद्ध नाही.  त्यामुळे कोळसा हा मोठ्या प्रमाणात परदेशातून निर्यात करावा लागतो. कोळसा निर्यातीसाठी लागणारा  पैसा हे देखील अर्थव्यवस्थेचं दुखणं असल्याचं 'ड़ॉक्टर' मनमोहन सिंग यांनी सांगितलं. कोळसा उत्पन्न वाढावं यासाठी कोळसा खाणीवरचे सरकारी नियंत्रण उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने 1993 साली घेतला. 1993 ते 2009 या काळात 17397.22 दशलक्ष टन निर्मिती क्षमता असलेल्या कोळसा खाणीचे नियंत्रण सरकारने हटवले. यामधले 1460.32 दशलक्ष टन निर्मितीच्या खाणीचे कंत्राच 2006 ते 2009 या तीन वर्षात वाटप करण्यात आलं. खासगी क्षेत्रात नवे नवे खाण माफिया निर्माण होत असताना सरकारला कोळसा खाणीतून सरकारला मिळणारा फायदा शून्य होते. या सर्व काळात कोळसा मंत्री होते स्वत:  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग. विरोधकांवर आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर सारं काही खापर फोडण्यापूर्वी पंतप्रधानांनी याचं उत्तर द्याव लागेल. ( त्यातचं सीरियावर लष्करी कारवाई करण्याची घोषणा करत बराक ओबामांनी पंतप्रधानांना आणखी एक कारण दिलं आहे.

   मनमोहन सिंग हे अर्थववस्थेला आकार देऊ शकले याचं कारण होत नरसिंह राव सारखं नेतृत्व त्यांच्या पाठिमागे उभं होतं. पण त्यांच्या धडाडीचं, धाडसाचं आणि खंबीरतेचं सारं श्रेय मनमोहन सिंग यांना मिळाले. आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार हे मनमोन सिंग नसून पी.व्ही. नरसिंह राव हेच आहेत.भारतीय अर्थव्यवस्थेचे 'अॅशेस'कार हीच पदवी डॉ. मनोमोहन सिंग यांना ख-या अर्थाने शोभून दिसेल. भारतीय अर्थव्यवस्थेची ही अॅशेस अवस्था का आली याचं  ( प्रामाणिक) उत्तर पंतप्रधांनी द्यावं हीच जनतेची मागणी आहे. त्यामुळे आपल्या भाषणात शेरोशायरीचा अनेकदा वापर करणा-या पंतप्रधानांना लोकसभेत सुषमा स्वराज यांनी म्हंटलेल्या शेरची आठवण करुन देण्याची गरज आहे

तू इधर-उधर की न बात कर,ये बता कि कारवा क्यूं लुटा,
मुझे रहजनों से गिला नही तेरी रहबरी का सवाल है 

Monday, May 27, 2013

अन्न सुरक्षेचे मोहजाल


'' देशातल्या प्रत्येक भूकेल्या व्यक्तीला दोन घास देणारी योजना म्हणजे अन्न सुरक्षा विधेयक. कुपोषण, उपासमारी यासारख्या पाचवीला पुजलेल्या समस्यांवरचे  रामबाण औषध म्हणजे अन्न सुरक्षा विधेयक.'' निवडणुका जवळ आल्या की आपल्या नाकर्त्या कारभारावरुन जनतेचे लक्ष वळवण्यासाठी अशा प्रकारच्या भन्नाट आयडिया समोर घेऊन येणे आणि पुढच्या पाच वर्षांची तजवीज करणे ही काँग्रेसची जूनी सवय आहे. ( याच पक्षाने 70 च्या दशकात 'गरिबी हटाव'  चा नारा देत सत्ता मिळवली होती. ) मागच्या 35 वर्षांपैकी जवळपास 25 वर्ष याच पक्षाची सत्ता आहे. पण आजवर  गरिबी हटण्याची गोष्ट सोडा पण ती कमीहूी झालेली नाही. त्यामुळे देशातल्या गोरगरिबांबद्दल काँग्रेस पक्षाला वाटणारी अतीव काळजी, कळवळा आणि तळमळीचा हा उद्योग सामान्य मतदार आणि भाकड स्वप्नाळू  वर्गाला गहिवरुन टाकणारा असला तरी तो अजिबात नवा नाही.

     अन्न सुरक्षा ही तीन गोष्टींमधून येते. 1)  नोकरी आणि उद्योग अशा दोन्ही माध्यमांतून रोजगार निर्मितीला चालना देणे 2) अन्न धान्यांची उत्पादकता वाढावी यासाठी प्रयत्न करणे 3) देशातल्या दुष्काळी तसेच कुपोषित भागांतला ज्या घटकाला पोटभर आहार मिळणे शक्य नाही अशांना तातडीने अन्नधान्य मिळेल अशी व्यवस्था करणे. युपीए सरकारच्या नऊ वर्षांच्या कालखंडात यापैकी कोणत्या गोष्टीवर सरकारने गांभिर्याने काम केले आहे ? नऊ वर्षे काहीही काम करायचे नाही आणि आता अचानक निवडणुकांच्या तोंडावर या विधेयकासाठी अटापिटा करायचा हा  सवंग लोकप्रियता आणि राजकीय लाभ मिळवण्याठी चाललेला खटाटोप आहे.

       देशातली जवळपास 75 कोटी लोकसंख्या या विधेयकाच्या अंतर्गत येते. अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिक लाभार्थींचा या योजनेत समावेश होतो. ( केवळ ) कागदावर आकर्षक वाटणा-या या योजनेत अनेक त्रूटी आहेत. दारिद्र्य रेषेच्या खालील आणि वरील ( सामान्य आणि प्राधान्य गट ) याची विभागणी कधी करायची याबाबत अजून सहमती झालेली नाही. याबाबत नेमण्यात आलेल्या तेंडुलकर, सक्सेना, सेनगुप्ता या प्रत्येक समितीच्या अहवालात तफावत आहे. त्यातच दरडोई 32 रुपये कमावणारा व्यक्ती गरीब नाही अशी व्याख्या योजना आयोगतल्या सरकारी बाबूंनी केलेली सगळ्यांना आठवतच असेल. त्यामुळे सामान्य गट आणि प्राधान्य गट याचे निकष हे सरकारी लहर आणि राजकीय लाभ याच्याच अधारे ठरणार हे उघड आहे.
   
        गरीब लोकांना स्वस्त दराने धान्य मिळावं म्हणून रेशनिंगच्या दुकांनाची निर्मिती केली गेली. मात्र अनेक सुखवस्तू कुटूंबही रेशन कार्डचे लाभार्थी आहेत. आपल्या खासगी दुचाकी किंवा चार चाकी मधून येऊन  E.B.C.. चा फॉर्म भरणारे विद्यार्थी प्रत्येक महाविद्यालयात आढळतात. एवढं कशाला याच युपीए सरकारनं सुरु केलेल्या राष्ट्रीय रोजगार हमी योजना ( नरेगा) मध्ये किती बोगस नावं आहेत, याच्या सुरस कथा आज गावोगावी ऐकायला मिळतात. या अनुभवातून राजकीय पक्ष शहाणे झाले तर देशापुढचे कितीतरी प्रश्न कमी होतील.हे प्रश्न संपले तर त्यांची दुकानदारी कशी चालणार ? त्यामुळे या योजनेतही सामान्य आणि प्राधान्य गटाची विभागणीचा घोळ सोडवण्याचे काम सरकार करणार नाही. प्राधान्य गटाला अधिक लाभ असल्यानं त्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न सुस्थितीमधल्या लोकांचाही राहणार आहे.

             भारतासारख्या खंडप्राय देशातल्या 120 कोटी लोकसंख्येच्या भूकेचा प्रश्न मिटवण्यासाठी यापूर्वीही ' आयआरडीपी, स्वर्णजयंती,  नरेगा, अंत्योदय, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी यासारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत. ढिसाळ आणि भ्रष्ट वितरण व्यवस्थेमुळे या सा-या योजना आपले उद्दिष्ट गाठू शकल्या नाहीत. 'विकासकामातील केवळ  10 पैसेच लाभार्थींपर्यंत पोहचतात' हे राजीव गांधी यांनी 80 च्या दशकात केलेले विधानही आजही लागू आहे.( याच राजीव गांधी यांच्या नावे युपीए सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत !!! )  हे सारे  अनुभव ताजा असताना वितरण व्यवस्था सक्षम करण्याच्या आधीच ही प्रचंड खर्चाची अवाढाव्य योजना जनतेच्या माथी मारण्याची घाई सरकार केवळ आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच करत आहे.
 
      अन्न सुरक्षा विधेयक हे एकमेव उत्तर असून त्याचे नियंत्रण केंद्र सरकारकडेच राहील हा आणखी खटकणारा मुद्दा. केरळ, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातल्या अन्नधान्यांचा प्रश्न एकसारखा असू शकत नाही.  राज्य सरकारांना विश्वासात घेऊन त्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याऐवजी सर्व राज्यांना एकाच मोजपट्टीने मोजण्याचा अट्टहास कशासाठी केला जातोय ?काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि सौराष्ट्रापासून अरुणाचल प्रदेशमधल्या प्रश्न सोडवण्यासाठी   स्थानिक परिस्थिती ऐवजी  सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीला इतके महत्त्व कशाला दिले जाता आहे ? सोनिया गांधी आणि त्यांच्या सल्लागार समितीचा या विधेयकाबाबत खरचं विधायक दृष्टीकोण असता त्यांना गरिबांबाबत उत्कटतेनं वाटत असेल तर त्यांनी याबाबत सर्व राज्य सरकारांशी चर्चा करायला हवी. या विधेयकाच्या अंमलबजवाणीबाबत त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. जर गुजरातला स्वस्त धान्याऐवजी  पैसे आणि छत्तीसगडला केवळ तांदूळ वितरीत करण्याची इच्छा असेल तर तो अधिकार राज्य सरकारला मिळायला हवा. पण तसे केले जात नाहीयं. या विधेयकामध्ये राज्य सरकारची भूमिका अगदी नगण्य आहे. केवळ काँग्रेस पक्षालाच राजकीय लाभ मिळवा याच उद्देशाने या विधेयकाची रचना आणि अंमलबजावणी करण्याचे राष्ट्रीय सल्लागार समितीने ठरवले आहे.

ज्या कृषी क्रांतीच्या जोरावर ही योजना राबवण्याता घाट घातला जात आहे ती  कृषी क्रांती  पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडील काही राज्यं यांच्यापुरतीच सीमित आहे. याच भागांतली धान्यांची कोठारे भरलेली आहेत.अन्य राज्यातल्या शेतक-यांना खतं, पाणी, आणि वीज यासाठी सरकारी अनुदानावर अवलंबून राहावं लागतं. झोनबंदी आणि खरेदीतल्या एकाधिकारशाहीमुळे रास्त भाव मिळवण्यासाठी त्यांना अनेकदा रस्त्यावर उतरावं लागतं. आता या विधेयकानुसार पंजाब, हरियाणा किंवा पश्चिम उत्तर प्रदेशातलं धान्य हे ईशान्य भारत किंवा ओडिशांमधल्या व्यक्तींपर्यंत पोहचवण्यात येईल. अन्नधान्याच्या वाहतुकीतून होणारी नासाडी पाहता सल्लागार समितीनं घेतलेला हा निर्णय तुघलकाचीच आठवण करुन देणारा आहे. या देशातला प्रत्येक भाग हा अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण हवा. गरज पडली तर  पुणे जिल्ह्यातले अन्नधान्य हे विदर्भात नेणे अधिक योग्य आहे. मात्र त्याऐवजी हिस्सार किंवा भटिंडामधले धान्य ट्रकनं दिब्रूगडला पोहचवण्याचा येडचाप उद्योग या विधेयकानुसार होणार आहे.

      गरिबांना सर्व काही अनुदानित  स्वरुपात मिळायला हवं ही जी आपली समजूत राजकीय पक्षांनी करुन ठेवली आहे ती मोडायला हवी. गरीब  शेतक-यांना सर्व प्रकारचे अनुदान द्या त्यानंतर त्यांनी पिकवलेले धान्य महागड्या दराने खरेदी करा आणि नंतर तेच धान्य गरीब जनतेला फुकट वाटा... हा सारा प्रकार कितपत व्यवहार्य आहे ? अशाच प्रकारच्या  मोफत  धान्य आणि अनुदान वाटपाच्या अतिरेकामुळे सोव्हिएट रशियाची जनता आळशी बनली. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. अर्थव्यवस्थेतील घसरणीचे रुपांतर राजकीय आणि सामाजिक असंतोषामध्ये झाले आणि त्या देशाची शकले उडाली. आपल्या देशाचा सोव्हिएट रशिया होऊ द्यायचा नसेल तर अन्न सुरक्षेच्या मोहजालातून बाहेर पडून  प्रत्येकानं  त्याला विरोध करायला हवा. 

Wednesday, March 27, 2013

झाला चमत्कार तरी...



कधीही कल्पना केली नाही अशा गोष्टी घडल्या की जगात चमत्कार होतात ही समजूत खरी आहे असेच मानावे लागते. आता बघा ना नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज संपलीय. भारत चक्क 4-0 ने विजयी झालाय. 1982 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 0-3 अशा फरकानं पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच इतका मोठा पराभव आहे. 1994 मध्ये श्रीलंकेला 3-0 अशी धूळ चारल्यानंतर भारताने पहिल्यांदाच  मोठ्या सीरिजमध्ये निर्भेळ यश मिळवलंय. या आकडेवारीपेक्षा चमत्कारीक गोष्टी पुढे आहेत. पहिला चमत्कार (सर ) रवींद्र जडेजा मायकल क्लार्कला 6 पैकी 5 वेळेस आऊट करतो. दुसरा चमत्कार मुरली विजय ऑस्ट्रेलियन बॉलर्सना सलग दोन टेस्टमध्ये एक संपूर्ण दिवस आऊट होत नाही. तिसरा चमत्कार पहिल्याच टेस्टमध्ये फास्टेट सेंच्युरीचा विक्रम शिखर धवनच्या नावावर होतो. चौथा चमत्कार  चार पैकी तीन टेस्ट भारत पाचपेक्षा कमी दिवसांत जिंकतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सलग चार टेस्ट पराभूत झाल्यानंतरआणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध मायदेशीही आपण सीरिज गमावली. तरीही या सीरिजमध्ये दुबळ्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आपले पारडे जड होते. पण प्रत्येक दुबळ्या टीमशी त्यांच्या लेव्हलवर जाऊन खेळण्याचा आपला लौकीक लक्षात घेता ही सीरिज भारताने 4-0 ने जिंकणे हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही.  भारतीय क्रिकेट विश्वात अशा प्रकारच्या आश्चर्यकारक घडामोडी घडत असल्यानंच  मी माझा आगोदर रेंगाळलेला सीरिजमधला तिसरा ब्लॉग आणखी  पुढं ढकलून क्रिकेटवर लिहण्याचा मोह आवरु शकलो नाही.

                                या सीरिजची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. चेन्नईत धोनी टॉस हरला. ऑस्ट्रेलियाचा 5 आऊट 153 असा स्कोअर असताना क्लार्क- हेन्रिक्समध्ये दिड शतकी भागिदारी झाली. क्लार्कने आपला फॉर्म कायम ठेवत शतक झळकावलं. पहिलीच टेस्ट खेळणा-या हेन्रिक्सचा उत्साह वाढेल ही नैतिक जबाबदारी भारतीय बॉलर्सनं नेटानं पूर्ण केली.त्यानंतर 380 चा पाठलाग करताना वीरु 'सेहवाग'सारखाच खेळला. मुरली विजयच्या बॅट आणि पॅडमध्ये त्या दिवशी इतका गॅप होता की त्यामधून राम कपूरसुद्धा चालत जाऊ शकला असता. दोन्ही ओपनर्स पॅव्हिलियनमध्ये परत. भारत 2 आऊट 12

                              त्यानंतर या सीरिजमध्ये रंग भरायला सुरुवात झाली. विकेटची नशा चढलेल्या जेम्स पॅटिन्सनच्या पहिल्या तीन ब़ॉल्सवर तीन चौकार खेचत सचिननं जुन्या आठवणी ताज्या केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि चेन्नईच्या मैदानात सचिनचा रेकॉर्ड नेहमीच बहरदार राहिलाय.  सचिननं आपल्या जुन्या आठवणी जाग्या करत चार्ज आपल्याकडं घेतला. सचिननं 81 रन्स काढले. शतकाकंडं डोळे लावून बसलेल्या कोट्यावधी चाहत्यांची पून्हा निराशा झाली. टीम इंडियाला त्याची सर्वाधिक गरज असताना तो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर टीम  अडचणीत सापडली.

     सचिन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या  धोनीची मागील काही टेस्टमधील कामगिरी यांची आम्हाला लाज वाटते या प्रकारातली होती. तो सहाव्या क्रमांकावर मैदानात आला. सचिनप्रमाणेच धोनीचेही चेन्नईशी चांगलंच नातं जमलंय. तो चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन आहेच. घरच्या मैदानावर चेन्नईची टीम पराभूत होणार नाही याची खबरदारी त्यानं नेहमीच घेतलीय. शिवाय चेन्नई सुपर किग्जची मालकी ज्यांच्याकडे आहे त्या इंडिया सिमेंट कंपनीचा तो ही सीरिज सुरु होण्याच्या आठवडाभर आधीच उपाध्यक्ष झालाय. ( इंडिया सिमेंट ही कंपनी बीसीसीआय अध्यक्ष आणि धोनीचे गॉडफादार एन. श्रीनिवासन यांच्या मालकीची आहे. त्यांच्याच आशिर्वादानं   परदेशात सलग 8 टेस्ट हरुनही धोनीची कॅप्टनसी शाबूत राहीली)

 सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेला धोनी मैदानावर आला त्यावेळी मॅचचं पारडं ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं होतं. पण क्रिकेटमधला आपला जुना 'धोनीपछाड' अवतार धारण करण्यासाठी त्यानं चेन्नई टेस्टचाच मुहूर्त निवडला. ऑस्ट्रेलियन बॉलिंगच्या सर्व मर्यादा त्यानं उघड्या पाडल्या. पॅटीन्सन, स्टार्क यांना यॉर्कर टाकण्यात अपयश येत असल्यानं त्यांचे बॉल्स फुलटॉस येत होते. अशा फुलटॉस बॉल्सनं त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले. क्लार्कनी सतत बॉलर्स बदलले. प्रत्येक बॉलर्सचं स्वागत त्यानं चौकारांच्या आतषबाजीनं केलं. क्लार्कनं नवा बॉल घेतला. नव्या बॉलनं टाकलेल्या पहिल्या सात ओव्हर्समध्ये भारतानं 54 रन्स काढले. कोहली आऊट झाला. भारत अजूनही 56 रन्सने पिछाडीवर होता. पण धोनीच्या मनातला संयम आणि बॅटींगमधला आक्रमकपणा कमी झाला नाही. टी टाईमनंतर लगेच त्यानं शतक पूर्ण केलं. शतकानंतर त्याच्या बॅटीचे चटके ऑस्ट्रेलियन्सना असे काही बसले की त्यापूढे चेन्नईचा उन्हाळाही त्यांना शितल वाटला असेल. भुवनेश्वरकुमारसोबत 10 व्या विकेटसाठी त्यानं केलेली शतकी भागिदारी अखेर निर्णायक ठरली. धोनीनं 224 रन्स काढले. कोणत्याही भारतीय टेस्ट कॅप्टनचा हा सर्वोच्च स्कोअर आहे. सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकर आणि मन्सूर अली पतौडी ते राहुल द्रविड या महान बॅट्समन कॅप्टन्सना मागे टाकात धोनीनं हे शिखर गाठलं. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियन टीमला बॅकफूटवर ढकलणारी एक लाजवाब इनिंग सचिन चेन्नईमध्ये खेळला होता.सचिनच्या त्या अजरामर इनिंगची आठवण धोनीच्या या खेळीनं झाली. संपू्र्ण सीरिजचा कौल त्याच्या 224 रन्सने निश्चित झाला. त्यामुळे कब तक धोनी ? असा प्रश्न विचारणा-या मलाही फिर दिल दो धोनी को ! असे ट्विट आनंदाने करावे लागले.

   कॅप्टन भरात असेल तर संपूर्ण टीमच्या मनोधौर्यात सकारात्मक फरक पडतोच. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, (सर) रवींद्र जडेजा भुवनेश्वरकुमार आणि मोहाली टेस्टमध्ये शिखर धवन या टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं या सीरिजमध्ये कमाल केली.सचिन भरात नव्हता. सेहवागची बोंब कायम होती. गंभीरला तर घेतलेच नव्हते. सचिन, सेहवाग, गंभीर आणि निवृत्त झालेले द्रविड, लक्ष्मण यांच्याशिवायही भारत सीरिज 4-0 ने जिंकू शकतो हे या विजय, पुजारा,अश्विन, (सर) जडेजा,  धवन आणि भुवनेश्वरकुमारनं दाखवून दिलं. या सीरिजमध्ये सर्वात चमत्कारीक बदल कुणात झाला असेल तर तो मुरली विजयमध्ये. चेन्नईच्या या शोबाज बॅट्समननं या सीरिजची सुरुवात 10 आणि 6 अशी अगदी टीपिकल केली. पण नंतरच्या 5 इनिंगमध्ये त्याचा स्कोअर होता 167, 153, 26, 57 आणि 11. त्यानं 61.42 च्या सरासरीनं या सीरिजमध्ये सर्वात जास्त 430 रन्स केले. सीरिजमध्ये 2 सेंच्युरी झळकवणारा तो एकमेव बॅट्समन होता.  टीपिकल शोबाज , आळशी बॅट्समन असलेला विजय या सीरिजमध्ये संयमी झाला. हैदराबादमध्ये पुजारासोबत 370 आणि मोहालीत धवनबरोबर 289 अशा दोन मोठ्या पार्टनरशिपमधला तो सामाईक घटक होता. टी-20 च्या दूधावरच बहरलेल्या विजयनं या दोन्ही पार्टनरशिपमध्ये दुय्यम भूमिका शांतपणे बजावली. त्याहीपेक्षा महत्तवाचे म्हणजे दोन टेस्टमध्ये तो संपूर्ण दिवस आऊट झाला नाही. खराब सुरुवातीनंतर हकालपट्टीच्या टकमक टोकावरुन त्यानं केलेला हा खेळ नक्कीच अवघड असा आहे. त्याला एकदाही 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळाला नसेल पण त्यानं रचलेल्या भक्कम पायावरच ही 4-0 ची ऐतिहासिक इमारत टीम इंडियाला उभी करता आलीय.

      चेतेश्वर पुजारा नंबर 3 वर अगदी राहुल द्रविडनं लावून दिल्यासारखा चिकटलाय. इंग्लंड विरुद्धच्या पडझडीतही त्यानं किल्ला लढवला होता. हैदरबाद टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावत त्यानं आपल्या मोठ्या इनिंगचं सातत्य जपलं. कोटालाच्या नासक्या खेळपट्टीवर चौथ्या डावात  पाठलाग करताना काढलेले 82 रन्स त्याच्या क्लासचं दर्शन देतात.आता दक्षिण आफ्रिकेतल्या फास्ट पीचवर त्याची खरी कसोटी असेल. शिखर धवनला नशिबानं केवळ एकच संधी या सीरिजमध्ये दिली.त्या संधीचं त्यानं सोनं केलं. त्याच्या रावडी अवतारापढे ऑस्ट्रेलियन्स अगदीच बापूडे वाटत होते. त्याचे प्लेसमेंट अप्रतिम होते. आईच्या पोटातून शिकून आल्याप्रमाणे तो गॅप शोधत होता.त्याच्या बॅक फूट ड्राइव्हचा रिकी पॉन्टिंगलाही अभिमान वाटला असेल. कोणतीही रिस्क न घेता कांगारुंची कशी धुलाई करता येते हे हशीम अमलानं पर्थ टेस्टमध्ये 87 बॉल्समध्ये सेंच्युरी ठोकत दाखवून दिलं होतं. धवननं अमलाचाच कित्ता गिरवला. शिवाय आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकताना त्याला अमलापेक्षा 2 बॉल्स देखील कमी लागले.

   
  सीरिजमध्ये ख-या अर्थानं कुणी कमाल केली असेल तर (सर) रवींद्र जडेजानं.  त्यानं  मायकल क्लार्कला 6 पैकी 5 वेळा आऊट केलं. ( रावडी राठोडमधला डायलॉग क्लार्कच्या भाषेत सांगायचा झाला तर मै जब बॅटिंग करता हूं तब आऊट होता हूं. और जब रवींद्र जडेजा बॉलिंग करता है तब मै डेफिनेटली आऊट होता हूं, असं काहीसं क्लार्कला म्हणावे लागेल ). एकेकाळी प्रचंड डोक्यावर चढवलेल्या या बॉलिंग ऑलराऊंडरनं  सीरिजध्ये आपली उपयुक्तता दाखवलीय. त्यानं 4 टेस्टमध्ये 25 विकेट्स घेतल्या. त्यात त्याचा इकॉऩमी रेट, सरासरी आणि स्ट्राईक रेट हा अन्य कोणत्याही बॉलर्सपेक्षा चांगला आहे. त्यानं मोहालीमध्ये निर्णायक क्षणी फटकेबाजी करत डर के आगे (सर) रवींद्र जडेजा है ! हे दाखवून दिलं. या सीरिजमध्ये पहिल्यांदा टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये पिछाडीवर पडणार अशी परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली होती. त्यावेळी श्री श्री रवींद्र जडेजा पुन्हा एकदा बॅटच्या साह्यानं धावून आले. त्यांची टेस्टमधली ट्रिपल सेंच्युरी 257 रन्सने हुकली. पण आपल्या भक्तांना खूश करण्याचे आणि टीमला 10 रन्सची आघाडी मिळवून देण्याचं काम त्यांनी पार पडालं. त्यांच्या भक्तांचा वाढता संप्रदाय आता थेट रजनी फॅन्सशी स्पर्धा करणारा आहे.  हे मी  या ब्लॉगवर लावलेल्या त्यांच्या एका छायाचित्रावरुन स्पष्ट होतेच. याशिवाय मॅन ऑफ द सीरिज आर. अश्विननं घेतलेल्या 29  विकेट्स आणि भुवनेश्वर कुमारचे दोन स्पेल या सीरिजच्या आणखी काही गोड आठवणी आहेत.


        भारताच्या विजयापेक्षा कांगारुंचा कडेलोट हा या सीरिजमधला मोठा विषय आहे. हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, हसी हे बडे बॅट्समन आता पडद्याआड गेलेत. वॉर्न, मॅग्रा,यांनीही निवृत्ती स्वीकारलीय. मागच्या अडीच दशकातली.ऑस्ट्रेलियाची सर्वात कमजोर टीम यंदा भारत दौ-यावर आली होती. त्यातचं त्यांचे क्लार्क, वॉर्नर, वॉटसन, वॅड, पॅटीसन्सन हे महत्वाचे खेळाडू 100 टक्के फिट नव्हते. कांगारुंनाही सर्व सहानभूती देऊनही 0-4 अशा पद्धतीनं त्यांचा पराभव होणं हे नक्कीच क्षम्य नाहीय.

   ऑस्ट्रेलियाचं गोल्डन जनरेशन आता समाप्त झालंय. पॉन्टिंग, हसी किंवा क्लार्कसारखे बॅट्समन आता भविष्यात मिळणं अवघड आहे, असं इयान चॅपेल या खडूस ऑस्ट्रेलियननंही मान्य केलंय.मायकल क्लार्कच्या टीमनं या दौ-यात सुरुवात चांगली केली. चेन्नई टेस्टमध्ये जवळपास अडीच दिवस ते भारताच्या बरोबरीनं खेळत होते. पण नंतर धोनीच्या धूमधडाक्यापुढे ते साफ गडबडले. चेन्नईत चित झाल्यानंतर हैदरबाद, मोहाली आणि दिल्ली प्रत्येक टेस्टमध्ये त्यांची कामगिरी उतरंडीला लागली. गरिबांचा वीरेंद्र सेहवाग म्हणून ओळखला जाणारा डेव्हिड वॉर्नर हा संपूर्ण सीरिजमध्ये आपल्या दिल्ली डेयर डेव्हिल्सच्या साथीदारा प्रमाणे खेळला. इडि कोवनं मैदानावर वेळ भरपूर घालवला. पण त्याला रन्स काही करता आले नाहीत. फिल ह्युजेसला भारतीय स्पिनर्सनी वारंवार मामू बनवलं. मॅथ्यू वेड आणि ब्रॅड हॅडिन ह्या दोन्ही विकेटकिपर्सना इयान हिली किंवा अॅडम गिलख्रिस्टच्या 25 टक्के ही सर नाही. मात्र ऑस्ट्रेलियन बॅटिंगमध्ये सर्वात मोठा अपयशी मासा असेल तर तो शेन वॉटसन.

         
भारतीय दौ-याचा अनुभव असलेला आणि भारतीय पिचवर चांगला रेकॉर्ड असलेला शेन वॉटसन हा कांगारुंचा खर तर ट्रम्प कार्ड. मात्र हे कार्ड संपूर्ण फेल गेलं. त्यानं या संपूर्ण सीरिजमध्ये खेळले 239 बॉल्स. तर नॅथन लिओन या कांगारुंच्या 11 व्या क्रमांकाच्या बॅट्समननं 244 बॉल्स भारतीय बॅट्समनचा सामना केला. कोटालचं पिच बॅटिंगला लायक नाही, असं कारण कॅप्टन वॉटसन देत होता. मात्र त्याच खराब पिचवर पीटर सीडलनं 7 व्या क्रमांकावर येऊन दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. मिचेल स्टार्कनं मोहालीमध्ये 99 रन्स काढले. दुस-या  इनिंगमध्ये पुन्हा एकदा झुंजार 35 रन्स करत भारताला विजयापासून दूर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चौथ्या क्रमांकावर येणा-या वॉटसनला अशी एकही इनिंग या सीरिजमध्ये खेळता आली नाही. ऑस्ट्रे्लियन टीमचा उपकर्णधार असलेल्या वॉटसननं मागच्या दोन वर्षात 14 टेस्टमध्ये अवघ्या 24.11 च्या सरासरीनं 627 रन्स केलेत. त्यात तो हल्ली बॉलिंगही करत नाही.त्यामुळे केवळ टॉप ऑर्डर बॅट्समन म्हणून तो आता टीममध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. असं असूनही त्याला टीममध्ये सतत खेळवलं जातं. याच कारण कांगारुंच्या बॅटिंगमध्ये संपत आलेली धार हे आहे. मागच्या वर्षभरात ऑस्ट्रेलियानं खेळलेल्या 13 टेस्टमध्ये मायकल क्लार्कनं चार सेंच्युरी झळकावल्या आहेत. आता रिटायर झालेल्या हसीच्या नावावर आहेत 3 सेंच्युरी. पॉन्टिंग स्कूलच्या या दोन बॅट्समनशिवाय केवळ 4 सेंच्युरी सध्याच्या ऑस्ट्रेलियन बॅट्समनच्या नावावर आहेत. यात मॅथ्यू  वेड 2 तर डेव्हिड वॉर्नर आणि इडी कोवेन प्रत्येकी 1 सेंच्युरीचा समावेश आहे. पॉन्टिंग आणि हसी एकाच काळात रिटायर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा सर्व बोजा एकट्या मायकल क्लार्कवर पडलाय. क्लार्कच्या खांद्यांना हा बोजा सहन करणे अवघड आहे.

         मायकल क्लार्क ही एक विकेट मिळाली की निम्मे काम झाले हे भारतीय बॉलर्सना माहिती होते. त्यानं चेन्नईत सेंच्युरी झळकावली. हैदराबादमध्ये 93 रन्स काढले. पण नंतर दुखापतीमध्ये क्लार्क ढेपाळला. दिल्लीमध्ये तो खेळू शकला नाही आणि कांगारुंची फक्त 3 दिवसात शिकार झाली. त्याची कॅप्टनसीही साधारणच होती. चेन्नईत रंगात आलेल्या पॅटीन्सनला त्यानं 3 ओव्हर्सनंतर काढले. हैदराबाद टेस्टमध्ये नॅथन लिओनला न खेळण्याचा अजब निर्णय घेणा-या टीम मॅनेजमेंटचा तो निर्णायक सदस्य होता. त्याच टेस्टमध्ये त्यानं पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 9 आऊट झाल्यानंतर  डाव घोषीत करण्याचा अतीधाडसी असा निर्णय घेतला. शेन वॉटसनबरोबरचे त्याचे शीतयुद्ध चव्हाट्यावर आले. मोहाली टेस्टपूर्वी झालेली 4 खेळाडूंची हकालपट्टी तो टाळू शकला नाही.  बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग या एक से बढकर एक खेळाडूंचा वापसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी क्लार्कला अजून बरेच अवघड पेपर सोडवावे लागणार आहेत.

ऑस्ट्रेलियाची बॉलिंगही फुसका बार ठरली. गेल्या वर्षी याच काळात युएईमध्ये पाकिस्तान विरुद्ध रंगात असलेला मिचेल स्टार्क संपूर्ण सीरिजमध्ये निस्तेज ठरला. जेम्स पॅटीन्सननं चेन्नईत चांगली सुरुवात केली. पण फास्ट बॉलिंगला सर्वाधिक मदत करणा-या मोहाली टेस्टमध्ये शिस्तभंगाच्या नावाखाली त्याला बाहेर बसावे लागले. पीटर सीडिल आणि नॅथन लेऑननी अधनंमधनं चमक दाखवली, पण मॅच विनिंग कामगिरी त्यांना करता आली नाही. काही चमकदार स्पेल वगळता त्या दोघांचा भारतीय बॉलर्सनी सपशेल समाचार घेतला. डोहार्टी आणि मुंबई इंडियन्सचा  मिलियन डॉलर बेबी मॅक्सवेलची तर भारतीय बॅट्समन्सना अडचणीत आणण्याची कुवतचं नव्हती. तर  ज्याचे फक्त पायच वळतात अशा स्टीव्हन स्मिथ या आणखी एका लेगस्पिनरला ऑस्ट्रेलियानं खेळवलं, ( मोहालीमध्ये त्यानं टाकलेल्या एकमेव लेगब्रेकवर त्या सचिनची विकेट मिळाली , असते एकाकेकाचे नशीब ! )


      आता भारतीय टीमनं या न भूतो अशा मिळवलेल्या यशानं फार वाहवतं जायची गरज नाहीय. अजूनही बरेच प्रश्न तसेच कायम आहेत. पहिला प्रश्न सचिन तेंडुलकर. चेन्नईत त्यानं सुरुवात तर झोकात केली.  दुस-या इनिंगमध्ये तर तो इतक्या जोमात होता की 50 रन्सचा पाठलाग करताना सेंच्युरी झळकावण्याचा नवा रेकॉर्ड त्याच्या नावावर होईल असा एक विचार माझ्या मनात आला. पण नंतर पुन्हा त्याचं ये रे माझ्या मागल्या सुरु झालं. आता दोन वर्ष उलटली तरी त्याची टेस्टमध्ये सेंच्युरी झालेली नाही. वय वाढतं. रिफ्लेक्शन कमी होतायत. तरी मनोजकुमारचं गाणं तो  मै ना छोडूंगा , सालो साल खेलूंगा या नव्या शब्दासह तो गात खेळतोय. मुरली विजय, शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांची खरी कसोटी परदेशातल्या फास्ट पिचवर होईल. या सीरिजमध्ये  चांगल्या सुरुवातीचा मोठा फायदा उचलण्यात मोहाली आणि हैदराबादमध्ये भारताला अपयश आलं. आर. अश्विन अचानक निष्प्रभ वाटू लागतो. झहीरचा वारसदार अजूनही सापडलेला नाही.

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेला हा ऐतिहासीक विजय हा दोन अतिआक्रमक इनिंग ( चेन्नईत धोनी आणि मोहालीत शिखर धवन ) आणि स्पिन फ्रेंडली पिचची कमाल आहे असंच वाटू लागतं. दक्षिण आफ्रिकेत अमला, स्मीथ डि व्हिलीयर्स, ड्यूप्लेली हे बॅट्समन, स्टेन, मोर्केल आणि फिनलॅँडर हे आग ओकणारे बॉलर्स, जॅक कॅलीस हा सर्वकालीन महान ऑलराऊंडर आणि भारतीय प्लेयर्सच्या कुंडल्या पाठ असलेला कोच गॅरी कस्टर्न समोर पुन्हा एकदा 4-0 चा निकाल 0-4 मध्ये बदलण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्सनं यंदा चमत्कार झाला म्हणून तो नेहमी नेहमी होईल अशी भाबडी आशा ठेवू नये.            
                              

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...