Showing posts with label Ramayana. Show all posts
Showing posts with label Ramayana. Show all posts

Friday, August 7, 2020

राम मंदिर : भयावरील विजयाचा उत्सव

नव्या पर्वाची सुरुवात


स्वतंत्र भारताच्या इतिहासात पाच ऑगस्ट ही तारीख भयावर विजय मिळवणारा दिवस म्हणून लिहिली गेली आहे. भारताने एक देश म्हणून दोन घटना सलग दोन वर्ष या दिवशी दुरुस्त केल्यात. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणारे कलम 370 रद्द करणारे विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यानंतर बरोबर वर्षभरानी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातील दोन विषयांची पूर्तता इतकेच या घटनांचे महत्व नाही. सामान्य भारतीयांसमोर भयाचा बागूलबुवा उभा करुन वर्षानुवर्षे ज्या दोन गोष्टी प्रस्थापित व्यवस्थेने होऊ दिल्या नाहीतत्या दोन गोष्टी या दिवशी घडल्या. त्यापैकी अयोध्येतील जन्मभूमीच्या स्थानी श्रीराम मंदिराच्या पुन्हा एकदा निर्मितीसाठी तर तब्बल पाच शतकांची प्रतीक्षा या देशाने केली आहे. 

'मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे?' या प्रश्नाच्या उत्तरातील सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे मनुष्याने जगण्यासाठी स्वत:ची संस्कृती उभी केली. ती संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून जतन केली. त्या संस्कृतीमधील वैभवशाली वारसाचा, परंपरांचा आणि इतिहासाचा अभिमान ही मनुष्याला एकमेकांशी घट्ट बांधणारा मुख्य घटक आहे. 

सततच्या आक्रमणामुळे जगभरात ज्यू विखुरले होते, इस्रायलच्या निर्मितीवेळी ज्यू धर्माच्या गौरवशाली इतिहासाने त्यांना एकत्र आणले. ज्यू लोकांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे अक्षरश: राखेतून इस्रायल हा विजिगीषू देश उभा केला. फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्समध्ये एक समान भाषा नव्हती. वेगवेगळे गट अस्तित्वात होते. या सर्वांना जोडणारा फ्रेंच संस्कृती हा एक धागा होता. फ्रेंच संस्कृतीच्या धाग्याने परस्परांशी जोडल्या गेलेल्या या समाजाने फक्त युरोप खंडावर नाही तर संपूर्ण जगावर परिणाम करणारी फ्रेंच राज्यक्रांती केली.   

भारतामधील हिंदू संस्कृतीमधील आदर्श पुरुष म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. भारतीयांसाठी विष्णूचा सातवा अवतार इतकेच श्रीरामाचे महत्व नाही. राम हा एक आदर्श राजा आहे. 'राम राज्य' ही भारतीय संस्कृतीमधील सर्वात आदर्श राज्यपद्धती आहे. श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने काँग्रेसी, डावे, नास्तिक, शाळावाले, हॉस्पिटलवाले आणि हल्ली नव्याने तयार झालेले चायनीज व्हायरसचे काळजीवाहू अशा मंडळींपैकी अनेकांनी भूमीपूजनाची पोटदुखी सहन होत नसतानाही रामाचे मोठेपण आणि रामराज्याची आठवण करुन देत देशातील बहुसंख्य सश्रद्ध हिंदूंना उपदेशाचे डोस पाजले आहेत. 

भारतामध्ये पाचशे वर्षांपूर्वी एक परकीय, धर्मांध आणि जुलमी राजा येतो आणि भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले रामजन्मभूी स्थानावरील मंदीर पाडतो. तो धर्मांध राजा आणि त्यानंतर दिल्लीच्या गादीवर बसलेले त्याचे वंशज परकीय होते. त्यानंतर सत्तेवर आलेले ब्रिटीशही परकीय होते. ब्रिटीश भारतामधून निघून गेल्यानंतरही ७२ वर्षे 'अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराम मंदिर उभं करण्याचा प्रश्न प्रलंबित असतो. हे मंदिर उभं राहू नये म्हणून भारतामधला एक वर्ग अगदी वाट्टेल ते डावपेच आखतो. ही परकीय व्यक्तीसाठी आश्चर्यकारक आणि भारतीयांसाठी शरमेची बाब आहे.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारला म्हणजेच दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी श्रीराम मंदिराची उभारणी ही एक सहज साध्य गोष्ट होती. गुजरातमधील सोरटी सोमनाथाच्या मंदिराची निर्मिती सरकारच्याच माध्यमातून झाली. नेहरु सरकारने सोमनाथ प्रमाणेच अयोध्या, काशी आणि मथुरामधील मंदिरांची निर्मिती करायला हवी होती. तसे झाले असते तर, देशातील हिंदुत्ववादी संघटनांचा एक खूप मोठा मुद्दा काँग्रेस पक्षाने सुरु होण्यापूर्वीच संपवला असता. रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून संघ परिवार, भाजपा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी संघटनांचा देशभर विस्तार झाला. त्यांनी देशभरात आपल्या संघटना भक्कम केल्या. त्याच संघटनात्मक शक्तीच्या जोरावर आज नरेंद्र मोदी हा 'कट्टर हिंदू' देशाचा पंतप्रधान आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सत्ता मिळालीय, असा दावा अनेक मंडळी वारंवार करतात. थोडक्यात काँग्रेसने वेळीच हालचाल केली असती तर 1990 नंतर बदललेल्या इतिहासाची आज काही मंडळींना लाज वाटते, तो इतिहास घडलाच नसता.

मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे देशातील स्व प्रमाणित 'विवेकाचा आवाज' 'अंधाराची काजळी भेदणारे' 'पुरोगामी' 'समतावादी' 'मानवतावादी' 'एनजीओवादी ( मी इथे पुढचा शब्द नक्षलवादी हा शब्द वापरणार नाही, कुणाला तो आठवला तर ते तो योगायोग समजावा. मी कुणाचेही विचार नियंत्रित करु शकत नाही. विचार नियंत्रित करण्यावर माझा विश्वासही नाही)  मंडळींवर  'बिच्चारे दिवस' आलेच नसते.

प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. या वनवासातही त्यांना अनेक अडचणी आल्या. श्रीरामानांही कष्ट चुकलेले नाहीत,ति राम मंदिर सहज साध्य कसे असेल ? या भावनेतून हिंदूंनी गेली 500 वर्षे  प्रतीक्षा केली आहे. गेली 30 वर्ष यासाठी तीव्र लढा दिला. या लढ्यात अनेक हुतात्मा झाले. मंदिर स्थापना करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात नाही तर भारतात हिंदूंना कारसेवा करावी लागली. बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह सरकारने या कारसेवकांवर गोळीबार केला. त्यानंतर काही वर्षांनी गुजरातमधल्या गोध्रामध्ये कारसेवकांनी भरलेला रेल्वेचा डबा बाहेरच्या जमावाने पेटून दिला. देशातल्या हिंदूंना डिवचण्यासोबतच मुस्लिमांना गोंजारत त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम गेल्या ३० वर्षात केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारने केले.

सत्तेत असलेल्या पक्षांची रामभक्तांवर दडपशाही सुरु असताना राजकीय सत्तेपासून कोसो दूर असलेल्या डाव्या संघटनांनी स्वातंत्र्यानंतर एक नवी 'इको सिस्टिम' तयार केली.या वर्गाने श्रीरामाच्या अस्तित्वावर, भारतीय संस्कृतीशी, अयोध्येशी श्रीरामाच्या असलेल्या संबंधांवर सातत्याने खोट्या प्रमेयाद्वांरे प्रश्न निर्माण केले. हिंदूच्या विचारपद्धतीत संभ्रम निर्माण केला. हिंदू समाज हा जगाच्या प्रारंभापासून सहिष्णू आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणारा आहे. या डाव्या संघटनांनी या समाजातील प्रत्येक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांवर प्रश्नचिन्ह उभे करत 'आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलो' ' आम्ही हिंदू आहोतयाची लाज वाटावी अशी पिढी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 

सोमनाथ ते विश्वनाथ, कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत परकीय धर्मांध राजांच्या हिंदू मंदिरांवरील आक्रमणाच्या खुणा या देशात ठिकठिकाणी आहेत. या खुणा या मंडळींना कधीही दिसत नाहीत. वेगवेगळ्या परकीय आक्रमकांचे पुतळे पाडण्याची मोहीम जगभर सुरु असते. या चळवळीला डाव्यांचा पाठिंबा असतो. भारतामधील खिल्जी, टिपू, औरंगजेब या मंडळींनी केलेले आक्रमण या डाव्या मंडळींना दिसत नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या ABP देशातील अल्पसंख्यांकावर झालेले हल्ले त्यांना समजत नाहीत. या देशातील शेकडो मंदिरं  1947 नंतर पाडण्यात आली. हजारो धर्मांतर झाले. असंख्य महिलांना रोज  'लज्जा'स्पद प्रसंग सहन करावे लागतात. या सर्व गोष्टींचा या मंडळींना कधीही त्रास होत नाही.

राजकीय आणि बौद्धीक पातळीवरील दादागिरी सुरु असूनही हिंदू संघटनांनी राम मंदिरासाठी मोठ्या चिवटपणे लढा दिलाय. कोर्टाच्या दरबारातील आणि जनतेच्या दरबारातील प्रत्येक लढाई ते लढले. ''श्रीराम जन्मभूमी आंदोलन हे स्वातंत्र्य लढ्यासारखे व्यापक होते. यामध्ये संपूर्ण देशाचा समावेश होता.'' असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीयांनी न्यायालयातही या प्रकरणाचे सर्व पुरावे मांडत, युक्तीवाद सादर करत आणि आक्षेपांचे खंडण करत या 500 वर्षांच्या लढाईचा निर्णायक शेवट केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एकमताने निर्णय दिला. हा निर्णय झाल्यानंतर देशात कुठेही अतिरेकी जल्लोष झाला नाही. दुसऱ्या दिवशी वाजत-गाजत मंदिर उभे करण्याचे काम सुरु झाले नाही. याचे कारण म्हणजे विरोधकांची भावना दुखावण्यात किंवा त्यांना त्रास देण्यात हिंदू समाजाला  कधीही रस नव्हता, ती हिंदू समाजाची संस्कृती नाही. 

स्वत:ला राज्यघटनेचे रक्षक म्हणवणाऱ्या 'अंधाराची काजळी फोडू छाप' व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करुन श्रीराम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे मोकळ्या मनाने स्वागत करायला हवे होते. वास्ताविक तसे काहीही झाले नाही. श्रीराम मंदिराच्या जागेवर शाळा उभारा, हॉस्पिटल उभारा ही त्यांची बडबड सुरुच होती. मनासारखा निर्णय दिला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयावर आणि तो निर्णय देणाऱ्या खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीशावरही त्यांनी शंका उपस्थित केली. तरीही ही मंडळी स्वत:ला 'संविधानवादी' असं ठासून सांगतात आणि जगाने त्यांच्यावर तसा विश्वास ठेवावा अशी त्यांना अपेक्षा असते. 

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीची प्रक्रिया इतके दिवस सुरु नव्हती. यापूर्वीचा बहुसंख्य काळ 'आंधाराची काजळी फोडू छाप' विचारांचे सरकार होते. त्यांच्या हातात गल्लीपासून- दिल्लीपर्यंत कारभार होता. हे सर्व असूनही शिक्षण आणि आरोग्याचे  प्रश्न आजही का कायम आहेत? लहान देश आपल्या पुढे निघून जात आहेत असं मंदिर भूमीपूजनाच्या आठवड्यात रडगाणे गायणाऱ्या व्यक्तींचा विवेकशील आवाज यापूर्वी का बसला होता? अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणार म्हणजे आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार असे केंद्र सरकारने किंवा कोणत्या भाजप शासित राज्य सरकारने सांगितले आहे? सरकार सोडा तुमच्या भागात राहणाऱ्या परिवारातील जबाबदार व्यक्तींनी आता हे प्रश्न सोडवण्याची सरकारला गरज नाही. 'सरकारचे जीवतकार्य आता संपले आहे, सर्व प्रश्न आपोआप मार्गी लागतील' असे वक्तव्य केले आहे का

 मंदिराच्या भूमीपूजनाचा दिवस घरात दिवाळीसारखा साजरा करणाऱ्या परिवारानेच या देशात शाळा आणि रुग्णालयांचं जाळं उभं केलंय. यामध्ये अनेक गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याची व्यवस्था उभी केलीय. रुग्णांवर वैद्यकीय उपचार होतात. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, मोठा अपघात, आणि आता चायनीज व्हायरस प्रत्येक आपत्तीमध्ये हे सर्व स्वयंसेवक सर्वस्व झोकून देऊन काम करतात. हे या मंडळींना दिसत नाही, दिसलं तरी आठवतं नाही, आठवलं तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ही मंडळी राम मंदिराचे काम सुरु झाले याचा आनंद न झाल्याने 'माझं मत जरा वेगळं आहे' असं ओरडत समाजाच्या मुख्य धारेपासून वेगळी पडत चालली आहेत. त्यांनीच त्यांच्या सोयीसाठी मांडलेला सिद्धांत खरा आहे, हे समजण्याचा काळ हा सोशल मीडियाच्या युगात इतिहासजमा झालाय.  

शहरातल्या कोणत्याही इमारतीकडे पाहून ' अरे इथे हॉस्पिटल बांधले असते तर आज चायनीज व्हायरस पेशंट्सवर चांगले उपचार झाले असते' हे सांगणाऱ्या व्यक्तींचा 'कोरोना वॉरियर्स' म्हणून गौरव करणे  जितके हास्यास्पद आहे त्यापेक्षा जास्त जास्त हास्यास्पद असा या मंडळींचा हॉस्पिटल आणि शाळा प्रेमाचा आलेला हा हंगामी उमाळा आहे.

परकीय सत्ताधीश देशातून निघून गेले म्हणजे देश बदलला असं होत नाही. परकीयांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्यानंतरच भीतीच्या सावटातून देशाची सुटका होते. भारतात पहिले मंदिर पाडले गेले तेंव्हापासून आजपर्यंत हिंदूंच्या मनात परकीय आक्रमकांनी भीतीचा पर्वत तयार केलाय.काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या विशाल भारत देशात शतकं उलटली, कित्येक पिढ्या बदलल्या, जीवनपद्धतीमध्ये बदल झाले, तरी भीतीचा पर्वत मार्गातून हटत नव्हता. 

हा भीतीचा पर्वत वितळण्यास 5 ऑगस्ट 2020 या दिवशी सुरुवात झालीय. हा दिवस म्हणजे फक्त अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाची  तारीख नाही, तर शेकडो वर्षांचे भय नष्ट होत आहे याची जाणीव करुन देणारा  दिवस आहे. एक असे भय ज्यावर हिंदू समाजाने आजवर फारशी मोकळेपणे चर्चा केलीच नाही. याच भयामुळे हिंदू बायकांना मोकळेपणे फिरण्यावर बंधनं आली. याच भयामुळे अनेक मंदिरातले देव एखाद्या घरात लपवले गेले.  याच भयामुळे नवी दिल्लीत अठराव्या शतकात एकही भव्य मंदीर उभे राहिले नाही. 1939 साली पूर्ण बिर्ला मंदीर हे नवी दिल्लीमध्ये काही शे वर्षानंतर उभे राहिलेले भव्य मंदीर आहे. याच भयातून निर्माण झालेल्या चुकीच्या समजुतीमधून सरकारी कार्यक्रम असूनही पंडित नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पूजेला जाणे टाळले. भारतीय उपखंडातल्या प्रत्येक भागातील भग्न मंदिरं आणि मोडकळीस आलेल्या लेण्यांमधून या भयाचे अवशेष सापडतात. हे भय अखेर आता संपलंय. जे आजवर गमावलं ते सारं गंगार्पण म्हणून सोडून देण्याची परंपरा आता खंडित झालीय. आपला नष्ट झालेला सांस्कृतिक वारसा हिंदू समाज पुन्हा उभा करु शकतो याची जाणीव 5 ऑगस्ट 2020 या दिवशी झालीय. 

धर्माला दडपशाही आणि बुद्धीभेद करुन कायम स्वरुपी नष्ट करता येत नाही, हा विश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारा हा दिवस आहे. 5 ऑगस्ट 2020 या दिवशी भारतीयांच्या भयावरील विजयाच्या उत्सवाला आता सुरुवात झालीय.

टिप - श्रीरामाच्या आयुष्यावरील भ्रामक समजुती दूर करणारा माझा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Wednesday, April 15, 2020

सीतेवरील अन्याय आणि शंबुक वध - रामायणातील खोट्या गोष्टी



चायनीज व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात टीव्हीवर सर्वात जास्त बघितला जाणारा कार्यक्रम म्हणजे रामायण. हजारो किलोमीटर लांब आणि वेगवेगळ्या भाषा, जाती, चाली-रिती यांचा समावेश असलेल्या भारत देशाला एकत्र बांधून ठेवणारे तीन अक्षरी नाव म्हणजे श्रीराम. श्रीरामाच्या आयुष्यावर आधारित रामायण ही मालिका तीन दशकांपूर्वी जितकी लोकप्रिय होती तितकीच आजही आहे हे आता सिद्ध झाले आहे.

मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या आयुष्यावर प्रश्न विचारणे ही भारतामध्ये पुरोगामी होण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे. या पुरोगामी मंडळींकडून श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वाधिक वादग्रस्त भासवला जाणारा भाग म्हणजे सीतेची अग्निपरीक्षा, सीतेला वनवासाला पाठवणे आणि शंबुक या शूद्राचा श्रीरामाने शिरच्छेद करणे हा आहे. या घटनांमुळे श्रीराम हे असुरक्षित, स्त्रीविरोधी आणि जातीयवादी आहेत असा कांगावा या मंडळींकडून सतत केला जातो. दुर्दैवाने देशातल्या अनेक ग्रंथांमध्ये आणि रामायणातील उत्तरकांडात याबाबत उल्लेख असल्याने हे प्रसंग श्रीरामाच्या आयुष्यात घडले असा अनेकांचा समज आहे. पण हे प्रसंग प्रत्यक्ष रामायणात घडलेच नाहीत. हे पुराव्यासह मांडण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.

सीतेची अग्निपरीक्षा

याबबात सांगितली जाणारी कथा थोडक्यात : रावण वधानंतर श्रीरामाने सीतेच्या पावित्र्यावर संशय घेत त्यांना परत घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी सीतेने आपल्या चारित्र्याची खात्री श्रीरामाला व्हावी यासाठी अग्निपरीक्षा दिली. ( सीता यांनी अग्नीत उडी घेतली) त्यावेळी अग्नीदेवतेने सीतेला सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर सर्व देवांनी एकत्रपणे रामाला सीता यांचे पावित्र्य पटवून दिले आणि रामाने सीतेचा स्विकार केला. काही जणांच्या मते रावणाने खऱ्या सीतेला पळवले नव्हतेच. रावणाने पळवलेल्या सीता ह्या ख-या सीतेची सावली होत्या. खऱ्या सीता ह्या अग्नीदेवतेकडे होत्या. त्यामुळे अग्नीपरीक्षेनंतर सीतेची सावली अग्नीमध्ये जाताच खऱ्या सीता प्रकट झाल्या.

रामायणात स्त्रियांना बरोबरीचे स्थान होते. श्रीरामाच्या आई कौसल्या या राज्यकारभारात भाग घेत असत. कैकेयी यांनी तर दशरथ राजाला युद्धात मदत केली. त्या दशरथ राजाबरोबर युद्धात सहभागी होत्या. श्रीरामाच्या पत्नी सीता यांनीही त्यांचा अभ्यास पूर्ण केला होता. त्यांनी स्वयंवरातून जोडीदार निवडला. त्यांचे लग्न जनक राजाने ठरवले नव्हते. संपूर्ण रामायणात असलेले हे समानतेचे सूत्र सीतेच्या अग्निपरीक्षेच्यावेळी अचानक कसे तुटले? याचा विचार करायला हवा.

श्रीराम स्वत:ही धर्म आचरण करण्याचे मुर्तीमंत प्रतिक मानले जातात. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना आहेत. राजा सुग्रीवाच्या पत्नीला त्यांच्या मोठ्या भावाने वालीने कैद केले होते. बलिला मारल्यानंतर सुग्रिवाच्या पत्नीची कैदेतून सुटका झाली. त्यावेळी श्रीरामाने सुग्रीवाला पत्नीचा स्विकार करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे श्रीरामाने सीता यांच्या अग्निपरीक्षेचा आग्रह धरणे ही त्यांच्या संपूर्ण स्वभावधर्माच्या विरुद्ध गोष्ट वाटते.

कोणत्याही स्त्रीच्या पावित्र्याचा मापदंड हा अग्निपरीक्षा म्हणजेच तिचे शरीर हे अग्नीरोधक असणे हा कसा असू शकतो? असं असेल तर सर्व पवित्र स्त्रीने अग्निरोधक असायला हवं पण ते शक्य नाही. अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना मान्यता दिली तर भविष्यात कर्मकांड बळावेल आणि समाजातील स्त्रीयांचे स्थान दुर्बल होईल हे श्रीरामाला नक्कीच माहिती असणार त्यामुळे ते अशा प्रकारच्या प्रथांना परवानगी देतील हे पटत नाही.

रामायणाची गती ही प्रवाही आहे. ही प्रवाही गती रावण वधानंतर श्रीराम – सीतेची जेंव्हा पहिल्यांदा भेट होते त्यावेळी अचानक गडबडते. युद्धकांडातील सर्ग ११४ मध्ये श्रीरामाने सीतेला परत भेटण्याचे वर्णन हे अगदी भावनाविवश होऊन केले आहे. पण त्यानंतर त्याच्या पुढच्या टप्प्यात अचानक श्रीराम सीतेला भरत, लक्ष्मण, सुग्रीव किंवा विभीषणाजवळ राहयला सांगतात. त्यानंतर सर्ग ११६ मध्ये सीता लक्ष्मणांना अग्निपरीक्षेची तयारी करायला सांगतात. सीता अग्नीत प्रवेश करतात. सर्ग ११७ मध्ये अग्नीदेवतेसह सीता आणि स्वर्गातून सर्व देव प्रकट होतात. त्यानंतर सर्ग ११८ मध्ये राम आणि सीता एकमेकांना आनंदाने भेटतात.

आता सर्ग ११४ मधील रामाचे सीतेसाठी भावनाविवश होणे... या श्लोकानंतर पुढचे  श्लोक काढले आणि सर्ग ११८ मधील आणि त्यापुढे  राम आणि सीता एकमेकांना आनंदाने भेटतात, हा श्लोक ठेवला तर संगती लागते. या दोन श्लोकांमधील सर्व श्लोक हे नंतरच्या काळात रामायणात घुसडण्यात आले आहेत याची खात्री पटते.  


उत्तरकांड रामायणाचा भाग नाही

श्रीरामाने सीतेचा त्याग करणे आणि शंबुकाचा शिरच्छेद करणे हे दोन प्रसंग श्रीराम राजा बनल्यानंतरचे आहेत. रामायणातील उत्तरकांडात त्याचे वर्णन केले आहे. उत्तरकांड हे रामायणातले सातवे आणि शेवटचे प्रकरण. पण हे प्रकरण मुळ रामायणात महर्षी वाल्मिकी यांनी लिहलेच नव्हते. युद्धकांड या सहाव्या प्रकरणानंतर रामायण समाप्त झाले. उत्तरकांड नंतरच्या काळात लिहिले गेले असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. यासाठी या अभ्यासकांनी अनेक पुरावे देखील दिले आहेत. हे पुरावे कोणते ते पाहूया

पहिला पुरावा – हिंदू धर्माच्या कोणतेही प्रसिद्ध ग्रंथ, स्त्रोत्र किंवा आरतीमध्ये त्याच्या शेवटी हा ग्रंथ वाचून, स्त्रोत्र किंवा आरती म्हंटल्यानंतर काय फायदा होईल याचे हमखास वर्णन असते. ज्याला फलश्रृती असे म्हणतात. रामायणाची फलश्रृती ही महर्षी वाल्मिकींनी युद्धकांडाच्या शेवटी सर्ग १२८ मध्येच लिहिली होती. त्यामुळे हे सिद्ध होते युद्धकांड हेच रामायणातले शेवटचे प्रकरण आहे.

दुसरा पुरावा – रावणाच्या दरबारात कैदेत असलेल्या हनुमाला ठार मारण्याचे आदेश रावण देतो. त्यावेळी विभीषण रावणाला सांगतो की हनुमान हा श्रीरामाचा दूत आहे, दूताला मारल्याची घटना आजवर कधीही झालेली नाही. शास्त्राला मान्य नाही. त्यावेळी रावण विभीषणाचे मत मान्य करतो आणि हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश देतो. पण उत्तरकांडात अचानक रावणाने कुबेराच्या दुताला ठार मारल्याचा उल्लेख आहे. या दोन परस्पर विरोधी घटना आहेत. महर्षी वाल्मिकी ही एकच व्यक्ती या घटना लिहू शकत नाही.

तिसरा पुरावा –  महर्षी वाल्मिकींनी युद्धकांडात स्पष्ट लिहलंय की रामराज्यात कुणाचाही अकाली मृत्यू होत नाही. कोणत्याही वडिलांवर मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ कधीही आली नाही. पण उत्तरकांडात मात्र अचानक एक ब्राह्मण आपल्या मुलाचे प्रेत घेऊन श्रीरामाच्या दरबारात येतो आणि सांगतो, शंबुकाने माझ्या मुलाचा वध केला त्यानंतर ब्राह्मणाच्या विलापामुळे संतापलेले श्रीराम मागचा-पुढचा विचार न करता शंबुकाचा वध करतात. या दोन्हीही परस्परविरोधी घटना आहेत. ज्यामुळे सिद्ध होतं की उत्तरकांड हे मुळ रामायणाचा भाग नसून त्यानंतर हजारो वर्षानंतर लिहिले गेले आहे.

चौथा पुरावा – रामायण आणि महाभारत यांच्यात सुमारे तीन हजार वर्षांचा कालावधी आहे असे मानले जाते. महाभरातामधील वनपर्वात मार्केंडेय ऋषी युधिष्ठिराला रामायण समजावून सांगतात, याचे वर्णन आहे. यामध्ये देखील मार्केंडेय ऋषी युधिष्ठिराला युद्धकांडापर्यंत रामायण सांगातात. याचे कारण महाभारताच्या काळातही युद्धकांड हेच रामायणातील शेवटचे प्रकरण होते.

पाचवा पुरावा – रामायणातले सर्वात जुने हस्तलिखीत काही वर्षांपूर्वी सापडले. हे हस्तलिखित सहाव्या शतकातील आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर हजारो वर्षांनंतरचे हे हस्तलिखित आहे. या हस्तलिखितामध्येही उत्तरकांडचा उल्लेख नाही. युद्धकांडनंतरच हे रामायण समाप्त होते.


नाविकाचा मान राखणारे, जटायूचा वडिल मानून त्यांचा अंत्यसंस्कार करणारे, सुग्रीवावरील अन्याय दूर करणारे, शबरीची उष्टी बोरं आवडीनं खाणारे श्रीराम हे उत्तरकांडात अचानक एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरुन मागचा पुढचा विचार न करता शंबुकाचा वध कसा करु शकतात? संपूर्ण रामायणात स्त्रीयांना सन्मान द्या अशी शिकवण आहे. त्यानंतर अचानक उत्तरकांडात एका धोब्याच्या सांगण्यावरुन श्रीराम सीतेवर अविश्वास कसा दाखवू शकतातनिर्वासित अहिल्याला आई म्हणणारे श्रीराम, वनवासात पाठवलेल्या कैकेयीबद्दल कोणतीही कटूता न ठेवणारे श्रीराम आपल्या पत्नीला दुय्यम वागणूक कशी देऊ शकतात ? पत्नीचा त्याग कसे करु शकतातयाचा अर्थ स्पष्ट आहे, उत्तरकांड हे मुळ रामायणाचा भाग नाही.

ज्या लोकांची भारतीय संस्कृतीवर श्रद्धा नाही त्यांनीच सीतेची अग्निपरीक्षा, सीता त्याग आणि शंबुक वध या गोष्टींचा रामायणात समावेश केला आहे. श्रीराम हे देखील अपयशी होते असा प्रचार करण्यासाठी या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. 

आपला देश हा अफवांचा देश आहे. या देशात एकाच गोष्टीचे, बातमीचे अनेक व्हर्जन सतत प्रचलित असतात. सध्याच्या व्हॉट्सप युगात तर याचा सर्वांनाच अनुभव आहे. रामायणातले उत्तरकांड आणि या लेखात उल्लेख केलेल्या तीन गोष्टी देखील अशाच प्रकारचे व्हर्जन आहे. अनेक सामान्य भक्त हे आजवर रामायणातील अफवांना बळी पडले आहेत. 

हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाला मला शेवटी कळकळीनं विचारावं वाटतं, 'तुमचा भाऊ, नवरा किंवा मुलाच्या चारित्र्यावर विश्वास आहे ना ? मग आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श पूत्र असलेल्या श्रीरामाच्या चरित्रावर तुम्ही कसा अविश्वास दाखवू शकता? तुम्ही खरोखरच मनुष्य असाल तर सीतेची अग्निपरीक्षा, सीतेचा त्याग आणि शंबुकाचा शिरच्छेद या घटना रामायणात घडल्या आहेत, ही समजूत काढून टाका. भ्रामक कथा, दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका आपल्या -हदयातील श्रीरामाला जागृत करा '.

जय श्रीराम. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...