Showing posts with label MSDhoni. Show all posts
Showing posts with label MSDhoni. Show all posts

Sunday, August 16, 2020

''मैं हर इक पल का शायर हूँ''

 DHONI finishes off in style...

A magnificent strike in to the crowd...

India lift the world cup after 28 years... 

महेंद्र सिंह धोनीची  यापुढे जेंव्हा आठवण काढली जाईल त्या प्रत्येक वेळी रवी शास्त्री यांचे हे वाक्य सर्वांना आठवेल. क्रिकेट पाहत मोठे झालेल्या माझ्या पिढीसाठी आजवरची सर्वात चांगली आठवण आहे. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये नुवान कुलसेखराचा तो बॉल धोनीनं अगदी शांत आणि सहजपणे मिडऑनवरुन मैदानाच्या बाहेर फेकला. धोनीच्या या सिक्सरसोबत टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

 कपिल देवच्या युवा आणि उत्साही टीमनं मिळवलेलं विजेतपद आम्ही केवळ टीव्हीवर हायलाईट्समध्ये पाहिलं होतं. त्यानंतर 28 वर्ष या क्षणाची देशानं प्रतीक्षा केली. सर्व देशवासियांच्या अपेक्षा धोनीच्या टीमने पूर्ण केल्या. क्रिकेटच्या पंढरीतसुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरच्या मुंबईत धोनीनं सिक्सर खेचत सर्व भारतीयांची स्वप्नपूर्ती केली.

 महेंद्रसिंह धोनी टीम इंडियामध्ये स्थान नक्की करत असतानाच 'बंटी आणि बबलीहा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात 'छोटे छोटे शहरोंसे खाली भोर दुपहरोंसे हम तो झोला उठाके चलेबारीश कम-कम लगती हैं नदीयां मद्धम लगती है हम समंदर के अंदर चलेअसं गाणं आहे. देशात जागतिकीकरण स्थिरावत असलेला तो काळ होता. छोट्या शहरातल्या तरुणांची मोठी पिढी महानगराकडे धाव घेत होती. छोट्या गावात त्यांनी पाहिलेली स्वप्न महानगरात म्हणजेच स्पर्धेच्या महासागरात ही पिढी पूर्ण करत होती.

सिस्टिमच्या बाहेरच्या या मंडळींनी देशात घुसळण सुरु केली होती. याच काळात रांचीमधला म्हणजेच भारतीय क्रिकेटमधल्या प्रस्थापित शहरी बेटांच्या बाहेरचा महेंद्रसिंह धोनी हा तरुण टीममध्ये दाखल झाला. 2002 मधला रेल्वेतला सामान्य टिकीट चेकर ते  स्वत:चं जेट विमान सहज घेऊ शकेल असा देशातला श्रीमंत खेळाडू हा  धोनीचा प्रवास आहे. या काळात फक्त धोनीचा बँक बॅलेन्स वाढला नाही. तर क्रिकेटविश्वातली सारी मानाची  विजेतेपद टीम इंडियाच्या कपाटात आली आहेत.

महेंद्र सिंह धोनी येण्यापूर्वी भारतीय टीममध्ये काही ठरावीक महानगरांमधील खेळाडूच प्रामुख्याने होते. धोनीनं छोट्या शहरातील खेळाडूंसाठी टीमचा दरवाजा सताड उघडला. भारतीय टीमवरील  काही ठरावीक शहरांची मक्तेदारी संपली. छोट्या शहरातील खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी आणि सर्वोच्च पातळीवर सर्वोत्तम खेळ करण्यासाठी आवश्यक वेळ, पाठिंबा आणि मार्गदर्शन धोनीकडून मिळाले.

 प्रत्येक कॅप्टनचं एक वैशिष्ट्य असतं. कपिल देव स्वत: अग्रभागी राहून टीमला चांगलं खेळण्यासाठी प्रोहत्साहित करत असे. सौरव गांगुलीनं टीममधल्या प्रत्येकाचा खेळ उंचवण्यावर भर दिला. लढाऊ वृत्तीला मैदानातल्या कुशल डावपेचाची जोड राहुल द्रविडनं दिली. महेंद्र सिंह धोनीचं वैशिष्ट्य काय किंवा धोनीनं टीम इंडियाला काय दिलं या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्याचं असेल तर धोनीनं टीम इंडियाला जगातली यशस्वी टीम बनण्याची 'प्रोसेसदिली.

होय प्रोसेस. धोनीच्या बोलण्यात नेहमी येणारा शब्द. धोनीच्याच वेगवेगळ्या वाक्यांचा आधार घेत सांगायचं झालं तर प्रोसेस म्हणजे,  "एखाद्या कामासाठी शारीरिक आणि मानसिक रित्या पूर्णपणे तयार असणं, भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार न करता ते लक्ष्य गाठण्यासाठी स्वत:ला मैदानावर झोकून देणं. निकाल काय लागेल तो फारसा महत्वाचा नाही. पण त्यासाठी तुम्ही 90 किंवा 95 टक्के नाही तर 100 टक्के मेहनत घेतली आहे का हे महत्वाचं आहे. टीमचं हे 100 टक्के कमिटमेंट म्हणजेच प्रोसेस "

 याच प्रोसेसपूर्तीचा ध्यास घेऊन धोनी खेळला. त्यामुळेच तो केवळ टीम इंडियाचा नाही तर जगातला एक यशस्वी कॅप्टन बनला. मैदानावर असताना संपूर्णपणे फोकस होऊन खेळणं आणि  खेळताना घडलेल्या घटनामिळालेलं यशापयश हे मैदानाच्या बाहेर पडल्यावर मैदानावरच सोडणं हे धोनीचं वैशिष्ट्य होते. ही 'स्विच ऑन- स्विच ऑफवृत्ती धोनीकडं आहे. त्यामुळेच तो भारतीय क्रिकेट फॅन्सचा अमर्यादीत दबाव सहजपणे सहन करु शकला.

 धोनीने टीममध्ये येण्यापूर्वी क्रिकेटचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले नव्हते.

प्रथमश्रेणी सामन्यातही  कधी कॅप्टन नसलेला हा पठ्या थेट राष्ट्रीय टीमचा कॅप्टन झाला. कॅप्टन झाल्यानंतर  क्रिकेटचं शास्त्रीय प्रशिक्षण न घेणं त्याच्या फायद्याचं ठरलं. मैदानावरच्या समस्यांची पुस्तकी उत्तरं त्यानं शोधली नाहीत. तर आपल्या ओरिजनल मेथडनं त्यानं प्रतिस्पर्धी टीमला गोंधळात टाकलं. सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला. टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

धोनी हा कॅप्टन म्हणून अनेकदा प्रतिस्पर्धी प्लेयर्सच्या एक पाऊल पुढे असे. तो अगदी ओरिजनल सुचण्याच्या बाबतीत 'भारतीय क्रिकेटचा स्टीव्ह जॉब्ज ' होता. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बॉल आऊटमध्ये भारताने मिळवलेला विजय हा धोनीच्या याच 'एक पाऊल पुढे' विचाराचा परिणाम होता. त्याने नेहमीच्या फास्ट बॉलर्सच्या नाही तर संथ बॉल टाकून स्टंप उडवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंच्या हाती बॉल दिला होता. 


बॉल आऊटमध्ये बॉलरचे टार्गेट स्टंप होते. धोनी बरोबर स्टंपच्या मागे अशा पद्धतीने बसला की बॉलरला बॉल टाकताना टार्गेट स्पष्ट दिसत होते. बॉलर हातातून बॉल सोडेपर्यंत तो त्या जागेवरुन अजिबात हलला नाही. त्याचा योग्य परिणाम झाला. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा या भारताच्या तीन्ही बॉलर्सनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. त्याच्या अगदी उलट पाकिस्तानच्या बॉलर्सची निवड आणि विकेट किपरची स्टंपमागची पोझिशन हे सर्व काही चुकले होते. त्यामुळे त्यांच्या एकाही बॉलरला बॉल आऊटमध्ये यश मिळाले नाही.

बांगलादेश विरुद्ध २०१६ च्या टी -२० वर्ल्ड कपमध्येही धोनीच्या इतरांच्या पुढे विचार करण्याच्या वृत्तीने टीम इंडियाला तारले. हार्दिक पंड्याचा बॉल स्ट्राईकवरील बॅट्समनपर्यंत पोहचेपर्यंत त्याच्या सहकाऱ्याने अर्धे क्रिज पार केले होते. धोनीनं तो बॉल शांतपणे पकडला. थ्रो करताना हातातून निसटू नये म्हणून ग्लोज काढण्याचीही खबरदारी घेतली आणि चपळाईने समोरच्या खेळाडूला रन आऊट करत बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.  

टी-20 वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांची विजेतेपद जिंकणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. या तिन्ही विजेतेपदामध्ये धोनीची विचार करण्याची ओरिजनल मेथड उपयोगी पडली. यामुळेच त्यानं टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची ओव्हर हरभजनला नाही तर जोगिंदर शर्माला दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली आऊट झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या युवराजच्या ऐवजी स्वत: मैदानावर उतरला. चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडला विजय डोळ्यासमोर असताना त्यानं इशांत शर्माच्या हातात बॉल दिला.

सहकाऱ्यांबद्दलचा विश्वासत्यांचा खेळ उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत हाच धोनीच्या यशाचा 'एक्स फॅक्टरआहे. एकदा मिळालेलं यश हे  योगायोग असू शकतं. पण त्या यशाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या यशामध्ये 'एक्स फॅक्टरनिर्णायक असतो.  सभोवतल्या व्यक्तींना नियंत्रित करतोय याची कल्पनाही न देता प्रभावित करणं हा महान नेत्यांचा 'एक्स फॅक्टरअसतो. अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायी सहजपणे विकसित होत असतात.

धोनी कॅप्टन असताना मैदानात आणि ड्रेसिंग रुममधली शांतता, सर्वोच्च यश आणि पराकोटीचं अपयश आल्यानंतरही त्याला सारख्याच स्थितप्रज्ञतेनं सामोरं जाण्याची धोनीची वृत्ती याचा सहकाऱ्यांवर मोठा प्रभाव पडला हे नक्की. त्यामुळेच धोनीच्या टीममधले खेळाडू मैदानातल्या कठीण प्रसंगाला न डगमगता सामोरं गेले. या टीमनं खेळाचा आनंद लुटला.

संपूर्णपणे फोकस करुन खेळतानाही हा फक्त खेळ आहे. हा खेळ म्हणजे आयुष्य नाही हा धोनीमंत्र टीममध्ये कुठेतरी रुजला असावा. त्यामुळेच टी वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफीवर्ल्ड कपआशिया कपऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेचं विजेतेपदआयसीसी टेस्ट रँकींगमध्ये पहिला नंबरवन-डे रँकींगमध्ये पहिला नंबरटी-20 रँकींगमध्ये पहिला नंबरहे सारं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला मिळवता आलं.

आज टीम इंडियाच्या फिटनेसचा स्तर उंचावलाय. हा कॅप्टन धोनीच्या प्रभावाचा मोठा भाग आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीबी सीरिजपूर्वी 'संथ हलचाली करणारे खेळाडू टीममध्ये नको' असं त्यानं निवड समितीला सांगितलं होतं. एका ओव्हरमध्ये बॉलर्सना किंवा सिक्सर लगावल्यानंतर बॉलर्सवर भडकलेला धोनी कुणी पाहिला नाही. सलग चार वाईड बॉल टाकले तरी चेहऱ्यावरची रेषाही हलू न देणारा विकेटकिपर-कॅप्टन धोनी सर्वांनी पाहिलाय. पण ढिसाळ फिल्डिंगला धोनीकडं कधीही माफी नव्हती. अशावेळी धोनीनं केलेली कानउघडणी स्टम्पमधल्या मायक्रोफोनमधून साऱ्या जगानं ऐकलीय.

फिल्डिंग आणि 'रनिंग बिटविन द विकेटहा क्रिकेटमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. यामध्ये प्रत्येकानं आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे हे सर्वांमध्ये बिंबणारा कॅप्टन म्हणून इतिहास धोनीला लक्षात ठेवणार आहे. धोनीचा हा वारसा विराट कोहलीने नव्या उंचीवर नेलाय. 

 'कोणताही खेळाडू हा त्याच्या नावावर नाही तर खेळाच्या जोरावर टीममध्ये असायला हवा. तो टीमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतो की नाही हे कॅप्टनला ठरवू द्या' असा नियम धोनीनं तयार केला.याच नियमाच्या आधारावर त्यानं गांगुलीलक्ष्मण आणि द्रविड या तिघांना टीममधून वगळलं. धोनीची टेस्टमधील निवृत्ती आणि वन-डे, टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयही त्याने असाच अगदी सहज घेतला. १०० टेस्ट खेळण्याचा किंवा २०० वन-डे मध्ये कॅप्टनसी करण्याचा विचार त्याने केला नाही. कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर, बीसीसाआयला फक्त काही ओळींचे औपचारिक पत्र पाठवून धोनीनं त्याची निवृत्ती जाहीर केली होती. 

धोनीनं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर मागच्या तीन वर्षात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल वारंवार चर्चा झाली. त्याचा खेळ संथ झाला होता. त्याला मैदानात आल्यावर स्थिर होण्यास बराच वेळ लागत असे. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही तो अगदीच संथ खेळला. त्याच्या संथ खेळामुळे झटपट रन्स बनवण्याच्या नादात हार्दिक पंड्या आऊट झाला. रवींद्र जडेजा संपूर्ण भरात होता. त्यावेळी धोनीनं फक्त प्रत्येक बॉलला एक रन काढून त्याला साथ देणे आवश्यक होते, पण तो दिवस धोनीचा नव्हता. वर्ल्ड कप फायनलमध्ये बटलर-स्टोक्स जोडीनं जवळपास याच परिस्थितीतून मॅच बरोबरीत आणली होती. पंड्या आणि जडेजाच्या मदतीनं नेहमीच्या धोनीला मॅच जिंकणे सहज शक्य होते, पण त्या दिवशी नेहमीचा धोनी दिसलाच नाही.

धोनी आणि क्रिजमध्ये अखेर अगदी काही इंचाचे अंतर राहिले. मार्टिल गप्टीलच्या थेट थ्रो ने धोनी रन-आऊट झाला. त्यावेळी मॅचचे लाईव्ह समालोचन करणाऱ्या सौरव गांगुलीसह जगभरात मॅच पाहणाऱ्या तमाम भारतीयांचा आवाज नंतरचा काही काळ बंद झाला होता. धोनीनं रिटायरमेंटचा जो 4.2 मिनिटांचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यात जवळपास 20  सेकंद त्याचे हे शेवटचे रन आऊट दाखवलंय. मैदानावरचे यश आणि अपयश शांतपणे स्विकारणाऱ्या आणि ते मैदानावर सोडून पुढच्या क्षणी सामान्य आयुष्य जगणे ही ज्या धोनीची सवय आहे, त्या धोनीलाही 'ती आठवण' किती छळतीय  हे आपल्याला समजण्यासाठी धोनीनं त्या रन आऊटच्या प्रसंगाला दिलेला इतका वेळ पुरेसा आहे.

धोनी वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही सेमी फायनल खेळला नाही. 'तो रिटायर कधी होणार?' 'तो रिटायर का होत नाही?' 'तो जागा अडवून का बसलाय?' ' त्याने इतरांना जो नियम लावला त्याची स्वत: का अंंमलबजावणी करत नाही?' यासारखे अनेक प्रश्न अनेकांनी विचारले. धोनी त्याच्या स्वभवाप्रमाणे शांत होता. त्याच्यात आणि निवड समितीत काय चर्चा झाली का? याचे अंदाज अनेकांनी बांधले. ठराविक दिवसांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु होत असे. अखेर तो त्याने ठरवले त्याच दिवशी, त्याच्या नेहमीच्या शांत पद्धतीने निवृत्त झाला. 

त्याचे लग्न, टेस्टमधील निवृत्ती, वन-डे आणि टी-२० कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय याच प्रमाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती यापैकी कोणतीही बातमी जगात कुणालाही 'ब्रेक' करता आली नाही. आता त्याच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा सर्वांनी त्याच्या 'टायमिंगवर' 'वेळकाढू' चर्चा सुरु केलीय. 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीप्रमाणे अनेकजण त्यावर काथ्याकूट करतायत. धोनीचा स्वभाव पाहता या सर्वांना त्याच्याकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळातही अनेक जण 'आपल्यातल्या शेरलॉकला अनलॉक करत' नवे-नवे सिद्धांत मांडत स्वत:ची पाठ थोपटून घेतील हे नक्की.

सौरव गांगुलीनं नव्या भारतीय टीमची उभारणी केली. टीम इंडियाला आक्रमक बनवलं. धोनीनं या आक्रमकतेला शांततेची जोड दिली. 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008 साली सीबी सीरिज जिंकल्यानंतर अगदी सामान्य विजयासारखे राहा, अवास्तव सेलिब्रेशन करु नका' अशी स्पष्ट सूचना धोनीनं टीममधल्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती. 'ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे ही जगासाठी मोठी गोष्ट असेल. आमच्यासाठी ही एक सामान्य बाब आहे'. हा संदेश ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्वाला टीम इंडियानं दिला होता. 

यश आणि अपयश हे खेळाचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. यशानंतर अपयश आणि अपयशानंतर पुन्हा यश ही सर्व प्रोसेस सतत सुरु राहणार आहे. आपण या प्रोसेसचा अभ्यास करायचा. आपले स्कील अधिक घोटीव करायचे आणि त्यानंतर जे काही होईल त्याला शांतपणे समोर जायचे. या विस्तीर्ण ब्रह्मांडातला आपण एक बिंदू आहोत, आपल्यापूर्वी इथे अनेक सरस होऊन गेले आणि पुढेही अनेक अव्वल होतील. आपण फक्त काल आणि उद्या या साखळीला जोडणारा आज आहोत. हा आज आपल्याला अधिक समृद्ध करायचा आहे. धोनीचं करियर हीच शिकवण देते.

महेंद्र सिंग धोनीनं निवृत्तीसाठी देखील याच प्रकारचे गाणे निवडले आहे. करियरमधील सर्वोच्च क्षण आणि अगदी तळाचे क्षण याला या व्हिडिओमध्ये समान महत्व देण्यात आलंय. धोनीचा तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले. त्यानंतर पुन्हा प्रत्येकदा व्हिडिओ पाहतानाही डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. त्यामधील प्रत्येक प्रसंग हा माझ्यासह अनेकांच्या तारुण्याची गोष्ट आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे पाहताना त्या सर्व आठवणीने डोळ्यात पाणी येणार आहे.

धोनीला निवृत्तीच्या प्रसंगी जगाला काय सांगायचे आहे ते त्याने साहिर लुधियानवी यांच्या शब्दात सांगितले. माझ्यासाठी धोनी काय आहे हे सांगण्यासाठी देखील मला साहिरचेच शब्द आठवतात....

रिश्तों का रूप बदलता है, बुनियादे खतम नही होती

ख्वाबो और उमंगों की मियादें खतम नही होती

- ''मैं हर इक पल का शायर हूँ''

 


Friday, January 19, 2018

गंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल !



पाच महिन्यांपूर्वी श्रीलंकेचा श्रीलंकेत 3-0 असा सहज फडशा पाडून  टीम इंडिया टॉपवर होती. आजवर जे कुणालाही जमलं नाही ते विराट कोहलीच्या टीमनं करुन दाखवलं. आज पाच महिन्यानंतर हीच विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत व्हाईटवॉशच्या उंबरठ्यावर आहे. '25 वर्षाचा बदला' तर सोडाच पण आजवर  कोणत्याही भारतीय टीमवर ओढावली नाही अशा नामुष्कीचा याच 'विराट' सेनेला सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

     2015 च्या वर्ल्ड कपनंतरच्या सर्व टेस्ट या भारतानं घरच्या मैदानावर, जयवर्धने-संगकाराच्या निवृत्तीनंतर अजूनही सावरु न शकलेल्या श्रीलंकेत किंवा ज्यांचा टेस्ट क्रिकेटमधला रस केंव्हाच संपला अशा वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या होत्या. त्यामुळे साहजिक टीम इंडियाच्या यशाचा आलेख हा गेली दोन वर्ष टॉपवरच होता. याच टॉपच्या धुंदीमध्ये ही विराटसेना आजवर कोणत्याही भारतीय टीमला परदेशात जे जमलं नाही ते करु शकेल असा आत्मविश्वास कोच रवी शास्त्रींनी दक्षिण आफ्रिका सीरिजपूर्वी बोलून दाखवला. वास्ताविक 2011 नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 24 टेस्टमध्ये भारताला अवघी एक टेस्ट जिंकता आलेली आहे. तर 17 टेस्टमध्ये पराभव झाला. तरीही कोणत्याही सराव सामन्याशिवाय राखेतून फिनिक्स भरारी घेऊच या अविर्भावात विराट-शास्त्रीची ही टीम दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती.


    टीम इंडियाच्या यापूर्वीच्या पराभवात परदेशी खेळपट्यांवरील टिपीकल वातावरणाचा मोठा वाटा होता. या सीरिजमध्ये या टिपीकल वातावरणाच्या पडद्यामागे लपण्याची सोय नाही.  दक्षिण आफ्रिकेची इनिंग गडगडली, टिपकील चोकर्स वृत्तीतून त्यांनी विकेट्स गमावल्या,  बॅट्समन मोक्याच्या क्षणी रन आऊटही झाले आणि विशेष म्हणजे विराट कोहलीनं ज्याचं वर्णन 'फ्लॅट विकेट' असं केलं अशी खेळपट्टी भारताला बनवून दिली.तरीही भारतानं आपल्या हक्काचा विजायचा घास दक्षिण आफ्रिकेला आग्रहानं भरवला. सर्व अनुकूल संधी समोर असूनही त्या  लाथाडून खडतर आयुष्य जगणाऱ्या संतांची मोठी परंपरा या देशाला आहे. भारतीय क्रिकेटर्सनी  हा आध्यात्मिक वारसा चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीनं वापरलाय.

     1990 च्या दशकामध्ये भारतीय टीम कुठेही असो सर्वाधिक फोकस सचिन तेंडुलकरवर असायचा. आता सचिनची जागा विराटनं घेतलीय.  क्रिकेट विश्वातल्या सर्वाधिक एक्स्प्रेसिव्ह खेळाडूंमध्ये विराटचा क्रमांक हा वरचा आहे. तो मैदानावर प्रचंड उर्जेनं उतरतो. मैदानावरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो संपूर्णत: समरस झालेला असतो. सतत फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये बदल करणे ही त्याची कॅप्टनसीची पद्धत आहे. सेंच्युरीनमध्ये आफ्रिकेच्या दुसऱ्या इनिंगमधल्या शेवटच्या 15 ओव्हर्समध्ये त्यानं पाच बॉलर्स वापरले. (बहुधा ज्या बॉलर्सचा पार्थिवला विकेट किपिंग करताना त्रास झाला त्याला पुढच्या मॅचमध्ये बाहेर बसवण्याचा विराटचा विचार असावा ) मैदानात सक्रीय असणं ही चांगली कॅप्टनसी मानली जाते, पण याचा अतिरेक हे स्वत:वर विश्वास नसल्याचं लक्षण आहे. तुमच्या डोक्यात नक्की योजना तयार नाही हा यामधून अर्थ निघतो. हेच अपुरे नियोजन टीमच्या निवडीमध्ये उतरल्यानं  गोंधळ आणखी वाढलाय.

       विराटनं आजवर 34 टेस्टमध्ये कॅप्टनसी केली आहे. या 34 टेस्टमध्ये त्यानं आजवर एकदाही सलग दोन टेस्टमध्ये एक टीम खेळवलेली नाही. या सीरिजमधल्या पहिल्याच टेस्टमध्ये टीम मॅनेजमेंटनं अजिंक्य रहाणेला वगळून रोहितला खेळवलं. या निर्णयाचा  'अजिंक्य अंतिम 11 मध्ये असेल याचा कुणीही विचार केला नव्हता' असा भक्कम बचाव विराटनं केला. हे असं इतकं काळं आणि पांढरं सांगून अजिंक्य रहाणेला आपण चुकीचा संदेश देत आहोतच पण त्याचबरोबर रोहित शर्मावरही अनावश्यक दबाब वाढवतोय याचं भान विराटनं जपलं नाही.


     सेंच्युरीयन टेस्टमध्ये भुवनेश्वर कुमारला वगळण्याचा निर्णय तर आणखी धक्कादायक होता. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्यानंतर लगेच भुवनेश्वरला बाहेर बसवण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर होताच. भारतीय मैदानावर सर्वच जण बहारात असताना ते झाकून गेलं. दोन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेतही त्यानं ही परंपरा जपली. केपटाऊन टेस्टमध्ये केवळ बॉलिंग नाही तर बॅटिंग करतानाही भुवनेश्वर पहिल्या टेस्टमध्ये सर्वोत्तम टचमध्ये होता. सेंच्युरियनमध्ये जम बसलेल्या विराटला त्यानं नक्कीच उत्तम साथ दिली असती. सेंच्युरीयन टेस्ट सुरु होण्यापूर्वी  टीम मॅनेजमेंटनं हा सुटकेचा दोर सिंहगडावरच्या लढाईत मावळ्यांनी कापावा तसा कापून टाकला. त्यामुळेच 2016 च्या टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून विराटची  निवड झाली त्यावेळी हा माणूस आपल्या टीममध्ये स्टिव्ह स्मिथ आणि जेम्स अँडरसन यांना वगळून रोहित शर्मा आणि ईशांत शर्माचा समावेश करेल असा पहिला विचार माझ्या मनात आला. असमान्य बॅट्समन आणि गोंधळलेला  कॅप्टन हे भारतीय टीमनं 90 च्या दशकामध्ये अनुभवलंय. आता 2018 मध्येही आपण पुन्हा एकदा या 90 च्या दशकाकडं वाटचाल करतोय.


     आक्रमक खेळण्याचा रवी शास्त्रीचा मंत्र घेऊन ही टीम इंडिया मैदानात उतरली होती. वर्षातल्या सर्वात महत्वाच्या टेस्टमध्ये नवोदीत कुलदीप यादवचा समावेश करणे ही आक्रमकता आहे. दिवस संपायला पाच ओव्हर्स बाकी असताना डेल स्टेनला पुढे येऊन आत्मघातकी फटका मारणे ही आक्रमकता नाही. विराट सर्वोत्तम खेळत असताना एक बाजू लावून धरायला हवी हा क्रिकेटमधला नैसर्गिक नियम अगदी काही दिवसांपासून क्रिकेट पाहणारा व्यक्तीही सांगेल. सेंच्युरीयनच्या पिचवर हार्दिक पांड्या तर बागेत धावात तसं धावला आणि मैदानाबाहेर गेला.

       हार्दिक बागेत बागडत होता तर चेतेश्वर पुजाराचं रनिंग बिटविन द विकेट पाहून हा माणूस कधीच पळून जाऊन लग्न करणार नाही असा विश्वास त्याच्या आई वडिलांना असेल याची खात्री त्यानं सेंच्युरियन टेस्टमध्ये घातलेला घोळ पाहिलेला कुणीही देईल. चौथ्या इनिंगमध्ये मॅच वाचवण्याची गरज असताना विकेट फेकणं म्हणजे राजाच्या गालावर बसलेली माशी माकडानं तलवारीनं उडवण्याचा मुर्खपणा करण्यासारखं किंवा ऐन अॅप्रायजलच्या पूर्वी बॉसशी भांडण करण्यासारखे आहे.


      वृद्धीमान सहा जखमी झाल्यामुळे सेंच्युरीयन टेस्टमध्ये उतरलेला पार्थिव पटेल जुन्या अनुभवातून काहीच शिकलाय असं वाटलं नाही. पार्थिव यापूर्वी 2004 साली जानेवारी महिन्यातच सिडनीमध्ये टेस्ट खेळला होता. त्याच्या गचाळ विकेटकिंपीगमुळे भारतानं ती टेस्ट जिंकून परदेशात सीरिज जिंकण्याची अलिकडच्या काळातील सर्वोत्तम संधी गमावली होती.  14 वर्षानंतर पुन्हा एकदा गचाळ किपिंग करत त्यानं पराभवातला आपला वाटा उचलण्याचं काम केलं. बुमराहच्या बॉलिंगवर एल्गाच्या बॅटची कड लागून गेलेला बॉल पार्थिवच्या डाव्या दिशेनं आला होता. हा माणूस 70 वर्षांपासून क्रिकेट खेळत असूनही कॅच पकडणे काही त्याला जमले नाही. उलट तो पुजाराच्या दिशेनं बोट दाखवत होता. कॅच सुटल्यावर बाजूच्या फिल्डरकडे बोट दाखवणे ही  रवी शास्त्री खेळत असताना भारतीय टीमच्या खेळाडूंची सवय होती. आता इतक्या वर्षांनी कॉमेंट्री करुन करुन थकलेल्या घशाला आराम देण्यासाठी रवी शास्त्री कोच बनलाय.  ह्या परंपरेचं पार्थिव पटेल मोहब्बतेमधल्या नारायण शंकरच्या तोडीच्या निष्ठेनं पालन करतोय.

   
     दक्षिण आफ्रिकेतले हे पराभव टीम इंडियानं ओढावून घेतले आहेत. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पत्कारली तशी शरणागती  पत्करली नाही. त्यामुळे या पराभवाचं कठोर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. खिलाडूवृत्तीचा कितीही गवगवा केला तरी पराभव हा पराभव असतो आणि तो खेळाडूला आतमध्ये नक्कीच टोचतो. विशेषत: मॅच जिंकण्याची संधी असताना पराभूत होणे ही जास्त जिव्हारी लागणारी गोष्ट आहे.

     
    सलग दुसऱ्या पराभवानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना पत्रकार कोणते प्रश्न विचारणार याची विराटला नक्कीच कल्पना असेल. अशावेळी पत्रकारांचे प्रश्न निग्रहानं टोलवून लावण्याऐवजी विराटनं त्यांनाच उलटे प्रश्न विचारले. प्रत्येक देश आपल्याला अनुकूल अशा वातावरणात समोरच्या टीमला लोळवतो हा टेस्ट क्रिकेटमधला गेल्या काही वर्षातला ट्रेंड आहे. परदेशातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी सर्वोत्तम टीम खेळवण्याऐवजी विराट दक्षिण आफ्रिकेतला भारतामधला इतिहास उगाळत होता. ( दक्षिण आफ्रिकेची भारतामधली कामगिरी ही भारताच्या दक्षिण आफ्रिकेतल्या कामगिरीपेक्षा किती तरी सरस आहे. ) विराटनं याबाबत त्याचा पूर्वीचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीकडून शिकण्यासारखं आहे. पत्रकारांच्या खोचक प्रश्नांना उत्तर देण्याची धोनीची खास पद्धत होती. धोनीच्या उत्तरामध्ये अनेकदा ह्यूमर आणि उपहास दडलेला असतो. विराटची शैली मात्र 2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  'भारतामध्ये या आम्ही तुम्हाला दाखवतो' असं सांगणाऱ्या दिल्लीकर गौतम गंभीरशी जुळणारी आहे.

     विराट कोहली हा नैसर्गिक नेता आहे. जो आघाडीवर राहून टीमचं नेतृत्व करतो. त्यानं वन-डेमध्ये अगदी सहजगत्या पूर्ण केलेले अनेक टार्गेट्स हे याचं उदाहरण आहे. सध्या तरी विराटच्या दर्जाचा आणि त्याच्या कॅप्टनीसाला पर्याय ठरु शकेल असा खेळाडू टीम इंडियामध्ये नाही. त्याच्या या फायरब्रँड नेतृत्वाला योग्य दिशा देणारा समंजस व्यक्तीची गरज आहे. वन-डेमध्ये मैदानावर धोनी हे काम उत्तम रित्या करतो. टेस्टमध्ये  हे काम शास्त्रीनं करणं आवश्यक आहे. 

 

    मुर्खासारखे रन आऊट, कॅच सोडण्याचं सातत्य, विकेट फेकण्याची प्राचीन सवय आणि आक्रमकतेच्या नावावर भरकट चाललेली कॅप्टनसी या चार गोष्टी दक्षिण आफ्रिकेतल्या पराभवाचं कारण आहेत. टीम इंडियाच्या परदेशातल्या पराभवाची हीच गंगोत्री आहे.ही गंगोत्री शुद्ध झाली की विजयाचा अडलेला प्रवाह पुन्हा प्रवाहित होईल. या प्रवाहाला वाट करुन देणाऱ्या होयबाच्या मानसिकेतून बाहेर पडून विराटला योग्य सल्ला देणाऱ्या सल्लागारांची टीम इंडियाला गरज आहे.  भारतीय क्रिकेटची प्रचंड काळजी करणारं सन्माननीय सुप्रीम कोर्ट या योग्य सल्लागारांच्या निवडीचं किंवा आहे त्या सल्लागारांना पुरेशी समज देण्याचं काम करेल का ? पुढच्या आठवड्यात विनोद राय यांना बीसीसीआयचा कारभार हाती घेऊन एक वर्ष आणि लोढा समितीला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. 

Wednesday, June 24, 2009

कब तक धोनी ?


विरुद्ध दक्षिण अफ्रिका 12 बॉल 5.

विरुद्ध वेस्टइंडिज 23 बॉल 11

आणि इंग्लंडविरुद्ध जवळपास 10 च्या सरासरीने विजय आवश्यक असताना 20 चेंडूत 30 धावा

ह्या कोणत्याही सामान्य भारतीय खेळाडूच्या धावा नाहीत.किंबहूना तो एखादा सामान्य खेळाडू असता तर पराभवाचे खापर त्याच्यावर फोडून तो केंव्हाच संघाच्या बाहेर गेला असता...ही भारतीय संघाचा

सूपरकूल ( !) कर्णधार महेंद्रसिंग धोनीची T-20 विश्वचषकातल्या शेवटच्या तीन सामन्यातील धावसंख्या.

वेस्ट इंडिज,दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या तीन देशांविरुद्ध भारताने या स्पर्धेत सूपर एटचे तीन सामने खेळले.उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला यापैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक होते.मात्र सर्व सामन्यात भारत पराभूत झाला.गत विजेता भारतीय संघ या स्पर्धेत उपांत्य फेरीतही पोचू शकला नाही.भारताच्या या अधोगतीची अनेक कारणे आहेत..परंतु एक कर्णधार आणि त्याचबरोबर एक फलंदाज म्हणून कर्णधार धोनीचा हरवलेला फॉर्म हे भारताच्या अपयशाचे सर्वात मुख्य कारण मानवे लागेल.

काही व्यक्ती ह्या खरेच नशीबवान असतात. मुख्यमंत्री म्हणून नाकार्तेपणे काम करुनही विलासराव देशमुख केंद्रीय मंत्री बनतात.नौशादचे संगीत,महंमद रफीचा आवाज, आणि चांगल्या बॅनरचे चित्रपटाच्या जोरावर राजेंद्रकुमार सारख्या सामान्य कलाकाराचे अनेक चित्रपट हे गोल्डन ज्यूबली ठरतात.त्याच प्रमाणे महेंद्र सिंग धोनीसारखा एक सामान्य खेळाडू भारतीय संघाचा नुसता कर्णधार बनत नाही तर एक प्रचंड यशस्वी कर्णधार असल्याचा अभास निर्माण करण्यास यशस्वी ठरतो.

2007 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेत बाद झाला.या स्पर्धेत भारत बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्घ पराभूत झाल होता. या दोन्ही मॅचमध्ये धोनी भोपळाही फोडू शकलेला नाही. ही माहिती आता कुणालाच आठवत नसली तरी ती खरी आहे. श्रीलंकेविरुद्ध भोपळा न फोडणारा धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.तर या मॅचमध्ये सर्वात जास्त 60 धावा काढणा-या राहुल द्रविडला मात्र पद्धतशीरपणे भारतीय वनडे संघातून वगळण्यात आलंय.धोनीचं महात्म पटवून देण्यासाठी T-20 चा नेहमी गवगवा केला जातो. धोनीचा T-20 चा स्ट्रायक रेट आहे 101.68 . याच संघातला गोलंदाज हरभजन सिंगचा स्ट्रायक रेट आहे 105.55 तर झहीर खानचा आहे 133.33.एवढंच काय तर ज्यांच्यावर कसोटी खेळाडू असा शिक्का सा-या जगाने टाकलाय अशा राहुल द्रविड (121.21) आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण ( 102.67 ) यांचाही देशांतर्गत T-20 मध्ये स्ट्रायक रेट धोनीपेक्षा जास्त आहे.

या T-20 विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या मर्यादेचे पितळ उघडे पडले.या स्पर्धेत सेहवाग नव्हता.त्यामुळे रोहीत शर्माला सलामीला यावे लागले.अशा परिस्थितीमध्ये एक फिनीशर म्हणून धोनीनं युवराजसह भूमिका बजावायला हवी होती.मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याला बॅंटींग ऑर्डर लावताच आली नाही.रैनाचा 3 क्रमांक काही कारण नसताना सुरवातीला काढून घेण्यात आला.वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या रटाळ खेळामुळे भारत 170 च्या एवजी 150 च धावा करु शकला.युवराज सिंग ,युसूफ पठाण या फॉर्मातल्या फटकेबाज खेळाडूंना बढती त्याने दिली नाही.फॉर्मातल्या खेळाडूंना खेळण्यास कमी बॉल मिळाले.धोनी,जडेजा सारख्या खेळाडूंनी अधिक बॉल वाया घालवत बॉल आणि धावा यांचे गणित पार बिघडवून टाकले.धोनीच्या खराब निर्णयामुळेच आपण वेस्ट इंडिज आणि इंग्लंडकडून पराभूत झालो.

कर्णधाराचा खेळ हा संघातल्या सहका-यांचा उत्साह वाढवणारा हवा.1999 च्या विश्वचषकात स्टीव्ह वॉचे दक्षिण अफ्रिके विरुद्धचे जिगरबाज शतक, रिकी पॉंटीगची 2007 मधल्या फायनल मधील घणाणती खेळी एवढं काय तर 1983 मधील कपिल देवच्या अजरामर 175 धावा कोण विसरु शकेल.T-20 विश्वचषक दुस-यांदा जिंकण्यासाठी धोनीकडूनही अशाच एखाद्या अविस्मरणीय खेळीची आवश्यकता होती.मात्र जो फलंदाज बांगलादेश सारख्या दुबळ्या टिम विरुद्धही 21 बॉल मध्ये अवघ्या 26 धावा काढतो तो संघाला एकहाती विजय कसा मिळवूण देणार ? इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दहा ओव्हर्स धोनी मैदानात होता.तरही भारत मॅच जिंकू शकला नाही अथवा मॅचवर काही काळतरी वर्चस्व मिळवू शकला नाही.एका कर्णधारासाठी यापेक्षा नामुष्कीची बाब दुसरी काय असू शकते ?

मैदानाबाहेरचे हे त्याचे वागणे हल्ली पार बदललंय.मागील T-20 विश्वचषकानंतर 'मर्यादा पुरुषोत्तम ' असं त्याचं वर्णन काही जणांनी केलं होतं. सेहवागचं दुखापत प्रकरण त्यानं ज्या प्रकारे हाताळलं ते संशय वाढवणारेच आहे.द्रविड आणि गांगुलीला काही कारण नसताना एकदिवसीय संघातून त्याच्याच दबावामुळे वगळण्य़ात आले.हे आता ओपन सिक्रेट आहे.आपली दुखापत लपवून विश्वचषक खेळणा-या खेळाडूतही तो आहे.एवढचं काय तर पद्मश्री सारखा राष्ट्रीय पुरस्कार न स्विकारता शुटींग करणाराही हाच मर्यादा पुरुषोत्तम आहे.

2011 साली भारतीय उपखंडात 50 ओव्हर्सचा विश्वचषक होतोय.आडव्या बॅटने खेळून T-20 कपही जिंकता येत नाही.हे यंदा सिद्ध झालंय.आगामी विश्वचषकात भारताला मधल्या फळीत एक भरवशाचा फिनीशर हवा आहे.युवराज,रोहीत,रैनाच्या बरोबरीने खेळणारा सर्व फटक्यांची रेंज असणारा खेळाडू मधल्या फळीत फिट्ट बसू शकतो.दिनेश कार्तिक ने मागील काही स्पर्धेत याची झलक दाखवली आहे.एक यष्टीरक्षक म्हणूनही तो धोनी पेक्षा सरस आहे.2011 चा विश्वचषक जिंकायचा असेल तर काही धाडसी बदल हे करावेच लागतील. या बदलाची सुरवात धोनीला पर्याय कोण ? ह्या प्रश्नाच्या उत्तराने करण्यास हवी.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...