Tuesday, December 23, 2008

दिपस्तंभ !


तुझा आवडता फलंदाज असा कोणी मला अगदी मध्यरात्री गाढ झोपेत असताना प्रश्न विचारला तर मी एकच उत्तर सांगेन राहुल द्रविड..भारतीय संघाला मोठ्य़ा फलंदाजांची कमतरता कधीही नव्हती,विजय हजारंपासून अगदी वीरेंद्र सेहवाग पर्यंत अनेक मोठे फलंदाज भारताला मिळाले आहेत. यापुढही मिळतील.पण या सा-या फलंदाजांच्या मांदियाळीत मि.डिपेंडेबल म्हणता येईल असा एकचं फलंदाज आतापर्यंत भारताला मिळालाय तो म्हणजे राहुल राहुल द्रविड

मला आठवतय,1996 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल भारताच्या संघात आला.वनडे क्रिकेटचा थरार काय असतो हे त्या विश्वचषकात जयसुर्या-कालूविथरणा जोडीनं दाखवून दिलं होत.भारताकडेही त्यावेळी सचिन,जडेजा सिद्धु यासारखे फटकेबाज खेळाडू होते.त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीनचा वारसा सांगणा-या त्याच्याच परंपरेरीतली शैलीदार फलंदाजी करणा-या राहुलनं भारतीय संघात प्रवेश मिळवला.1996 साली ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित त्यानं सौरव गांगुलीच्या साह्यानं कसोटी पदार्पन केलं.चार बाद...अशा एका अगदी नाजूक परिस्थीतीमध्ये त्यानं सौरवच्या साह्यानं हा डाव सांभाळला.या डावात सौरवनं शतक मारलं.मात्र द्रविडला शतकानं पाच धावांनी हुलकावणी दिली.या कसोटीत सौरवच्या शतकाप्रमाणे राहुलच्या 95 धावाही अतिशय महत्वाच्या होत्या.मात्र त्याच्या या महत्वपूर्ण खेळाकडे सा-याच दुर्लक्ष झालं.पहिल्या कसोटीपासून ते सध्याच्या महोली कसोटीपर्यंत सातत्यानं द्रविडच्या फलंदाजीचं मनमोकळं कौतूक जगात झालंच नाही.

राहुलकडं दुर्लक्ष झालं याच कारण तो ज्या काळात खेळायला आला त्याकडे आहे.त्याची फलंदाजी सुनील गावस्कर,हेन्स,बॉयकॉट,हनीफ या खेळाडूंच्या परंपरेतली होती.तर 1996 या वर्षात सचिनचा सूर्य अगदी मध्यावर होता.सचिनच्या फलंदाजींन भारतीय क्रिकेटची परिभाषाचं बदलून टाकली. आक्रमकतेचा नवा मुलमंत्र सचिननं भारतीय क्रिकेटला दिला.त्यानंतरचे सौरव सहेवाग किंवा सध्याचा युवराज सिंग या सा-यांच्या फटका-यांच्या झगमगाटाट द्रविडची फलंदाजीही संपूर्णपणे वेगळी आहे.आज 20-20 च्या या जमान्यात केवळ विध्वंस करणं हीच बॅटींगची व्यख्या झालीय.मात्र ही व्यख्या करणारे हे सोयिस्कर रित्या विसरतात की लढाई केवळ तलवार,बंदूका यांच्यासाह्यानं लढता येत नाही तर ही लढाई जिंकण्यासाठी ढालही तितकीच मजबूत असावी लागते.शत्रूवर हल्ला करण्याकरता एक भक्कम बालेकिल्ला तुमच्याकडं असायला हवा.राहुल द्रविड ही भारतीय संघाची अशी ढाल होती की जी पुढं करुन भारतानं वेगवेगळ्य़ा देशांमधल्या लढाया जिंकल्या.राहुल द्रविड हा असा एक मजबूत खांदा होता की ज्याच्या खांद्यावर भरवसा ठेवून भारतीय तोफा गेली अनेक वर्षे धडाडल्या.

भारतीय संघाचं परदेशात कसोटी जिंकणं म्हणजे जनसंघानं लोकसभेच्या जागा जिंकण्यासारखी परिस्थीती 1996 पूर्वी होती.या जनसंघाचं भाजपमध्ये रुपांतर करण्याचं काम द्रविड या निस्पृह फलंदाजानं केलं.राहुल द्रविडनं केलेल्या नांगरणीनूनच भारतीय संघाला परदेशात विजयाचं पीक काढंता आलंय.सिडनी असो की लाहोर हेडिंग्ले असो की जमेका क्रिकेट विश्वातल्या कोणत्याही कोप-यात भारतानं जे विजय गेल्या दशकात मिळवलेत.त्या विजयात राहुलचा वाटा सर्वात मोठा आहे.2001 साली कोलकता कसोटीमध्ये त्यानं जी अविस्मरणीय भागीदारी व्ही.व्ही.एस लक्ष्मण बरोबर केली.त्याला कोणाताच भारतीय क्रिकेट रसीक कधीच विसरणार नाही.भारताचा सर्वात अविश्वसनीय विजय म्हणूनचं या कसोटीकडं पाहवं लागेल.

द्रविड फक्त कसोटीचा फलंदाज आहे असा आरोप नेहमीच होत आलंय.(याच कारणामुळे काहीही काऱण नसताना त्याला या वर्षाच्या सुरवातीला वनडेतून वगळण्यात आलं.) पण सचिन आणि सौरवनंतर वनडेमध्ये 10 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज आहे फक्त राहुल द्रविड.जे अगदी नवडे स्पेशालिस्ट फलंजा ओळखले जातात त्या विरेंद्र सेहवागचे वनडेत शतकं आहेत 9 आणि सरासरी आहे 33.28,युवराज सिंगची आहेत 10 शतकं आणि 37.16 इतकी सरासरी उलट राहुल द्रविडची अगदी 333 एकदिवसीय सामने खेळूनही सरासरी आहे 39.49.कसोटीमध्येतर त्याच्या दर्जाशी आणि गुणवत्तेशी फक्त सचिनच स्पर्धो करु शकेलं.हे संपूर्ण 2008 खराब जाऊनही त्याची सरासरी आहे 52.52 कसोटी क्रिकेटच्या 100 वर्षांच्या इतिहासात ही सरासरी पार करणारे अगदी मोजकेच फलंदाज असतील.कसोटी खेळणा-या प्रत्येक देशात शतक झळकावाणरे अगदी बोटावर मोजता येतील इतके फलंदाज आहेत.त्या यादिय द्रविडनं स्थान सचिनच्याही आधी मिळवलं होतं.(सचिनचाही या यादीत द्रविडच्या नंतर समावेश झालाय.)

ह्या महान फलंदाजासाठी हे संपूर्ण वर्ष मात्र अगदी खराब गेलं. त्याच्या बॅटला या संपूर्ण वर्षात ग्रहण लागलं होतं.फलंदाजाची स्टार व्हल्यू जेवढी जास्त तेवढी त्याच्या अपयशाचा आवाजही मोठा असतो.टिव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांच्या स्पोर्टस पेजवर हा आवाज सर्वात जास्त घुमतो.द्रविडनं निवृत्त व्हावं का हा सध्या भारतानं पाकिस्तानवर हल्ला करावा का या प्रश्नानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न बनलाय.(हा प्रश्न अजुन भारत-पाकिस्तान युद्दापेक्षा महत्वाचं बनला नाही हे आपल्या सर्वांचे सुदैवंच मानावं लागेल) मात्र आता मोहाली कसोटीमधल्या शतकानं आपण संपलो नसल्याचं त्यानं जगाला दाखवून दिलंय.20-20 क्रिकेटच्या या फास्टफूडच्या जमान्यात द्रविडही सर्व पक्वान्नांनी भरलेली डिश आहे.ब-याचदा आक्रमकता ही बेदरकार ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक संघात असा एका दिपस्तंभ असावाचं लागतो.हा दिपस्तंभ म्हणजे राहुल द्रविड आहे.

मला अनेक गोष्टींची हुरहुर वाटते,आपल्याला लोकमान्य टिळक आणि सावरकरांचे भाषणं ऐकता आली नाहीत.जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वानं भारलेल्या विद्यार्थी शक्तीचा काळ मी अनुभला नाही.गॅरी सोबर्स,डॉन ब्रॅडमन ह्यांची फलंदाजी पाहण्याचं भाग्यही मला मिळालं नाही मात्र मी माझ्या आयुष्यातली 12 वर्ष राहुल द्रविडची फलंदाजी पाहीलीय. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात ही राहुलची ही फलंदाजी मला एक सतत नवी उभारी देत राहील. काळ कसाही असो परिस्थिती कशीही असो न डगमगता न खचता आपलं काम करत राहयचं...माझ्या कुटूंबासाठी माझ्या मित्रपरीवारासाठी त्याहीपुढं जाऊन माझ्या देशासाठी एक मिस्टर डिपेंडेबल बनण्याचा सतत प्रयत्न करायचा ...त्यामुळेच मी या ब्लॉगच्या अगदी सुरवातीला म्हंटलंय की तूझा आवडता फलंदाज कोणता असा प्रश्न मला कोणी अगदी गाढ झोपेत अगदी मध्यरात्री कोणी मला प्रश्न विचारला तर मी सांगेनं राहुल द्रविड !

Tuesday, December 9, 2008

इलेक्ट्रॉनिक मिडिया नवे सॉफ्ट टार्गेट


महाराष्ट्रात कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट घडली तर त्याला गोष्टीला शरद पवारचं जवाबदार आहेत.असं म्हणायची पद्धत गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रचलित आहे.(याला वैतागून लातूरचा भूंकपही मीच घडवला असा आरोप करा असं शरद पवार एकदा म्हणाले होते) त्याच प्रमाणे देशातल्या कोणत्याही घटनेनंतर त्या घटनेची भीषणता वाढण्यास इलेक्ट्रॉनिक मिडियाचं जवाबदार आहे असा आरोप अशा प्रकारचा नवा ट्रेंड सर्वत्र (विशेषत: मुद्रीत माध्यमांमध्ये) प्रचलीत झालाय. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियावर वेगवेगळे आरोप करण्याची जणी स्पर्धाचं वाढलीय. ही स्पर्धा सध्या इतकी वाढलीय की हा हल्ला आपला टिआरपी वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडियानंचं घडवून आणला असा आरोप कोणी केला तर मला याचं आश्चर्य वाटणारं नाही.

सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मुंबईवरचा हा हल्ला एवढा भयानक असेल की याची कल्पना सुरवातीच्या काही तासात कोणालाचं आली नव्हती.अगदी इलेक्ट्रॉनिक मिडियाही त्याला अपवाद नाही.असं असतानाही ह्या हल्ल्ल्याच्या काळात कोणतीही चूकीची अथवा भीती पसरेल अशा प्रकारची बातमी जाणार नाही याची आंम्ही सारे जण काळजी घेत होतो.26/11 च्या रात्री सा-या बातम्या इतक्या वेगानं येऊन आदळंत होत्या की त्या कुठून येतायत हेही कळत नव्हतं.अशा परिस्थीतही देशात कोणत्याही प्रकारचा तणाव वाढेल अशी बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिली नाही.अशा भयानक परिस्थीतीमध्ये अत्यंत संयमानं वार्तांकन कराव याची जाणीव आंम्हा सर्व पत्रकारांना नक्कीच आहे.त्यामुळेच मृतदेह,सांडलेल्या रक्ताचा सडा,अथवा असाप्रकारचे बटबटीत अनेक दृश्य आमच्याकडं असूनही आंम्ही ती दाखवण्याचं टाळलं. तसंच यासंबधीची जी दृश्य दाखवली गेली त्यामधल्या बटबटीत आणि चित्त विचलीत करु शकतील अशी दृश्यांना ''ब्लर'' ही करण्यात आलं होत.

हेमंत करकरे आणि अन्य पोलीस अधिका-यांचा मृत्यू इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच झाला.अशी बातमी एका माझ्या आवडत्या वृत्तपत्राच्या संकेत स्थळावर मी वाचली होती. एकांगी विचाराचा हा अस्सल नमुना आहे.वास्ताविक ज्यावेळी सगळीकडून अंदाधुंद गोळीबार होत होता त्यावेळी टीव्ही बघायला या अधिका-यांना वेळ तरी होता का ? उलट खराब दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेचं या अधिका-यांचा मृत्यू झाला.ही वस्तुस्थीती सरकारसमोर मांडण्याचं काम इलेकट्रॉनिक माध्यमांनीचं सर्वप्रथम केलं.दुसरा आणखी एक फालतू मुद्दा म्हणजे की अतिरेक्यांना टीव्हीमुळे बाहेर काय चालले आहे याची खडा न् खडा माहिती मिळत होती.जणू काही तुमच्या वाहिन्यांवरच्या बातम्या बघूनच ते त्यांची रणनीती ठरवत होते. असा लोकांचा समज होता. पण या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, हे सर्व अतिरेकी अत्यंत तयारीने आले होते आणि आपल्याला काय करायचे आहे याचे पूर्ण भान त्यांना होते म्हणून ते मुंबईचे एवढे नुकसान करु शकले.ताज आणि ओबेरॉय मधील विद्युतप्रवाह आणि टीव्ही कनेक्शन त्वरीत बंद केले होते याची माहिती जनतेसमोर दडवण्यातचं अनेकजण धन्यता मानत आहेत.

उलट ह्या हल्ल्याची परिणामकारता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच तात्काळ सा-या जगभरात पोचली.हा हल्ला किती गंभीर आहे.ह्याची जाणीव देशातल्या नागरिकांना या बातम्यांमुळे तात्काळ झाली.त्यामुळेच या हल्ल्याच्या दुस-या दिवशी अनेक मुंबईकरांनी घराबाहेर जाणं टाळलं.त्यामुळे मुंबईच्या व्यवस्थेवर निर्माण होणारा ताण यामुळेचं टळला.या महत्वाच्या प्रसंगी राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता सर्वांपर्यंत पोचवण्याचं कामही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीच केलं. आर.आर.पाटलंच या हल्ल्याबाबतचं धक्कादायक विधान,विलासराव देशमुखांची ताज टूर याच माध्यमांमुळे जनतेपर्यंत पोचली. शिवराज पाटील सारख्या संवेदनशून्य नेत्याचे 'कपडे' काढण्याचं काम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीचं अनेक वेळा केलं आहे.

ह्या हल्ल्याच्या पाठिमागेही पाकिस्तानचं कनेक्शन आहे.ह्याची जाणीव अगदी पहिल्याच क्षणी सा-यांना झाली होती.तरीही ठोस पुरावा हाती आल्याशिवाय या प्रकरणात पाकिस्तानचं नावं घेणं इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी टाळंलं.ह्या नाजूक क्षणी कोणताही नवा तणाव निर्माण होणार नाही ह्याची काळजी सर्व माध्यमं घेत होती.एक याबाबत आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की इलेक्ट्रॉनिक मिडियात कोणतीही बातमी सांगताना ती बातमी सिद्ध करणारी VISUALS , BYTE असल्याशिवाय दाखवता येत नाही.बाप दाखव नाही तर श्राद्ध करं असा हा प्रकार असतो.उलट वृत्तपत्रामधल्या अनेक बातम्या ह्या टेबल न्यूज असतात हे अगजी उघड गूपीत आहे.कदाचित याच कारणामुळे इलेक्ट्रॉनिक मिडियाची सर्वसामान्य जनतेमधली विश्वासहर्ता जास्त आहे.(नेमक्या याच असूये पोटी इलेक्ट्रॉनिक मिडियाला वारंवार टार्गेट केलं जात नसेल ना ? )

युद्ध, दहशतवादी हल्ला अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये माध्यमांचं व्यवस्थापन कसं करावं याचं व्यवस्थापन या देशात अजूनही विकसीत झालेलं नाही.ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या कमांडो कारवाईची दृश्य दाखवली गेली नाही.कारण या ठिकाणी कारवाई करणा-या कमांडोमनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांना अशा प्रकारची सूचना केली होती.सर्वच माध्यमांनी ही सूचना पाळली.यापूर्वीही जम्मूमध्ये झालेल्या एका लष्करी ऑपरेशनमध्ये प्रसिद्धी माध्यमांना घटनास्थळाच्या दोन किलोमीटर आगोदरच थांबवण्यात आलं होतं.ह्या निर्णयालाही कोणत्यीच प्रतिनिधीनं विरोध केला नाही. अशा नाजूक प्रसंगी सरकारशी सहयोग आंम्ही नेहमीच केला आहे.मात्र सरकारी यंत्रणेमध्येच जर समन्वय नसेल तर या भोंगळ कारभारचं खापर इलेक्ट्रॉनिक मिडियावर फोडण्याचं काम सरकारकडून केलं जातं.

या देशात 24 तास काम करणा-या वृत्तवाहिन्याचं वय अवघी दहा वर्षे आहे. या अपु-या अनुभवामुळे या माध्यमांकडून कळत नकळत काही चूका झाल्या असतील.अशावेळी या चुका संमजसपणे निदर्शनास आणून देण्याचं काम या देशातल्या उज्जवल परंपरा असलेल्या वृत्तपत्रांनी करावं.या माध्यामातल्या पत्रकारांना हा वडीलकीचा नक्कीच अधिकार आहे.परंतु या पत्रकारांकडून सध्या उघड उघड भाऊबंदकी सुरु आहे. याच वृत्तपत्रांनी घालून दिलेल्या ट्रेंडच पालंन लबाड राजकारणी,बेजावबदार पोलीस अधिकारी किंवा निगरगट्ट प्रशासकही करु लागलेत.या सा-यांना इलेक्टॅनिक मिडियाच्या रुपानं एक नव स्फॉट टार्गेटचं सापडलंय.अशा प्रकारचा अंधाधुंद हल्ला आणखी किती काळ करायचा याचा विचार ज्यानं त्यानंच करायला हवा.

Thursday, December 4, 2008

दोन लातूरकर..




मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्यानंतर दोन लातूरकरांचा राजकीय बळी गेलाय.या हल्ल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभापूढे नमतं घेत (खर तर निवडणुकांची गणितं समोर ठेवून) गृहमंत्री शिवराज पाटील आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा देण्याचे निर्णय कॉँग्रेस हायकमांडन दिले.केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचं मुख्यमंत्री ही दोन्ही अत्यंत महत्वाची पदं गेली चार वर्षे लातूरकडं होती.लातूरचं नाव देशात चर्चेत ठेवण्यात या दोन नेत्यांचा नेहमीच महत्वाचा वाटा राहीलाय.एक लातूरकर या नात्यानं या दोन्ही नेत्याची राजकीय काराकीर्द मला जवळून पाहता आलीय.
मला आठवतीय 1996 लोकसभा निवडणूक शिवराज पाटील हरणार असंच सा-या लातूर शहरात वातावरण होतं.त्यांच्या विरोधात गोपाळराव पाटील सारखा तगडा उमेदवार भाजपनं दिला होता.त्या काळातला भाजप हा आजच्या भाजपपेक्षा बराच सोज्जवळ होता.भाजपची सा-या देशभर हवा होती.अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुपानं पंतप्रधान पदाचा एक चांगला उमेदवार देशापुढं होता.त्या अटलजींच भाषण ऐकण्याकरता लातूरच्या राजस्थान शाळेच्या मैदानावर मोठी गर्दी झाली होती.मी अटलजींच प्रत्यक्ष ऐकलेलं ते पहिलं भाषण..सारा जीव कानात एकवूटन मी अटलजींच प्रत्येक भाषण ऐकलेलं आहे.त्या भाषणात अटलजी एक वाक्य बोलले होते,''शिवराज पाटील बहूत अच्छे नेता है उन्होने संसद काफी अच्छी तरहसे चलायी''अटलजींच्या त्या एकाच वाक्यामुळे माझ्या मनात शिवराज पाटील यांच्याबद्दलचा आदर अनेक वर्ष टिकवून ठेवला होता.
खरतर शिवराज पाटील यांची प्रकृती ही परंपरागत राजकारण्यासारखी कधीच नव्हती.पांढरे बूट,पांढरी कडक इस्त्रीची सफारी,चोपून बसवलेला भांग आणि अगदी अगम्य इंग्रजी बोलणारा माणूस म्हणजे शिवराज पाटील अशीचं त्यांच्याबद्दल माझी लहाणपणी प्रतिमा होती.ते 1972 पासून राजकारणात आहेत.या 36 वर्षात आमदार,खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष,अगदी केंद्रीय गृहमंत्री अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवली.पण या 36 वर्षात त्यांनी लातूरकरता काय केलं याचा शोध मला आजपर्यंत कधीच लागलेला नाही.राजकारणी लोकांप्रमाणे जनसंपर्क,कार्यकर्त्यांचा गराडा,सर्वसामान्य जनतेची वर्दळ या माणसानं कधीचं अनुभली नाही.हा गांधी घराण्याशी निष्ठा हा महत्वाचा कॉँग्रेसी बाणा
त्यांच्यामध्ये पुरेपूर भिनलाय..
मला आठवतंय 30 स्पटेंबर 1993 ला लातूर जिल्ह्यात मोठा भूकंप झाला होता.या भीषण भूकंपानंतर सा-या जगभरातून लातूर जिल्ह्यात मदत कार्य सुरु होतं.या सा-या मदतकार्यात हे आमचे लातूरचे सन्माननीय खासदार महाशय पूर्णपणे गायब होते.ते अवतरले थेट सोनिया गांधीच्या लातूर दौ-यात.त्या काळात सोनिया गांधी सक्रीय राजकारणात नव्हत्या.पण भूकंपग्रस्तांची पाहणी करायला म्हणून पहिल्यांदाच जाहीररीत्या त्या जनतेत आल्या होत्या.हे आमचे खासदार लातूरच्या ग्रामीण भागात अपला सूट सांभाळत दबकत दबकत फिरत होते.कोण काय म्हणंत ते बाईंना इंग्रजी अनुवाद करुन सांगत होते.या आपत्तीमध्ये शिवराज पाटलांचे आंम्हाला झालेले हे एकमेव दर्शन.
गांधी घराण्याच्या याच निष्ठेचं फळं त्यांना 2004 साली मिळालं.वास्ताविक ते लातूरची लोकसभा निवडणुक हरले होते.(मी आणि माझ्या मित्र कंपनीनं केलेलं ते पहिलं मतदान,आमच्या मतामुळे एक मातब्बर निष्क्रीय खासदार हरला याचा आनंद आंम्हा सा-यांना होता.) पण या निकालानंतर सोनिया गांधीनी आंम्हाला मोठा धक्का दिला.ज्या शिवराज पाटलांना लातूरकरांनी नकारलं होतं त्या शिवराज पाटलांना त्यांनी थेट गृहमंत्री म्हणून सा-या देशाच्या डोक्यावर बसवलं.
त्याच्या अगदी उलट विलासरावांचं राजकारण होतं.बाभुळगावच्या सरपंचपदापासून त्यांनी आपली काराकिर्द सुरु केली.ते लातूरचे आमदार बनले.अंतुलेंच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री बनले.त्यांच्याच प्रयत्नामुळे 1982 साली लातूर जिल्हा बनला.त्या नंतरच्या 26 वर्षात विलासरावांनी अनेक वेगवेगळी मंत्रीपद सांभाळली.1999 साली मुख्यमंत्री होण्यापूर्वी जवळपास सा-या खात्याच्या मंत्रीपदाचा त्यांना अनुभव होता.एक आमदार म्हणून मंत्री म्हणून मोठं होत असताना त्यांनी लातूरच्या विकासाकडंही जातीनं लक्ष पुरवलं हे मान्य करावचं लागेल.आज लातूर जिल्हा हा महाराष्ट्रातला एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो.नैसर्गिक दृष्ट्या लातूरकडं कोणतीही जमेची बाजू नाही.रेल्वे सारख्या विकासाच्या महत्वाच्या दळणवळण साधनापासून लातूर अगदी अलिकडच्या काळापर्यंत अलग होत.( लातूरमधल्या माझ्या अनेक मित्रांनी वयाच्या 17 व्या 18 वर्षी पुण्यात आल्यावर पहिल्यांदा रेल्वे पाहिली आहे) या सर्व अडचणींवर मात करत लातूर विकासाच्या दिशेनं झेपावतंय.याचं महत्वाचं श्रेय विलासरावांच्या नेतृत्वालाच द्यावं लागेल.
या दोन्ही लातूरकरांची शेवटचा कार्यकाळ मात्र नेहमी वादग्रस्त ठरला.कॉँग्रेसमधला सर्वात सोयीचा नेता म्हणून शिवराज पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आलं.तर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला छेद देणारा तगडा मराठा नेता म्हणून विलासराव दुस-यांदा मुख्यमंत्री झाले.शिवराज पाटलांच्या काळात देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे पार वाभाडे निघाले.दिल्ली,जयपूर,हैदराबाद,बेंगळूरु,अहमदाबाद,मालेगाव यांच्यासह गुवाहटी,आगरतळा या सारख्या इशान्य भारतामधल्या देशात बॉम्बस्फोट झाले.मुंबईवर हल्ला करुन दहशतवाद्यांनी सा-या देशाशीच युद्ध पुकारलं होतं.तरीही दहशतवाद्यांना शोधून काढू आणि त्यांना कठोर शासन देऊ, अशी साचेबंद प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी प्रत्येक वेळी दिली.दिल्ली बॉम्बस्फोटानंतर तरदेशाचे गृहमंत्री ठिकठिकाणी भेट देण्यासाठी आपले सफारी सूट बदलण्यात मश्गूल होते. सुरक्षा दलांना आवश्यक ते आदेश देण्यापेक्षा आणि बॉम्बस्फोटातील जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यापेक्षा त्यांना आपले कपडे बदलणे महत्त्वाचे वाटले.सा-या देशाला या सुटातल्या 'निरोची' लाज वाटली होती.
विलासरावांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही अनेक आपत्ती राज्यावर आल्या.26 जुलैला मुंबईत झालेली अतिवृष्टी,रेल्वे बॉम्बस्फोट,खैरलांजी प्रकरण, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या या प्रत्येक आपत्तीत विलासरावांच सरकार ढिम्मचं राहीलं.राज ठाकरेंच्या काठीनं शिवसेनेचा साप मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला.राज यांची जी लार्जर दॅन लाईफ प्रतिमा मुंबई आणि परिसरात निर्माण झालीय.ही प्रतिमा बवनण्यात विलासराव सरकारचाचं मोठा वाटा आहे.मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला या दोन्ही लातूरकरांच्या अकार्यक्षम कारभाराचा कळसअध्याय ठरला.कोणतीही आपत्ती असू दे बेफिकीर राहयची सवय विलासरावांना लागली होती.याच बेफीकीरीतून ते ताज हॉटेलची पाहणी करायला रामगोपाल वर्माला घेऊन गेले.माध्यमांनी हे सर्व प्रकरण उचलून धरल्यानंतरही त्यांचा देशमुखी बेफीकीरपणा कमी झालेला नव्हता.
आता या दोन्ही लातूरकरांच्या खुर्च्या गेल्या आहेत.एकुण विचार केला तर शिवराज पाटील यांची राजकीय काराकिर्द आता संपली असंच म्हणावं लागेल.विलासराव देशमुखांना मात्र कॉँग्रेस पक्षामध्ये अजुनही भवितव्य आहे.कोणतीही राजकीय परिस्थिती नसताना हे दोन्ही लातूरकर देशाच्या तसंच राज्याच्या राजकारणात मोठे झाले.पश्चिम महाराष्ट्रातल्या तसंच उत्तर भारतामधल्या प्रबळ लॉबीला नमवून महत्वाची पद त्यांनी हस्तगत केली.एवढी महत्वाची पद मिळूनही हे नेते स्वत:च्याच धुंदीत मग्न राहीले.हायकमांडची मर्जी राखण्याकरता त्यांनी जितकी खटपट केली त्याच्या निम्मी जरी कार्यक्षमता दाखवली असती तरी त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती.
राजकीय क्षेत्रातल्या या नेत्यांच्या लातूर पॅटर्नला आज सेटबॅक बसला आहे.मात्र ह्या नेत्यांच्या चुकांपासून बोध घेत विकासाचा,कार्यक्षमतेचा प्रगतीचा नवा लातूर पॅटर्न कोण निर्माण करणार हा प्रश्न माझ्यातल्या एका लातूरकराला पडलाय.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...