Wednesday, March 27, 2013

झाला चमत्कार तरी...



कधीही कल्पना केली नाही अशा गोष्टी घडल्या की जगात चमत्कार होतात ही समजूत खरी आहे असेच मानावे लागते. आता बघा ना नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज संपलीय. भारत चक्क 4-0 ने विजयी झालाय. 1982 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 0-3 अशा फरकानं पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच इतका मोठा पराभव आहे. 1994 मध्ये श्रीलंकेला 3-0 अशी धूळ चारल्यानंतर भारताने पहिल्यांदाच  मोठ्या सीरिजमध्ये निर्भेळ यश मिळवलंय. या आकडेवारीपेक्षा चमत्कारीक गोष्टी पुढे आहेत. पहिला चमत्कार (सर ) रवींद्र जडेजा मायकल क्लार्कला 6 पैकी 5 वेळेस आऊट करतो. दुसरा चमत्कार मुरली विजय ऑस्ट्रेलियन बॉलर्सना सलग दोन टेस्टमध्ये एक संपूर्ण दिवस आऊट होत नाही. तिसरा चमत्कार पहिल्याच टेस्टमध्ये फास्टेट सेंच्युरीचा विक्रम शिखर धवनच्या नावावर होतो. चौथा चमत्कार  चार पैकी तीन टेस्ट भारत पाचपेक्षा कमी दिवसांत जिंकतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सलग चार टेस्ट पराभूत झाल्यानंतरआणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध मायदेशीही आपण सीरिज गमावली. तरीही या सीरिजमध्ये दुबळ्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आपले पारडे जड होते. पण प्रत्येक दुबळ्या टीमशी त्यांच्या लेव्हलवर जाऊन खेळण्याचा आपला लौकीक लक्षात घेता ही सीरिज भारताने 4-0 ने जिंकणे हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही.  भारतीय क्रिकेट विश्वात अशा प्रकारच्या आश्चर्यकारक घडामोडी घडत असल्यानंच  मी माझा आगोदर रेंगाळलेला सीरिजमधला तिसरा ब्लॉग आणखी  पुढं ढकलून क्रिकेटवर लिहण्याचा मोह आवरु शकलो नाही.

                                या सीरिजची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. चेन्नईत धोनी टॉस हरला. ऑस्ट्रेलियाचा 5 आऊट 153 असा स्कोअर असताना क्लार्क- हेन्रिक्समध्ये दिड शतकी भागिदारी झाली. क्लार्कने आपला फॉर्म कायम ठेवत शतक झळकावलं. पहिलीच टेस्ट खेळणा-या हेन्रिक्सचा उत्साह वाढेल ही नैतिक जबाबदारी भारतीय बॉलर्सनं नेटानं पूर्ण केली.त्यानंतर 380 चा पाठलाग करताना वीरु 'सेहवाग'सारखाच खेळला. मुरली विजयच्या बॅट आणि पॅडमध्ये त्या दिवशी इतका गॅप होता की त्यामधून राम कपूरसुद्धा चालत जाऊ शकला असता. दोन्ही ओपनर्स पॅव्हिलियनमध्ये परत. भारत 2 आऊट 12

                              त्यानंतर या सीरिजमध्ये रंग भरायला सुरुवात झाली. विकेटची नशा चढलेल्या जेम्स पॅटिन्सनच्या पहिल्या तीन ब़ॉल्सवर तीन चौकार खेचत सचिननं जुन्या आठवणी ताज्या केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि चेन्नईच्या मैदानात सचिनचा रेकॉर्ड नेहमीच बहरदार राहिलाय.  सचिननं आपल्या जुन्या आठवणी जाग्या करत चार्ज आपल्याकडं घेतला. सचिननं 81 रन्स काढले. शतकाकंडं डोळे लावून बसलेल्या कोट्यावधी चाहत्यांची पून्हा निराशा झाली. टीम इंडियाला त्याची सर्वाधिक गरज असताना तो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर टीम  अडचणीत सापडली.

     सचिन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या  धोनीची मागील काही टेस्टमधील कामगिरी यांची आम्हाला लाज वाटते या प्रकारातली होती. तो सहाव्या क्रमांकावर मैदानात आला. सचिनप्रमाणेच धोनीचेही चेन्नईशी चांगलंच नातं जमलंय. तो चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन आहेच. घरच्या मैदानावर चेन्नईची टीम पराभूत होणार नाही याची खबरदारी त्यानं नेहमीच घेतलीय. शिवाय चेन्नई सुपर किग्जची मालकी ज्यांच्याकडे आहे त्या इंडिया सिमेंट कंपनीचा तो ही सीरिज सुरु होण्याच्या आठवडाभर आधीच उपाध्यक्ष झालाय. ( इंडिया सिमेंट ही कंपनी बीसीसीआय अध्यक्ष आणि धोनीचे गॉडफादार एन. श्रीनिवासन यांच्या मालकीची आहे. त्यांच्याच आशिर्वादानं   परदेशात सलग 8 टेस्ट हरुनही धोनीची कॅप्टनसी शाबूत राहीली)

 सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेला धोनी मैदानावर आला त्यावेळी मॅचचं पारडं ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं होतं. पण क्रिकेटमधला आपला जुना 'धोनीपछाड' अवतार धारण करण्यासाठी त्यानं चेन्नई टेस्टचाच मुहूर्त निवडला. ऑस्ट्रेलियन बॉलिंगच्या सर्व मर्यादा त्यानं उघड्या पाडल्या. पॅटीन्सन, स्टार्क यांना यॉर्कर टाकण्यात अपयश येत असल्यानं त्यांचे बॉल्स फुलटॉस येत होते. अशा फुलटॉस बॉल्सनं त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले. क्लार्कनी सतत बॉलर्स बदलले. प्रत्येक बॉलर्सचं स्वागत त्यानं चौकारांच्या आतषबाजीनं केलं. क्लार्कनं नवा बॉल घेतला. नव्या बॉलनं टाकलेल्या पहिल्या सात ओव्हर्समध्ये भारतानं 54 रन्स काढले. कोहली आऊट झाला. भारत अजूनही 56 रन्सने पिछाडीवर होता. पण धोनीच्या मनातला संयम आणि बॅटींगमधला आक्रमकपणा कमी झाला नाही. टी टाईमनंतर लगेच त्यानं शतक पूर्ण केलं. शतकानंतर त्याच्या बॅटीचे चटके ऑस्ट्रेलियन्सना असे काही बसले की त्यापूढे चेन्नईचा उन्हाळाही त्यांना शितल वाटला असेल. भुवनेश्वरकुमारसोबत 10 व्या विकेटसाठी त्यानं केलेली शतकी भागिदारी अखेर निर्णायक ठरली. धोनीनं 224 रन्स काढले. कोणत्याही भारतीय टेस्ट कॅप्टनचा हा सर्वोच्च स्कोअर आहे. सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकर आणि मन्सूर अली पतौडी ते राहुल द्रविड या महान बॅट्समन कॅप्टन्सना मागे टाकात धोनीनं हे शिखर गाठलं. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियन टीमला बॅकफूटवर ढकलणारी एक लाजवाब इनिंग सचिन चेन्नईमध्ये खेळला होता.सचिनच्या त्या अजरामर इनिंगची आठवण धोनीच्या या खेळीनं झाली. संपू्र्ण सीरिजचा कौल त्याच्या 224 रन्सने निश्चित झाला. त्यामुळे कब तक धोनी ? असा प्रश्न विचारणा-या मलाही फिर दिल दो धोनी को ! असे ट्विट आनंदाने करावे लागले.

   कॅप्टन भरात असेल तर संपूर्ण टीमच्या मनोधौर्यात सकारात्मक फरक पडतोच. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, (सर) रवींद्र जडेजा भुवनेश्वरकुमार आणि मोहाली टेस्टमध्ये शिखर धवन या टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं या सीरिजमध्ये कमाल केली.सचिन भरात नव्हता. सेहवागची बोंब कायम होती. गंभीरला तर घेतलेच नव्हते. सचिन, सेहवाग, गंभीर आणि निवृत्त झालेले द्रविड, लक्ष्मण यांच्याशिवायही भारत सीरिज 4-0 ने जिंकू शकतो हे या विजय, पुजारा,अश्विन, (सर) जडेजा,  धवन आणि भुवनेश्वरकुमारनं दाखवून दिलं. या सीरिजमध्ये सर्वात चमत्कारीक बदल कुणात झाला असेल तर तो मुरली विजयमध्ये. चेन्नईच्या या शोबाज बॅट्समननं या सीरिजची सुरुवात 10 आणि 6 अशी अगदी टीपिकल केली. पण नंतरच्या 5 इनिंगमध्ये त्याचा स्कोअर होता 167, 153, 26, 57 आणि 11. त्यानं 61.42 च्या सरासरीनं या सीरिजमध्ये सर्वात जास्त 430 रन्स केले. सीरिजमध्ये 2 सेंच्युरी झळकवणारा तो एकमेव बॅट्समन होता.  टीपिकल शोबाज , आळशी बॅट्समन असलेला विजय या सीरिजमध्ये संयमी झाला. हैदराबादमध्ये पुजारासोबत 370 आणि मोहालीत धवनबरोबर 289 अशा दोन मोठ्या पार्टनरशिपमधला तो सामाईक घटक होता. टी-20 च्या दूधावरच बहरलेल्या विजयनं या दोन्ही पार्टनरशिपमध्ये दुय्यम भूमिका शांतपणे बजावली. त्याहीपेक्षा महत्तवाचे म्हणजे दोन टेस्टमध्ये तो संपूर्ण दिवस आऊट झाला नाही. खराब सुरुवातीनंतर हकालपट्टीच्या टकमक टोकावरुन त्यानं केलेला हा खेळ नक्कीच अवघड असा आहे. त्याला एकदाही 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळाला नसेल पण त्यानं रचलेल्या भक्कम पायावरच ही 4-0 ची ऐतिहासिक इमारत टीम इंडियाला उभी करता आलीय.

      चेतेश्वर पुजारा नंबर 3 वर अगदी राहुल द्रविडनं लावून दिल्यासारखा चिकटलाय. इंग्लंड विरुद्धच्या पडझडीतही त्यानं किल्ला लढवला होता. हैदरबाद टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावत त्यानं आपल्या मोठ्या इनिंगचं सातत्य जपलं. कोटालाच्या नासक्या खेळपट्टीवर चौथ्या डावात  पाठलाग करताना काढलेले 82 रन्स त्याच्या क्लासचं दर्शन देतात.आता दक्षिण आफ्रिकेतल्या फास्ट पीचवर त्याची खरी कसोटी असेल. शिखर धवनला नशिबानं केवळ एकच संधी या सीरिजमध्ये दिली.त्या संधीचं त्यानं सोनं केलं. त्याच्या रावडी अवतारापढे ऑस्ट्रेलियन्स अगदीच बापूडे वाटत होते. त्याचे प्लेसमेंट अप्रतिम होते. आईच्या पोटातून शिकून आल्याप्रमाणे तो गॅप शोधत होता.त्याच्या बॅक फूट ड्राइव्हचा रिकी पॉन्टिंगलाही अभिमान वाटला असेल. कोणतीही रिस्क न घेता कांगारुंची कशी धुलाई करता येते हे हशीम अमलानं पर्थ टेस्टमध्ये 87 बॉल्समध्ये सेंच्युरी ठोकत दाखवून दिलं होतं. धवननं अमलाचाच कित्ता गिरवला. शिवाय आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकताना त्याला अमलापेक्षा 2 बॉल्स देखील कमी लागले.

   
  सीरिजमध्ये ख-या अर्थानं कुणी कमाल केली असेल तर (सर) रवींद्र जडेजानं.  त्यानं  मायकल क्लार्कला 6 पैकी 5 वेळा आऊट केलं. ( रावडी राठोडमधला डायलॉग क्लार्कच्या भाषेत सांगायचा झाला तर मै जब बॅटिंग करता हूं तब आऊट होता हूं. और जब रवींद्र जडेजा बॉलिंग करता है तब मै डेफिनेटली आऊट होता हूं, असं काहीसं क्लार्कला म्हणावे लागेल ). एकेकाळी प्रचंड डोक्यावर चढवलेल्या या बॉलिंग ऑलराऊंडरनं  सीरिजध्ये आपली उपयुक्तता दाखवलीय. त्यानं 4 टेस्टमध्ये 25 विकेट्स घेतल्या. त्यात त्याचा इकॉऩमी रेट, सरासरी आणि स्ट्राईक रेट हा अन्य कोणत्याही बॉलर्सपेक्षा चांगला आहे. त्यानं मोहालीमध्ये निर्णायक क्षणी फटकेबाजी करत डर के आगे (सर) रवींद्र जडेजा है ! हे दाखवून दिलं. या सीरिजमध्ये पहिल्यांदा टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये पिछाडीवर पडणार अशी परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली होती. त्यावेळी श्री श्री रवींद्र जडेजा पुन्हा एकदा बॅटच्या साह्यानं धावून आले. त्यांची टेस्टमधली ट्रिपल सेंच्युरी 257 रन्सने हुकली. पण आपल्या भक्तांना खूश करण्याचे आणि टीमला 10 रन्सची आघाडी मिळवून देण्याचं काम त्यांनी पार पडालं. त्यांच्या भक्तांचा वाढता संप्रदाय आता थेट रजनी फॅन्सशी स्पर्धा करणारा आहे.  हे मी  या ब्लॉगवर लावलेल्या त्यांच्या एका छायाचित्रावरुन स्पष्ट होतेच. याशिवाय मॅन ऑफ द सीरिज आर. अश्विननं घेतलेल्या 29  विकेट्स आणि भुवनेश्वर कुमारचे दोन स्पेल या सीरिजच्या आणखी काही गोड आठवणी आहेत.


        भारताच्या विजयापेक्षा कांगारुंचा कडेलोट हा या सीरिजमधला मोठा विषय आहे. हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, हसी हे बडे बॅट्समन आता पडद्याआड गेलेत. वॉर्न, मॅग्रा,यांनीही निवृत्ती स्वीकारलीय. मागच्या अडीच दशकातली.ऑस्ट्रेलियाची सर्वात कमजोर टीम यंदा भारत दौ-यावर आली होती. त्यातचं त्यांचे क्लार्क, वॉर्नर, वॉटसन, वॅड, पॅटीसन्सन हे महत्वाचे खेळाडू 100 टक्के फिट नव्हते. कांगारुंनाही सर्व सहानभूती देऊनही 0-4 अशा पद्धतीनं त्यांचा पराभव होणं हे नक्कीच क्षम्य नाहीय.

   ऑस्ट्रेलियाचं गोल्डन जनरेशन आता समाप्त झालंय. पॉन्टिंग, हसी किंवा क्लार्कसारखे बॅट्समन आता भविष्यात मिळणं अवघड आहे, असं इयान चॅपेल या खडूस ऑस्ट्रेलियननंही मान्य केलंय.मायकल क्लार्कच्या टीमनं या दौ-यात सुरुवात चांगली केली. चेन्नई टेस्टमध्ये जवळपास अडीच दिवस ते भारताच्या बरोबरीनं खेळत होते. पण नंतर धोनीच्या धूमधडाक्यापुढे ते साफ गडबडले. चेन्नईत चित झाल्यानंतर हैदरबाद, मोहाली आणि दिल्ली प्रत्येक टेस्टमध्ये त्यांची कामगिरी उतरंडीला लागली. गरिबांचा वीरेंद्र सेहवाग म्हणून ओळखला जाणारा डेव्हिड वॉर्नर हा संपूर्ण सीरिजमध्ये आपल्या दिल्ली डेयर डेव्हिल्सच्या साथीदारा प्रमाणे खेळला. इडि कोवनं मैदानावर वेळ भरपूर घालवला. पण त्याला रन्स काही करता आले नाहीत. फिल ह्युजेसला भारतीय स्पिनर्सनी वारंवार मामू बनवलं. मॅथ्यू वेड आणि ब्रॅड हॅडिन ह्या दोन्ही विकेटकिपर्सना इयान हिली किंवा अॅडम गिलख्रिस्टच्या 25 टक्के ही सर नाही. मात्र ऑस्ट्रेलियन बॅटिंगमध्ये सर्वात मोठा अपयशी मासा असेल तर तो शेन वॉटसन.

         
भारतीय दौ-याचा अनुभव असलेला आणि भारतीय पिचवर चांगला रेकॉर्ड असलेला शेन वॉटसन हा कांगारुंचा खर तर ट्रम्प कार्ड. मात्र हे कार्ड संपूर्ण फेल गेलं. त्यानं या संपूर्ण सीरिजमध्ये खेळले 239 बॉल्स. तर नॅथन लिओन या कांगारुंच्या 11 व्या क्रमांकाच्या बॅट्समननं 244 बॉल्स भारतीय बॅट्समनचा सामना केला. कोटालचं पिच बॅटिंगला लायक नाही, असं कारण कॅप्टन वॉटसन देत होता. मात्र त्याच खराब पिचवर पीटर सीडलनं 7 व्या क्रमांकावर येऊन दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. मिचेल स्टार्कनं मोहालीमध्ये 99 रन्स काढले. दुस-या  इनिंगमध्ये पुन्हा एकदा झुंजार 35 रन्स करत भारताला विजयापासून दूर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चौथ्या क्रमांकावर येणा-या वॉटसनला अशी एकही इनिंग या सीरिजमध्ये खेळता आली नाही. ऑस्ट्रे्लियन टीमचा उपकर्णधार असलेल्या वॉटसननं मागच्या दोन वर्षात 14 टेस्टमध्ये अवघ्या 24.11 च्या सरासरीनं 627 रन्स केलेत. त्यात तो हल्ली बॉलिंगही करत नाही.त्यामुळे केवळ टॉप ऑर्डर बॅट्समन म्हणून तो आता टीममध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. असं असूनही त्याला टीममध्ये सतत खेळवलं जातं. याच कारण कांगारुंच्या बॅटिंगमध्ये संपत आलेली धार हे आहे. मागच्या वर्षभरात ऑस्ट्रेलियानं खेळलेल्या 13 टेस्टमध्ये मायकल क्लार्कनं चार सेंच्युरी झळकावल्या आहेत. आता रिटायर झालेल्या हसीच्या नावावर आहेत 3 सेंच्युरी. पॉन्टिंग स्कूलच्या या दोन बॅट्समनशिवाय केवळ 4 सेंच्युरी सध्याच्या ऑस्ट्रेलियन बॅट्समनच्या नावावर आहेत. यात मॅथ्यू  वेड 2 तर डेव्हिड वॉर्नर आणि इडी कोवेन प्रत्येकी 1 सेंच्युरीचा समावेश आहे. पॉन्टिंग आणि हसी एकाच काळात रिटायर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा सर्व बोजा एकट्या मायकल क्लार्कवर पडलाय. क्लार्कच्या खांद्यांना हा बोजा सहन करणे अवघड आहे.

         मायकल क्लार्क ही एक विकेट मिळाली की निम्मे काम झाले हे भारतीय बॉलर्सना माहिती होते. त्यानं चेन्नईत सेंच्युरी झळकावली. हैदराबादमध्ये 93 रन्स काढले. पण नंतर दुखापतीमध्ये क्लार्क ढेपाळला. दिल्लीमध्ये तो खेळू शकला नाही आणि कांगारुंची फक्त 3 दिवसात शिकार झाली. त्याची कॅप्टनसीही साधारणच होती. चेन्नईत रंगात आलेल्या पॅटीन्सनला त्यानं 3 ओव्हर्सनंतर काढले. हैदराबाद टेस्टमध्ये नॅथन लिओनला न खेळण्याचा अजब निर्णय घेणा-या टीम मॅनेजमेंटचा तो निर्णायक सदस्य होता. त्याच टेस्टमध्ये त्यानं पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 9 आऊट झाल्यानंतर  डाव घोषीत करण्याचा अतीधाडसी असा निर्णय घेतला. शेन वॉटसनबरोबरचे त्याचे शीतयुद्ध चव्हाट्यावर आले. मोहाली टेस्टपूर्वी झालेली 4 खेळाडूंची हकालपट्टी तो टाळू शकला नाही.  बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग या एक से बढकर एक खेळाडूंचा वापसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी क्लार्कला अजून बरेच अवघड पेपर सोडवावे लागणार आहेत.

ऑस्ट्रेलियाची बॉलिंगही फुसका बार ठरली. गेल्या वर्षी याच काळात युएईमध्ये पाकिस्तान विरुद्ध रंगात असलेला मिचेल स्टार्क संपूर्ण सीरिजमध्ये निस्तेज ठरला. जेम्स पॅटीन्सननं चेन्नईत चांगली सुरुवात केली. पण फास्ट बॉलिंगला सर्वाधिक मदत करणा-या मोहाली टेस्टमध्ये शिस्तभंगाच्या नावाखाली त्याला बाहेर बसावे लागले. पीटर सीडिल आणि नॅथन लेऑननी अधनंमधनं चमक दाखवली, पण मॅच विनिंग कामगिरी त्यांना करता आली नाही. काही चमकदार स्पेल वगळता त्या दोघांचा भारतीय बॉलर्सनी सपशेल समाचार घेतला. डोहार्टी आणि मुंबई इंडियन्सचा  मिलियन डॉलर बेबी मॅक्सवेलची तर भारतीय बॅट्समन्सना अडचणीत आणण्याची कुवतचं नव्हती. तर  ज्याचे फक्त पायच वळतात अशा स्टीव्हन स्मिथ या आणखी एका लेगस्पिनरला ऑस्ट्रेलियानं खेळवलं, ( मोहालीमध्ये त्यानं टाकलेल्या एकमेव लेगब्रेकवर त्या सचिनची विकेट मिळाली , असते एकाकेकाचे नशीब ! )


      आता भारतीय टीमनं या न भूतो अशा मिळवलेल्या यशानं फार वाहवतं जायची गरज नाहीय. अजूनही बरेच प्रश्न तसेच कायम आहेत. पहिला प्रश्न सचिन तेंडुलकर. चेन्नईत त्यानं सुरुवात तर झोकात केली.  दुस-या इनिंगमध्ये तर तो इतक्या जोमात होता की 50 रन्सचा पाठलाग करताना सेंच्युरी झळकावण्याचा नवा रेकॉर्ड त्याच्या नावावर होईल असा एक विचार माझ्या मनात आला. पण नंतर पुन्हा त्याचं ये रे माझ्या मागल्या सुरु झालं. आता दोन वर्ष उलटली तरी त्याची टेस्टमध्ये सेंच्युरी झालेली नाही. वय वाढतं. रिफ्लेक्शन कमी होतायत. तरी मनोजकुमारचं गाणं तो  मै ना छोडूंगा , सालो साल खेलूंगा या नव्या शब्दासह तो गात खेळतोय. मुरली विजय, शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांची खरी कसोटी परदेशातल्या फास्ट पिचवर होईल. या सीरिजमध्ये  चांगल्या सुरुवातीचा मोठा फायदा उचलण्यात मोहाली आणि हैदराबादमध्ये भारताला अपयश आलं. आर. अश्विन अचानक निष्प्रभ वाटू लागतो. झहीरचा वारसदार अजूनही सापडलेला नाही.

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेला हा ऐतिहासीक विजय हा दोन अतिआक्रमक इनिंग ( चेन्नईत धोनी आणि मोहालीत शिखर धवन ) आणि स्पिन फ्रेंडली पिचची कमाल आहे असंच वाटू लागतं. दक्षिण आफ्रिकेत अमला, स्मीथ डि व्हिलीयर्स, ड्यूप्लेली हे बॅट्समन, स्टेन, मोर्केल आणि फिनलॅँडर हे आग ओकणारे बॉलर्स, जॅक कॅलीस हा सर्वकालीन महान ऑलराऊंडर आणि भारतीय प्लेयर्सच्या कुंडल्या पाठ असलेला कोच गॅरी कस्टर्न समोर पुन्हा एकदा 4-0 चा निकाल 0-4 मध्ये बदलण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्सनं यंदा चमत्कार झाला म्हणून तो नेहमी नेहमी होईल अशी भाबडी आशा ठेवू नये.            
                              

4 comments:

Niranjan Welankar said...

सर ओंकार. . . अद्भुत. . . झक्कास. . . चाबूक. . . अपूर्व. .. शब्दातीत. . . नॉट आउट 501* टेस्टमध्ये ब्लॉग झाला आहे!!!! फक्त आदरणीय हिझ एक्सेलन्सी श्री श्रींना तुम्ही कंसात सर म्हंटलं ते खटकलं. . . :) झकास वर्णन आहे. सर्वच. ऑस्ट्रेलिया संकटात आहेच. पण भारतही दक्षिण आफ्रिकेबद्दल धोक्यात आहेच. सचिनचं गाणं अगदी सटीक वाटलं. . . धोनी कंपनीचा उपाध्यक्ष होतो. धोनी हा खरा मॅन बिहाईंड सक्सेस आहे. . . निव्वळ भन्नाट. . .

Unknown said...

या विषयावर आतापर्यंत वाचलेल्या लेखांपैकी सर्वोत्तम लेख. तुमचे क्रिकेटवरील अन्य लेखही छान आहेत. एखाद्या वृत्तपत्राला पाठवा नक्की छापतील.

हेरंब said...

दुबळी टीम असो की चांगली असो, कांगारूंना लोळवण्यात एक असुरी आनंद आहे ज्याची तुलना फक्त आणि फक्त पाकड्यांना हरवण्याशीच होऊ शकते !!

ओंकार संझगिरी, नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख ! ;)

Niranjan Welankar said...

परत वाचला.... खूप खूप फ्रेश वाटतोय हा लेख अजून......

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...