भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी नुकत्याच जैतापूर या महाकाय अणुऊर्जा प्रकल्पासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी केली.गेली अनेक वर्षे वादग्रस्त बनलेल्या या प्रकल्पाला आता वेग येईल. तब्बल 9,900 मेगावॅट वीज निर्मीती या करारामधून होणार आहे. गेली अनेक वर्षे हा करार वेगवेगळ्या करणांमुळे वादग्रस्त बनलाय. मात्र देशाची वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अशा प्रकारचे अनेक करार होणे आवश्यक आहे. या प्रकारच्या करारातील पहिले पाऊल जैतापूरच्या निमित्तानं पडलंय. त्यामुळे या प्रकल्पांच्या सर्व मुद्यांवर चर्चा व्हायला हवी.
Saturday, December 11, 2010
जैतापूरच्या निमित्ताने...
भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी नुकत्याच जैतापूर या महाकाय अणुऊर्जा प्रकल्पासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी केली.गेली अनेक वर्षे वादग्रस्त बनलेल्या या प्रकल्पाला आता वेग येईल. तब्बल 9,900 मेगावॅट वीज निर्मीती या करारामधून होणार आहे. गेली अनेक वर्षे हा करार वेगवेगळ्या करणांमुळे वादग्रस्त बनलाय. मात्र देशाची वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अशा प्रकारचे अनेक करार होणे आवश्यक आहे. या प्रकारच्या करारातील पहिले पाऊल जैतापूरच्या निमित्तानं पडलंय. त्यामुळे या प्रकल्पांच्या सर्व मुद्यांवर चर्चा व्हायला हवी.
Sunday, May 2, 2010
पन्नाशीच्या वेदना
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला आता 50 वर्षे पूर्ण झालीत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यानंतर महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला. या घटनेला आता 50 वर्षे झालीत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 50 वर्षांचा कालखंड हा महत्वाचा मानला जातो. आपल्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट घटनांची उजळणी या निमित्ताने केली जाते. भूतकाळाचा आढावा घेत आणि भविष्याचे नियोजन करत असताना महाराष्ट्राच्या 50 वर्षांच्या वाटचालींचा लेखाजोखा मांडणे आवश्यक ठरते. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाला त्यामुळेच महत्व आहे.
भाषावार प्रांतरचनेचे तत्व स्विकारल्यानंतर मराठी भाषिकांचे एक राज्य असावे या कल्पनेतून महाराष्ट्राचा जन्म झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच्या निर्मितीस तत्कालीन केंद्र सरकार राजी नव्हते. मुंबईला केंद्रशासित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशा परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली जमलेल्या अठरापगड विचारांच्या आणि प्रवृत्तीच्या मंडळींनी आणि पक्षांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्वाचा वाटा उचलला आहे. या राज्याच्या निर्मितीकरता ज्या 106 झुंजार कार्यकर्त्यांना आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले.त्यांचेही या निमित्ताने कृतज्ञापूर्ण स्मरण करायला हवे.
महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली, प्रेरणादायक असा होता. वेगवेगळ्या विचारांचे, कार्यकर्त्यांचे उगमस्थान म्हणजे महाराष्ट्र. म्हणूनच गांधीजींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहळ म्हंटले आहे. स्वांत्र्यलढा उभारणारी कॉँग्रेस इथेच जन्मली. स्वा.सावरकरांची हिंदु महासभा ही इथलीच. डॉ. हेडगेवारांच्या रा.स्व.संघाचा पायाही याच मातीत रचला गेला. डावी चळवळ, कामगार लढे यांच्या चळवळींचा केंद्रबिंदूही महाराष्ट्रच होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने देशातल्या पददलित, शोषित वर्गाला आपल्या अस्मितेचा आवाज याच भूमीत पहिल्यांदा सापडला. महात्मा फुले-शाहू-अगरकर आणि कर्वे या सारख्या थोर समाजसुधारकांच्या सामाजिक क्रांतीची सुरवातही इथेच झाली.
आजच्या महराष्ट्रात कसे चित्र दिसते ? शेतक-यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.. संपूर्ण राज्य भारनियमनाचे चटके सहन करतोय.गेल्या 15 वर्षात नवीन वीजनिर्मिती झालेली नाही. पुढच्या पाच वर्षात ती होण्याची शक्यता कमी आहे. ज्यांच्या लढ्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली तो गिरणी कामगार मुंबईतून हद्दपार होतोय. पाकिस्तानमधून काही मुठभर अतिरेकी मुंबईत दाखल होतात. या देशाच्या आर्थिक राजधानीला, शक्तीशाली संरक्षण व्यवस्थेला 60 तासांपेक्षा अधिक वेठीस धरतात. या राज्यातला क्राईम रेट बिहार आणि उत्तर प्रदेशला शोभावा असा आहे. मुंबईपासून गोंदिया पर्यंत बेरोजगारी वाढत चाललीय. समाजसुधारकांचा, क्रांतीकारकांचा, हिंदुत्ववाद्यांचा, उद्योजकांचा, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हाच आहे ?
राज्यातील प्रमुख महानगरे सोडली तर उर्वरित राज्याचा विकास दर हा थेट बिमारु राज्यांच्या जवळ जाणारा आहे. मुंबई-ठाणे-पुणे आणि नाशिक-औरंगाबाद-कोल्हापूर या शहरांमध्ये चकचकाट आला.उद्योगधंदे आले. अनेकांना यातून रोजगार मिळाला. पण आज योग्य नियोजनाच्या अभावी ही महानगरे बकाल होत चाललीत. या शहरात बिल्डर संस्कृती बळावलीय. टोलेजंग टॉवर उभी राहतायत आणि त्याचबरोबर झोपडपट्टी वसवण्याचे त्या अधिकृत करण्याचे कामही बिनभोबाटपणे सुरु आहे. शहरे बकाल होत असताना खेडीही ओसपडत चाललीत. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा पार बोजवारा उडालाय. बारामाही शेती करणे हा आता आतबट्याचा व्यवहार होत चाललाय. अपुरा बाजार भाव, लहरी निसर्ग, पाण्याची कमतरता यामुळे शेतक-यांना जगणे नकोसे होत चाललंय. देशात शेतक-यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. आत्महत्यग्रस्त शेतक-यांसाठी पंतप्रधानांनी पॅकेज जाहीर केले. राहुल गांधींची कलावती भेटही गाजली. मात्र असे अनेक पॅकेज जाहीर झाले. अनेकांचे दौरे वाजतगाजत झाले. तरीही आत्महत्याग्रस्त शेतक-यांची परिस्थिती जैसे -थेच आहे. धान्यापासून दारु बनवण्याच्या मागे असणा-या या महाराष्ट्र सरकारला या शेतक-यांच्या कुटुंबियांची फारशी काळजी दिसत नाही.
आर्थिक विषमतेप्रमाणेच प्रादेशिक असमोतलाचं दुखणंही कायम आहे. शेतक-यांच्या आत्महत्या, नक्षलवाद, कुपोषण या सारख्या समस्यांनी आज विदर्भाला ग्रासले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी अधिका-यांना गडचिरोली चंद्रपूरची पोस्टिंग म्हणजे शिक्षा वाटते. वरीष्ठ अधिकां-यांचाही हे पोस्टिंग देण्यामागे हाच हेतू असतो. अशा मनस्थितीचे राज्यकर्ते आणि नोकरशाहा विदर्भाचा विकास कसा करणार ? विदर्भातल्या काही जिल्ह्यात नक्षलवादाने बस्तान बसवलंय. गेली 50 वर्षे उपेक्षचं जगण जगत असलेल्या विदर्भवासियांकडून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जातेय. महाराष्ट्राबाबत भावनिक विचार न करता या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आली आहे.
कोणे एके काळी महाराष्ट्र शेजारच्या राज्यांना वीज पुरवत असे, हा इतिहास आता दंतकथा बनलाय. 18-18 तास तास लोडशेडिंगच्या झळा ग्रामीण महाराष्ट सहन करतोय. अपुरी वीज, नोकरशाहांची दिरंगाई आणि व्हिजनरी नेतृत्वाचा अभाव ह्यामुळे अनेक उद्योगधंदे गुजरात किंवा अन्य राज्यात जातायत. टाटांचा नॅनो प्रकल्प हे याचे क्लासिक उदाहरण. शिक्षण व्यवस्थेतहगी सावळा गोंधळ असाच कायम आहे. प्रत्येक शिक्षणमंत्री आपल्या लहरी स्वभावानुसार राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवतो. खाजगी शिक्षण संस्था हे नफा कमवण्याचे कुरण बनले आहेत. सत्ताधारी आणि आता काही विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही शैक्षणिक संस्थांवर सत्ता आहे. फी निश्चितीकरता तयार करण्यात आलेल्या कुमुद बन्सल समितीच्या शिफारशी बिनभोपाटपणे स्विकारल्या जातात. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चाललीय. सहकारी साखर कारखानेही कर्जामुळे डबाघाईला आलेत.
राज्यापुढे प्रश्नांचा हिमालय उभा आहे. तरीही सरकार किंवा विरोधी पक्षांना याचे सोयरसुतक नाही. मुंबईत टॅक्सी परवाने मराठी की गैरमराठींना द्यायचे यावर गजहब केला जातो. मात्र मुंबईत घुसणारे लाखो बांग्लादेशी यांना दिसत नाहीत. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्याचा सरकारचा हट्ट आहे. पण राज्यातील जनतेला शुद्ध पाणी पाजवण्यासाठी पैसे नाहीत. सेना-मनसेमध्ये तर मराठीच्या अस्मितेची भाऊबंदकी सुरु आहे. गाणी बजावणे, सत्कार समारोह, खाद्य महोत्सव यासारख्या मनोरंजक कार्यक्रमातूम मराठी वाचवण्याचा उद्योग हे पक्ष करतायत.
माझे हे लिखाण अनेकांना निराशादायी वाटेल. पण उघड्या डोळ्यांनी सभोवती बघितले तर हेच चित्र मला दिसते. राज्यकर्त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांची धुंदी माझ्या डोळ्यांवर तरी अजिबात नाही.महाराष्ट्राच्या 50 वर्षानिमित्त आनंद साजरा करावा अशा गोष्टी फार थोड्या आहेत. 1970 च्या दशकात राज्यात भीषण असा दुष्काळ पडला होता. पण त्यातूनच संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या 'रोजगार हमी योजने'ची निमिर्ती झाली.कोयना धरणाची निर्मिती, मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग अशा काही मोजक्याच गोष्टी राज्याच्या गौरवात भर पाडणा-या आहेत.
यावरच्या उपाय सुचवण्याइतका मी काही मोठा नाही. माझा त्याबतीत अनुभव अथवा अधिकार अगदी तोकडा आहे. पण मला इतकं कळत,पन्नाशीची उमर गाठल्यानंतर परिपक्वता येते. चांगले काय, प्रलोभन दाखवणा-या गोष्टी कोणत्या यातील फरक कळायला लागतो. तारुण्यात भावनिक मनस्थितीमध्ये केलेल्या चुकांची जाणीव होते. आता राज्याच्या समाजमनाला ही जाणीव व्हायला हवी. राजकीय पक्षांचा जात, धर्म आणि भाषा याच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. राज्यकर्त्यांचे काम हाच ते ठरविण्याचा निकष असायला हवा.पन्नाशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील समाजमनात ही परिपक्वता आली तरच आगामी काळात या पन्नाशीच्या वेदना काही प्रमाणात कमी होतील.
Wednesday, April 21, 2010
आयपीएलचे काय करायचे ?
इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल आणि वाद हे समीकरण अगदी घट्ट आहे. आयपीएलच्या जन्मापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही स्पर्धा वादग्रस्त बनलीय. कधी खेळाडूंचा लिलाव, चिअरलिडर्सचा नाच, नॉन स्टॉप खेळाचा ओव्हरडोस, संघ मालकांचा हस्तक्षेप अशा वेगवेगळ्या कारणामुळे ही स्पर्धा वादग्रस्त बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या एकूण कारभार ( गैर) वेगवेगळ्या बातम्या समोर येतायत. हे प्रकरण प्रचंड व्यापक, गुंतागुतीचे आणि गंभीर आहे. मॅच फिक्सिंग नंतर भारतीय क्रिकेट समोरची सर्वात मोठी समस्या आयपीएलने उभी केलीय. त्यामुळेच सध्या सडकेपासून संसदेपर्यंत एकच प्रश्न चर्चेला जातोय तो म्हणजे आयपीएलचे काय करायचे ?
भारतीय क्रिकेटच्या सुरवातीच्या दिवसांबद्दल वाचलेला एक जुना किस्सा मला इथे लिहावासा वाटतो. 1950 च्या दशकात टेस्ट खेळणा-या भारतीय खेळाडूला दरडोई 250 रुपये वेतन दिले जायचे. या काळात न्यूझीलंड विरुद्धची मॅच भारताने 4 दिवसात जिंकली. या विजेत्या टीम इंडियाला दरडोई 200 रुपये वेतन दिले गेले. या कमी पगाराबद्दल खेळाडूंनी बोर्डाच्या अधिका-यांकडे तक्रार केली. त्यावेळी, '' चार दिवसात तुम्हाला मॅच जिंकण्यास कोणी सांगितले होते ? पाचव्या दिवसाचा खेळ झाला नाही म्हणून तुमचे दरडोई 50 रुपये कापून घेण्यात येतायत.
आज क्रिकेट खेळणा-या आणि पाहणा-या कोणत्याही भारतीयाला विश्वास बसणार नाही. पण हा किस्सा अगदी खरा आहे. पाच दशकानंतर आयपीएलने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. देश सोडा पण आपल्या राज्याच्या टीमकडूनही न खेळणा-या खेळाडू आता लाखोपती-करोडपती बनतायत. वर्षातून सात आठवडेच चालणा-या या क्रिकेटच्या बाजारात त्यांची मोठी कमाई होतीय. एकाच सिझनमध्ये होणारी त्यांची कमाई जुन्या काळात टेस्ट खेळणा-या खेळाडूंच्या आयुष्यभरातल्या कमाईपेक्षा जास्त आहे.
जागतिक मंदीचा अनिष्ट प्रभाव अजून ओसरलेला नाही. आयपीएलच्या विश्वाला मंदीची अजिबात झळ बसलेली नाही. पुणे आणि कोची ह्या दोन टीम 3200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकल्या गेल्या. पुणे आणि कोची या दोन संघांनी मिळून जो पैसा ओतलाय, तो आयपीएलमधल्या सध्याच्या सर्वाधिक महागडय़ा म्हणजे मुंबई इंडियन्स टीमसाठी 2008 मध्ये मुकेश अंबानींनी गुंतवलेल्या रकमेच्या सातपट जास्त आहे..! जागतिक क्रिकेटमध्ये क्रांतीकारी बदल घडवणा-या क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचे काम ललित मोदींनी केले आहे. मोदींना त्याचे श्रेय द्यायलाच हवे.
क्रिकेटमध्ये पैसा येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. क्रिकेट खेळाडूंनी पैसा कमावण्यावरही कुणाचा आक्षेप असता कामा नये. कॉर्पोरेट कंपन्यांनी क्रिकेटमध्ये पैसा गुंतवणे आणि त्यातून नफ्याची अपेक्षा करणे निदान मला तरी वावगे वाटत नाही. आयपीएलमध्ये पैसा आहे... येतोय यात काही आक्षेप नाही खरा प्रश्न आहे हा पैसा कोणत्या मार्गाने येतो ? आयपीएलच्या टीममध्ये कोणाकोणाचे समभाग आहेत ? श्रीनीवासन सारख्या बोर्डाच्या खजिनदाराने आयपीएल टीम विकत घेणे हे कितपत नियमाला धरुन आहे ?
माजी परराष्ट्र राज्य मंत्री शशी थरुर यांनीही आयपीएलच्या वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या कारभारात ढवळाढवळ करणारे थरुर काही पहिले राजकारणी नाहीत. शरद पवार, अरुण जेटली, फारुख अब्दुल्ला आणि प्रफुल्ल पटेल हे राजकारणीही आयपीएलशी या ना त्या कारणामुळे संबधित आहेत.केवळ क्रिकेटच नाही तर प्रत्येक क्रीडा संघटनेचा या राजकारण्यांनी खेळ खंडोबा केलाय. राजकारण्यांच्या या कारभारची कोण आणि कधी चौकशी करणार ?
आयपीएल स्पर्धेवर बंदी घालावी अशी मागणी आता अनेक जण करु लागलेत मला हे मान्य नाही
1 ) आयपीएल सारख्या स्पर्धा हे 21 व्या शतकातले क्रिकेट आहे. त्यामुळे भारतात नाही तर अन्य कोणत्या तरी देशात ह्या स्पर्धा नक्की होणार. त्या देशातल्या स्पर्धेत हे खेळाडु खेळतील..मग ह्या स्पर्धा भारतामध्ये घेण्यात काय वावगे आहे ?
2 ) आयपीएल स्पर्धेमुळे एक मोठी क्रिकेट इकॉनॉमी तयार झालीय. या इकॉनॉमीतून मोठा महसूल मिळू शकेल..त्यामुळे आयपीएल स्पर्धा होणे आवश्यक आहे.
3 ) आयपीएल स्पर्धेमुळे काही तरुण खेळाडू पुढे आले आहेत.. तरुण खेळाडुंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यात ही स्पर्धा महत्वाची ठरते. तसेच सिनियर्स खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळतो. सचिनच्या मार्गदर्शनामुळे सौरभ तिवारी आणि रायडूचा खेळ बहरला. कुंबळेच्या कानमंत्रामुळे विनय कुमारच्या आक्रमणाला चांगली धार आली.
4 ) टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय खेळाडूंचे असते. मात्र ते सर्वांचे पूर्ण होऊ शकते असे नाही. त्यामुळे अशा युवा खेळाडूंना पैसा, प्रसिद्धि आणि ग्लॅमर मिळवण्यासाठी आयपीएलचा उपयोग होऊ शकतो.
5 ) आयपीएल स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा मोठा पाठिंबा मिळालाय. तिन्ही सिझनमधलील मॅचेसना होणारी गर्दी हे याचेच उदाहरण आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचे भक्कम पाठबळ लाभलेली ही स्पर्धा बंद करण्याचा अधिकार बीसीसीआय किंवा केंद्र सरकारला नाही.
आयपीएलच्या चेअरमनपदावरुन ललित मोदींना निलंबित करण्यात आलंय. आयपीएलचा कारभार सुधारण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे. अजुनही काही महत्वाचे बदल आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये व्हायला हवेत...
भारतीय क्रिकेटचा सुधारणा कार्यक्रम -
1 ) आयपीएल बाबतच्या सर्व गैरकारभारची चौकशी लवकरात लवकर व्हायला हवी.यातील दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा करण्यात यावी
2 ) आयपीएल चेअरमनला निरंकुश अधिकार देण्यात येऊ नयेत. नवा ललित मोदी तयार होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी
3 ) आयपीएलमध्ये काळा पैसा गुंतला आहे का ? कंपनी व्यवहार नियमांचे किती उल्लंघन आयपीएल मालकांनी केले हेही तपासायला हवे
4 ) आयपीएलच्या लिलावात लागणारी बोली, टीम मालकांनी यात गुंतवलेला पैसा, टीमच्या मालकांचे नाव त्यांचा उद्योग, समभागधारक व्यक्ती, आयपीएल फ्रेंचायझींना होणारा फायदा-तोटा ही सर्व माहिती वेळोवेळी जाहीर करण्याचे बंधन घालण्यात यावे.तसेच माहिती अधिकाराखाली ही माहिती वेळोवेळी तपासण्यात यावी
5 ) आयपीएल मॅचदरम्यान मॅच फिक्सिंग करण्यात आले अशीही चर्चा आहे. आयसीसी आणि भारतीय पोलीसांनी याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.
6 ) आयपीएल मॅचेसवर करमाफीचा वर्षावर करु नये. या स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात महसूल राज्य सरकारला मिळू शकतो.
7 ) यावर्षीच्या आयपीएलमध्ये 60 सामने खेळवण्यात आले. पुढील वर्षी त्याची संख्या 95 होणार आहे. हे अतिक्रिकेट खेळाच्या मुळाशी येतं. ऐन उन्हाळयात इतकी दिर्घकाळ स्पर्धा चालवण्यात येऊ नये.खेळाडूंच्या फिटनेसवर याचा गंभीर परिणाम झालाय.
8 ) आयपीएल सामन्यांची संख्या निम्याने कमी करावी. तीन आठवड्यांपेक्षा याचा जास्त कालावधी असू नये.
9 ) सर्वात महत्वाचे म्हणजे क्रिकेट रसिकांनी आयपीएलला किती महत्व द्यायचे याचा विचार करायला हवा. व्यवसायिक फायदा मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आलेला हा क्रिडाप्रकार आहे. आंतराष्ट्रीय खेळापेक्षा याला जास्त महत्व देण्यात येऊ नये.
महागाई, नक्षलवाद, दुष्काळ, राष्ट्रीय सुरक्षा यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न सध्या देशाला भेडसावतायत. प्रश्नांच्या या जंजाळात आयपीएल सारख्या विषयाला एवढे अवास्तव महत्व देणे किती योग्य आहे ? याचा विचार सर्वांनीच डोकं शांत ठेवून करायला हवा. असा विचार खरंच झाला तर आयपीएलचे काय करायचे ? या प्रश्वाचे उत्तर मिळू शकेल.
Thursday, February 25, 2010
सचिन, तुला दंडवत !
Thursday, February 18, 2010
सूपरफास्ट सेहवाग
भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा म्हणजे वीरेंद्र सेहवाग. आज टेस्टमध्ये टीम इंडिया ख-या अर्थाने नंबर वन बनलीय. टीम इंडियाला नंबर वन बनवण्यात सेहवागच्या खेळाचा मोठा वाटा आहे. टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय सेहवागन एकहाती मिळवून दिलेत. सेहवागची बॅटींग पाहताना गेल्या अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या विचारांना या ब्लॉगमध्ये बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न...
वीरेंद्र सेहवागची बॅटींग ही एखाद्या मुक्तछंदामधल्या कवितेसारखी असते. क्रिकेटमधले पारंपारिक नियम, रुढी, परंपरा यांच्यात ती कधीही अडकत नाही. कोणत्याही परंपरेत तील बंदिस्त करता येत नाही.सेंच्युरी जवळ आली तरी त्याची धावगती कमी होत नाही. समोरच्या बॉलर्सच दडपण तो कधीही घेत नाही.
कानपूर असो की कराची... मुंबई असो की मॅलेबोर्न खेळपट्टी...मॅचचा दिवस मॅचमधली सिच्युएशन यापैकी कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. गेल्या दहा वर्षांत टीम इंडियाच्या बॅटनं कात टाकलीय.पूर्वी भारतीय फलंदाजांचे नाव जगात आदराने घेतलं जायचं. आता वीरेंद्र सेहवाग या नजफगडच्या नवाबाची जगातल्या सर्व बॉलर्सना दहशत वाटतेय. T-20 मध्ये 200 धावांचा पाठलाग असो अथवा टेस्टमध्ये 1 दिवसात 400 रन्स.... वीरुची बॅट चालली की कोणतही टार्गेट अशक्य नसंत. चांगल्या बॉलचा आदर करायचा... खराब चेंडूची वाट बघायची या सारख्या पारंपारिक कल्पना त्याला रुजत नाहीत. द्रविड, लक्ष्मण या सारख्या फलंदाजांप्रमाणे तो बॉलशी लोकशाही पद्धतीने वाटाघाटीही कधी करत नाही. येणा-या प्रत्येक बॉलवर तुटून पडणे एवढाच एक मंत्र त्याच्या रक्तात भिनलाय.
खेळताना त्याचे पाय हलत नाहीत... नो प्रॉब्लेम.. पण संघाचा धावफलक तरी हलतो ना.अगदी बॉलर्सला धाप लागेल इतक्या वेगाने तो पळत असतो. उसळत्या चेंडूंचा तो सामना करु शकत नाही अशी टीका नेहमी केली जाते. पण अशा चेंडूवर तो नेहमी कोसळतो असे नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका या देशातल्या वेगवान खेळपट्टीवर त्याने शतक झळकावली आहेत.तंत्र हेच पूर्णब्रम्ह हे सत्य त्यानं कधीही स्विकारले नाही. वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमधली सीमारेषाच त्याने पूसून टाकलीय. फक्त ड्रेस कोडमध्ये काय तो बदल. पण दोन्ही कडे रिझल्ट एकच. बॉलर्सचे डोळे पांढरे होणे.
सिक्सर आणि कॅचमध्ये नेहमीच एक धोकादायक सीमारेषा असते. सेहवाग सारख्या बॅटसमनचे नेहमी त्या धोकादायक रेषेवर वास्तव असतो. त्यामुळे चौकार किंवा षटकार खेचत शतक पूर्ण करण्याचा बेदरकारपणा त्याने अनेकदा दाखवलाय. यामध्ये तो अयशस्वी झाला तरी त्याची त्याला पर्वा नसते. कारण रेकॉर्ड, भविष्यातील टीममधील स्थानची तरतूद हा विचार त्याच्या गावीही नसत. वर्तमान काळात जगणा-या पिढीचा सेहवाग हा प्रतिनिधी आहे. त्यामुळेच वर्तमान काळात जगणा-या लाखो तरुणांचा तो आयडॉल बनलाय. जोपर्यंत तरुणांची ही पिढी आहे. तो पर्यंत वीरेंद्र सेहवाग नावाच्या वल्लीचे महत्व कायम राहणार आहे.
Friday, February 5, 2010
मराठीचे प्रयोग !
Wednesday, January 27, 2010
हॉकीचे हाल !
Saturday, January 23, 2010
नो पाकिस्तानी प्लीज !
भारतीयांची पाकिस्तान बद्दलची भूमिका प्रत्येक पिढीनुसार बदलत चाललीय. माझ्या आजोबांच्या पिढीतल्या व्यक्तींना पाकिस्तान बद्दल कुठतरी हळवा कोपरा होता. फाळणी ही काही काळापूरती झालेली गोष्ट आहे. काही काळानंतर भारत-पाकिस्तान एकत्र येतील ( हिंदी सिनेमात जसे लहानपणी हरवलेले दोन भाऊ शेवटी एकत्र येतात. ) असा त्यांचा विश्वास होता. पंडित नेहरुंचे लाहोरमधील संपूर्ण स्वराज्याबाबतचे भाषण, खान अब्दुल गफार खान यांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, कराची, लाहोर या शहरांबद्दलच्या आठवणींनी त्यांच्या -हदयात घट्ट घर करुन ठेवलं होतं.
माझ्या वडिलांच्या पिढीने भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली दोन युद्ध पाहिली. युद्ध असो वा क्रिकेट कोणत्याही क्षेत्रात भारतीयांना कोणत्याही मार्गाने हरवायचे. ही खास पाकिस्तानी मनोवृत्ती या पिढीने जवळून अनुभलीय. पाकिस्तानी नागरिक आपले पूर्वीचे भाऊ आहेत. हे त्यांनाही मान्य होतं. परंतु बदलत्या काळात पाकिस्तानच्या सिंधू- रावी किंवा भारताच्या गंगा-यमुना नदीतून बरेच पाणी वाहून गेलंय. हे त्यांना उमजू लागलं होतं. तरीही हे दोन भाऊ एकत्र नाही तर जवळ येतील असं त्यांनाही वाटत असे. व्यापार, संगीत, चित्रपट आणि क्रिकेट यासारख्या मिळेल त्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या पिढीने केला. इंडो-पाक पीस फोरम सारख्या अनेक संस्था याच काळात निर्माण झाल्या. पाकिस्तानी नागरिकांच्या मानगुटीवरचे भारत विरोधी उतरवण्याचा प्रयत्न ह्या पिढीने अनेकदा अनेक माध्यमातून केला.
माझ्या पिढीच्या नजरेतून पाकिस्तान कसा वाटतो ? काश्मिरी पंडितांना हूसकावून लावण्याकरता दहशतवाद्यांना मदत करणारा देश, शिख बांधवांमध्ये अलग खलिस्तानाची भावना वाढवणारे कपटी राष्ट्र, कारगीलच्या बर्फाळ शिखरांवर घुसखोरी कराणारा विश्वासघातकी शेजारी, देशाच्या वेगवेगळ्या शहरात बॉम्बस्फोट घडवणारी ना 'पाक' शक्ती म्हणजे पाकिस्तान. अशीच पाकिस्तानची वेगवेगळी ओळख लहानपणापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर आंम्हाला होत आलीय.
13 डिसेंबर 2001 हा दिवस आमचीच काय कोणतीही भारतीय पिढी कधी विसरु शकणार नाही. भारतीय संसदेवर, लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरावर या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला रसद पाकिस्तानमधून पूरवण्यात आली हे लगेच सिद्ध झाले. या दिवसानंतर दोन्ही देशाच्या सीमेवरची परिस्थिती कमालीची बदलली. भारतीय लष्कराची मोठी जमावाजमव पाकिस्तानच्या सीमेवर करण्यात आली. कोणत्याही क्षणी पाकिस्तानबरोबरच्या युद्धाला आपला देश आता तयार झालाय. हे आम्हाला जाणवतंय. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यानंतर तर दोन देशांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन अण्विक शक्तींमध्ये युद्ध होऊ नये याकरता जागतिक समुदयाचा मोठा दबावगट कार्यरत आहे. त्यामुळेच या दोन देशांमधले युद्ध गेल्या दहा वर्षांपासून टळत आलंय. परंतु पाकिस्तानबरोबरच्या युद्धाला कधीही या तोंड फूटू शकते याची जाणीव माझ्या पिढीला आहे.
या सा-या इतिहासाची आठवण माझ्या पिढीत ताजी आहे. त्यामुळेच ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या तिस-या आवृत्तीच्या लिलावात पाकिस्तानी खेळांडूंवर बोली लागली नाही याचे दु:ख अथवा आश्चर्यही आमच्या पिढीतल्या अनेकांना वाटले नाही. आयपीएल ही निव्वळ व्यवयासियक स्पर्धा आहे. हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले जातात. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी यामध्ये गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीने तयार केलेले हे मॉडेल आहे. यामुळे यामध्ये निव्वळ व्यवसायिक गोष्टींना सर्वात जास्त महत्व येणे स्वाभाविक आहे.
या स्पर्धेतले संघ मालक जेंव्हा एखाद्या खेळाडूवर बोली लावतात. त्यावेळी त्या खेळाडूकरता लावलेला प्रत्येक पैसा वसूल होईल याची खबरदारी ते घेणार हे उघड आहे. त्यामुळेच संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असलेल्या पोलार्ड, बाँड, रोच आणि पानेर्ल या खेळाडूंना त्यांनी अधिक पसंती दिली. शाहिद अफ्रिदी किंवा उमर गुल या सारख्या खेळाडूंच्या गुणवत्तेबद्दल कोणाला शंका नाही. मात्र राजकीय परिस्थितीमुळे हे खेळाडू भारतात येऊच शकणार नसतील तर त्यांच्यासाठी करोडो रुपये कशाला मोजायचे ?
आयपीएल स्पर्धा मार्चमध्ये सुरु होणार आहे. मार्चपर्यंत अथवा ही स्पर्धा सुरु असताना भारतात एखादा दहशतवादी हल्ला होणार नाही याची खात्री कोणी देऊ शकेल ? मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तान बद्दलचे भारतीय जनमत प्रक्षुब्ध आहे. पाकिस्तानी खेळाडू दहशतवादी नाहीत हे मान्य. पण भारतविरोधी दहशतवादी पुरवणा-या देशाचे ते प्रतिनिधी आहेत हे कोण विसरेल ? देशातल्या नागरिकांच्या रोषाला, राजकीय संघटनेच्या दादागिरीला ते बळी पडू शकतात. अशा परिस्थीत त्यांच्या सुरक्षेचा खर्च संघ व्यवस्थानाने का पेलावा ? यासारखे अनेक प्रश्न या लिलावानंतर उपस्थित झाले आहेत.
या लिलावानंतर पाकिस्तानंमध्ये उमटलेल्या प्रतिक्रीया अनेकांना अतातायी किंवा आक्रस्ताळ्या वाटतील. पण ह्या सर्व पाकिस्तानी मनोवृत्तीला साजेशा अशाच आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळाचा भारतीय दौरा रद्द करण्यात आला. पाकिस्तान संघाच्या कबड्डी दौ-यावरही सरकारी कु-हाड कोसळली. भारत सरकारला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सरकारने केला. पाकिस्तानी केबल चालकांनी आयपीएल स्पर्धा न दाखवण्याचा निर्णय घेतलाय. (भारतीय चित्रपटांनाही पाकिस्तानमध्ये बंदी होती. मात्र त्याकाळातही भारतीय चित्रपटांच्या व्हीडीओ कॅसेट पाकिस्तानात सर्रास मिळत असे ) आयपीएल स्पर्धा ही पाकिस्तानी फॅन्सना या पद्धतीने पाहायला मिळणार यात शंका नाही. आता पीसीबी आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रारही करणार आहे. पाकिस्तानी सडकेपासून ते संसदेपर्यंत सर्व माध्यमातून आयपीएलच्या निमित्ताने तयार झालेले भारतविरोधी वातावरण एकवटण्याचा प्रयत्न सध्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून केला जातोय.
पाकिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थीतीला ब-याच अंशी पाकिस्तानी राज्यकरतेच जबाबदार आहेत. या राज्यकर्त्यांने जे पेरले तेच आता पाकिस्तानमध्ये उगवलंय.. जागतिक दहशतवाद्यांचे पाकिस्तान माहेरघर बनला आहे. आता परिस्थिती आमच्या हातामध्ये नाही याची कबुली पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही दिलीय. त्यामुळेच कोणताही संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला तयार नाही.चॅम्पीयन्स ट्रॉफी, विश्वचषक या सारख्या महत्वाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला गमवावे लागले आहे. श्रीलंका संघाव हल्ला करणा-या मारेक-यांचा शोध अजुनही लागलेला नाही.
पाकिस्तानच्या या सध्याच्या अवस्थेला त्यांचे खेळाडू जबाबदार नाहीत. हे मान्य. पण ज्या देशातून भारतविरोधी शक्तींना सतत खतपाणी घातले जाते. त्याच देशाचे ते प्रतिनिधी आहेत. मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचे ते देशबांधव आहेत. हे आमची पिढी कधीही विसरु शकणार नाही. याबद्दल कोणत्याही पाकिस्तानीला माफ करण्याचा आमचा मूड नाही. आमच्या पिढीची ही मानसिकता ओळखून आयपीएल मालकांनी, 'नो पाकिस्तानी प्लीज ' असा बोर्ड लावला तर त्यात वावगे काय ?