Thursday, May 7, 2020

दारूबंदी हवीच कारण....


If I was appointed dictator for one hour for all India, the first thing I would do would be to close without compensation all the liquor shops, and compel factory owners to produce humane conditions rooms where these workmen would get innocent drinks and equally innocent amusements.   ( M.K. Gandhi , Young India ( 25-6-31) 


संपूर्ण देश ज्यांचा राष्ट्रपिता म्हणून गौरव करतो. ज्यांच्या मार्गावर चालण्याच्या शपथा आजही अनेक जण वर्षातील किमान दोन दिवस तरी नक्की घेतात त्या महात्मा गांधी यांचे हे दारूबद्दलचे विचार आहेत. गांधीजींच्या स्वतंत्र भारताबद्दलच्या अनेक चांगल्या संकल्पना त्यांच्या अनुयायांनी धुळीस मिळवल्या.दारूबंदीचा आग्रह ही त्यापैकी एक चांगली संकल्पना.

चायनीज व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता तातडीने दारु पिणे आवश्यक आहे, अन्यथा जेल होईल या काळजीनं अनेक मद्यप्रेमी रस्त्यावर उतरले.

दारू पिल्यानंतर नशा चढते आणि माणूस झिंगतो हे माहिती होतं/पाहिलं होतं. पण या मद्यप्रेमींना सरकारच्या  निर्णयानंतरच नशा चढली. त्याच नशेत झिंगत त्यांनी थेट दारुच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या. देशात चायनीज व्हायरस पसरलाय. त्यामुळे देशभर लॉकडाऊन सुरुय.  हा व्हायरस संसर्गामुळे पसरतो. दारू दुकानासमोर मोठ्या श्रद्धेनं रांगेत उभ्या असलेल्या या 'प्या' रे मंडळींपैकी एकाला जरी या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर रांगेतील अनेकांना तो होऊ शकतो. चायनीज व्हायरस हा कसा गुणाकार करतो....त्याबद्दलचे  व्हॉट्सअपवर व्हायरल झालेले अनेक मेसेज सर्वांनीच वाचले आहेत. मोठ्या तत्परतेने इतरत्र फॉरवर्ड केलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हायरसच्या गुणाकाराचा उल्लेख त्यांच्या संवादातून  केला आहे.

देशात लॉकडाऊन का सुरू आहे ? तिन्ही त्रिकाळ कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे ? हे सतत सर्व माध्यमातून सांगितलं जात असूनही, त्याची कसलीही आठवण या मंडळींना नव्हती. दारू मिळणार या कल्पनेनंच ती पिण्यापूर्वीच शुद्ध गमावत त्यांनी रस्त्यांवर गर्दी केली. या गर्दीमुळे देशातील चायनीज व्हायरसचा मुक्काम किती लांबणार आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

या 'प्या' रे मंडळींचा सतत एक दावा असतो की, ' दारूमुळे राज्याला महसूल मिळतो. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये हा महसूल राज्याला अत्यंत आवश्यक आहे...' एखाद्या अर्थव्यवस्थेचा आधार हा दारू विक्री असेल तर ती अर्थव्यवस्था किती ठिसूळ आहे हे वेगळं सांगायला नको. राज्य आणि देशाने याचा गांभिर्याने विचार करायला हवा.

चायनीज व्हायरसग्रस्त अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ग्रीन झोनच्या भागातील रस्ते, पडक्या शाळा, पाण्याच्या टाक्या किंवा अन्य पायाभूत सुविधा उभारणीसाठी मजुरांना कामाला लावायला हवं. यामुळे सध्या घरात बसून राहिलेल्या मजुरांना रोजगार मिळेल. हातावर पोट असलेल्या मोठ्या वर्गाची चिंता मिटेल. मजुरांना त्यांच्या गृह राज्यात कसे पाठवायचे ? हा प्रश्न निर्माण होणार नाही. दारू दुकानं उघडण्यासाठी लॉबिंग करणारे आणि त्याचं समर्थन करत चढ्या भावात बाटल्या खरेदी करून घरात बार उघडणाऱ्या प्रत्येक करदात्या मंडळींनी दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरला तरी अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. ऐन लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची ढाल पुढे करत दारूची दुकाने उघडणे हा 'रोगापेक्षा इलाज भयंकर' प्रकार आहे.

 सध्या 'प्या' रे गटातल्या एका गृहस्थाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो गृहस्थ अगदी आनंदाने वेडापिसा झालाय. ' मी किती बाटल्या घेतल्या, त्यापैकी आता किती पिणार, मला किती जाम भारी वाटतंय, मी आता कसं समाधानाने झोपणार'  याचं तो अगदी 'हाय जोश' मध्ये वर्णन करतोय. व्यसनी मंडळींचं वर्णन करण्यासाठी तळीराम  हा शब्द आता चांगलाच प्रचलित झालाय.  तुम्हाला त्यांना दारुडे किंवा बेवडे हे अस्सल मराठी शब्द वापरणे बरं वाटत नाही हे एकवेळ ठीक. पण ज्या शब्दात राम आहे असा शब्द तुम्ही या व्यसनी मंडळींना कसा लावू शकता ? श्रीराम हे काय दारु पित होते का ? मग या व्यसनी लोकांचा उल्लेख करताना 'राम' ही जोड कशाला हवी ?

'अमेरिकन / युरोपीयन लोकं दारू पितात. अमुक देशाची ही दारू आहे. तमुक देशाची ही दारू आहे. दारू पिणे ही तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. भारतातच संस्कृतीरक्षकांना दारूचे वावडे आहे' असा प्रचार काही मंडळींकडून केला जातो. वास्ताविक अमेरिकन / युरोपीयन देशांकडून घेण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या देशातील मंडळींमध्ये फिटनेस , खेळाची आवड आहे. अगदी लहानवयापासून ही आवड जोपासली जाते. त्यासाठी वेळ दिला जातो. त्यावर मेहनत घेतली जाते.त्यामधून ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची मोठी साखळी तयार होते. इतिहास असो वा शिल्पकला आपल्या देशातील सर्व संस्कृती उत्तम पद्धतीने जतन करण्याची त्यांना सवय आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, नवे-नवे शोध लावण्याच्या बाबतीत ही मंडळी सदैव आघाडीवर असतात. सार्वजनिक स्वच्छतेची सवय तर या मंडळींमध्ये जन्मजात म्हणावी इतकी सहज असते. या देशांकडून इतक्या चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असताना त्यांची फक्त दारू पिण्याचीच सवय आपल्याकडे आणण्याचा अट्टहास कशाला ?

'त्याचा पैसा आहे, तो वाट्टेल ते खरेदी करेल' हे लॉजिक असेल तर अंमली पदार्थांची खरेदी सरकारने कायदेशीर करावी. लोकं आपल्या पैशाने शहरातल्या ड्रग्ज पार्कमध्ये जावून आवडीचे अंमली पदार्थ खरेदी करतील.  गांजाची शेती करायला परवानगी देत त्यावर कर लावावा. त्यामुळे शेतकरी श्रीमंत होतील आणि सरकारलाही कर मिळेल. आणखी एक उपाय सांगितला जातो तो म्हणजे दारूवरील कर वाढवा ती आणखी महाग करा. आता दारूवर कर वाढवला की हातभट्टीवरील अवैध दारूच्या निर्मितीचा धंदा वाढणार.  गरीब मंडळी तिकडं मोठ्या प्रमाणात वळणार या प्रकारची दारू पिल्याने जीव गेल्याच्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कर वाढला की काळाबाजार आणखी वाढणार. करवाढ हा जर सर्व गोष्टींवरील उपाय असेल तर प्रत्येक वस्तूवर ११० टक्के कर लावला की सरकारचे काम संपेल. आपल्याला या प्रकारच्या समाजवादी अर्थव्यवस्थेत देशाला पुन्हा ढकलायचे आहे का ?

महात्मा गांधींपासून अभय बंगांपर्यंत अनेक मंडळींनी दारूबंदीचा सातत्याने आग्रह केला आहे. दारू पिणे इतकेच प्रतिष्ठेचे असेल तर त्यांनी याबाबत मार्गदर्शन करणारे क्लासेस काढले असते. दारू ही कोणत्याही प्रकारातील असो ती शरिराला अपायकारच असते. हे WHO पासून ते आपल्या घरातील बायको, आई, वडिल किंवा अन्य वडिलधा-या मंडळींपर्यंत अनेक जण सतत सांगत असतात. 'दारू पिण्याला सेफ लिमिट असते' हा देखील एक जागतिक प्रोपगंडा आहे. जितकी अधिक दारू प्याल तेवढे दुष्परिणाम अधिक होतात. 'व्हायरस' हा श्रीमंत - गरीब असा भेद करत नाही, हे आपण सध्या वारंवार ऐकतो तसंच दारू देखील श्रीमंत- गरीब असा कोणताही भेद करत नाही. गंमत म्हणून, सामाजिक वातावरण म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सुरू केलेली दारू अगदी सहज व्यसन बनू शकते.

व्यसनाचा अंमल असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालाय. व्यसनी माणसाचे शरीर खंगत  जाते. अनेकदा नंतर पश्चाताप करुन किंवा औषधोपचारावर अफाट खर्च केल्यानंतरही फरक पडत नाही. दारूच्या नशेत होणारा हिंसाचार ही देखील मोठी समस्या आहे. या हिंसाचाराच्या छायेत अनेक महिला आणि त्यांची मुलं जगत असतात. त्यांचे संसार उद्धवस्त होतात. अनेकांची कमाई, बचत सर्व काही दारूच्या पुरात वाहून जाते. दारूबंदीच्या मागणीसाठी महिला वर्ग सातत्याने आग्रही  असतो याचे हे मुख्य कारण आहे. समाजातल्या एका मोठ्या वर्गाच्या मागणीकडे आपण फक्त महसूल प्राप्तीच्या हव्यासापोटी दुर्लक्ष किती दिवस करणार ?

पत्रकार पराग फाटक यांनी एक छान मुद्दा त्यांच्या फेसबुक वॉलवर मांडलाय. पराग लिहितात, 'ऑफिसात दारू पिऊन येऊ शकत नाही, दारू पिऊन गाडी चालवू शकत नाही, दारू पिऊन देवळात जाता येत नाही. आणखी अनेक गोष्टी दारू पिऊन करता येत नाहीत. ज्या अर्थी एवढ्या ठिकाणी दारूबंदी आहे त्याअर्थी काहीतरी लॉजिकल कारण असणार. जिथे जबाबदारीचं काम आहे तिथे दारू पिऊन यायला, काम करायला परवानगी नाही.'

  आपल्याला जबाबदार, चांगल्या सवयी असलेला, निरोगी समाज हवा आहे की व्यसनी, खंगलेला, स्वनियंत्रण गमावलेला समाज हवा आहे ? याचा सरकार आणि समाज या दोघांनीही विचार करणे आवश्यक आहे. दारू न पिणारे सर्वच जबाबदार, चांगल्या सवयी असलेले आणि निरोगी असतात असा माझा अजिबात भाबडा समज नाही. पण दारूबंदी करून सर्वांनाच चुकण्याची एक खूप मोठी सवय कायमची निकालात काढता येऊ शकते.

 दारूबंदी न करता प्रबोधनातून समाज व्यसनमुक्त झाला असता तर आज व्यसनमुक्ती केंद्र कायमची बंद झाली असती. 'संसाराला उद्धवस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू' ही १९९० च्या दशकातील टीव्हीवरील अगदी परिणामकारक जाहिरात होती. ती परिणामकारक होती म्हणूनच आजही अनेकांच्या लक्षात आहे. या प्रकराच्या अनेक जाहिरांतीवर सरकारने आणि स्वयंसेवी संस्थांनी बराच खर्च केलाय. तरीही स्त्री आणि पुरुषांमध्ये भारतात दारू पिण्याचं प्रमाण हे सतत वाढत आहे, असे सर्व अहवाल सांगतात.

स्वनियंत्रण, वेगवेगळ्या प्रचारात्मक साहित्यामधून प्रबोधन हा देशामध्ये उपाय असता तर चायनीज व्हायरस लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर २४ तास पोलीस तैनात करावे लागले नसते. दारूची नशा रोखण्यासाठी देखील हेच लागू आहे. दारूच्या दुष्परिणामातून देशातील खूप मोठ्या पिढीचा बचाव करायचा असेल तर सार्वत्रिक दारूबंदी हाच उपाय आहे. 

2 comments:

Swapnil said...

ओंकार,
नेहेमीप्रमाणे उत्तम विवेचन केलं आहेस.
विषयाच्या सर्व पैलूंचा उहापोह अतिशय प्रभावी आहे. हा लेख मी नक्कीच इतरांबरोबर शेअर करेन, अर्थात तुझ्या नावानिशी :-)
अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा

Unknown said...

ओंकार
विस्तृत लेख आणि विस्तृत विवेचन. तुझा लेख वाचताना मला माझे विचार वाटले. शब्द मात्र नवे होते. तुझा लेख माझ्या प्रत्येक जवळच्या साठी वाचनीय असल्याने मी ते तुझ्या नावाने शेअर करेल आणि अभिमानाने सांगेल माझा मित्र आणि त्याचे विचार ....

तुला पुढील विषयासाठी शुभेच्छा ....

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...