Friday, March 16, 2012

सेलिब्रेटिंग सचिन


संपूर्ण क्रिकेट विश्वाला गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेले डोहाळे पूर्ण झालेत. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकवण्याचा न भूतो ( तसेच कदाचित न भविष्यतीही ) विक्रम सचिननं केलाय. 100 आंतरराष्ट्रीय शतक झळकवणारा सचिन हा एकमेव ( आणि बहुधा शेवटचा ) क्रिकेटपटू आहे. सचिनच्या या शंभर शतकांचे सेलिब्रेशन करत असताना त्याच्या आजवरच्या काही अविस्मरणीय शतकांचा हा आढावा ( टीप - * खूण नाबाद असल्याचे दर्शविते )

10 )   119* विरुद्ध इंग्लंड ( मॅंचेस्टर , 1990 )
 
   सचिन तेंडुलकरचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक. मॅँचेस्टरच्या टिपीकल इंग्लिश वातावरणात अगदी प्रतीकूल परिस्थितीमध्ये त्यानं झळकावलेलं. तीन टेस्टच्या त्या सीरिजमध्ये भारतीय टीम 1-0 अशी पिछाडीवर होती.इंग्लंडचा कॅप्चन ग्रॅहम गुचनं यापूर्वीच्या लॉर्डस टेस्टमध्ये काढलेले 333 रन्सचे व्रण भारतीय टीमच्या मनावर ताजे होते. त्यातचं मॅंचेस्टर टेस्ट जिंकण्यासाठी दुस-या डावात भारतासमोर आव्हान होते 408 रन्सचे. नवजोत सिद्धू, संजय मांजरेकर, अझहरुद्दीन, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि कपिल देव हे सहा रथी -महारथी धारातिर्थी पडले तेंव्हा स्कोअर होता 6 आऊट 183. पराभवाच्या कडेलोटावर उभं असताना 17 वर्षांचा कोवळा सचिन इंग्रजांविरुद्ध लढला. आक्रमकता आणि संयम याचा सुरेख संगम असलेली एक अविस्मरणीय इनिंग त्यानं क्रिकेटच्या माहेरघरात पेश केली. भारतीय टीमच्या गोकुळाचा डोलारा ह्या कोवळ्या सचिननं अगदी अलगत पेलला.  त्यानं काढलेल्या नाबाद 119 रन्समुळे ही टेस्ट अनिर्णित राखण्यात भारत यशस्वी ठरला.  क्रिकेट विश्वाला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे हे त्या दिवशी ख-या अर्थाने समजलं.

9)  140* विरुद्ध केनिया ( ब्रिस्टॉल, 1999 )


    आपल्या वडिलांच्या वियोगाचे दु:ख बाजूला ठेवत सचिननं झळकावलेलं हे शतक आठवलं की आजही अनेकांचे आपसूकच डोळे ओलावतात. झिम्बाव्वे विरुद्ध झालेल्या धक्कादायक पराभवामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेलेला सचिन केनिया विरुद्धची मॅच सुरु होण्याच्या काही तास अगोदरचं इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. संघहितासाठी आपलं अभाळाएवढं दु:ख त्यानं बाजूला ठेवलं. सचिनच्या बॅटनं निर्माण केलेल्या झंझावातामध्ये केनियाचे दुबळे बॉलर्स  पालापाचोळ्यासारखे उडून  गेले. सचिननं हे शतक आभाळाकडं बघत आपल्या वडिलांना अर्पण केलं. त्यानंतरच्या प्रत्येक शतकानंतर आभाळाकडे बघण्याची प्रथा सचिननं पाळली आहे.







                 8 ) -  103* विरुद्ध इंग्लंड ( चेन्नई 2008 )


   मुंबई हल्ल्या नंतर देशवासियांना झालेल्या जखमेवर मुंबईकर  सचिनचे हे शतक फुंकर घालणारं ठरलं. चेन्नई टेस्ट जिंकण्यासाठी 387 रन्सचं आव्हानात्मक टार्गेट भारतीय टीम समोर होतं. सेहवाग- गंभीर चांगल्या सुरुवातीनंतर परतले. भरवशाच्या द्रविड - लक्ष्मणनं निराशा केली. अशा कठिण परिस्थितीमध्ये सचिननं आपला सारा अनुभव पणाला लावत विजयाचा घास इंग्लंडच्या तोंडातून हिसकावून घेतला.  चेन्नईच्या त्या पिचवर पाचव्या दिवशी अचनाक बॉल उसळत होते तसेच वळत ही होते अशा अवघड परिस्थितीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये फारशा न सरावलेल्या युवराजच्या मदतीनं त्यानं हा अविस्मरणीय विजय प्रत्यक्षात आणला. चौथ्या इनिंगमध्ये तब्बल नऊ वर्षांनी शतक झळकवण्यात सचिन यशस्वी ठरला होता.दबावाखाली टीमला गरज असताना सचिन खेळत नाही असे ओरडणा-या टीकारांना सचिननं आपल्या बॅटनं दिलेलं हे खणणीत उत्तर होतं.


7 )  200 * विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (ग्वाहलेर, 2010)


   वन-डेमधली पहिली डबल सेंच्युरी तीही साक्षात सचिननं झळकावलेली मी पाहिली आहे. असं मी पुढच्या पिढीला नेहमीच अभिमानाने सांगू शकेल. पहिली डबल सेंच्युरी कोण झळकवणार ?  ह्यावर सर्वांचेच आपले-आपले अंदाज होते. मात्र हा पराक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणा-या सचिननच्या बॅटमधून व्हाला असं नियतीला मंजूर होतं.वयाच्या 37 व्या वर्षी तब्बल 20 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवल्यानंतर सचिननं हा पराक्रम केला. विशेष म्हणजे त्याने या 200 धावा आफ्रिकन बॉलर्सच्या विरुद्ध केल्या. बांग्लादेश, केनिया, झिम्बाब्वे यासारख्या दुबळ्या देशांच्या बॉलर्सविरुद्ध नाही. डेल स्टेन, पारनेल, जॅक कॅलिस यासारखे दिग्गज बॉलर्सन आणि सर्व 11 च्या 11 वर्ल्ड क्लास दर्जाच्या क्षेत्ररक्षकांवर मात करत त्यानं ही ऐतिहासिक डबल सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे त्याचे मोल अधिक आहे.

6 ) 117 * विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( सिडनी 2008 )


फायनल मॅचमध्ये सचिन खेळत नाही असे गृहितक मांडणारे क्रिकेट तज्ज्ञ त्याची ही इनिंग हमखास विसरतात.कॉमनवेल्थ बॅंक सीरिजच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं 240 धावांचे लक्ष्य सचिनच्या या शतकाच्या जोरावर भारताने सहज पार केलं. ब्रेट ली, नॅथन ब्रॅकन, मिचेल जॉन्सन आणि जेम्स होप्स या कांगारुच्या बॉलर्सची सचिननं मनोसोक्त धुलाई केली. सलग तीन वर्ल्ड कप पटकवणा-या ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच जमिनीवर तेही फायनलमध्ये सचिननं धक्का दिला.



5 ) 160 विरुद्ध न्यूझीलंड  ( हॅमिल्टन, 2009 )



     2003 च्या दौ-यात न्यूझीलंडच्या पिचचा अंदाज वीरेंद्र सेहवाग वगळता कोणालाच आला नव्हता. त्यामुळे या दौ-यात टीम इंडियासमोर या अपमानाचा बदला घेण्याचं आव्हान होतं. हॅमिल्टनच्या  पिचवर उसळणा-या बॉलची कोणत्याही भारतीय बॅट्समनला सवय नव्हती. सचिननं मात्र या पिचशी सहज जुळवून घेतलं. 90 च्या दशकात सचिन अगदी भरात असताना जशी बॅटिंग करत होता  अगदी तशाच पद्धतीनं त्यानं 2009 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी केली.  सचिनच्या शतकानं तब्बल 33 वर्षांनतर भारताला न्यूझीलंडमध्ये टेस्ट जिंकता आली. तसंच पुढे सीरिज जिंकण्यात आपली टीम यशस्वी ठरली. न्यूझीलंड दौरा म्हंटलं की वेगवान पिचचं आणि तिथल्या संपूर्णपणे अनोळखी वातावरणाचं भूत टीम इंडियाच्या मानगुटीवर बसतं. हे भूत उतरवण्यात सचिनचं हे शतक यशस्वी ठरलं. त्यामुळेच त्याचं हे शतक संस्मरणीय आहे.





              4 )      241* विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( पर्थ, 2004 )


  ऑस्ट्रेलियाचा महान कॅप्टन स्टीव्ह वॉ याची ही शेवटची टेस्ट. स्टीव्ह वॉ साठी भारताविरुद्धची सीरिज म्हणजे 'द लास्ट फ्रंटियर' होती. आपल्या लाडक्या कॅप्टनला सीरिज विजयाची भेट द्यायचीच या निर्धारानं कांगारु पेटले होते. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताचा स्कोअर सुरुवातीला 4 आऊट 157 आणि नंतर 7 आऊट 705 ! हा विशाल स्कोअर उभा राहिला तो सचिन आणि लक्ष्मण ( म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमसाठी संताजी - धनाजी ) यांच्या संस्मरणीय शतकामुळे. या सीरिजपूर्वी सचिनला बराच काळ टेनिस एल्बोनं सतावलं होतं. ऑफ साईडला मारलेल्या काही फटक्यांवर तो आऊट झाला होता. दुखापत, खराब फॉर्म ह्या सा-यांना मुठमाती देत सचिननं सिडनीवर हा डबल धमाका केला. या टेस्टमध्ये ऑफ साईडच्या शॉट्सना मुरड घालत बहुतेक फटके लेगला मारत सचिननं  नाबाद 241 रन्स काढले. शेवटची टेस्ट जिंकण्याचं  स्टीव्ह वॉ चं स्वप्न धुळीस मिळालं. बॉर्डर - गावसकर ट्रॉफी भारताकडेच राहिली.



3)    155* विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( चेन्नई, 1998 )

    ऐन बहारात असलेला सचिन तेंडुलकर कसा खेळायचा याचा अभ्यास आणखी 50 वर्षानंतर कोणत्या क्रिकेट अभ्यासकाला करायचा असेल तर त्याला त्याची ही चेन्नईमधल्या इनिंगच्या हायलाईट्स पाहव्याच लागतील. जगातला 'ऑल टाईम ग्रेट' लेग स्पिनर शेन व़र्न अगदी बहरात होता. सचिन विरुद्ध वॉर्न यांच्यातील लढाईकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष होतं. पहिल्या इनिंगमध्ये सचिनला फक्त 4 रन्सवर आऊट करत वॉर्ननं पहिली फेरी आरामात जिंकली होती. दुस-या इनिंगमध्ये सचिनला परतफेड करण्याची संधी मिळाली.  टेस्टच्या चौथ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये पिछाडीवर असलेल्या टीमच्या बॅट्समननं त्याकाळातील सर्वोत्तम लेगस्पिनरची जोरदार धुलाई केली. राऊंड- द-विकेट बॉलिंग करणा-या शेन वॉर्नला सचिननं स्वीप आणि पूल शॉट्सचा वापर करत खेचेले सिक्सर आणि फोर आठवले की आजही माझ्या अंगावर शहारे येतात. क्रिकेटमधल्या या दोन महान खेळाडूंच्या लढाईत विजेता कोण ? याचं उत्तर क्रिकेट विश्वाला मिळालं होतं. सचिननं केलेल्या याच धुलाईनंतर शेन वॉर्नला स्वप्नातही सचिन दिसू लागला.


     2 )    143 विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( 1998, शारजा )

     अमिताभ बच्चन म्हंटला की त्यानं दिवारमध्ये पिटर आणि त्याच्या पंटरची बंद खोलीत धुलाई हमखास आठवते. तसंच सचिन म्हंटला की त्याची ही शारजामधली वादळी इनिंग हमखास डोळ्यासमोर उभी राहते.फायनलमध्ये पोचण्यासाठी भारताला 254 रन्स करणे आवश्यक होते. डेमियन फ्लेमिंग, शेन वॉर्न, माइक कॅस्पारोविझ यासारखी विकेट्सला चटावलेली बॉलर्सची टोळी कांगारुंकडे होती. ही मॅच सुरु असतानाचं शारजाच्या वाळवंटात वादळ आलं त्यामुळे साहजिकचं मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला. आता भारताला फायनल गाठण्यासाठी 46 ओव्हर्समध्ये 236 रन्स आवश्यक होते. कांगारुंचा तेंव्हाच दबदबा पाहता हे टार्गेट हिमालयाएवढे वाटत होतं. पण दिवार मधल्या अमिताभ प्रमाणे सचिन जिद्दीला पेटला होता. त्याच्या बॅट्नं त्यादिवशी  क्रिकेटमधली एक अविस्मणीय स्क्रिप्ट लिहली. त्यानं अवघ्या 131 बॉल्समध्ये 9 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 143 रन्स काढले. शारजातील वाळवंटात होणारी वादळंही शुल्लक वाटावीत असा झंझावात त्या दिवशी सचिननं निर्माण केला होता. त्याच्या या झंझावातामुळेच भारतीय टीम फायनलमध्ये दाखल झाली होती हे वेगळं सांगयला नकोच. महत्वाच्या वेळेस सचिन खेळत नाही असे ओरडणा-या सचिन विरोधकांनी त्याची ही इनिंग नेहमी लक्षात ठेवावी. सचिनचे फॅन तर ही इनिंग कधीच विसरु शकणार नाहीत.



1)  136 विरुद्ध पाकिस्तान ( चेन्नई, 1999 )

  हे आहे सचिनचं माझ्या मते सर्वोत्तम शतक. तब्बल नऊ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली ही ऐतिहासीक टेस्ट मॅच. पाकिस्तानकडे वासिम अक्रम  आणि वकार .युनूस हे क्रिकेट  जगातले दोन खतरनाक बॉलर्स. त्यांच्या जोडीला संपूर्ण भरात असलेला 'दुसरा' फेम ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताक. युवा शाहिद आफ्रिदीनंही आपल्या 'हातचालाखी' च्या जोरावर  पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेटमधल्या या सर्वात हाय- व्होल्टेज मॅचमध्ये भारतासमोर विजयासाठी 271 रन्सचं लक्ष्य होतं. पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगमुळे भारताची अवस्था 5 आऊच 82. सचिननं  एका बाजूला उभा होता. त्याची आणि नयन मोंगियाची जोडी जमली. य दोघांनी सहाव्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टरनरशिप केली. मोंगिया आऊट झाला तरी सचिन खेळत होता.चेन्नईचे दमट हवामान कोणत्याही क्रिकेटपटूच्या फिटनेसची परीक्षा घेणारचं असतं त्यातचं सचिनला त्या टेस्टमध्ये पाठदुखीनं हैराण केलेलं होतं. तरी देखील आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी विरुद्ध भारताला विजय मिळवून द्यायचाच या एकाच निर्धाराने त्यानं तब्बल 405 मिनिटं बॅटिंग केली. विजय अगदी हातातोंडाशी असताना सचिन आऊट झाला. सचिन परतला तेंव्हा भारताला केवळ 17 रन्स हवे होते. चौथ्या दिवसाचे काही ओव्हर्स आणि पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ बाकी होता. त्यामुळे अगदी रमत-गमत हे रन्स काढले तरी चालणारं होतं. तरी देखील शेवटच्या चौघांना हे लक्ष्य पार करता आलं नाही.सचिन परतल्यानंतर अवघ्या चार रन्समध्ये भारताच्या पुढच्या तीन विकेट्स पडल्या. सचिननं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला भारत  12 रन्सने पराभूत झाला. नेता पडला की कोसळायचं ही आपली जुनी परंपरा ह्या शेवटच्या तिघांनी पाळली. या मॅचच्या हायलाईट्स आजही बघत असताना सचिन नंतर आऊट झालेल्या तिघांच्या कानाखाली समई पेटवावी असंच मला वाटतं.   
               

Thursday, December 15, 2011

सोशल मीडियावरील नियंत्रण : शेरे, ताशेरे अन् मते, मतांतरे




सध्या फक्त एकच गोष्ट सेन्सॉर होण्याची गरज आहे आणि ती म्हणजे कपिल सिब्बल यांचे तोंड!'
'फेसबुकवर स्टेटस अपडेट करताना प्रत्येक वेळी सिब्बल यांची परवानगी घ्यायची काय?'अशा उपरोधिक प्रतिक्रियांपासून ट्विटरवर 'इडियट कपिल सिब्बलअसा हॅश टॅग देण्यापर्यंत विविध प्रकारे नेटकरांनी सिब्बल यांच्यावर हल्ला चढविला आहे. त्याला कारण आहे ती सिब्बल यांची सूचना. सोशल मीडिया संकेतस्थळावर नियंत्रण घालण्याची. फेसबुकट्विटरऑर्कूट आदी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर देशातील राजकीय नेते आणि धार्मिक समूहांच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह छायाचित्रेमजकूर प्रसिद्ध होण्यापूर्वी संपादित करण्यात यावा किंवा हटविण्यात यावाअशी सूचना माहिती-तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी याहूगुगल या कंपन्यांना केली आहे. 


या संकेतस्थळांवरत्यातही प्रामुख्याने फेसबुकवर सोनिया गांधी तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे संतप्त होऊन सिब्बल यांनी हा इशारा दिल्याचे म्हटले जाते. पण फेसबुकसारख्या संकेतस्थळांवरील विविध राजकीय नेतेसंघटनापत्रकारितेसारख्या अन्य क्षेत्रातील व्यक्ती यांच्याविरोधातील टीकेचा स्तरत्यातील विखारीपणा पाहता सिब्बल यांना याबाबत संशयाचा फायदा देणे गरजेचे आहे. म्हणजे केवळ कॉंग्रेस नेत्यांवरील टीकेमुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहेअसेच काही म्हणता येणार नाही. गुगलकडे ते जेव्हा आपली सूचना घेऊन गेलेतेव्हा त्यांनी जो मजकूर व छायाचित्रे सादर केली होतीती काही सगळीच सोनिया गांधी वा मनमोहन सिंग यांच्याबद्दलची नव्हती. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे मुंबईतल्या एका उपनगरात दंगल भडकण्याची वेळ आली होतीहेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे. यां सारख्या काही घटनांतून सिब्बल यांनी तशी सूचना केली असावी. आपल्या कार्यकाळात ट्विटर मंत्री म्हणून ओळखले जाणारे माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूरकॉंग्रेसचे खासदार मिलिंद देवराजम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांसारख्या व्यक्तींनी सिब्बल यांच्या सूचनेला याच मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे. काही आक्षेपार्ह मजकूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची सेन्सॉरशिप आवश्यक आहेअसे ट्विट थरुर यांनी केले आहे. भाजपनेही या सूचनेला सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. पण या सर्वांहून विरोधाचा आवाज मोठा आहे.



सायबर विश्वातून तर सिब्बल यांच्यावर जणू ऑनलाइन आक्रमणच सुरु आहे. देशातील सर्वसामान्य नेटिझन्सचे ( विशेषत: युवकांचे ) विचारांचे प्रकटीकरण करण्याचे माध्यम म्हणून आता फेसबुक ओळखले जाते. फेसबुकचा वापर करणा-या अनेक युझर्सनी सिब्बल यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियाचा गळा दाबून भारताला चीन किंवा पाकिस्तानाच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न थांबवा असे आवाहन काही नेटिझन्सनी केले आहे. काहींनी तरसिब्बल यांच्या सेन्सॉरशिपवरील संभाव्य विधेयकाचे Social Networking Inspection Act ( SONIA ) असे बारसेच करून टाकले आहे! सामान्य नेटिझन्स प्रमाणे सेलिब्रिटींनींही टिविटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सोशल मीडियावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. सरकारला हीच क्षमता सलत असावीअसे मत चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी व्यक्त केले आहे. तर केवळ आपल्या मॅडमचे खासगी आयुष्य जपण्यासाठी दहा कोटी इंटनेट युझर्सवर सरकार अन्याय करणार का असा सवाल स्तंभलेखिका शोभा डे यांनी विचारला आहे. चित्रपट निर्माते प्रीतीश नंदी यांनीहा माझा देश आहे आणि मला माझ्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यावर आक्रमण करणा-यांनी नरकात जावेअशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. 



सेन्सॉरच्या योग्यायोग्यतेचा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवलातरी एक सवाल उरतोच. तो म्हणजे अशा प्रकारची सेन्सॉरशिप मुळात शक्य तरी आहे काफेसबुक ट्विटरवरील चर्चेत नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त करत असतानाचा ही सेन्सॉरशिप कितपत व्यवहार्य आहे. पुण्यातील गौरव मित्तल या अभियंत्याने याबातची सविस्तर आकडेवारीच मांडली आहे.  यू ट्यूबवर दर मिनीटाला सुमारे ४८ तासांचे व्हिडीओ अपलोड होत असतात. फेसबुकचे जगभरात ८० कोटी तर भारतामध्ये सुमारे २५ कोटी वापरकर्ते आहेत. ज्या प्रमाणे टेलिफोन कंपन्यांनाकडून त्यांच्या ग्राहकांकडून पाठविण्यात येणा-या प्रत्येक संदेशाचे नियंत्रण करणे अशक्य आहे. त्याच प्रमाणे सोशल नेटवर्किंग संकेत स्थळाकडूनही प्रत्येक वापरकर्त्याने अपलोड केलेल्या माहितीवर नियंत्रण ठेवणे हीसुद्धा अशक्य कोटीतील बाब आहे, असा बिनतोड युक्तिवाद गौरव यांनी केला आहे.

कपिल सिब्बल यांच्या विरोधातील एक कम्युनिटीही फेसबुकवर आहे. या कम्युनिटीची लोकप्रियताही मागील काही दिवसात वाढली आहे. या कम्युनिटींवर काही जणांनी आक्षेपार्ह भाषेत सिब्बल यांच्यावर ताशेरे ओढले असले तरी काही अभ्यासू युक्तिवादही केलेले आढळतात. नवी दिल्लीच्या आशिष माहेश्वरी या उद्योजक युवकाने मांडलेल्या मताचा याबाबत आवर्जून उल्लेख करावा लागेल. केंद्र सरकारला ग्रृप च्या ५० लाख कर्मचा-यांना लोकपाल विधेयकाच्या अंतर्गत आणणे शक्य नाही. मात्र फेसबुक किंवा गुगलने सुमारे २५ कोटी युझर्सवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा कशी करता येईल असा सवाल माहेश्वरी यांनी विचारला आहे. काही आक्षेपार्ह शब्द किंवा काही चित्रांची यादी तयार करुन फार तर त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. पण त्यालाही मर्यादा आहेत. फेसबुक किंवा गुगल प्लसवरील काही बंदिस्त गटांमध्ये किंवा काही विशिष्ट मित्रांपुरत्या मर्यादीत असलेल्या मजकुरावर नियंत्रण कसे ठेवणार? त्या गटातील माहितीवर नियंत्रण ठेवणे हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच हल्ला आहे. ज्या देशाने आपल्या राज्यघटनेत हे एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक नागरिकाला आचार-विचार-उच्चार स्वातंत्र्य दिले आहे. तेथे अशा प्रकारची सेन्सॉरशिप कोणत्या कलमात बसवणारहे घटनातज्ज्ञ असलेल्या सिब्बल साहेबांनी देशाला समजवून सांगण्याची गरज आहे! अशा आशयाचा सूर या कम्युनिटीच्या सदस्यांनी आपल्या चर्चेतून व्यक्त केला आहे.


भारतामध्ये नाही तर सातासमुद्रापार अमेरिकेमधील भारतीयांमध्येही या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत.
अमेरिकेतील भारतीय नेटिझन्सनी यामध्ये अमेरिका आणि भारताची तुलना केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावाने जर इंटरनेचवर सर्च केले तर अनेक आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ आपल्याला सहजपणे आढळतील. मात्र त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिमेला धक्का बसला आहेअमेरिकेतील लोकशाहीचा गैरवापर होत आहेअशा प्रकारची ओरड कोणीही करत नाही. अमेरिकेनेने सोशल माध्यमांचात्याच्या चांगल्या आणि त्रासदायक बाजूंसह स्वीकार केला आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तर मग भारतामध्ये सिब्बल साहेब या अमेरिकेच्या पॅटर्नचे अनुकरण का करत नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावर अंशत: सेन्सॉरशिप लादण्याचा विचार सिब्बल यांनी बोलून दाखवला आहे. गर्भधारणा आणि सेन्सॉर अंशतः असू शकत नाहीया आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. ती सिब्बल यांनी लक्षात घेतली नसावी. कारण सेन्सॉरशिप ही एकतर असते किंवा नसते.असा सूरही काही अमेरिकी नेटिझन्सनी व्यक्त केलेला आढळतो.


सोशल मीडिया लोकप्रिय झाला याचे महत्वाचे कारण म्हणजे या माध्यमामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा वृत्तपत्रे यां माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना अभिव्यक्त होण्यास काही  मर्यादा आहेत. सोशल मीडियाने मात्र प्रत्येकाला आपले विचार दुस-यापर्यंत पोहचवण्याचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या माध्यमाच्या वापरकर्त्यांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हे याचेच द्योतक आहे. या व्यासपिठावर लोक चर्चा करतातगप्पा मारतातएकमेकांना विनोद सांगतात तसेच गंभीर विषयांच्या चर्चेत सहभागीही होतात. आपल्या परिसरातीलराज्यातीलदेशातील समस्या या छायाचित्रे तसेच व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अलिकडच्या काळात जगात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांचा जन्म याच व्यासपीठावर झाला आहे. निपचित पडलेल्या सरकारला जागे करण्याचे काम पूर्वी हे काम राजकीय पक्ष किंवा संघटना करत असतआता सामान्य नेटिझन्स करत आहेत. सोशल मीडियाच्या याच स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न सिब्बल करत आहेत अशी तक्रार या सोशल मीडियाशी एकरुप झालेल्या  वर्गाने केला आहे. कपिल सिब्बल यांचे तोंड सेन्सॉर करा अशा आशयाचा टाहो या वर्गातून फोडला जात आहे तो यामुळेच. 

टीप - दै. लोकसत्तामध्ये १२ डिसेंबर २०११ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख  लोकसत्तामधील लेख इथे पाहता येईल 

Thursday, December 8, 2011

सेहवाग नव्हे सिंघम !



तो खेळताना त्याचे पाय हलत नाहीत....
त्याचा फॉर्म हरपलाय ......
कर्णधार पदाचे गांभीर्य त्याच्या बॅटिंगमध्ये दिसत नाही
त्याचे रनिंग-बिटविन द विकेट गचाळ आहे सहकारी खेळाडूंना तो हमखास बाद करतो किंवा स्वत: बाद होतो
त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या आहेत... त्याच्या कानात दोष निर्माण झाला आहे ...

इंदूरमध्ये आज झालेल्या वन-डे पूर्वी वीरेंद्र सेहवागर अशा अनेक प्रकरे टीका होत होती. एखादा सामान्य खेळाडू अशा प्रकारच्या टीकेमुळे कोषात जाऊ शकतो. पण हा वीरेंद्र सेहवाग आहे. त्याचे खेळताना पाय हलत नाहीत पण तो जेंव्हा खेळतो त्यावेळी धावफलक इतक्या जोराने पळू लागतो की समोरच्या टीमच्या खेळाडूंना अक्षरश: धाप लागते. त्याचा फॉर्म हरपलाय अशी जेंव्हा टीका होते त्यावेळी तो अशी काही खेळी खेळतो की त्याची हेटाळणी करणा-यांचे दात घशात जाऊन वेगळ्याच वाटेने शरिराच्या बाहेर पडतील की काय अशी शक्यता निर्माण होते.

एक कॅप्टन म्हणून आज तो जी खेळी खेळला आहे. तो विक्रम मोडण्याचे स्वप्न बघत आता भविष्यातले कित्येक महान कॅप्टन निवृत्त होणार आहेत. त्याच्या रनिंग बिटिवन-द विकेटमध्ये नेहमीच घोळ असतो. त्यामुळे सहकारी खेळाडू रन-आऊटही होतात. मात्र तो रंगात असला की या चुकीची सव्याज परतफेड करु शकतो. आजही गंभीर आणि रैना चांगले सेट झाल्यानंतर रन-आऊट झाले. मात्र ते कुणीही खिचगणतीत पकडले नाही. त्याच्या शारिरीक हलचाली मंदावल्या असतील पण जागेवर उभे राहून काही कळायच्या आत बॉलला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देण्याची शक्ती त्याच्या मनगटात आहे. मध्यंतरी त्याच्या कानात दोष निर्माण झाला होता. पण  त्याच्या फटकेबाजीमुळे उत्साहित झालेले प्रेक्षक जेंव्हा मैदान डोक्यावर घेतात. तेंव्हा त्यांच्या आवाजाने मैदानावर उपिस्थत असलेल्या खेळाडूंचे कान बधिर होऊ शकतात. ७० च्या दशकात अमिताभ पडद्यावर आला की त्याच्या सोबत कोण आहे याकडे कुणाचेही लक्ष नसायचे. सर्वांची नजर अमिताभ काय करणार यामध्ये सर्वांचे लक्ष असायचे.तसे सेहवाग भरात असला की त्याच्या सोबत कोणताही ग्रेट बॅट्समन खेळत असला तरी त्याची पर्वा कुणीच करत नाही. त्यामुळेच वन-डे क्रिकेटमध्ये २०० रन्सचा टप्पा सर्वात प्रथम सेहवाग पार करेल असा माझा अंदाज होता. यापूर्वीच्या माझ्या ब्लॉग
मध्ये मी तो व्यक्तही केला होता. पण तो टप्पा सर्वप्रथम सचिनने पार केला. आता सेहवागने सचिनचा हा रेकॉर्ड नुसताच मोडला नाही तर आणखी उंचीवर नेऊन ठेवला आहे.

मराठी साहित्य निर्मितीमध्ये जेंव्हा  व्याकरणाच्या नियमांचा बोलबाला होता. त्याकाळात मराठीमध्ये मुक्तछंद हा कविता प्रकार सुरु झाला. वीरेंद्र सेहवागची बॅटिंग म्हणजेही मुक्तछंदामधली कविता असते.  क्रिकेटमध्ये कोणत्याही नियमांमध्ये चौकटीमध्ये त्याला बसविता येत नाही.

देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाप्रमाणे त्याची बॅट नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडूंना आव्हान देत असते. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या ! असा इशारा तो समोरच्या प्रत्येक बॉलर्सना देत असतो. चांगला बॉल, खराब बॉल, उसळता बॉल किंवा आखूड बॉल अशा प्रत्येक प्रकारच्या बॉलवर त्याने षटकार खेचला आहे. अगदी शतकाच्या नव्हे तर त्रिशतकाच्या उंबरठ्यावरही त्याने हे अचाट साहस वारंवार केले आहे. कधी तो फसतो या प्रयत्नात तो २९३ किंवा १९५ वर आऊटही झाला आहे. म्हणून तो कधीही दडपणामध्ये येत नाही. अगदी या इंदूर वन-डेमध्येही त्याने १५० ते २०० हे अंतर अवघ्या २८ बॉल्समध्ये पार केले.
            क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूंचे मोठेपण हे नेहमी आकड्यांच्या तराजूमध्ये मोजले जाते. सचिन, ब्रॅडमन, लारा, द्रविड किंवा पॉन्टिंग यांनी शतके किंवा त्यांच्या नावावर असलेली भरमसाठ रन्स याचे दाखले नेहमी दिली जातात. या सर्व महान खेळाडूंच्या यादीत सेहवागच्या नावाचा फारसा उल्लेख केला जात नाही.

टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमध्ये डबल सेंच्युरी मारणारा तो जगातला एकमेव बॅट्समन आहे. टेस्टमध्ये दोन वेळा ३०० चा जादूई आकडा पार करणे हे केवळ ब्रायन लारा ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवागला जमले आहे. या यादीमध्ये त्याच्या पुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन हे एकच नाव आहे. टेस्टमधली सर्वात जलद ट्रिपल सेंच्युरी आणि वन-डेमधली सर्वात जलद डबल सेंच्युरी त्यानेच झळकावली आहे. १० वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये २२ सेंच्युरी त्यापैकी १४ वेळा दिडशेपेक्षा जास्त रन्स , ४ डबल सेंच्युरी आणि २ ट्रिपल सेंच्युरी करण्याचा पराक्रम हा दुस-या कोणत्याही भारतीय बॅट्समनने केलेला नाही. इंग्लंड विरुद्ध २००८ साली चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या इनिंगमध्ये साधारण १०० ओव्हर्समध्ये ३८७ रन्स करण्याचे टार्गेट वीरेंद्र सेहवाच्या झंझावती सुरुवातीमुळेच ( ६८ बॉल्स ८३ रन्स ) शक्य झाले होते.

तसेच जेंव्हा टेस्ट मॅच वाचवण्याची वेळ येते तेंव्हाही सेहवागने भारतीय टीमच्या मदतीला धावून आला आहे. २००८ साली अॅडलेड टेस्टमध्ये टीममध्ये जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केल्यानंतर त्याने काढलेल्या १५१ रन्समुळे भारताला पराभव टाळता आला होता. तसेच त्याच वर्षी श्रीलंकेमध्ये त्याने सलमीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहत २०१ रन्सची खेळी केली होती. ( त्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा स्कोअर होता सर्वबाद ३२९ ).

वेस्ट इंडिजच्या पिचवर हॅल्मेट नसताना उसळत्या बॉल्सचा सामना करत गावस्करने झळकावलेली शतके जबडा फाटल्यावर बॉलिंग करणारा कुंबळे किंवा चेन्नई टेस्टमध्ये जीवघेण्या पाठदुखीवर पर्वा न करता सचिनने विजयासाठी केलेली एकाकी धडपड या इनिंग सर्वांच्या लक्षात आहेत. या सर्व इनिंग ग्रेट आहेत याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सेहवागला त्याच्या करियरमध्ये अशा प्रकारची कोणती मोठी दुखापत आजवर झाली नाही.  मात्र २००७ मध्ये त्याला टीमच्या बाहेर बसवण्यात आले. त्याच्या खेळण्याच्या तंत्रामध्ये दोष आहे. त्याची वृत्ती क्रिकेट खेळण्यास साजेशी नाही अशा प्रकारची वारंवार टीका त्यावर केली गेली. या सर्व मानसिक दडपणानंतरही सेहवागने आपले तंत्र बदलले नाही. आपली वृत्ती सोडली नाही. उलट २००८ ते २००११ या मागील चार वर्षातील त्याच्या अनेक खेळी थक्क करुन सोडणा-या आहेत. आपल्याला नावं ठेवणा-या जगाला अंगावर घेऊन खेळातील तंत्रामध्ये फारसा बदल न करता, आक्रमक वृत्तीला मुरड न घालता यशस्वी होता येते हे सेहवागने सिद्ध करुन दाखवले. अशा प्रकारचा कणखरपणा जगातील किती क्रिकेटपटूंमध्ये आहे  ?

    जंगलात अनेक प्राणी असतात. कुणी बुद्धीमान असतो, कुणी चतूर असतो, कुणी चपळ असतो तर कुणी प्रचंड शक्तीशाली असतो. पण या सर्वांच्या गर्दीमध्ये सिंहाचे श्रेष्ठत्व कुठेही झाकले जात नाही. तसेच शतके अनेक जण झळकावतात... सिक्स फोर्सची बरसातही अनेक करतात... मोठ्या खेळी करणारेही अनेक आहेत. पण जेंव्हा सेहवाग हे सर्व करतो त्याची सर अन्य कुणालाच येत नाही. वीरेंद्र सेहवाग हा क्रिकेट विश्वातला सिंघम आहे.
          वीरेंद्र सेहवागवरील माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Thursday, October 27, 2011

पुस्तक नव्हे मसालापट !

 
गोपाळ हा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि जमीनीच्या वादाने खंगलेल्या निवृत्त शिक्षकाचा मुलगा. आरती ही एका जिल्हाअधिका-याची मुलगी. दोघेही वर्गमित्र. इयत्ता पाचवीमध्ये असताना गोपाळ आरतीच्या डब्यातला चॉकलेट केक चोरतो...गोपाळची चोरी पकडली जाते गोपाळला शिक्षा होते. मात्र या घटनेनंतर गोपाळ आणि आरती  मित्र बनतात. वेगळ्या आर्थिक आणि समजिक स्तरातील गोपाळ आणि आरती एकमेकांचे अगदी जिवलग मित्र बनतात. त्यानंतर गोपाळ आरतीकडे आकर्षिला जातो

आरती आणि गोपाळ यांच्या या कथेतला तिसरा कोन आहे तो म्हणजे राघव. या दोघांचा वर्गमित्र गोपाळ गरीब आणि आरती श्रीमंत असल्यामुळे उरलेला तिसरा स्तर याच्या वाटेला आलाय अर्थात राघव आहे  मध्यमवर्गीय. AIEEE आणि JEE सारखी खडतर परीक्षा पास झालेला स्कॉलर विद्यार्थी. इंजिनियर झाल्यानंतर इन्फोसिसची नोकरी नाकारत  पत्रकारिता हा व्यवसाय निवडणारा ध्येयवादी तरुण. हा राघव  आरतीच्या प्रेमात पडतो तर आरती त्याक्षणी साधारण असलेल्या गोपाळच्या ऐवजी स्कॉलर म्हणून ओळखल्या जाणा-या राघवकडे आकर्षिली जाते.आरतीने आपल्याला नाकारुन राघवचा स्वीकार केला आहे ही बाब गोपाळला  अस्वस्थ करत असते.त्यामुळे गोपाळ सतत आपण राघवपेक्षा श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. परिस्थितीने गांजलेल्या आणि प्रेमात आपटी खालेल्या गोपाळची भेट स्थानिक आमदाराशी होते आणि त्याची परिस्थिती बदलू लागते. गोपाळची जमिन आणि आमदाराचा पैसा याचा संगम होऊन गंगा टेक हे एक नवे खासगी कॉलेज तयार होते.कोणतीही डीग्री नसलेला गोपाल या कॉलेजचा संचालक होतो. राघववर मात करण्याचे त्याचे प्रयत्न सफल होत आलेले असतानाच गोपालला आपल्या चुकीच्या वागण्याचा साक्षात्कार होतो. अत्यंत नाट्यमय रित्या तो स्वत:ला आरती समोर खलनायक ठरवतो. ज्या राघवला त्याने देशोधडीला लावलेले असते त्याला पुन्हा एकदा स्थिर होण्यासाठी पडद्याआडून मदत करतो आरती आणि राघव यांना पुन्हा 'एकत्र' आणण्यात महत्वाची भूमिका बजावतो. नायक आणि नायिकांचे मिलन होतो आणि हे मिलन घडवून आणल्याबद्दल खलनायकालाही सहानभूती मिळते. कोणत्याही मसाला हिंदी चित्रपटला शोभेल असे हे कथानक आहे  'रिव्ह्युलेशन २०२०'  या चेतन भगत यांच्या ताज्या पुस्तकाचे. 

दोन मित्र आणि त्यांची एक कॉमन मैत्रीण यातल्या कथानकाचे नाव Revoltion 2020 कसे असू शकेल ? हे पुस्तक आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे. मार्कांच्या उतरंडीवर आधारित असलेल्या या शिक्षणपद्धतीत सर्वात वरच्या १० टक्के स्तरातीलच मुले आपल्याला हवे ते शिकू शकतात. पण बाकीच्या ९० टक्क्यांचे काय ?  IIT सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये  आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची सुरु असलेली धडपड.सुरु असते. या पुस्तकातील गोपालचे वडील ही त्याच प्रकारातले आहेत. ते गोपाल पहिल्या प्रयत्नात प्रवेश परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात अपयशी होतो. त्यामुळे ते गोपालला  कोटाच्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवतात. कोटामधले कोचिंग क्लासेसची रचना, तिथली प्रवेश पद्धती,कोचिंग क्लासेसवर आधारित तेथिल  अर्थव्यवस्था हा प्रकार पुस्तकात चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गोपाल दुस-या प्रयत्नातही प्रवेश परीक्षेत चांगले मार्क्स घेण्यात अपयशी होतो. अपयशी झालेला गोपाल वारणसीमध्ये परततो आणि चेतन भगतांची गा़डी पुन्हा एकदा गोपाल आरती आणि  अधूनमधून राघव या स्टेशनवर फिरत राहते.

           या पुस्तकाचा नायक ( म्हणजे ज्याला शेवटी नायिका मिळते  तो ) राघव याला क्रांती घडवायची आहे. तो त्यासाठी इंजिनयर असूनही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पत्रकारिता सुरु करतो. बड्या वृत्तपत्रातील नोकरी गेल्यानंतर स्वत:चे वृत्तपत्र सुरु करतो. या वृत्तपत्राच्या माध्यमातून शिक्षण  क्षेत्रातील भ्रष्टाचार बाहेर काढतो. त्यामुळे स्थानिक आमदाराची जेलमध्ये रवानगी होते. हे सगळे ठिक. आमदाराशी पंगा घेतल्यामुळे त्याचा पेपर उद्धवस्त होतो हे देखील मान्य. मात्र नंतर ज्या वृत्तपत्रामधून आपल्याला काढून टाकण्यात आले तेच वृत्तपत्र आपल्याला परत का बोलावते ? हे त्याला समजत नाही.ज्या वृत्तपत्राने दबावामुळे  आपल्याला काढून टाकले त्याच वृत्तपत्राने आपल्याला परत घेतले यामागे काही राजकारण असू शकते् हे त्याला का वाटत नाही ?  गोपाल आणि आरतीमधले प्रसंग त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर होणा-या भेटी यामध्ये इतकी पाने खर्ची करण्यात आली आहेत की त्यामुळे राघवच्या आयुष्यात  घडणारी ही  स्थित्यंरे अत्यंत घाई घाईने उरकण्यात आली आहेत असे वाटते. 

एखाद्या व्यवसायिक चित्रपटामध्ये ज्या प्रमाणे नाच गाणे, नायक नायिकांमधले भावोत्तकट प्रसंग यात बरीच रिळे खर्च केली जातात. ही सर्व दृश्य पिटातल्या प्रेक्षकांना सुखावणारी असतात. त्यामुळे गल्लाही चांगला जमतो. मात्र त्यामुळे एक सशक्त चित्रपट पाहिल्याचे समाधान सच्चा रसिकांना होत नाही. चेतन भगतच्या या पुस्तकाचेही असेच आहे. 
   
              अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचार हा विषय तरुणाईच्या अजेंड्यावर आला आहे. या  आंदोलनाच्या काळात चेतन यांनी  ठाम समर्थन केले होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार ही मध्यवर्ती थीम असलेलले पुस्तक असा प्रचार करत चेतन भगत यांचे नवे पुस्तक बाजारात आल्याने त्याच्याकडून अपेक्षा मोठ्या होत्या. मात्र या अपेक्षा तू पूर्ण करु शकलेला नाही. हे पुस्तक भ्रष्टाचार , नवी क्रांती याबाबतचे पुस्तक नसून एका मुलीला प्राप्त करण्यासाठी दोन मित्रांमध्ये असणा-या स्पर्धेबाबतचे वाटते.  

फाईव्ह पॉईंट समवन या सारख्या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे चेतन भगत हे लेखक आहेत. सहसा पुस्तके वाचण्याच्या फंदात न पडणारे अनेक तरुण त्यांचे पुस्तक आवडीने वाचतात. त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे तरुणाईची 'भाषा' समजणारा लेखक म्हणून चेतन भगत यांचे नाव घेतले जाते. त्याच चेतन भगत यांनी  निराश केले आहे. मळलेली वाट सोडून  एका नव्य वाटेवर चालणारी, प्रस्थापित रचनेच्या विरुद्ध काही तरी वेगळे करण्याची धमक दाखवणा-या व्यक्ती हे आजच्या तरुणाईचे आयडॉल आहेत. अण्णा हजारे किंवा स्टीव्ह जॉब्ज यांना गेल्या काही महिन्यात ज्या पद्धतीने तरुणाईने उचलून धरले त्यातून हे सिद्ध होते. चेतन भगत यांनाही आपल्या या पुस्तकातून वास्तवदर्शी पुस्तक लिहण्याची चांगली संधी होती. मात्र त्या मार्गावर फार न जाता केवळ त्या वेगळ्या वाटेचे मार्केटिंग करत त्यांनी एक साचेबद्ध पुस्तक सर्वांसमोर ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकेल अशा  एका नव्या मसालापटाची कथा आपण या पुस्तकात वाचली इतकेच समाधान या पुस्तकातून होऊ शकेल. 
 





Wednesday, October 5, 2011

एक होता 'युवराज' !


परक्रमी राजा , त्या राजाने लढलेली युद्ध त्याचा दरबार त्याला असलेले अंतर्गत आणि बाह् शत्रू त्या राजाची मुलं त्याला मुलांमध्ये असलेली स्पर्धा त्यातही ती सावत्र भावंड असतील तर त्यांच्यामध्ये सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्याची असलेली तयारी हे विषय काही नवे नाहीत. महाभारतापासून ते अगदी काल-परवा प्रसिद्ध झालेल्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा हाच गाभा राहिला आहे. किरण नगरकर यांनी लिहलेल्या 'ककल्ड' या पुस्तकाची कथा आहे एका युवराजाची. बहुतेकांना संत मीराबाई माहिती असतात. भक्ती परंपरेत या मीरेला मोठं स्थान आहे. या मीरेचे सासरे आणि सर्वात शक्तीशाली राजपूत राजे राणा संग यांच्या परक्रमांच्या आणि त्यांना प्रत्येक युद्धात झालेल्या जखमांच्या अख्यायिकाही अनेकांना माहिती असतील. मात्र या मीरेचा पती या राज संग यांचा सर्वात ज्येष्ठ मुलगा भोजराज याचे काय ? काळाचे पुढे बघणारा, कोणत्याही शूर राजपुतांपेक्षा शौर्यामध्ये काकणभरही कमी नसलेला हा युवराज नेमकं काय रसायन होतं हे कुणालाचं माहिती नाही. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला घडलेली ही युवराजाची कथा इतिहासात हरवलेली आहे. इतिहासाने ज्याचे अस्तित्वच पुसून टाकले त्या युवराजाला प्रकाशात आणण्याचे काम नगरकरांनी आपल्या या पुस्तकात केले आहे.


            हा कालखंड आहे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा. राणा संग यांच्या नेतृत्वाखालील मेवाड हे एक सामर्थ्यशाली राज्य त्या काळी हिंदूस्थानात होते. मेवाडच्या या वैभवशाली राज्याचा वारस भावी राणा म्हणजे युवराज. भूतकाळापासून बोध, वास्तवाचे भान आणि भविष्यकाळाचा अचूक वेध घेण्याची शक्ती ह्या युवराजामध्ये आहे. मेवाडला अधुनिक युगाला साजेसं घडवणे हाच त्याचा ध्यास आहे. याबबत त्याचे सतत चिंतन सुरु असते. राजे, सरदार, राण्या, दास-दासी अगदी हिजडे अशा प्रचंड मोठ्या गदारोळातही हा युवराज एकाकी आहे. त्याचा बायको ( हिरवे डोळेवाली हे युवराजनं ठेवलेलं तिच नाव ) त्याला जवळ येऊ देत नाही. अगदी  पहिल्याच रात्री  आपला 'संबध' शक्य नाही असे त्याला स्पष्टपणे सांगते. तो असह्य होतं. अगतिक होतं, बेचैन होतं मात्र कधीही तिच्यावर बळजबरी करत नाही तिच्यावर पुरुषी वर्चस्व गाजवत नाही. त्यामुळे षंढ हा शिक्का त्याच्या कपाळावर बसतो. त्याची सावत्र आई राणी कर्मावती आणि सावत्र भाऊ विक्रमादित्य त्याचं हे खासगी दु;ख जगाच्या वेशीवर टांगतात. वेगवेगळ्या अख्यायिकांमधून युवराज बदनाम होत राहील याची काळजी  घेत असतात.


             भारतीय परंपरेत 'परमेश्वर पियकर' असणे ह्याला मोठे महत्व आहे. त्याला खूप मोठा संदर्भ आहे. मात्र ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्या भावी आयुष्याची स्वपनं रंगवणा-या शक्तीशाली सम्राटाच्या कर्तबगार मुलाच्या आयुष्यात जेव्हा अशी  परमेश्वराला प्रियकर मानणारी स्त्री येते तेंव्हा त्याची काय अवस्था होत असेल ? आपला 'प्रतिस्पर्धी ' हा दुसरा कोणी नसून  खुद्द श्रीकृष्ण ( बन्सीबाज ) आहे हे जेंव्हा समजते त्यावेळी तो अस्वस्थ होऊन जातो. एका पतीचं हे अस्वस्थ होणं  नगरकरांनी अत्यंत तपशीलवार आणि समर्थपणे उभे केले  आहे ते मुळातूनच वाचायला हवे.

    सर्वांच्या गोतावळ्यात राहणा-या या युवराजाचा सखा असतो तो म्हणजे श्रीकृष्ण. ज्याच्या मनात आपल्या प्रतिमेविषयी कसलाच न्यूनगंड नाही असा देव. युवराजाला सतत वाटायचं की श्रीकृष्ण हा एक नाही किमान तीनचार तरी श्रीकृष्ण होते. तो अष्टपैलू होता. त्याच्या व्यक्तिमत्वावर नेमकं बोट ठेवून ' हाच तो ' म्हणता येत नसे.  आपली सारी नीतीतत्वं वेळ पडली तर तो बाजूला ठेवायचा किंवा बदलायचा किंवा विसरुन जायचा.

           युवराजाची ही श्रीकृष्ण भक्ती आंधळी नव्हती. तर आपल्या या आदर्श पुरुषाचे वागणे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी किती जुळणारे आहे ह्याचा तो सतत शोध घेत असे. राजपूत शूर आणि पराक्रमी असूनदेखील आपल्या शौर्याच्या पुराव्यासंबंधी कायम साशंक का ? राजपुतांची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान स्वत:च बलिदान करण्यातचं का मानला जायचा ? नामर्द ठरवण्याची भीती त्यांना सतत का भेडसावयची ? हे प्रश्न त्याला कायम पडत असतं.

    रणांगणात पाठ फिरवायची नाही हा राजपुतांचा बाणा. युवराजांची तत्वे मात्र  अगदी 'रणछोडदास' च्या परंपरेतली. शेपटी पायात घालून माघार घेण्यात काहीच कमीपणा नाही हे त्याला वाटत असे. कितीही चिथवलं तरी योग्य वेळेपर्यंत शांत राहणे हीच हुशारी आहे. युद्ध हा पर्यायी उपाय नव्हे तर सर्व वाटाघाटी फसल्या तरच वापरायचा अंतिम मार्ग हे त्याचं तत्व होतं. बहुतेक वेळा युद्धामुळे हाती काहीच लागत नाही आणि जिथून सुरुवात झाली आहे त्याच ठिकाणी तुम्ही येऊन पोचता. युद्ध करायचंच असल्याच आपल्या राजकीय प्रदेशात आणि अर्थिक स्थितीत प्रचंड आणि जमल्यास कायमस्वरुपी फरक पडणार असेल तरच करावे नाहीतर स्वस्थपणे घरी बसून शेजा-याबरोबर शांतीपूर्ण संबंध जोपासावेत हे युवराजांचे युद्धासंबंधीचे विचार केवळ पंधराव्या नाही तर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही अगदी समर्पक आहेत.

        यु्द्धासंबंधी इतके टोकाचे विचार असलेल्या या युवराजाकडे ईडरच्या लढाईचे नेतृत्व सोपवण्यात येते. त्यावेळी तो आपली अपारंपरिक युद्धनिती सैनिकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतं. त्या लढाईत अगदी कमीत कमी हानी होऊन राजपुतांना प्रचंड असा विजय मिळतो. त्याचे सारे सैन्य त्याला डोक्यावर घेते मात्र राज्याच्या राजधानीत त्याचं भ्याड म्हणत काळे निशान फडकवत स्वागत होतं. हा सारा अपमाण गिळून तो मेवाडच्या भल्यासाठी काम करत असतं सांडपाणी आणि पाणीपुरवठा व्यवस्था हा त्याचा सर्वात आवडीचा विषय.
     
               गटार आणि सांडपाण्याच्या निच-यासंबंधी कोणी फारशी आस्था दाखवत नाही. पण त्यावर गंभीर उपाय करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीतरी उपाय करण्याच राज्यकर्त्यांनी मनावर घेतलं नाही तर लवकरच आम्ही सारे स्वत:च्याच घाणीत वाहून जाणार आहोत.असा इशारा या युवराजानं पंधराव्या शतकात दिला होता. आज याला सहाशे वर्षे झाली तरीही या प्रश्नाकडे बघण्याचा आपल्या राज्यकर्त्यांचा दृष्टीकोण बदललेला दिसत नाही.

         आदर्श राजाचे महत्वाचे लक्षण म्हणजे त्याची दृष्टी ही काळाच्या पुढे असवी लागते. शिवाजी महाराज किंवा जे-जे आदर्श राजे होऊन गेले ते सर्व याच परंपरेतले होते. हा युवराजही याच परंपरेतसा.याची गुप्तचर यंत्रणा भक्कम होती. हिंदूकूश पर्वताच्या पलिकडे राज्य करणा-या बाबराच्या दरबारापर्यंत त्याच्या हेरांनी जाळं विणलेलं होतं. बाबराच्या रोजनिशीतल्या चिठ्टीचा अर्थ काढून तो लवकरच हिंदूस्थानावर हल्ला करणार आहे त्याचा आता हल्ला करण्याचा नाही तर दिल्लीची गादी बळकावण्याचा विचार आहे असं भाकित या युवराजाने व्यक्त केलं होतं.

        दिल्लीची राजसत्ता दुबळी झालेली असताना ती राजपुतांनी ताब्यात घ्यावी हा त्याचा सल्ला धुडकावला जातो. बाबरासोबतचे युद्ध  त्याच्या इतकी अधुनिक शस्त्रे जमा होत नाही तो पर्यंत पुढे ढकला हा त्याचा सल्लाही दुर्लक्षित राहतो. आपल्या सामर्थ्यावर फाजिल आत्मविश्वास असलेले राणा संग यांच्या नेतृत्वाखालील राजपुत सैन्य बाबराशी लढाईसाठी मैदानात उभं राहतं. युद्धात उतरण्यापूर्वी शत्रूच्या बारीक सारिक सवयींचा योग्य अभ्यास असायला हवं हा या युवराजाने दिलेला सल्ला हे राजपुत सरदार फेटाळून लावतात. परिणामी प्रचंड तयारीच्या आणि एकजिनसी अशी मुगल सैन्यासमोर या राजपूत सैन्याचा एकतर्फी पराभव होतो. भारतामध्ये मोगल सम्राज्याचा पाया रचला जातो.

             जो एक महापरक्रमी असा राजा होऊ शकला असता त्याचा एक सर्वस्व गमावलेला युवराज अशा अवस्थेत शेवट होतो.. काळाच्या पुढे बघणारा हा युवराज आपल्याला लाभला होता. मात्र त्याच्या खडतर नशिबामुळे त्याला ओळखणारा समाज या देशाला मिळू शकला नाही. युवराजच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या शोकांतिकेपेक्षा आपल्या देशाची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही एकच जाणीव किरण नगरकरांचे 'ककल्ड' वाचत असताना सतत अस्वस्थ करत असते.

Sunday, September 11, 2011

दहशतवाद विरोधी लढाई आणि अमेरिका


अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याला आता दहा वर्षे झालीत. 2001 पूर्वीही या जगात दहशतवादी हल्ले झाले. मात्र त्याचे बहुतेक उद्देश हे स्थानिक होते. एखादी राजवट उलथवून टाकणे,  तत्कालीन घटनेचा बदला घेणे किंवा एखादा प्रदेश बळकावणे हाच या दहशतवादी हल्लायांचा उद्देश होता. मात्र 9/11 च्या हल्ला हा ख-या अर्थाने जागतिक स्वरुपाचा होता.

                  सौदी अरेबिया तसेच वेगवेगळ्या मुस्लीम देशांत अमेरिका करत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात ओसामा बिन लादेन या कडव्या दहशतवाद्यांने आपल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यामातून ( ज्या संघटनेत पाकव्याप्त काश्मिर पासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान. सौदी अरेबिया, येमेन यासह काही आशियाई आणि आफ्रिकन दहशतवाद्यांचा समावेश होता. ) थेट अमेरिकेवर हल्ला चढवला. 20 व्या शतकात अमेरिकेनं अनेक युद्ध खेळली. मात्र पर्ल हर्बरवर वर जपानने केलेल्या हल्ल्याचा अपवाद सोडल्यास अमेरिकन भूमीला प्रत्यक्ष युद्धाची झळ बसली नव्हती. त्यामुळे 21 व्या शतकाच्या सुरुवातीला थेट अमेरिकेच्या गंडस्थळावर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्या काळातील अमेरिक अध्यक्ष जॉर्ज बूश आणि इतर नेत्यांची वक्तव्य वाचली तर अमेरिकेचा या हल्ल्यानं सपशेल गोँधळ उडाला होता हे सहज लक्षात येते.

               अमेरिकेच्या साम्राज्याला आव्हान देणा-या या हल्ल्याचा बदला अमेरिकेनं अगदी त्यांच्या स्टाईलने घेतला.  प्रथम अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. तालिबाननांना अफगाणिस्तानच्या बाहेर हुसकावून लावण्यात अमेरिका तेंव्हा तरी यशस्वी झाली. हाच युद्धज्वर कायम ठेवत बूश प्रशासनाने इराकवर हल्ला चढवला. इराकमधली सद्दाम राजवट संपुष्टात आली. सद्दाम हुसेनला प्रथम पकडण्यात आणि नंतर फासावर लटकवण्यात अमेरिकेला यश आलं. याच वर्षी मे महिन्यात ओसामा बिन लादेनला ठार मारुन अमेरिकेनं दहशतवाद विरोधी लढ्यातला एक मोठा टप्पा पार केलाय. अफगाणिस्तान आणि इराक जिंकले, सद्दाम आणि ओसामाला ठार मारले तरीही अमेरिकेला या  लढाईत निर्णायक यश आलेले नाही.

             दहशतवादाला मदत करणा-या प्रत्येक शक्तीविरुद्ध, देशांविरुद्ध अमेरिका युद्ध पुकारत आहे. असं दहा वर्षांपूर्वी जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यांच हे युद्ध अफगाणिस्तान, इराक आणि काही अंशी पाकिस्तान इतपतचं मर्यादीत राहिलं.  इराण, सीरिया, लेबनॉन, पॅलिस्टाईन या देशातूनही  दहशतवाद्यांना पाठिंबा मागच्या दशकात मिळतचं राहिला. मात्र त्या देशांविरुद्ध अमेरिकेनं कोणतीही लष्करी कारवाई केली नाही.

             अमेरिकेविरुद्धच्या युद्धात  आपण जिंकणार नाही याची खात्री ओसामाला नक्कीच होती. मात्र अमेरिकन नागरिकांना अस्वस्थ करण्यात, अफगाणिस्तान, इराक यासारख्या मुस्लीमबहुल देशात अमेरिकेला युद्ध लढायला लावण्यात तो यशस्वी झालाय.या युद्धामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला, दोन हजार पेक्षा जास्त अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांचे सैनिक मारले गेले तरीही अमेरिकेला इराक आणि अफगाणिस्तानवर निर्णायक यश मिळवता आलेलं नाही. या वर्षाखेरिस अमेरिेकेचे सैन्य इराकमधून बाहेर पडेल त्यानंतर इराकमध्ये  यादवी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच 2014 मध्ये  नाटोच्या सैन्यानी  अफगाणिस्तानमधून आपले समान पॅक केल्यानंतर तिथली लोकशाही राजवट कितपत तग धरु शकेल ?

        शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेसमोर सोव्हियत रशिया हा एक ठोस शत्रू होता. सोव्हित रशिया आणि सोव्हियत संघराज्यातील राष्ट्रे अशा आघाडीविरुद्ध लढयाचे आहे याची माहिती होती. मात्र या दहशतवाद विरोधी लढाईत तसे नाही. या लढाईत नेमका शत्रू कोण हे अमेरिकेला अजूनही ठरवता आलेलं नाही. ही दहशतवाद विरोधातली लढाई आहे असे जॉर्ज बूश यांनी जाहीर केलं होतं. इस्लामी दहशतावाद्यांनी अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेणे आणि संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकेचे रक्षण करणे हा अमेरिकेचा उद्देश होता. परवा सद्दाम हुसेन आणि इराक  काल ओसाम बिन लादेन आणि अलकायदा अमेरिकेचे या लढाईतले  शत्रू होते. हे शत्रू तर मारले गेलेत. मात्र तरीही अमेरिकेचे भय संपलेले नाही. हमास, हिजबूल्लाह आणि इराण हे अमेरिकेचे जूने शत्रू हे 9/11 पेक्षा आज अधिक सशक्त झालेत. हमासचे गाझा पट्टीवरचे वर्चस्व कायम आहे. येत्या निवडणुकीतही पुन्हा एकदा हमास जिंकण्याची शक्यता आहे.  हिजबूल्लाहचे लेबॉनॉनवरची पकड आणखी घट्ट झालीय. तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणनं आपली लष्करी शक्ती वाढवलीय इराण बहुधा अण्वस्त्र सज्जही झालाय.

         या जुन्या शत्रूंबरोबरच आणखी एका  शत्रूची चिंता आता अमेरिकेला करावी लागणार आहे ती म्हणजे पाकिस्तान. गेल्या 60 वर्षात अमेरिकेच्या मदतीवर आपले अर्थकारण चालवणा-या देशातली बहुस्ंख्य जनता आज अमेरिकेच्या विरोधात आहे. 20 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला पाकिस्तान आज जागतिक दहशतवादाचे नंदनवन आहे. संपूर्ण जगभरात चाललेल्या दहशतवादी कारवायांचे कोणते ना कोणते कनेक्शन पाकिस्तानशी जोडलेले असते. अस्थिर सरकार, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, राजकीय महत्वकांक्षा असलेले लष्कर, आणि जिहादी कारवाई करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेली धर्मांध जनता ही जागतिक विद्धवंसाला कारणीभूत ठरु शकेल अशी सूपीक परिस्थिती पाकिस्तानात आहे.

           त्यामुळे आज 9/11 ऩंतर दहा वर्षांनी कदाचित अमेरिकेचा भूभाग अधिक सुरक्षित झाला असेल. मात्र ज्या पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाई भागात अमेरिका ही लढाई लढत आहे त्या ठिकाणी अमेरिकेची परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसलीय. जगातली एकमेव महासत्ता होण्याच्या महत्वकांक्षेनं झपाटलेल्या अमेरिकेसाठी ही परिस्थिती नक्कीच अभिमानास्पपद नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय रंगमंचावर वाटेल तशी टोपी फिरवणे आणि अगदी कोणत्याही स्तराला जाण्याची नेहमीच तयारी असणा-या अमेरिकेच्या आजवरच्या धोरणामुळेच या देशावर ही परिस्थिती ओढवली आहे.

                संकट आली की त्यामधून उसळी मारयची आणि आपल्या शक्तीशाली सामर्थ्यानं जगाचे डोळे दिपून टाकयचे हा अमेरिकेचा आजवरचा इतिहास आहे. 19 व्या शतकातील अमेरिकन यादवी, 1929 ची महामंदी, दुसरे महायुद्ध, कोल्ड वॉर यासारख्या प्रत्येक घटनांमध्ये ह्या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला झाले आहे. आता आपल्या पल्लेदार भाषणांमधून Yes We Can चा नारा देत अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले बराक ओबामा पुन्हा एकदा या 'ग्रेट अमेरिकन पॉवर' चे दर्शन जगाला घडवून देतात का हा खरा प्रश्न आहे.
          

Friday, August 26, 2011

अण्णांचे आंदोलन आणि लोकशाही व्यवस्था


दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य
ते काढाया यत्न करावे यातच जीवन साफल्य .
       
  अशा प्रकारच्या ओळी आपल्यापैकी अनेकांनी कित्येकदा वाचल्या असतील. त्यावर पोटतिडकीने चर्चा केली असेल, शोधनिंबधही लिहले असतील..पण केवळ वाचन,चर्चा शोधनिबंध लिहून हा विषय थांबत नाही. आपल्या देशाची आपल्या बांधवांची आज जी अवस्था झालीय ती बदलली पाहिजे...ही अवस्था ज्यांनी केली त्यांना शासन व्हावे किमान त्यांना जरब बसावी यासाठी काही तरी केलं पाहिजे यासाठी पुढाकार घेणारे यासाठी मरमर करणारे फारच थोडे आहेत. थोडक्यात काय तर शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात हीच मानसिकता असलेल्या या देशात अण्णा हजारे नावाचा शालेय शिक्षण ही पूर्ण न झालेला 76 वर्षांचा खेडूत देशातील भ्रष्टाचार संपुष्टात यावा यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारतो. मराठी मिश्रीत हिंदीमध्ये  बोलणा-या अण्णांच्या शूद्ध आचार , शूद्ध विचार, समर्पण, त्याग या सारख्या शब्दांची या 120 कोटींच्या देशाला भूरळ पडते..कोणतेही प्रलोभन, धाक न दाखवता या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी लोक जमतात ही खरच अतिशय अविश्वसनीय गोष्ट आहे.

                या अविश्वसनिय गोष्टी सुरु असतानाही काही गोष्टी मात्र अत्यंत अपेक्षेप्रमाणे सुरु आहेत. अण्णा हजारे कसे हट्टी आहेत...त्यांच्या साध्या इमेजचा फायदा घेत केजरीवाल,किरण बेदी  आपला छुपा एजंडा कसा राबवतायत, भाजपला सत्तेमध्ये आणण्यासाठी रा.स्व.संघ अण्णांचा वापर करतंय, अण्णांचा लोकपाल ही एक कशी फॅंटसी आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या आंदोलनामुळे देशाच्या सार्वभौमं संसदेला कसा धोका निर्माण झालाय...हे आंदोलन लोकशाही व्यवस्थेसाठी कसे घातक आहे असा प्रचारही आपल्या देशातील काही मंडळी अगदी प्रामाणिकपणे करतायत. महेश भटसारख्या भंपकांनी अण्णा हजारेंची तुलना काश्मिरमधले फुटीरतावादी नेते गिलानीशी केली. तर वादग्रस्त आणि बेछूट बोलण्यामध्ये दिग्विजय सिंगांचे महिला रुप  असलेल्या अरुंधती रॉयनी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना अण्णा हजारे गप्प का होते ? असा सवाल उपस्थित केला.  टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी अण्णांनी त्यांचे कौतुक कुठे केले ? म्हणून माझा या आंदोलनाला विरोध आहे असे अजून कोणत्या क्रिकेटपटूनी म्हंटले नाही हे निश्चितच कौतुकास्पद मानावे लागेल.

      गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या पस्पर विरोधी मत-मतांतरामुळे माझ्या डोक्याचा पार 'केमिकल लोचा' झाला होता. ही दुसरी क्रांती आहे की भाबडा आशावाद ? /यामध्ये टीम अण्णांचा निस्वार्थीपणा आहे की आक्रस्ताळेपणा ? ज्या लोकशाही तत्वांचा मला अभिमान आहे...ज्या सांसदीय पद्धतीचा अभ्यास मी अगदी आवडीने केलाय....त्याला यामुळे खरचं धक्का बसेल ? तिचे महत्व कमी होईल ? महेंद्रसिंग टिकैत, शरद जोशी यांच्या एकेकाळच्या आंदोलनाप्रमाणेच अण्णांच्या आंदोलनाची अवस्था होईल ? सर्वात महत्वाचे म्हणजे लोकपाल हे देखील भ्रष्टाचार करण्याचे नवे माध्यम बनेल का या सारख्या प्रश्नांनी मी काहीसा गोंधळलो होतो. मात्र गेल्या काही दिवसात याबबतची वेगवेगळे साहित्य वाचले. मित्रांशी चर्चा, वाद-विवाद केले आणि त्यानंतर अण्णा  हजारेंचे आंदोलन हे देशाच्या भल्यासाठी आवश्यक आहे तसेच यामुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नसून उलट ती सशक्तच होईल असं माझं ठाम मत झालंय. 

           लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवले राज्य म्हणजे लोकशाही. ही व्याख्या आपण सर्वांनी शिकली आहे. आज आपल्या देशातली लोकशाही खरीच तशी आहे ?  ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यामधील बहुतेकांची  निवडणुकीपूर्वीची संपत्ती आणि पाच वर्षानंतरची संपत्ती यामध्ये एकदम फरक कसा काय पडतो ? नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी जून्या पुराण्या लूनावर फिरणारा....झोपडी वजा घरात राहणारा व्यक्ती ...तो नगरसेवक झाल्यानंतर काही वर्षातच कारमध्ये फिरु लागतो. त्याचे झोपडी वजा घराची जागा एका इमारतीने घेतली असते. हे कसे काय घडते ? जगनमोहन रेड्डींकडे अशी काय जादूची छडी आहे किंवा त्यांच्यामध्ये असे कोणते अफाट व्यवसायिक कर्तुत्व आहे की त्यामुळे ते अवघ्या पाच वर्षात 11 लाखांवरुन थेट 43 हजार कोटींचे मालक बनतात ( ही केवळ अधिकृत आकडेवारी आहे )  मधू कोडा सारख्या व्यक्ती  एखाद्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला आव्हान निर्माण करणारे घोटाळे करतात... रेड्डी बंधू आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर येदीयुराप्पा सरकार आणि कर्नाटक भाजपला आपल्या दावणीला बांधू शकतात..आदर्श, लवासा सारख्या प्रोजेक्टच्या फाईल झटपट सरकतात...पण मावळमधल्या शेतक-यांचा आक्रोश ऐकायला सरकारला वेळ नाही ही अशी आणि याप्रकारची न संपणारी उदाहरणे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. तरीही आपण ती सहन कितपत करायची  ? जयललिता, शिबू सोरेन यासारखे घोटाळेबाज नेते वारंवार मुख्यमंत्री होतात. राजकीय गरज आणि स्वार्थापोटी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच राष्ट्रीय पक्षात चढाओढ असते.  इतकचं काय तर लालूप्रसाद यादव सारखे नेते भ्रष्टाचार ही देशाला लागलेली किड आहे  असं सांगत संसदेमध्ये भलं मोठं भाषण ठोकतात. हे सारे आपण संसदीय लोकशाहीच्या, लोकप्रतिनिधींचे हक्क यासाऱख्या गोंडस आणि पुस्तकी तत्वांसाठी आपण किती दिवस सहन करायचे ?

                    याबाबतचे वाचन करत असताना श्री अभय फिरोदीया यांच्या लेखातला एक किस्सा मला इथे टाकायचा मोह होतोय  फिरोदीया यांना वीस वर्षापूर्वी त्यांच्या एका राजकारणी मित्राने ( जो मंत्रीही होता ) त्यांनी राजकारण्यांविषयी तीन गृहितके सांगितले आहेत पहिले - राजकारणी मंडळी लोकसेवेसाठी सत्तेवर येत नाहीत, तर स्वत:ची सत्ता वाढविण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी ते सत्तेवर येतात. दुसरे - फक्त स्वत:ला  फायदेशीर ठरणारे कायदेशीर किंवा प्रशासकीय पाऊलच ते उचलतात. तिसरे प्रशासकीय किंवा संसदीय पातळीवर त्यांनी उचललेले कोणतेही पाऊल जनतेच्या फायद्यासाठीच टाकले आहे. असे चित्र निर्माण करतात, तसेच दुर्बल तळागळातीले लोक, अल्पसंख्याकांसाठी हे पाऊल उचलल्याचाही दावाही ते करतात   ( मग तसे असो किंवा नसो ) चौथे अलिखित गृहितकही फिरोदीया यांनी या लेखात लिहले आहे. ते म्हणजे तर्कदृष्ट्या पटणारी, देशाच्या हिताची नैतिकतेची सूचना मांडली तरी त्या सूचनेचा हे नेते गांभीर्याने विचार करत नाहीत. अशी सूचना राजकीय यंत्रणेबाहेरच्या व्यक्तींकडून किंवा सूजाण नागरिकांकडून आली, तरी ती दुर्लक्षिली जाते. अशा लोकांना राजकारणी बिनकामाचे किंवा तुच्छ समजतात.

    आपल्या राजकर्त्यांचा कारभार हा फिरोदियांनी मांडलेलेल्या या गृहितकांवरच आधारलेला आहे. निवडणूक व्यवस्थेतील सर्व त्रूटींचा फायदा घेत ज्यांना एकूण मतदार संख्येच्या 15 ते 20 टक्के मतं मिळाली आहेत ती आपली लोकप्रतिनिधी असतात. मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर दादा, भाई म्हणून मिरवणारी ही मंडळी आपले प्रतिनिधी म्हणून देशाच्या कायदेमंडळात बसतात आणि कायदे पास करतात अशा वेळी जनलोकपाल सारखे यांच्या नरडीचा घोट घेणारे आणि आपली दुकानदारी बंद करणारे विधेयक ही मंडळी कसे संमत करतील ?

    टीम अण्णांनी तयार केलेले लोकपाल विधेयक संमत झाले तर संसदेचा अवमान होईल असा प्रचार सध्या केला जातोय. आपल्या सरकारला सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेतेखालील परिषदेने तयार केलेला मसुदा चालतो. या परिषदेच्या सदस्यांचा कायदानिर्मितीमध्ये सक्रीय सहभाग असतो. सोनियांच्या स्वयंसेवी संस्थांना जो न्याय आहे तो अण्णांच्या स्वयंसेवी संस्थेला का नाही ?

  सध्या देशात असंख्य घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. या घोटाळ्यांमध्ये गुंतलेले सर्वपक्षीय नेत्यांचे चेहरे उघड होतायत तरीही ही बडी धेंड अजूनही उजळ माथ्यानं समाजात वावरतात. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आजवर कोणत्या लोकप्रतिनिधीला कायमचे जेलमध्ये राहवे लागले आहे ?

  लोकपाल बिलातील वादग्रस्त तरतूदींवर चर्चा होऊन त्यामध्ये आवश्यक बदल घडले पाहिजेत. मात्र हे बिल संसदेमध्ये सादर न करण्याचा हट्ट सरकारने का धरला ? हा हट्ट सरकारने 16 ऑगस्टपूर्वी सोडला असता तर अण्णांचे उपोषण झालेच नसते. भ्रष्ट व्यक्तींना जरब बसवण्यासाठी सरकारही गंभीर आहे असा संदेश ही यामधून गेला असता. मात्र मनमोहन सरकारने ही संधी दवडलीय. या कायद्यामुळे भ्रष्टाचार शंभर टक्के संपणार नाही मात्र भ्रष्ट व्यक्तींना जरब निश्चित बसू शकेल. एकट्या टी.एन. शेषनने निवडणूक आयोगाची जरब काय असते हे देशाला दाखवून दिलं. कॅगचा वार्षिक रिपोर्ट किती परिणाम करु शकतो हे विनोद रायनं सिद्ध केलंय. शेषन, विनोद राय यासारखे काम लोकपालही करु शकतो.
    
     पंतप्रधान आणि न्यायव्यवस्था लोकपालाच्या कार्यकक्षेत येता कामा नये हा हट्ट कशासाठी ? भारतीय राज्यघटनेनुसार देशाची जनता सार्वभौम आहे. तर मग या सार्वभौम नागरिकांचे जगणे असह्य करणा-या प्रत्येकांना वेळोवेळी जाब विचारायचा अधिकार त्यांना असायला हवा. देशाच्या राजकीय संस्कृतीचे संपूर्ण चित्र यामधून बदलू शकते. ते चित्र बदलू नये यासाठीच सध्या आटापिटा सुरु आहे.  

     स्वत:च्या फायद्यासाठी कायदे करणारी व्यवस्था बदलण्याची आता गरज आहे. लोकशाही व्यवस्थेत संसद सर्वोच्च आहे, संसद सदस्य नाही. सरकार सर्वोच्च आहे,  सरकार चालवणारे नाही. त्याचप्रमाणे लोकपाल सर्वोच्च, लोकपाल ही यंत्रणा चालवणा-या व्यक्ती नाही हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. अण्णा हजारेंनी दुस-या स्वातंत्र्य लढ्याची जी हाक देशाला दिली आहे त्यामधून याच प्रकारचे स्वातंत्र्य देशाला अपेक्षित आहे. देशातल्या जनतेला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सुरु असलेले हे आंदोलन लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक कसे असू शकेल ?           
Related Posts Plugin for WordPress, Blogger...