Friday, December 21, 2012

नरेंद्र मोदी 3.0


कोणाला ते 'गुजरातचे हिटलर' वाटतात. तर कुणी त्यांना विकासपुरुष म्हणून संबोधतात. त्यांना 'मौत के सौदागर'  ठरवू पाहणारा मोठा शक्तीशाली गट या देशात कार्यरत असताना त्यांच्या पंतप्रप्रधानपदाच्या राज्याभिषेकाची तयारी करणा-यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. तथाकथत बुद्धीजवी वर्ग (?) त्यांच्या विकास मॉडेलचा फोलपणा शोधण्याचा व तो मोठा करण्याचा खटाटोप करत असताना  जगभरातील 'नेटकर' तरुणांमध्ये त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे. कोणत्याही घराण्याचा वारसा नाही की चित्रपटाची पार्श्वभूमी नाही. असे असूनही नरेंद्र मोदी हे सरत्या दशकातील ( 2002 ते 2012 ) भारतामधील सर्वात चर्चीत मुख्यमंत्री आहेत.
   गुजरातमध्ये भाजपने सलग पाचव्यांदा सत्ता हस्तगत केली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा सलग तिसरा विजय. सलग तीनदा सत्तेवर येणारे ते भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. लागोपाठ पाच निवडणुकीत भाजपला जनादेश देणारे गुजरात हे देशातील एकमेव राज्य. त्यामुळेच हा विजय हा नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांप्रमाणेच  भाजपच्या मतदारांनाही सुखावणारा आहे.
2002 आणि 2007 च्या निवडणुका ह्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर मोदींनी जिंकल्या . आता यातील काहीच उपयोगी पडणार नाही.सौराष्ट्रमध्ये पटेल आणि लेवा पाटील नाराज आहेत. उत्तर गुजरातमधील शेतकरी देशोधडीला लागलाय. कच्छमध्ये अपु-या पाण्याच्या दुष्काळात मोदी होरपळणार. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मोदींचा पराभव हवाच आहे. संघ परिवार त्यांच्यावर नाराज आहे. मुस्लिम तर त्यांच्या बाजूने कधीच नव्हते असा दावा करत मोदी विरोधाची हवा तापवणारे 'इलेक्शन इंटलेक्च्युअल्स' मोदींच्या दोन जागा कमी झाल्या की !!! असे सांगत गरबा खेळत आहेत. किंवा आपणच मांडलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणापेक्षा मोदींना जागा कमी मिळाल्या त्यामुळे मोदींनी आत्मपरिक्षण करावे असा शाहजोग सल्ला आज दिवसभर दिला जातोय. ( आता हे सर्वेक्षण केल ते यांच्या 'पेड' सर्वेक्षकांनी. ते चुकले हे या माध्यमांची व त्यांच्याशी संबंधित असलेल्या मंडळींची जबाबदारी न ठरता मोदींचे अपयश कसे ठरते हे मला पामराला न उलगडलेले कोडे आहे. )
      अटलजींच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरण्यात अपयशी ठरलेल्या भाजपमध्ये मोदींनी नंबर वन पदासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. प्रचारामध्ये मनमोहन सिंग सोनिया/ राहुल गांधी यांना टार्गेट करणे किंवा विजयानंतरचे भाषण गुजरातीमध्ये न देता देशाला समजण्यासाठी हिंदीमध्ये देणे या सारख्या संकेतांमधून मोदींची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा सर्वांसमोर आलेली आहे. मोदींच्या पक्षांतर्गत स्पर्धकांपैकी अडवाणींची दावेदारी वाढत्या वयोमानानुसार कमकुवत होत चालली आहे. सुषमा स्वराज भाषण तर सुरेख करतात. पण निवडणुका जिंकण्याचा त्यांचा इतिहास फारसा बरा नाही. ( त्यांच्ये नेतृत्वाखालील दिल्ली भाजपला 14 वर्षांपूर्वी काँग्रेसने धूळ चारली होती.त्यानंतर आजपर्यंत दिल्लीत भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही) आणि अरुण जेटली उत्कृष्ट बोर्ड रुम मॅनेजर असले तरी लोकसभेच्या रणधुमाळीत पाऊल ठेवण्याचे धाडस त्यांना अजूनही जमलेले नाही. दोन लोकसभा निवडणुकीतील पराभव, जबाबदार नेत्यांमधील बेजाबाबदार विधान करण्याच्या स्पर्धेमुळे पक्षावर निष्ठा असणा-या लाखो कार्यकर्त्यांची आज गोची झालेली दिसते. पराभूत मानसिकतेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मोदींचा सहारा भाजपला वाटतोय तो यामुळेच मोदींच्या तिस-या इनिंगला त्यामुळेच मोठे महत्व आले आहे.
       अर्थात गांधीनगर ते नवी दिल्ली हे अंतर पार करत असताना मोदींसमोर दोन मोठे अडथळे आहेत.पहिला  अडथळा अर्थात मोदींच्या टेंपरामेंटचा आहे. एककल्ली स्वभावाचे आणि एकपक्षीय सरकारमध्येही एकाधिकारशाही गाजवणारे मोदींना आघाडी धर्माचे पालन कितपत करता येईल ? 'पार्टी विथ डिफरन्सेस'
म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपमधील गटतटांना चुचकारण्यापासून ते संघ परिवाराशी पुन्हा जवळीक वाढविण्यापर्यंतच्या कसरती करणे हे मोदींसमोरील पहिले आव्हान असेल.
मोदी कार्डचा वापर केल्यास मित्रपक्ष मिळवतानाही भाजपची दमछाक होणार हे उघड आहे.जदयू सारख्या रालोआमधील जुन्या घटक पक्षाचा मोदींना तीव्र विरोध आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीमुळे अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, तृणमूल काँग्रेस हे रालोआचे संभाव्य मित्र पक्ष आघाडीपासून पुन्हा दूर जाण्याची शक्यता आहे.
अगदी सर्व अनुकूल बाजू आणि प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा गृहीत धरल्यानंतरही भाजपला 200 पेक्षा जास्त जागा 2014  मध्ये मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि अकाली दल वगळता अन्य मित्र पक्षांना जवळ करण्यासाठी मोदींपेक्षा स्वराज किंवा जेटली हे मध्यममार्गी नेतृत्वाला पसंती मिळू शकते.
2004 मध्ये रालोआ सरकारचा पराभव झाला, 2014 मध्ये या पराभवास दहा वर्षे होतील. मागील दहा वर्षात मनमोहन सरकाराच्या राजवटीला जनता निश्चितच कंटाळलेली आहे. वाढती महागाई, नित्य नव्या शुन्यांची भर घालत उघडकीस आलेले घोटाळे, रबर स्टॅम्प पंतप्रधान, धोरण लकव्यामुळे आलेली आर्थिक क्षेत्रातील मरगळ,काळा पैसा धारकांची यादी लपविण्यासाठी चाललेला खटाटोप, फाळणीचा इतिहास विसरून मतपेढी समोर डोळा ठेवून अल्पसंख्यांकाना आरक्षण देण्याचे होत असलेले प्रयत्न, ईशान्य भारताचे होत असलेले बांग्लादेशीकरण, अपु-या शस्त्रसज्जतेची लष्करप्रमुखांनीच दिलेली कबुली, दहशतवादी संघटनाचे जाळे उद्धवस्त करण्यात आलेले अपयश, यामुळे जनतेमधील असलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी समर्थ विरोधी पक्ष नेत्याची आवश्यकता आहे. तो समर्थ पर्याय देण्याची क्षमता मोदींमध्ये निश्चितच आहे.
   अहमदाबादमध्ये चहाचा स्टॉल चालविणारा पो-या ते पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार हा मोदींचा प्रवास  राजकीय अभ्यासाचा विषय आहे. दंगलपुरुष ही  झालेली प्रतिमा सुधारत विकासपुरुष म्हणूनही ओळख निर्माण करण्यात मोदींची दुसरी इनिंग कामी आली. आता गुजरातच्या बाहेर पडताना, देशातील सर्वात शक्तीशाली गांधी घराणे आणि 'ग्रॅँड ओल्ड पार्टी' असलेल्या काँग्रेसला देशव्यापी पर्याय बनण्यासाठी मोदींना आपल्या तत्वांना मुठमाती न देता स्वभावाला मुऱड घालण्याचे मोठे आव्हान आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या देशाच्या विकासाचा सौदागर होण्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी या इनिंगमध्ये त्यांना मिळणार आहे. मोदींच्या तिस-या आवृत्तीला यामुळेच केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक महत्व प्राप्त झाले आहे.
     
टीप - नरेंद्र मोदींवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
     

Monday, November 26, 2012

यांची आम्हांला लाज वाटते !


महेंद्रसिंग धोनी, अॅलिस्टर कूक, मायकल क्लार्क, ग्रॅमी स्मिथ, महेला जयवर्धने आणि रॉस टेलर यांच्यात काय साम्य आहे ? तर हे सर्व जण सध्या आंतरराष्ट्रीय टीमचे कॅप्टन आहेत. धोनी आणि अन्य कॅप्टनमधील फरक काय ? तर हे सर्व कॅप्टन्स सध्या सुरु असलेल्या  टेस्ट मॅचमध्ये आपल्या टीमच्या वाटचालीत निर्णायक भूमिका ( कॅप्टन्स नॉक ) बजावत आहेत. ( यामधील महेला जयवर्धनेने हा ब्लॉग लिहत असताना कोलोंबो टेस्टमध्ये फलंदाजी केली नव्हती. मात्र यापूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेच्या अंतिम फेरी पर्यंतच्या वाटचालीत त्याचा वाटा सिंहाचा होता. )
     महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होऊन आता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. दोन विश्वचषक जिंकले ही सर्वात जमेची बाजू. पण आज त्या विश्वचषक विजयाचा आढावा घेत असताना काय लक्षात येते ? 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या दरम्यान टी-20 हा प्रकार जागतिक क्रिकेटला नवा होता. टीम इंडियासह कोणत्याच  संघाला याचा फारसा सराव नव्हता. युवराज सिंगचा जबरदस्त फॉर्म आणि त्याला अन्य युवा खेळाडूंनी दिलेली साथ ह्याच्या जोरावावर आपण तो विश्वचषक जिंकला. हां आता फायनलमध्ये धोनीचा जुगार फळला की मिसाबह-उल-हकचा उतावीळपणा पथ्यावर पडला ह्यावर वाद होऊ शकतो. ठीक आहे, आपण धोनीच्या कल्पकतेला संशयाचा फायदा देऊ. मग ही कल्पकता नंतरच्या तीन टी-20 विश्वचषकात कुठे लोप पावली ?

     त्यानंतरचे दोन विश्वचषक धोनीने सर (!!!) रवींद्र जाडेजाच्या प्रेमापोटी ओवाळून टाकले.यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीरेंद्र सेहवागला बसवले. फॉर्म हाच निकष लावयचा असेल तर सेहवागच्या आगोदर रोहित शर्माचा नंबर होता. पण रोहित प्रत्येक मॅच खेळला. कांगारुंनी आपल्या फलंदाजाचे नेहमीचेचे कच्चे दुवे हेरुन नेहमीप्रमाणेच आखूड टप्याचे चेंडू टाकले. भारतीय बॅटिंग गडगडली.आणि धोनीसाहेबांनी वॉटसन आणि वॉर्नर या कसायांच्या जोडीसमोर हरभजन आणि चावला हे भंपक बॉलर्स उभे केले. नऊ विकेट्सने सपाटून पराभव झाला. रनरेटचे गणित बोंबलले, ते शेवटपर्यंत सुधारलेच नाही.

आता 2011 च्या विश्वचषकाचा मागोवा घेऊया.मला आपल्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचा कुठेही अपमान करावयाचा नाही किंवा संशयही घ्यायचा नाही. पण त्या विश्वचषकात अन्य देशांची स्थिती कशी होती ? ऑस्ट्रेलिय टीम 'अॅशेस'च्या राखेतून बाहेर पडली नव्हती. इंग्लंडला भारतीय उपखंडात कधीच फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिका चोकर्स म्हणूनच ओळखली जाते. वेस्ट इंडिजचा      बो-या वाजलेला होता. न्यूझीलंडच्या यशाला नेहमीच मर्यादा असतात. पाकिस्तानचा कधीच भरवसा देता येत नाही. आता उरलेले दोन महत्वाचे संघ भारत व श्रीलंका फायनलमध्ये आले.
   फायनलमध्ये सुरुवातीच्या यशाचा फायदा उचलण्यात भारतीय बॉलर्स अपयशी ठरले. ( हे आपले नेहमीचे दुखणे आहे, दोन-तीन विकेट्स झटपट मिळाल्या की आपली टीम गाफिल होते. नंतर मग एखादी जोडी अशी काही जमते की यापूर्वीच्या सर्व कामगिरीचा बट्याबोळ होतो) झहीरने शेवटच्या स्पेलमध्ये 2003 च्या फायनलची आठवण करुन दिली. जयवर्धनेने एक अविस्मरणीय शतक झळकावले. आपल्यासमोर आव्हानात्मक टार्गेट होते.
        या टार्गेटचा पाठलाग करताना धोनीने स्वत:ला बढती दिली. त्याचा जुगार पुन्हा यशस्वी ठरला. पण फायनलमध्ये श्रीलंकाच्या ऐवजी ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका असते तर धोनी पाचव्या क्रमांकावर आला असता का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहवा. मलिंगाचा पहिला स्पेल संपला होता. त्यामुळे त्याला शेवटासाठी राखून ठेवणे संगकाराला भाग होते. मुरलीधरन आणि निवृत्ती यामध्ये काही तासांचे अंतर उरले होते. मलिंगा आणि मुरलीशिवाय बाकी लंकेची बॉलिंग खेळणे धोनीला आरामात शक्य होते. ब्रेट ली, जॉन्सन. शॉन टेट किंवा मॉर्केल, स्टेन, कॅलीस ह्या मा-यासमोर धोनीने पाचव्या क्रमांकावर खेळण्याचे धाडस केले असते आणि तो त्यात यशस्वी ठरला असता हे  त्याच्या आजवरच्या इतिहासाचा आणि फलंदाजीतील वकूबाचा अभ्यास करता अगदी अशक्य वाटते.
        वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे कोच बदलले. धोनी-फ्लेचर जोडीने परदेशातील सलग आठ टेस्टमध्ये शरणागती पत्कारली. अगदी औषधालाही एखादी कसोटी वाचविता आली नाही. टीम इंडियाचे वस्त्रहरण  
 झाले.  
     आता सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लंड सीरिजला बदला सीरिज असे रुप आले आहे. अगदी बरोबर आहे. पण फॉर्मात नसलेल्या हरभजनला खेळवून बदला कसा पूर्ण होणार हा माझा प्रश्न आहे. सध्या सर्वच देश नव्या खेळाडूंना संधी देत आहेत. आपण मात्र तिसरा पर्याय म्हणून हरभजनची निवड करतो. वास्तविक इक्बाल अब्दुल्ला किंवा हरमीत सिंग हे युवा गोलंदाज आपल्याकडे आहेत. त्यांची शैलीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अगदीच अपरिचीत आहे.त्यांचा फायदा घेण्याची कल्पकता निवड समितीला दाखविता आली असती. धाडसी खेळ आणि डावपेचांसाठी प्रसिद्ध असलेल्या संदीप पाटील यांनी हरभजनला घेत टीमला  बॅकफूटवर ढकलले.
    आपल्या कॅप्टनची मागील काही कसोटीतील सरासरी ही अगदी अश्निनपेक्षाही कमी आहे. अहमदाबाद कसोटीत इंग्लंडच्या पडझडीतही कूकने लाजवाब संघर्ष केला. भारतीय खेळपट्यांचा धसका घेतलेल्या इंग्लिश संघला अहमदाबामध्ये 'कूकस्पर्श' मिळाला. कॅप्टन कूकने जागवलेल्या याच आत्मविश्वासाच्या जोरावर इंग्लिश संघाने साडेतीन दिवसांत टीम इंडियाची माती केली. दोन्ही डावात संघाची गरज पूर्ण करण्यात आपले 'कॅप्टन कूल' सपशेल अपयशी ठरले.

 भारतीय टीमच्या या पराभवात धोनीच्या बरोबरीने टीमचे कोच डंकन फ्लेचरही गुन्हेगार आहेत. फ्लेचरच्या काळात धोनी-सेहवागमधील शीतयुद्ध पुन्हा सुरु झाले. लक्ष्मणच्या खराब फॉर्मवर त्यांना शेवटपर्यंत उत्तर सापडलेच नाही. गौतम गंभीरने शेवटचे कसोटी शतक कधी झळकावले आहे हे आता राम गोपाल वर्मांनी शेवटचा चांगला चित्रपट कधी केला हे आठवण्याइतके अवघड होऊन बसले आहे. हरभजनचा भंपकपणा कायम आहे. रैनाची टेस्टमधील दैना अजून संपलेली नाही. विराट कोहली तर मागील दोन टेस्टमध्ये बाद झाल्यानंतर पॅव्हीलियनमध्ये परतताना वेगवेगळ्या भावना कशा दाखवयाच्या याचा सराव करत आहे. मनोज तिवारीचा उमेदीचा कालखंड बारावा खेळाडू म्हणून वाया जातोय. 'फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट' असे क्रिकेटमध्ये नेहमी म्हंटले जाते. मात्र 'बॉलिंग इज टेम्पररी बॅटिंग इज परमनंट ' अशी अश्विनची अवस्था झाली आहे. थोडक्यात त्याचा इरफान पठाण होण्याची चिन्हे आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यासारख्या देशात नव्या गोलंदाजांची फौज तयार होत असताना अजूनही फ्लेचर साहेबांना झहीरचा वारसदार शोधता आला नाही. त्यातच सचिन आणि झहीर हे दोघे आता अस्ताला आलेत. त्यांच्यानंतर टीम इंडियाची टेस्ट मॅच पाहणे सोडून द्यावे असा माझा विचार आता प्रबळ होत चालला आहे.
        पीटरसन-फ्लॉवरमधील संघर्ष सा-या जगाने नुकताच पाहिला. अहमदाबाद कसोटीत पीटरसन फ्लॉप झाल्यानंतर ह्याच फ्लॉवरने ग्रॅहम गूचच्या मदतीने पीटरसनच्या कच्या दूव्यावर मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचे फळ इंग्लंडला मिळाले.ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सीरीजमधील पहिल्या टेस्टमध्ये टीम अडचणीत असताना क्लार्कने डबल सेंच्युरी झळकावली. अॅडलेडमध्ये कांगारुंच्या विशाल धावसंख्येला उत्तर देताना ग्रॅमी स्मिथमधला कॅप्टन जागा झाला. कस्टर्न आणि कंपनीने केलेल्या मार्गदर्शनामुळेच ड्यू प्लेसीला आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये तेही चौथ्या डावात शतक झळकवता आले. कॅप्टन आणि कोच प्रेरणादायी असले की टीमच्या कामगिरीत सकारात्मक बदल तात्काळ दिसून येतात. हेच बदल घडविण्यात धोनी आणि फ्लेचर अपयशी होत आहेत. त्यामुळेच धोनी व फ्लेचर यांची आम्हांला लाज वाटते ! 

टीप- महेंद्रसिंग धोनीवरील कब तक धोनी ? हा माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Friday, August 10, 2012

वंचित समाजाचे बटबटीत वास्तव

 हिंदी चित्रपट निर्माते- दिग्दर्शक दोन प्रकारचे असतात एक प्रेक्षकांना गृहित धरणारे  आणि दुसरे  प्रेक्षकांच्या बुद्धीमत्तेवर  विश्वास ठेवून त्यांच्यापुढे सिनेमा सादर करणारे.  अनुराग कश्वायपचा गॅँग्ज ऑफ वासेपूर हा दुस-या प्रकारातला चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव फक्त इंग्रजी आहे, पण ही कथा अगदी याच मातीमधली आहे. या चित्रपटाची भाषा, लहेजा, शिव्या,हिंसा, प्रेम परस्परातील वैर, राजकारण आणि बदला प्रत्येक गोष्ट ही या मातीतील आहे. चोप्रा-जोहर यांच्या एनआरआय चित्रपटावर वाढलेल्या आणि  मल्टीप्लेक्स सिनेमाला सरावलेल्या प्रेक्षकांना हा प्रकार कदाचित आवडणार नाही. त्यांना हा चित्रपट अतिशय बटबटीत, अश्लील, नृशंस आणि अविश्वसनीय वाटेल.. पण महानगरात राहणा-या या मूठभर वर्गाच्या पलीकडेही एक मोठा समाज या देशात आहे. ज्या समाजातील पुढच्या पिढीच्या खांद्यावर मागच्या पिढीचे ओझे आपोओप येते. मागच्या पिढीचा वारसा ( त्यांचे प्रेम, भांडण, कोर्ट कचेरी ) ही पिढी इमानइतबारे पुढे चालवित असते. तीन तास डोके बाजूला ठेवून पाहण्याचा प्रकार म्हणजे सिनेमा असा ह्या वर्गाचा समज नसतो. तर या वर्गातील प्रत्येकाच्या डोक्यात स्वत:चा असा एक सिनेमा सुरु असतो. शहरी मानसिकेतपासून काहीसा विलग असलेल्या या समाजाचे बटबटीत वास्तव मांडणारी कथा अनुराग कश्यपने या दोन भागात जिवंत केली आहे.

      या चित्रपटाचा पहिला भाग जून महिन्यात तर दुसरा भाग हा आठ ऑगस्टला प्रदर्शित झाला. वासेपूर हा ख-या अर्थाने दोन भागातील चित्रपट आहे. असे पार्ट-2 किंवा पार्ट-3 प्रकारतील चित्रपट सध्या खो-याने आढळतात. पण ह्यामध्ये पहिल्या भागाचा दुस-याशी आणि दुस-याचा तिस-याशी फारसा संबंध नसतो.हे चित्रपट आपल्या पहिल्या भागाच्या यशाचा  ब्रँड पुढील भागात वापरतात.यापूर्वी रामगोमाल वर्माच्या रक्तचरित्रची कथाही दोन भागात दाखविली होती. वासेपूर हा ही त्याच पठडीतला चित्रपट आहे. पहिल्या भागाची कथा ज्या ठिकाणी संपते त्याच ठिकाणी दुसरा चित्रपट सुरु होतो. पहिल्या पिढीतील सूडभावना दुस-या पिढीत  गडद होते आणि तिस-या पिढीत कळसाला पोहचते. 1940 ते 2009 अशी सात दशके चित्रपटात जिवंत करण्याचे काम अनुरागने या साडेपाच तासांच्या दोन भागात केले आहे.

        2004 मधील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ह्या  लोकप्रिय मालिकेपासून ही कथा सुरु होते. एक मोठे कुटूंब एका लहानशा खोलीत ही मालिका पाहत असताना अचानक गोळीबार सुरु होतो.... अगदी पहिल्या फ्रेममध्ये चित्रपटगृहातील प्रेक्षक स्थिरावण्याच्या आत ह्या 'गोळ्यांची दिवाळी' अनुराग पडद्यावर साकार करतो. ही दिवाळी संपल्यानंतर व्हाईस ओव्हरच्या माध्यमातून समजते की वासेपूर आहे. जे पूर्वी बंगाल नंतर बिहार आणि आता झारखंडचा भाग आहे. ह्या गावात राहणा-या सरदार खानचा ( मनोज वाजपेयी ) एकच उद्देश आहे तो म्हणजे ब...द...ला !!! स्थानिक आमदार रामधीर सिंग ( तिग्मांशू धुलीया ) ला मारुन आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेणे हे एकच त्याचे ध्येय आहे.हा सूड त्याला आंधारात, बेसाववधपणे पूर्ण करायचा नाहीयं.. तर अगदी दिवसाढवळ्या, रामधीरला सूचना देऊन त्याच्या डोळ्याला डोळे भिडवत त्याला आपला सूड पूर्ण करायचा आहे. ( कहं के लूंगा )बदल्याची ही आग कायम ठेवत वासेपूरमध्ये होणारी स्थित्यंतर अनुराग आपल्याला दाखवत असतो. कोळशाची चोरी, रेतीचा व्यापार, खाण माफियांचे वास्तव त्याला मिळाणारी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची साथ ह्या सर्वांची उकल विविध दृश्यांमध्ये केली आहे. प्रेक्षकांना संदर्भ समजवण्यासाठी व्हाईस ओव्हरचा वापरही अनेक ठिकाणी करण्यात आला आहे.

चित्रपटाचा पहिला भाग हा मनोज वाजपेयी चा आहे. सत्यानंतर पहिल्यांदाच इतकी सशक्त भूमिका त्याच्या वाटेला आली आहे. भिकू म्हात्रे पाहून मोठा झालेल्या माझ्या सारख्या चाहत्यांच्या मनातील भिकूचा प्रभाव पुसण्याचे काम मनोजच्या या सरदार खानने केला आहे. सरदार खानमध्ये एकही गूण नाही..तरीही तो आपला वाटतो.  क्रूरता असो वा रोमान्स प्रत्येक प्रसंगातील त्याची सहजता मूग्ध करणारी आहे. त्याची पहिली बायको नगमा ( रिचा चढ्ढा ) आणि दुसरी दूर्गा ( रिमा सेन ) बरोबरच्या प्रसंगातून त्याचे कौटुंबिक आयुष्य समोर येते. रिमा सेनला फारसा स्कोप नसला तरी रिचाने दोन्ही भागात कमाल केली आहे. नव-याच्या बाहेररख्यालीला वैतागलेली, पोलिसांवर कोयता घेऊन धावणारी आणि दुस-या भागात आपल्या मुलाला बदला घेण्यास प्रवृत्त करणारी नगमा ही या पुरुष कलाकारांच्या गर्दीतही भाव खावून जाते.पहिल्या भागाच्या शेवटी मनोज वाजपेयी मरतो. आणि आता सरदारविना वासेपूर-2 कसा बघायचा ? हा प्रश्न पडलेला असतानाच त्याचा दुसरा मुलगा फैजल खान ( नवाजुद्दीन सिद्दीकी ) त्याची जागा घेतो. सचिनच्या जबरदस्त सुरुवातीनंतर  अर्धवट राहिलेले टार्गेट कोहली किंवा रैनाने त्याच तडफेने पूर्ण केल्यानंतर सच्चा क्रिकेटप्रेमीमंध्ये जे समाधान असते तेच समाधान वासेपूर-2 मध्ये फैजलने मिळवून दिले आहे.


फैजलच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनवर विश्वास टाकल्याबद्दल अनुराग कश्यपच्या सृजनात्मक साहसाची दाद द्यायला हवी. लूक, प्रेझेन्स ह्याचा विचार केला तर पारंपारिक हिरोच्या फ्रेममध्ये कुठेही न बसणारा हा हिरो त्याने निव्वळ अभिनय क्षमतेच्या जोरावर उभा केला आहे. त्याच्यावर चित्रीत झालेल्या प्रत्येक दृश्यात त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे.कायम नशेत चूर्र... असणा-या फैजलच्या आयुष्यात बापाच्या मोठ्या भावाच्या मृत्यूने्ही फारसा फरक पडलेला नसतो, पण आपल्या आईच्या त्राग्यानंतर तो जागा होतो.आपने दादा का, बाप का, भाई का सबका बदला घेण्याची कसम हा   हिंदी चित्रपटाच्या प्रभावात नेहमी  वावरणारा फैजल घेतो. फजलूचा गळा कापण्यापासून ते रामधीर सिंगच्या हत्येपर्यंतच्या टप्यात फ्रस्टेटेड, डिस्टर्ब आणि खूनशी असा फैजल प्रत्येक फ्रेममध्ये भाव खावून जातो. मोहसिना ( हुमा कुरेशी ) बरोबरची त्याची प्रणयदृश्यही विरंगुळा देणारी आहेत. दुस-या भागात केवळ फैजलच नव्हे तर मोहसिना, टेजंट, परपेंडिकूलर, फजलू, शमशाद आणि सूलतान ह्या प्रत्येकाने आपले काम चोख केले आहे. सत्यानंतर अशा प्रकारे एकत्रित कम करणारी गँग ही वासेपूरच्या निमित्ताने पाहयला मिळाली आहे.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूवर भाष्य करणे हा काही माझा प्रांत नाही. मात्र राजीव रवीच्या कॅमेरामनची कमाल ही दोन्ही भागात जाणवते. दुस-या भागातील पाठलागाचा प्रसंग हा ख-या बाजारात चित्रीत केला आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांचा कॅमेरा चोख काम करतात. तसेच या चित्रपटातील संगीतही तितकच परिणामकारक आहे. पहिल्या भागातील इक बगल में चांद होगा, वुमनिया, आय एम हंटर, किंवा दुस-या भागातील चिचा लेदर, काला रे, आबरु की कसम, किंवा तार बिजली से पतले हमारे पिया ही गाणे कथेला पूढे नेण्यात आणि कलाकारांच्या स्वाभाव छटा दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावितात. तार बिजली से पतले हमारे पिया म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून या भागातील जनता आहे. त्यांच्या या परिस्थिीतीला गांधीजी, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण हे देखील कुठेतरी जबाबदार आहेत असे गीतकाराला या गाण्यातून सांगायचे आहे. पियूष मिश्रा आणि वरुण ग्रोवर यांच्या गीतांना स्नेहा खानवलकर ह्या हरहुन्नरी संगीतकार ( की संगीतकारणी ) ने साज चढविला आहे. यशपाल शर्माने गायलेली चित्रपटाली गाणे आणि त्याचा बँड ही त्या विशिष्ट प्रसंगाला अधिक मार्मिक बनवितात.

अर्थात ह्या चित्रपटातही काही खटकणा-या गोष्टी आहेत. रामधीर सारखा आमदार सरदार खान सारख्या एका गावगुंडाला इतका का घाबरतो ते कळत नाही. दुस-या भागातील हिंसाचार जास्तच लांबला आहे. विशेषत: शेवटच्या भागात फैजलने अगदी अमिताभ बच्चनच्या स्टाईलने केलेली मारामारी जास्तच अविश्वसनीय वाटते तसेच दुस-या भागातील पात्र पुढे कसा वागेल किॆवा त्याचा शेवट कसा होईल याचाही अंदाज यायला लागतो. मात्र चित्रपटाचा एकंदरीत परिणाम लक्षात घेता ह्या त्रूटी दुर्लक्ष कराव्यात अशा आहेत.'बदला' हे पारंपरिक ढोबळ सूत्र वापरुन बनिवण्यात आलेले हे दोन्ही भाग ह्या तीन अक्षरी सूत्राच्या जोरावरच हटके ठरतात.

शहरी मानसिकेतेपासून शकडो मैल दूर असणा-या भारताची ही वासेपूर कथा आहे. या भागातील संघर्ष त्यांच्यातील ताण-तणाव, कट-कारस्थानेही ही देखील याच देशाचा भाग आहे. आपल्याला माहिती नसलेला हा भारत कसा आहे हे पाहण्यासाठी तरी वासेपूरचे दोन्ही भाग पाह्यलाच हवेत.

Friday, March 16, 2012

सेलिब्रेटिंग सचिन


संपूर्ण क्रिकेट विश्वाला गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेले डोहाळे पूर्ण झालेत. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकवण्याचा न भूतो  विक्रम सचिननं केलाय. 100 आंतरराष्ट्रीय शतक झळकवणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिनच्या या शंभर शतकांचे सेलिब्रेशन करत असताना त्याच्या आजवरच्या काही अविस्मरणीय शतकांचा हा आढावा ( टीप - * खूण नाबाद असल्याचे दर्शविते )

10 )   119* विरुद्ध इंग्लंड ( मॅंचेस्टर , 1990 )
 
   सचिन तेंडुलकरचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक. मॅँचेस्टरच्या टिपीकल इंग्लिश वातावरणात अगदी प्रतीकूल परिस्थितीमध्ये त्यानं झळकावलेलं. तीन टेस्टच्या त्या सीरिजमध्ये भारतीय टीम 1-0 अशी पिछाडीवर होती.इंग्लंडचा कॅप्टन ग्रॅहम गुचनं यापूर्वीच्या लॉर्डस टेस्टमध्ये काढलेले 333 रन्सचे व्रण भारतीय टीमच्या मनावर ताजे होते. त्यातच मॅंचेस्टर टेस्ट जिंकण्यासाठी दुस-या डावात भारतासमोर आव्हान होते 408 रन्सचे. नवजोत सिद्धू, संजय मांजरेकर, अझहरुद्दीन, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि कपिल देव हे सहा रथी -महारथी धारातिर्थी पडले तेंव्हा स्कोअर होता 6 आऊट 183. पराभवाच्या कडेलोटावर उभं असताना 17 वर्षांचा कोवळा सचिन इंग्रजांविरुद्ध लढला. आक्रमकता आणि संयम याचा सुरेख संगम असलेली एक अविस्मरणीय इनिंग त्यानं क्रिकेटच्या माहेरघरात पेश केली. भारतीय टीमच्या गोकुळाचा डोलारा ह्या कोवळ्या सचिननं अगदी अलगत पेलला.  त्यानं काढलेल्या नाबाद 119 रन्समुळे ही टेस्ट अनिर्णित राखण्यात भारत यशस्वी ठरला.  क्रिकेट विश्वाला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे हे त्या दिवशी ख-या अर्थाने समजलं.

9)  140* विरुद्ध केनिया ( ब्रिस्टॉल, 1999 )


    आपल्या वडिलांच्या वियोगाचे दु:ख बाजूला ठेवत सचिननं झळकावलेलं हे शतक आठवलं की आजही अनेकांचे आपसूकच डोळे ओलावतात. झिम्बाव्वे विरुद्ध झालेल्या धक्कादायक पराभवामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेलेला सचिन केनिया विरुद्धची मॅच सुरु होण्याच्या काही तास अगोदरचं इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. संघहितासाठी आपलं अभाळाएवढं दु:ख त्यानं बाजूला ठेवलं. सचिनच्या बॅटनं निर्माण केलेल्या झंझावातामध्ये केनियाचे दुबळे बॉलर्स  पालापाचोळ्यासारखे उडून  गेले. सचिननं हे शतक आभाळाकडं बघत आपल्या वडिलांना अर्पण केलं. त्यानंतरच्या प्रत्येक शतकानंतर आभाळाकडे बघण्याची प्रथा सचिननं पाळली आहे.







                 8 ) -  103* विरुद्ध इंग्लंड ( चेन्नई 2008 )


   मुंबई हल्ल्या नंतर देशवासियांना झालेल्या जखमेवर मुंबईकर  सचिनचे हे शतक फुंकर घालणारं ठरलं. चेन्नई टेस्ट जिंकण्यासाठी 387 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट भारतीय टीम समोर होतं. सेहवाग- गंभीर चांगल्या सुरुवातीनंतर परतले. भरवशाच्या द्रविड - लक्ष्मणनं निराशा केली. अशा कठिण परिस्थितीमध्ये सचिननं आपला सारा अनुभव पणाला लावत विजयाचा घास इंग्लंडच्या तोंडातून हिसकावून घेतला.  चेन्नईच्या त्या पिचवर पाचव्या दिवशी अचानक बॉल उसळत होते तसेच वळत ही होते अशा अवघड परिस्थितीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये फारशा न सरावलेल्या युवराजच्या मदतीनं त्यानं हा अविस्मरणीय विजय प्रत्यक्षात आणला. चौथ्या इनिंगमध्ये तब्बल नऊ वर्षांनी शतक झळकवण्यात सचिन यशस्वी ठरला होता.दबावाखाली टीमला गरज असताना सचिन खेळत नाही असे ओरडणा-या टीकारांना सचिननं आपल्या बॅटनं दिलेलं हे खणणीत उत्तर होतं.


7 )  200 * विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (ग्वाहलेर, 2010)


   वन-डेमधली पहिली डबल सेंच्युरी तीही साक्षात सचिननं झळकावलेली मी पाहिली आहे. असं मी पुढच्या पिढीला नेहमीच अभिमानाने सांगू शकेल. पहिली डबल सेंच्युरी कोण झळकवणार ?  ह्यावर सर्वांचेच आपले-आपले अंदाज होते. मात्र हा पराक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणा-या सचिननच्या बॅटमधून व्हाला असं नियतीला मंजूर होतं.वयाच्या 37 व्या वर्षी तब्बल 20 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवल्यानंतर सचिननं हा पराक्रम केला. विशेष म्हणजे त्याने या 200 धावा आफ्रिकन बॉलर्सच्या विरुद्ध केल्या. बांग्लादेश, केनिया, झिम्बाब्वे यासारख्या दुबळ्या देशांच्या बॉलर्सविरुद्ध नाही. डेल स्टेन, पारनेल, जॅक कॅलिस यासारखे दिग्गज बॉलर्सन आणि सर्व 11 च्या 11 वर्ल्ड क्लास दर्जाच्या क्षेत्ररक्षकांवर मात करत त्यानं ही ऐतिहासिक डबल सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे त्याचे मोल अधिक आहे.

6 ) 117 * विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( सिडनी 2008 )


फायनल मॅचमध्ये सचिन खेळत नाही असे गृहितक मांडणारे क्रिकेट तज्ज्ञ त्याची ही इनिंग हमखास विसरतात.कॉमनवेल्थ बॅंक सीरिजच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं 240 धावांचे लक्ष्य सचिनच्या या शतकाच्या जोरावर भारताने सहज पार केलं. ब्रेट ली, नॅथन ब्रॅकन, मिचेल जॉन्सन आणि जेम्स होप्स या कांगारुच्या बॉलर्सची सचिननं मनोसोक्त धुलाई केली. सलग तीन वर्ल्ड कप पटकवणा-या ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच जमिनीवर तेही फायनलमध्ये सचिननं धक्का दिला.



5 ) 160 विरुद्ध न्यूझीलंड  ( हॅमिल्टन, 2009 )



     2003 च्या दौ-यात न्यूझीलंडच्या पिचचा अंदाज वीरेंद्र सेहवाग वगळता कोणालाच आला नव्हता. त्यामुळे या दौ-यात टीम इंडियासमोर या अपमानाचा बदला घेण्याचं आव्हान होतं. हॅमिल्टनच्या  पिचवर उसळणा-या बॉलची कोणत्याही भारतीय बॅट्समनला सवय नव्हती. सचिननं मात्र या पिचशी सहज जुळवून घेतलं. 90 च्या दशकात सचिन अगदी भरात असताना जशी बॅटिंग करत होता  अगदी तशाच पद्धतीनं त्यानं 2009 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी केली.  सचिनच्या शतकानं तब्बल 33 वर्षांनतर भारताला न्यूझीलंडमध्ये टेस्ट जिंकता आली. तसंच पुढे सीरिज जिंकण्यात आपली टीम यशस्वी ठरली. न्यूझीलंड दौरा म्हंटलं की वेगवान पिचचं आणि तिथल्या संपूर्णपणे अनोळखी वातावरणाचं भूत टीम इंडियाच्या मानगुटीवर बसतं. हे भूत उतरवण्यात सचिनचं हे शतक यशस्वी ठरलं. त्यामुळेच त्याचं हे शतक संस्मरणीय आहे.





              4 )      241* विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( सिडनी, 2004 )


  ऑस्ट्रेलियाचा महान कॅप्टन स्टीव्ह वॉ याची ही शेवटची टेस्ट. स्टीव्ह वॉ साठी भारताविरुद्धची सीरिज म्हणजे 'द लास्ट फ्रंटियर' होती. आपल्या लाडक्या कॅप्टनला सीरिज विजयाची भेट द्यायचीच या निर्धारानं कांगारु पेटले होते. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताचा स्कोअर सुरुवातीला 4 आऊट 157 आणि नंतर 7 आऊट 705 ! हा विशाल स्कोअर उभा राहिला तो सचिन आणि लक्ष्मण ( म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमसाठी संताजी - धनाजी ) यांच्या संस्मरणीय शतकामुळे. या सीरिजपूर्वी सचिनला बराच काळ टेनिस एल्बोनं सतावलं होतं. ऑफ साईडला मारलेल्या काही फटक्यांवर तो आऊट झाला होता. दुखापत, खराब फॉर्म ह्या सा-यांना मुठमाती देत सचिननं सिडनीवर हा डबल धमाका केला. या टेस्टमध्ये ऑफ साईडच्या शॉट्सना मुरड घालत बहुतेक फटके लेगला मारत सचिननं  नाबाद 241 रन्स काढले. शेवटची टेस्ट जिंकण्याचं  स्टीव्ह वॉ चं स्वप्न धुळीस मिळालं. बॉर्डर - गावसकर ट्रॉफी भारताकडेच राहिली.



3)    155* विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( चेन्नई, 1998 )

    ऐन बहारात असलेला सचिन तेंडुलकर कसा खेळायचा याचा अभ्यास आणखी 50 वर्षानंतर कोणत्या क्रिकेट अभ्यासकाला करायचा असेल तर त्याला त्याची ही चेन्नईमधल्या इनिंगच्या हायलाईट्स पाहव्याच लागतील. जगातला 'ऑल टाईम ग्रेट' लेग स्पिनर शेन  वॉर्न अगदी बहरात होता. सचिन विरुद्ध वॉर्न यांच्यातील लढाईकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष होतं. पहिल्या इनिंगमध्ये सचिनला फक्त 4 रन्सवर आऊट करत वॉर्ननं पहिली फेरी आरामात जिंकली होती. दुस-या इनिंगमध्ये सचिनला परतफेड करण्याची संधी मिळाली.  टेस्टच्या चौथ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये पिछाडीवर असलेल्या टीमच्या बॅट्समननं त्याकाळातील सर्वोत्तम लेगस्पिनरची जोरदार धुलाई केली. राऊंड- द-विकेट बॉलिंग करणा-या शेन वॉर्नला सचिननं स्वीप आणि पूल शॉट्सचा वापर करत खेचेले सिक्सर आणि फोर आठवले की आजही माझ्या अंगावर शहारे येतात. क्रिकेटमधल्या या दोन महान खेळाडूंच्या लढाईत विजेता कोण ? याचं उत्तर क्रिकेट विश्वाला मिळालं होतं. सचिननं केलेल्या याच धुलाईनंतर शेन वॉर्नला स्वप्नातही सचिन दिसू लागला.


     2 )    143 विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( 1998, शारजा )

     अमिताभ बच्चन म्हंटला की त्यानं दिवारमध्ये पिटर आणि त्याच्या पंटरची बंद खोलीत धुलाई हमखास आठवते. तसंच सचिन म्हंटला की त्याची ही शारजामधली वादळी इनिंग हमखास डोळ्यासमोर उभी राहते.फायनलमध्ये पोचण्यासाठी भारताला 254 रन्स करणे आवश्यक होते. डेमियन फ्लेमिंग, शेन वॉर्न, माइक कॅस्पारोविझ यासारखी विकेट्सला चटावलेली बॉलर्सची टोळी कांगारुंकडे होती. ही मॅच सुरु असतानाचं शारजाच्या वाळवंटात वादळ आलं त्यामुळे साहजिकचं मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला. आता भारताला फायनल गाठण्यासाठी 46 ओव्हर्समध्ये 236 रन्स आवश्यक होते. कांगारुंचा तेंव्हाचा दबदबा पाहता हे टार्गेट हिमालयाएवढे वाटत होतं. पण दिवारमधल्या अमिताभप्रमाणे सचिन जिद्दीला पेटला होता. त्याच्या बॅट्नं त्यादिवशी  क्रिकेटमधली एक अविस्मणीय स्क्रिप्ट लिहली. त्यानं अवघ्या 131 बॉल्समध्ये 9 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 143 रन्स काढले. शारजातील वाळवंटात होणारी वादळंही शुल्लक वाटावीत असा झंझावात त्या दिवशी सचिननं निर्माण केला होता. त्याच्या या झंझावातामुळेच भारतीय टीम फायनलमध्ये दाखल झाली होती हे वेगळं सांगयला नकोच. महत्वाच्या वेळेस सचिन खेळत नाही असे ओरडणा-या सचिन विरोधकांनी त्याची ही इनिंग नेहमी लक्षात ठेवावी. सचिनचे फॅन तर ही इनिंग कधीच विसरु शकणार नाहीत.



1)  136 विरुद्ध पाकिस्तान ( चेन्नई, 1999 )

  हे आहे सचिनचं माझ्या मते सर्वोत्तम शतक. तब्बल नऊ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली ही ऐतिहासीक टेस्ट मॅच. पाकिस्तानकडे वासिम अक्रम आणि वकार .युनूस हे क्रिकेट  जगातले दोन खतरनाक बॉलर्स. त्यांच्या जोडीला संपूर्ण भरात असलेला 'दुसरा' फेम ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताक. युवा शाहिद आफ्रिदीनंही आपल्या 'हातचालाखी' च्या जोरावर  पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेटमधल्या या सर्वात हाय- व्होल्टेज मॅचमध्ये भारतासमोर विजयासाठी 271 रन्सचं लक्ष्य होतं. पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगमुळे भारताची अवस्था 5 आऊट 82. सचिननं  एका बाजूला उभा होता. त्याची आणि नयन मोंगियाची जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टरनरशिप केली. मोंगिया आऊट झाला तरी सचिन खेळत होता.चेन्नईचे दमट हवामान कोणत्याही क्रिकेटपटूच्या फिटनेसची परीक्षा घेणारचं असतं त्यातचं सचिनला त्या टेस्टमध्ये पाठदुखीनं हैराण केलेलं होतं. तरी देखील आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी विरुद्ध भारताला विजय मिळवून द्यायचाच या एकाच निर्धाराने त्यानं तब्बल 405 मिनिटं बॅटिंग केली. विजय अगदी हातातोंडाशी असताना सचिन आऊट झाला. सचिन परतला तेंव्हा भारताला केवळ 17 रन्स हवे होते. चौथ्या दिवसाचे काही ओव्हर्स आणि पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ बाकी होता. त्यामुळे अगदी रमत-गमत हे रन्स काढले तरी चालणारं होतं. तरी देखील शेवटच्या चौघांना हे लक्ष्य पार करता आलं नाही.सचिन परतल्यानंतर अवघ्या चार रन्समध्ये भारताच्या पुढच्या तीन विकेट्स पडल्या. सचिननं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला भारत  12 रन्सने पराभूत झाला. नेता पडला की कोसळायचं ही आपली जुनी परंपरा ह्या शेवटच्या तिघांनी पाळली. या मॅचच्या हायलाईट्स आजही बघत असताना सचिन नंतर आऊट झालेल्या तिघांच्या कानाखाली समई पेटवावी असंच मला वाटतं.   
               

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...