Tuesday, May 26, 2009

आयपीएल धमाका


आयपीएल ही क्रिकेट जगतामधली एक सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धेची दुसरी आवृत्ती आता पार पडलीय. 'इंडियन प्रिमियर लीग' स्पर्धा अनेक वादविवाद उलट-सुलट चर्चेनंतर दक्षिण अफ्रिकेत पार पडली.या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले गेले होते. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीची ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा पार पडणार हे नक्की होत.या स्पर्धेमध्ये क्रिकेटबाहेरचे अनेक गोष्टींना कमालीचे महत्व होते.त्याची चर्चाही झाली.परंतु प्रत्यक्ष मैदानावर खेळ करत असताना मात्र केवळ क्रिकेटच्याच कौशल्यांना अजुन महत्व आहे.त्यामुळेच अस्सल क्रिकेटपडूंचं नाण या स्पर्धेत खणखणीत वाजलं.

टी -२० हे केवळ युवा क्रिकेटपटूंसाठीच असते या गृहितकाला यंदाच्या स्पर्धेत जोरदार तडा गेलाय.या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला त्या गिलख्रिस्टचे वय आहे 37.अंतिम सामन्याचा मानकरी आणि संपूर्ण स्पर्धेत ज्यानं अत्यंत जिगरबाज खेळ केला तो अनिल कुंबळे आहे 38 वर्षाचा..तर या स्पर्धेत ज्यानं सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली तो मॅथ्यू हेडन आहे 37 चा.या तिन्ही खेळांडूंना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता केंव्हाच सिद्ध केलीय.किंबहूना सर्व प्रकारची आव्हान यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांनी निवृत्ती स्विकारली. या खेळाडूंना आता कोणासमोरही काहीही सिद्ध करायचे उरलेले नाही.तरीही या तिघांनी तरुणांना लाजवेल असा खेळ केला.

गुणवत्ता ही जर अस्सल असेल तर ती कालातीत असते.एखादा क्रिकेटपटू वयस्कर झाला की त्याची विनाकारण थट्टा करण्याचा ट्रेंडचं बनलाय.दर्जेदार खेळाडूंना T-20 चे कारण देत पेन्शनीत काढणा-या सर्व क्रिकेटतज्ज्ञ आणि काही खेळाडूंना या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी सणसणीत चपराक दिलीय.

यंदाचे आयपीएल हे भारताच्या बाहेर खेळवले गेले. अफ्रिकेत भारताप्रमाणे पाटा खेळपट्टी नाहीत.त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातला चांगला संघर्ष या स्पर्धेत पाहायला मिळालाय.संपूर्ण स्पर्धेत 200 ची धावसंख्या केवळ एकदाच राजस्थान रॉयल्सने पार केली.केवळ दोनच शतकं नोंदवले गेले. भारतीय खेळपट्ट्यावर खो-याने धावा काढणारे या स्पर्धेत अपयशी ठरले. भारतीय सुवा खेळाडूंनीही या स्पर्धेमधून ब-याच काही गोष्टी शिकल्या असतील.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केलं होतं.यंदाही त्यांनी झुंजार वृत्ती जिवंत असल्याचं सिद्ध केलंय.राजस्थानकडे त्यांच्या हंगामातले सर्वात यशस्वी खेळाडू सोहल तन्वीर आणि शेन वॉटसन नव्हते.काही खेळाडू जखमी झाले,कमरान खान पकंज सिंगच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित केल्या गेल्या.तरीही शेन वॉर्नचा हा संघ शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम होता.काही मोजक्या गोष्टी सुधारल्या तर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार बनू शकेल.

कोलकता आणि मुंबई या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक दुस्वप्नचं ठरलं.कोलकता संघ मैदानाबाहेरच्या गोष्टीमुळेच अधिक अडचणीत आला.मल्टीपल कॅप्टन्सचा वाद,सौरव दादाची कर्णधारपदावरुन केलेली हाकालपट्टी,'भू-खा-नन' चे अनाकलनीय डावपेच आणि फेक ब्लॉगरचा पाठलाग यामुळे हा संघ अगदी रसातळाला गेला.संपूर्ण स्पर्धेत हा संघ केवळ हरण्यासाठीच खेळत होता.विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले. मुंबई इंडियन्सचे सारेच डावपेच अनाकलनीय होते.सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे.परंतु त्याला कर्णधार पदाचा भार पेलवत नाही...ही बाब या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाली.फलंदाजीच्या क्रमावारीत होणारा बदल,झहीरची दुखापत,हरभजनच्या भूमिकेबाबत गोंधळ ,जयसूर्याचा हरवलेला फॉर्म,सचिनच्या बॅटमधला चढ-उतार या बाबी संघाला सातव्या क्रमांकावर घेऊन गेल्या. युवराजच्या लहरी फलंदाजी प्रमाणेच पंजाबचा खेळ या स्पर्धेत राहीला.या संघानं शेवटपर्यंत झूंज दिली.परंतू शॉन मार्शची अनुपस्थिती आणि जयवर्धेनेला अत्यंत महत्वाच्या क्षणी झालेली दुखापत यामुळे हा संघ यंदा उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

दिल्ली आणि चेन्नई हे या स्पर्धेतले सर्वात संतुलीत संघ होते.भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे योग्य मिश्रण या संघात आहे.दिल्लीनं साखळी सामन्यात अत्यंत धडाकेबाज पद्धतीनं खेळ केला.नेहरानं या स्पर्धेत शानदार कमबॅक केलं.डिव्हीलीयर्स-दिलशान जोडूनं जबाबदार खेळं केला.कार्तिक- भाटीया-संगवान या युवा भारतीय खेळाडूंनीही दिल्लीला विजय मिळवून दिले.गिलख्रिस्टच्या जबरदस्त खेळीमुळे दिल्ली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.परंतु संपूर्ण स्पर्धेत ग्लेन मॅग्राला बेंचवर बसवण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.विशेषत: विजेतेपदाच्या जवळ येऊन दिल्ली संघ पराभूत झाला.त्यामुळे मॅग्राला न खेळवण्याची सल सेहवागला जाणवत राहील. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा चेन्नईला भोवला.सोपे झेल सोडण्याबाबत चेन्नईची कोलकताशी जणू काही स्पर्धाच सुरु होती.तर मुरलीधरन वगळता प्रमुख गोलंदांमध्ये कोणतीच शिस्तबद्धता नव्हती.कोलकत्ता नाईट रायडर या स्पर्धेतल्या सर्वात दुबळ्या संघाविरुद्ध चेन्नईचे गोलंदाज 188 धावांचे संरक्षण करु शकले नाहीत.धोनीने गोलंदाजीमध्ये काही कल्पक बदल केले.परंतु त्याच्यामधला विध्वसंक फलंदाज गेल्या काही काळात संपूर्णपणे लोप पावलाय.उंपात्य सामन्यात तर धोनीच्या संथ खेळामुळेच चेन्नईच्या वेगाला खिळ बसली.हाच महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.T-20 विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असताना धोनीचा हा खराब फॉर्मची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. एक कल्पक कर्णधार या एकमेव निकषाच्या जोरावर महेंद्र सिंग धोनी ही विश्वचषक स्पर्धा खेळेल.अशीच चिन्ह आहेत.त्यामुळे कर्णधार पदासाठी धोनीचा समर्थ पर्याय आपण लवकरचं शोधायला हवा.

डेक्कन आणि बंगळूरु या संघाने या स्पर्धेत अगदी फिनीक्स भरारी घेतली.डेक्कनने सलग चार विजय मिळवत शानदार सुरवात केली.मधल्या काळात हा संघ ढेपाळला.परंतु गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या झंझावाताला डेक्कनच्या युवा फलंदाजांनीही साथ दिली.या स्पर्धेचा पर्पल कॅप विजेता आर.पी.सिंग डेक्कनचाच.संपूर्ण स्पर्धेत त्यानं सातत्यपूर्ण गोलंदाजी केली.या स्पर्धेमुळे त्याचं संघातलं स्थान पक्क झालंय.शेवटच्या हाणामारीच्या षटकात त्यानं अनेकदा थंड डोक्याने गोलंदाजी केली.T-20 विश्वचषकात त्याच्या या कौशल्याचा भारतीय संघाला महत्वाचा उपयोग होऊ शकेल.

आयपीएल-2 मधली सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ते अनिल कुंबळेचं मॅजिक..आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत अगदी दृष्ट लावणारा खेळ केला.मागच्या वर्षीच्या राजस्थान प्रमाणेच बंगळूरुच्या विजयात कोणत्याही एका खेळाडूचा महत्वाचा वाटा नव्हता.राहुल द्रविड- जॅक कॅलीस या बुजूर्ग खेळाडूंपासून ते विराट कोहली-मनीष पांडे या युवा खेळाडूंना जम्बोनं एका संघात बनवलं.प्रत्येक खेळाडूला विश्वास दिला,सुरक्षिततता दिली.हे सर्व होत असताना कुंबळेनं युद्धभूमीवर आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व केलं.अंतिम सामन्यातली त्याची गोलंदाजी कोण विसरु शकेल.

क्रिकेटमध्ये धंदेवाईक वृत्ती वाढत चाललीय.लॅपटॉप प्रशिक्षणाचं युग आलंय. खेळाडू हे यंत्रमानव बनलेत अशी ओरड नेहमी केली जाते.परंतु कितीही यांत्रिक प्रयत्न केले तरी गुणवत्ता आणि क्रिकेटवरची निष्ठा महत्वाची असते.क्रिकेट या खेळाचे चाहते लाखोंमध्ये आहेत.परंतु हा खेळ खेळणारे देश अगदी मौजकेच आहेत.या मोजक्या देशातल्या अगदी असमान्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळेचं नाव घ्यावं लागेल.आयपीएल जिंकण्यास तो अपयशी ठरलाय.परंतु करोडो क्रिकेट रसीकांच्या -हदयामधले स्थान त्यानं अढळ ठेवलंय.

Tuesday, May 19, 2009

मतदारराजाचा विजय असो !


लोकशाही राजवटीतला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक.पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आता लागलेत.गेल्या काही महिन्यांपासून माझे या निवडणुकींवर लक्ष होतं..या निवडणुकांचे माझ्या परीने विश्लेषण या ब्लॉगवर करणं अपेक्षित आहे. मात्र या निवडणुक निकालानं माझ्या आजवरच्या सा-या गृहीतकांना तडा गेलाय.

संपूर्णपणे फसलो.या दोनच शब्दात या निवडणुक निकालांचे वर्णन मला करावेसे वाटते.1991 पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुका मी पाहतं आलोय. राजकीय विषयांमध्ये मला गती आहे असा माझा काहीसा समज होता.त्यात पत्रकार म्हणून मी कव्हर करत असलेली पहिली निवडणूक. त्यामुळे या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरतील याची मला काहीशी खात्री होती. 26/11 चा हल्ला,चिंदबरम यांच्यावर फेकण्यात आलेला जोडा,मुलायम-लालू यांनी काँग्रेसशी घेतलेली फारकत, मायावतींचे मॅजीक,तामिळ इलम, डाव्यांचे डाव,कमजोर पंतप्रधान,अनअनुभवी राहुल हे मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे ठरतील असं मला वाटलं होतं. परंतु मी सुरवातीलाच म्हंटल्याप्रमाणे संपूर्णपणे फसलो.

26/11 च्या घटनेनंनंतर सर्व शहरी वर्ग विशेषत: मुंबईमध्ये राष्ट्रीय सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा बनलाय.प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचा हा संताप मतपेटीमधून बाहेर पडेल अशी समजूत होती.परंतु याबाबत तावातावाने बोलणारा शहरी वर्ग केवळ न्यूज चॅनलपुरताचं मर्यादीत राहीला. मुंबईकरांचा मतदानासारख्या संवेदनशील विषयावरचा असंवेदनशीलपणा यंदाही कायम राहीला.हे माझ्यासकट अनेकांना जाणवलं नाही.'जागो रे'टाईप स्टोरीज आंम्ही इतक्या केल्या की मुंबईकरांच्या ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं .मी ज्या शहरात राहतो त्या शहरातल्या मराठी माणसात मनसेची लाट आहे हे मला थेट 16 मेलाच समजलं.

जर्नेलसिंग प्रकरणानंतर शिख मतदारांची मतं काँग्रेसच्या विरोधात फिरतील..हाही एक असाच समज परंतू दिल्लीत काँग्रेस सातही जागी विजयी झाली.त्याचबरोबर पंजाबमध्येही पक्षाची कामगिरी चांगली झालीय. लालू-पासवानचा सफाया होऊ शकतो. बिहारचे मतदार जातीपातीच्या राजकारणाच्या पलिकडे जाऊन नितीशकुमार सारख्या मुख्यमंत्र्याला कौल देऊ शकतो हा खरचं थक्क करणारा अनुभव आहे.मायावतींची 'माया'जाल दिल्लीवर पसरणार ही नुसती कल्पनाचं अस्वस्थ करणारी होती.परंतु भारतीय मतदार खरंच सूज्ञ आहे.खंडणी,बदल्या,हुजरेगीरी,पुतळेबाजी आणि फसव्या सोशल इंजिनिअरींगच्या भुलभुलैय्याला हा मतदार भुलला नाही.मायावतींच्या सा-या महत्वकांक्षेला या निवडणुकीत सुरुंग लागलाय.

उत्तरेतल्या मतदारांनी जातीपातीच्या पलिकडं जात मतदान केलं.तर दक्षिणेतल्या तामिळनाडूनं तामिळ इलमच्या ठेकेदारांना घरी बसवलं. एलटीटीईच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात होती. तरीही स्वंत्र तामिळ इलमचा मुद्दा मतदारांनी नाकारला.प्रभाकरनचा पगारी माणूस अशी ज्यांची ओळख आहे अशा वायकोला या निवडणुकीत काँग्रेसच्या एका तरुण उमेदवाराने पराभूत केलं. तसंच प्रभाकरच्या बाजूने उपोषण करणा-या करुणानिधींनाही हे मतदार फारसे बधले नाहीत.त्याचबरोबर जयललितांच्या यू टर्नलाही भूलले नाहीत.

पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष पराभूत झालेत.हे गेल्या अनेक वर्षांपासून मनामध्ये रेखाटलेलं चित्र या निवडणुकीत प्रत्यक्षात आलं.कोणत्याही मुद्यावर थयथयाट करणे,प्रत्येक विकासकामांना भांडवलवादी अथवा अमेरिकावादी म्हणून टिका करणे, जातीय राजकारणाचा अहोरात्र द्वेष करत असताना लालू-मुलायम पासून ते अगदी मायावतीपर्यंतच्या सर्व 'जाती'वंत राजकारण्यांशी समोझाता करणा-या अस्सल डाव्या नेत्यांचा या निवडणुकीत शक्तीपात झालाय..

डाव्यांचा शक्तीपात झालाय..तर भाजपलाही त्यांची जागा या मतदारांनी दाखवून दिलीय. अटलजींच्या काळातली पक्षाची लोकप्रियता ढासलीत.लालकृष्ण अडवाणी अनुभवी आहेत..परंतु त्यांच्याजवळच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही.अडवाणींच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय.आर्थिक मंदी ,वाढती महागाई,सुरक्षेचा प्रश्न या सारखे प्रश्न तर सोडाचं परंतु भाजपचा जो बेस आहे ते रामंदीर,370 वे कलम सारखे मुद्दे आघाडीधर्म म्हणून बासनात गुंडाळले गेले.अन्य पक्षाच्या उपद्रव मुल्यावरच भाजपवाले पुर्णपणे विसंबून राहीले.शत प्रतिशत भाजप या संकल्पनेवर या पक्षाचा विश्वास होता.मात्र गेल्या 28 वर्षात केरळ,तामिळनाडू,आंध्र,पश्चिम बंगाल या पक्षात भाजपला आपले पाय रोवता आले नाहीत.ओरिसामध्ये बिजू जनता दलानं भाजपचा वापर केला.नितीशकुमारही तोच कित्ता गिरवत आहेत,महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आजही भाजप मित्रपक्षाशिवाय पांगळा आहे.उत्तर प्रदेशात पक्षाचा बेस बरवलाय.तो परत मिळवून देण्याकरता राहुल गांधी सारखा नेता भाजपला अजुन सापडलेला नाही.मग आता जी काही मोजकी राज्य उरलीत..त्या राज्याच्या जोरावर भाजप सत्ता कशी मिळवणार ?

या देशातल्या मतदारांना आता स्थिर सरकार हवंय.उत्तर प्रदेश,बिहार,कर्नाटक पासून वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीत स्थिर सरकार देऊ शकणा-या पक्षालाचं मतदारांनी पसंती दिलीय.तरीही या लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा येणार ही माझी खात्री होती.माझी ही समजूत खोटी ठरली.काही पुस्तके वाचून ,इलेक्टोनिक मिडीयाच्या कार्यालयात बसून, ठराविक विचारांच्या वर्तुळात फिरुन देशाच्या जनमानसाचा अंदाज बांधणं हे शुद्ध भंपकपणाचं आहे ही शिकवण या निवडणुकीनं मला दिलीय.

माझ्या देशातले केवळ 50 टक्केचं मतदार मतदान करतात. परंतु हे मतदार नक्कीच सुज्ञ आहे.जातीपातीचं राजकारण,राजकीय ब्लॅकमेलिंग,स्वत:च्या शक्तीविषयीचा फाजील आत्मविश्वास बाळगणा-या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला या मतदारांनी जागा दाखवलीय.त्याचबरोबर माझ्या सारख्या असंख्य कुडमुड्या पत्रकारांनीही त्यांनी तोंडघाशी पाडलंय..म्हणूनच या ब्लॉगच्या शेवटी मला एवढंच म्हणावस वाटत मतदाराजाचा विजय असो !

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...