Monday, May 11, 2020

रवींद्र जडेजा : योद्धा क्रिकेटर



'' First they ignore you, then they laugh at you,, then they fight you, then you win''  ESPN Cricinfo या क्रिकेटच्या आघाडीच्या संकेत स्थळावरील रवींद्र जडेजाच्या प्रोफाईलची सुरुवात महात्मा गांधींच्या या जगप्रसिद्ध वाक्याने होते. महात्मा गांधींच्या जन्मगावापासून साधारण १२५ किलो मीटर अंतरावर असलेल्या जामनगरच्या या 'योद्धा क्रिकेटर'ची ही सार्थ ओळख आहे.

भारताने २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. जडेजा या टीमचा सदस्य. डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करणाऱ्या भारतातील अनेक बॉलरपैकी एक म्हणून त्याच्याकडे त्यावेळी अनेकांचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर २००९ साली टी - २० वर्ल्ड कपमध्ये लॉर्ड्सवर इंग्लडविरुद्ध १५४ चा पाठलाग करताना धोनीने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. त्या मॅचमध्ये जडेजाला ३५ बॉल्समध्ये २५ रन्सच करता आले. भारताच्या पराभवाचे खापर या संथ खेळीवर फोडण्यात आलं. क्रिकेट फॅन्सना व्हिलन सापडला. देशांतर्गत स्पर्धेत तीन त्रिशतक झळकावूनही त्याच्यावरील लोकांचे हसणे थांबले नाही. टेस्ट टीममध्ये 'धोनीचा माणूस' म्हणून तो घुसला असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मागील आठ वर्षात  मोठ्या संघर्षानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात रवींद्र जडेजाने स्वत:ला सिद्ध केलंय.फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंगमधील उपयुक्तता सिद्ध केलीय.

जडेजा हा सौराष्ट्रमधील जामनगच्या एका सुरक्षा रक्षकाचा मुलगा. त्याच्या भावकीतले पूर्वज स्वातंत्र्यपूर्व काळात कच्छचे राजे हॉते. राजेशाही वंशातील कोणाताही श्रीमंती त्याच्या घरात नव्हती. जडेजाचे वडील त्याला जामनगरच्या 'रॉयल स्पोर्ट ऑफ क्रिकेट' या क्लबमध्ये कधी तरी घेऊन जात. ते त्या क्लबमध्ये कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचं काम करत. सौराष्ट्राचे दोन मोठे क्रिकेटपटू रणजीतसिंहजी आणि दुलीपसिंहजी हे एकेकाळी या क्लबमध्ये क्रिकेट खेळत असत. मोठी परंपरा असलेल्या याच क्लबमध्ये सौराष्ट्राच्या तिसऱ्या मोठ्या क्रिकेटरची क्रिकेटची पहिली ओळख झाली.

जडेजासाठी क्रिकेट हा फावल्या वेळातील खेळ नव्हता. तर घरच्या गरिबीमुळे जे काही मिळत नाही त्याचा त्रास विसरण्याचे ते माध्यम होते. रॉयल स्पोर्ट्स क्लबच नाही तर संधी मिळेल तिथे तो क्रिकेट खेळत असे. जामनगरचे वर्षातील काही दिवस ५० अंश सेल्सियसच्या जवळ जाणारे तापमान, ओसाड जमिनीवर तासंतास करावी लागणारी फिल्डिंग, मोठ्या वयोगटातल्या मुलांच्या दादागिरीमुळे बहुतेकदा न मिळणारी बॅटिंग यापैकी कशाचाही परिणाम त्याच्या क्रिकेटबद्दलच्या समर्पणात झाला नाही.

 जडेजाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये दोन महेंद्रचं मोठं योगदान आहे. यापैकी दुसरा महेंद्र म्हणजे महेंद्रसिंह धोनी हा सर्वांना माहिती आहे. पहिले महेंद्र होते महेंद्रसिंह चौहान. त्याचे पहिले क्रिकेट कोच. पोलीस दलात काम केलेले महेंद्रसिंह हे प्रशिक्षित कोच नव्हते. पण ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जात. क्रिकेटच्या सरावात कोणतीही हलगर्जी त्यांना खपत नसे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी म्हणून ते त्यांना रट्टे द्यायलाही मागे-पुढे पाहत नसत. क्रिकेट आणि अभ्यास या व्यक्तीरिक्त कोणतीही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेली त्यांना खपत नसे.  जडेजाने एका मॅचमध्ये भरपूर रन्स दिले होते. दुसऱ्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्येही त्याने मागच्या मॅचमधील चुकांची पुनरावृत्ती करत भरपूर रन्स दिले. या ओव्हरनंतर स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या जडेजाची महेंद्रसिंह यांनी मैदानातच धुलाई केली. त्यांच्या या शिक्षेचा तात्काळ परिणाम झाला. जडेजाने त्या मॅचमध्ये ५ विकेट्स घेतल्या !

जामनगर ते सौराष्ट्र क्रिकेटची राजधानी राजकोट हा प्रवास जडेजाने निव्वळ क्रिकेटमधील गुणवत्तेच्या जोरावर केला. घरात आनंद, पेपरमध्ये नाव, समाजात ओळख हे सर्व क्रिकेटमुळेच मिळालं. १९ वर्षाखालील राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर तर घरात पैसा आणि गाडीचे क्रिकेटच्याच जोरावरच आगमन झाले. त्याच दरम्यान जडेजाची आई गेली. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पोरासाठी हा मोठा धक्का होता. या धक्क्याने तो अबोल बनला. एकटा पडला. क्रिकेटनंच त्याला यामधून बाहेर काढलं. मोठा क्रिकेटपटू होण्याचं आईचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय बनलं.

पहिली फिल्डिंग, दुसरी बॉलिंग आणि तिसरी  बॅटिंग असं पॅशन जपणारा जडेजा २००८ च्या १९ वर्षाखालील विश्वविजेत्या टीमचा भाग होता.राजस्थान रॉयल्सने त्याला पहिल्याच ट्रायलमध्ये टीममध्ये निवडलं. फिरकीचा जादूगर शेन वॉर्न त्याच्या खेळानं भलताच प्रभावित झाला. लांब केस, सडसडीत शरीर आणि मैदानावरील ऊर्जेचा अंखड स्रोत असलेला हा पोरगा भविष्यातला 'रॉक स्टार' आहे, असं त्याने जाहीर केलं. आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सनं सर्वांनाच धक्का देत विजेतेपद पटाकवलं. या विजेतेपदासाठी जडेजानं जाम मेहनत घेतली होती.

इंग्लंडमधील २००९ चा टी-२० वर्ल्ड कप सेटबॅक होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सशी नियमबाह्य वाटाघाटी करताना सापडला. एक वर्षाची आयपीएल बंदीची शिक्षा भोगली. चेन्नई सुपर किंग्जने २०१२ साली त्याला मोठ्या किंमतीमध्ये खरेदी केलं. लोकांनी त्याच्यावर 'धोनीचा माणूस' म्हणून शिक्कामोर्तब केलं. जडेजाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या त्रिशतकांवर सारं जग हसत होतं, धोनीनं टेस्ट बॉलर म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली झालेल्या सीरिजमध्ये सहा पैकी पाच वेळा मायकल क्लार्कला आऊट करत त्यानं हा विश्वास सार्थ ठरवला.  इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी तो व्हिलन ठरला होता. त्याच इंग्लंडमध्ये २०१३ साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात त्याच्या बॉलिंगचं मोलाचं योगदान होतं.

इंग्लंड दौरा आणि रवींद्र जडेजा यांच्यात काही तरी वेगळंच नातं आहे. सर्व काही सुरळीत सुरु झालंय असं वाटत असताना २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली. 'ट्रेंटब्रिजच्या ड्रेसिंग रुम आणि खेळपट्टी यांच्यातील पॅसेजमध्ये जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला ढकलंलं.' अशी तक्रार धोनीनं आयसीसीकडं केली. ही घटना घडली त्या पॅसेजमध्ये कोणताही सीसीटीव्ही नव्हता. भारताकडे कोणताही पुरावा नव्हता. इंग्लंडचे प्लेयर्स अँडरसनच्या विरुद्ध बोलतील ही कल्पनाही अशक्य होती. तरीही धोनीनं आयसीसीकडे तक्रार केली. लॉर्ड्स टेस्टपूर्वी सर्व फोकस जडेजावर शिफ्ट झाला.

लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या इनिंगमध्ये भारताची अवस्था ६ आऊट १७९ अशी असताना जडेजा बॅटिंगला आला. त्यानंतर त्याने अँडरसनच्या प्रत्येक बॉलला टार्गेट केलं. अँडरसनच्या बॉलवर तो कधी बीट व्हायचा पण नंतर  भिरकावून द्यायचा...पुन्हा चुकायचा, पुन्हा फेकून द्यायचा. दबावाच्या ओझ्यात त्याने खांदे पाडले नाहीत. त्याच्यातला 'योद्धा क्रिकेटर' जागा झाला होता. याच मॅचमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जडेजानं पहिल्यांदा  तलावारीसारखी बॅट फिरवत आनंद साजरा केला. त्यानंतर जडेजाचे हे ट्रेडमार्क सेलिब्रेशन बनले. ५७ बॉल ६८ रन्स अशी आक्रमक मॅच विनिंग इनिंग तो खेळला.  भारतीय टीम २०११ नंतर जमेकाचा अपवाद वगळता पहिल्यांदाच उपखंडाच्या बाहेर टेस्ट मॅच जिंकली होती.

भारतीय टीममधलं धोनी युग संपलं. विराट युग सुरु झालं. जडेजाच्या भोवती टीकाकारांना सदैव दिसणारं धोनीचं संरक्षण कवच संपलं होतं. तरीही जडेजा टीममध्ये भक्कम उभा होता. विराट कोहलीच्या टीममध्येही त्याचं स्थान अबाधित होतं. भारतीय पिचवरचा तो आर. अश्विनचा भक्कम साथीदार बनला. आता तर भारतीय उपखंडाबाहेर अश्विनच्या अगोदर त्याचा विचार होतो.

पिचची साथ नसेल तर कधी - कधी अश्विनची जादू चालत नाही. अश्विनचा खराब दिवस असतानाही कॅप्टन जडेजावर विसंबून राहू शकतो. तो आपल्या 'बोरिंग लाईन'च्या जोरावर बॅट्समन्सला अडचणीत आणतो. विशाखपट्टणम ( 2016 )  टेस्टच्या शेवटच्या इनिंगध्ये कुक मैदानावर घट्ट चिकटून उभा होता. जडेजाने त्याला बोरिंग लाईनवर बॉलिंग करत भंडावून सोडलं. दिवसातल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तरी जडेजा काही तरी वेगळं करेल अशी कुकला आशा होती. जडेजानं त्याचं व्रत सोडलं नाही. त्याच्या बॉलची 'लाईन अँड लेन्थ' ओळखण्यात कुकने छोटी चूक केली. या चुकीचा फटका त्याला बसला. कुक आऊट झाला. इंग्लंडची टेस्ट ड्रॉ करण्याची आशा संपुष्टात आली. कुक शेवटच्या ओव्हरमध्ये चुकला नसता तर दुसऱ्या दिवशी जडेजानं पुन्हा त्याच पद्धतीनं बॉलिंग केली असती. ग्लॅमरस बॉलिंगप्रमाणे बोरिंग लाईनही टीमला मॅच जिंकण्यात आवश्यक असते हे या 'बोरिंग लाईनच्या राजा' ला पक्कं माहिती आहे.

इंग्लंडमधल्या २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पराभवाचे खापर अश्विन आणि जडेजावर फुटले. दोघांचीही टेस्ट टीममधून हकालपट्टी झाली. चहल - कुलदीपचा उदय झाला होता. त्यानंतर अश्विनला आजवर वन-डे टीममध्ये कमबॅक करता आलं नाही. संजय मांजरेकरनं २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये ज्याचं वर्णन 'Bits & pieces players' असं केलंय त्या जडेजानं फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग या तिन्ही क्षेत्रातील योगदानाच्या जोरावर वन-डे टीममध्ये पुनरागमन केलं. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी झालेल्या आशिया कपमध्ये शांत डोक्यानं बॅटिंग करत जडेजानं अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव टाळला. वर्ल्ड कपमधलं टीममधलं स्थान पक्कं केलं.

वर्ल्ड कपमध्ये जडेजा सुरुवातीला १२ वा खेळाडू म्हणून खेळला. निव्वळ फिल्डर म्हणून 'अंतिम ११ मध्ये निवड हवी' अशी पात्रता असलेला तो पहिला भारतीय खेळाडू. सुरुवातीच्या मॅचमध्ये तो १२ वा खेळाडू या नात्याने फक्त फिल्डर म्हणूनच मैदानावर उतरला. वर्ल्ड कपच्या काळात ऋतिक रोशनच्या 'सुपर ३०' सिनेमाचं ट्रेलर सर्वत्र सुरु होतं. त्या सिनेमात ऋतिकचा एक डायलॉग आहे. समाजताल्या गरीब, वचिंत गटातल्या मुलांना उद्देशून ऋतिक म्हणतो, '' जब समय आएगा तो सबसे लंबा और सबसे बडा छल्लांग हम ही मारेंगे '' ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये जडेजानं मॅक्सवेलचा घेतलेला कॅच आठवून पहा...ऋतिकच्या त्या फिल्मी डायलॉगचा तो 'लाईव्ह डेमो' होता. समाजातील अती गरीब वर्गातील  सुरक्षा रक्षकाच्या मुलानं क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेत बड्या टीम विरुद्धच्या मॅचमध्ये निर्णायक क्षणी मारलेली ती 'छल्लांग' होती.

जडेजा वर्ल्ड कपमध्ये त्याचं काम चोख करत होता. त्याचवेळी कॉमेंट्री करताना वाहवत जाणाऱ्या आणि नकारत्मकतेचा डोस पाजणाऱ्या संजय मांजरेकरनं एक ट्विट करत विनाकारण वाद उकरुन काढला. नाराज जडेजानं मांजरेकरला ट्विटरवरच चोख भाषेत उत्तर दिलं. जडेजाचं हे ट्विट अनेकांना वरिष्ठ खेळाडूचा केलेला अपमान वाटलं. वर्ल्ड कपसारखी सर्वात महत्त्वाची स्पर्धा सुरु असताना वरिष्ठ खेळाडू मर्यादाभंग करत वाट्टेल ते बरळतात. त्यामुळे आपल्या देशाच्या खेळाडूच्या मनस्थितीवर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत. पण त्याला संबंधित खेळाडूंनी काहीच उत्तर द्यायचं नाही....

जडेजा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकटा लढला. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानंतर तो बॅटिंगला आला. त्यावेळी २४० च्या टार्गेटचा पाठलाग करताना ६ बाद ९२ अशी आपली नाजूक अवस्था होती. न्यूझीलंडचे बॉलर्स फॉर्मात होते. त्यांना पिच आणि हवामानाची साथ मिळत होती. महेंद्र सिंह धोनी 'आऊट ऑफ टच' होता. जडेजानं 'योद्धा क्रिकेटर' सारखा त्वेषानं प्रतिहल्ला चढवला. त्याच्या ७७ रन्समुळे आपण मानहानीकारक पराभव टाळू शकलो.

फिल्डिंग आणि बॉलिंग प्रमाणे जडेजा आता बॅटिंगही अधिक गांभीर्याने करु लागला आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टॉप आणि लोअर ऑर्डरमधील समन्वयाचं काम त्याला जमलंय. टेस्ट क्रिकेटमधील फक्त १६ इनिंगमध्ये त्याची सरासरी ही २९.४० वरुन ३५. ४२ इतकी सुधारली आहे. २०१८ आणि २०१९ या वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये सहा ते नऊ क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या फलंदाजामध्ये (किमान १५ इनिंग बॅटिंग हा निकष ) त्याची सरासरी  सर्वात जास्त ५७.०९ इतकी आहे.  ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, जोस बटलर, मोईन अली, बेअरस्ट्रो, क्विंटन डी कॉक या सर्वांपेक्षा जडेजाची या क्रमांकावरील बॅटिंग सरासरी जास्त आहे.

चायनीज व्हायरसमुळे अनेक देश सध्या लॉकडाऊन अनुभवत आहेत. या काळात खेळाडू वेगवेगळे व्हिडिओ करुन फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतायत. जडेजानं हवेत तलवारबाजीचा एक व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला होता.





त्याचे फॅन्स या  व्हिडिओमुळे खुश झाले. काही पत्रकारांना मात्र हा व्हिडिओ चांगलाच झोंबला. 'जडेजा, तू क्रिकेटर कधी होणार ? ' असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांच्या लेखातून त्याला विचारला. जडेजाचं वागणं जातीय आहे. तो स्थानिक गुंड मुलगा आहे का ? हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांच्यावर गैरवर्तनाबद्दल (!!!) बीसीसीआयनं कारवाई केली होती, याची आठवण करुन देत जडेजाच्या अशा व्हिडिओचे कोणत्याही प्रकारे समर्थन होत नाही, असं त्यांनी या लेखात सांगितले होते.  ( लेखाची लिंक देऊन मी जाहिरात करणार नाही. गरजवंतांनी शोध घ्यावा )

खेळाडूंनी सतत 'पोलिटिकली करेक्ट' राहण्याची भाषा करणे हे चुकीचे आहे. त्याचबरोबर जागतिक खेळाडू कसं वर्तन करतात याची माहिती नसल्याचे/ त्यांचा निकष जडेजाला न लावण्याचे हे उदाहरण आहे. बॉक्सर मोहम्मद अली जाहीरपणे राजकीय मतं सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असत. त्यांची धार्मिक ओळख ठामपणे सांगत. अनेक क्रिकेटर्सनी इंग्लंडच्या राणीकडून वेगवेगळ्या संरजामी पदव्या आनंदाने घेतल्या आहेत. त्या अभिमानाने मिरवल्या आहेत.हशीम अमलाने धार्मिक कारण देत मद्याच्या जाहिरातीचा लोगो जर्सीवर लावण्यास नकार दिला. या खेळाडूंच्या स्वातंत्र्याचा ते आदर करतात. त्याचे त्यांना कौतूक वाटते मग जडेजाच्या स्वातंत्र्यावर त्यांचा थयथयाट का होतो ?

रवींद्र जडेजा गेली १२ वर्ष व्यवसायिक पातळीवरचं सर्वोच्च क्रिकेट खेळतोय. कॅप्टन विराट कोहलीच्या बरोबरच त्याची कारकीर्द सुरू झाली. विराट झपाट्याने मोठा होत आज महान खेळाडू बनलाय. रवींद्र जडेजानं प्रत्येक पातळीवर संघर्ष करत स्वत:ला सिद्ध केलंय. टीममधील उपयुक्तता वेळोवेळी जगाला दाखवून दिलीय. आज तो त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फिल्डर आहे. टेस्ट टीममध्ये अश्विनच्या आधी त्याचा विचार केला जातो. बॅटिंगमधील त्याची सरासरी वाढलीय.  तो काही वर्षांनी निवृत्त होईल. तेंव्हा क्रिकेट फॅन्स त्याचे नेहमी ' Bits & pieces' क्रिकेटर म्हणून नाही तर टीमसाठी सतत कमिटेड असलेला 'ऑलराऊंडर' म्हणून स्मरण करतील.  रवींद्र जडेजा या 'योद्धा क्रिकेटर'चा हाच सर्वोच्च सन्मान असेल.
 

5 comments:

Sanket Kad said...

Very well written 👌

NEEL said...

Thank you Onkar for acknowledging such a talented player. He has been always neglected n targeted by privileged but underperforming individuals.
He is not glamorous or flamboyant as kohli, yuvi Pandya ..rather he seems more ethical and cultured.
You saved someone to go unsung!

केदार केसकर said...

Excellent article. Ravindra will be remembered as the powerhouse of cricket...!!!

Talk to Prashant Dhotre said...

Wonderful writing... from unknown to known... but wondering how is he called "Sir Jadeja"...

Shreerang said...

Well written article for deserving cricketer

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...