Tuesday, March 24, 2009

तिस-या आघाडीचे मृगजळ


काही गोष्टींची कल्पना केल्यानंतर तूंम्हाला काय होतं..हे मला माहित नाही.पण माझी तर पार झोपचं उडते.कल्पना करा मुंबईच नव्हे तर सा-या देशातल्या एक महत्वाचं पर्यटनस्थळ असलेल्या गेट वे ऑफ इंडिया पाहायला तूंम्ही गेलाय..आणि गेट वे वर तूमचं स्वागत बहेनजी मायावतींचा पुतळा करतोय.तूंम्ही नवी दिल्लीत शहीद जवानांना सलाम करायला गेलात त्याच्या बाजूलाच तूंम्हाला मायामेमसाहबला सलाम करावा लागतोय.तूंम्ही ताजमहालचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी गेलात...त्याच्या भोवती वेगवेगळ्या व्यापारी संकुलाचा विळखा पडलाय. खरचं झोपेतून खडबडीत जागं व्हावं अशीच ही कल्पना आहे.पण हे प्रत्यक्षात घडू शकतं...बसपाच्या सर्वोच्च नेत्या...सोशल इंजिनिअरींगच्या शिल्पकार....आणि बरचं काही बहेनजी मायावती जर पंतप्रधान झाल्या तर ही गोष्ट खरंच प्रत्यक्षात पाहयला मिळू शकते.


निवडणुका जवळ आल्या की काही गोष्टी सुरु होतात... सर्वच पक्षात हूजरेगीरी वाढते. पाडापाडीचे राजकारण कसं करायचं याचे डावपेच सुरु होतात.जुने मित्र तूटतात.नवी सोयरीक जमते.अशाच प्रकारे प्रत्येक निवडणुकीपूर्वी तयार होणारी एक गोष्ट म्हणजे तिसरी आघाडी...कॉँग्रेस तसंच भाजपशी नाराज असणारे (किंवा भविष्यकाळात ज्यांना या पक्षाकडून मोठा लाभ घ्यायचा आहे ) अशा दहा पक्षांनी एकत्र येऊन तिस-या आघाडीची स्थापना केलीय. अशाच सर्व नाराज नेत्यांनी कर्नाटकातल्या तुमकूरमध्ये शक्तीप्रदर्शन केलं.

ही आघाडी निर्माण झाल्यापासून देशातल्या अनेक स्वयंभू राजकीय तज्ज्ञ कामाला लागलेत.ही आघाडी कसा समर्थ तिसरा पर्याय आहे. कॉँग्रेस आणि भाजपला कशा प्रकारे समर्थ पर्याय आहे असा राग अनेकजण आवळत आहेत...परंतू तिस-या आघाडीचा आजवरचा इतिहास पाहीला तरं ही आघाडी म्हणजे असंतूष्ट नेत्यांची सत्तेच्या दिशेनं धावणारी फूटकळ फौज आहे असंच म्हणावं लागेल.

या आघाडीतल्या सर्वात शक्तीमान नेत्या आहेत मायावती. माझा मायावती यांच्यावर कोणताही व्यक्तीगत राग नाही.परंतू केवळ जातीच्या जोरावर कोणाताही विधीनिषेध न बाळगता सर्व तत्वांना मूठमाती देत,मित्राला दगा देत शत्रूंना जवळ करणा-या टिपीकल राजकारणी व्यक्तींची जी जमात या देशात आहे त्या जमातीच्या मायावती ह्या राणी आहेत.माझा राग ह्या प्रवृत्तीवर आहे.कोणत्याही व्यक्तींवर नाही.

मायावती नाही तर जयललिता तयार आहेत... नाही तर मग पुन्हा झोपाळू नजरेच्या एच.डी.दैवेगोडा ह्या देशाची झोप उडवायला सज्ज आहेत.ज्यांना सर्व प्रकारचे अधिकार हवेत पण जबाबदारी नको.ज्यांना विदेशी गुंतवणूक फक्त बंगालमध्ये हवी आहे.गुजरात,महाराष्ट्रात कदापीही नाही.ज्यांना अणूकरार चीनबोरबर हवाय अमेरिकेबरोबर नाही असे डावे पक्ष ह्या आघाडीचे खरे निर्माते. खुल्या आर्थिक व्यवस्थेचे कडवे विरोधक डावे पक्ष तर त्याचे कडवे समर्थक चंद्रबाबू नायडू हे दोन प्रकारची टोकं एकाच आघाडीत आहेत.परस्पर विरोधी नेते आणि पक्ष असलेली ही आघाडी फार काळ टिकणार नाही हे वेगळं सांगायला नको.

तिस-या आघाडी बाबत मला सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे ह्या आघाडीतल्या नेत्यांना कोणतेही व्हीजन नाही.यामधल्या अनेक नेत्यांची धाव आपल्या राज्याच्या बाहेर नाही.शेजारी राष्ट्रांमधली अशांतता,बेरोदगारी आर्थिक मंदी ह्या सारखे प्रश्न देशासमोर असताना अशा प्रकारच्या स्थानिक किंवा फार तर प्रादेशिक पक्षाच्या नेत्याकडे देश सोपवणे ही लोकशाहीची सर्वात मोठी थट्टा मानावी लागेल.

परंतु आपल्यासाठी काही दिलासादायक गोष्टी आहेत.बंगालमध्ये कॉँग्रेस-तृणमुल महाज्योत मुळे डाव्या पक्षांना नक्कीच फटका बसणार.केरळमध्ये तर डाव्यात उघड दुफळी माजलीय.त्यामुळे पंधराव्या लोकसभेत डावे पक्ष 30 जागापर्यंत पोचतील असा माझा अंदाज आहे.आता मायावतींची हवा आहे हे जरी मान्य केलं तरी त्या जिंकून जिंकून किती जागा जिंकतील 50...(अन्य राजकीय पक्ष आणि नेत्यांना मी मूर्ख मानायला अजिबात तयार नाही.मायावतींच्या आव्हानाचा सामाना करायला सर्व पक्ष नक्कीच तयार असतील ) आता डावे आणि मायावती नंतर तिस-य़ा आघाडीतल्या सर्व पक्षाची शक्ती एकत्र केली तरी 120-140 च्या आसपास येऊन थांबतात.म्हणजेच कॉँग्रेस किंवा भाजपा ह्या दोन्ही पैकी एका राजकीय पक्षाची मदत घेतल्याशिवाय ही आघाडी सत्तेवर येऊचं शकत नाही.

ह्याचाच अर्थ ज्या उद्देशाकरता ही आघाडी सत्तेवर आली तो उद्देशचं संपुष्टात येणार.हे सरकार पाच वर्ष चालणार नाही. मग अशा प्रकारच्या अस्थिर आघाडीला मतदान का करायचे ? कॉँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षांमध्ये अनेक दोष आहेत.परंतू ह्या पक्षाला देश चालवण्याचा अनुभव आहे.अर्थकारण,आंतरराष्ट्रीय राजकारण, वेगवेगळ्या प्रादेशिक समस्या निर्माण झाल्यानंतर कशाप्रकारे राज्य करावं ह्याचं भान ह्या पक्षातल्या अनेक नेत्यांना आहे.देशातल्या वेगवेगळ्या भागात प्रादेशिकवादी शक्ती डोकं वर काढंत असताना देशाची सत्ता राष्ट्रीय पक्षाकडे देणं हेच देशाच्या एकतेसाठी आवश्यक गोष्ट आहे.

त्यामुळेच ह्या निवडणुकीत मतदान करणा-या प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे की तूंम्ही मतदान एकतर भाजपाला करा किंवा कॉँग्रेसला करा..तिस-या आघाडीच्या मृगजळामागे धावून आपली शक्ती वाया घालवू नका.

Tuesday, March 17, 2009

'वार' करी आणि साहित्यिक यादवी


मेणाहून मऊ आम्ही विष्णूदास l
कठीण वज्रासही भेदू ऐसे ll

मेणाहून मऊ असणारे वारकरी आता वज्राहून कठीण झालेत.'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीत अवमानकारक मजकूर लिहला म्हणून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांच्या विरुद्ध शड्डू ठोकले होते.आता आनंद यादव यांनी साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आनंद यादव यांच्यासारख्या एका सृजनशील लेखकाला, नवनिमिर्तीची आस बाळगणा-या सरस्वतीपूजकाला आणि संवेदनशीलतेने ग्रामीण वास्तव टिपून ते जिवंत करणा-या वाङ्मय-सेवकाला राजीनामा द्यावा लागल्याने आपला विजय झाला, अशी भावना या कादंबरीवर आक्षेप घेणा-या मंडळींना झाली असेल.पण या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तान जे काही गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत.त्यांचा यानिमित्तानं विचार होणं आवश्यक आहे.

कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीमध्ये मानवी पातळीवरचं लिखाण करणं हा गुन्हा आहे का ? तूंम्ही त्यांना पौराणिक कथांमध्येच,चमत्कारांच्या कोंदणातच बांधून ठेवलं पाहिजे..ही जी पारंपारीक प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे.त्या प्रथेचं आपण या एकविसाव्या शतकातही तितकंच पालन करत आहोत.उलट वरचेवर ह्या सर्व प्रथा ह्या आणखीनंच घट्ट होत चालल्यात.प्रत्येक महारपूरुष हा एखाद्या समाजाची मालमत्ता आहे असंच ह्या समाजाच्यातल्या व्यक्तींचं वर्तन असंत. भक्तीमार्गाची उज्जवल परंपरा सांभाळणारा वारकरी समाजही ह्या परंपरेपासून दूर नाही हेच कटू वास्तव या निमीत्तानं सिद्ध झालंय.

डॉ.यादव यांनी जे काही लिहले ते आक्षेपार्ह होते..तुकाराम महाराजांसारख्या जगद्दगुरुंबद्दल लिहताना
जबाबदारीचं तेवढं भान असायला हवं.तूमच्याकडे भक्कम पुरावे असायला हवे.कोणताही परिस्थितीमध्ये तुंम्ही आपल्या विचारांवर ठाम असायला हवं. याचं भान साहित्य विश्वात आपली संपूर्ण हयात घालवणा-या यादवांना नसावं हे आश्चर्यचं मानावं लागेल.

खरं तर वादग्रस्त लिखाण करणारे आनंद यादव हे काही या जगातले पहिलेच साहित्यिक नाहीत.यापूर्वीही तस्लिमा नसरीन,सलमान रश्दी,विजय तेंडुलकर यासारख्या अनेक लेखकांना असाच रोषाचा सामाना करावा लागलाय.तस्लिमा नसरीन आणि सलमान रश्दी यांच्या विरोधात तर फतवे निघाले. आश्रयासाठी देशोदेशी फिरावं लागलं. तरीही हे लेखक आपल्या लिखाणापासून मागं हटले नाहीत.आजही आपल्या पुस्तकात लिहलेल्या प्रत्येक विधानावर ते ठाम आहेत. एक लेखक म्हणून त्याचबोरबर एक माणूस म्हणून त्यांची उंची आज म्हणूनचं तितकीच मोठी आहे.त्याच्या उलट आनंद यादव यांच वर्तन होतं. त्यांनी एकाकी आपली कादंबरी मागं घेतली.त्याच पद्धतीनं अगदी तितक्याच तडकाफडकी अध्यक्षपदाचा
राजीनामा दिला.

आनंद यादव यांच्यावर ही वेळ का आली याचा विचार केला तर काही कारणं अगदी सहजपणे सापडतात. ते साहित्य संमेलानाचे नियोजीत अध्यक्ष होते. आपल्या या अध्यक्षांच्या पाठिमागनं संपूर्ण साहित्य विश्वानं एकदिलानं उभं राहायला हवं होतं.पण राम शेवाळकर यांच्यासारखा एखादा सन्मानजनक अपवाद सोडला तर एकही साहित्यिक त्यांच्या मागे उभा राहिला नाही.हेची फळ का मम तपाला ? असा
प्रश्न यादवांच्या मनात या निमित्तानं अगदी सहज उभा राहीला असेल.आणीबाणी ऐन भरात असताना क-हाडच्या साहित्य संमेलानात यशवंतरावाच्या उपस्थित आणिबाणीचा निषेध करणारे साहित्यिक आता संपले का ? या प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे हे कोणीही मान्य करेल.

या प्रकरणातली सर्वात महत्वाची बाजू वारक-यांची आहे.भक्तीमार्गामध्ये तल्लीन होणारा कोणाच्याही अध्यात-मध्यात नसणारा हा संप्रदाय आता मूळ प्रवाहात आलाय.ह्या संप्रदायाची खरी शक्ती लक्षात आली ती डाऊ प्रकरणाच्या निमित्तानं...शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यालाही वारक-यांनी आपल्या शक्तीपुढं वाकायला लावलं.डाऊ प्रकरणानंतर वारकरी संप्रदायातल्या नेत्यांना आपल्या शक्तीची जाणीव झाली.बंडातात्या कराडकर सारख्या काही व्यक्ती आता महाराज नाही तर नेते बनलेत.सांस्कृतीक क्षेत्रात त्यांची सुरु असलेली दादागिरी ही त्यांच्या राजकीयतेची चूणूक दाखवतीय. त्याचबरोबर वारक-यांच्या बाजूनं संभाजी ब्रिगेड,मराठा महासंघ संघटना वारक-यांच्या मागं उभ्या आहेत. त्याचबरोबर साहित्य
विश्वातली अनेक स्वयंभू पीठंही या निमित्तानं गप्प राहीली.सामाजिक समरसता मंचाच्या व्यासपीठावर वावरलेला,ग्रामीण संस्कृतीशी घट्ट नाळ असलेल्या साहित्यका बाबत वाद सुरु आहे ना..मग सुरु पाहू दे बाबा..मला काय त्याचे ? हीच त्यांची वृत्ती आहे. आपल्या लिखानातून शब्दांचे मोठे मोठे इमले उभे करणा-या मराठी साहित्यकांचं जातीय ध्रुवीकरण झालंय.

तुकाराम महाराजांनीच 'करितो कवित्व म्हणाल कोणी। नोहे वाणी माझ्या पदरीची। माझिया युक्तीचा नोहे हा प्रकार। मज विश्वंभर बोलवितो।।' असे लीनतेने म्हटले आहे. तुकारामांच्या भक्तांमध्ये आता या ऋजुतेची जागा असहिष्णुतेने घेतलीय. आज या असहिष्णूतेनं आनंद यादव यांच्या अध्यक्षपदाचा बळी घेतलाय. आता संपूर्ण संतसाहित्यावर सेनॉस्रशीप लावण्यास हे 'वार'करी सज्ज झालेत.मात्र हे सुरु असताना साहित्य विश्वातही जी 'यादवी' सुरु आहे ती यादवी नक्कीच अस्वस्थ करणारी आहे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...