जयंती नटराजन ते दिग्विजय सिंह आणि संजय निरुपम ते अंबिका सोनीपर्यंतचे निष्ठावान, युवा, मागसवर्गीय, अल्पसंख्यांक व महिला काँग्रेसजणांना मागील काही वर्षांपासून लागलेले डोहाळे अखेर पूर्ण झाले. काँग्रेसचे हुशार, व्हिजनरी, शोषिंतांचे प्रेषीत, युवकांचे आधारस्तंभ, वृद्धांची काठी, देशाची एकमेव आशा ( यातील प्रत्येक शब्दामागे किती उद्गारचिन्ह द्यावयचे किंवा नाही हे वाचकाने आपआपले ठरवावे). प्रत्यक्षात ११ राष्ट्रीय सरचिटणींसापैकी एक असलेले राजमान्य राजर्षी राहुल राजीवजी गांधी ( काँग्रेसचे आजी अध्यक्ष सोनिया गांधी व माजी अध्यक्ष माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे चिरंजीव , माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू. माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे पणतू व माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरु यांचे खापर पणतू ). कंसातील वंशावळीचा इतिहास सर्वांनाच माहिती असला तरी तो दिल्याशीवाय राहुल गांधी यांची ओळख पूर्ण होत नाही किंबहूना या घरण्यातील असल्यामुळेच त्यांच्याकडे काँग्रेसचे उपाध्यक्षपद चालून आले आहे. पक्षाने त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपावली.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये गांधी युग अवतरले. महात्मा गांधीच्या बोटाला धरुन जवाहरलाल नेहरु यांनी राजकारण गिरवले, त्यामध्ये जम बसविला आणि नंतर देशाचा कारभार केला. असहकार चळवळीला सुरुवात झाली ते १९२० ते सध्याचे २०१३ म्हणजे मागील ९३ वर्षांत काँग्रेसपक्षाचे नेतृत्व कालावधी सोडला तर या खंडप्राय देशाचे नेतृत्व हे गांधी- नेहरु घराण्यातील नेत्यांनी केला आहे.गांधी नेहरु घराण्याच्या सत्तेला पक्षांतर्गत आव्हान निर्माण करणारे सुभाषचंद्र बोस ते शरद पवार आणि मोरराजी देसाई ते सीताराम केसरी हे सर्व नेते एकतर पक्षाच्या बाहेर गेले किंवा काँग्रेसजनांच्या विस्मृतीच्या कप्प्यात. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केला त्याचवेळी ते पक्षातील दोन क्रमांकाचे नेते असणार हे उघड झाले होते.आता नऊ वर्षांही जयपूरच्या अधिवेशनात ही औपचारिकता पूर्ण झाली इतकेच.
भारतीय निवडणूक रचनेत लोकप्रतिनिधींना पाच वर्षांचा कालावधी दिला आहे. खासगी कंपनीतील कर्मचा-यांचे दर वर्षी तर सरकारी अधिका-यांचेही दर दोन वा तीन वर्षांनी मुल्यमापन होत असते. त्यामुळे नऊ वर्षे हा कालावधी राहुल गांधी यांच्या राजकीय कारकीर्दीचे मोजमाप करण्यास नक्कीच पुरेसा आहे.
जनमानसांची नस ओळखणारे नेते हे काँग्रेस पक्षाचे नेहमीची वैशिष्ट्य राहिले आहे. याच वैशिष्ट्याच्या जोरावर ह्या पक्षाची वृक्षाची पाळेमुळे देशात घट्ट रुजली त्यांना सत्तेची रसाळ गोमटी फळे लागली. केंब्रीज रिटर्न राहुल गांधी हा इंग्रजी बोलणा-या कोणत्याही उच्च मध्यवर्गीय भारतीय युवकाचा असा चेहरा आहे की ज्याचे जमीनीशी कोणते नाते नाही. ( हे नाते शोधण्यासाठीच त्यांना 'भारत की खोज' यात्रे अंतर्गत सनसनाटी दौरे करावे लागतात. ) २००४ मध्ये ते अमेठीचे खासदार झाले. २००७ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अमेठी व रायबरेली या बालेकिल्यात पक्षाचा धुव्वा उडाला. २०१० मध्ये त्यांच्याकडे बिहारची जबाबदरी सोपविण्यात आली बिहारत त्या पक्षाची संख्या एकेरी झाली. मागील वर्षी त्यांनी उत्तर प्रदेश पालथा घातला. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या जागा पूर्वीपेक्षा घटल्या. २०१० नंतर आजवर ते बिहारमध्ये फिरकले नाहीत. मागील वर्षभरात उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी दंगे झाले, कायदा व सुव्यवस्थेचा बो-या वाजला तरी त्यांना आपल्या गृहराज्यात धाव घ्यायला वेळ मिळाला नाही. निवडणुकीती अपयशापेक्षा राजकीय निष्क्रीयपण हे त्यांच्या कार्यक्षमतेवरील मोठे प्रश्नचिन्ह आहे.
त्यांची हीच राजकीय शिथीलता सतत ठसठशीतपणे वेळोवेळी समोर आली आहे. नऊ वर्षांतील संसदीय कारकीदीमध्ये ते बेकबेंचर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. अण्णा हजारेंचे आंदोलन असो वा दिल्लीतील बलात्कार प्रकरण देशातील यंगिस्तानला अस्वस्थ करणा-या त्यांना रत्यावर उतरण्यास भाग पाडणा-या प्रश्नावर एरवी विद्यापीठातील युवकांना भाषणांचा डोस देत फिरणा-या या तरुण तुर्काला सामोरे जाण्याचे धाडस झाले नाही. युपीए -२ मध्ये भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणे उघडकीस आली, सुरेश कलमाडी, ए. राजा पासून ते थेट पंतप्रधानांपर्यंत सर्वजण संशयाच्या फे-यात अडकले असताना राहुल संपूर्णपणे आऊट ऑफ फोकस होते. वास्ताविक सोनिया गांधी मागील वर्षभर आजारपणामुळे सक्रीय राजकारणापासून दूर असताना पक्ष व सरकार यांच्यासाठी संकटमोचक म्हणून भूमिका पार पाडण्याची मोठी संधी राहुल यांना होती. मात्र ती पेलण्याचे धाडस त्यांना करता आले नाही.
जवाहरलाल नेहरु यांच्याकडे स्वांतत्र्य लढ्याची पुण्याई होती. इंदिरा गांधीचा कणखरपणा हा त्यांना तारण्यासाठी पूरेसा होता. राजीव गांधींना अत्यंत अपघाती पंतप्रधान पद मिळाले पण त्यांनी देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विकासाचा पाया रचला. या सगळ्या वंशावळीचा विचार करत असताना राहुल गांधी कुठे आहेत ? राजीव गांधींच्या काळात व नंतरचे अडीज दशके ज्या सॅम पित्रोदा यांची 'आयटी मॅन' म्हणून ओळख होती त्या पित्रोदा यांचे राहुल यांनी सुरुवातीला ओबीसी आणि नंतर गुजराथी असे राजकीय अवमुल्यन केले. देशातील प्रमुख मीडिया विरोधात असतानाही सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करुन देशातील युवकांचे आयडॉल अशी प्रतिमा बनविण्यात राहुल यांचे मुख्य प्रतिस्पर्धी नरेंद्र मोदी कमालीचे यशस्वी झाले आहेत. 'नयी दुनीया' या उर्दू साप्ताहिकापासून ते 'यू ट्यूब ' या ग्लोबल माध्यमापर्यंत विविध पातळीवर वेगवेगळ्या गुगली प्रश्नांना मोदी सामोरे गेले आहेत. तर राहुल यांनी षटकार मारता येतील असे चेंडूही सोडून देण्याचे प्रसंग अधिक आहेत.
'डिकोडिंग राहुल' हे पु्स्तक लिहणा-या आरती रामचंद्रन यांनी त्यांच्या अनुभव कथनामध्ये हीच बाब मांडली आहे. दीड वर्षे सतत पाठलाग करुनही राहुल यांनी आरती यांना मुलाखत देणे टाळले. अखेर त्यांना राहुल यांच्या कार्यालयात लिखीत प्रश्न पाठवावी लागली. वेटिंग प्रायमिनीस्टर म्हणून ओखळले जाणारे राहुल यांचे परराष्ट्र धोरण, अर्थकारण यासारख्या प्रश्नांवर काय भूमिका आहे याचे कोडे नऊ वर्षांनंतरही उलगडले नाही. मागील नऊ वर्षांत त्यांनी कोणत्याही नव्या मतदार वर्गाला काँग्रेसशी जोडलेले नाही. एकाही राज्यातील निकाल त्यांना बदला आले नाहीत. नवे मित्रपक्ष जोडण्यात ते अपयशी ठरलेत, आणि युवा वर्गाचे नेते होण्याच्या शर्यतीमध्ये ते शेकडो मैल दूर आहेत. एक राजकीय नेता म्हणून आवश्यक असलेली भूक त्यांच्यामध्ये दिसत नाही. असे 'द इकॉऩमिस्ट' ने केलेले त्यांचे वर्णन अगदी सार्थ वाटते.
राजकीय भूक नसलेले राहुल पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उडीसामध्ये नवीन पटनाईक, उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम तामिळनाडूमध्ये जयललिता आणि आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यासारख्या मातब्बर नेत्यांचा सामना कसा करणार ? शरद पवार, करुणानिधी, अजित सिंह यासारखी उभी हयात राजकारणात घालवलेल्या वा-याच्या दिशेप्रमाणे टोपी बदलण्यात पटाईत असलेल्या घटकपक्षांना आणखी १६ महिन्यांनी २०१४ मध्येही काँग्रेससोबत ठेवणारे लोहचुंबक त्यांना सापडेल ? २०१४ सोडा आता याच वर्षात दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या चार राज्यांत त्यांचा भाजपशी थेट सामना आहे. या लढाईत सोनियांचे उत्तराधिकारी म्हणून काँग्रेसला मिळणा-या यशापयाशाच्या जबाबदारीपासून त्यांना आजवरच्या परंपरेप्रमाणे टाळता येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आता (तरी) करुन दाखविणार का ?काँग्रेसचे नवे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ह्या प्रश्नापासून पळण्याचे दोर आता कापले गेलेत.