Thursday, December 31, 2009

कथा काँग्रेसची


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या इंदिरा काँग्रेस या भारतामधल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्या 125 व्या वर्षात पदार्पन केलंय. 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईत या पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. गेल्या 125 वर्षात या पक्षाने देशाच्या इतिहासात एक न पुसता येणारे स्थान निर्माण केले आहे.

सुरवातीचा काळ भारताचा 125 वर्षांचा इतिहास लिहीत असताना काँग्रेसला टाळून हा इतिहास लिहणे शक्य नाही.1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापन झाली. हा काळ मोठा गुंतागुंतीचा होता. इंग्रजी शिक्षण घेऊन तयार होणारी एक सुशिक्षत भारतीयांची पिढी या देशात तयार होत होती. या वर्गाच्या अंसोतषाला योग्य प्रकारे रस्ता देणं आवश्यक आहे. हे चाणाक्ष ब्रिटीश राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं.त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलेन ह्युम या निवृत्त सनदी अधिका-यांच्या पुढाकाराने झाली. सुरवातीच्या काही अधिवेशनात ब्रिटीश राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबध ठेवावे असेच मत त्यावेळी काँग्रेस पक्षातल्या बहुतेक नेत्यांचे होते. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनालाही हजेरी लावली होती.न्या. रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी या सारख्या विलक्षण व्यक्तींचे सुरवातीच्या काळात पक्षावर वर्चस्व होते. ब्रिटीश राज्यकर्त्यांशी संघर्ष न करता चर्चेच्या माध्यमातून भारतीयंचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे मत यापैकी बहुतेक नेत्यांचे होते. काँग्रेसच्या राजकारणात प्रसिद्ध झालेला हाच तो मवाळ गट. ब्रिटीशांची राजवट ही हिंदूस्थानला मिळालेले वरदान आहे. असेही यापैकी अनेकांचे मत होते. या नेत्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाचे स्थान समाजातल्या काही वर्गांपुरतेच मर्यादीत होते. हा पक्ष ख-या अर्थाने लोकचळवळ बनला तो टिळकयुगात.




टिळकयूग---लोकमान्य टिळकांवर त्यांच्या विरोधकांनी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी अशी टिका केली होती. पुढे हेच विशेष टिळकांची ओळख बनली. कोणताही अन्य व्यवसाय न करत केवळ राजकारण करणारे व्.यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. काँग्रेसच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला त्यांनी आपल्या काराकिर्दीत वेगळी दिशा दिली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध सामान्य जनतेमध्ये असलेल्या असंतोषाला टिळकांनी आपल्या लेखणीतून आणि कार्यातून ख-या अर्थाने वाचा फोडली. भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या टिळकांनी काँग्रेसला लढाऊ आणि समर्थ बनवले. 1907 च्या सुरत अधिवेशनात ज्येष्ठ मवाळ नेत्यांच्या दडपणाला त्यांनी जुमानले नाही. जहाल आणि मवाळ अशी काँग्रेसची विभागणी या अधिवेशनात झाली.

1905 मध्ये करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीला टिळकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. धर्माच्या नावावर बंगालची फाळणी करण्याचा ब्रिटीश सरकारच्या राजकारणावर त्यांनी सा-या देशात रान उठवले. लाल-बाल-पाल या त्रिमुर्तींच्या नेतृत्वाखाली सारा भारत देश एकत्र आला. भारतीय जनमानसाच्या या अभूतपूर्व रेट्यांमुळे ब्रिटीश सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले. 1911 साली बंगालची फाळणी ब्रिटीशांनी रद्द केली. काँग्रेसच्या चळवळीला मिळालेलं हे पहिले मोठं यश होतं. 1907 मध्ये काँग्रेसची विभागणी झाली असली तरी त्यानंतर 1916 मध्ये काँग्रेसच्या सर्व गटाचे एकत्रिकरण करण्यामध्ये टिळकांचा पुढाकार होता. टिळकांच्याच पुढाकाराने जहाल-मवाळ आणि अगदी मुस्लिम लिग देखील राष्ट्रीय सभेच्या झेंड्याखाली एकत्र आली. मुस्लिम लिगचे नंतरच्या काळातील सर्वेसर्वा आणि भारतीय फाळणीचे खलनायक महंमद अलि जिना हेही कट्टर टिळकभक्त होते. टिळकांनी आपल्या शेवटच्या काळात होमरुल चळवळीची स्थापना केली. स्वराज हा जन्मसिद्ध हक्क आहे असे ब्रिटीश साम्राज्याला निक्षणुण सांगणा-या लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 या दिवशी निधन झाले. भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले. गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली.

गांधीयूग ---विसाव्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओखख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी, सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार अस्त्रांनी त्यांनी ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडले.

मुस्लिमांचे तृष्टीकरण करण्याची काँग्रेसला सवय लावली तीही गांधीजींनी...तुर्कस्थानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खिलाफत चळवळ सुरु केली. काँग्रेसच्या राजकारणात मुस्लिमांचे जाणीवपूर्वक प्रतिनिधीत्वन त्यांनीच वाढवले. 'हम करे सो कायदा ' ह्या गांधी घराण्याच्या खास कल्चरचा पायाही त्यांनीच रचला. आपल्या नेतृत्वाला धोका निर्माण करु शकणारे सुभाषचंद्र बोस आणि महंमद अली जिना हे दोन नेते त्यांनी काँग्रेसच्या राजकारणातून दूर केले.

गांधीच्या आणि काँग्रेसच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे पुणे करार. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन भारताचे आणखी एक विभाजन करण्याचा डाव ब्रिटीशांनी रचला होता. ब्रिटीशांच्या या धूर्त डावपेचाविरुद्ध गांधीजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले. अखेर गांधीजीच्या नैतिक दबावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान राखला. 24 सप्टेंबर 1932 या दिवशी गांधीजी आणि आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये पुणे करार करण्यात आला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ द्यावे. या बाबीवर या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. गांधीजींनी या बाबत आग्रही भूमिका घेतली नसती तर दलित समाज मूळ प्रवाहातून बाहेर काढण्याचा ब्रिटीशांचा हेतू साध्य झाला असता. अर्थात गांधीजींची ही आग्रही भूमिका मुस्लिम लिगच्या बाबतीत कायम राहू शकली नाही.

फाळणी आणि गांधीहत्या --लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडणा-या पंडित नेहरुंच्या काँग्रेसनेच फाळणीला संमती दिली. महंमद अली जिनांच्या महत्वकांक्षी मनोवृत्तीला ब्रिटीश राज्यकर्त्यांनी खतपानी घातले. एकेकाळचे धर्मनिरपेक्ष आणि कट्टर टिळकभक्त जिना 1940 नंतर मुस्लिम लिग या कट्टर संघटनेचे सर्वेसर्वा बनले. मुस्लिम लिगच्या गुंडांनी देशभर घातलेला हैदोस, सत्ता संपादन करण्यासाठी आतुर झालेले काँग्रेस नेते यामुळे या देशाची फाळणी होऊन हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हीच एकमेव सर्वमान्य आणि सर्वशक्तीमान संघटना होती. या पक्षांच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे आणि सर्वशक्तीने प्रयत्न केले असते तर कदाचित फाळणीचा इतिहास बदलला असता. फाळणी टाळता न येणं हे गांधीजंच्या नेतृत्वाखाली लढणा-या महान देशभक्तांच्या संघटनांचे मोठे अपयश होते. गांधींच्या या अपयशामुळे त्यांच्यावर नाराज असलेला एक वर्ग या देशात होता. त्यातच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावरही मोठा गहजब उडाला होता. अखेर 30 जानेवारी 1948 या एक दुर्दैवी दिवशी नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरु तरुणाने गांधींची हत्या केली. स्वातंत्र्यानंतर देशावर आणि काँग्रेस पक्षावर झालेला हा मोठा आघात होता. देशाच्या विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेचे मोठे पडसाद उमटले. अनेक ब्राम्हण व्यक्तींची घरे यानंतरच्या काही दिवसात जाळण्यात आली. राजकारणात आणि समाजकारणात ब्राम्हण वर्गाचे महत्व कमी करण्यासाठी गोडसेच्या जातीचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आला. जातीभेद मिटावा याकरता आयुष्यभर संघर्ष करणा-या गांधींच्या शिष्यांनी या संपूर्ण गोष्टीक़डे दुर्लक्ष केलं.

नेहरुयूग --1947 ते 1964 या काळात काँग्रेसवर संपुर्णपणे नेहरुंचे वर्चस्व होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले जवळपास सर्वच नेते काँग्रेसमध्ये होते. या पुण्याईवर काँग्रेसने सुरवातीच्या काही निवडणुका जिंकल्या. परंतु सत्तेची उब चाखताच काँग्रेस नेत्यांचा भाबडा आशावाद गळून पडला. माणूस स्खलनशील असतो. ह्या तत्वाला काँग्रेसचे नेते अपवाद नाहीत हे देशाने पाहिले. या देशात रामराज्य आले पाहिजे या गांधींच्या स्वप्नाला 'शांतीघाटा'मध्ये कायमची समाधी मिळाली.आंतराराष्ट्रीय नेतृत्व करण्याचा प्रयत्न नेहरुंनी केला. पंचशील करार, अलिप्त राष्ट्र चळवळीला दिलेली चालना, पंचशील करार यासारख्या गोष्टींमुळे नेहरुंनी स्वत:ला तरराष्ट्रीय राजकारणात ब-यापैकी प्रस्थापित केले. परंतु नेहरुंच्या स्वप्नाळू वृत्तीचा मोठा फटका देशाला 1962 मध्ये सहन करावा लागला. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मोठा पराभव स्विकारावा लागला. चीनच्या या हल्ल्याची सुतराम कल्पना भारतीय लष्कराला नव्हती. कारगील घुसखोरीवरुन भाजपला टिका करणा-या काँग्रेस नेत्यांना 1962 च्या या ऐतिहासिक चुकीची आता आठवणही होत नाही.

शास्त्री कालखंड 1964 ते 1966 या लहान परंतु अत्यंत कसोटीच्या काळात लालबहाद्दूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते होते. या काळात दुष्काळ आणि 65 चे युद्ध या दोन मोठ्या परीक्षांना देश समोर गेला. जय जवान जय किसान हा नारा त्यांनी देशाला दिला. हरित क्रांतीची बिजं त्यांनी आपल्या कारकिर्दींमध्ये रोवली. देशाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या दुर्देवाने शास्त्रीजींचे 1966 साली अपघाती निधन झाले. शास्त्रीजींना मोठा कालखंड मिळाला असता तर काँग्रेसचे आणि देशाच्या सध्याच्या चित्रात मोठा फरक पडला असता.

इंदिरापर्व ---- काँग्रेस पक्षातील एकमेव पुरुष असं वर्णन त्या काळातल्या अनेक विश्लेषकांनी इंदिरा गांधींचे केले आहे. 1969 मध्ये बंगोलर अधिवेशनात तमाम बड्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड केले. या बंडाने ह्या बाई डगमगल्या नाहीत. इंदिरा काँग्रेस ही नवीन काँग्रेस त्यांनी स्थापन केली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बॅंकांचे राष्ट्रीयकरण, 1974 मध्ये पोखरणमध्ये झालेला अणुस्फोट , सिक्किमचे भारतामध्ये केलेले विलिनीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशची निर्मिती ह्या सर्व भक्कम उपलब्धी इंदिराजींच्या आहेत.

कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्याच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.

भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.


राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.

राजीव राजवट --- नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी हे पंतप्रधान होणं हे काँग्रेसी परंपरेला अगदी साजेसं होतं. एकेकाळी पायलट असणारा हा तरुण कोणताही मंत्रिपदाचा अनुभव नसताना या देशाचा पंतप्रधान झाला. या देशातल्या स्वप्नाळू तरुणांचा प्रतिनिधी म्हणून सुरवातीला राजीव गांधी यांच्याकडे सुरवातीला बघितले गेले. बोफोर्स घोटाळा आणि शाहबानो प्रकरण या दोन प्रकरणामुळे राजीव गांधींच्या या प्रतिमेला तडा गेला. बोफोर्समधले वास्तव आजतागायत बाहेर आलेले नाही. तर शाहबानो प्रकरणामुळे राजीव गांधींची पुरोगामी प्रतिमा किती बेगडी आहे हे सा-या देशाने पाहिले. कट्टरवादी मुस्लिमांच्या दबाबावाला बळी पडून काँग्रेसने घटनादुरुस्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तमा त्यांनी केली नाही. या समाजातल्या मागास वर्गाला त्यातही मुस्लिम समाजाला प्रगतिच्या प्रवाहात येऊ द्यायचे नाही. हे काँग्रेसचे धोरण आहे. असा आरोप नेहमी करण्यात आलाय. शाहबानो प्रकरणामुळे या आरोपाला बळ मिळाले. शाहबानो प्रकरणाच्या दोन दशकांनतर देशातल्या मुस्लिमांची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. काँग्रेस सरकारनेच नेमलेल्या सच्चर आयोगाने ह्या वास्तवावर बोट ठेवलंय.

1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीखांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. या शीख दंगलीबाबत राजीव गांधींनी अगदी बोटचेपी भूमिका घेतली. '' वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर फांद्या कोसळणारच '' हे राजीव गांधी यांचे वाक्य शीख बांधवांच्यया जखमांवर मीठ चोळणारे ठरले. त्यांतर सुमारे दहा वर्ष पंजाब या ज्वालामुखीत जळत होता. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला काँग्रसी राज्यकर्त्यांच्या विघातक धोरणांमुळे बळ मिळाले

.नरसिंह राव ---गांधी घराण्याच्या व्यतीरिक्त काँग्रेसने एक पंतप्रधान देशाला दिला. ते म्हणजे पी. व्ही. नरसिंहराव. देशाची आर्थिक परिस्थिती डबाघाईला आलेली असताना राव पंतप्रधान झाले. या देशात आर्थिक उदारीकरणाचे युग त्यांनी आणले. आज भारतीय अर्थव्यवस्थेला जे ब-यापैकी दिवस आले आहेत त्याचा पाया नरसिंहराव यांच्याच सरकारनेच रचला. परंतु नरसिंह राव यांचे नेतृत्व हे करिश्माई नव्हते. त्यांच्या काळात आयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेली. या घटनेमुळे मुस्लिम समाज काहीप्रमाणात काँग्रेसपासून दूर गेला. वेगवेगळ्या भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये राव अडकले. काँग्रेसची पक्षसंघटना कमजोर झाली. या सर्व कारणांमुळे 1996 ते 2004 ही आठ वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले.

सोनिया काँग्रेस---काँग्रेस पक्ष अत्यंत कठिण कालखंडामध्ये असताना सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारलं. योग्य पक्षांची घेतलेली साथ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काही फसलेली धोरणे यामुळे 2004 साली काँग्रेस आघाडीला सत्ता मिळवता आली. 2009 मध्ये विरोधकांच्या दूहीचा आणि शक्तीपाताचा फायदा काँग्रेस आघाडीला झाला. मनमोहन सिंग सलग दुस-यांदा देशाचे पंतप्रधान झाले.

आज देशापुढे वाढती महागाई, घुसखोरी, नक्षलवाद, तेलंगाना सारख्या मुद्यावर निर्माण झालेला कट्टर प्रांतवाद ह्या जुन्याच अंतर्गत समस्या मोठ्या होऊन उभ्या आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबानी शक्तींचा वाढत चाललेला प्रभाव, बांगलादेशमधील कडवा धर्मवाद, नेपाळमध्ये माओवादी संघटनांचे वाढते जाळे या गोष्टींचा भारताच्या पुढच्या वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे. या सर्व समस्यांमधून देशाला बाहेर पाडण्यासाठी एखादे लॉंग टर्म व्हिजन काँग्रेसी राज्यकर्त्यांपुढे नाही. ह्य. सर्व समस्यांवर रामबाण औषध शोधण्यापेक्षा केवळ तात्कालिन फायद्याकरता वरवरची मलमपट्टी करण्याची विघातक परंपरा आजही सुरु आहे. सध्या चिघळलेला तेलंगना प्रश्न हे याचे अगदी क्लासिक उदाहरण


देशातल्या नागरिकांनी काँग्रेसवर भरभरुन प्रेम कलं. काँग्रेसी नेत्यांना अगदी देव्हा-यात बसवलं. सत्ता, संपत्ती, किर्ती या सर्व गोष्टींचा भरभरुन उपभोग काँग्रेसी राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे केलाय. या सर्व प्रेमाची उतराई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसी नेत्यांनी केला नाही. स्वातंमत्र्याच्या सहा दशकानंतरही भारताची गणना विकसीत राष्ट्र म्हणून होत नाही. काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या या उदासिन धोरणांचीच फळे भारतीय भोगतायत असं म्हंटल तर यात वावगे काय ?

Friday, December 25, 2009

अटल कहाणी


राजकारण हे सभ्य लोकांचे क्षेत्र नाही. सर्वसामान्य व्यक्ती राजकारणात तगू शकत नाही. ध्येय, विचारधारा या गोष्टींना राजकारणात स्थान नाही.या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जात, पैसा, घराणे आणि पक्ष असे राजकीय मेरीट तुमच्याकडे असावे लागते. या सारख्या गोष्टी आपण सारेजण वारंवार ऐकतो. स्वातंत्र्यानंतर अगदी आत्तापर्यंतचे वेगवेगळे राजकारणी पाहिले की या गोष्टी ख-या आहेत याची खात्री वाटू लागते. परंतु गेल्या सहा दशकांत अशी काही मोजक्या राजकारणी व्यक्ती आठवल्या की वाटतं..अजुनही आशेला जागा आहे. पैसा, पक्ष, जात, विचारधारा या सारख्या कोणत्याही गोष्टींची तडजोड न करता या क्षेत्रात यशस्वी होता येतं. अगदी या देशाचे तीन वेळा पंतप्रधानही होता येतं. होय अटलबिहारी वाजपेयी हे या देशातल्या अशा मोजक्या राजकरण्यांपैकी एक आहेत. ज्यांचा अभिमान सर्वांना वाटायला हवा. .

आतापर्यंत या देशाने 7 काँग्रेसेतर पंतप्रधान पाहिले. परंतु ख-या अर्थाने एकमेव गैरकाँग्रेसी पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. सुमारे सहा दशकं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक, जनसंघ आणि नंतर भाजप या माध्यमातून त्यांनी समाजकाराण आणि राजकारण केलं. 1957 मध्ये बलरामपूर या लोकसभा मतदारसंघातून ते सर्वात प्रथम निवडून आले. सुमारे सहा दशकं त्यांच्यामधील कुशल संसदपटूचा अनुभव सा-या देशाने घेतला आहे.

वाजपेयींचं एकूणच व्यक्तिमत्त्व एखाद्या खानदानी उत्तर भारतीय कुटुंबप्रमुखासारखं. शिवाय ओजस्वी आणि सभा जिंकणारं वक्तृत्व साथीला. त्यामुळे अल्पावधीतच संसदेतील त्यांचं स्थान अपरिहार्य बनलं आणि ते परराष्ट्र धोरणावर बोलू लागले की पंडित नेहरूही सभागृहात आवर्जून येऊन बसत. ज्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि काँग्रेस ह्याच पक्षाचे राज्य होते. पंडित नेहरु इंदिरा गांधी यासारख्या प्रचंड मासबेस असलेल्या व्यक्ती देशाच्या पंतप्रधान होत्या.त्या काळात विरोधी पक्षात तेही जनसंघासारख्या एका विशिष्ट विचाराधारेनं भारलेल्या पक्षात राहून स्वत:चे स्थान निर्माण करणे ही अत्यंत अवघड बाब होती. परंतु अटलजीने ती अगदी लिलया केली.


सर्वसमावेशकता हा अटलजींच्या व्यक्तीमतवामधला अत्यंत महत्वाचा गुण. त्यांच्या याच कौशल्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने त्यांना प्रोजेक्ट केलं. अण्णा द्रमुक ते असम गण परिषद आणि शिवसेना ते नॅशनल काँन्फरन्स यासारख्या अगदी अठरापगड पक्षांची मोट त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ शकली. अठरापगड पक्षांना एकत्र येऊन या देशात सरकार बनू शकतं. तसेच ते संपूर्ण कालावधी चालू शकतं हे अटलजींनीच सर्वप्रथम या देशाला दाखवून दिलं.


अटलजींच्या पंतप्रधान पदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या दिवशी भारताने पोखरणमध्ये अणूस्फोट केला. इंदिरा गांधींनतर अणूचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटलजी. जय जवान जय किसान यांच्याबरोबरच जय विज्ञान असा नवा नारा त्यांनी देशाला दिला. या देशाला अण्वस्त्रसज्ज त्यांनी केलं. जागतिक समुदायाच्या दबावाची तसेच निर्बंधाची त्यांनी पर्वा केली नाही. पाकिस्तान, चीन बांग्लादेश या सारखे विश्वासघातकी शत्रूराष्ट्र सभोवती असताना संरक्षण सज्जता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अणूचाचणी करुन सा-या जगाला त्यांनी आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले.


अटलजींच्या कारकिर्दीतला दुसरा कसोटीचा काळ म्हणजे कारगील युद्ध. पाकिस्तान सोबत मैत्रीचे संबंध राहावे हीच त्यांची प्रमाणिक इच्छा होती. याच एकमेव उद्देशाने लाहोर बस यात्रा सारखे अत्यंत धाडसी पाऊल त्यांनी उचलले. लाहोर घोषणापत्रामध्येही त्यांनी पाकिस्तानकडे अत्यंत दिलदारपणे मैत्रीचा हात पुढे केला होता. परंतु पाकिस्तानच्या ना 'पाक' राज्यकर्त्यांना त्यांचे हे प्रामाणिक प्रयत्न मान्य नव्हते.त्यामुळेच त्यांनी कारगिलचे युद्ध भारतावर लादले.


कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेली घुसखोरी हे भारतीय गुप्तचर संस्थांचे अपयश होते. हा मुद्दा बरोबर आहे. परंतु ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर अगदी तातडीने अटलजी सरकारने पाऊले उचलली हे मान्य करावे लागेल. नियंत्रण रेषा पार न करता प्रतिकूल भौगोलिक आणि सामरिक परिस्थितीवर मात करत भारतीय लष्कराने या युद्धात विजय मिळवला. भारतीय लष्कराच्या प्रत्येक कृतीला अटलजींच्या सरकारने खंबीर पाठिंबा दिला. जागतिक दडपणाचा दबाव न जुमानता पाकिस्तानी लष्कराला भारतीय सैन्याने नियंत्रणरेषेच्या बाहेर पिटाळले.' हम जंग न होने देंगे ' अशी एकेकाळी कविता करणारा हा कवी -हदयाचा पंतप्रधान प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगात किती खंबीर बनू शकतो हे सा-या देशाने या काळात अनुभवलं. ऑपरेशन विजय यशस्वी होण्यामागे भारतीय लष्कराला अटलजींच्या सरकारने दिलेली तोलामोलाची साथ तितकीच महत्वाची होती.


संपूर्ण देशाला पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर जोडणारी पंतप्रधान ग्रामसडक योजना, देशातल्या प्रत्येक व्यक्तीला साक्षर करण्यासाठी सुरु केलेले सर्वशिक्षा अभियान, देशातला दुष्काळ आणि पाणीटंचाई सारख्या समस्या कायम स्वरुपात संपण्याकरता नदी जोड सारखी 'भगीरथ' योजना, दुरसंचार क्षेत्राचे व्यापक जाळे, मोबाईल क्रांती या सारख्या अनेक कल्याणकारी योजना वाजपेयी सरकारने आपल्या सहा वर्षांच्या काळात सुरु केल्या. नरसिंह राव सरकारने सुरु केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रीयेला त्यांनी चालना दिली. सार्वजनिक प्रकल्पात खाजगी गुंतवणूक वाढवली. शंभर कोटी लोकसंख्येच्या भारतीय बाजारपेठेचे आत्मभान जागवण्याचे काम याच सरकारच्या कारकिर्दीत झाले. सा-या जगाला भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची जाणीव करुन देण्याचे काम अटलजी सरकारने सर्वप्रथम केले.


अटलजी सरकारच्या सर्वच गोष्टी आलबेल होत्या असे नाही. या सहा वर्षात अशा काही गोष्टीही घडल्या की त्या काळात अटलजी पंतप्रधान होते हे आठवलं तरी मन अस्वस्थ होतं. किंबहूना अटलजींसारखे व्यक्ती देशाचे पंतप्रधान असताना या गोष्टी घडू शकतात याचा कधी कधी विश्वास बसत नाही. IC-814 या विमानाचे झालेले अपहरण हा असाच एक दुर्दैवी अध्याय.काठमांडूहून दिल्लीला निघालेले विमान दहशतवाद्यांनी कंदहारला नेले. ह्या विमानातले प्रवासी सोडवण्याकरता मौलना अझर मसूद सहीत काही कडव्या दहशतवाद्यांना अटलजी सरकारने सोडून दिले. प्रबळ राष्ट्रवादी विचाराशी नाळ घट्ट जोडलेले सरकार दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकू शकते हे करुन चित्र या जगाने पाहिले.


संसदेवर झालेला हल्ला आणि त्यांनंतर काहीही न करता पार पडलेलं ऑपरेशन पराक्रम या दोन गोष्टींबाबतही या सरकारला माफ करणे अवघडं आहे. भारतीय लोकशाही सर्वोच्च मंदींरावर भारतीय संसदेवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामागील पाकिस्तानी कनेक्शन सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. अशा काळातही अटलजी सरकार केवळ ' अब आर पार की लडाई होगी ' इतकेच म्हणत राहिले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान सीमेवर भारतीय लष्कराची सर्वात मोठी जमावाजमव याचकाळात करण्यात आली. सुमारे वर्षभर भारतीय सैन्य केंद्र सरकारच्या आदेशाची वाट बघत सीमेवर उभे होते. कारगील युद्धाच्या वेळी ताठ कणा दाखवणारे अटलजी सरकार त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक समुदायपुढे किंवा अन्य कोणत्याही शक्तीपुढे का झुकले हे न उलगडलेलं कोडं आहे.


राममंदीर, समान नागरिक कायदा,370 वे कलम रद्द करणे हे भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवरचे अस्सल विषय. भाजपला पार्टी विथ डिफरन्स बनवणारे. आघाडीधर्माचे पालन करण्यासाठी भाजपने हे विषय गुंडाळले हे मान्य आहे. आघाडी धर्माचे पालन करताना अटलजींना येणारी मर्यादाही समजता येते. परंतु हे विषय पुढ सरकावे किमान ते पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जीवंत राहावेत याकरताही फारसे प्रयत्न केले नाहीत. भाजपचे काँग्रेसीकरण होण्याचे जी उदाहरणे गेल्या काही वर्षांत ठळकपणे समोर आलीत. हे काँग्रेसीकरण होण्याच्या परंपरेलाही अटलजी पंतप्रधान असताना अधिक चालना मिळाली हे वास्तव नाकरता येत नाही. भाजप नेत्यांनीही भ्रष्टाचार केला.संरक्षण सारख्या सर्वात संवेदनशील क्षेत्रातल्या प्रकरणात लाच घेताना भाजप अध्यक्ष पकडले गेले. माणूस स्खलशील आहे.कितीही संस्कार केले तरी लोभ संपत नाहीत...हे कटू वास्तव भाजपच्या बाबतीत ही खरं आहे. भाजपची ही वैचारिक घसरण सुरु होण्याच्या काळात अटलजी पंतप्रधान होते हे पचण्यास जड असलं तरी दुर्दैवाने खरं आहे.


ह्या सर्व खर्चाचे मुद्दे धरले तरी एक नेता म्हणून अटलजींची उंची हिमालयाइतकी मोठी आहे हे मान्य करावेच लागते. अटलजीं सारख्या योगी व्यक्तींनी सुमारे चार दशकं केलेल्या साधनेच्या जोरावर भाजपला सत्तेची उब अनुभवता आली. एक संघस्वयंसेवक देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे एकेकाळी अशक्य वाटणारे वास्तव अटलजींनी खरे करुन दाखवले. अटलजी वेगळे आहेत. अटलजी सर्वसमावेशक आहेत. कावळ्यांच्या कळपातले राजहंस आहेत अशा प्रकारची मिठ्ठास वाणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रसंगात अनेकदा वापरली. दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा असो किंवा विश्वासदर्शक प्रस्तावाची लढाई कोणत्याही 'आणिबाणी'च्या प्रसंगी त्यांनी आपल्या मुलभूत विचारधारेशी आपल्या परिवाराशी परिवारातल्या संस्कारांशी तडजोड केली नाही. फळाची कोणतीही अपेक्षा न करता काँग्रेसला भाजपच्या रुपाने राष्ट्रव्यापी पर्याय निर्माण करण्याचे काम या कुशल राजकरण्याने केलं आहे.


भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घराणेशाही, गुंडगिरी, जात यापैकी कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. एका प्रमाणिक विचाराधारेनं प्रेरित होऊन यशस्वी होता येतं. नुसतं यशस्वी नाही तर अगदी या देशाचे पंतप्रधान होता येतं हे अटलजींनी दाखवून दिले आहे. 25 डिसेंबरला त्यांच्या 85 व्या वाढदिवशी त्यांना आठवताना ह्या एकाच गोष्टीचे स्मरण सर्वांनी केले तर अटलजींच्या स्वप्नातला समर्थ भारत साकारता येऊ शकेल.

Wednesday, November 11, 2009

.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!


मी मनसेचा समर्थक नाही. राज ठाकरेंचा फॅन नाही.मराठीचा दुराभिमानी नाही. लोकशाहीच्या मंदिराचा आदर ठेवला पाहिजे. विधानसभा हे चर्चेचे व्यासपीठ आहे. हे सारे मला पटते. तरीही मनसेच्या आमदारांनी अबु आझमीला जो चोप दिला त्याला माझे समर्थन आहे.


या प्रकरणात ज्या व्यक्तीला चोप देण्यात आलाय.तो अबु आझमी हा अत्यंत मस्तवाल माणूस आहे.(मला मान्य आहे की लिखानाचे संकेत जपण्याकरता अबु आझमींचा उल्लेख आदरपूर्वक करायला हवा.परंतु अबु आझमीला आदरआर्थी लिहण्यासाठी माझे बोट काही वळत नाही..सॉरी ) अबु आझमीवर मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचे आरोप झाले. अनेक प्रक्षोभक आणि धार्मिक तेढ भाषणे करण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्या मुलाला कोकेन घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. हे सारे करताना त्याला कधीही भारतीय राज्यघटना, महान परंपरा याची आठवण आली नाही. आता मात्र आपल्या स्वार्थासाठी त्याला राज्यघटनेतील कलमांची आठवण होतेय.


तेरा वर्षापूर्वी अबु आझमीच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेत शपथ घेऊ द्यावी याकरता राडा केला होता. हे आज सर्वजण विसरले आहेत. तेरा वर्षापूर्वी त्यांना हिंदू- मुस्लिम अशी तेढ निर्माण करायची होती. आज या पक्षाला मराठी -हिंदी भाषिक यांच्यात फाळणी करायची आहे.सिमी सारख्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणारे समाजवादी पक्षाचे नेते हेच आजचे भिंद्रनवाले आहेत.हा इतक्या कलंकीत पार्श्वभूमी असलेला अबु आझमी निवडून कसा येतो याचेच खरे आश्चर्य आहे.लोकशाही राजवटीतल्या सर्व मर्यादांचा अत्यंत खुबीने वापर करत अबु सारखे हे आमदार निवडून येतात. ते ही एक नाही तर दोन विधानसभा मतदारसंघातून..देशातल्या प्रत्येक समजदार व्यक्तींनी याचा खरेच गंभीरपणे विचार करायला हवा.


अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहे, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची मातॄभाषा हिंदी आहे. मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेचा आदर ठेवण्यासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ? परंतु नाही....राज ठाकरेंच्या 'मराठी खतरेमे ' या ना-याला तेवढ्याच तडफेने उत्तर द्यायचे असेल तर हिंदीच्या आग्रहाची अडेलतट्टू भूमिका घेतली पाहीजे. हे या अबु आझमीला बरोबर माहित आहे. एक मुस्लिम आमदार हिंदीचा कैवार घेतो. हा नवीन प्रतिमा अबुने आता बनवली आहे. अबु आझमीच्या भावी राजकीय काराकिर्दीसाठी ही प्रतिमा नक्कीच उपयोगी पडणार आहे.

अबु प्रमाणे अन्य काही आमदारांनी अन्य भाषेत शपथ घेतली. काहींनी इंग्रजी, काहींनी हिंदी काहींनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. परंतु त्यांच्या शपथ घेण्याच्या उद्देशात कोणता मस्तवालपणा नव्हता.त्यामुळे त्यांना मनसेने कोणताही विरोध केला नाही हे योग्य झाले. माझाही विरोध हिंदी किंवा अन्य भाषेत शपथ घेण्यास नाहीय..तर अबु आझमींच्या मस्तवालपणाला आहे.


या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारची भूमिकाही संशयास्पद होती.राज ठाकरे ह्यांनी दिलेले आव्हान आणि त्याला अबु आझमीने दिलेले प्रतिआव्हान ह्यामुळे हे सर्व प्रकरण पेटणार याची कल्पना सर्वांना होती. तरीही तडजोडीचे कोणतेही प्रयत्न सरकार दरबारातून करण्यात आले नाहीत.यापूर्वी अनेकदा विधानसभेत मार्शल बोलवण्यात आले आहेत. सोमवारी ही खबरदारी का घेण्यात आली नाही. मनसेच्या काठीने अबु आझमीचा साप ठेचण्याची सरकारची योजना होती ?


विधानसभेत राडा करणा-या मनसे आमदारांना शिक्षा ही व्हायलाच हवी. परंतु त्यांना चप्पल दाखवणा-या अबु आझमीला मोकळे का सोडण्यात आले. ? अबु आझमीने बाळासाहेबांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केलं.त्याच्या समर्थकांनी भिवंडीमध्ये बसेस फोडल्या.याबाबत गुन्हा नोंदवणे सोडा साधा निषेध करण्याचे धाडसही मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याने दाखवलेलं नाही. याचे कारण उघड आहे. बिहार आणि झारखंडच्या निवडणुका तोंडावर आहेत.अशा परिस्थीतीमध्ये हिंदी करता झगडणा-या (!!!) या मुस्लिम नेत्याला विरोध करणे काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.


सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा अहंगंड सध्या कमालीचा वाढलाय. दुर्दैवाने भाजप- शिवसेना युतीमध्ये सध्या सुतकी वातावरण आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे काम राज ठाकरेंची मनसे करतेय. ( ही पोकळी भरुन काढण्याकरता त्यांचा जो मार्ग आहे..तो अजिबात योग्य नाही ) परंतु अबु आझमी सारख्या नाठाळ व्यक्तीला ताळ्यावर आणण्याकरता मनसेचे आमदार जर काठी उगारणार असतील. तर हे आमदार मला चालतील. त्यांचा यामागचा उद्देश पवित्र नसेल .. किंबहुना तो नाहीच. त्यांना त्यांची मराठीची दुकानदारी भक्कम करायची असेल, शिवसेनेची गोची करायची असेल हे सारे मला पटतंय..समजतंय परंतु महाराष्ट्रला खरा धोका हा अबु आझमीसारख्या धर्मांध शक्तीचा आहे. मनसेच्या काठीने का होईना हा साप ठेचला जात असेल.. तर त्या मारहाणीस माझे समर्थन आहे.

Tuesday, October 27, 2009

अर्थ निकालाचा


महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अगदी अपेक्षित असेच लागले आहेत.हे निकाल लागल्यावर मला यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतची आठवण येतीय.. या स्पर्धेत कोलकता नाईट रायडर्सचा संघ हरणार यामध्ये अगदी सगळ्यांचे एकमत होते.या निवडणुकीत नाईट रायडर्सची जागा भाजप-शिवसेना युतीने घेतली होती. अगदी नाईट रायडर्स प्रमाणे युतीनेही अगदी विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणला. नाईट रायडर्सप्रमाणे युतीच्या टीममध्येही अनेक स्टारर्स होते.मात्र या स्टारर्समध्ये एकवाक्यता नव्हती. जॉन बुकाननची मल्टीपल कॅप्टनची थियरी त्यांनी अगदी निवडणूक प्रचारातच अमलात आणली होती.ऐन निवडणुक प्रचार रंगात असतानाचे युतीचे नेते आणि आयपीएलच्या दरम्यानचे नाईट रायडर्सचे खेळाडू यांचे चेहरे एकमेकांच्या बाजूला लावले तर हे दोन्ही चेहरे आणि चेह-यावरचे भाव अगदी सारखेच दिसतील.राजकारण आणि क्रिकेट या गोष्टी भारतीय समाजात किती बेमालुमपणे मिसळलेल्या आहेत याचे उदाहरण म्हणून हे पुरेसे असावे.

आघाडी सरकारचा नाकार्तेपणा त्यांना सत्तेपासून दूर खेचण्याकरता पुरेसा होता.परंतु या नाकर्त्या राजवटीला हटवण्यासाठी समर्थ पर्यायच युतीने उभा केला नाही. शिवसेनेचा सारा प्रचार राज ठाकरेंभोवतीच फिरत राहीला. तर भाजपची अवस्था जुने वैभव आठवत बसणा-या व्यक्तींसारखी झालीय.लोकसभेत झालेल्या पराभवातून हा पक्ष अजुनही बाहेर पडलाय असे वाटत नाही.या निवडणुकीत एक पक्ष म्हणून भाजप उतरलाय असे कधीच वाटले नाही. राज्य भाजपचे युनीट एकत्र बांधण्याची जी शक्ती प्रमोद महाजनांच्याकडे होती ती ताकत त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मिरवणा-या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे नाही.हे या निवडणुकीत सिद्ध झालंय.

पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणा-या भाजपने यंदाच्या निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाहीचा पॅटर्न राबवला.गोपीनाथ मुंडेंनी आपली मुलगी पंकजा, भाजी पूनम महाजन आणि जावाई मधुसूदन केंद्रे यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले.यापैकी पंकजा वगळता अन्य वारस या निवडणुकीत पराभूत झाले.मात्र या पंकजा मुंडेंना निवडून आणण्याकरता मुंडेंची बरीच शक्ती घालवावी लागली. मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये भाजप -सेनेला 6 पैकी केवळ परळीची एकमेव जागा मिळवता आली.संपूर्ण मराठवाड्यात परळी आणि उदगीर ह्या दोनच जागा भाजपला जिंकता आल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणा-या मुंडेंनी या पराभवाने कठोर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

भाजपची ही अवस्था तर दुसरिकडे शिवसेनेमध्येही यंदा आश्चर्यकारक असा गोंधळ होता.राडे, धाक, मारामारी आणि परप्रांतीयांचा द्वेष ह्या सारख्या घटकांच्या मदतीने शिवसेना मुंबईत आणि राज्यभर वाढली.उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यापासून शिवसेनेचा हा राडेबाज चेहरा कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि राज ठाकरे या सारख्या नेत्यांना उद्धव यांची ही नवी संस्कृती मानवण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे ते शिवसेनेपासून दूर झाले. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा एकखांबी तंबू होता. राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व गडद करण्याकरता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याकरता त्यांनी गेले पाच वर्षे भरपूर प्रयत्न केले. मात्र ऐन निवडणुक काळात राज यांच्या भुलभुलैयाला बळी पडून उद्धव स्वत:चा मार्ग भरकटले. हा मार्ग भरकटल्याची शिक्षा मतदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिली आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालेला उदय हे या निवडणुकीतील महत्वाचे वैशिष्ट मानावे लागेल. अवघ्या साडेतीन वर्षात स्वत:चे 13 आमदार निवडून आणण्याची कामगिरी राज ठाकरेंनी केलीय.राज ठाकरेंच्या राजकीय कौशल्याला नक्कीच सलाम करावा लागेल. परंतु मनसेने हा विजय कसा मिळवला आहे. या यशाकरता कोणता शॉर्टकट त्यांनी वापरला ह्याचाही विचार त्याच्या जोडीने करायला हवा.

राज यांच्या काठीने शिवसेना नावाचा साप मारला गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मंडळीना तसेच अनेक स्वयंभू सेक्यूलर विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. किंबहुना, युतीला रुळावरून उतरवण्यासाठी मनसेच्या इंजिनाला कोळसा आणि तेलपाणी कोणी पुरवले याचा विचारही व्हायला हवा. 'मराठी खतरे में' असा नारा देत मराठी माणसाचा एकमेव तारणहार असल्याचा दावा करत बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी राजकारण केले.आता बाळासाहेबांचा हा वारसा राज ठाकरे पुढे चालवत आहे. मराठी माणसांच्या नावाने दुकानदारी करणा-या या पक्षांना किती महत्व द्यायचे याचा विचार मराठी माणसांनीच करायला हवा.

राज्यातील जनतेच्या मनात आघाडी सरकारविषयी जो रोष होता, तोच मनसेच्या मतांमुळे विभागला गेला आहे. मनसेमुळे युतीच्या 40 जागा गेल्या. मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत हा जो प्रचार निवडणुकीपूर्वी युतीने केला आहे. ते या निकालाने सिद्ध झाले आहे. आघाडीला सत्तेवर आणण्याकरता राज ठाकरेंच्या या 'अशोकसेनेचा ' मोठा वाटा आहे..

शिवसेनेचा लढाऊ बाणा संपला, , मवाळ झाली, सर्वसमावेशक झाली, म्हणून तिचे पारंपरिक मतदार मनसेकडे वळले, असे मानले जाते. तसे असेल, तर ते मराठी माणसांसाठी किती घातक आहे. याचा विचार सर्व सुजाण मराठी माणसांनी करायला हवा. कोणत्याही मुद्द्यावर नाक्यानाक्यावर राडा करणारे, नोकरीच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांना पिटाळून लावणारे, टॅक्सी फोडणारे मराठी नेते जर मसीहा म्हणून ओळखले जात असतील तर ही अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे.

मराठी माणसांची ओळख भलेही कुणाला आक्रमक अस्मितेचा साक्षात्कार घडवणारी वाटो, ही ओळख ही न्यूनगंडामधून निर्माण झालेली आहे. मराठी समाज हा भावनिक भुललैय्यात अडकलेला आहे. या भुलभैलैय्यातून बाहेर काढणारे नेते सध्या महाराष्ट्राला हवे आहेत. ह्या समर्थ पर्यायाचा शोध मराठी मतदारांना लागेपर्यंत नाकर्त्या सरकारची राजवट राज्यातून जाणे अवघड आहे.

Sunday, October 4, 2009

चीन @ 60


चीन. भारताचा शेजारी देश.चीन जगातली सध्याची एक महासत्ता.. क्रीडा,लष्कर,व्यापार आणि आणखी ब-याच काही क्षेत्रात जगात अव्वल स्थान मिळवायचेच.या महत्वकांक्षेने झपाटलेला देश .भारताशी सीमाप्रश्नावर उभा दावा मांडणारा देश. पंचशील कराराचे उल्लंघन करत 1962 मध्ये आपले लचके तोडणारा देश. जगातल्या सर्व भारतविरोधी शक्तींना उदारहस्ते मदत करणारा शेजारी..आणि बरेच काही

1 ऑक्टोबर 2009 या दिवशी चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीला 60 वर्षे झालीत. माओंच्या नेतृत्वाखाली चिनी शेतक-यांनी साम्यवादी क्रांती केली. मागच्या साठ वर्षात यांगेत्से नदीच्या पात्रातून 'लाल' पाणी वाहून गेलंय. वर्गसंघर्षाविरुद्ध लढे उभारणा-या चीनमध्ये गेल्या साठ वर्षात राज्यकर्त्यांनी वेगवेगळी प्रयोग केलेत.केंद्रीय सत्ता आणि साम्यवादी राजवट मजबूत करणे हाच या सर्व प्रयोगांमधील मुख्य उद्देश होता. विसाव्या शतकात चीनमध्ये झाली इतकी सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवरची घुसळण क्वचितच कोणत्या देशात झाली असेल.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत म्हणून राहण्यापेक्षा समाजवादी अर्थरचनेत गरीब राहणे कधीही चांगले’, अशी माओच्या सांस्कृतिक क्रांतीची हाक होती. माओंच्या या हाकेपासून थेट मांजर काळे असो वा गोरे, जे उंदीराची शिकार करते ते मांजर चांगले.’ असा डेंग झिओपिंग पर्यंतचा बाजरपेठीय दृष्टीकोन असा थक्क करणारा प्रवास चीनने गेल्या साठ वर्षात केला आहे.

माओने 1949 मध्ये चीनची सत्ता साम्यवादी क्रांतीने ताब्यात घेतली.परंतु माओचे साम्यवादी मॉडेल हे रशियन मॉडेलपेक्षा वेगळे होते.चीनी शेतकरी हा या मॉडेलचा मूळ गाभा होता.तर रशियन राज्यक्रांतीमध्ये मजुरांना सर्वात जास्त महत्व होते. माओंची प्रयोगशाळा होती अख्या चीन देश. सामुदायीक शेती, उद्योगांची नवी रचना यासारखे अचाट आणि अजस्त्र प्रयोग त्याने याकाळात केले.या प्रयोगाच्या जोरावर साम्यवादी पक्षात एक प्रबळ जमात तयार झाली होती.सत्तेचे टॉनिक घेऊन सशक्त बनलेला हा वर्ग आपल्याला भारी पडेल अशी भिती माओंना सतत सतावत होती.

साम्यवादी राजवटीच्या आशिर्वादाने बलवान होत चाललेल्या या भांडलवादी जमातीला त्यांनी मुळापासून उखाडायचे ठरवले.सांस्कृतिक क्रांतीची हाक त्यांनी कोट्यावधी जनतेला दिली.आपल्याच पक्षातल्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना केंद्रीय नेत्यांवर हल्ला करण्यास चिथावले.त्याकाळातील चिनी समाजात घडत असलेल्या हिंसाचाराची वर्णने करणारी पुस्तके वाचली तर कुणीही बधीर होऊन जाईल. चंगेझ खानपासून ते हिटलर पर्यंत जगातल्या सर्व हुकूमशाहांना लाजवेल असे अभूतपूर्व शिरकाण याकाळात चीनमध्ये झाले. तेही सरकारी आशिर्वादाने.

माओंच्या नंतर चीनमध्ये डेंग झिओपिंग यांची राजवट आली.या राजवटीत माओंच्या उद्दीष्टांपासून पूर्णपणे फारकत घेण्यात आली.बदलत्या परिस्थितीशी दूळवून घेतले नाही तर ह्या महाकाय देशाचे तुक़डे होतील हे बहुधा डेंग यांनी ओळखले असावे.त्यामुळेच 1979 नंतर त्यांनी उदारीकरणाचे नवे युग चीनमध्ये आणले. गोर्बोचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनमध्ये ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’- स्वातंत्र्य आणि आर्थिक पुनर्रचनेचे नारे दिले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.कोंडून पडलेला रशियन समाज या वा-याने इतका मुळासकट हलला की या देशाची अनेक शकले झाली.डेंग यांनी गोर्बोचेव्हच्या आधीच हे बदल सुरु केले होते.मात्र टप्प्याटप्याने.केंद्रीय नेतृत्वाची पकड सैल होऊ न देता.

वर्गसंघर्षाविरुद्ध एकेकाळी नारे देणा-या चीनमध्ये आता ' आहे रे ' गटाचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.स्पेशल इकॉनॉमिक झोन, आक्रमक बाजार, गगनचुंबी इमारती, पंचतारांकित झगमगाट , अजस्त्र असे खाजगी प्रकल्प याच्या जोरावर एक नवा साम्यवादी राजवटीतला अस्सल भांडवलशाही चीन आज तयार झालाय.एवढ्या टोकाचा अंतर्गत विरोध घेऊन आत्मविश्वासाने वाटचाल करणारा चीन हा अधुनिक युगातील एक चमत्कार मानला पाहिजे.

चीनला झोपेतच राहू द्या. तो उठला, तर सारे जग हादरवून सोडेल’ ह्या नेपोलियनच्या प्रसिद्ध वाक्याची या देशाने गेल्या काही वर्षात जगाला वारंवार आठवण करुन दिली आहे.सोव्हियट युनीयनच्या पतनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे हे काम या देशाने केले आहे. अगदी क्रिडा क्षेत्रावरही चीनने आपली हुकमत आता सिद्ध केलीय.आज रिपब्लिक ऑफ चायना म्हणून जो देश ओळखला जातो, त्या देशाने सुरुवातीचा बराच काळ ऑलिंपिककडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही.

१९४९नंतर प्रथम म्हणजे १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये चिनी अ‍ॅथलीट्स प्रथम उतरले. त्या स्पर्धेत चीनने थेट चौथा क्रमांक पटकावला. त्यानंतर जवळपास प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत चीनने आपला ठसा उमटवला आहे. 2008मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये चीनने 51 सुवर्णपदके घेऊन पहिला क्रमांक पटकावला. .तर या वर्षी सारा भारत वर्ष अभिनव बिंद्राला मिळालेल्या पहिल्या वाहिल्या वैयक्तिक सुवर्णपदकांच्या आनंदामध्ये मग्न झाला होता.

चीनची लष्करी ताकदही महाकाय आहे.जगातील सर्वात मोठे पायदळ चीनकडे आहे.चीनकडे 23 लाख खडे सैन्य आहे. भारताची सर्व महत्वाची शहरे चीनी क्षेपणअस्त्रांच्या टप्प्यात येतात.चीनचे वायूदळही तितकेच प्रभावशाली आहे. भारतानेही नुकतीच चीनच्या तुलनेत आपले हवाईदलाचे सामर्थ्य एक तृतियांशही नसल्याची नुकतीच कबुली दिली आहे. 1964 सालीच अण्वस्त्रधारी बनलेल्या या राष्ट्राकडे आज सुमारे 400 अणवस्त्र असल्याची शक्यता आहे.इराण, उत्तर कोरियाप्रमाणेच पाकिस्तान या आपल्या कट्टर शत्रूला अणवस्त्रधारी बनवण्यात चीनची सक्रीय मदत लाभलेली आहे.

भारताचा शेजारी देश असल्याने चीनमध्ये घडणा-या प्रत्येक घटनांचे थेट आपल्यावर परिणाम होऊ शकतो.चीनबाबतीत गाफील राहीलो तर काय होऊ शकते याचा अनुभव आपण 1962 मध्ये घेतला आहे.पाकिस्तान,म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ मालदिव आणि श्रीलंका अशा भारताच्या बाजूच्या सर्व देशात चीनने आपले जाळे विणले आहे. तिबेटच्या दुर्गम भागात अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या लोहमार्गाचा उद्देश जलद गतीने लष्करी हलचाली करता याव्यात हाच आहे. भारताच्या सीमाभागात चीनने वाढवलेल्या हलचालींनी वेळीच सावध होण्याची गरज आपल्याला आहे.

गेल्या साठ वर्षात चीनने जगात आपला दरारा निर्माण केलाय.परंतु अनेक समस्यांनी चीनला ग्रासलंय.. तिबेट आणि सिंकिंयाग हे चीनचे दोन अवघड दुखणे,हे दुखनं कधी उसळी मारेल याचा नेम नाही. दारिद्रय आणि भूकबळीने गेल्या साठ वर्षात लाखो लोकांना जीव गमावावा लागला आहे. आर्थिक सुधारणांचे वारे अंगात गेलेल्या तरुण वर्गाला 1989 मध्ये चिनी राज्यकरत्यांनी रणगड्यांखाली चिरडले. या उठावाला आता वीस वर्षे झालीत.परंतु भविष्यातही असा उठाव होऊ शकतो ही भिती चीनी राज्यकर्त्यांना सतत पोखरत असते.त्यामुळे कोणतेही लहाण मोठे उठाव पाशवीपणे चीनमध्ये दडपले जातात.बेकारी आणि विषमता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलीय. एकेदिवशी या सा-याचा विस्फोट होऊन चीनी महासत्तेचा मुखवटा गळून पडेल असा अंदाज अनेकांनी वर्तवलाय.

ऐक शेजारी देश म्हणून चीनमध्ये होणा-या प्रत्येक गोष्टीकडे सावध नजर भारताला ठेवायला हवी.इतिहास, अर्थकारण, व्यापार, राजकारण व हजारो मैलांची सीमा या गोष्टींनी दोन देशांचे ऋणानुबंध अतूट आहेत. चिनी अर्थव्यवस्था कोसळली किंवा कम्युनिस्ट राजवट कोसळून तेथे राजकीय गोंधळ उडाला, तर त्याचे परिणाम युरोप-अमेरिकेपेक्षा भारताला अधिक भोगावे लागतील. चीनच्या हिरक महोत्सावाने दबून अथवा हुरळून न जाता डोळसपणे त्याचा सामना करण्याचे धोरणच भावी काळात भारताला उपयोगी पडणार आहे.

Friday, September 4, 2009

हिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप सैरभैर झालाय.प्रमुख नेत्यामंधील मतभेद वाढलेत.पक्षाला नवा नेता सापडलेला नाही.अडवाणीनंतर कोण ? संघ भाजपचा ताबा घेणार का ? अशा प्रकारचे प्रश्न सध्या वारंवार विचारले जातायत.अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भाजपचे काय होणार ? ही चिंता सतावतेय.देशातला एक प्रमुख पक्ष दुबळा झालाय.असं मत सध्या व्यक्त केलं जातंय.भाजपचे काय होणार ? हाच देशापुढचा सर्वात महत्वाचा आणि चिंतेचा प्रश्न बनलाय.असंच चित्र गेल्या आठवड्यात माध्यमांनी उभं केलं होतं.

भाजपचे काय होणार ? असा प्रश्न माझे अनेक मित्र मला सध्या विचारतायेत.मला याबाबत एक जुनी गोष्ट आठवते.एक अस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात एकदा कडाक्याचा वाद झाला देव आहे की नाही यावरुन. नऊ दिवस नऊ रात्र अखंड वाद घातल्यानंतरही निर्णय लागला नाही.त्यामुळे दोघंही आपआपल्या घरी निघून गेले.नास्तिक व्यक्तीनं घरी गेल्यानंतर घरी देव्हारा स्थापन करुन त्यात देवाच्या मुर्तीची स्थापना केली.तर आस्तिक व्यक्तीनं देवासकट देव्हाराचं फेकून दिला.आपल्या मुल्यांवरचा विश्वास हरवलेल्या,नेमक्या अस्मितेचं भान विसरलेल्या त्या आस्तिक माणसानं देवासकट देव्हारा फेकून देण्याचं दृष्टांत भाजपला अगदी फिट्ट बसतो.

भाजपचे काय होणार ? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना या पक्षातील चार महत्वाच्या अप्रवृत्तीचा विचार करायला हवा.

1) धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ

2 ) प्रमुख नेत्यांमधील टोकाचे मतभेद

3) भाजपचे झालेले काँग्रेसीकरण

4 ) भाजपचा नवा चेहरा कोण ?


धोरणांमध्ये कमालीचा गोंधळ :

गेल्या काही वर्षात भाजपचे धोरण कमालीचे टोकाचे बनले आहे.सत्ता असताना सर्वधर्म समभाव आणि सत्तेत नसताना हिंदुत्ववाद. सत्तेत असताना पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी कोणत्याही थराला जायचे आणि सत्तेत नसताना, पाकिस्तानविरोधी प्रचार करायचा . सत्तेत असताना आर्थिक उदारीकरणासाठी फायद्यातील उद्योग विकण्याचा सपाटा, सत्तेत नसताना, दुस-या सरकारने स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणाचा विरोध. सत्तेत असताना अमेरिकेबरोबर अणुकराराकरता पुढाकार दुस-या सरकारच्या याच कराराला कमालीचा विरोध असे कमालीचे टोकाचे अगदी दुटप्पी वाटावे असे धोरण या पक्षाने राबवले आहे.

स्वदेशी आणि सुरक्षेचा जप भाजप नेहमी करतो. मात्र अगदी संसदेवर हल्ला होऊनही ' अब आरपार की लडाई होगी ' असं भाषणातून गरजण्याइतपतचं भाजपची आक्रमकता मर्यादीत राहीली. एकेकाळी स्वदेशीचा सतत जप करणा-या या पक्षानं निर्गुंतवणूक हे नवीन मंत्रालय निर्माण केलं.अनेक फायद्यातले सरकारी उद्योग मोडीत काढले. समान नागरी कायदा आणि 370 वे कलम रद्द करणे हे मुद्दे अडचणीचे ठरतात म्हणून कार्यक्रम पत्रिकेतून वगळले गेले.राममंदिराचा जप हा फक्त निवडणुका आल्यावरच करायचा हेच बहुधा या पक्षाचं धोरणं असावं.

प्रमुख नेत्यांमधील कमालीचे मतभेद :

पार्टी विथ डिफरन्स ही भाजपची एकेकाळाची ओळख. मात्र आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी नवी ओळख पक्षाची बनली आहे.जसवंत सिंग सारखा संपूर्ण हयात पक्षामध्ये घालवलेला नेता आपल्या पुस्तकांमध्ये जिनांचे कौतुक करतो.अरुण शौरीपांसून ते वसुंधराजे पर्यंत भाजपचे नेते पक्षासमोरील डोकेदुखी बनले आहेत.लोकसभा निवडणुका जिंकू न शकणारे अनेक नेत्यांनी पक्षात महत्वाच्या जागा बळकावल्यात.यापैकी काही नेत्यांचे संघटनात्मक किंवा व्यवस्थापनात्मक कौशल्य उत्तम आहे.परंतु आपली वैयक्तिक महत्वकांक्षा साध्य करण्यासाठी एकमेकांच्या बातम्या हेच नेते माध्यमांना पुरवतात.जसवंत सिंग-यशवंत सिन्हा-अरुण शौरी यांनी लिहलेलं अध्यक्षांना पत्र सार्वजनिक कसे झाले ? बाळ आपटे समितीचा अहवाल माध्यमांना कुणी पुरवला ? या आणि अशा प्रश्नांचा कठोरपणे मागोवा घेण्याची वेळ पक्षावर आलीय.गोपिनाथ मुंडे,नरेंद्र मोदी,शिवराज सिंह चौहान,वसुंधराजे शिंदे,यदीयुराप्पा विजयकुमार मल्होत्रा अशा राज्यपातळीवरील प्रमुख नेत्याला अपशकून करण्याकरता तितकाच मोठा गट पक्षात सतत कार्यरत असतो.भाजपच्या झालेल्या काँग्रेसीकरणाचे हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपचे काँग्रेसीकरण :-

जनसंघाची एक तर हिंदुमहासभा होईल किंवा काँग्रेस’ असे विधान जनसंघाच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले होते. हिंदुत्ववादाची पताका घेतलेल्या जनसंघाला ना हिंदुमहासभेचा आकार मिळाला, ना काँग्रेसचे रूप घेता आले. याच जनसंघाचा तीन दशकांनंतरचा अवतार म्हणजे भारतीय जनता पक्ष. तो मात्र काँग्रेस हिंदुत्ववादी अवतार किंबहुना हिंदुत्ववादाचा काँग्रेसी अवतार बनतो आहे, असे खुद्द भाजपच्या नेते-कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना आता वाटू लागले आहे.

भाजपचे काँग्रेसीकरण झाले, ते मुख्यत: गेल्या दोन दशकांत. वाजपेयी सरकारवर नजर टाकली तरी ते लक्षात येते. सुरेश कलमाडी, अरुण नेहरू आणि सुखराम यांच्यासारखे आयाराम ,गयाराम खूपच झाले ते सोडून दिले तरी वाजपेयी सरकारमधील किती मंत्री अस्सल संघवादी किंवा भाजपचे होते? जसवंतसिंह, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, राम जेठमलानी, मनेका गांधी, यांचा संघाशी किंवा संघाच्या विचारसरणीशी तरी काय संबंध? जसवंतसिंह लष्कारातील निवृत्त मेजर. यशवंत सिन्हा दोन तपे नोकरशाहीत वावरले आणि संधी मिळताच राजकारणात येऊन चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये थेट अर्थमंत्री बनले. पुढे १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून वाजपेयी मंत्रिमंडळात सत्तेची ऊब कायम राखली. आता तर संजय गांधींचे चिरंजीव, मनेकापुत्र वरुण म्हणजे भाजपची मुलुखमैदान तोफ मानली जाते. अरुण नेहरू, मनेका आणि वरुण यांनी हिंदुत्ववादी भाजपचे प्रतिनिधित्व करावे, यात नेहरू-गांधी घराण्याला खिजवण्याचे समाधान भाजपला मिळत असले, तरी ही भाजपचीही थट्टा आहे, हे त्यांना समजत नाही. अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

भाजपचा नवा चेहरा कोण ? :-

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी गेली तीन दशके भाजपची धुरा सांभाळलीय. भाजपला प्रभावी राष्ट्रीय पक्ष बनवण्यात आणि सत्तेपर्यंत पोचवण्यात या दोन्ही नेत्यांचा महत्वाचा वाटा आहे.आज अटलजी पार थकलेत.अडवाणींचा शक्तीपात झालाय.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचा हा लोहपुरुष कमालीचा एकाकी पडलाय.कंदहारच्या मुद्यावर अडवाणी सारख्या मुरब्बी आणि अस्सल राष्ट्रीय विचाराच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली आहे ती खरीच अस्वस्थ करणारी आहे.त्यांना ही भूमिका जाणीवपूर्वक घेण्यास भाग पाडले असावे.अशीही शंका मनात येत राहते.भाजप थिंक टॅंकच्या अनेक फसलेल्या आणि अंगाशी आलेल्या धोरणांपैकी हे एक महत्वाचे उदाहरण.

भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांचा विचार केला तर भाजपचा चेहरा बनू शकेल असं एकच नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे नरेंद्र मोदी. 59 वर्षांचे नरेंद्र मोदी हे एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजराथमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.मोदींच्या कार्यकाळात गुजराथमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.मोदींचे हे मॅजिक या लोकसभा निवडणुकीत चालले नाही.असा एक महत्वाचा दावा त्यांचे विरोधक करतात.मात्र खुद्द अटलजी आणि अडवाणींचे मॅजिक चालण्याची सुरवात 1989 पासून झाली.मोदी कार्डचा वापर तर पक्षाने यंदा प्रथमच केलाय.

संघपरिवाराशी घट्ट जुळलेली नाळ हे मोदींचे आणखी एक बलस्थान.संघाच्या शक्तीशिवाय आणि मदतीशिवाय भाजप हा अधुरा आहे.हे एक अगदी उघड सत्य आहे.मोदी हे संघाचे अनेक वर्ष प्रचारक होते.संघाच्या मुशीत तयार झालेला नेता अशीच त्यांची पहिली ओळख पूर्वी होती आणि आजही आहे.अटलजींप्रमाणे मोदीही अविवाहीत आहेत.त्यामुळे इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा ब-यापैकी मोदीत्वाची ब-यापैकी ओळख करुन देते.

गुजराथची दंगल हा मोदींवरील डाग आहे.तसेच अल्पसंख्याक मतं भाजपला मोदींमुळे मिळाली नाहीत असाही प्रचार केला जातो.मात्र गेल्या आठ वर्षात साबरमती नदीमधून बरेच पाणी वाहून गेले आहे.एक विकासाची कास धरणारा राज्याला प्रगती पथाकडे नेणारा नेता अशी ओळख करुन देण्यात ते यशस्वी झालेत.विकासकामांना अडथळा येतो म्हणून अतिक्रमणं करुन बांधलेली अहमदाबादमधील मंदीरे पाडण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. मागील गुजराथ विधानसभे निवडणुकीत संघपरिवारातील एका 'प्रवीण' नेत्याने मोदींविरुद्ध मोहिम उघडली होती.ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदी त्यामुळे विचलीत झाले नाहीत.मोदींच्या कट्टरवादाचा बाऊ करणा-यांनी ही उदाहरणे आवर्जून लक्षात घ्यायला हवीत.

ये देशाचे कट्टर धर्मांध व्यक्तीने जेवढे नुकसान नाही केले तेवढे बेगड्या धर्मनिरपेक्ष व्यक्तींने केले आहे.
धर्मनिरपक्षतेच्या नावाखाली बांगालदेशी घुसखोरांपासून ते अफजल गुरुंपर्यंत सर्वांचे लाड करणे हेच अनेकांचे धोरण असते. अशा प्रकारच्या बेगड्या वृत्तींचा भाजपमध्ये शिरकाव झालाय.हिंदुत्व हाच भाजपाचा वैचारीक गाभा आहे. हा गाभा हलवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपच्या इमारतीला सध्या चिरा गेल्यात.या चिरा बुजवायच्या असतील तर नरेंद्र मोदींकडेच पक्षाची धूरा सोपवायला हवी.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपला धक्का नक्कीच बसला असेल.परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही.आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले, पण अद्यापही भाजप उभा चिरला जावा, तसा फुटलेला नाही.एका प्रमाणिक विचारांनी भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे मोठे बळ भाजपच्या मागे उभे आहे.हे बळ जोपर्यंत भाजपकडे आहे तोपर्यत या पक्षाला मरण नाही.
वैचारिक गोंधळ झाल्यामुळे देवासंकट देव्हारा फेकून देणा-या व्यक्तीचा दृष्टांत भाजपला लागू होतो.असं मी या ब्लॉगच्या सुरवातीलाच सांगितलंय. या देवाची पक्षात पुन्हा एकदा स्थापना करायची असेल तर यासाठी करायला लागणा-या पुजेचे पौरोहित्य मोदींकडेच द्यायला हवे.

Wednesday, August 26, 2009

ऑस्ट्रेलियन युगाचा अंत


जो पिछले कई साल मे नही हूआ वो अब हो गया है !

हो हे खरं आहे. क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपलीय. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियानं सलग दुस-यांदा अ‍ॅशेस मालिका गमावली.कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पॉंन्टिंगचा संघ पहिल्या,दुस-या किंवा तिस-या नाही तर थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय.जगातील सर्व गोलंदाजांची चिंधड्या उडवणारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅट म्नान न करणारे कांगारु फलंदाज आता दोनशे धावाही करु शकत नाहीत.शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राचा वारसा सांगणा-या कांगारुंच्या गोलंदाजाना एंडरसन-पानेसार ही शेवटची इंग्लंडची जोडी तासभर घाम गाळूनही फोडता येत नाही. फक्त इंग्लंड नाही तर भारत श्रीलंका आणि न्यूझिलंड संघाच्या विरुद्धही ऑस्ट्रेलियानं कसोटी गमावलीय.सलग सोळा कसोटी दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम करणा-या कांगारुंना सलग दोन कसोटी जिंकतानाही धाप लागतीय.क्रिकेटविश्व आता समतल पातळीवर आलंय.

मी क्रिकेटमधील वेस्टइंडिजचे युग पाहिले नाही.लॉईड,रिचर्डस,ग्रिनीच,मार्शल या सारख्या खेळाडूंचा खेळ मी पाहू शकलो नाही.परंतु ऑस्ट्रेलियन युग मात्र पुर्णपणे अनूभवलंय.सलग तीन विश्वचषक, सलग सोळा कसोटी जिंकण्याचा दोन वेळेस विक्रम, कित्येक कसोटी आणि एकदिवसीय मालिकांमध्ये अगदी एकतर्फी विजय मिळवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.विजयाचे दुसरे नाव म्हणजे ऑस्ट्रेलिया.प्रतिस्पर्धीला कोणतीही दयामाया न दाखवणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.सामना जिंकून देणारे एक नाही तर अकरा खेळाडू एकाच संघात बाळगणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया. कोणत्याही खेळाडूचे अथवा कर्णधाराचे अजिबात लाड न करणारी टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.क्रिकेटमधील सर्वात खडूस स्वभावाची टीम म्हणजे ऑस्ट्रेलिया.

मला आठवतोय इंग्लंडमध्ये 1999 साली झालेला विश्वचषक.दक्षिण अफ्रिका संघ नेहमीप्रमाणे तुफान फॉर्मात होती.उपांत्य सामन्यात कांगारुचा संघ दोनशेही धावा करु शकला नव्हता.पण ते डगमदले नाहीत.त्यांच्या गोलंदाजांनी खांदे टाकले नाहीत.किवा क्षेत्ररक्षकांनी नाहक चूका केल्या नाहीत.शेन वॉर्नने एक अप्रतिम स्पेल टाकला.दक्षिण अफ्रिकेची प्रमुख फळी कापून काढली.शेवटच्या षटकात कांगारुंना विजयाकरता नऊ धावा हव्या होत्या.स्ट्रायकवर होता त्या विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडू लान्स क्लूसनर.पहिल्या दोन चेंडूवर क्लूसनरने चौकार मारले.सामना बरोबरीत आणला.चार चेंडू शिल्लक होते.क्रिकेट पाहणा-या सर्व प्रेक्षकांनी सामन्यांचा निकाल गृहित धरला होता.मात्र मैदानावर खेळणारे ते 11 ऑस्ट्रेलियन लढाऊंनी अजून हार पत्कारली नव्हती.तिस-या चेंडूवर क्लूसनरचा अतिउत्साह आणि डोनाल्डचा भित्रेपणा यांचा संगम झाला.चाणाक्ष कांगारुंनी ती संधी साधली.काही कळायच्या आत क्लूसनरला धावचित केले.सरस धावगतिच्या जोरावर कांगारु अंतिम फेरीत गेले.मोक्याच्या क्षणी कच खाणा-या दक्षिण अफ्रिकन वृत्तीला कधीही हार न मानणा-या कांगारुंच्या जिद्दीने धूळ चारली.या सामन्यानंतर झालेले तिन्ही (99.2003,2007 ) हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकलेत.दक्षिण अफ्रिकेची मात्र विश्वविजेतेपदाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही.

उगवलेला सूर्य हा मावळतोच. भरतीच्या वेळी खवळलेला सागरही शांत होतो.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन युगाचा अंत आता जवळ आलाय. शेन वॉर्न.ग्लेन मॅग्रा,मॅथ्यू हेडन,गिलख्रिस्ट हे ऑल टाईम ग्रेट ऑस्ट्रेलियन फलंदाज आता निवृत्त झालेत.त्यांची जागा घेणारे खेळाडू त्यांना अजुनही मिळालेले नाहीत.ब्रेट लि या दौ-यात केवळ टुरिस्ट ठरला.मिचेल जॉन्सचा फॉर्म पार हरपलाय.सलामीच्या जोडीचा प्रश्न अजनही सुटलेला नाही.शेवटच्या तीन कसोटीत शेन वॉटसनला सलामीला पाठवण्याचा त्यांचा निर्णय हा असाच अंगाशी आला.प्रभावी बेंच स्ट्रेन्थच्या अभावी ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला थकलेल्या आणि अनअनुभवी खेळाडूंवर अवलंबून राहावे लागले.या सर्व कारणामुळे पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडमध्ये सलग दुस-यांदा अ‍ॅशेस गमावल्यात.गेल्या शंभर वर्षात अशी नामुष्की कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघावर ओढावली नव्हती.कधी फ्लिंटॉफ,कधी स्टुएर्ट ब्रॉड तर कधी जोनाथन ट्रॉट अशा वैयक्तिक कामगरिच्या जोरावर इंग्लंडने ही मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाणा-या ऑस्ट्रेलियन आत्मविश्वासाच्याच 'अ‍ॅशेस' झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या या पराभवानंतर टीम इंडियानेही बोध घेतला पाहिजे.ऑस्ट्रेलियन संघ हा काही ठरावीक खेळाडूंवर अवलंबून होता.हे आता स्पष्ठ झालंय. कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही सचिन-द्रविड-लक्ष्मण-सेहवाग यांच्या पलिकडे जाऊ शकलेला नाही.अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर एकहाती सामना जिंकून देणारा गोलंदाज कोण याचे उत्तर आपल्याला ठामपणे देता येत नाही.एकदिवसीय संघातही वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले.युवा रक्ताला वाव दिला.परतु दोन वर्षानंतर पुन्हा एकदा तिस-या क्रमांकार खेळण्याकरता राहुल द्रविड हाच एकमेव पर्याय निवड समितीसमोर उरलाय. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या T-20 विश्वचषकात सेहवागची कमतरता जाणवली.युवराजला कसोटी संघात अजुनही आपला क्लास सिद्ध करता आलेला नाही.रोहित शर्मा ,रैना अनअनुभवी आहेत.हरभजन बेभरवशाचा तर झहीर खान सतत दुखापतीने घेरलेला.गेली दोन वर्ष भारतीय संघ ज्या नावाभोवती फिरतोय तो महेंद्र सिंग धोनी आपला खरा खेळ पार विसरलाय.अशा परिस्थितीमध्ये एकटा गंभीर संघाचा भार कसा वाहणार ? हा प्रश्न आहे.येत्या काही वर्षात सचिन-लक्ष्मण-राहुल हे निवृत्त होतील.हे महान खेळाडूंच्या निवृत्तीआधीच त्यांच्या पर्यायाचा शोध आपण गांभिर्याने घ्यायला हवा.अन्यथा अटलजी विना भाजपची झालीय त्याहीपेक्षा केविलवाणी अवस्था टिम इंडियाची होऊ शकते.क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियन युगाचा अंत होत असताना या सरत्या युगापासून हाच धडा टिम इंडियाने घ्यायला हवा.

Tuesday, August 18, 2009

शाहरुख पब्लिसिटी खान


शाहरुख खान या बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला चौकशीकरता अमेरिकेतल्या नेवार्क या विमानतळावर थांबवण्यात आलं.त्याच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. तो ग्लोबल आयकॉन आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात त्याचे फॅन्स आहेत.भारतामधील अगदी वरपर्यंतच्या वर्तुळात त्याच्या ओळखी आहेत.अगदी कशाचाही त्या खडूस तपासणी अधिका-यांवर परिणाम झाला नाही.त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्याची मुक्तता केली.खरंतर शाहरुख सारख्या सेलिब्रिटीनी हा विषय समंजसपणे हाताळायला हवा होता.पण माझं नाव मुस्लिम आहे म्हणूनच मला थांबवण्यात आलं.असा दावा त्यानं केला.

एप्रिल महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.

ह्या विषयावरचे नेटवरील संदर्भ अभ्यासत असताना माणिक मुंढे या माझ्या जुन्या सहका-याने त्याच्या ब्लॉगवर लियो टॉलस्टायबद्दलचा लिहलेला एक प्रसंग वाचण्यात आला.हा प्रसंग जशाच्या तशा लिहण्याचा मोह मला होतोय.टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

हे तीन प्रसंग आहेत तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे..तीन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय. हे कर्तुत्व सिद्ध केल्यानंतर जो समंजसपणा यायला हवा तो शाहरुखमध्ये आलाय..असं काही वाटतं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून मुस्लिम नट टॉपला आहेत. ' खान ' नावांच्या खानदानाची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याची बातमी कधी तरी आल्याचं आठवतंय का ? परंतु घर नाकारलं गेल्यावर किसर किंग इमरान हश्मीलाही तो मुस्लिम असल्याचा साक्षात्कार होतो.अमेरिकेत तपासणी झाल्यावर शाहरुखला मुस्लिम म्हणून मिळणारी सहानभूती कॅश करण्याचा प्रयत्न करतो.

अमेरिकन नागरिकांमध्ये मुस्लिमांबद्दल खरचं द्वेष असाता तरं बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष कसे झाले असते ? अमेरिकेमध्ये आज लाखो मुस्लिम नागरिक राहातायत.त्यामधील अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गैरमुस्लिम नागरिकांना मिळणा-या वागणुकीपेक्षा कित्येक पटीनं सन्मानाची,प्रतिष्ठेची आणि बरोबरीची वागणूक या मुस्लिमांना मिळते.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेमधील परिस्थीती झपाट्याने बदललीय. सर्व सार्वजनिक ठिकाणी अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. कोणत्याही व्यक्तीची तपासणी होत असताना त्याची प्रतिष्ठा,पद समाजातील राजकीय स्थान कशा कशाचाही विचार केला जात नाही.अमेरिकेत जाऊन आलेल्या लाखो भारतीयांनी याचा अनेकदा अनुभव घेतलाय.परंतु त्यांनी त्याचा कधीही ब्रभा केला नाही.अमेरिकेत येणा-या,वावरणा-या प्रत्येक नागरिकांच्या हलचालींवर अमेरिकन सुरक्षा अधिका-यांचे बारीक लक्ष असते.त्यामुळेच अमेरिकेवर 9-11 नंतर एकही मोठा हल्ला होऊ शकला नाही.त्याच्या नेमक्या उलट आपल्याकडची परिस्थिती.26-11 नंतर आपण सतर्क झालो.असा एक समज आहे.पण आजही सीएसटी स्टेशनच्या परिसरात अगदी सहजपणे वावरता येतं..मेटल डिटेक्टर सुरक्षा अधिकारी काय आणि कसे काम करतात याची अनुभती अनेक जण रोज घेत असतात.त्यामुळेच या देशात कुठेही आणि कधीही अगदी सहज हल्ला होऊ शकतो.

देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले.मात्र तरीही या देशातीन अनेकांच्या रक्तातील संरजामी गूण गेली नाही.उलट राजकारणी,सनदी नोकरशाहा,चित्रपट कलावंत,क्रिकेटपटू यांच्यातील सरंजामदाराची नवीन जमात या देशात निर्माण झालीय.आपल्या देशात मिळणा-या व्हीव्हीआयपी वागणुकीची त्यांना इतकी सवय झालीय की त्यांना परदेशातही हीच वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते.

लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. या पाचशे कोटींमध्ये विकासाची कित्येक काम होऊ शकतात.आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही.ही व्यक्ती आहे पंडित नेहरुंचा पणतूजावाई,इंदिरा गांधीचा नातजावाई,सोनिया गांधींचा जावई आणि प्रियंका गांधीचा नवरा रॉबर्ट वढेरा.गांधी घराण्याचा जावाईच हीच त्याची एकमेव ओळख.केवळ याच गोष्टींमुळे तो देशातील सर्वशक्तीशाली नागरिकांमध्ये जाऊन बसतो.

शाहरुखच्या चाहत्यांना हा संपूर्ण देशाचा अपमान वाटला.आपल्याकडे ही बातमी गाजत असताना अमेरिकेत आणखी एक प्रकार घडला. बॉब डिलन या वयोवृद्ध अमेरिकन संगीतकाराला एका चौकशी अधिका-याने अडवलं.बॉब डिलन आज ८४ वर्षांचे आहेत. गेल्या पाच दशकांत त्यांच्या संगीताने जगभरातल्या संगीतकारांवर प्रचंड प्रभाव टाकला आहे. अमेरिकेसह जगभरातल्या संगीत रसीकांवर त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे.असे हे जगप्रसिद्ध बॉब डिलन अमेरिकेतल्या एका चौकशी अधिका-याच्या 'अपमानास्पद' वागणुकीला सामोरे गेले. परंतु बॉब यांनी आपण संगीतकार आहोत,वृद्ध आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी आहोत..असा कोणताही गवगवा केला नाही.

ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.या जॉर्ज ऑरवेल यांच्या वाक्याची सतत आठवण येत राहते..मोअर इक्वल या प्रकारात मोडणारे अनेक शाहरुख आपल्या देशात आहेत.त्यांच्या या समजूतीला कोणी धक्का दिला की काही जण आदळाआपट करतात.कुणाला तो दलित महिलेचा अपमान वाटतो तर कुणाला आणखी काही..शाहरुख सारखे काही हूशार व्यक्ती त्याचा पब्लिसिटीसाठी वापर करुन घेतात.या देशातील भोळी-भाबडी जनता मात्र त्यांच्या अशा नाटकी वागण्याला बळी पडते.त्यांचा अपमान हा स्वत:चा अपमान समजते. कोणी आपला आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करुन घेतयं हे त्यांच्या गावीही नसतं.सरंजामशाही नष्ट झाले, संस्थानिकांचे तनखे रद्द झाले परंतु संस्थानिकांना देव समजण्याची खास भारतीय प्रवृत्ती अजूनही नष्ट झालेली नाही.

भारतीय मनोवृत्ती आणि अमेरिक मनोवृत्तींमध्ये असलेला हा एक सर्वात मोठा फरक.अमेरिकेची बरोबरी करायाला निघालेल्या आपण सर्वांनी सुरवातीला ही मनोवृत्ती बदलायला हवी.पण याची तयारी किती जणांची आहे ?

Wednesday, July 22, 2009

चर्चा पे चर्चा...


कोणतही सरकार असो काही गोष्टी भारतामध्ये हमखास घडतात.लहरी मान्सून,अस्थिर शेअरबाजार,संवग लोकप्रियेतेच्या घोषणा.दरवर्षी देशाच्या काही भागात होणारे बॉम्बस्फोट आणि त्या स्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन सापडणे. देशातल्या महानगरांमध्ये बॉम्बस्फोट होतो...निष्पाप मारले जातात.ह्या स्फोटाचे मास्टरमाईंड पाकिस्तानमध्ये असल्याचं जाहीर होते. 'ठोस कारवाई होईपर्यंत पाकिस्तानशी चर्चा बंद.'

अशा हमखास हेडलाईन्स बनतात.कालांतराने विषय मागे पडतो...आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो आणि भारत सरकार पाकिस्तान बरोबर चर्चेचे गु-हाळ पुन्हा सुरु करते.

भारत-पाकिस्तानचे पंतप्रधान नुकतेच अलिप्त राष्ट्र परिषदे निमीत्त इजिप्तमध्ये भेटले.या बैठकीनंतर जे घोषणापत्र काढण्यात आले..त्याबद्दल सध्या अनेक वाद-प्रतिवाद निघतायत.दोन्ही बांजूंनी अनेक अर्थ काढले जातायत.मात्र दोन्ही देशांच्या चर्चेच्या दरम्यान दहशतवाद हा मुद्दा वगळणे ही बाब सामान्य भारतीयांना मोठ्या प्रमाणात अस्वस्थ करणारी आहे.याचे दोन अर्थ होतात पहिला म्हणजे जिहादी संघटना यांचा येथेच्छ धुडगुस सुरु असतानाही भारत-पाकिस्तान चर्चा होऊ शकते. दुसरा असा की या दोन्ही शक्तींवर नियंत्रण ठेवण्यास पाकिस्तान सरकार समर्थ आहे. या जगाचा (विशेषत: अमेरिकेच्या) विश्वासाला आता भारतानेही मान्यता दिली आहे.

पाकिस्तानमध्ये असणा-या दहशतवाद्यांविरुद्ध त्या सरकारने ठोस कारवाई सुरू केली आहे, असा पाश्चिमात्य जगताचा समज आहे. पाकिस्तानने स्वात, वझिरीस्तान, खैबर, बजौर आदी भागांतल्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू केली ही वस्तुस्थिती आहे. तथापि ती त्या भागापुरती मर्यादित आहे.बैतुल्ला मसुद सारख्या स्वत:हला डोईजड होत असलेल्या दहशतवाद्याच्या विरुद्ध पाकिस्तान लष्कर सध्या लढतंय.अमेरिकेनं पुकारलेल्या दहशतवादा विरुद्धच्या लढाईतही पाकिस्तानची भूमिका संशयास्पद आहे.

दाऊद इब्राहम पासून ते अजमल कसाब पर्यंत भारताविरुद्ध लढणा-या व्यक्तीची नाळ पाकिस्तानशी घट्ट जोडलीय.ही नाळ ठेचण्याच्या आधीच भाबड्या आदर्शवादाने भारलेले भारत सरकार पाकिस्तानशी पुन्हा एकदा चर्चेचा डाव टाकण्यास तयार झालंय.

या संयुक्त पत्रकात बलुचिस्तानचा उल्लेख करण्यात आलाय.ह्याचा समावेश करुन पाकिस्तानने पुन्हा एकदा बाजी मारलीय.बलुचिस्थानमध्ये अशांतता निर्माण व्हावी याकरता काही बाह्य शक्ती कार्य करत आहेत.असा उल्लेख या पत्रकात आहे.गेल्या सहा दशकांपासून बलुचिस्तान ही पाकिस्तानची मोठी डोकेदुखी आहे.पंजाबी लॉबीचे वर्चस्व माणण्यास बलुची लोकांनी कायमच नकार दिला.स्वतंत्र बलुचिस्तान हे तेथील राज्यकर्त्यांचे स्वप्न..महमंद अली जीनांनी लष्करी सामर्थ्याचा वापर करत बलुचीस्थान विलीन करुन घेतला.मात्र बलुची लोकांची स्वतंत्र राष्ट्राची भावना ते विजवू शकले नाहीत.

बलुचिस्तानच्या शेजारी असलेल्या अफगाणिस्तानने बलुची स्वातंत्र्य युद्धाला नेहमीच मदत केलीय.1980 च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हीएट रशियाचे वर्चस्व होते.तरीही ही मजत थांबली नाही.अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाईंच्या जवळच्या व्यक्तीही बलुची लढ्याला मदत करतात असा सर्वांचा समज आहे.पाकिस्तान आणि करझाईंचे संबंध त्यामुळेच तणावाचे राहीले आहेत.

भारताचे अफगाणिस्तानात चांगलेच बस्तान बसले आहे. तेथील पोलिस, सैन्य आणि अन्य नागरी सेवांत भारताने सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे या सेवेतील लोक व सामान्य अफगाणी लोक यांच्या मनात भारताबद्दल ममत्व निर्माण झाले आहे. याचीच पाकिस्तानला भीती वाटत आहे.पाकिस्तानची ही भीती या पत्रकात उमटलीय.जागतिक समुदायाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यास पाकिस्तानी राज्यकर्ते यशस्वी झालेत.

26-11 नंतर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी एक नामी संधी भारताला आली होती.गेल्या नऊ महिन्यात दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध पाकिस्तानने काहीही कारवाई केलेली नाही.भारताच्या समाधानाची एकही गोष्ट झाली नसताना भारत सरकार चर्चाला तयार झालंय..तेही दहशतवादाच्या मुद्याला बगल देण्याची तयारी दाखवत...आता यापुढे परराष्ट्र पातळीवर दोन देशांना जवळ आणण्यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचा नेहमीचा मार्ग स्वीकारला जाईल.केवळ पैशाच्या मागे धावणारं बीसीसीआय खेळाडुंच्या सुरक्षेच्या जराही विचार न करता दहशतवाद्यांच्या स्वर्गात खेळांडूंना पाठवेल.शांततेची तीच कबूतरं पुन्हा सोडले जातील.

सालाबादाप्रमाणे पुन्हा बॉम्बस्फोट होतील..त्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल...काही दिवस पुन्हा चर्चा बंद टाईप हेडलाईन्स पुन्हा एकदा अमेरिकेचा दबाब...सरकार कोणतेही असो भारत सरकारचा एक नेहमीचा खेळ पुन्हा सुरु होईल तो म्हणजे चर्चा पे चर्चा

Friday, July 10, 2009

फेडरर फॉरेव्हर


स्वित्झर्लंडलडच्या काही गोष्टीचे सा-या जगात मोठे कुतहूल आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य,जिनीव्हामध्ये चालणारी वेगवेगळ्या देशांची खलबते,स्वीस बॅंकेमध्ये असलेला अनेकांचा काळा पैसा आणि सध्याचा टेनिस सम्राट रॉजर फेडरर.


5 जुलैला झालेल्या 5 सेटच्या कडव्या झुंजीनंतर फेडररनं विम्बलडन स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं.हे त्यांच 15 वे ग्रँड स्लॅम.या विजेतेपदानंतर त्यानं 14 ग्रँड स्लॅमचा पीट सँप्रासचा विक्रम मोडला.14 गँड स्लॅमचा प्रवास करण्यास सँप्रासला 12 वर्षे लागली.हे शिखर फेडररनं अवघ्या 7 वर्षात पार केलं.या बारा वर्षात सँप्रासला फ्रेंच ओपन कधीही जिंकता आले नाही..तर फेडररने या वर्षी फ्रेंच ओपनचं विजेतेपद खेचत आपल्या सर्व टिकाकारांची तोंडे बंद केली.सहा विम्बल्डन, पाच अमेरिकन ओपन, तीन ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक फ्रेंच ओपन फेडररने जिंकून दाखवलीय.या चारही स्पर्धा जिंकणारा टेनिस इतिहासातला तो सहावा टेनिसपटू ठरलाय. पण ही आकडेवारी वरवरची आहे. कारण या अजिंक्यपदांच्या जोडीला आहेत सात विम्बल्डन फायनल्स, चार फ्रेंच ओपन फायनल्स, पाच अमेरिकन ओपन फायनल्स आणि चार ऑस्ट्रेलियन ओपन फायनल्स! म्हणजे 20 वेळा ग्रँड स्लॅम फायनल्स गाठल्यावर फेडररने त्यापैकी १5 सामन्यांमध्ये बाजी मारलीय. गेल्या २1 सलग ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये तो किमान उपांत्य फेरीपर्यंत तरी गेलेलाच आहे. तर गेल्या १7 ग्रँड स्लॅम स्पर्धापैकी १6 वेळा तो फायलमध्ये पोहोचलाय!टेनिस जगतामध्ये एवढं सातत्य दाखवणारा फेडरर एकमेव खेळाडू असेल.


सातत्याचे दुसरे नाव असलेल्या फेडररचा फॉर्म हरपलाय..अशी गेल्या काही महिन्यात सातत्याने सुरु होती.विशेषत: गेल्या वर्षी सलग दोन ग्रँण्ड स्लॅम स्पर्धेत तो नादालकडून हरला.चार वर्षाहून अधिक काळ त्याच्याकडे असलेलं अग्रमानांकान नादालने हिसकावून घेतलं.त्यामुळे फेडरर संपला अशीच हाकाटी काही जण पिटत होते. याबबतीत मला त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी करावीशी वाटते..सचिन आणि फेडरर या दोघांनाही दुस-या क्रमांकावर पाहयला क्रिडा रसिक तयार नसतात.सचिनने शतक मारावं आणि फेडररने ग्रँड स्लॅम जिंकावे अशीच सर्वांची एकमेव अपेक्षा असते.


टोटल टेनिसचे उदाहरण म्हणजे फेडररचा खेळ.बोरिस बेकर-सँप्रास-इव्हानोविचसारखी तडाखेबंद सव्‍‌र्हिस किंवा आगासीसारखा खणखणीत रिटर्न अशी हत्यारे फेडररकडे नाहीत.त्याच भर असतो टोटल टेनिसवर.

या टोटल टेनिसमुळेच क्ले असो की ग्रास अथवा हार्ड सर्व कोर्टवर तो विजेता ठरलाय.तिन्ही प्रकारच्या कोर्टवर ग्रँड स्लँम जिंकणारा आगासीनंतरचा दुसरा खेळाडू ठरलाय.


खेळाबरोबरच फेडररचं कोर्ट आणि त्याबाहेरचं वागणं त्याला कोणीही रोल मॉडेल ठेवावं असंच आहे. जिंकणं आणि हरणं या दोन्ही गोष्टी त्याने तितक्याच शांतपणे स्वीकारल्या आहेत. आपला खेळ चांगला होत नसेल तर त्याने त्या गोष्टीचा राग रॅकेटवर कधीच काढलेला नाही किंवा रेफ्रीशी त्यानं भांडणही केलं नाही.

यश मिळवणं सोप असंत परंतु ते टिकवणं मात्र प्रचंड अवघड..सध्याच्या व्यवसायिक टेनिसच्या या युगात अव्वल क्रमांक गमावल्यानंतर फेडररनं तो पुन्हा आपल्याकडे खेचून आणलाय.अव्वल स्थानावर पोचण्यासाठी आणि त्यावर टिकून राहण्याचा मंत्र त्याच्याकडे नक्कीच आहे. अखंड मेहनत,प्रचंड चिकाटी आणि पोलदापेक्षाही कणखरपणा या गुणांच्या जोरावर टेनिस इतिहासात त्यानं स्वत:च नाव कायमचं कोरलंय.

Wednesday, June 24, 2009

कब तक धोनी ?


विरुद्ध दक्षिण अफ्रिका 12 बॉल 5.

विरुद्ध वेस्टइंडिज 23 बॉल 11

आणि इंग्लंडविरुद्ध जवळपास 10 च्या सरासरीने विजय आवश्यक असताना 20 चेंडूत 30 धावा

ह्या कोणत्याही सामान्य भारतीय खेळाडूच्या धावा नाहीत.किंबहूना तो एखादा सामान्य खेळाडू असता तर पराभवाचे खापर त्याच्यावर फोडून तो केंव्हाच संघाच्या बाहेर गेला असता...ही भारतीय संघाचा

सूपरकूल ( !) कर्णधार महेंद्रसिंग धोनीची T-20 विश्वचषकातल्या शेवटच्या तीन सामन्यातील धावसंख्या.

वेस्ट इंडिज,दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या तीन देशांविरुद्ध भारताने या स्पर्धेत सूपर एटचे तीन सामने खेळले.उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला यापैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक होते.मात्र सर्व सामन्यात भारत पराभूत झाला.गत विजेता भारतीय संघ या स्पर्धेत उपांत्य फेरीतही पोचू शकला नाही.भारताच्या या अधोगतीची अनेक कारणे आहेत..परंतु एक कर्णधार आणि त्याचबरोबर एक फलंदाज म्हणून कर्णधार धोनीचा हरवलेला फॉर्म हे भारताच्या अपयशाचे सर्वात मुख्य कारण मानवे लागेल.

काही व्यक्ती ह्या खरेच नशीबवान असतात. मुख्यमंत्री म्हणून नाकार्तेपणे काम करुनही विलासराव देशमुख केंद्रीय मंत्री बनतात.नौशादचे संगीत,महंमद रफीचा आवाज, आणि चांगल्या बॅनरचे चित्रपटाच्या जोरावर राजेंद्रकुमार सारख्या सामान्य कलाकाराचे अनेक चित्रपट हे गोल्डन ज्यूबली ठरतात.त्याच प्रमाणे महेंद्र सिंग धोनीसारखा एक सामान्य खेळाडू भारतीय संघाचा नुसता कर्णधार बनत नाही तर एक प्रचंड यशस्वी कर्णधार असल्याचा अभास निर्माण करण्यास यशस्वी ठरतो.

2007 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेत बाद झाला.या स्पर्धेत भारत बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्घ पराभूत झाल होता. या दोन्ही मॅचमध्ये धोनी भोपळाही फोडू शकलेला नाही. ही माहिती आता कुणालाच आठवत नसली तरी ती खरी आहे. श्रीलंकेविरुद्ध भोपळा न फोडणारा धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.तर या मॅचमध्ये सर्वात जास्त 60 धावा काढणा-या राहुल द्रविडला मात्र पद्धतशीरपणे भारतीय वनडे संघातून वगळण्यात आलंय.धोनीचं महात्म पटवून देण्यासाठी T-20 चा नेहमी गवगवा केला जातो. धोनीचा T-20 चा स्ट्रायक रेट आहे 101.68 . याच संघातला गोलंदाज हरभजन सिंगचा स्ट्रायक रेट आहे 105.55 तर झहीर खानचा आहे 133.33.एवढंच काय तर ज्यांच्यावर कसोटी खेळाडू असा शिक्का सा-या जगाने टाकलाय अशा राहुल द्रविड (121.21) आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण ( 102.67 ) यांचाही देशांतर्गत T-20 मध्ये स्ट्रायक रेट धोनीपेक्षा जास्त आहे.

या T-20 विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या मर्यादेचे पितळ उघडे पडले.या स्पर्धेत सेहवाग नव्हता.त्यामुळे रोहीत शर्माला सलामीला यावे लागले.अशा परिस्थितीमध्ये एक फिनीशर म्हणून धोनीनं युवराजसह भूमिका बजावायला हवी होती.मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याला बॅंटींग ऑर्डर लावताच आली नाही.रैनाचा 3 क्रमांक काही कारण नसताना सुरवातीला काढून घेण्यात आला.वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या रटाळ खेळामुळे भारत 170 च्या एवजी 150 च धावा करु शकला.युवराज सिंग ,युसूफ पठाण या फॉर्मातल्या फटकेबाज खेळाडूंना बढती त्याने दिली नाही.फॉर्मातल्या खेळाडूंना खेळण्यास कमी बॉल मिळाले.धोनी,जडेजा सारख्या खेळाडूंनी अधिक बॉल वाया घालवत बॉल आणि धावा यांचे गणित पार बिघडवून टाकले.धोनीच्या खराब निर्णयामुळेच आपण वेस्ट इंडिज आणि इंग्लंडकडून पराभूत झालो.

कर्णधाराचा खेळ हा संघातल्या सहका-यांचा उत्साह वाढवणारा हवा.1999 च्या विश्वचषकात स्टीव्ह वॉचे दक्षिण अफ्रिके विरुद्धचे जिगरबाज शतक, रिकी पॉंटीगची 2007 मधल्या फायनल मधील घणाणती खेळी एवढं काय तर 1983 मधील कपिल देवच्या अजरामर 175 धावा कोण विसरु शकेल.T-20 विश्वचषक दुस-यांदा जिंकण्यासाठी धोनीकडूनही अशाच एखाद्या अविस्मरणीय खेळीची आवश्यकता होती.मात्र जो फलंदाज बांगलादेश सारख्या दुबळ्या टिम विरुद्धही 21 बॉल मध्ये अवघ्या 26 धावा काढतो तो संघाला एकहाती विजय कसा मिळवूण देणार ? इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दहा ओव्हर्स धोनी मैदानात होता.तरही भारत मॅच जिंकू शकला नाही अथवा मॅचवर काही काळतरी वर्चस्व मिळवू शकला नाही.एका कर्णधारासाठी यापेक्षा नामुष्कीची बाब दुसरी काय असू शकते ?

मैदानाबाहेरचे हे त्याचे वागणे हल्ली पार बदललंय.मागील T-20 विश्वचषकानंतर 'मर्यादा पुरुषोत्तम ' असं त्याचं वर्णन काही जणांनी केलं होतं. सेहवागचं दुखापत प्रकरण त्यानं ज्या प्रकारे हाताळलं ते संशय वाढवणारेच आहे.द्रविड आणि गांगुलीला काही कारण नसताना एकदिवसीय संघातून त्याच्याच दबावामुळे वगळण्य़ात आले.हे आता ओपन सिक्रेट आहे.आपली दुखापत लपवून विश्वचषक खेळणा-या खेळाडूतही तो आहे.एवढचं काय तर पद्मश्री सारखा राष्ट्रीय पुरस्कार न स्विकारता शुटींग करणाराही हाच मर्यादा पुरुषोत्तम आहे.

2011 साली भारतीय उपखंडात 50 ओव्हर्सचा विश्वचषक होतोय.आडव्या बॅटने खेळून T-20 कपही जिंकता येत नाही.हे यंदा सिद्ध झालंय.आगामी विश्वचषकात भारताला मधल्या फळीत एक भरवशाचा फिनीशर हवा आहे.युवराज,रोहीत,रैनाच्या बरोबरीने खेळणारा सर्व फटक्यांची रेंज असणारा खेळाडू मधल्या फळीत फिट्ट बसू शकतो.दिनेश कार्तिक ने मागील काही स्पर्धेत याची झलक दाखवली आहे.एक यष्टीरक्षक म्हणूनही तो धोनी पेक्षा सरस आहे.2011 चा विश्वचषक जिंकायचा असेल तर काही धाडसी बदल हे करावेच लागतील. या बदलाची सुरवात धोनीला पर्याय कोण ? ह्या प्रश्नाच्या उत्तराने करण्यास हवी.

Tuesday, May 26, 2009

आयपीएल धमाका


आयपीएल ही क्रिकेट जगतामधली एक सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धेची दुसरी आवृत्ती आता पार पडलीय. 'इंडियन प्रिमियर लीग' स्पर्धा अनेक वादविवाद उलट-सुलट चर्चेनंतर दक्षिण अफ्रिकेत पार पडली.या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले गेले होते. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीची ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा पार पडणार हे नक्की होत.या स्पर्धेमध्ये क्रिकेटबाहेरचे अनेक गोष्टींना कमालीचे महत्व होते.त्याची चर्चाही झाली.परंतु प्रत्यक्ष मैदानावर खेळ करत असताना मात्र केवळ क्रिकेटच्याच कौशल्यांना अजुन महत्व आहे.त्यामुळेच अस्सल क्रिकेटपडूंचं नाण या स्पर्धेत खणखणीत वाजलं.

टी -२० हे केवळ युवा क्रिकेटपटूंसाठीच असते या गृहितकाला यंदाच्या स्पर्धेत जोरदार तडा गेलाय.या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला त्या गिलख्रिस्टचे वय आहे 37.अंतिम सामन्याचा मानकरी आणि संपूर्ण स्पर्धेत ज्यानं अत्यंत जिगरबाज खेळ केला तो अनिल कुंबळे आहे 38 वर्षाचा..तर या स्पर्धेत ज्यानं सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली तो मॅथ्यू हेडन आहे 37 चा.या तिन्ही खेळांडूंना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता केंव्हाच सिद्ध केलीय.किंबहूना सर्व प्रकारची आव्हान यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांनी निवृत्ती स्विकारली. या खेळाडूंना आता कोणासमोरही काहीही सिद्ध करायचे उरलेले नाही.तरीही या तिघांनी तरुणांना लाजवेल असा खेळ केला.

गुणवत्ता ही जर अस्सल असेल तर ती कालातीत असते.एखादा क्रिकेटपटू वयस्कर झाला की त्याची विनाकारण थट्टा करण्याचा ट्रेंडचं बनलाय.दर्जेदार खेळाडूंना T-20 चे कारण देत पेन्शनीत काढणा-या सर्व क्रिकेटतज्ज्ञ आणि काही खेळाडूंना या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी सणसणीत चपराक दिलीय.

यंदाचे आयपीएल हे भारताच्या बाहेर खेळवले गेले. अफ्रिकेत भारताप्रमाणे पाटा खेळपट्टी नाहीत.त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातला चांगला संघर्ष या स्पर्धेत पाहायला मिळालाय.संपूर्ण स्पर्धेत 200 ची धावसंख्या केवळ एकदाच राजस्थान रॉयल्सने पार केली.केवळ दोनच शतकं नोंदवले गेले. भारतीय खेळपट्ट्यावर खो-याने धावा काढणारे या स्पर्धेत अपयशी ठरले. भारतीय सुवा खेळाडूंनीही या स्पर्धेमधून ब-याच काही गोष्टी शिकल्या असतील.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केलं होतं.यंदाही त्यांनी झुंजार वृत्ती जिवंत असल्याचं सिद्ध केलंय.राजस्थानकडे त्यांच्या हंगामातले सर्वात यशस्वी खेळाडू सोहल तन्वीर आणि शेन वॉटसन नव्हते.काही खेळाडू जखमी झाले,कमरान खान पकंज सिंगच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित केल्या गेल्या.तरीही शेन वॉर्नचा हा संघ शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम होता.काही मोजक्या गोष्टी सुधारल्या तर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार बनू शकेल.

कोलकता आणि मुंबई या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक दुस्वप्नचं ठरलं.कोलकता संघ मैदानाबाहेरच्या गोष्टीमुळेच अधिक अडचणीत आला.मल्टीपल कॅप्टन्सचा वाद,सौरव दादाची कर्णधारपदावरुन केलेली हाकालपट्टी,'भू-खा-नन' चे अनाकलनीय डावपेच आणि फेक ब्लॉगरचा पाठलाग यामुळे हा संघ अगदी रसातळाला गेला.संपूर्ण स्पर्धेत हा संघ केवळ हरण्यासाठीच खेळत होता.विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले. मुंबई इंडियन्सचे सारेच डावपेच अनाकलनीय होते.सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे.परंतु त्याला कर्णधार पदाचा भार पेलवत नाही...ही बाब या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाली.फलंदाजीच्या क्रमावारीत होणारा बदल,झहीरची दुखापत,हरभजनच्या भूमिकेबाबत गोंधळ ,जयसूर्याचा हरवलेला फॉर्म,सचिनच्या बॅटमधला चढ-उतार या बाबी संघाला सातव्या क्रमांकावर घेऊन गेल्या. युवराजच्या लहरी फलंदाजी प्रमाणेच पंजाबचा खेळ या स्पर्धेत राहीला.या संघानं शेवटपर्यंत झूंज दिली.परंतू शॉन मार्शची अनुपस्थिती आणि जयवर्धेनेला अत्यंत महत्वाच्या क्षणी झालेली दुखापत यामुळे हा संघ यंदा उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

दिल्ली आणि चेन्नई हे या स्पर्धेतले सर्वात संतुलीत संघ होते.भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे योग्य मिश्रण या संघात आहे.दिल्लीनं साखळी सामन्यात अत्यंत धडाकेबाज पद्धतीनं खेळ केला.नेहरानं या स्पर्धेत शानदार कमबॅक केलं.डिव्हीलीयर्स-दिलशान जोडूनं जबाबदार खेळं केला.कार्तिक- भाटीया-संगवान या युवा भारतीय खेळाडूंनीही दिल्लीला विजय मिळवून दिले.गिलख्रिस्टच्या जबरदस्त खेळीमुळे दिल्ली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.परंतु संपूर्ण स्पर्धेत ग्लेन मॅग्राला बेंचवर बसवण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.विशेषत: विजेतेपदाच्या जवळ येऊन दिल्ली संघ पराभूत झाला.त्यामुळे मॅग्राला न खेळवण्याची सल सेहवागला जाणवत राहील. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा चेन्नईला भोवला.सोपे झेल सोडण्याबाबत चेन्नईची कोलकताशी जणू काही स्पर्धाच सुरु होती.तर मुरलीधरन वगळता प्रमुख गोलंदांमध्ये कोणतीच शिस्तबद्धता नव्हती.कोलकत्ता नाईट रायडर या स्पर्धेतल्या सर्वात दुबळ्या संघाविरुद्ध चेन्नईचे गोलंदाज 188 धावांचे संरक्षण करु शकले नाहीत.धोनीने गोलंदाजीमध्ये काही कल्पक बदल केले.परंतु त्याच्यामधला विध्वसंक फलंदाज गेल्या काही काळात संपूर्णपणे लोप पावलाय.उंपात्य सामन्यात तर धोनीच्या संथ खेळामुळेच चेन्नईच्या वेगाला खिळ बसली.हाच महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.T-20 विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असताना धोनीचा हा खराब फॉर्मची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. एक कल्पक कर्णधार या एकमेव निकषाच्या जोरावर महेंद्र सिंग धोनी ही विश्वचषक स्पर्धा खेळेल.अशीच चिन्ह आहेत.त्यामुळे कर्णधार पदासाठी धोनीचा समर्थ पर्याय आपण लवकरचं शोधायला हवा.

डेक्कन आणि बंगळूरु या संघाने या स्पर्धेत अगदी फिनीक्स भरारी घेतली.डेक्कनने सलग चार विजय मिळवत शानदार सुरवात केली.मधल्या काळात हा संघ ढेपाळला.परंतु गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या झंझावाताला डेक्कनच्या युवा फलंदाजांनीही साथ दिली.या स्पर्धेचा पर्पल कॅप विजेता आर.पी.सिंग डेक्कनचाच.संपूर्ण स्पर्धेत त्यानं सातत्यपूर्ण गोलंदाजी केली.या स्पर्धेमुळे त्याचं संघातलं स्थान पक्क झालंय.शेवटच्या हाणामारीच्या षटकात त्यानं अनेकदा थंड डोक्याने गोलंदाजी केली.T-20 विश्वचषकात त्याच्या या कौशल्याचा भारतीय संघाला महत्वाचा उपयोग होऊ शकेल.

आयपीएल-2 मधली सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ते अनिल कुंबळेचं मॅजिक..आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत अगदी दृष्ट लावणारा खेळ केला.मागच्या वर्षीच्या राजस्थान प्रमाणेच बंगळूरुच्या विजयात कोणत्याही एका खेळाडूचा महत्वाचा वाटा नव्हता.राहुल द्रविड- जॅक कॅलीस या बुजूर्ग खेळाडूंपासून ते विराट कोहली-मनीष पांडे या युवा खेळाडूंना जम्बोनं एका संघात बनवलं.प्रत्येक खेळाडूला विश्वास दिला,सुरक्षिततता दिली.हे सर्व होत असताना कुंबळेनं युद्धभूमीवर आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व केलं.अंतिम सामन्यातली त्याची गोलंदाजी कोण विसरु शकेल.

क्रिकेटमध्ये धंदेवाईक वृत्ती वाढत चाललीय.लॅपटॉप प्रशिक्षणाचं युग आलंय. खेळाडू हे यंत्रमानव बनलेत अशी ओरड नेहमी केली जाते.परंतु कितीही यांत्रिक प्रयत्न केले तरी गुणवत्ता आणि क्रिकेटवरची निष्ठा महत्वाची असते.क्रिकेट या खेळाचे चाहते लाखोंमध्ये आहेत.परंतु हा खेळ खेळणारे देश अगदी मौजकेच आहेत.या मोजक्या देशातल्या अगदी असमान्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळेचं नाव घ्यावं लागेल.आयपीएल जिंकण्यास तो अपयशी ठरलाय.परंतु करोडो क्रिकेट रसीकांच्या -हदयामधले स्थान त्यानं अढळ ठेवलंय.

Tuesday, May 19, 2009

मतदारराजाचा विजय असो !


लोकशाही राजवटीतला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक.पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आता लागलेत.गेल्या काही महिन्यांपासून माझे या निवडणुकींवर लक्ष होतं..या निवडणुकांचे माझ्या परीने विश्लेषण या ब्लॉगवर करणं अपेक्षित आहे. मात्र या निवडणुक निकालानं माझ्या आजवरच्या सा-या गृहीतकांना तडा गेलाय.

संपूर्णपणे फसलो.या दोनच शब्दात या निवडणुक निकालांचे वर्णन मला करावेसे वाटते.1991 पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुका मी पाहतं आलोय. राजकीय विषयांमध्ये मला गती आहे असा माझा काहीसा समज होता.त्यात पत्रकार म्हणून मी कव्हर करत असलेली पहिली निवडणूक. त्यामुळे या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरतील याची मला काहीशी खात्री होती. 26/11 चा हल्ला,चिंदबरम यांच्यावर फेकण्यात आलेला जोडा,मुलायम-लालू यांनी काँग्रेसशी घेतलेली फारकत, मायावतींचे मॅजीक,तामिळ इलम, डाव्यांचे डाव,कमजोर पंतप्रधान,अनअनुभवी राहुल हे मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे ठरतील असं मला वाटलं होतं. परंतु मी सुरवातीलाच म्हंटल्याप्रमाणे संपूर्णपणे फसलो.

26/11 च्या घटनेनंनंतर सर्व शहरी वर्ग विशेषत: मुंबईमध्ये राष्ट्रीय सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा बनलाय.प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचा हा संताप मतपेटीमधून बाहेर पडेल अशी समजूत होती.परंतु याबाबत तावातावाने बोलणारा शहरी वर्ग केवळ न्यूज चॅनलपुरताचं मर्यादीत राहीला. मुंबईकरांचा मतदानासारख्या संवेदनशील विषयावरचा असंवेदनशीलपणा यंदाही कायम राहीला.हे माझ्यासकट अनेकांना जाणवलं नाही.'जागो रे'टाईप स्टोरीज आंम्ही इतक्या केल्या की मुंबईकरांच्या ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं .मी ज्या शहरात राहतो त्या शहरातल्या मराठी माणसात मनसेची लाट आहे हे मला थेट 16 मेलाच समजलं.

जर्नेलसिंग प्रकरणानंतर शिख मतदारांची मतं काँग्रेसच्या विरोधात फिरतील..हाही एक असाच समज परंतू दिल्लीत काँग्रेस सातही जागी विजयी झाली.त्याचबरोबर पंजाबमध्येही पक्षाची कामगिरी चांगली झालीय. लालू-पासवानचा सफाया होऊ शकतो. बिहारचे मतदार जातीपातीच्या राजकारणाच्या पलिकडे जाऊन नितीशकुमार सारख्या मुख्यमंत्र्याला कौल देऊ शकतो हा खरचं थक्क करणारा अनुभव आहे.मायावतींची 'माया'जाल दिल्लीवर पसरणार ही नुसती कल्पनाचं अस्वस्थ करणारी होती.परंतु भारतीय मतदार खरंच सूज्ञ आहे.खंडणी,बदल्या,हुजरेगीरी,पुतळेबाजी आणि फसव्या सोशल इंजिनिअरींगच्या भुलभुलैय्याला हा मतदार भुलला नाही.मायावतींच्या सा-या महत्वकांक्षेला या निवडणुकीत सुरुंग लागलाय.

उत्तरेतल्या मतदारांनी जातीपातीच्या पलिकडं जात मतदान केलं.तर दक्षिणेतल्या तामिळनाडूनं तामिळ इलमच्या ठेकेदारांना घरी बसवलं. एलटीटीईच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात होती. तरीही स्वंत्र तामिळ इलमचा मुद्दा मतदारांनी नाकारला.प्रभाकरनचा पगारी माणूस अशी ज्यांची ओळख आहे अशा वायकोला या निवडणुकीत काँग्रेसच्या एका तरुण उमेदवाराने पराभूत केलं. तसंच प्रभाकरच्या बाजूने उपोषण करणा-या करुणानिधींनाही हे मतदार फारसे बधले नाहीत.त्याचबरोबर जयललितांच्या यू टर्नलाही भूलले नाहीत.

पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष पराभूत झालेत.हे गेल्या अनेक वर्षांपासून मनामध्ये रेखाटलेलं चित्र या निवडणुकीत प्रत्यक्षात आलं.कोणत्याही मुद्यावर थयथयाट करणे,प्रत्येक विकासकामांना भांडवलवादी अथवा अमेरिकावादी म्हणून टिका करणे, जातीय राजकारणाचा अहोरात्र द्वेष करत असताना लालू-मुलायम पासून ते अगदी मायावतीपर्यंतच्या सर्व 'जाती'वंत राजकारण्यांशी समोझाता करणा-या अस्सल डाव्या नेत्यांचा या निवडणुकीत शक्तीपात झालाय..

डाव्यांचा शक्तीपात झालाय..तर भाजपलाही त्यांची जागा या मतदारांनी दाखवून दिलीय. अटलजींच्या काळातली पक्षाची लोकप्रियता ढासलीत.लालकृष्ण अडवाणी अनुभवी आहेत..परंतु त्यांच्याजवळच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही.अडवाणींच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या दुस-या फळीतल्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय.आर्थिक मंदी ,वाढती महागाई,सुरक्षेचा प्रश्न या सारखे प्रश्न तर सोडाचं परंतु भाजपचा जो बेस आहे ते रामंदीर,370 वे कलम सारखे मुद्दे आघाडीधर्म म्हणून बासनात गुंडाळले गेले.अन्य पक्षाच्या उपद्रव मुल्यावरच भाजपवाले पुर्णपणे विसंबून राहीले.शत प्रतिशत भाजप या संकल्पनेवर या पक्षाचा विश्वास होता.मात्र गेल्या 28 वर्षात केरळ,तामिळनाडू,आंध्र,पश्चिम बंगाल या पक्षात भाजपला आपले पाय रोवता आले नाहीत.ओरिसामध्ये बिजू जनता दलानं भाजपचा वापर केला.नितीशकुमारही तोच कित्ता गिरवत आहेत,महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आजही भाजप मित्रपक्षाशिवाय पांगळा आहे.उत्तर प्रदेशात पक्षाचा बेस बरवलाय.तो परत मिळवून देण्याकरता राहुल गांधी सारखा नेता भाजपला अजुन सापडलेला नाही.मग आता जी काही मोजकी राज्य उरलीत..त्या राज्याच्या जोरावर भाजप सत्ता कशी मिळवणार ?

या देशातल्या मतदारांना आता स्थिर सरकार हवंय.उत्तर प्रदेश,बिहार,कर्नाटक पासून वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीत स्थिर सरकार देऊ शकणा-या पक्षालाचं मतदारांनी पसंती दिलीय.तरीही या लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा येणार ही माझी खात्री होती.माझी ही समजूत खोटी ठरली.काही पुस्तके वाचून ,इलेक्टोनिक मिडीयाच्या कार्यालयात बसून, ठराविक विचारांच्या वर्तुळात फिरुन देशाच्या जनमानसाचा अंदाज बांधणं हे शुद्ध भंपकपणाचं आहे ही शिकवण या निवडणुकीनं मला दिलीय.

माझ्या देशातले केवळ 50 टक्केचं मतदार मतदान करतात. परंतु हे मतदार नक्कीच सुज्ञ आहे.जातीपातीचं राजकारण,राजकीय ब्लॅकमेलिंग,स्वत:च्या शक्तीविषयीचा फाजील आत्मविश्वास बाळगणा-या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला या मतदारांनी जागा दाखवलीय.त्याचबरोबर माझ्या सारख्या असंख्य कुडमुड्या पत्रकारांनीही त्यांनी तोंडघाशी पाडलंय..म्हणूनच या ब्लॉगच्या शेवटी मला एवढंच म्हणावस वाटत मतदाराजाचा विजय असो !

Tuesday, April 28, 2009

इस बार...सुशीलकुमार ?


सध्या संपूर्ण देश निवडणुकीला सामोरा जातोय.जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान कोण असणार ह्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही.त्यातचं या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला अथवा आघाडीला बहुमत मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसंच प्रादेशिक नेत्यांना पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत.

काँग्रेस पक्षानं यंदाच्या निव़णुकीत पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांना आपला उमेदवार घोषीत केलंय.मात्र युपीएमधल्या सर्व पक्षांमध्ये मनमोहन सिंग यांच्या नावावर एकमत नाही ही बाब आता लपून राहीलेली नाही. त्याचबरोबर अणुकराराच्या मुद्यावरुन डावे पक्ष आणि मनमोहन सिंग यांच्यात संबध बरेच ताणले गेलेत.त्यामुळे डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यास मनमोहन सिंग यांना बलिदान द्यावे लागेल.प्रणब मुखर्जी हे काँग्रेस पक्षामधले दुस-या पक्षाचे महत्वाचे नेते. सर्वच महत्वाच्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ' पीम इन वेटींग ' असं त्यांच वर्णन केलं जात.डाव्या पक्षांची असलेली जवळीक ही त्यांची आणकी एक जमेची बाजू.परंतु त्यांची आजवरची कारकीर्द पाहीली तर ते पंतप्रधान म्हणून काँग्रेस हायकमांडला नक्कीच डोईजड ठरु शकतात.लालू प्रसाद यादव यांच्या बरोबरबरचे संबधही त्यांचे या निवडणुकीत ताणले गेलेत.त्यामुळे प्रणब मुखर्जींच्या नावाला काँग्रेस पक्ष तसंच युपीए आघाडीतएकमत होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

एनडीए आघाडी या निवडणुकीत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला आली तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होणार हे नक्की. त्यांच्या नावाला एनडीएतल्या सर्व घटक पक्षाने आगोदरचं संमती दिली आहे.एनडीएचे संख्याबळ वाढले तर जयललिलातांसारखे कुंपणावरचे पक्षही अडवाणी कॅम्पमध्ये दाखल होतील.मात्र एनडीए आघाडीला मनासाखारख्या जागा मिळल्या नाहीत तर कदाचित नितीशकुमार यांचे नाव पुढे येऊ शकते. गेल्या काही वर्षात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा देशात चांगलीच उजळली आहे.वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्यासाठी नितीशकुमार उपयोगी पडू शकतात.परंतु लालू-पासवान-मुलायम ही प्रादेशिक पक्षांची आघाडी त्यांच्या नावाला पाठिंबा देणार नाही.

शरद पवार यंदा पंतप्रधान नक्की बनणार असा विश्वास राज्यातल्या अनेक जाणकारांना वाटतोय.नवीन पटनायक,जयललिता यांनी त्यांना आता पाठिंबा दिलाय.(अर्थात हे सहकारी कधीही उलटू शकतात ) डावे पक्ष -मुलायम यांनाही पवार जवळचे आहेत.वेगवेगळ्या पक्षांना घेऊन आघाडी सरकार चालवण्याचा त्यांचा अनुभव (आठवा महाराष्ट्रामधले पुलोदचे सरकार ) जुनाच आहे.परंतु पवारांची आजवरची राजकीय काराकीर्द त्यांना त्रासदायक ठरु शकते. 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी त्यांनी केलेले बंड सोनिया गांधी अजुनही विसरलेल्या नाहीत.त्यातच पवार हे अत्यंत धुर्त आणि महत्वकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात.आपल्या सहकारी पक्षांचा शक्तीपात कतरुन आपली शक्ती वाढवण्याची कला ( आठवा 1999 नंतर राज्यात घसरत चाललेली काँग्रेसची स्थिती,जनता दल,शेकाप सारख्या पक्षांचा झाले -हास ) त्यामुळे अशा धोकादायक व्यक्तीला पंतप्रधान करण्याचा जुगार सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष करेल असे मला वाटत नाही.

या निवडणुकीच्या निकालानंतर सोनिया गांधी पंतप्रधान पदाचा आपला हुकमाचा एक्का बाहेर काढतील असे मला वाटते.सुशीलकुमार शिंदे हा काँग्रेस पक्षासाठी हुकमाचा एक्का ठरु शकतो.धक्कातंत्र देण्यात सोनिया गांधी माहीर आहेत.1999 मध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी दावा करायचा आणि 2004 मध्ये ' आतल्या आवाजाचे ' कारण देत त्यांनी देशादतल्या सर्व राजकारण्यांना चांगलाच धक्का दिला आहे.त्यामुळेच निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग यांचे नाव पुढे करुन सुशीलकुमार यांना पंतप्रधान सोनिया नक्कीच बनवू शकतात. शिंदे गांधी घराण्याशी एकनिष्ठही आहेत.गेल्या दहा वर्षात कांग्रेस सरचिटणीसपद,महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद,राज्यपालपद, उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी,केंद्रीय मंत्रीपद शिंदेंना मिळालीत.त्यातचं शिंदे मराठी आहेत.शरद पवार यांचे नाव बाजूला करण्यात आणि शिवसेनेला किमान वेळेप्रसंगी किमान तटस्थ ठेवण्यात शिंदेचे मराठीपण कामाला येऊ शकतं.

शिंदेची जात ही त्यांच्यासाठी महत्वाची ठरु शकते.ते दलीत असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष (किमान नाईलाज म्हणून का होईना...) विरोध करु शकणार नाहीत.एका दलित व्यक्तीला पंतप्रधान पदाची उमेदवारी देणं काँग्रेसला राजकीय दृष्ट्या प्रचंड फायद्याचे ठरु शकतं. देशभरात वाढत चाललेल्या माया फॅक्टरला हे चांगलं उत्तर ठरु शकतं. या सर्वाबरोबरच निरुपद्रवीपणा हा शिंदेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.गांधी मॅडमना होयबा म्हणण्यात त्यांना धन्यता वाटते.अशाच होयबा मंडळींना सोनिया गांधी भरभरुन
पाठिंबा देतात. होयबा वृत्तीमुळेच शिवराज पाटील गृहमंत्री म्हणून चार वर्षे राहीले.प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाची 'लॉटरी' लागली.सुशीलकुमार तर या सर्वांपेक्षा नक्कीच चांगले राजकारणी आणि प्रशासक आहेत.फक्त याकरता त्यांच थोडं नशीब चांगलं असायला हवं कारण नशीब बलवत्तर असेल तर दैवेगोडाही
या देशाचे पंतप्रधान बनू शकतात हे आपण अनुभवलं आहे.

Tuesday, April 14, 2009

धुमसता भारत


महिला दहशतवादी भारतामध्ये घुसण्याच्या तयारीत-लष्करप्रमुख
ओरिसामधल्या खाणीवर नक्षलवाद्यांचा हल्ला
आसाममध्ये पंतप्रधानाच्या सभेच्या आधी बॉम्बस्फोट
तालिबानी दहशतवाद्यांची सुरु आहे काश्मीरमध्ये घुसखोरी

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु असताना या सर्व घडमोडींना हल्ली वर्तमानपत्रात अथवा वृत्तवाहिन्यांमध्ये फारसे स्थान दिलं जात नाहीय..परंतु देशाच्या सर्व बाजूला सध्या धुमसती परिस्थीती आहे.आपण वेळीच सावध झालो नाही तर विध्वंसाच्या वेढ्यातून बाहेर पडणं आपल्या देशाला अवघड होऊ शकत.

आपला सर्वात डोकेदुखी शेजार म्हणजे पाकिस्तान.एका failed state साठी आवश्यक अशा सर्व कसोट्या आता पाकिस्तानने पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तान काही लाख रुपयात आत्मघातकी व्यक्ती मिळू शकतो असं गृहमंत्री रेहमान मलिक यांनी नुकतेच कबूल केलय.त्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे नियोजन मंत्री असिफ अहमद अली त्यांनी इस्लामाबादमधे एका परिसवादात कबूल केले की पाकिस्तानात आज ४० टक्के लोक गरीबी रेषेच्या खाली आहेत. मुंबईवरील हल्ल्यात पकडला गेलेला अजमल कसाब हा असाच चौथी पास , बेकार व भुरटा चोर होता ज्याला मुल्लांनी भडकवून ' जिहादी ' बनवला. असे चार कोटी भावी अजमल कसाब आज पाकिस्तानात फिरत आहेत. बेकार व अशिक्षित लोकसंख्येला भारताविरुद्ध ' जिहाद ' लढायला उद्युक्त करण्याचा उद्योग गेले अनेक दशके पाकिस्तानात सुरू आहे.तालिबानी दहशतवाद्यांच्या टोळधाडीने संपूर्ण पाकिस्तानला जर्जर करुन सोडलंय.येत्या सहा महिन्यात पाकिस्तान कोलमडून पडेल असं भाकित अमेरिकेच्या लष्करप्रमुखांचे सल्लागार डेव्हिड किल्सुलेन यांनी नुकतंच व्यक्त केलंय. धर्माँध शक्तींना रोखण्यासाठी पाकिस्तान नावाचे बफर स्टेट असणं भारतासाठी महत्वाचे आहे.या बफर स्टेटचे बाल्कन राष्ट्रांप्रमाणे तुकडे झाले तर त्याची सर्वाधिक झळ आपल्यालाच बसेल.

देशाच्या पूर्व सीमेवरही काही फारशी वेगळी परिस्थीती नाही.दर काही महिन्यांनी ठरावीक बॉम्बस्फोटाने आसाम हादरतोय.हुजी या बांगलादेशी दहशतवादी संघटनेने ईशान्य भारतामधल्या सर्वच राज्यात व्यापक जाळं निर्माण केलंय.आसाममधल्या अनेक लोकसभा मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांना निर्णायक महत्व प्राप्त झालंय.या मतांकडे बघत सत्ताधारी पक्ष वर्षानूवर्षे काहीच कारवाई करत नाही.तर बांगलादेशी घुसखोरांचा बागुलबुवा दाखवत भाजपा आणि असम गण परिषद या पक्षांचे राजकारण सुरु आहे.त्यामुळे आसू संघटनेनं 1980 च्या दशकात ज्या प्रकारे आंदोलन केलं.तसं कोणतही आंदोलन सुरु करण्याची इच्छाशक्ती कोणत्याच संघटनेमध्ये सध्या दिसत नाही.

तामिळ अस्मितेची दुकानदारीही सध्या जोरात सुरु आहे.श्रीलंकेत प्रभाकरनचे काही बरे-वाईट झाले तर वायको इकडे रक्तपात घडवणार. वायकोला प्रभाकरनकडून नियमितपणे पैसे मिळतात असा आरोप आहे.तरीही त्याच्याकडे सर्व पक्ष डोळेझाक करणार कारण बदलत्या राजकीय परिस्थीमध्ये चारही आघाड्यांना वायको हवेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई धमक कोणीच दाखवणार नाही.श्रीलंका लष्कराकडून सर्व बाजूने चिरडली गेलेली एलटीटीई तामिळमाडूमध्ये एखादा मोठा घातपात करुन सर्व जगाचं लक्ष नक्कीच वेधू शकते.1991 च्या लोकसभा निवडणुक प्रचार काळात याच संघटनेनं श्रीपेरम्बदूरला राजीव गांधींची हत्या केली.

पश्चिम भारतामधल्या सीमा किती ठिसूळ आहेत हे यापूर्वी वारंवार सिद्ध झालंय.दहा दहशतवादी कराचीमधून बोटीतून सहजपणे मुंबईमध्ये येतात.तीन दिवस संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.दिल्ली बॉम्बस्फोटामधल्या दहशतवाद्यांना केरळमधल्या जंगलामध्ये प्रशिक्षण दिलं जातं...26 नोव्हेंबरच्या हल्ल्याला चार महिने होत आली तरही आजवर या हल्ल्यातील किमान चार महत्वाच्या दहशतवाद्यांना आपण चक करु शकलेलो नाही. या हल्ल्यातील पाकिस्तानचे सर्व पुरावे जगासमोर मांडले..तरीही पाकिस्तानला कचाट्यात पकडण्यात आपल्याला यश आले नाही.एकाही वॉँटेड दहशतवाद्याचे हस्तांतरण अजुनही पाकिस्तानने भारताकडे केलेले नाही.

देशाच्या चारही सीमांवर सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेत.दहशतवादी हल्ल्याच्या भितीने आयपीएल स्पर्धा निवडणूक काळात आपण आयोजीत करु शकत नाही.जागतिक दहशतवादाच्या रडारावर भारत आलाय. पशूपतीनाथ ते तिरुपती हा नक्षलवाद्यांचा महामार्ग या देशात तयार झालाय.झारखंड.छत्तीसगड,आंध्रप्रदेश ओरिसा या राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 'नक्षली'राज निर्माण झालंय.परंतु या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा कोणताच राजकीय पक्ष करताना दिसत नाही.

या सर्व पार्श्नभूमीवर होणा-या या लोकसभा निवडणुकीला म्हणून खूप मोठे महत्व प्राप्त झालंय.देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारे ताठ कण्याचे सरकार निवडण्याकरता सर्वांनीच मतदान करायला हवे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...