Tuesday, December 9, 2008

इलेक्ट्रॉनिक मिडिया नवे सॉफ्ट टार्गेट


महाराष्ट्रात कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट घडली तर त्याला गोष्टीला शरद पवारचं जवाबदार आहेत.असं म्हणायची पद्धत गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रचलित आहे.(याला वैतागून लातूरचा भूंकपही मीच घडवला असा आरोप करा असं शरद पवार एकदा म्हणाले होते) त्याच प्रमाणे देशातल्या कोणत्याही घटनेनंतर त्या घटनेची भीषणता वाढण्यास इलेक्ट्रॉनिक मिडियाचं जवाबदार आहे असा आरोप अशा प्रकारचा नवा ट्रेंड सर्वत्र (विशेषत: मुद्रीत माध्यमांमध्ये) प्रचलीत झालाय. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियावर वेगवेगळे आरोप करण्याची जणी स्पर्धाचं वाढलीय. ही स्पर्धा सध्या इतकी वाढलीय की हा हल्ला आपला टिआरपी वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडियानंचं घडवून आणला असा आरोप कोणी केला तर मला याचं आश्चर्य वाटणारं नाही.

सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मुंबईवरचा हा हल्ला एवढा भयानक असेल की याची कल्पना सुरवातीच्या काही तासात कोणालाचं आली नव्हती.अगदी इलेक्ट्रॉनिक मिडियाही त्याला अपवाद नाही.असं असतानाही ह्या हल्ल्ल्याच्या काळात कोणतीही चूकीची अथवा भीती पसरेल अशा प्रकारची बातमी जाणार नाही याची आंम्ही सारे जण काळजी घेत होतो.26/11 च्या रात्री सा-या बातम्या इतक्या वेगानं येऊन आदळंत होत्या की त्या कुठून येतायत हेही कळत नव्हतं.अशा परिस्थीतही देशात कोणत्याही प्रकारचा तणाव वाढेल अशी बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिली नाही.अशा भयानक परिस्थीतीमध्ये अत्यंत संयमानं वार्तांकन कराव याची जाणीव आंम्हा सर्व पत्रकारांना नक्कीच आहे.त्यामुळेच मृतदेह,सांडलेल्या रक्ताचा सडा,अथवा असाप्रकारचे बटबटीत अनेक दृश्य आमच्याकडं असूनही आंम्ही ती दाखवण्याचं टाळलं. तसंच यासंबधीची जी दृश्य दाखवली गेली त्यामधल्या बटबटीत आणि चित्त विचलीत करु शकतील अशी दृश्यांना ''ब्लर'' ही करण्यात आलं होत.

हेमंत करकरे आणि अन्य पोलीस अधिका-यांचा मृत्यू इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच झाला.अशी बातमी एका माझ्या आवडत्या वृत्तपत्राच्या संकेत स्थळावर मी वाचली होती. एकांगी विचाराचा हा अस्सल नमुना आहे.वास्ताविक ज्यावेळी सगळीकडून अंदाधुंद गोळीबार होत होता त्यावेळी टीव्ही बघायला या अधिका-यांना वेळ तरी होता का ? उलट खराब दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेचं या अधिका-यांचा मृत्यू झाला.ही वस्तुस्थीती सरकारसमोर मांडण्याचं काम इलेकट्रॉनिक माध्यमांनीचं सर्वप्रथम केलं.दुसरा आणखी एक फालतू मुद्दा म्हणजे की अतिरेक्यांना टीव्हीमुळे बाहेर काय चालले आहे याची खडा न् खडा माहिती मिळत होती.जणू काही तुमच्या वाहिन्यांवरच्या बातम्या बघूनच ते त्यांची रणनीती ठरवत होते. असा लोकांचा समज होता. पण या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, हे सर्व अतिरेकी अत्यंत तयारीने आले होते आणि आपल्याला काय करायचे आहे याचे पूर्ण भान त्यांना होते म्हणून ते मुंबईचे एवढे नुकसान करु शकले.ताज आणि ओबेरॉय मधील विद्युतप्रवाह आणि टीव्ही कनेक्शन त्वरीत बंद केले होते याची माहिती जनतेसमोर दडवण्यातचं अनेकजण धन्यता मानत आहेत.

उलट ह्या हल्ल्याची परिणामकारता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळेच तात्काळ सा-या जगभरात पोचली.हा हल्ला किती गंभीर आहे.ह्याची जाणीव देशातल्या नागरिकांना या बातम्यांमुळे तात्काळ झाली.त्यामुळेच या हल्ल्याच्या दुस-या दिवशी अनेक मुंबईकरांनी घराबाहेर जाणं टाळलं.त्यामुळे मुंबईच्या व्यवस्थेवर निर्माण होणारा ताण यामुळेचं टळला.या महत्वाच्या प्रसंगी राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता सर्वांपर्यंत पोचवण्याचं कामही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीच केलं. आर.आर.पाटलंच या हल्ल्याबाबतचं धक्कादायक विधान,विलासराव देशमुखांची ताज टूर याच माध्यमांमुळे जनतेपर्यंत पोचली. शिवराज पाटील सारख्या संवेदनशून्य नेत्याचे 'कपडे' काढण्याचं काम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीचं अनेक वेळा केलं आहे.

ह्या हल्ल्याच्या पाठिमागेही पाकिस्तानचं कनेक्शन आहे.ह्याची जाणीव अगदी पहिल्याच क्षणी सा-यांना झाली होती.तरीही ठोस पुरावा हाती आल्याशिवाय या प्रकरणात पाकिस्तानचं नावं घेणं इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी टाळंलं.ह्या नाजूक क्षणी कोणताही नवा तणाव निर्माण होणार नाही ह्याची काळजी सर्व माध्यमं घेत होती.एक याबाबत आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की इलेक्ट्रॉनिक मिडियात कोणतीही बातमी सांगताना ती बातमी सिद्ध करणारी VISUALS , BYTE असल्याशिवाय दाखवता येत नाही.बाप दाखव नाही तर श्राद्ध करं असा हा प्रकार असतो.उलट वृत्तपत्रामधल्या अनेक बातम्या ह्या टेबल न्यूज असतात हे अगजी उघड गूपीत आहे.कदाचित याच कारणामुळे इलेक्ट्रॉनिक मिडियाची सर्वसामान्य जनतेमधली विश्वासहर्ता जास्त आहे.(नेमक्या याच असूये पोटी इलेक्ट्रॉनिक मिडियाला वारंवार टार्गेट केलं जात नसेल ना ? )

युद्ध, दहशतवादी हल्ला अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये माध्यमांचं व्यवस्थापन कसं करावं याचं व्यवस्थापन या देशात अजूनही विकसीत झालेलं नाही.ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या कमांडो कारवाईची दृश्य दाखवली गेली नाही.कारण या ठिकाणी कारवाई करणा-या कमांडोमनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांना अशा प्रकारची सूचना केली होती.सर्वच माध्यमांनी ही सूचना पाळली.यापूर्वीही जम्मूमध्ये झालेल्या एका लष्करी ऑपरेशनमध्ये प्रसिद्धी माध्यमांना घटनास्थळाच्या दोन किलोमीटर आगोदरच थांबवण्यात आलं होतं.ह्या निर्णयालाही कोणत्यीच प्रतिनिधीनं विरोध केला नाही. अशा नाजूक प्रसंगी सरकारशी सहयोग आंम्ही नेहमीच केला आहे.मात्र सरकारी यंत्रणेमध्येच जर समन्वय नसेल तर या भोंगळ कारभारचं खापर इलेक्ट्रॉनिक मिडियावर फोडण्याचं काम सरकारकडून केलं जातं.

या देशात 24 तास काम करणा-या वृत्तवाहिन्याचं वय अवघी दहा वर्षे आहे. या अपु-या अनुभवामुळे या माध्यमांकडून कळत नकळत काही चूका झाल्या असतील.अशावेळी या चुका संमजसपणे निदर्शनास आणून देण्याचं काम या देशातल्या उज्जवल परंपरा असलेल्या वृत्तपत्रांनी करावं.या माध्यामातल्या पत्रकारांना हा वडीलकीचा नक्कीच अधिकार आहे.परंतु या पत्रकारांकडून सध्या उघड उघड भाऊबंदकी सुरु आहे. याच वृत्तपत्रांनी घालून दिलेल्या ट्रेंडच पालंन लबाड राजकारणी,बेजावबदार पोलीस अधिकारी किंवा निगरगट्ट प्रशासकही करु लागलेत.या सा-यांना इलेक्टॅनिक मिडियाच्या रुपानं एक नव स्फॉट टार्गेटचं सापडलंय.अशा प्रकारचा अंधाधुंद हल्ला आणखी किती काळ करायचा याचा विचार ज्यानं त्यानंच करायला हवा.

9 comments:

http://swapneelbapat.blogspot.com said...

hamam main sab nange hai, mere dost...........

SPORTS ZONE said...

ओंकार डंके यांनी मांडलेल्या विषयाशी मी पूर्णपणे सहमत आहे. किंबहुना अजून काही मुद्दयांची मी भर घालू इच्छितो. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अपरिपक्व लोकांनी कमांडोच्या कारवाईची थेट दृश्ये टीव्हीवरुन दाखवायला नको होती. त्यामुळे कमांडोच्या या कारवाईत अडचणी निर्माण झाल्याची “अफवा” काही वृत्तपत्रांनी पसरवली. थेट दृश्ये दाखवल्यानं या कारवाईत अडचणी निर्माण झाल्याचंही माझ्या वाचनात आलं. जेव्हा हे ऑपरेशन पूर्ण झालं आणि एनएसजीचे प्रमुख दत्ता यांनी नवी दिल्ली पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी सरकारच्या बेजबाबदारपणाची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली. दिल्लीहून कमांडोंना मुंबईत आणण्यासाठी अक्षम्य असा उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक विमान उपलब्ध असताना मालवाहू विमानातून कमांडोंना मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत आल्यावरही बेस्टच्या बसेसमधून दणके खात या कमांडोंना ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊस येथे नेण्यात आलं. वास्तविक एखाद्या व्हॉल्वो बसची व्यवस्था राज्य सरकारला करणं सहज शक्य होतं. हे सगळं सांगण्याचं कारण एकच ते म्हणजे दत्ता यांनी त्यांच्या संपूर्ण निवेदनात कमांडोंना ऑपरेशनदरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कव्हरेजमुळे अडथळा निर्माण झाला असं अवाक्षरही काढलं नाही. यात इलेक्ट्रॉनिक मीडियाचं यश आहे, असं मला वाटतं. याचाच अर्थ असा की सुरक्षा दलांच्या कारवाईच्या नावाखाली काही तास प्रसारण बंद ठेवण्याचा घाट हा सरकारनं स्वखुशीनं घातला होता. इलेक्ट्रॉनिक मीडियानं दाखवलेली दृश्ये एवढी परिणामकारक होती की त्याचा थेट परिणाम सरकारवर होऊ शकतो की काय या भीतीनं काही उच्चस्तरीय राजकारण्यांनी सुरक्षा दलांच्या नावाखाली प्रसारण बंद ठेवण्याचा विचित्र प्रकार केला. वास्तविक कमांडोंच्या कारवाईची थेट दृश्ये दाखवून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पराक्रम नेमका काय असतो हे दाखवून दिलंय. कमांडोंच्या कारवाईचं कितीही लिखीत वर्णन केलं तरी ते अपूर्णच राहणार आहे. कारण जे अवघ्या काही वेळाच्या दृश्यातून दाखवता येतं ते पु्स्तकभर लिहीलं तरी अपूर्णच वाटणार आहे. कमांडोंची कारवाई केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे सर्वप्रथम थेट घराघरांत गेली आहे. कशा विपरित परिस्थितीत आपली सुरक्षा दले काम करतात हे लोकांसमोर आलंय. कदाचित या दृश्यांमुळेच धोनी आणि अभिनव बिंद्रा यांची तुलना लोक कमांडोंच्या शौर्याशी करू लागले. जो जनप्रक्षोभ गेट वे ऑफ इंडिया येथे उसळला होता, तो देखील इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे शक्य झालं, असंच म्हणावं लागेल. कमांडोंच्या कारवाईत विशेषत: नरिमन हाऊसमधील कारवाईची थेट दृश्ये दाखवत असताना कमांडो कशा प्रकारे कारवाई करीत आहेत, याची माहिती अतिरेक्यांना टीव्हीवरुन दिसत होती, असंही काही पत्रपंडितांनी म्हटलंय. मला एक सांगावसं वाटतं की अतिशय उथळ असं हे वक्तव्य आहे. कारण मृत्यूची टांगती तलवार घोंघावत डोक्यावर असताना अतिरेकी टीव्ही पाहत बसतील, हे कोणालाही पटण्यासारखं नाही. बरं अतिरेक्यांचा आका जरी त्यांना सगळ्या कारवाईची सॅटेलाईट फोनमार्फत माहिती देत होता, असं म्हटलं तरी कितीही माहिती दिली तरी अतिरेकी वाचण्याची शक्यता अजिबात तेथे नव्हती. आणि अतिरेक्यांच्या म्होरक्या त्यांना सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून माहिती देत असला तरी सातत्यानं 60 तास हे ऑपरेशन सुरु होतं. पैकी 20 तास जरी हे अतिरेकी म्होरक्याच्या अर्थात पाकिस्तानच्या संपर्कात होते असं म्हटलं तरी त्यांना सॅटेलाईट फोनद्वारे त्यांना ट्रेस करण्याची मोठी संधी सुरक्षा दलांना मिळाली. याचा फायदा आता तपासात सुरक्षा यंत्रणांना होतोय. अतिरेक्यांना बोलण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियानं मजबूर केलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. अजून महत्वाचा मुद्दा असा की कमांडोंची नाव अनेक तरुणांनी केवळ ऐकलेली असतात. कमांडोंची कारवाई थेट दाखवून युवा मनामनांत एक धगधगणारी अंगार चेतवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडियानं केलंय. अनेक तरुणांना आता कमांडो, मरीन कमांडो बनण्याची उर्मी निर्माण झाली असेल, असं मी मानतो. कारण एखादा क्षण देखील आयुष्याची दिशा बदलवण्यासाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळं हल्ली केवळ पैशाच्या मागे लागलेली युवा पिढी संरक्षण दलांकडील आव्हानात्मक करिअर वळणार आहे. त्यांना पैशापेक्षाही अनेक बाबी आयुष्यात महत्वाच्या असतात, हे या घटनांमधून दिसणार आहे. त्यामुळे कुठल्याही दृष्टीकोनातून विचार केला तरी इलेक्ट्रॉनिक मीडियानं या ऑपरेशन टोरनॅडोच्या माध्यमातून देशाला खूप काही दिलंय....
राहुल रनाळकर

Ishita said...

इलेक्ट्रॉनिक मिडीयानं ज्या पद्धतीनं रिपोर्टींग केलं ते मलाही फारसं रुचलं नाही मे बी यापेक्षा शांत आणि मॅच्युरिटीनं हा प्रकार करता आला असता. मराठी न्यूज चॅनेल्स साठी हा प्रकार नवा असला तरीही हिंदी चॅनेल्सनी जरा सबुरनं घेतलं असतं तर ऑडियन्सवर आणखी चांगला इंपॅक्ट झाला असात. इलेकट्रॉनिक माधयमांचे प्लस आणि मायनस पॉंट्सही लक्षात घ्यायला हवेत. मात्र इलेक्ट्रॉनिक मिडीयामुले अनेक लोक शहीद झाले किंवा त्याचं खापर मिजडीयावर फोडणंहे अत्यंतिक चुकीचं आहे. त्यामुळे तू लिहीलंयस ते मला फार आवडलं. जाम खूश..

Ishita said...

इलेक्ट्रॉनिक मिडीयानं ज्या पद्धतीनं रिपोर्टींग केलं ते मलाही फारसं रुचलं नाही मे बी यापेक्षा शांत आणि मॅच्युरिटीनं हा प्रकार करता आला असता. मराठी न्यूज चॅनेल्स साठी हा प्रकार नवा असला तरीही हिंदी चॅनेल्सनी जरा सबुरनं घेतलं असतं तर ऑडियन्सवर आणखी चांगला इंपॅक्ट झाला असात. इलेकट्रॉनिक माधयमांचे प्लस आणि मायनस पॉंट्सही लक्षात घ्यायला हवेत. मात्र इलेक्ट्रॉनिक मिडीयामुले अनेक लोक शहीद झाले किंवा त्याचं खापर मिजडीयावर फोडणंहे अत्यंतिक चुकीचं आहे. त्यामुळे तू लिहीलंयस ते मला फार आवडलं. जाम खूश..

Niranjan Welankar said...

Good. But more critical analysis could have come. What about Aaj Tak which throws light on the news that Amitabh is sleeping with a gun instead of a news such as a huge demonstration is arranged against coca cola. More analysis and comprehensive description could have come, that is a matter of easy stroke for the blogger.. Good going.
Suggested issues - Long term impacts of heavy intrusion in India and ways to check it, How government can become more transperent with the media (RTI) etc. Issues with suggested practical remedies.

mayur said...

ओंकार आपण ज्या पद्घतीने इलेक्ट्रॉनिक मिडियावरील तथाकथित पत्रकारांचे आरोप परतावून लावले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. मी देखील आपल्याशी सहमत आहे. अनायसे योग आलाच आहे तर मी देखील काही सांगु इच्छितो, मुळात आरोप करणा-या पत्रकारांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे की घटनास्थळावरून थेट दिली जाणारी माहिती आणि घटना घडून गेल्यानंतर "असे केले असते तर असे झाले असते" असे सांगणारे उपदेशिक विवेचन यात खुप फरक आहे. मुळात टीका करणारेच या घटनाकाळात उत्सुकतेने टीव्ही संचासमोर बसले होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ओंकार बाकी आपण सर्व मुद्दे योग्यारित्या मांडले आहेत त्याबद्दल आपले पुन्हा अभिनंदन..

anilpaulkar said...

lekh changla aahe, pan electronic media til chuka hi dakhwayala hawyat.

शिनु said...

लेख चांगला जमला आहे. यातल्या एका मुद्याबद्दल मला सांगायचं आहे, कमांडो कारवाई थेट दाखवली नव्हती तर जी चित्रं दाखवली जात होती ती मुळात "थेट नव्हतीच" असं मध्यंतरी वाचनात आलं. मग त्यावर "लाईव्ह" असं का येत होतं?


बातमिच्या कव्हरेजबद्दल शंकाच नाही पण काही वाहिन्यांनी त्यात अतीरंजकता आणण्याच प्रयत्न केला. ज्या झुंडीनं मिडियावाले त्याठीकाणी होते ते भयानक होतं. मुळात मला पडलेला प्रश्न हा आहे की या सगळ्या कारवाईचं मिनिट टू मिनिट "लाईव्ह" दाखवणं खरोखरच गरजेचं होतं का? त्याऐवजी दर एक तासानं खास बुलेटिन दाखवता आलं नसतं का? काही वाहिन्यांनी संयम बाळगला आणि बर्याच वाहिन्यांनी ढण ढणाट केला. कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच पत्रकार केवळ इसी चॆनेल पर पहली बार च्या व्यावसायिक स्पर्धेपायी ताजकडे धावले. अजूनही जवानांनी "पोझीशन" घेतलेल्या असताना त्यांच्यावरूनही केमेरा पॆन केला. हे सगळं निव्वळ माहिती देण्याच्या उद्देशानं झालं कां? थोडी सबुरी बाळगायला हवी होतीच असं मला वाटतं.

Gireesh Mandhale said...

Good view. But the electronic media should not have shown the LIVE and minute by minute coverage of what is going on around the attacked places in Mumbai. You just can't ignore that terrorists were having satellite phones, internet so they could easily have watched these news channels though they were fully trained. Two things I have observed during those three days that none of the place under attack was immediately sealed and only concerned ones are allowed in the premises. Other one is, in those three days media have not shown ANY OTHER NEWS than the Mumbai attack except the one of death of former PM V.P.Singh. This is strange, I mean, then what about the other exaggerated news being shown on this media?

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...