Showing posts with label Modi. Show all posts
Showing posts with label Modi. Show all posts

Friday, January 20, 2017

19 जानेवारी 1990 !


संताप, भीती, राग, लाज, असह्यता अशा वेगवेगळ्या स्वरुपाच्या भावनांनी दरवर्षी  19 जानेवारीला दिवसभर मी अस्वस्थ होतो.  19 तारखेच्या रात्री ही हतबलता वाढत जाते. काश्मिरी पंडित हे आपले देशबांधव आपल्याच देशात विस्थापित होण्यास  27 वर्षांपूर्वी याच दिवशी सुरुवात झाली. इस्लाम बहुल प्रदेशातले हिंदू इतकाच त्यांचा अपराध होता. देशातल्या सरकारवर, व्यवस्थेवर, धर्मनिरपेक्षतेचा जयघोष करणाऱ्या यंत्रणांवर त्यांचा विश्वास होता. पण या साऱ्या विश्वासाला 19 जानेवारी 1990 च्या रात्री जबरदस्त हादरा बसला.

 आपल्या देशात इस्लामी दहशतवाद कशा प्रकारे थैमान घालू शकतो याची झलक त्या रात्री काश्मीर खोऱ्यानं अनुभवली. काश्मीरमधले हजारो मुस्लीम त्या दिवशी रस्त्यावर उतरले होते. पाकिस्तान पुरस्कृत जिहादामध्ये ही मंडळी सहभागी झाली होती. त्या जीव गोठवणाऱ्या थंडीतही प्रत्येक काश्मिरीच्या मनात भीतीचं कापरं भरलं पाहिजे हाच हेतू या जिहादींचा होता.

श्रीनगरमध्ये ११०० पेक्षा जास्त ठिकाणी सुरु असलेल्या लाऊड स्पिकरवरुन या जिहादी मंडळींना चिथावणी दिली जात होती. 'हमें क्या चाहिये आझादी, ऐ जालिमो ए काफिरो काश्मिर हमारा छोड दो' अशा घोषणा सातत्यानं दिल्या जात होत्या. काही मशिदींमधून अफगाणिस्तानमधल्या मुजाहिद्दीनची गौरवं गीतं मोठ्यानं वाजवण्यात येत होती. ही संपूर्ण कॅसेट वाजवल्यानंतर पुन्हा एकदा घोषणा दिल्या जात. यामधली एक घोषणा होती 'आम्हाला काश्मिर पाकिस्तानमध्ये हवाय. या पाकिस्तानात काश्मिरी पंडितांना कोणतंही स्थान नाही फक्त त्यांच्या बायकांना जागा आहे.'  धर्मांतर करा, ही जागा सोडून दुसरीकडं निघून जा, किंवा मरा  असे तीनच पर्याय या जिहादी मंडळींनी काश्मिरी पंडितांसमोर ठेवले होते.

  ' हमे क्या चाहिये आझादी, ऐ जालिमों, ऐ काफिरों, काश्मिर हमारा छोड दो' ' अगर काश्मिर में रहना होगा, अल्लाहू अकबर कहना होगा' 'यहां क्या चलेगा निझाम-ए-मुस्तफा' ' अशा घोषणांमधून इस्लामचं कट्टर आणि असहिष्णू रुप त्या रात्री काश्मिरी पंडितांनी अनुभवलं.

आपल्या शक्तीचं प्रदर्शन घडवण्यासाठी या जिहादी मंडळींनी 19 जानेवारीची रात्र अत्यंत हुशारीनं निवडली होती. फारुक अब्दुल्ला सरकार हे अस्तित्वहिन होतं. जगमोहन यांनी आदल्याच दिवशी काश्मीरच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्विकारला होता. खराब हवामानामुळे त्यांचं विमान त्या दिवशी श्रीनगरमध्ये पोहचू शकलं नाही. त्यामुळे त्यांचा मुक्काम त्या रात्री जम्मूमध्ये होता. हिवाळ्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगरहून जम्मूला हलवण्यात आली होती. श्रीनगरमधलं राजभवन, सरकारी ऑफिस  यामध्ये मोजकेच कर्मचारी होते. या सरकारी यंत्रणांनी या उन्मादी मंडळींची मूक साक्षिदार बनली.  कोणतीही ऑर्डर नसल्यानं लष्कर आणि अन्य सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्या रात्री हस्तक्षेप केला नाही. असहाय्य, भयग्रस्त, हतबल आणि एकाकी अशा  काश्मिरी पंडितांसाठी दिल्ली तर खूपच दूर होती.

  फक्त श्रीनगर नाही तर काश्मिर खोऱ्यातलं प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, प्रत्येक काश्मिरी पंडितांच्या घरासमोर त्या रात्री हा जिहादी उन्माद सुरु होता. स्वतंत्र भारतामध्ये, आपल्या हक्काच्या देशात आपण असुरक्षित आहोत. आपला जीव, बायका मुलांची अब्रू,  आपली संपत्ती हे सारं या जिहादी मंडळींचा मूड असेपर्यंत सुरक्षित आहे, याची जाणीव काश्मिरी पंडितांना त्या रात्री झाली.

त्या रात्री प्रत्येक काश्मिरी पंडित जागा होता. त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं. घरातले दिवे बंद केले होते. अगदी कुजबूजही बाहेर जाणार नाही याची ते काळजी घेत होते. आपल्या मुलांना काही होऊ नये अशी प्रार्थना प्रत्येक आई-वडिल करत होते.  कर्त्या पुरुषांनी बायका-मुलींना घराच्या कपाटात, अडगळीच्या खोलीत, ट्रंकमध्ये लपवलं होतं. गरज पडली तर स्वत:च्या पोटात सुरा खुपसून आयुष्य संपवण्याची तयारीही काश्मिरी पंडितांच्या आई-बहिणींनी त्या रात्री केली होती.

त्यामुळे ती काळरात्र संपताच बहुतेक काश्मिरी पंडितांनी आपलं सामान बांधलं. देशाच्या फाळणीनंतर प्रथमच एवढं मोठं स्थालांतरास सुरुवात झाली. टॅक्सी, बस, ट्रक अशा मिळेल त्या वाहनांनी ही मंडळी आपला जीव आणि अब्रू वाचवण्यास घराच्या बाहेर पडली.

 काही काश्मिरी पंडितांनी काश्मीरच्या बाहेर जाणं टाळलं. मागे उरलेल्यांमधील अनेकांचा वर्षानुवर्षे आपल्या शेजारी राहणाऱ्या मंडळींवर विश्वास होता. तर कुणाचा आपलं घर, जमीन, परिसर, सफरचंदाच्या बागा, गावातली प्राचीन मंदीर याच्यावर मोठा जीव होता. ज्या जागेत आपण लहानाचे मोठे झालो, ती जागा, ते वातावरण सोडणं त्यांच्यासाठी अशक्य होतं. त्यामुळे ते काश्मिर खो-याच्या बाहेर पडले नव्हते. तर काही जणांकडे जम्मू, दिल्ली किंवा देशाच्या अन्य भागात जाऊन तिथं निर्वासितांच्या छावणीत आयुष्याला नव्यानं सुरुवात करण्याची शक्ती नव्हती.


कारण कोणतही असो काही काश्मिरी पंडितांनी आपलं घर सोडलं नाही. त्यांचं हे आपल्या घरात राहणं दहशतवाद्यांना मान्य नव्हतं. बुडगाव ते  ब्रिजबेहारा, कुपवाडा ते कनिमंडल अशा काश्मिर खोऱ्यातल्या वेगवेगळ्या भागात काश्मिरी पंडितांचं हत्याकांड सुरु झालं. सैतानालाही लाज वाटेल अशा पद्धतीनं काश्मिरी पंडितांना मारण्यात येऊ लागलं. सर्वानंद कौल प्रेमी या काश्मिरी पंडितांच्या कपाळावर ( तिलक लावतात ती जागा ) खिळा ठोकून त्यांना ठार मारण्यात आलं.बी.के. गांजू यांची त्यांच्या घरामध्ये घुसून हत्या करण्यात आली. त्यानंतर  त्यांच्या रक्ताला लागलेला भात चाटण्याची शिक्षा त्यांच्या बायकोला देण्यात आली. सरला भट या नर्सची सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली.  तिचे नग्न शरीर रस्त्यावर फेकून देण्यात आलं. रवींद्र पंडितांच्या मृतदेहावर जिहादी मंडळींना नाच केला.ब्रिजलाल आणि छोटीचा मृतदेह जीपला बांधून शोपियाच्या रस्त्यावर १० किलोमीटर फरफटत नेण्यात आला.

    तीन लाखांपेक्षा जास्त काश्मिरी पंडित या इस्लामी दहशतवादामुळे देशोधडीला लागले असा या विषयावर काम करणाऱ्या मंडळींचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या समुदायाला जाणीवपूर्वक टार्गेट करुनही देशातल्या 'आदर्श लिबरल' मंडळींच्या डोळ्यांवरची पट्टी काही निघाली नाही. 'नरसंहार' 'मानवी समुदायाची सफाई' अशा प्रकारच्या विशेषणांनी काश्मिरी पंडितांच्या अवस्थेचं वर्णन या मंडळींनी कधीही केलं नाही. या घटनेवर सिनेमा बनवला नाही किंवा सुप्रीम कोर्टात जनहित याचिकाही दाखल केली नाही. धर्मनिरपेक्षता या घटनेच्या गाभ्याला धक्का बसलाय म्हणून देशभर छाती बडवण्याचा कार्यक्रम केला नाही.
         
  आज 27 वर्षांनंतर  जम्मू काश्मिरच्या विधानसभेत या काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन करण्यात यावं असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लांनी यावेळी केलेलं जोरदार भाषण  देशभरातल्या मीडियानं दाखवलं. ते पाहून काही मंडळी कमालीची उत्तेजीत झाली. जणू मागच्या तीन दशकांमध्ये अब्दुल्ला घराण्याकडं कधी सत्ता असती तर काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन नक्की झाले असते असे त्यांना वाटले असावे. ओमर अब्दुल्लाचे वडिल आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी 1989 साली 70 कट्टर दहशतवाद्यांची मुक्तता केली होती. हे आज देशातली काही मंडळी विसरली असतील. पण काश्मिरी पंडितांना याचा विसर पडणे अशक्य आहे.


       1989 पासून आजवर सहा पंतप्रधान देशानं पाहिले. नरेंद्र मोदी हे आता सातवे पंतप्रधान आहेत. यापैकी कोणत्याही पंतप्रधानांना अगदी भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारलाही हा प्रश्न सोडवता आलेला नाही. अटलजींकडे पूर्ण बहुमत नव्हतं.या तर्काच्या आधारावर या प्रश्नाचा इतिहास लिहताना त्यांच्या बाजूनं युक्तीवाद करता येऊ शकेल. पण नरेंद्र मोदींना ती देखील संधी इतिहास देणार नाही. 282  खासदारांसह स्पष्ट बहुमत असलेलं मोदी सरकार जर काश्मिरी पंडितांचं त्यांच्या गावात पुनर्वसन करु शकलं नाही तर देशातल्या कोणत्याही सरकारला हे पुनर्वसन करणं अशक्य आहे. मोदी सरकार सध्या अनेक चांगली काम करतंय. भविष्यातही करेल. पण या एका मुद्यावर ते अपयशी ठरलं तर किमान मी तरी नरेंद्र मोदींना कधीही माफ करणार नाही.


            अर्थात काश्मिरी पंडितांचं दु:ख समजून घेणारी, त्यांच्याबद्दल सर्वाधिक सहानभूती असणारी मंडळी केंद्रात सत्तेत आहेत याची मला जाणीव आहे. त्यामुळेच आता या मंडळींनी 27 वर्षानंतर का होईना काश्मिरी पंडितांना न्याय मिळावा यासाठी हलचाल करणे आवश्यक आहे. काश्मिरचा कोणताही प्रश्न आला की कलम 370 चा बाऊ नेहमी केला जातो. पण म्यानमारमधले विस्थापित रोहिंग्ये मुसलमान हे काश्मिरच्या खो-यात स्थायिक होतात. त्यावेळी कधी कलम 370 चा अडथळा येत नाही. पण काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाला मात्र आपली लोकसंख्येच्या पाशवी बहुमताला धक्का पोहचेल म्हूणून  आजवर नेहमीच विरोध करण्यात आलाय. हा विरोध मोडण्याची वेळ आता आलीय.

  जम्मू काश्मिर विधानसभेवर काश्मिर खोऱ्याचं वर्चस्व आहे. या भागातल्या बहुसंख्य जागांवर निवडून येणारे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेस पक्षाचे आमदार या पुनर्वसनामध्ये व्होट बँक आणि काश्मिरीयतची खोटी अस्मिता जपण्याच्या नावाखाली आजवर खोडा घालत आलेत. जम्मू काश्मिरमधलं काश्मिर खोऱ्याचं असलेलं हे वर्चस्व संपवण्यासाठी जम्मू काश्मीरचं त्रिभाजन हाच एकमेव पर्याय आहे.

 काश्मीर आणि जम्मू अशी दोन स्वतंत्र राज्य आणि लड्डाख हे केंद्रशासित प्रदेश बनला तर या  तिनही विभागाचा विकास होण्यास चालना मिळेल. कारण सध्या केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळाणाऱ्या हजारो कोटींच्या मदतीचा बहुतेक पैसा हा काश्मिरच्या खो-यातच झिरपला जातोय. त्यामुळे जम्मू आणि लडाखच्या प्रश्नांकडे जम्मू काश्मीर सरकारचं दुर्लक्ष होतंय. जम्मू आणि लडाखमधल्या जनतेचा भारतीय घटनेवर भारत सरकारवर विश्वास आहे. त्यांना देशाच्या मूळ प्रवाहात समरस व्हायचं आहे. आपला विकास करायचा आहे. तेथील साधनसंपत्तीवर 'हमे चाहिये आझादी' अशी घोषणा देणाऱ्या, बुरहान वाणीला हिरो समजणाऱ्या आणि लष्करावर दगडफेक करणाऱ्या काश्मिरी कट्टरवाद्यांचं वर्चस्व संपवणं हे केंद्र सरकारचं काम आहे.


        जम्मू काश्मीरच्या त्रिभाजनानंतर काश्मिरमधल्या फुटीरतावादी वृत्तीकडं, असंतोषाकडं आणि रेंगाळलेल्या विकासकामांकडे अधिक बारकाईनं लक्ष देणं सरकारला शक्य आहे. इस्रायल देश तयार होण्यापूर्वी धनाढ्य मंडळींनी जमिनी विकत घेतल्या. तिथं जगभरातल्या ज्यू मंडळींना स्थायिक होण्यासाठी आमंत्रण दिलं.  त्यानंतर इस्रायल देश अस्तित्वात आला. शेकडो वर्ष जगाच्या कानाकोप-यात विस्थापित झालेली ज्यू मंडळी आपल्या मातृभूमीत परत आली. तिथं स्थायिक झाली.

 भारत सरकारानंही काश्मिर खो-यात अशाच प्रकारे जमिनी ताब्यात घेणं आवश्यक आहे. या ताब्यात घेतलेल्या जमिनीवर स्थायिक होण्यासाठी काश्मिरी पंडितांना बोलवलं तर ते देशाच्या कानाकोप-यातून आपल्या प्रिय प्रदेशात नक्कीच परत येतील.

गेली 27 वर्ष आपण या काश्मिरी पंडितांवर अन्याय केलाय. आपले प्रतिनिधी म्हणून हा अन्याय नष्ट करण्याची जबाबदारी मोदी सरकारवर आहे. मोदी सरकारनं ही जबाबदारी पूर्ण केली तर देशाच्या इतिहासात त्यांचं नाव नक्कीच सुवर्णअक्षरानं लिहलं जाईल.

   टिप - बुरहान वाणी या दहशतवाद्याला ठार मारल्यानंतर काश्मिरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबतचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे http://bit.ly/2jxYyEs क्लिक करा


       

Sunday, November 2, 2014

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !


2014 हे खरोखरच एक अनोख वर्ष आहे.  या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आलं. भ्रष्ट, नाकर्ते, सरंजामी, देशविघातक अशा युपीए सरकारचा पराभव होणार हे स्पष्ट होतं. मोदी लाट निकालात दिसेल याचाही अंदाज होता, पण सर्व शक्याशक्यतेच्या पलिकडं नेणारा सुखद धक्का मोदींनी दिला. केवळ भाजपाला  लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवता येतं हे मोदींनी दाखवून दिलं.त्यापाठोपाठ दुस-या टप्प्यात राज्यात देवेंद्र फडणवीसच्या निमित्तानं भाजपाचा पहिला मु्ख्यमंत्री झालाय. भाजपाला स्पष्ट बहुमत नाही. तरीही 120 पेक्षा जास्त जागा जिंकत आणि आपल्या मतांची टक्केवारी दुप्पॉट करत भाजपानं राज्यातला नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवलाय. तोही अगदी स्वबळावर. 'मराठी खतरे में' असा नारा देत अस्मिताचं राजकारण करणा-या कोणत्याही ठाकरेंच्या अहंकाराला न कुरवाळता.

       गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे  निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय. भाजपा कार्यकर्त्यांची निष्ठा, रा.स्व.संघाचे पाठबळ अमित शाह यांचे संघटन आणि मोदींचे नेतृत्व यांच्या जोरावरच आज देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झालेत.
           
           भाजपाशी ऐन निवडणुकीत युती तोडून तथाकथित स्वाभिमान दाखवणारे उद्धव ठाकरे हे मागील महिनाभर अनेक पत्रपंडितांचे हिरो होते. ( वर्षभरापूर्वी केजरीवाल आणि नंतर राहुल गांधी यांना खांद्यावर घेणाराही हाच वर्ग होता) भाजपा नेतृत्त्वाला महाराष्ट्रविरोधी ठरवून, अफजलखानाची टोळी संबोधून भर सभेत टाळ्या मिळवता येतात. हेडलाईनही छान होते. पण यातून पक्ष वाढत नसतो. विरोधकांवर हल्ला करत असताना पक्ष वाढवण्याची जबाबदारीही पक्षप्रमुखाला पार पाडायची असते. काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल व्यापक नाराजीचा फायदा शिवसेनेलाही झाला. ही नाराजी नसती तर शिवसेना पन्नाशीही ओलांडू शकली नसती. 'शहा'णे व्हा असा सल्ला देणा-या उद्धव ठाकरेंनी समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाला त्यांची युती सहन करावीच लागली असती. त्यांना आपसुक मोठेपणा मिळाला असता. आणि कुणास ठाऊक ज्या मु्ख्यमंत्रीपदासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केला ते मुख्यमंत्रीपदही देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी त्यांना मिळाले असते.

                    'मराठी खतरे में' चा नारा देत एकगठ्ठा मराठी मतं मिळवण्याचा उद्धवसेनेचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. ' अफजलखानाच्या दरबारात ' शिवसेनेचे अनंत गिते 'विडे '  चघळत राहिले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद महापालिकेतली साथ सोडण्याचा ताठ बाणा, ' मोडेन पण वाकणार नाही ' असा अभिमान बाळगणा-या या मराठीच्या कैवा-यांनी दाखवला नाही. उद्धव ठाकरेंच्या महत्वकांक्षेमुळे नारायण राणे, राज ठाकरे पक्ष सोडून गेले त्यामुळे शिवसेनेवर त्यांची एकहाती सत्ता आली. पण युतीवर एकहाती सत्ता राखू शकेल असं संघटन आपल्याकडे नाही. जनाधार तर त्याहून नाही हे उद्धव ठाकरेंना लक्षातच आलं नाही. निवडणूक निकालाने त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलीय.

              शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इथे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भगवा फडकवण्याची भाषा करत असताना मराठी-गुजराती वाद उभा केला. सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर केलं. 15 वर्ष महाराष्ट्राला बरबाद करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 25 वर्ष संघर्ष केला. एकत्र स्वप्न पाहिलं त्या पक्षाला संपवण्याची सुपारी उद्धव सेनेनं घे्तली होती. युती असती तर एमआयएमचा एकही सदस्य विधानसभेत शिरु शकला नसता. पण अवास्तव महत्वकांक्षेनं पछाडलेल्या शिवसेना नेतृत्वाला हे काहीही दिसलं नाही. काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर देशभक्त आहे. आपला वापर करुन आजवर केवळ वडापाची गाडी हाथी देणा-या आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून 24 वर्षाच्या आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पक्षावर लादणा-या या ठाकरे कंपनीच्या हाती त्यांनी किती काळ आपल्या माना द्यायच्या याचा विचार त्यांनी करायला हवा.

           प्रबळ विरोधक आणि ऐनवेळी समोर युद्धाला उभा राहिलेला मित्रपक्ष या सर्व लढाईनंतरही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ही व्यक्ती मु्ख्यमंत्री होणं याला मोठं महत्व आहे.जातीची व्होटबँक, उद्योगसमूह, सहकारी बँक, सहकारी कारखाना असं कोणतही पाठबळ नसताना मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेले आणि प्रखर वैचारिक निष्ठा जोपसणारे युवा मु्ख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत.

      देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित आहेत. अर्थशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. राजकीय आयुष्यात प्रामणिकता जपणा-या फडणवीसांसमोर राज्याचा कारभारही पारदर्शी करण्याची जबाबदारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्यावरुन धारेवर धरणा-या आणि चितळे समितीसमोर बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणा-या या मुख्यमंत्र्याला आता भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील.
           
       महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगानं शहरीकरण होत चालेलं राज्य आहे. उंची मॉल्स, विदेशी बनावटीच्या गाड्या, गज्ज भरलेल्या बाजारपेठा, अगदी लेटेस्ट मोबाईल्स, मल्टीप्लेक्स अशा स्मार्ट सिटी राज्यात उदयाला येतायत. त्याचवेळी ग्रामीण भागातली परिस्थिती झपाट्यानं बिघडतीय. वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेला शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र विकायला लावणारी निगरगट्ट यंत्रणा या राज्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मेकओव्हर करण्याचं अभियान या सरकारला करावं लागेल. त्याचबरोबर   प्रादेशिक असमतोल, नक्षलवाद आणि युवकांच्या मेंदूत भिनवत चालेलं ब्रिगेडी जातीयता आणि एमआयएमची धार्मिकता याचं भूत उतरवण्याचं आव्हानं  पेलण्याची शक्ती या युवा मुख्यमंत्र्यांकडे असेल अशी आशा त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरुन करायला हवी.
 
            आगामी काळातल्या जगात होणा-या बदलामध्ये 125 कोटींच्या या लोकसंख्येच्या देशाची भूमिका महत्त्वाची असेल. जागतिक आव्हांनाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये होणा-या बदलाचे केंद्रबिंदू असतील नरेंद्र मोदी. महाराष्ट्राविना राष्ट्र कसे चालेल ? महाराष्ट्रात हीच जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना पार पाडावी लागेल. प्राप्त परिस्थितीमध्ये देशाचं आणि राज्याचं नेतृत्व हे दोन सर्वोत्तम व्यक्तींच्या हाती 2014 या वर्षानं सोपवलंय.केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही भाजपाची घोषणा खरी ठरली. या घोषणेमुळे भाजपामध्ये मोठे बदल झाले पुढेही होतील. देशात आणि महाराष्ट्रातल्या बदलाची सुरुवातही 2014 मध्ये झालीय. हे वर्ष त्यामुळेच नेहमीच संस्मरणीय ठरणार आहे. 

Friday, December 21, 2012

नरेंद्र मोदी 3.0


कोणाला ते 'गुजरातचे हिटलर' वाटतात. तर कुणी त्यांना विकासपुरुष म्हणून संबोधतात. त्यांना 'मौत के सौदागर'  ठरवू पाहणारा मोठा शक्तीशाली गट या देशात कार्यरत असताना त्यांच्या पंतप्रप्रधानपदाच्या राज्याभिषेकाची तयारी करणा-यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. तथाकथत बुद्धीजवी वर्ग (?) त्यांच्या विकास मॉडेलचा फोलपणा शोधण्याचा व तो मोठा करण्याचा खटाटोप करत असताना  जगभरातील 'नेटकर' तरुणांमध्ये त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे. कोणत्याही घराण्याचा वारसा नाही की चित्रपटाची पार्श्वभूमी नाही. असे असूनही नरेंद्र मोदी हे सरत्या दशकातील ( 2002 ते 2012 ) भारतामधील सर्वात चर्चीत मुख्यमंत्री आहेत.
   गुजरातमध्ये भाजपने सलग पाचव्यांदा सत्ता हस्तगत केली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा सलग तिसरा विजय. सलग तीनदा सत्तेवर येणारे ते भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. लागोपाठ पाच निवडणुकीत भाजपला जनादेश देणारे गुजरात हे देशातील एकमेव राज्य. त्यामुळेच हा विजय हा नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांप्रमाणेच  भाजपच्या मतदारांनाही सुखावणारा आहे.
2002 आणि 2007 च्या निवडणुका ह्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर मोदींनी जिंकल्या . आता यातील काहीच उपयोगी पडणार नाही.सौराष्ट्रमध्ये पटेल आणि लेवा पाटील नाराज आहेत. उत्तर गुजरातमधील शेतकरी देशोधडीला लागलाय. कच्छमध्ये अपु-या पाण्याच्या दुष्काळात मोदी होरपळणार. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मोदींचा पराभव हवाच आहे. संघ परिवार त्यांच्यावर नाराज आहे. मुस्लिम तर त्यांच्या बाजूने कधीच नव्हते असा दावा करत मोदी विरोधाची हवा तापवणारे 'इलेक्शन इंटलेक्च्युअल्स' मोदींच्या दोन जागा कमी झाल्या की !!! असे सांगत गरबा खेळत आहेत. किंवा आपणच मांडलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणापेक्षा मोदींना जागा कमी मिळाल्या त्यामुळे मोदींनी आत्मपरिक्षण करावे असा शाहजोग सल्ला आज दिवसभर दिला जातोय. ( आता हे सर्वेक्षण केल ते यांच्या 'पेड' सर्वेक्षकांनी. ते चुकले हे या माध्यमांची व त्यांच्याशी संबंधित असलेल्या मंडळींची जबाबदारी न ठरता मोदींचे अपयश कसे ठरते हे मला पामराला न उलगडलेले कोडे आहे. )
      अटलजींच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरण्यात अपयशी ठरलेल्या भाजपमध्ये मोदींनी नंबर वन पदासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. प्रचारामध्ये मनमोहन सिंग सोनिया/ राहुल गांधी यांना टार्गेट करणे किंवा विजयानंतरचे भाषण गुजरातीमध्ये न देता देशाला समजण्यासाठी हिंदीमध्ये देणे या सारख्या संकेतांमधून मोदींची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा सर्वांसमोर आलेली आहे. मोदींच्या पक्षांतर्गत स्पर्धकांपैकी अडवाणींची दावेदारी वाढत्या वयोमानानुसार कमकुवत होत चालली आहे. सुषमा स्वराज भाषण तर सुरेख करतात. पण निवडणुका जिंकण्याचा त्यांचा इतिहास फारसा बरा नाही. ( त्यांच्ये नेतृत्वाखालील दिल्ली भाजपला 14 वर्षांपूर्वी काँग्रेसने धूळ चारली होती.त्यानंतर आजपर्यंत दिल्लीत भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही) आणि अरुण जेटली उत्कृष्ट बोर्ड रुम मॅनेजर असले तरी लोकसभेच्या रणधुमाळीत पाऊल ठेवण्याचे धाडस त्यांना अजूनही जमलेले नाही. दोन लोकसभा निवडणुकीतील पराभव, जबाबदार नेत्यांमधील बेजाबाबदार विधान करण्याच्या स्पर्धेमुळे पक्षावर निष्ठा असणा-या लाखो कार्यकर्त्यांची आज गोची झालेली दिसते. पराभूत मानसिकतेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मोदींचा सहारा भाजपला वाटतोय तो यामुळेच मोदींच्या तिस-या इनिंगला त्यामुळेच मोठे महत्व आले आहे.
       अर्थात गांधीनगर ते नवी दिल्ली हे अंतर पार करत असताना मोदींसमोर दोन मोठे अडथळे आहेत.पहिला  अडथळा अर्थात मोदींच्या टेंपरामेंटचा आहे. एककल्ली स्वभावाचे आणि एकपक्षीय सरकारमध्येही एकाधिकारशाही गाजवणारे मोदींना आघाडी धर्माचे पालन कितपत करता येईल ? 'पार्टी विथ डिफरन्सेस'
म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपमधील गटतटांना चुचकारण्यापासून ते संघ परिवाराशी पुन्हा जवळीक वाढविण्यापर्यंतच्या कसरती करणे हे मोदींसमोरील पहिले आव्हान असेल.
मोदी कार्डचा वापर केल्यास मित्रपक्ष मिळवतानाही भाजपची दमछाक होणार हे उघड आहे.जदयू सारख्या रालोआमधील जुन्या घटक पक्षाचा मोदींना तीव्र विरोध आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीमुळे अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, तृणमूल काँग्रेस हे रालोआचे संभाव्य मित्र पक्ष आघाडीपासून पुन्हा दूर जाण्याची शक्यता आहे.
अगदी सर्व अनुकूल बाजू आणि प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा गृहीत धरल्यानंतरही भाजपला 200 पेक्षा जास्त जागा 2014  मध्ये मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि अकाली दल वगळता अन्य मित्र पक्षांना जवळ करण्यासाठी मोदींपेक्षा स्वराज किंवा जेटली हे मध्यममार्गी नेतृत्वाला पसंती मिळू शकते.
2004 मध्ये रालोआ सरकारचा पराभव झाला, 2014 मध्ये या पराभवास दहा वर्षे होतील. मागील दहा वर्षात मनमोहन सरकाराच्या राजवटीला जनता निश्चितच कंटाळलेली आहे. वाढती महागाई, नित्य नव्या शुन्यांची भर घालत उघडकीस आलेले घोटाळे, रबर स्टॅम्प पंतप्रधान, धोरण लकव्यामुळे आलेली आर्थिक क्षेत्रातील मरगळ,काळा पैसा धारकांची यादी लपविण्यासाठी चाललेला खटाटोप, फाळणीचा इतिहास विसरून मतपेढी समोर डोळा ठेवून अल्पसंख्यांकाना आरक्षण देण्याचे होत असलेले प्रयत्न, ईशान्य भारताचे होत असलेले बांग्लादेशीकरण, अपु-या शस्त्रसज्जतेची लष्करप्रमुखांनीच दिलेली कबुली, दहशतवादी संघटनाचे जाळे उद्धवस्त करण्यात आलेले अपयश, यामुळे जनतेमधील असलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी समर्थ विरोधी पक्ष नेत्याची आवश्यकता आहे. तो समर्थ पर्याय देण्याची क्षमता मोदींमध्ये निश्चितच आहे.
   अहमदाबादमध्ये चहाचा स्टॉल चालविणारा पो-या ते पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार हा मोदींचा प्रवास  राजकीय अभ्यासाचा विषय आहे. दंगलपुरुष ही  झालेली प्रतिमा सुधारत विकासपुरुष म्हणूनही ओळख निर्माण करण्यात मोदींची दुसरी इनिंग कामी आली. आता गुजरातच्या बाहेर पडताना, देशातील सर्वात शक्तीशाली गांधी घराणे आणि 'ग्रॅँड ओल्ड पार्टी' असलेल्या काँग्रेसला देशव्यापी पर्याय बनण्यासाठी मोदींना आपल्या तत्वांना मुठमाती न देता स्वभावाला मुऱड घालण्याचे मोठे आव्हान आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या देशाच्या विकासाचा सौदागर होण्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी या इनिंगमध्ये त्यांना मिळणार आहे. मोदींच्या तिस-या आवृत्तीला यामुळेच केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक महत्व प्राप्त झाले आहे.
     
टीप - नरेंद्र मोदींवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
     

Friday, September 4, 2009

हिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप सैरभैर झालाय.प्रमुख नेत्यामंधील मतभेद वाढलेत.पक्षाला नवा नेता सापडलेला नाही.अडवाणीनंतर कोण ? संघ भाजपचा ताबा घेणार का ? अशा प्रकारचे प्रश्न सध्या वारंवार विचारले जातायत.अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भाजपचे काय होणार ? ही चिंता सतावतेय.देशातला एक प्रमुख पक्ष दुबळा झालाय.असं मत सध्या व्यक्त केलं जातंय.भाजपचे काय होणार ? हाच देशापुढचा सर्वात महत्वाचा आणि चिंतेचा प्रश्न बनलाय.असंच चित्र गेल्या आठवड्यात माध्यमांनी उभं केलं होतं.

भाजपचे काय होणार ? असा प्रश्न माझे अनेक मित्र मला सध्या विचारतायेत.मला याबाबत एक जुनी गोष्ट आठवते.एक अस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला देव आहे की नाही यावरुन. नऊ दिवस नऊ रात्र अखंड वाद घातल्यानंतरही निर्णय लागला नाही.त्यामुळे दोघंही आपआपल्या घरी निघून गेले.नास्तिक व्यक्तीनं घरी गेल्यानंतर घरी देव्हारा स्थापन करुन त्यात देवाच्या मुर्तीची स्थापना केली.तर आस्तिक व्यक्तीनं देवासकट देव्हाराचं फेकून दिला.आपल्या मुल्यांवरचा विश्वास हरवलेल्या,नेमक्या अस्मितेचं भान विसरलेल्या त्या आस्तिक माणसानं देवासकट देव्हारा फेकून देण्याचं दृष्टांत भाजपला अगदी फिट्ट बसतो.

भाजपचे काय होणार ? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना या पक्षातील चार महत्वाच्या अप्रवृत्तीचा विचार करायला हवा.

1) धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ

2 ) प्रमुख नेत्यांमधील टोकाचे मतभेद

3) भाजपचे झालेले काँग्रेसीकरण

4 ) भाजपचा नवा चेहरा कोण ?


धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ :

गेल्या काही वर्षात भाजपचे धोरण कमालीचे टोकाचे बनले आहे.सत्ता असताना सर्वधर्म समभाव आणि सत्तेत नसताना हिंदुत्ववाद. सत्तेत असताना पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी कोणत्याही थराला जायचे आणि सत्तेत नसताना, पाकिस्तानविरोधी प्रचार करायचा . सत्तेत असताना आर्थिक उदारीकरणासाठी फायद्यातील उद्योग विकण्याचा सपाटा, सत्तेत नसताना, दुस-या सरकारने स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणाचा विरोध. सत्तेत असताना अमेरिकेबरोबर अणुकराराकरता पुढाकार दुस-या सरकारच्या याच कराराला कमालीचा विरोध असे कमालीचे टोकाचे अगदी दुटप्पी वाटावे असे धोरण या पक्षाने राबवले आहे.

स्वदेशी आणि सुरक्षेचा जप भाजप नेहमी करतो. मात्र अगदी संसदेवर हल्ला होऊनही ' अब आरपार की लडाई होगी ' असं भाषणातून गरजण्याइतपतचं भाजपची आक्रमकता मर्यादीत राहीली. एकेकाळी स्वदेशीचा सतत जप करणा-या या पक्षानं निर्गुंतवणूक हे नवीन मंत्रालय निर्माण केलं.अनेक फायद्यातले सरकारी उद्योग मोडीत काढले. समान नागरी कायदा आणि 370 वे कलम रद्द करणे हे मुद्दे अडचणीचे ठरतात म्हणून कार्यक्रम पत्रिकेतून वगळले गेले.राममंदिराचा जप हा फक्त निवडणुका आल्यावरच करायचा हेच बहुधा या पक्षाचं धोरणं असावं.

प्रमुख नेत्यांमधील कमालीचे मतभेद :

पार्टी विथ डिफरन्स ही भाजपची एकेकाळाची ओळख. मात्र आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी नवी ओळख पक्षाची बनली आहे.जसवंत सिंग सारखा संपूर्ण हयात पक्षामध्ये घालवलेला नेता आपल्या पुस्तकांमध्ये जिनांचे कौतुक करतो.अरुण शौरीपांसून ते वसुंधराजे पर्यंत भाजपचे नेते पक्षासमोरील डोकेदुखी बनले आहेत.लोकसभा निवडणुका जिंकू न शकणारे अनेक नेत्यांनी पक्षात महत्वाच्या जागा बळकावल्यात.यापैकी काही नेत्यांचे संघटनात्मक किंवा व्यवस्थापनात्मक कौशल्य उत्तम आहे.परंतु आपली वैयक्तिक महत्वकांक्षा साध्य करण्यासाठी एकमेकांच्या बातम्या हेच नेते माध्यमांना पुरवतात.जसवंत सिंग-यशवंत सिन्हा-अरुण शौरी यांनी लिहलेलं अध्यक्षांना पत्र सार्वजनिक कसे झाले ? बाळ आपटे समितीचा अहवाल माध्यमांना कुणी पुरवला ? या आणि अशा प्रश्नांचा कठोरपणे मागोवा घेण्याची वेळ पक्षावर आलीय.गोपिनाथ मुंडे,नरेंद्र मोदी,शिवराज सिंह चौहान,वसुंधराजे शिंदे,यदीयुराप्पा विजयकुमार मल्होत्रा अशा राज्यपातळीवरील प्रमुख नेत्याला अपशकून करण्याकरता तितकाच मोठा गट पक्षात सतत कार्यरत असतो.भाजपच्या झालेल्या काँग्रेसीकरणाचे हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपचे काँग्रेसीकरण :-

जनसंघाची एक तर हिंदुमहासभा होईल किंवा काँग्रेस’ असे विधान जनसंघाच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले होते. हिंदुत्ववादाची पताका घेतलेल्या जनसंघाला ना हिंदुमहासभेचा आकार मिळाला, ना काँग्रेसचे रूप घेता आले. याच जनसंघाचा तीन दशकांनंतरचा अवतार म्हणजे भारतीय जनता पक्ष. तो मात्र काँग्रेस हिंदुत्ववादी अवतार किंबहुना हिंदुत्ववादाचा काँग्रेसी अवतार बनतो आहे, असे खुद्द भाजपच्या नेते-कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना आता वाटू लागले आहे.

भाजपचे काँग्रेसीकरण झाले, ते मुख्यत: गेल्या दोन दशकांत. वाजपेयी सरकारवर नजर टाकली तरी ते लक्षात येते. सुरेश कलमाडी, अरुण नेहरू आणि सुखराम यांच्यासारखे आयाराम ,गयाराम खूपच झाले ते सोडून दिले तरी वाजपेयी सरकारमधील किती मंत्री अस्सल संघवादी किंवा भाजपचे होते? जसवंतसिंह, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, राम जेठमलानी, मनेका गांधी, यांचा संघाशी किंवा संघाच्या विचारसरणीशी तरी काय संबंध? जसवंतसिंह लष्कारातील निवृत्त मेजर. यशवंत सिन्हा दोन तपे नोकरशाहीत वावरले आणि संधी मिळताच राजकारणात येऊन चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये थेट अर्थमंत्री बनले. पुढे १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून वाजपेयी मंत्रिमंडळात सत्तेची ऊब कायम राखली. आता तर संजय गांधींचे चिरंजीव, मनेकापुत्र वरुण म्हणजे भाजपची मुलुखमैदान तोफ मानली जाते. अरुण नेहरू, मनेका आणि वरुण यांनी हिंदुत्ववादी भाजपचे प्रतिनिधित्व करावे, यात नेहरू-गांधी घराण्याला खिजवण्याचे समाधान भाजपला मिळत असले, तरी ही भाजपचीही थट्टा आहे, हे त्यांना समजत नाही. अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

भाजपचा नवा चेहरा कोण ? :-

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी गेली तीन दशके भाजपची धुरा सांभाळलीय. भाजपला प्रभावी राष्ट्रीय पक्ष बनवण्यात आणि सत्तेपर्यंत पोचवण्यात या दोन्ही नेत्यांचा महत्वाचा वाटा आहे.आज अटलजी पार थकलेत.अडवाणींचा शक्तीपात झालाय.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचा हा लोहपुरुष कमालीचा एकाकी पडलाय.कंदहारच्या मुद्यावर अडवाणी सारख्या मुरब्बी आणि अस्सल राष्ट्रीय विचाराच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली आहे ती खरीच अस्वस्थ करणारी आहे.त्यांना ही भूमिका जाणीवपूर्वक घेण्यास भाग पाडले असावे.अशीही शंका मनात येत राहते.भाजप थिंक टॅंकच्या अनेक फसलेल्या आणि अंगाशी आलेल्या धोरणांपैकी हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांचा विचार केला तर भाजपचा चेहरा बनू शकेल असं एकच नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे नरेंद्र मोदी. 59 वर्षांचे नरेंद्र मोदी हे एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजराथमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.मोदींच्या कार्यकाळात गुजराथमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.मोदींचे हे मॅजिक या लोकसभा निवडणुकीत चालले नाही.असा एक महत्वाचा दावा त्यांचे विरोधक करतात.मात्र खुद्द अटलजी आणि अडवाणींचे मॅजिक चालण्याची सुरवात 1989 पासून झाली.मोदी कार्डचा वापर तर पक्षाने यंदा प्रथमच केलाय.

संघपरिवाराशी घट्ट जुळलेली नाळ हे मोदींचे आणखी एक बलस्थान.संघाच्या शक्तीशिवाय आणि मदतीशिवाय भाजप हा अधुरा आहे.हे एक अगदी उघड सत्य आहे.मोदी हे संघाचे अनेक वर्ष प्रचारक होते.संघाच्या मुशीत तयार झालेला नेता अशीच त्यांची पहिली ओळख पूर्वी होती आणि आजही आहे.अटलजींप्रमाणे मोदीही अविवाहीत आहेत.त्यामुळे इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा ब-यापैकी मोदीत्वाची ब-यापैकी ओळख करुन देते.

गुजराथची दंगल हा मोदींवरील डाग आहे.तसेच अल्पसंख्याक मतं भाजपला मोदींमुळे मिळाली नाहीत असाही प्रचार केला जातो.मात्र गेल्या आठ वर्षात साबरमती नदीमधून बरेच पाणी वाहून गेले आहे.एक विकासाची कास धरणारा राज्याला प्रगती पथाकडे नेणारा नेता अशी ओळख करुन देण्यात ते यशस्वी झालेत.विकासकामांना अडथळा येतो म्हणून अतिक्रमणं करुन बांधलेली अहमदाबादमधील मंदीरे पाडण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. मागील गुजराथ विधानसभे निवडणुकीत संघपरिवारातील एका 'प्रवीण' नेत्याने मोदींविरुद्ध मोहिम उघडली होती.ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदी त्यामुळे विचलीत झाले नाहीत.मोदींच्या कट्टरवादाचा बाऊ करणा-यांनी ही उदाहरणे आवर्जून लक्षात घ्यायला हवीत.

ये देशाचे कट्टर धर्मांध व्यक्तीने जेवढे नुकसान नाही केले तेवढे बेगड्या धर्मनिरपेक्ष व्यक्तींने केले आहे.
धर्मनिरपक्षतेच्या नावाखाली बांगालदेशी घुसखोरांपासून ते अफजल गुरुंपर्यंत सर्वांचे लाड करणे हेच अनेकांचे धोरण असते. अशा प्रकारच्या बेगड्या वृत्तींचा भाजपमध्ये शिरकाव झालाय.हिंदुत्व हाच भाजपाचा वैचारीक गाभा आहे. हा गाभा हलवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपच्या इमारतीला सध्या चिरा गेल्यात.या चिरा बुजवायच्या असतील तर नरेंद्र मोदींकडेच पक्षाची धूरा सोपवायला हवी.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपला धक्का नक्कीच बसला असेल.परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही.आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले, पण अद्यापही भाजप उभा चिरला जावा, तसा फुटलेला नाही.एका प्रमाणिक विचारांनी भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे मोठे बळ भाजपच्या मागे उभे आहे.हे बळ जोपर्यंत भाजपकडे आहे तोपर्यत या पक्षाला मरण नाही.
वैचारिक गोंधळ झाल्यामुळे देवासंकट देव्हारा फेकून देणा-या व्यक्तीचा दृष्टांत भाजपला लागू होतो.असं मी या ब्लॉगच्या सुरवातीलाच सांगितलंय. या देवाची पक्षात पुन्हा एकदा स्थापना करायची असेल तर यासाठी करायला लागणा-या पुजेचे पौरोहित्य मोदींकडेच द्यायला हवे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...