Sunday, February 6, 2011

वर्ल्ड कपचे दावेदार ( भाग 4 ) --- भारत


भाजपा आणि भारतीय क्रिकेट टीम यांच्यामध्ये एक साम्य आहे. या दोघांच्याही समर्थकांना प्रत्येकवेळी आपणच जिंकणार असा ठाम विश्वास असतो. भाजपावाले फार पूर्वीपासून 'अगली बारी अटलबिहारी' या घोषणा देत आले आहेत. तर 1983 नंतर प्रत्येक वर्ल्ड कपपूर्वी आपणचं वर्ल्ड कप जिंकणार हे भारतीय फॅन्सनी गृहित धरलेलं असतं. आता हा वर्ल्ड कप तर भारतीय उपखंडामध्ये होतोय.त्यामुळे संपूर्ण देश क्रिकेटमय होऊ लागला आहे. जाहिराती, न्यूज कव्हरेज, प्लेअर्सच्या मुलाखती या सगळ्या माध्यमातून क्रिकेटचा भडीमार होत आहे. टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार... जणू आता 2 एप्रिलला महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्याची औपचारिकताच बाकी आहे अशा प्रकारचे वातावरण देशामध्ये तयार होऊ लागलंय. भारतीय टीमचं वर्ल्ड कप जिंकावी अशी माझी 100 नाही तर 1000 टक्के इच्छा आहे. पण बाकीच्या टीम ह्या हरण्यासाठी वर्ल्ड कप खेळणार नाहीत. त्यामुळे भारतीय टीमची बलस्थाने तसेच कमकुवत बाजू यांचा विचार होणं आवश्यक आहे.


              निवड समितीनं निवडलेली टीम इंडिया कागदावर तर नेहमीप्रमाणे भक्कम आणि संतुलित आहे.  देशातले सर्वोत्तम 15 प्लेअर्सची निवड निवड समितीनं केली आहे. पण दुखापती तसेच रोटोशन पॉलिसी यामुळे हे 15 जण कधीही  एकत्र खेळलेले नाहीत.  यापैकी दुखापत ही टीम इंडियासमोरची मोठी समस्या आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौ-यातूनही सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि प्रवीण कुमार हे चार जण दुखापतीमुळे माघारी परतले.  आता वर्ल्ड कपपूर्वी हे सर्व जण फिट होतील. पण संपूर्ण स्पर्धेत फिट राहण्याचं अवघड आव्हान या चौंघासमोर ( तसेच अन्य 11 जणांवरही ) असेल . विशेषत: सचिन, सेहवाग आणि गंभीर या तिंघापैकी एखादा प्लेअर निर्णायक मॅचपूर्वी अनफिट ठरला तर त्याचा टीमच्या भवितव्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.



         भारताची बॅटिंग ऑर्डर नेहमीप्रमाणेच यंदाही भक्कम आहे. सचिन-सेहवाग ही जगातली सर्वात विस्फोटक ओपनिंग जोडी आपल्याकडे आहे. कोणत्याही मॅचचा निकाल ही जोडी आरामात निश्चित करु शकते. इतकी अनुभवी, आक्रमक आणि खतरनाक ओपनिंग जोडी या वर्ल्ड कपमध्ये अन्य कोणत्याही टीमकडे नाही. कोणत्याही टीमला विश्वविजेता बनवण्यामध्ये त्यांच्या ओपनर्सची महत्वाची भूमिका असते. हेन्स-ग्रिनीच किंवा हेडन- गिलख्रिस्ट यांनी हे पूर्वी दाखवून दिलंय. या दोन्ही जोडींप्रमाणे सचिन-सेहवाग ह्या जोडीलाही भारताच्या विश्वविजेतेपदाचा पाया रचावा लागेल.भारतासाठी एक आशादायक बाब म्हणजे वर्ल्ड कपमधला ह्या जोडीचा रेकॉर्ड. या जोडीनं वर्ल्ड कपमध्ये आजवर 10 वेळा ओपनिंग केलीय. त्यापैकी 9 वेळा भारत विजयी झाला आहे. केवळ 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत पराभूत झाला होता.  सचिन-सेहवागपैकी कोणी जखमी झाल्यास गौतम गंभीर हा ओपनिंगसाठी  एक चांगला पर्याय भारताकडे आहे.

           सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप म्हणून या वर्ल्ड कपचा मोठा गाजावाजा होतोय. सर्वत्र टीम इंडियापेक्षा सचिनची जास्त चर्चा आहे. सचिनसाठी क्रिकेटमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काहीचं उरलेलं नाही. हा वर्ल्ड कप भारताने जिंकला नाही तरीही त्याची क्रिकेटपटू म्हणून महानता अजिबात कमी होणार नाही. पण वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य बनण्याचा बहुमान त्याला मिळणार नाही. कपिल देव, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, व्हिव्हियन रिचर्ड, अरविंद डिसल्वा , शेन वॉर्न ह्या महान क्रिकेटपटूंनी स्वत:च्या हिमतीवर ( निर्णायक मॅचमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करत ) वर्ल्ड कप जिंकला आहे. या सर्वांपेक्षा सचिन कुठेही कमी नाही. त्यामुळे आता यादीमध्ये आपली भर पाडण्यासाठी 38 व्या वर्षी क्रिकेटच्या या महान जादूगाराला आपला आजवरचा सर्वोत्तम खेळ या वर्ल्ड कपमध्ये करावा लागेल.

          क्रिकेटमधले कोणतेच नियम ज्याला लागू होत नाहीत असा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग.कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे आक्रमकता ही त्याला जन्मत: मिळालेली देणगी असावी.  ख-या अर्थाने गेमचेंजर. प्रतिस्पर्धी टीम, समोरचा बॉलर,मॅचमधली परिस्थिती याचा कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नाही. भारतीय उपखंडातले पिच त्याच्या बॅटिंगसाठी नेहमीच फायदेशीर ठरल्यात. खराब फिटनेस आणि गचाळ रनिंग-बिटविन-द-विकेट ह्या विरुच्या दोन मोठ्या समस्या आहेत. त्याचबरोबर शॉर्ट पिच बॉलवर आऊट होण्याची त्याला वाईट सवय आहे. या गोष्टींची काळजी त्याने घेतली तर कोणत्याही बलाढ्य टीमचा तो आरामात निकाल लावू शकतो.    

            टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरची मोठी भिस्त गौतम गंभीरवर असेल. गौतम गंभीरचा 3 नंबरवर बॅटिंग करण्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे.वन-डेमधला त्याचा सर्वोत्तम स्कोर ( 150 नाबाद ) हा त्यानं तिस-या क्रमांकावर बॅटिंगला येऊनच काढलाय. त्यानं तिस-या क्रमांकावर येऊन 31 मॅचेसमध्ये 1161 रन्स काढलेत.त्यामध्ये त्याची सरासरी आहे 43. यामध्ये 3 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.  गंभीर नंतर येणारे बॅट्समन हे युवा किंवा बेभरवशाचे आहेत. त्यामुळे त्याचवरची जबाबदारी आणखी वाढलीय. त्याला एक बाजू लावून धरुन भारतीय डावाला आकार देण्याची जबाबदारी 'गंभीर' पणे पार पाडावी लागेल.

          गंभीरनंतर चौथ्या क्रमांकावर येणारा विराट कोहली हा आणखी एक भरवशाचा बॅट्समन आपल्याकडे आहे. 2010 हे वर्ष विराटसाठी भलतंच यशस्वी ठरला. या वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये हशिम आमला नंतर सर्वात जास्त रन्स त्याच्याच नावावर आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका सीरिजमध्येही त्यानं आपला ठसा उमटवला आहे. क्रिकेटमधले सर्व शॉट्स त्याच्याकडे आहेत. तसेच अलिकडच्या काळात डावाला आकार देण्याचं कौशल्यही त्यानं आत्मसात केलंय.विराट कोहली हा भविष्यात टीम इंडियाचा कॅप्टन होईल असा माझा अंदाज आहे. विराटवरचा माझा विश्वास किती योग्य आहे हे या वर्ल्ड कपमध्ये स्पष्ट होईल.

  

                    भारताला हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर युवराज सिंग चाललाच पाहिजे. अफाट गुणवत्ता, प्रचंड विध्वसंकारी, क्लिन हिटर म्हणजे युवराज.आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकाच ओव्हर्समध्ये 6 सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड असलेला या वर्ल्ड कपमधला एकमेव बॅट्समन.  पण या युवराजच्या बॅटवरची 'प्रीती' हल्ली दिसेनाशी झालीय. मागचं वर्ष त्याच्यासाठी खराब गेलं. क्रिकेट बाह्य कारणामुळेच तो जास्त गाजला.आता पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंगचे आपणच महाराजा आहोत हे दाखवण्याची संधी युवराजला चालून आलीय.  या वर्ल्ड कपमध्ये अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला रैनाशी स्पर्धा करावी लागणार आहे. रैनासारखा एक आक्रमक बॅट्समन अंतिम 11 मध्ये  प्रत्येक मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे.मात्र युवराज सलग 2-3 मॅच फेल गेला तर रैना आतमध्ये येऊ शकतो. त्यामुळे युवराजला आपलं स्थान टिकवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करुन दाखवावेच लागेल.

       महेंद्रसिंग धोनीबद्दल मी कब तक धोनी  ? या माझ्या दोन वर्षांपूर्वीच्या ब्लॉगमध्ये सविस्तर लिहले होते. एक बॅट्समन म्हणून त्याच्या बद्दलची माझी मते आजही कायम आहेत. तंत्रशुद्ध बॅट्समन म्हणून तो कधीच ओळखला गेला नाही. धोबी ज्या पद्धतीने काठीने कपडे बडवतो त्याचपद्धतीने बॅटने बॉल वर जोरदार प्रहार करणे ही त्याची मूळ शैली आहे. पण कॅप्टन कूल होण्याच्या नादात त्याची आक्रमकता पार नाहीशी झालीय. धोनी क्रिकेटमध्ये आला तेंव्हा त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त होता. आता 2010 वर्षातला त्याचा स्ट्राईक रेट 76 वर घसरला. तर या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाच वन-डेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 65 वर घसरलाय. ज्या हेलिकॉप्टर शॉट्ससाठी धोनी ओळखला जातो. तो शॉट आता फक्त जाहिरातीमध्येच दिसतो. मैदानावर तो शॉट बहुधा धोनी विसरला असवा. धोनीच्या या खराब फॉर्ममुळे मिडल ऑर्डरच्या अडचणी आणखी वाढल्यात.

      या वर्ल्ड कपमध्ये खेळणा-या भारतीय बॅटिंग लाईन-अपचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे युसूफ पठाण. न्यूझीलंड विरुद्ध बंगळूरु वन-डेमध्ये किंवा आफ्रिका सीरिजमध्ये त्यानं अगदी श्वास रोखून धरायला लावणारी फटकेबाजी केली. कोणत्याही मॅचचा रिझल्ट शेवटच्या काही ओव्हर्समध्ये बदलण्याची शक्ती या पठाणच्या पॉवरमध्ये आहे.भारताच्या संथ पिचवर तर तो आणखी धोकादायक ठरु शकतो. पण लागला तर फटका नाही तर चटका ही जुनी सवय पठाणनं यंदा मोडली पाहिजे. ती सवय त्यानं मोडली तर 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये लान्स क्लूसनर जे काम आफ्रिकेसाठी करायचा ते काम यंदा पठाण आपल्यासाठी करु शकतो.   त्याशिवाय हरभजन सिंग, प्रवीण कुमार,  आर.अश्विन आणि पियुष चावला हे हाणामारी करु शकणारे बॉलरही भारतीय टीममध्ये आहेत.

         भारतीय बॅट्समन्सना आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे बॅटिंग प़ॉवर प्ले. या पॉवर प्लेचा मोठा फायदा आजवर आपल्याला उठवता आलेला नाही. पॉवर प्लेच्या दरम्यान गरज नसताना बेजावबदार फटके मारुन आपले बॅट्समन अनेकदा आऊट झालेत. अथवा प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानंतर अनेकदा भारतानं बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे. त्यामुळे या पॉवर प्लेचा फायदा  भारताला आजवर फारसा उठवता आलेला नाही.त्याचबरोबर मोठ्या मॅचमध्ये रन्सचा पाठलाग करता आपली बलाढ्य बॅटिंग ऑर्डर कोसळल्याचे अनेक उदाहरणं क्रिकेट इतिहासात आपल्याला आढळतात. या इतिहासाची पूनरावृत्ती होऊ नये अशीच प्रार्थना आपण केली पाहिजे.


        भारताचा बॉलिंग ऐटॅक त्या तुलनेत फारसा मजबूत नाही. झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल आणि प्रवीण कुमार हे चार फास्ट बॉलर आपल्या टीममध्ये आहेत. या चौघांनाही भरपूर रन्स वाटण्याचा आणि वारंवार अनफिट होण्याचा मोठा इतिहास आहे. यापैकी कोणता बॉलर जखमी झाल्यास श्रीशांत टीममध्ये येऊ शकतो. अनुभवी झहीर खान आणि आशिष नेहरा यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. या दोघांनाही 2003 च्या वर्ल्ड कपचा ( विशेषत:  फायनलचा )  चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव त्यांना या वर्ल्ड कपमध्ये कामी येऊ शकतो.  झहीर खान हा भारताचा सर्वात अनुभवी फास्टर आहे. पण त्याची अवस्था ही सध्या 'उरलो फक्त टेस्टपुरता ' अशी झालीय. एकतर तो फारशा वन-डे मॅच खेळत नाही. तसेच ज्या वन-डे खेळतो ( उदा. दक्षिण आफिका सीरिज ) यामध्ये तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे आपल्यामध्ये अजुनही वन-डे क्रिकेट शिल्लक आहे हे दाखवण्यासाठी झहीरला आपला जलवा दाखवावा लागेल. त्याशिवाय शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये भरपूर रन्स देण्याची फास्ट बॉलर्सची सवय टीम इंडियाला मोठी अडचणीची ठरु शकते.

       हरभजन सिंग, पियूष चावला आणि आर. अश्विन हे तीन स्पिनर भारतीय टीममध्ये आहेत. यापैकी हरभजनचा अंतिम 11 मधला समावेश नक्की आहे.. रन्स रोखून धरण्याची जबाबदारी तो चोखपणे पार पाडतो. मात्र मोठ्या प्रमाणात  विकेट्स मिळवण्यात तो अपयशी ठरलाय. भारतीय पिचवर विकेट घेऊ शकणा-या आक्रमक स्पिनर्सची कमतरता टीम इंडियाला अडचणीत आणू शकते. अशा  परिस्थितीमध्ये हरभजनच्या मदतीला आर. अश्विनचा अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात यावा. चेन्नईचा हा युवा बॉलर एक आक्रमक स्पिनर आहे. विकेट मिळवण्यासाठी रिस्क घेण्याची कला त्याच्या बोटात आहे. त्याशिवाय हाणामारीच्या ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याची कलाही त्याला अवगत आहे. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये समोरच्या टीमला गोंधळात टाकण्यासाठी अश्विनचा वापर करता येऊ शकतो.


             पियूष चावला हा लेगस्पिनर आपल्या  टीममध्ये आहे. 2008 नंतर त्याची थेट वर्ल्ड कपसाठीच निवड समितीला आठवण झाली. त्यात भर म्हणजे तो भारतीय पिचवर अद्याप एकही वन-डे खेळलेला नाही.  असं असलं तरी देशांतर्गत मॅचमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. लेगस्पिन बॉलरचा एक चांगला ऑप्शन चावलाच्या रुपाने आपल्याकडे आहे. आता निवड समितीनं दाखवलेला मोठा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी चावलावर आहे. भारतीय टीमचा आजवरची परंपरा लक्षात घेता आपण 4 बॉलर्स घेऊन बहुतेक मॅच खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे युवराज, युसूफ, सेहवाग आणि रैना ( अंतिम 11 मध्ये खेळला तर ) या पार्ट टाईम बॉलर्सचा चांगला उपयोग धोनीला करुन घ्यावा लागेल. यापैकी युवराजची बॉलर म्हणून अलिकडच्या काळात समाधानकारक कामगिरी झालीय. जमलेली जोडी फोडण्याचं काम त्यानं अनेकदा बजावलंय. पाचव्या बॉलर्ससाठी असलेल्या या 10 ओव्हर्स धोनी कशा पद्धतीने हातळतो ह्यावरही मॅचचे भवितव्य अवलंबून असेल.


              भारतीय टीमची या वर्ल्ड कपमधली आणखी एक कमकुवत बाजू म्हणजे अस्सल ऑलराऊंडरची कमतरता. 1983 च्या विश्वविजेत्या टीममध्ये कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, मदनलाल यासारख्या ऑलराऊंडरची कामगिरी निर्णायक ठरली होती. या वर्ल्ड कपमध्येही शेन वॉटसन ( ऑस्ट्रेलिया), जॅक कॅलिस ( दक्षिण आफ्रिका ) , शाहिद आफ्रिदी, अब्दूल रझ्झाक ( पाकिस्तान ) , एंजलो मॅथ्यूज ( श्रीलंका ) असे उपयुक्त ऑल राऊंडर प्रतिस्पर्धी टीमकडे आहेत. वन-डे मॅचमध्ये 10 ओव्हर्स पूर्ण टाकून  1-2 विकेट्स हमखास घेऊ शकणारा तसेच 50 रन्स हमखास करणारा ऑलराऊंडर या टीममध्ये एकही नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलर्सना आपली जबाबादारी चोखपणे पार पाडावी लागेल.


              भारताचा या वर्ल्ड कपमध्ये ग्रृप  B मध्ये समावेश आहे. या ग्रृपमध्ये भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, आयर्लंड आणि नेदरलॅंड या टीम्स आहेत. या पैकी कोणत्याही टीमला कमी लेखण्याची चूक 2007 च्या अनुभवानंतर भारतीय टीम करणार नाही भारताचा क्वार्टर फायनलमधला प्रवेश तरी निश्चित मानला जातोय..क्वार्टर फायनल पासूनची प्रत्येक मॅच ही करा वा मरा या स्वरुपातली असेल.

   100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. या अब्जावधी लोकांच्या सा-या अपेक्षांचे ओझे 15 जणांच्या टीम इंडियावर असेल. त्यातच यंदाचा वर्ल्ड भारतीय उपखंडात होतोय. त्यामुळे घरच्या मैदानावर हे ओझं कित्येक पटीनं वाढणार आहे. भारतीय प्रेक्षकांची उपस्थिती आणि फेव्हिरिटचा दर्जा हे ओझं नसून जबाबदारी आहे याची खबरदारी भारतीय टीमनं घ्यायला हवी. गेल्या अनेक काही वर्षांपासून टीम इंडिया ज्या स्पिरिटने खेळतीय ते पाहता ही जबादारी ही टीम पार पाडू शकेल अशी आशा नक्कीच बाळगता येईल. भारतीय फॅन्सचा 28 वर्षांचा दुष्काळ ह्या टीमने संपवावा अशीच प्रार्थना आता आपण सर्वांनी करायला हवी.            


6 comments:

Prasad said...

मस्त लिहिला आहे हा लेख.
आपली टीम २००३ ला अशीच फायनल ला गेलेली
त्या सामन्यात जाहीर ने हेडन ला खुन्नस देऊन पूर्ण वाट लावली होती.
आपल्या टीम मध्ये मोक्याच्या क्षणी सगळे ढेपाळतात.
धोनी फलंदाज म्हणून लायबिलिटी आहे.
जर सचिन खेळला नाही तर टीकाकारांना आयते कोलीत मिळेल.
एका वेगळ्या अंगाने विचार केला तर वर्ल्ड कप मुळे घोटाळे प्रकरण महिनाभर थंडावतील.
वर्ल्ड कप चा शेवट गोड व्हावा हीच देवाकडे प्रार्थना!

Niranjan Welankar said...

नमस्कार. खरोखर अत्यंत सुंदर, आकर्षक ब्लॉग लिहिला आहे. इथून पुढे प्रत्येक ब्लॉग म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी विशेष मेजवानी आहे. पोल पद्धतही आवडली. प्रत्येक खेळाडूच्या वर्णनात न्याय चांगला दिला आहे. आणि प्रत्येकाच्या मनात ज्या गोष्टी असतात; त्या बरोबर टिपल्या आहेत उदा., युसुफ पठान (आधीच्या ब्लॉगमध्ये विशाखापट्टणम मॅचमधला व्हाईट असं). जोरदार.

Unknown said...

भारत एकदम हॉट फेवरेट आहे, घरगुती वातावरण आणि पब्लिक सपोर्ट म्हंटल्यावर काही बोलायलाच नको, आणि यावेळेसची टीमसुद्धा खुप बॅलन्स वाटते, त्यात असलेले अनेक प्लेअर्स जबरदस्त फॉर्मात आहेत, आणि नुकत्याच झालेल्या काही मॅचेस मध्ये भारतीय खेळाडुंनी प्रतिकुल परिस्थीतीतुन मॅच खेचुन आणली आहे त्यामुळे भारत नंबर १ चा दावेदार आहे. हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप, त्यामुळॆ हा मिळवण्यासाठी सचिन जीव तोडुन खेळणार हे नक्की, त्यामुळॆ बाकी टीम्सची काही खैर नाहीये एवढे मात्र खरे कारण एकदा का सचिन पेटला तर काय होते हे वेगळे सांगायला नको.

बाकी पोस्ट मस्तच!

Onkar Danke said...

@ प्रसाद, महत्वाच्या मॅचमध्ये गडबड करण्याची आपल्या टीमला वाईट सवय आहे. जुन्या अनभवातून टीम इंडिया आता तरी शाहणी झाली असेल.अशी अपेक्षा करणेच आपल्या हाती आहे.
बाकी आपले राजकारणी इतके कोडगे आहेत की ते वर्ल्ड कपच्या काळात घोटाळे करणार नाहीत अशी अपेक्षा करणे एकदम चूक आहे.

Onkar Danke said...

@ निरंजन, मित्रा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद..तुझ्यासारखे नियमीत प्रतिक्रीया देणारे आणि माझा ब्लॉग वाचण्याची सहनशक्ती असलेले वाचक आहेत म्हणूनच इंटरनेटवरच्या रद्दीत नवी नवी भर टाकण्याचे बळ मला मिळते.

Onkar Danke said...

@ गौरव भारत हॉट फेव्हरिट आहे. आपली टीम संतुलित आहेत हे मान्य. पण सचिनकडून आपण जास्त अपे्क्षा करतो असं वाटत नाही का ? तो एक महान क्रिकेटपटू आहे हे मान्य आहे. मात्र एकट्या सचिनच्या जिवावर आपण वर्ल्ड कप नाही जिंकू शकत. टीममधल्या प्रत्येक प्लेयरचे योगदान या वर्ल्ड कपमध्ये महत्वाचे असेल.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...